* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A FICTIONAL WORK BY DHRUV BHATT, IN THE FORM OF MEMOIRS OF A YOUNG CIVIL ENGINEER DEPUTED TO SURVEY AN ARID COASTAL PART OF SAURASHTRA. THE NOVEL HAS AT ITS CENTRE THE QUEST FOR A FINE BALANCE BETWEEN A TRADITIONAL, NON-SCIENTIFIC, FAITH-DRIVEN SOCIETY AND CYNICAL, PROFIT DRIVEN ECONOMY. WEAVING TOGETHER THE CHARACTERS, REAL AND IMAGINARY, EVENTS AND LEGENDS FROM THE FOLKLORE OF THE REGION, DHRUV BHATT HAS IMPARTED HIS OWN SENSITIVITY TO THE LEADING CHARACTERS AND AT THE SAME TIME NARRATED A GRIPPING STORY.
रात्री त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो. आज या अगदी नवख्या जागेची ओळख झाली. एका संध्याकाळच्या या ओळखीत असं काही अनुभवलं जे माझ्या आयुष्याचा न विसरणारा भाग बनून गेलं. छोटी जानकी माझी जणू खूप वर्षांच्या ओळखीची वाटू लागली! उद्या मी इथून पुढे जाईन, पुन्हा कधी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SAGARTEERI # DHRUV BHAT# ANJANI NARAVANE# SAMUDRA# BHARATI# KHADAK# SHANKHSHIMPALE# KHADI# KINARA# BANDAR# KHADAK# OHOTI# RETI# KHARAT# NARALI# DARIYA# SAGAR# DIVADANDI# SABUR# NOORABHAI# KRISHNA# SHYAMJI SARPANCH# HADABHATT# BANGALI BABAJI# AVAL
Customer Reviews
  • Rating StarRavindra Ogale

    સમુદ્રાન્તિકે या ध्रुव भट्ट यांच्या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद - `सागरतीरी` - वाचला. त्याबद्दल थोडंसं. भट्ट यांनी विविध पुस्तकांतून गुजरातच्या निरनिराळ्या भागांचं, तिथल्या-तिथल्या समाजजीवनाचं अत्यंत प्रगल्भ दर्शन घवलेलं आहे. तत्त्वमसि, अकूपार या कथा अनुक्रमे नर्मदा खोरं आणि गीर अभयारण्याच्या परिसरात घडतात तर सागरतीरीमध्ये भट्ट आपल्याला सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर नेतात. त्यांच्या या कादंबरींमध्ये काही समान दुवे आहेत. `सागरतीरी`तही कथानायकाचं नाव शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. या निनावीपणामुळे ती कथा प्रथमपुरूषातूनच वाचली जाते आणि vicariously ती कथा आपण आपोआपच जगतो. संपन्न अनुभव म्हणजे काय याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. ती कथा तुमची, माझी प्रत्येक वाचणाऱ्याचीच होऊन जाते. भट्टांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही ‌निसर्गाप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यातल्या समस्त जैवविविधतेसह आनंदानं एकत्र जगणाऱ्या, साध्या पण उदात्त, रूढार्थाने आर्थिकदृष्ट्या गरीब पण सुखासमाधानाच्या बाबतीत अतिशय संपन्न राहणीमान असलेल्या लोकांच्या आयुष्याचे फार जवळून आणि सुंदर दर्शन त्यांनी घडवलं आहे. अकूपारची सांसाई, तत्त्वमसिची सुप्रिया आणि सागरतीरीची अवल. मुक्त-निर्बंध, खंबीर, स्वाभिमानी, निःस्वार्थी आणि स्पष्ट विचारांची नायिका हेही भट्ट यांच्या कादंबरींचं लक्षण. अवल अशीच आहे, पुस्तकी शिक्षण थोडंफारच झालेली पण व्यवहार, धर्म, भावना, नैतिकता या साऱ्या गोष्टींची तिला व्यवस्थित जाण आहे. तसं पाहायला गेलं तर जेमतेम सव्वाशे पानांच्या या कथेत अवल मोजक्याच वेळी आपल्याला भेटते पण त्यातही तिचं पात्र लेखकाने इतकं सुबक रेखाटलं आहे की हिला तर आपण नीटच ओळखतो असा भास होत राहतो. त्यांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही नायक-नायिकेमध्ये असणारं एक अव्यक्त, गूढ, आदरणीय नातं दिसून येतं. म्हटलं तर ठसठशीतपणे जाणवणारं, नि काही प्रसंगात हळुवारपणे काळजाला हात घालणारं असं. या नात्याचं वर्णन इतकं प्रभावशाली आहे की अवल नि नायकाचा शेवटचा संवाद संपताना, हा अवलचा कथेतला शेवटचा सहभाग आहे हे जाणवत असल्याने हुरहूर लावून जातो. कथेची सुरुवात तिथल्या परिसराप्रमाणे थोडी रूक्ष (कथानायकाच्या त्यापरिसराप्रति सुरूवातीला असणाऱ्या भावनांमुळे कदाचित) भासते. पण जसजसे नायकाचे त्या परिसराशी, तिथल्या लोकांशी बंध जुळत जातात तसा वाचकही अलगद बांधला जातो. आणि हळूहळू चाललेली कथा शेवटच्या वादळाच्या प्रकरणात सुरेख वेग घेते आणि वाचकाला crescendo चा अनुभव होतो. आणि शेवटाला या वादळी अनुभवातून निसर्गाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या जाणिवांची आणि या सगळ्यांच्या एकसामायिक जगण्याची नायकाला पटलेली ओळख व त्यातून आपणही इथलेच होऊन गेल्याची त्याची भावना अशा समतोलानं कथेचा शेवट करत लेखकाने हा काहीसा Ascending storytelling (which has a rather scholarly name of `Fichtean curve`) परिणाम फार सुंदर साधला आहे. बाकी सबूरिया, सर्वण, किष्ना तांडेल, बेली, मुखिया, हादाभट्ट, बंगालीबाबा आणि मुख्य `अनंतमहाराज` दर्या या लोभस पात्रांना भेटण्याकरता पुस्तक वाचा. सागरतीरी मूळ पुस्तक સમુદ્રાન્તિકે : ध्रुव भट्ट मराठी अनुवाद: अंजनी नरवणे जाता जाता: ध्रुव भट्ट हे गुजराथी साहित्याचा शाश्वत, पथदर्शी ध्रुवतारा आहेत. त्यांची तत्त्वमसि, अकूपार, अतरापि आणि आता हे सागरतीरी ही सगळी मराठीत अनुवादित पुस्तके वाचल्यामुळे त्यांचं इतर साहित्य वाचण्याची प्रबळ इच्छा होते आहे. पण इतर पुस्तके तिमिरपंथी, कर्णलोक, अग्निकन्या इ. मराठीत अनुवादित सापडत नाहीत. कुणाला कल्पना असल्यास कळवावे. अन्यथा गुजराथीतच वाचावी लागतील. ...Read more

  • Rating StarMANISH UGALE

    इंजिनिअर असलेल्या नायकाचं बोट पकडून आपण सौराष्ट्राच्या प्रवासाला निघतो. सागर किनाऱ्यावरच्या एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या मागासलेल्या प्रदेशात नायकाची नियुक्ती झालेली आहे. रासायनिक कारखाने उभे करण्यासाठी सरकारी जमिनींची मोजणी करायला तो आलाय. दूरवरच्याएका गजबजलेल्या शहरातून एकदम या वैराण प्रदेशात येऊन पडल्यावर तो काहीसा निराश आणि अस्वस्थ झाला आहे. या भूमीत पाऊल टाकल्यापासून जसा अभावग्रस्त जीवनाला तो सामोरा जातो आहे, त्याच जोडीला त्याला भेटत आहेत ती इथली अनोळखी माणसावर सुद्धा जीवापाड प्रेम करणारी माणसं. ज्यांच्या घरात खायला दाना नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, आरोग्याच्या सोयी तर सोडाच पण होड्या, गाढवं आणि एखादा घोडा याशिवाय वाहतुकीची साधनं नाहीत अशी वंचित माणसं इतकी आनंदी आणि उदार मनाची कशी? हे पाहून नायक चकित होतो. नायकाला रहाण्यासाठी आणि ऑफिस थाटण्यासाठी एक सरकारी हवेली मिळाली आहे. समुद्रकिनारी इतक्या उजाड परिसरात उभ्या असलेल्या या एकमेव वास्तूच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. हवेलीवर साहेबाला (नायकाला) मदत करण्यासाठी काही स्थानिक स्टाफ नेमलेला आहे. अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेला नोकर सबूर, या वैराण प्रदेशात निगुतीनं वाढवलेल्या बाभळींवर आणि पक्ष्यांवर प्रेम करणारा जंगलअधिकारी नूरभाई, दर्यादेव येऊन राहतो त्या एका भेंसल्यावर की जिथे कोणीही जायची हिंमत करत नाही अशा ठिकाणी जाऊन येणारा शूर तांडेल किष्ना अशी काही इंटरेस्टिंग पात्रं साहेबाला या प्रदेशात भेटतात. सगळ्यात रोचक पात्रं आहेत ती म्हणजे बंगालीबाबा आणि अवल. किड्यामुंग्यांपासून समुद्रासोबत सुद्धा बोलू शकणारा बंगालीबाबा हा एक गूढ मनुष्य आहे. निसर्गाची भाषा त्याला अवगत आहे. अवल ही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्त्री आहे, ती कोण आहे, हवेलीशी तिचा काय संबंध आहे हे जाणून घेणं फार रंजक आहे. स्थानिक जीवनाशी जुळवून घेताना साहेब हळूहळू इथलाच एक होऊन जातो. या भूमीवर, समुद्रावर आणि माणसांवर त्याचा जीव जडतो. ही भावनाशीलता त्याला `नेमून दिलेलं काम करू नकोस` असा आंतरिक साद घालू लागते. निसर्ग आणि मनुष्यजीवन यांचा सहसंबंध कथानकातून हळुवारपणे उलगडताना लेखकाने केलेलं सुरेख चिंतन या कादंबरीतून आढळतं. हे केवळ कथेसाठी कथा सांगणं नाही. घटनांतल्या `मधल्या` जागांतून जीवनाकडे बघण्याचा लेखकाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. काम पुढे नेऊ की राजीनामा देऊ या द्वंद्वात सापडलेला साहेब पुढे काय करतो? समुद्री वादळाबद्दल बंगालीबाबाने वर्तवलेल्या भाकिताचं पुढे काय होतं? साहेबाची गूढ भेंसल्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होते का? कादंबरी वाचताना ही सारी रहस्ये उलगडत जातात. बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर भव्य निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षा माणूसप्राणी बाळगून असतो. पण सर्वव्यापी, सर्वपोषी आणि सर्वनाशी क्षमता बाळगून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, त्याला समजून घेतल्यावर माणसाच्या वृत्तीत, विचारांत कसा बदल होत जातो याची ही गोष्ट आहे. थोर गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या `समुद्रान्तिके` या गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचा अनुवाद अंजली नरवणे यांनी `सागरतीरी` नावाने केला आहे. साहित्य अकादमी मिळण्यासारखं या कादंबरीत काय विशेष आहे हे ती वाचायला घेतल्यावर लगेचच लक्षात येतं. ध्रुव भट्ट हे गुजरातीतले फार महत्त्वाचे लेखक आहेत. कथासूत्राला व्यक्तीकडून समष्टीकडे नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कथानक `प्रेडिक्टेबल` नसणं हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणखी गंमत तर यात आहे की ध्रुव भट्टांच्या कादंबरीतील नायकाचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि तरीही तो आपल्याला आपल्यातलाच एक वाटत राहतो. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी आणि जीवनाची भव्यता दाखवणारी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे. - मनीषा उगले (एका सन्मित्राने ध्रुव भट्ट यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली, त्याच्या ऋणात रहायला मला आवडेल.) ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 20-07-1997

    अनवट वाटेवरचा अनुभव… गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची ‘समुद्रान्तिके’ ही लेखाकृती रुढार्थाने कुठल्याच साहित्यप्रकारात न मोडणारी. कथेचा एकजिनसी अनुभवतीत नाही आणि कादंबरीचं बहुआयामित्वही तीत आढळत नाही, त्यामुळेच असेल बहुधा सोय म्हणून तिला ‘कादंबरी’ प्रकरात समाविष्ट केलं गेलं आहे. ‘सागरतीरी’ या नावाने अंजली नरवणे यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे. ‘सागरतीरी’त सलग असं कथानक नाही. आहेत ते विलक्षण अनुभव आणि विविध व्यक्तिरेखांचे तुकडे ! ज्यांची कधी सुसंगत वाटणारी, पण बरीचशी विस्कळीत अशी सांधेजोड करण्यात आली आहे. इंजिनियरिंगची पदवी पदरात असूनही दोन वर्षे बेकारीत काढलेल्या एका तरुण, संवेदनशील इंजिनियरच्या वाट्याला आलेल्या अकल्पित अनुभवांचं हे संचित आहे. बेकारीने संत्रस्त झालेल्या या तरुणाला एके दिवशी अनपेक्षितपणे एका सरकारी प्रकल्पात काम मिळते. लाभ-हानीचा यत्किंचितही विचार न करता तो ही नोकरी स्वीकारतो आणि त्या बिंदूपासून त्याच्या आयुष्यातील एका अज्ञाताच्या प्रवासाची सुरुवात होते. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील विरळ लोकवस्ती असलेल्या अत्यंत मागास प्रदेशात सरकारला एक रासायनिक कारखाना उभारावयाचा असतो त्यावर प्रकल्प अभियंता म्हणून त्यांची नेमणूक होते. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करुन ती संपादन करणं आणि प्रकल्प अहवाल तयार करणं हे त्याचं काम असतं. शहरी संस्कृती, सोयी-सुविधांपासून शेकडो मैल दूर आणि पदोपदी येणाऱ्या असंख्य अडचणींचा सामना करत त्याला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. याची जाणीव तिथे रुजू होण्यापूर्वीच त्याला होते. प्रारंभी तर, या अशा सर्व तऱ्हेच्या अभावांशी दोन हात करत आपण आपलं विहित काम कसं पुरं करणार, असा प्रश्न त्याला पडतो, त्यापेक्षा ‘नको हे काम’ म्हणून आपल्या जीवाभावाच्या माणसांत परतलेलं काय वाईट, असा टोकाचा विचारही क्षणभर त्याच्या मनात आपली बेकारीतील दोन वर्षे आठवतात आणि भरकटणारं त्याचं मन ताळ्यावर येतं. शहरी कोलाहलापासून दूर शांत निसर्गात, कोणतीही तक्रार न करता जगणारी तिथली आनंदी वृत्तीची माणसं पाहिल्यावर तर त्याचं कुतूहल भरलं मन मागे न फिरता पुढं पुढंच जायला त्याला भाग पाडतं. कळत-नकळत तोही त्यांच्यात गुंतत जातो. नोकरीवर रुजू होण्याचा प्रवासातच त्याला इथल्या प्रदेशाची, साध्या - सरळ जीवनपद्धतीची, वैचित्र्याचा परिचय देणाऱ्या माणसांची, त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची ओळख होते. नंतर तीन वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात त्याला माणसांचे असंख्य नमुने पाहायला, अनुभवायला मिळतात. कोणत्याही पाशांत स्वत:ला अडकवून न घेता काहीसं दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या सबूरची एकमात्र इच्छा आहे ती - स्वत:च्या मालकीच्या (लहानशा का होईना) जमिनीच्या तुकड्याची ! पण तोही त्याच्या नशिबी नाही. या एकाच जीवनध्यासाने पछाडलेला सबूर कथनायकाकडून मिळालेल्या नापीक, ओसाड जमिनीच्या तुकड्यानेही कृतार्थ होतो. तीच गोष्ट नूरभार्इंची. जंगल खात्यातला हा माणूस ! सर्वार्थाने पशु-पक्ष्यांच्या जगातच ते वावरतात. त्यांच्याच भाषेत बोलतात. बंगाली बाबाजी ही आणखी एक वल्ली. निसर्गाशी त्यांची अतूट नाळ जोडली गेली आहे. त्यांच्या फटकळपणातूनही माणुसकीचा निर्मळ झराच वाहात असतो. बेटावरचा धाडशी खलाशी किष्ना हे तर अजबच रसायन. ‘भीती, अशक्य’ असले फालतू शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीतच. तुफानाला सामोरं जातानाही त्याचं अप्रूप त्याला वाटत नाही. तो त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे जणू ! इथले शामजी सरपंच हे या मातीतच घडलेलं एक धीरोदात्त व्यक्तिमत्व. इथल्या माणसांचं ते खरंखुरं प्रतिनिधित्व करतात. गावात सरपंच म्हणून प्रतिष्ठित जीवन जगणारे शामजी उन्हाळ्यात मात्र इतरांबरोबर मोलमजुरीसाठी वणवण भटकतात, त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. ‘सागरतीरी’ त एक व्यक्ती मात्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसूनही सर्वव्यापी होऊन राहिलीय. ती म्हणजे हादा भट्ट! संपूर्ण कथानकभर हादा भट्टांबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक राहतो. तीच गोष्ट अवलची! या लोकविलक्षण स्त्रीचं वागणं-बोलणं-व्यवहार वाचकाचं कुतूहल जागृत करतं. ती नेमकी कोण, कुठली या आडगावात ती कशी रुजली, तिच्या या अलिप्त जगण्याचा मतलब काय, अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ वाचकाच्या मनात उठतं, त्याची उत्तरं जरी कादंबरीच्या शेवटी मिळत असली तरी ती मिळेपर्यंत उगीचच बेचैन व्हायला होतं. निसर्गाशी एकरुप झालेल्या या निरनिराळया मुशीतील वाटाव्यात अशा पण अंतर्यामी निर्झरासारख्या निर्मळ व्यक्तींचा कथानायकाला परिचय होत जातो. त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवाद-विसंवादातून आपणही हळुहळू अंतर्बाह्य बदलत चाललो आहोत, याची जाणीव त्याला होते. ‘माणूस’या शब्दाला अर्थ देणाऱ्या खऱ्याखुऱ्या माणसांना भौतिक प्रगतीच्या वरवंटयाखाली आपण उद्वस्त करायचं का, हा प्रश्न त्याचा पिच्छा पुरवतो. कामातलं लक्ष उडतं. मन द्विधा होतं. बंगाली बाबा त्याची मन:स्थिती ओळखतात. त्याचं वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात. त्यांच्याशी बोलल्यावर त्याच्या मनात घोंघावणारं वादळ शांत होतं आणि निश्चिंत होऊन तो आपल्या कामाला लागतो. चाकोरीबद्ध कथानकाची अपेक्षा ठेवून ‘सागरतीरी’ हाती घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच येईल. कारण ‘सागरतीरी’ हा एक अनवट वाटेवरचा अनुभव आहे. कथानकच नसल्याने यातल्या व्यक्तिरेखाही अचानक येतात आणि गायब होतात. या व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे मात्र मनावर ठसतात. अपरिचित प्रदेश, तिथली लोकसंस्कृती आणि विलक्षण माणसं यांचं दर्शन घडवणारी ‘सागरतीरी’ कोणताही पूर्वग्रह मनी न बाळगता वाचल्यास वाचकाला अनोख्या जगात निश्चितच नेईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more