* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAHASAMRAT ZANZAVAT
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258358
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2022
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE STORY OF CHHATRAPATI SHIVAJI IS FLAMBEAU WHICH INSPIRES INDEPENDENCE, LIBERTY AND SOVEREIGNTY. FLAMES OF HIS REIGN HISTORY ARE ENLIGHTENING THE MAHARASHTRA FOR CENTURIES. THIS CRESSET OF OUR MAHARAJA IS PENNED DOWN BY OUR OWN RENOWNED AUTHOR VISHVAS PATIL. ‘JHANJHAWAT’ IS THE FIRST BOOK IN HIS NOVEL SERIES ‘MAHASAMRAT’- CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ BIOGRAPHY. THE BOOK IS ABOUT THE PHENOMENA WHICH BOWED THE SEED OF ESTABLISHING OWN EMPIRE IN SHIVAJI MAHARAJA’S MIND. THE BOOK TELLS THE UNKNOWN HISTORY OF MARATHA’S PRIOR TO SHIVAJI MAHARAJA’S BIRTH. IT ALSO INCLUDES JIJAU-SHIVAJI MAHARAJ BIJAPUR TOUR, HIS EARLY TRAINING UNDER GUIDANCE OF SHAHAJI RAJE. THESE ASPECTS OF THE HISTORY WILL BE ENTIRELY NEW AND OVERWHELMING FOR THE READERS, NO DOUBT ABOUT THAT.
छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAHASAMRAT #ZAZAVAT #VISHWASPATIL #CHATRAPATIVISHWASPATIL #NOVEL #SHAHAJIMAHARAJ #JIJAU
Customer Reviews
  • Rating StarAbhiram Bhadkamkar

    महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more

  • Rating Starअपूर्व मराठे.

    नुकताच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. कादंबरीची सुरुवात शहाजीराजे भोसले ह्या व्यक्तिमत्वापासून होते शहाजी राजांचा पराक्रम, त्यांची धोरणी बुद्धी, लष्करशक्ती आणि मराठ्यांचे स्वतंत्र तख्त निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्या भोवतीचे त्यांचे अटीतटीचे प्रयत्न ादंबरीची सुरुवात करते. जिजाऊमासाहेब त्यांची मानसिकता आणि त्यांनी उरी बांधलेली स्वप्ने आणि आपले पती शहाजी राजे ह्यांना दिलेली साथ कादंबरीला भावनिक रूप आणते. लखोजीराव जाधव, मलिक अंबर, ही अनेक पात्रे व त्यांची वर्णन वाचताना ती आपल्यासमोरच आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट अगदी 360 अंशात सांगितली आहे. ऐतिहासिक कादंबरी प्रमाणे ह्यात फक्त वर्णन नाहीत लष्करी, राजकीय, प्रशासनिक, महसूली, सामाजिक, भावनिक, मुत्सद्दी अश्या अनेक तत्कालीन गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. श्री विश्वास पाटील ह्यांच्या लिखाणची खासियत म्हणजे युद्धवर्णन ते अगदी जबरदस्त शब्दात करतात. हत्यार त्याचे वैशिष्ट्य तर त्याचा वार आणि झालेली जखम सुद्धा सांगण्याची ताकत त्यांच्या लिखानातं आहे.. बंगळूर प्रांतातुन परत आल्यावर शिवाजी राजांना राज्य निर्माणकरण्यासाठी प्रेरणा कश्या महत्वाच्या ठरल्या व मावळ आणि किल्ले सुलतान का देत नाही त्यांचे गमक महाराजांनी कसे हेरले हे अतिशय वाचनीय.मावळातून मिळवलेली मदत पुरंदरची लढाई आणि हळूहळू सुरु स्वराज्याची प्रदीर्घ मोहीम. अफजल खानाचे प्रकरण अतिशय रुपक पण अभ्यासपूर्ण लिखाणाने रंगवले आहे. अगदी आपण स्वतः त्या लढाईचे साक्षीदार आहोत असच ते प्रकरण वाचताना वाटत. अफजलखानाच्या मोहिमेपर्यत शिवाजी महाराज किल्ले आणि सभोवतालची व्यवस्था लावताना दिसतात. प्रशासन, महसूल,न्याय, शेती आणि राज्यकारभार इत्यादी त्यांचे मुख्य विषय होते परंतु अफजलखानाच्या स्वारीनंतर महाराज वेगळ्या स्वरूपात दिसतात दिसतो तो त्यांच्यातला मुत्सद्दि, राजकारणी, कुठनीतीज्ञ आणि धोरणी योद्धा. अफजल खान वधानंतरच्या भागात कादंबरीचा शेवट होतो आणि आस लागते ती पुढच्या रणखैदाळाची. ...Read more

  • Rating Star१३.११.२०२२ सकाळ

    छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीच्या संघर्षमय कालखंडावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजे झंझावात. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर कादंबरी मालिकेचा संकल्प सोडला आणि त्यातला पहिला भाग म्हणजे हे पुस्तक. आतापर्यंत शिवरायांच्या पराकरमावर व जीवनावर आधारित अनेक पुस्तके आली आहेत. अजूनही काही येत आहेत. या कादंबरीमालिकेचे वैशिष्टये म्हणजे नवे पुरावे विचारात घेत लेखकाने येथे इतिहासाशी फारकत घेतलेली नाही. तसेच सत्य झाकोळले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. दंतकथांना स्थान दिलेले नाही. केवळ कल्पनेचा आधार घेतलाय तो वातावरण निर्मितीसाठी. मात्र अनेक अपरिचित ऐतिहासिक बाबींना या खंडात स्थान मिळाले आहे. शिवराय हि व्यक्ती नव्हती , तर एकाच वेळी सात ते आठ माणसांचे काम करणारी हि संस्था होती, असावं विधान पाटील यांनी मनोगतामध्ये केले आहे. याला बांधील राहून पाटील यांनी या महामालेचे लेखन केले आहे. छत्रपती शिवराय यांच्या आधी शहाजीराजांनी जे काम केले ते इतिहासात फारसे सांगितले गेलेलं नाही. मात्र हा काळ सांगितल्याशिवाय छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीचा कालखंड समजणार नाही. शहाजीराजांनी १६२४ मध्ये भातवडीची लढाई केली ती प्रत्यक्ष दिल्लीचा बादशहा जहांगीर याच्या फौजेशी, तर १६३५ मध्ये शहाजहानशी त्यांनी युद्ध केले. विजापूरच्या आदिलशाहीचे शहाजीराजांनी प्रचंड नुकसान करूनही त्याच आदिलशाहीने शहाजीराजांना सरनोबत म्हणून सन्मानाने पाचारण केले हे वेगळे उदाहरण आहे. विश्वास पाटील यांनी या महाकादंबरीची रचना करताना अशा अपरिचित गोष्टींचा मागोवा घेतला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीत शहाजीराजांचे आणि जिजाऊंमातांचे कसे मोठे योगदान होते. याचा तपशील या खंडामध्ये मिळतो. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभारणीचे काम सुरु झाल्यानंतर या स्वराज्यावर मोठा आघात झाला तो म्हणजे अफजखानाच्या स्वारीने, अफजखानाच्या स्वारीने स्वराज्यापुढे मोठे आव्हान उभे केले; मात्र छत्रपती शिवरायांनी योग्य ती व्हुहरचना रचून अफजल खानाची स्वारी संपवलीच; पण अफजल खानाचा वधही केला. हा सारा घटनाक्रम याच खंडामध्ये आलेला आहे. छत्रपती शिवरायांवरील या कादंबरीत ललित लेखनाची शैली असली तरी कौटुंबिक वातावरणाला अवास्तव स्थान देण्यात आलेले नाही. इतिहासाशी जितके प्रामाणिक राहता येईल तितके राहून पाटील यांनी हा सगळा कालखंड प्रेरणादायी शब्दांत उभा केला आहे. यातील प्रत्येक प्रकरणाचे शीर्षकही लक्षवेधी आणि चपखल असे आहे. `कडोविकडीची लष्करपेरणी` हे शीर्षक ज्या प्रकरणाला दिले आहे, या प्रकरणात अफजल खानाभोवती प्रतापगडाच्या परिसरात महाराजांनी कशी व्यूहरचना केली होती त्याचा तपशील कळतो. नेताजी पालकर यांच्यावरील प्रकरणातून महाराजांच्या बरोबर किती ताकदीची माणसे होती हे लक्षात येते. बंगळूर येथे शहाजीराजांच्या तालमीत छत्रपती शिवरायांना राजधर्माचे धडे कसे मिळाले, तसेच वेगवेगळ्या लढायांमध्ये शहाजीराजांनी कोणती भूमिका घेतली, मुस्तदेगीरीने संकटावर कसा मार्ग काढला याचे मार्गदर्शन शिवरायांना या काळात मिळाले. `झंझावात` या पहिल्या खंडात निम्म्यापेक्षा जास्त भाग शहाजीराजांनी विविध लढायांमध्ये केवढा मोठा पराक्रम केला होता त्याचा तपशील कळतो. इतिहास हा जसेजसे नवेनवे संशोधन होईल तसतसा उलगडला जात असतो. गेल्या शंभर वर्षात छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर अनेक पुस्तके अली; मात्र जास्तीत जास्त नव्या संशोधनाचा समावेश करीत, तसेच वस्तुनिष्ठ भूमिका घेत केवळ भाषेच्या प्रेमात न पडत ऐतिहासिक सत्य मांडण्याचा प्रयत्न विश्वास पाटील यांनी कादंबरी मालेच्या लेखनात केला आहे. जवळजवळ २५० पेक्षा जास्त किल्ल्यांना पाटील यांनी भेट दिली आहे. शिवचरित्राचे अभ्यासक व इतिहास संशोधक विविध बखरींचा ,तसेच परदेशी इतिहासकारांनी नोंदविलेल्या तपशिलाचा सांगोपांग विचार करून महाराजांच्या जडणघडणीचा काळ या खंडात पाटील यांनी मांडला आहे. ...Read more

  • Rating Starसुनील माने, पुणे

    छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की रणजीत देसाई यांची “श्रीमान योगी”, बाबासाहेब पुरंदरे यांची “राजा शिवछत्रपती”, शिवाजी सावंत यांची “छावा”, गो नि दांडेकर यांची “कादंबरीमय शिवकाल” या कादंबर्या हमखास आठवतात आणि सर्व माझ्या आवडत्या आहेत. या कादंबर्या वाचताा वाचक शिवकालात जातो. एक एक प्रसंग वाचताना अंगावर रोमांच उभे रहातात. छाती गर्वाने फुगून येते. छत्रपती शिवरायांच्या विशाल व्यक्तित्वासमोर नतमस्तक होतो. पण या कादंबर्यांमध्ये जे वर्णन आहे ते किती इतिहासाला धरून आहे? शिवचरित्रात अनेक वादाचे मुद्दे आहेत. शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल तर जदूनाथ सरकार, वा सी बेंद्रे, गजानन मेहेंदळे, जयसिंगराव पवार, इत्यादि दिग्गज इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तकेही अभ्यासायला हवी. तत्कालीन बखरी, पत्राचार, विदेशी इतिहासकार, फिरंगी कागदपत्रे, यांचाही अभ्यास करायला हवा. सर्व लेखक असा अभ्यास करून लिहित असतात. पण आपण पडलो सामान्य वाचक. कादंबरीकार जे सादर करतो, ते आपण विश्वास ठेऊन वाचतो. कधी तेच सत्य ही समजतो. विख्यात लेखक पानीपतकार श्री विश्वास पाटील यांनी गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून छत्रपती शिवरायांवर कादंबरी लिहायचे ठरवले. शिवचरित्राचा विशाल पट एका कादंबरीमध्ये मावणार नाही, हे उमजून त्यांनी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर कादंबरीमाला लिहायचे ठरविले. मेहता पब्लिशिंग हाउसने हा महायज्ञ प्रसिद्ध करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. “महासम्राट-भाग पहिला-झंझावात” या नव्या कोर्या कादंबरीचा परिचय देत आहे. या कादंबरीच्या प्रस्तावनेत विश्वास पाटील सर लिहितातः- “महाराष्ट्रातील तमाम इतिहासकारांनी शिवरायांच्या जीवनाचे शिल्पकार त्यांचे महापिता शहाजीराजे यांच्या कर्तृत्वाकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. शहाजीराजे, जिजाऊ साहेब आणि शिवराय या तिघांतील नातेसंबंधाचा इंद्रधनुषी गोफ जोपर्यंत नीट अभ्यासला जात नाही, तोपर्यंत शिवपूर्वकाळ आणि शिवरायांचा बालपणाचा व जडणघडणीचा कालखंड खर्या अर्थी उभाच राहू शकत नाही.” १६२४च्या भातवडीच्या लढाईत दिल्लीकर बादशहा जहांगीरच्या फौजेशी तर १६३५च्या लढाईत बादशहा शहाजहानशी शहाजीराजे प्रत्यक्ष लढले होते. भातवडीच्या लढाईत ज्या आदिलशाही फौजेला पराभूत केले होते, त्याच आदिलशाहने विजापूरचे सरनोबत म्हणून शहाजी महाराजांना पाचारण करावे लागले! शिवरायांना शहाजीराजांनीच गनिमी काव्याची दीक्षा आणि स्वलिखित राजमुद्रा दिली होती. कादंबरीची सुरूवात जिजाऊ आपल्या माहेरी निघालेल्या. देवगिरी (दौलताबाद) किल्याला वळसा घालून पुढे निघतो त्यांचा मेणा. सिंदखेडराजाचे लखोजीराव जाधवराव दौलताबादच्या दरबारात निझामाचे मुख्य सरदार असतात, त्यांच्या गोटावर पोहोचतात. आई वडील, भाऊ सगळे जंगी स्वागत करतात. शहाजीराजांचे वतन वेरूळ ही जवळच असते. दुसर्या दिवशी दरबारात दगा करून निज़ाम लखोजीराव, त्यांचे दोन पुत्र व दोन नातू यांची भर दरबारात निर्घृण हत्या करतो कारण त्याला भीति वाटते की ते वरचढ होतील… मोगलांना जाऊन मिळतील. जिजाऊ साहेबांवर आभाळ कोसळते. खाली गोटावर सर्व कनाती जाळलेल्या, भयंकर हत्याकांड झालेलं. सर्वत्र प्रेतं विखुरलेली. आई विषण्ण होऊन बसलेल्या! याची खबर लागल्यामुळे लगेच स्वारांबरोबर शहाजीराजे तिथे पोहोचतात व गर्भवती जिजाऊंना घेऊन परांड्याला जातात. याच निजामाची चाकरी शहाजीराजे ही करत असतात. शहाजी व मलिक अंबर हे दोन मुख्य सरदार. शहाजींचा भाऊ शरीफ त्यांच्याबरोबरच असतात. वेरूळचे भोसले घराण्यात मालोजीरावांचे हे दोन चिरंजीव. १६२४ मधे मोगल बादशहा जहांगीर निजामशाहीचा अस्त करण्याच्या इराद्याने ऐंशी हजाराची फ़ौज घेऊन दौलताबादकडे कूच करतो. आदिलशाह त्याची फौज पण पाठवतो. शहाजी, शरीफजी आणि मलिक अंबर यांच्या फौजा मोगलांना मेहेकरच्या तलावाजवळ आडव्या येतात. तिथे गनिमी काव्याने तलावाची भिंत फोडून रात्रीच मोगलांच्या सेनेची वाताहत करतात. त्यांचे अन्नधान्य, बारूद, चंदीचारा, सगळं रफादफा करतात. मागे फिरलेल्या मोगली फौजांवर वरच्या टेकड्यांवरून भातवडीच्या मैदानावर शहाजींची फ़ौज तुटून पडते. तीनशे हत्तींवर तोफांची बरसात करते. ते पळून जातात पण पाठलाग करायला शरीफजी जातात आणि बळी पडतात. मात्र मोगलांचा आणि आदिलशाही फौजेचा पूर्ण पराभव करतात. अनेक सरदारांना बंदी बनवतात. या विजयाप्रित्यर्थ दौलताबादेत ईद व दिवाळी साजरी होते! पण त्याच दरबारात शहाजी भोसलेंचा सत्कार करण्याऐवजी त्यांचे चुलतबंधु खेळोजींचा केला जातो. शरीफजींच्या बलिदानाचा उल्लेख नाही होत. त्यांचा जाणूनबुजून अपमान केला जातो. काही दिवसांनी आदिलशाह कडूनच “सरलष्कर” या पदावर नेमणूक करण्याचे आमंत्रण येते व ते विजापूरला जातात. कादंबरीचा पट विस्तारत जातो. *शहाजीराजांना पुण्याची जहागिरी. * मावळातील काही सरदारांना जवळ करून शहाजी राजे स्वराज्य बनविण्याचे स्वप्न. * शिवनेरीच्या किल्लेदारांच्या मुलीशी संभाजीराजांचा (शिवाजी महाराजांचे थोरले बंधु) विवाह. * सगळीकडे चाललेल्या धामधुमीत गर्भवती जिजाऊंना शिवनेरीला पाठवतात. तिथेच शिवरायांचा जन्म. * भुलेश्वरच्या डोंगरावर नवा किल्ला बांधायचा असतो. “महाराष्ट्र” हे स्वराज्य उभे करायचे असते. मुरार जगदेव तो नष्ट करतो आणि सर्व उध्वस्त करत पुण्याच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवतो. लुटालूट, जाळपोळ करून मावळात दहशत पसरवतो. * मावळात दुष्काळ * चंदनपुरी येथे शहाजीराजांना बादशहा शाहजहाँ कडून खिल्लत व नगद दोन लाख मोहरा आणि दख्खनची सुभेदारीचे आश्वासन मिळते. * संगमनेरजवळ पेमगिरी/ पेमगडावर मुक्काम * जिवधनच्या किल्ल्यातून शाहज़ादा मुर्तुजा व त्याच्या आईची सुटका व निज़ामशाहीची स्थापना, मात्र सर्व राज्यकारभार शहाजीराजेच करत असतात. * शहाजहॉंचा दौलताबाद व जवळचा मुलुखावर हल्ला. पेमगडावरही हल्ला. * परत विजापूरच्या आदिलशाहकडे. मात्र पुणे व सुपे जहागिरी आपल्या कडेच ठेवण्यात यश. पुन्हा उठाव करू नये म्हणून बेंगलोरला रवानगी. * पुण्यात शिवरायांचे फलटणच्या निंबाळकरांच्या सईबाईंशी लग्न. * बेंगलोरला पाचारण व दोन वर्षे संभाजी व शिवाजी या पुत्रांना शस्त्र, गनिमीकाव्याचे व राजकाजाचे शिक्षण. पुण्याला जिजाऊंसोबत शिवरायांना राजमुद्रा देऊन पाठवणी. * शहाजीराजांनी आपले स्वप्न स्वराज्याचे बीज शिवरायांमधे पेरले. * तोरणा जिंकून सुरूवात. जवळचा मुरूंबदेवाचा डोंगरही जिंकून स्वराज्याच्या राजधानी “राजगड” निर्मिती. * शहाजीराजांवर दडपण, जिंजीजवळ अटक. * स्वराज्याचा बिमोड करण्यासाठी विजापूरी फौजा शिरवळ, पुरंदराकडे. पण शिवाजीराजे त्यांच्या स्वराज्याचे शिलेदारांना घेऊन आदिलशाही फौजेला पराभूत करून पळवून लावतात. * शहाजीराजांच्या सुटकेसाठी मोगलांकडे मदत व बादशहाच्या खलित्यामुळे विजापूरातून सुटका. * थोरले बंधु संभाजींचा अफजलखानामुळे कनकगिरी येथे दुर्दैवी मृत्यु. * जावळी मोर्यांकडून हस्तगत. * जावळीबरोबर रायरी (रायगड) ही. * कोकणची किनारपट्टी जिंकली. विजयदुर्गाचे निर्माण. * विजापूरच्या दरबारात अफजलखान शिवरायांना मारण्याचा विडा उचलतो. हजरत पीराकडून त्याला धोक्याचा इशारा मिळतो. “जाओगे, तो लौट नहीं पाओगे”. इथून कादंबरीची शेवटची दिडशे पानं अफजलखानाची स्वराज्यावर चढाईची तयारी, भव्य लष्कराची उभारणी, याचे वर्णनात रंगतात. विजापूरजवळच अफजलपूरला त्याचा भव्य वाडा आणि ६२ बेगमा असतात. लष्कराची जमवाजमव चालू असताना आठ दिवस त्यांच्या संगतीत घालवतो. लढाईत जर तो मेला, तर त्याच्या बेगमांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्वांची हत्या करतो. त्यांच्या दिडशे दासींना दोरखंडाने बांधून विहिरीत ढकलून देतो. आणि मग आपल्या शामियानात दाखल होतो. अनेक सरदारांसह विशाल सैन्य, अगणीत संपत्ती, घोडे, तोफा, हत्ती, बाजारबुणगे, धान्य, वगैरे घेऊन प्रस्थान करतो स्वराज्यावरचा हल्ला करायला! शिवाजीराजांना मैदानात आणण्यासाठी तो पंढरपुर, तुळजापूर या महाराष्ट्राच्या कुलदैवतांवर हल्ला करून मंदिरांचा नाश करतो. पण गुप्तहेरांकडून आधीच सुगावा लागल्याने, मंदिरातील मूळ मूर्ती लपवून ठेवण्यात राजे यशस्वी होतात. शिवाजीराजे अल्पशा सैन्याने त्याला समोरासमोर न लढता गनिमी कावा रचतात. नुकत्याच हाती आलेल्या जावळीच्या घनदाट जंगलात त्याला येण्यासाठी मजबूर करतात. छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा, जावळी व प्रतापगडाचा उपयोग, सईबाईंचे निधन, रडतोंडीचा घाट, सर्व मावळ्यांनी दिलेली साथ आणि अफजलखानाचा चित्तथरारक शेवट! वाचक “झंझावात” अक्षरशः अनुभवतो! पानीपतकार श्री विश्वास पाटील यांच्या या कादंबरीतील अप्रतिम शब्दांकन वाचकाला खिळवून ठेवते. शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ, त्यांचे पिताश्री शहाजीराजे यांचे विस्तृत कार्य आपल्या समोर चितारते. स्वराज्य निर्मितीमागची त्यांची भूमिका मांडते आणि शिवरायांचा प्रताप रंगवते. हा सर्व इतिहास एका कादंबरीत मावणारा नाहीच! म्हणून या कादंबरी मालिकेतील “झंझावात” या प्रथम खंडानंतर पुढचा भाग “रणखैंदळ” कधी प्रकाशित होतो याकडे लक्ष लागते. ही अप्रतिम व भव्य कादंबरी मालिका प्रसिद्ध करण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाउसचे विशेष आभार. *सुनील माने, पुणे* ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more