* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOHINI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666465
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY OF A MENTALLY ILL PATIENT. THE TREATMENT WHICH SUCH PATIENTS RECEIVE FROM THE SOCIETY MAKES HER MORE ILL, MENTALLY. THE AUTHOR HAS TRIED A VERY DIFFERENT SUBJECT THROUGH THIS BOOK. NOT MUCH IS WRITTEN WITH A MENTAL PATIENT AS THE MAIN CHARACTER OF A STORY. BUT THE AUTHOR HAS DONE SO VERY SUCCESSFULLY. `MOHINI` SUCCEEDS IN CAPTURING THE MINDS OF ALL, FROM START TO END. THE TOPIC ITSELF IS VERY SERIOUS. STILL IT CAPTIVATES THE MINDS; THIS IS THE STRONGEST POINT OF IT. THE AUTHOR HAS RESEARCHED WELL BEFORE WRITING THIS NOVEL. SHE HAS DONE HER HOMEWORK REGARDING THE SYMPTOMS AND THE COURSE OF TREATMENT. SHE HAS SUGGESTED A NEW WAY FOR TREATING SUCH PATIENTS THROUGH MEDITATION AND SPIRITUALITY. NO WONDER, `MOHINI` IS SO EXCLUSIVE.
ही कथा आहे एका मनोरुग्ण स्त्रीमनाची. समाजात मनोरुग्णाला दिली जाणारी वागणूक ‘वेड्याला अधिक वेडं करणारी’ असते. ‘मोहिनी’च्या या कथेत लेखिकेने एक वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला आहे. मनोरुग्णासारखा एक वेगळा ‘पट’ घेऊन साकारणारी ‘मोहिनी’ वाचकाला आपल्या भावभावनांनी खिळवून ठेवते. विषय निवडीपासून लेखिकेनं एका अवघड विषयाचं आव्हान सामथ्र्यानं पेललं आहे. विषय गंभीर असूनही वाचकाला खिळवून ठेवण्याची किमया मोहिनीमध्ये आहे. यामध्येच मोहिनीचं यश सामावलं आहे. मनोरुग्णाची कारणमीमांसा खोलात जाऊन वास्तवाला उजाळा देणारी आहे. त्यावरील मानसशास्त्रीय उपायांचे उपयोजनही लेखिकेच्या अभ्यासपूर्ण चिंतनाची साक्ष देते. मनोरुग्णाच्या मनाचा कल अध्यात्माकडे वळवून मानसशास्त्रीय उपायामध्ये एक दिशा सूचित केली आहे. एका वेगळ्या विषयामुळे मराठी साहित्यक्षेत्रात ‘मोहिनी’ लक्षवेधी ठरली तर नवल नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MOHINI #MOHINI #मोहिनी #FICTION #MARATHI #PARUMADANNAIK #पारूमदननाईक "
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 09-09-2006

    मनोरुग्ण महिलेची कहाणी... पारु मदन नाईक या साहित्यक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या लेखिकेने वेगळा विषय निवडून कादंबरी लिहिली आहे. याचे कौतुक वाटते. मनोरुग्ण स्त्रीच्या जगण्याचे सहानुभूतिपूर्ण शब्दांत चित्र रेखाटणारी ही कादंबरी आहे. व्यक्तिचित्रणप्धान असलेल्या या कादंबरीचे शीर्षक नायिकेच्या नावावर आधारित आहे. ‘मोहिनी’ हीच कादंबरीची नायिका. मोहिनीच्या विवाहसोहळ्यापासून कादंबरीची सुरुवात होते. लेखिकेने सुरुवात कुतूहलपूर्ण पद्धतीने केली आहे. प्रसंगचित्रण, संवाद, सूक्ष्म नाट्य यांच्या मदतीने मोहिनीचे व्यक्तिचित्रण टळक होत गेले आहे. मोहिनीचे देखणे रूप, अल्लड, निष्पाप स्वभाव, इनामदार वडिलांची लाडकी लेक... ही तिची मुख्य ओळख. जवळच्या गावच्या प्रतापराव इनामदारांची लाडकी पत्नी होण्याचे भाग्यही तिला लाभते. प्रतापराव मान्यवर सतारवादक, प्रतिष्ठित घराण्यातले. यामुळे मोहिनी सुखात असते. ती स्वत: सतार शिकतेही. कालांतराने तिला दोन मुली होतात. पुढे तिसरा मुलगा होतो आणि तो चार महिन्यांचा होऊन जातो. तो धक्का मोहिनी पचवू शकत नाही. मुलाचा-रामचा मृत्यू ही घटना ती मान्यच करत नाही. येथून तिचे मनोरुग्ण म्हणून जगणे सुरू होते. त्यात लादलेले एकटेपण, हिंस्रता, इतरांना मारहाण इत्यादी प्रसंगांचा पुन्हा पुन्हा अनुभव येत राहतो. या गोष्टी सातत्याने सुरू झाल्यावर मोहिनीला औषधोपचार सुरू होतात. सुरुवातीला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये नेऊनही मोहिनी बरी होत नाही, तेव्हा तिला काही काळानंतर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. दरम्यान तिच्या अनावर वागण्यामुळे तिला बांधून ठेवण्याचे प्रयोग घरच्या मंडळींनी करून पाहिलेले असतात. आजारपणाचा बराच काळ असाच गेल्यामुळे ‘केस’ ‘क्रॉनिक’ झालेली असते. येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील वातावरण कादंबरीत जिवंत करण्यात लेखिकेला सर्वसाधारणपणे यश आले आहे. विविध डॉक्टर्स, विविध रुग्ण, त्या रुग्णांच्या परस्परसंबंधांची हकिगत... कादंबरीत या गोष्टींना जागा मिळाली आहे. मोहिनीचे स्पेशल वॉर्डमध्ये न रमणे, नंतर तिला मैत्रिणींची मिळणारी सोबत - या बदलांचा परिणामही सूक्ष्म रीतीने वर्णन केला आहे. तिच्या घरंदाजपणाची ओळख मिटवून टाकणारे तिचे वागणे, त्यामागील निराशा, तसेच तिला प्रेमाने भेटणारे भाऊ-भावजय या प्रसंगांचे चित्रण यात येते. पुढे द्रविडबाई या सामाजिक कार्यकर्त्या तिची केस हाताळण्यात पुढाकार घेतात. त्यांच्या प्रेमळ वागणुकीने मोहिनीत सुधारणा होत जाते. मात्र दरम्यान प्रतापरावांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ते मोहिनीशी घटस्फोट घेतात. यामुळे मोहिनीची संसारात परत जायची स्वप्ने कोसळतात. तरीही भाऊवहिनी तिला माहेरी घेऊन जातात. मनोरुग्णाला लागणारी जिव्हाळ्याची वागणूक मोहिनीला माहेरी सर्वांकडून मिळते. तिच्या मुली, जावई, नातवंडे यांच्या भेटीचे सुखही तिला मिळत जाते. प्रतापरावही तिला आपल्या घरी न्यायला नकार देतात. त्यांचे मोहिनीवरचे प्रेम त्यांना कायमच अस्वस्थ ठेवते. ते दुसऱ्या पत्नीशीही घटस्फोट घेतात. मोहिनीला घरी परतल्यानंतर काही दु:खद घटनांना तोंड द्यावे लागते. आईचा मृत्यू, पतीचा मृत्यू या दोन्ही घटनांना ती कमालीच्या संयमाने तोंड देते. वडिलांच्या इच्छेनुसार ती स्वत:ला अध्यात्म्याच्या विश्वात रमवते. या कादंबरीत काही प्रसंग चांगले चित्रित झाले आहेत. रुग्णालयात मोहिनी आपल्या मोठ्या झालेल्या मुलींना भेटते, तेव्हा त्यांना ओळखत नाही. हा प्रसंग चटका लावून जातो. मोहिनीचे पती प्रतापराव, त्यांची रसिकता, सतारवादनातील कीर्ती, हळवेपणा,मुलींवरील प्रेम, मोहिनीवरील प्रेम, त्यांना सोसावे लागलेले दु:ख - यांचाही ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. मोहिनीच्या भावाला निवडणुकीत यश मिळून मंत्रिपद मिळते आणि स्वप्नात आळंदीला जाऊन आलेली मोहिनी स्वप्न आणि वास्तव यातील सीमारेषा सहज ओलांडते - अशा टप्प्याशी कादंबरीचा शेवट होतो. मनोरुग्ण व्यक्ती वास्तवाचा स्वीकार सहजी कसा करत नाही. तिच्या लेखी वेगळे वास्तव अस्तित्वात असते; बरी झाल्यावरही ही व्यक्ती काही अंशी आपल्या जगात राहणे कसे शक्य असते... इत्यादी बाबी यातून प्रकट होत जातात. मनोरुग्णांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावरील ट्रीटमेंट यांचेही तपशील येतात. या कादंबरीत काही गोष्टी सुसंगत वाटत नाहीत. २२ वर्षे एवढा मोठा कालखंड मोहिनी हॉस्पिटलमध्ये असते. तो कालखंड कादंबरीत त्यामानाने पटकन संपतो. या काळात तिला तिचे आईवडील, प्रतापराव भेटत नाहीत आणि नंतर स्वत:ला अपराधी समजतात, असे का? वास्तविक ही सर्व माणसे प्रेमळच आहे. बरी झालेली मोहिनी माहेरी परतल्यानंतर कादंबरीत काहीच नज्ञट्यपूर्ण घटना नाहीत. त्यामुळे कादंबरी अकारण पसरट होते. लेखिका वास्तुचित्रणात अजिबात रस घेत नाही. इनामदारांचा वाडा असो वा हॉस्पिटल असे, त्याचे चित्र वाचकाच्या मन:पटलावर उभे राहत नाही. लेखिकेची शैली लाडिक वळणाची आहे. ‘मोहिनी लाजली’ हे वाक्य कादंबरीत अनेकदा, मोहिनीच्या प्रौढ वयातही सतत येत राहते. तरीही पदार्पणात वेगळ्या विषयावर लेखन करायचे धाडस लेखिकेला पेलले आहे. लेखिका रणजित देसाई यांची कन्या असल्यामुळे तिच्याकडे साहित्यगुणांचा वारसा आलेला आहे. कादंबरीतील पात्रे व प्रसंग काल्पनिक असल्याचे सुरुवातीला म्हटले आहे. पण काही ठिकाणी वास्तवाचे कवडसे उमटलेले दिसतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 08-04-2006

    छिन्नमनस्कतेचा साहित्यातील मागोवा… काही नावं, काही विषय नेहमीच लक्ष वेधून घेतात. पारू नाईक यांची कादंबरी येते आहे असं कळल्यावर असंच झालं. पण पारू नाईक नाव लक्षात केव्हा आलं? तपशिलात थोडं मागं-पुढं होईल, पण पारू – पारू नाईक असा उल्लेख बहुधा माधवी दसाई यांच्या बहुचर्चित ‘नाच ग घुमा’ या आत्मकथनात आला होता. रणजित देसाई यांची पहिली पत्नी सुनंदा यांच्या मुलीच्या संदर्भात हा उल्लेख होता. सुनंदा यांच्या मनाचा कोंडमारा झाल्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांना झटके यायला लागले. तसे उपचारदेखील सुरू झाले... आणि अशा अस्वस्थ काळातच रणजित देसाई ‘स्वामी’ कादंबरीचं लेखन करीत होते. विशेषत: रमा-माधव यांच्या मुग्ध प्रेमाची कहाणी रंगवताना स्वप्न आणि वास्तव अशा विलक्षण कुतरओढीत ते जगत होते. अशा वावटळीत वाढणारी ती पारू... खरं तिचं नाव पार्वती. या पार्वतीचं प्रेमानं झालं पारू! रणजित देसाई यांच्या आठवणीतदेखील कुठे कुठे पारू आलेली आहे, असं वाटतं. मग पारू नाईक हे नाव आलं ते रणजित देसाई गेल्यानंतर. ‘स्वामी’ची जी आवृत्ती आली त्यात कॉपीराइट देसार्इंच्या दोन मुलींच्या नावावर आहे. त्यातली एक पारू नाईक म्हणजे रणजित देसाई यांच्या कन्येची कादंबरी येते आहे. या कादबंरीचं नाव आहे ‘मोहिनी.’ कथावस्तू आहे ‘मोहिनी’ खानदानी संस्कारांनी संपन्न असलेली स्त्री. पती प्रतापरावांसमवेत पारंपरिक संस्कार, जीवनमूल्ये जपत मनसोक्त आनंद व सुख उपभोगत असते. मोहिनीला एकापाठोपाठ एक अशा दोन मुलीच होतात. मग इनामदारांच्या वंशाला वारस कोण? मोहिनीच्या मनात हे भय खोलवर रुजते. कारण त्यामुळे तिची प्रतिष्ठा पणाला लागते. तिच्या भावी जीवनाचे अस्तित्व त्यावर अवलंबून राहते. बऱ्याच कालावधीनंतर तिला मुलगा होतो. मात्र तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे मोहिनी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होते. मनोरुग्ण नायिकेचे रंगरूप उलगडून दाखवणारी पारू नाईक यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती. पारू नाईक लिखाणाला कशा उद्युक्त झाल्या, हे पाहणं कुतूहलजनक नक्कीच ठरेल. या कादंबरीतील पात्र, घटना, सर्वस्वी काल्पनिक असून, यदाकदाचित कुणाशी त्यात साम्य आढळले, तर तो योगायोग समजावा...’ असा अनेक कादंबऱ्यांमध्ये असलेला खुलासा या कादंबरीमध्ये आहे, हेही बघायला हवे. ‘स्किझोफ्रेनिया’ संबंधात ही कादंबरी आहे हेदेखील त्याचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. ‘स्किझोफ्रेनिया’ हा विषय तसा आपल्याकडे दुर्लक्षित राहिला आहे. काल-परवापर्यंत अशा केसेस वेड, उन्माद, डोक्यावर परिणाम झाला, अशा कप्प्यात टाकून त्यावर इलाज होत असे. साहित्यातदेखील त्याच्या बऱ्या-वाईट खुणा सापडू शकतील. पण ‘स्किझोफ्रेनिया’ असा नेमका उल्लेख होऊन त्याची पाहणी झाली ती ‘स्किझोफ्रेनिया’ कहाणीत. गणेश चौधरी डांभूर्णी या जळगाव जिल्ह्यातल्या गावचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संपन्न घराण्याचा वारसा लाभलेले आणि बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले. पण दुर्दैवानं असाध्य वेडाने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्यांच्या हातून पत्नीची-मुलांची हत्या घडली. तीही मुसळाने. गणेश चौधरीला फाशीची शिक्षा झाली. मग गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त काही कैद्यांना शिक्षेत माफी मिळाली. त्यात चौधरींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्यात आली. ही पहिलीच शोकांतिका आहे, असं म्हणता येणार नाही. अशा केसेस पूर्वीदेखील झाल्या आहेत. गणेश चौधरीच्या बाबतीत एकच गोष्ट झाली की, त्यांना काही डॉक्टर असे भेटले की, त्यांनी त्यांच्यातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न केला. तसं त्यांना थोडं यशही मिळालं. चौधरींमधील सृजनशक्ती त्यामुळे जागी होऊ लागली. पण मुळात हे सगळं का उद्भवलं? स्वत:चं वेड खुद्द गणेश चौधरी यांनी लपवून ठेवलं. काही डॉक्टरांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी एका असाध्य रोगाचे चौधरी बळी ठरले. त्यातून त्यांची सुटका मृत्यूनेच केली. अर्थात, या घटनेचा ताप सगळ्या चौधरी कुटुंबाला सोसावा आणि भोगावा लागणं अटळ होतं. खचलेली मनं, सामाजिक निंदानालस्ती, न्यायालयात मारावे लागणारे हेलपाटे, त्यातून होणारा खर्च याचे हादरे सगळं घर मोडून पडायला निमित्त होणं स्वाभाविक होतं. हे सगळं सोसलं आणि ही तगमग शब्दबद्ध केली ती गणेश चौधरींच्या बंधूंनी – दिवाकर चौधरींनी. ही कहाणी ‘स्किझोफ्रेनिया’ वाचकांपर्यंत पोचली हे विशेष. गणेश चौधरींना त्यामुळे सहानुभूती मिळाली. त्यामुळेच मग दिवाकर चौधरींनी ‘काचेचं मन’ हे पुस्तक धाडसाने प्रकाशकांकडे दिलं. यामध्ये गणेश चौधरींची पत्रं आहेत. शास्त्रीय, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक अशा गुंतागुंतीत सापडलेला गणेश चौधरी आणि त्याची मानसिक घालमेल त्यांनी विविध लोकांना लिहिलेल्या पत्रांत दिसतं. त्याचे संपादन आणि प्रस्तावना दीपक घारे यांची होती. त्यात त्यांनी नेमकं म्हटलं होतं, ‘क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाच्या अवस्था आणि भास-भ्रम-चक्कर-वेड यांचा सतत फिरणारा पंखा हे या साऱ्याच लेखनाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वाचकालाही चक्रावून टाकतं!’ ‘स्किझोफ्रेनिया’च्या शेवटी लक्षात राहतो तो दिवाकर चौधरींचा आकांत...’ वादळही संपलेलं आहे; पण आहे एक प्रचंड पोकळी! तिला सामोरं कसं जावं तेच कळत नाही. स्किझोफ्रेनिया – छिन्नमनस्कता यासंबंधातील ललित कलाकृतीचा विचार करताना अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन वॅश यांची कर्मकहाणी सांगणारी कहाणी ‘ए ब्युटिफुल माइंड’ ही विसरता येणंच अशक्य. सिल्विया नासर यांनी जॉन वॅशची चरित कहाणी साक्षेपानं लिहिली आहे. स्किझोफ्रेनियानं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन आणि यथायोग्य वेळीच उपचार झाला, तर हा रोग काबूत ठेवता येतो याचा ताळमेळ सिल्वियानं यशस्वीपणे मांडला आहे. ही कहाणी केवळ स्किझोफ्रेनिया पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाईकांना, ते ज्या समाजात वावरतात, त्या समाजालादेखील प्रेरणादायी ठरेल. म्हणून या कादंबरीचं महत्त्व आहे. या कादंबरीचा संक्षिप्त भावानुवाद कमलिनी फडके यांनी ‘सुंदर ते मन’ नावाने केला आहे. स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन, पुणे आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्यातर्फे तो प्रकाशित झाला आहे, यातच या भावानुवादाचं यश अधोरेखित झालं आहे. स्किझोफ्रेनियासंबंधात विचार करताना ‘देवराईच्या सावली’त पण विसरून चालणार नाही. अशा या मोजक्याच कलाकृती ओझरता उल्लेख करायचं कारण म्हणजे स्किझोफ्रेनियासंबंधात जेवढं ललित लेखन झालं आहे हे पुरुषकेंद्री झालेलं आहे. स्किझोफ्रेनिया ही केवळ पुरुषालाच होणारी व्याधी आहे काय? निश्चितच नाही; पण तसं चित्रण का झालं नाही? ‘मोहिनी’चं वेगळेपण इथंच आहे. खुद्द लेखिका पारू नाईक यांनी ते जीवन जवळून अनुभवलं आहे. साहजिकच त्या खाणाखुणा ‘मोहिनी’च सापडतीलच. ‘मोहिनी’ची मोहिनी ही अशी आहे. आपण त्याची वाट पाहू या. मोहिनीचे वेगळेपण म्हणून राहणार आहे. -रविप्रकाश कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-06-2006

    ‘हृदयस्पर्शी मोहिनी’... जीवनसत्याचे कलापूर्ण आविष्करण करून जीवनदर्शन घडविणारा कादंबरी हा आकृतीबंध पारू मदन नाईक यांनी आपल्या ‘मोहिनी’ कादंबरीत यशस्वीरित्या हाताळला आहे. मोहिनीच्या जीवनावर बेतलेली ही कादंबरी! एका सरळ मनाच्या, निष्पाप, लावण्यवतीच्या ावसौंदर्याचे सौहार्दाने केलेले हे चित्रण! खानदानी कुटुंबात जन्म- संस्कार व प्रेम प्राप्त करून, विवाहानंतर पतीच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी जाणाऱ्या व प्रेमाची प्रसन्न पखरण करणाऱ्या युवतीचे मनाचे विलोभनीय चित्र लेखिकेने ‘मोहिनीत’ शब्दांकित केले आहे. सासर-माहेरच्या नातेसंबंधातील जिव्हाळा, स्नेहस्निग्ध-वात्सल्यपूर्ण-उत्कट प्रेम या कादंबरीत आलेखित होते. परंतु मनोरुग्ण अवस्थेतील नायिकेच्या भावशून्य व भावपूर्ण अनुभवविश्वाचे सूक्ष्म- सखोल व तपशीलात्मक चित्रण या कादंबरीचे बलस्थान ठरते. कारुण्याच्या काजळरेषांतून प्रकर्षाने व प्रभावीपणे प्रस्फुटित होत राहते ती पती-पत्नीच्या प्रेमातील रमणीयता व परिचित आणि कुटुंबीयातील स्नेहबंधांची मधुरता. नियतीच्या आघाताने पती-पत्नीतील जीवनात निर्माण झालेला विरह त्यांच्या परस्परांवरील उत्कट प्रेमासमवेत उदातत्तेचा पारदर्शी आंतरिक पदरही प्रकट करतो. मनोरुग्णांच्या मानसिकतेचे त्यांच्यातील मूलभूत सत्प्रवृत्ती– सद्विचारांच्या आवर्तनांचे आगळे-वेगळे रेखांकन ‘मोहिनी’त प्रत्ययाला येते. नियतीच्या दुर्दैवी फटकाऱ्यांनी होरपळून निघालेली व आपल्या अस्थिर-असुरक्षित जीवनक्षणांची नोंद करणारी ‘मोहिनी’ची जीवनगाथा शृंगार व करुणरसात भिजली आहे. विवाहघटनेमुळे दोन खानदानी कुटुंबांच्या जुळणाऱ्या व दृढ होणाऱ्या नातेसंबंधांचे चित्रण जसे या कादंबरीत आकारते तसेच त्या त्या कुटुंबात वावरणाऱ्या नोकरांचे, परिचितांचे, मित्रांचे, हितचिंतकांचे व्यक्तिचित्रणही लेखिका अशी कौशल्याने करते की त्यातून ती ती व्यक्तिमत्त्वे उमलत जातात. खेळकर, सहजस्वाभाविक प्रेमप्रसंगांचे आलेखन नायक-नायिकेच्या मनातील प्रेम पैलूंना गडद व मनोरम करते तसेच कादंबरीचा सूर घनगंभीर करते. पिता, पती, भावंडे, भावजया, द्रविडबाई, मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर पडलेल्या मैत्रिणी यांची भावनिक उंची अशा स्तरावरची की जिथं स्वार्थाचा गंध नाही परंतु आनंदाचा निर्मळ खळाळ आहे. नायिकेच्या लज्जाशील, मुग्ध हावभावांचे, हालचालींचे हळूवार भावस्पर्शी रेखाटन लेखिकेने जसे केले आहे तसेच मनोरुग्ण अवस्थेतील प्रक्षुब्ध, क्रौर्य व क्रोधाने परिपूर्ण भावावेगांचे, शारीरिक हालचालींचे प्रत्ययकारी रेखाटन लेखिका या कादंबरीत करते. परस्परविरोधी भावावेग, जाणिवा, संवेदना, शारीरिक क्रिया यांच्या ताण्याबाण्यातून नायिकेचे व्यक्तिमत्त्व असे साकारते की वाचकांकडून तिला सहानुभूतीचा ओलावाच मिळावा. परस्परविरोधी भावस्पंदने व तद् नुषंगिक क्रिया दर्शविताना लेखिकेने साधलेला समतोल कौतुकास्पद असून नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ढासळू देत नाही. दोन जीवांतील निर्मळ प्रेमाचे व भावावेगांचे गडद चित्र रेखाटणारी ‘मोहिनी’ कादंबरी नाट्याने परिपूर्ण असूनही संघर्षाच्या स्थूल– ठळक रेषा– बिंदू क्वचितच रेखाटते. परंतु नियतीच्या क्रूर आघातामुळे निर्माण झालेला परिस्थितीशी टक्कर देताना व्यक्तिमनात आकारणारा संघर्ष कादंबरीच्या केंद्रस्थानी आपले अस्तित्व राखत अत्यंत टोकदार होतो. व्यथा-वेदनेचे, कारुण्याचे स्रोत आंतरमनात झरते ठेवून प्रेमाचे उदात्त रूप चित्रीत करतो. अनलंकृत, प्रासादिक सरस भाषाशैली, घरंदाज वातावरणातील आदब-प्रसन्नता विवाह समारंभात विविध प्रसंगी गायिल्या जाणाऱ्या गीतांचे आयोजन करून निर्माण केलेले औचित्य, रीतीरिवाज दर्शविणारे कौटुंबिक वातावरण, मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधील वातावरण, चित्रदर्शी शब्दशैली या कादंबरीची लक्षणीय गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. मनोरुग्णांच्या मानसिकतेचा आंतरिक जिव्हाळ्यानं घेतलेला वेध मनोज्ञ असून मनोरुग्णाच्या मनोवस्थेतील भावनिक चढ उतारांचे नेमकेपणाने केलेले रेखांकन लेखिकेच्या सुजाण व संवेदनशील मनाची साक्ष देणारे आहे. रणजित देसार्इंच्या साहित्यिक गुणांचा वारसा जपत स्वतंत्र प्रतिभाशक्तीतून साकारलेली ‘मोहिनी’ क्वचित कुठे ‘स्वामी’ व ‘श्रीमान योगी’ ची आठवण करून देते. एकंदरीत नाट्यपूर्ण, हळूवार भावांदोलनांनी सजलेली ‘मोहिनी’ वाचकांवर मोहिनी घालणारी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 06-08-2006

    खिळवून ठेवणारी ‘मोहिनी’… मनोरुग्ण स्त्रीची कहाणी कादंबरीतून मांडण्याचे मोठे आव्हान पारू मदन नाईक यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीत लेखिकेने या नायिकेचे विश्व ज्या पद्धतीने मांडले आहे, ते पाहता नाईक यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसणार ाही. मोहिनी ही या कादंबरीची नायिका. एका सुखवस्तू इनामदाराची पत्नी. दोन्ही सरकार घराणी असल्यामुळे परंपरागत इनामदारी संस्कारात ती वाढली आहे. खानदानी मोहिनीचा विवाह प्रतापराव या संगीतप्रेमी सतारवादकाशी होतो. मोहिनीलाही ते सतारवादन शिकवतात. त्यांचे आयुष्य सुखाचे सुरू होते. मोहिनीला दोन मुलीच होतात. त्यामुळे वंशाला ‘वारस’ मिळावा यासाठी हे इनामदार दापत्यं झुरत असतात. मोहिनी पुत्रप्राप्तीसाठी वेडीपिशी झालेली आहे. आपली प्रतिष्ठा, भावी जीवनाचे अस्तित्व इनामदार घराण्याचा वंशवेल पुढे वाढावा यावर अवलंबून आहे, अशा भयगंडात मोहिनी जगत असते. त्यासाठी तिचे देवदेवतांना नवस-उपास, तापास सुरूच असतात. अखेर थोड्याफार उशिरानेच तिला दिवस जातात आणि अपेक्षेप्रमाणे गुटगुटीत मुलगा होतो. मोहिनीच्या आनंदाला पारावार राहता नाही. पण चार महिन्यातच या मुलाचा अकल्पित मृत्यू होतो. मोहिनीचे सारे भावविश्वच हादरते. तिच्या आईवेड्या मनावर याचा गंभीर परिणाम होतो. तिला वेडाच झटके येतात. मोहिनीच्या अशा वागण्यामुळे सासर-माहेर उद्ध्वस्त होते. निष्पाप भोळ्या भावनाशील मोहिनीला ‘स्क्रिझोफोलिया’ या दुर्धर रोगाने पछाडले. अधूनमधून त्याचे झटके तिला येतात, तेव्हा ती हिंस्त्र बनते. घरातील सारेजण तिच्या अशा या वागण्यामुळे घाबरून गेलेले असतात. मोहिनीच्या सासर-माहेराकडील घरचे वातावरण पूर्ण बदलून जाते. दोन्ही घरातील भावभावनांचा कल्लोळ लेखिकेने या कादंबरीतून अचूक मांडला आहे. मोहिनीचे आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं, नोकर-चाकर, सासू-सासरे, पती यांच्या वागण्यात बोलण्यात हळूहळू अंतर पडू लागते. बदललेल्या वातावरणाचा गंभीर परिणाम मोहिनीवर पडत असतोच. शेवटी तिला मनोरुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येतो. लेखिकेने मोहिनीच्या मनोरुग्णालयातील वास्तवाचे एक वेगळे विश्व या कादंबरीतून उलगडलेले आहे. मोहिनीने या रुग्णालयात एक-दोन नव्हे तर उणीपुरी एकवीस वर्षे काढली. शॉक ट्रिटमेंट, इतर रुग्णांचे वागणे, घरापासून दूर, अनोळखी लोकांमध्ये मोहिनीने काढलेले हे वेगळे आयुष्य वाचले तर तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. या काळात मोहिनीने स्वत:चे गोकुळ या रुग्णालयात निर्माण केलेले असते. या संपूर्ण काळात ती घरच्यांना विसरलेली नकळत आपण त्यांच्यातले असूनही ते घर आपल्याला मिळू शकणार नाही ही तिला जाणीव आहे. या साऱ्या प्रवासात ती आपल्या मुला-मुलींना विसरलेली नाही. तो अजूनही जिवंतच आहे, या भ्रमात ती जगत असत. पती प्रतापराव अशा काळातच तिच्याशी घटस्फोट घेतात आणि दुसरा विवाह करतात. मोहिनी हतबल होते. तिने ज्या विश्वासाने आपले रुग्णालयातील आयुष्य सुरू केलेले असते, त्यालाच तडा जातो. मोहिनीचे आई-वडिल, माहेरची सारी माणसे हताश होतात. मोहिनी हा आघात हळूहळू पचवते. लेखिकेने मोहिनीचे वागणे, तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे केलेले वर्णन अप्रतिम आहे. मोहिनीविषयीचा लळा, प्रेम, जिव्हाळा या साऱ्यांचे वर्णन लेखिकेने या कादंबरीतून जिवंत केले आहे. रुग्णालयातून बरे होऊन माहेरच्या घरी येण्याचा प्रसंग भावपूर्ण आहे. मोहिनीची सवत, मोहिनीच्या दोन्ही मुली, त्यांचे पती, नातू या साऱ्या नातेसंबंधात मोहिनी पुन्हा गुरफटते. या काळातही मोहिनी आपल्या पतीला विसरलेली नाही. घटस्फोटानंतरही ती प्रतापरावांवर प्रेम करत असते. प्रतापरावही केवळ वृद्धावस्थेतील सोबत म्हणूनच दुसरा विवाह करतात, पण त्याचे पहिले प्रेम मोहिनीच असते. या काळात प्रतापरावांचाही मृत्यू होतो, तेव्हा मोहिनीवर दुसरा आघात होतो. या धक्क्यातून ती सावरते. वडिलाच्या मायेच्या सावलीत आपले उर्वरित आयुष्य घालवणाऱ्या मोहिनीवर तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा आघात होतो. पण मोहिनी आघातावर आघात झेलूनही आता संयमी बनलेली आहे. संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. वेगळा व गंभीर विषय हाताळताना लेखिकेने या कादंबरीची गती कमी होऊ दिलेली नाही. गंभीर प्रसंगातून एका मनोरुग्ण स्त्रीचे जीणे उलगडून दाखवलेले आहे. मनोरुग्ण होण्यापूर्वीचा काळ, प्रत्यक्ष मनोरुग्णाचा काळ, त्यातून सावरलेली नायिका, तिचे पूर्ण बरे होणे, त्यानंतर सातत्याने होणारे आघात झेलत जगणाऱ्या नायिकेला हा प्रवास वाचनीय झाला आहे. -संदीप आडनाईक ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more