* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY IS FROM THE NORTH KARNATAKA. PEOPLE HERE HAVE A TYPICAL PERSONALITY. THEY ALL CARRY THE CULTURE WITHIN THEMSELVES. ALL THE STORIES COLLECTED HERE RESEMBLE THE JASMINE GARLAND, EACH FLOWER CARRYING THE FRAGRANCE AND INTERWOVEN IN THE KARNATAKI THREAD. THE TENDEREST PART OF THE AUTHOR`S MIND COMES INTO LIGHT THROUGH THE WAY SHE HAS PICTURED THE UNCOMMON ASPECTS OF THE COMMON PEOPLE. SHE HAS ALSO BATHED IT IN LIGHT HUMOUR.
सुधा मूर्ती यांचं नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक मराठीत! उत्तर कर्नाटकातल्या या सर्व माणसांना स्वत:चं असं खास व्यक्तित्व आहे. तसेच ते सगळे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. यातील सर्व कथा म्हणजे टपोया, सुगंधी मोगयाच्या फुलांचा गजरा, अस्सल कर्नाटकी गोफात गुंफलेला! या ‘सर्वसाधारण’ माणसांमध्ये जाणवणारं ‘असामान्यत्व’ लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SAMANYARALLI #ASAMANYA #SUDHA #MURTY #UMA #KULKARNI #BANDLE #BINDAPPA #CUNDOCTOR #BHIMANNA #ANGADI #JAYANNA #CHATUR #CHAMAVVA #SANDHISADHU #SEEMA #DABBAWALI #NALINI #सामान्यांतले #असामान्य #कथासंग्रह #उमा #कुलकर्णी #बंडल #बिंदप्पा #कंडक्टर #भीमण्णा #अंगडि #जयण्णा #चतुर #चामव्वा #संधिसाधू #सीमा #डब्बावाली #नलिनी
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू... ‘सामान्यातले असामान्य’ या सुधा मूर्तीलिखित कथासंग्रहात उत्तर कर्नाटकातल्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत. कथांमधील व्यक्तींमध्ये अस्सल कर्नाटकी गुणधर्म असलेले कथांचे नायक-नायिका या कोणी असामान्य नाहीत. पण प्रत्येक माणसत काहीतरी चांगले-असामान्य असते. याच असामान्यत्वाचा शोध लेखिका घेते. असे करताना कधी विनोदी शैलीत व्यक्तिचित्रण केले आहे. उमा कुलकर्णींनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे उ. कर्नाटकी संस्कृतीचा व भाषेचा थाटच वेगळा आहे. प्रादेशिक वैशिष्ट्य आहे. येथील माणसं वरवर ओबडधोबड वाटली तरी पारदर्शी आहेत. बोलण्यात, वागण्यात रोखठोकपणा जाणवला तरी भावनाशीलता व मृदुताही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य अधोरेखित होते. ‘बंडल बिंदप्पा’ या नावातच त्याच्या स्वभावाची कल्पना येते. वरवर जाणवणारा उद्धटपणा, पण आतून फणसासारखा गोड रसाळपणा हे कर्नाटकी वैशिष्ट्य बंडल बिंदप्पामध्ये पुरेपूर भरलंय. बिंदप्पाला बंडल या उपाधीची तमा नाही, राईचा पर्वत करणं हा त्याचा स्वभावधर्म. याचा फटका कित्येकांना बसूनही तो कोणाच्या क्रोधाचा बळी ठरत नाही. कारण त्याचं पराकोटीचं कन्नड प्रेम. कंडक्टर भीमण्णा एक अजब वल्ली. स्वत:च्या संसारापासून अलिप्त, सामान्य परिस्थितीतही सदा आनंदी असणारा भीमण्णा दिलदार आहे. त्यामुळे नोकरी गमवावी लागली तरी मूळ स्वभाव जात नाही. ‘जीवन म्हणजे मूळ कडुनिंबाचं मिश्रण. माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र. प्रत्येकाने आपापल्या मर्जीप्रमाणे रंग भरायचे. किरकिरता जीवनाचा कुठलाही रुट सोडून पळून जात नाही.’ हे भीमण्णाचं तत्त्वज्ञान. अंगडी जयण्णा हा सामान्य पण दिलदार माणूस. अंगडी म्हणजे दुकान लहानपणापासून व्यापाराची आवड असणारा जयण्णा दुकान चालवतो. पण अव्यवहारीपणामुळे बुडितखाती जातो. अखेर आजोबा मळा विकून कर्जफेड करतात. याच्याविरुद्ध आहे चंतुर चामव्व. सामान्य रूप, सामान्य शिक्षण, सामान्य परिस्थितीतील चामव्वा व्यवहाराला चतुर व स्वार्थी. पैसा हेच सर्वस्व मानणारी चामव्वा सतत फायद्या-तोट्याचाच विचार करताना दिसते. प्रेम, ममता या शब्दांशी तिचा काहीही संबंध नाही. वरवर गोड बोलणारी चामव्वा आतून कडवटपणाने युक्त आहे. म्हणूनच कोंडीत पकडून श्रीमंत सासर पटकवते; इतकेच नव्हे तर दागिने, तिजोरी लंपास करते. संसाराच्या आर्थिक नाड्या हातात घेण्यात यशस्वी ठरते. असूया. तिचं नाव अनसक्का. ही स्त्री अत्यंत मत्सरी. कधीही कुणाच्याही चांगल्या गुणांचे कौतुक न करणारी वृत्ती. म्हणूनच वैभवात असूनही असमाधानी, अतृप्त. पण तिचा हा अवगुण झाकला जातो तो तिच्या एका गुणामुळे. कुणाच्याही, कुठल्याही अडचणीला धावून जाऊन मदत करण्याचा मोठेपणा तिच्यात आहे. मुळात शहाणी असून स्वाभावाला चांगले वळण न लागल्याने स्वभावात आलेला विचित्रपणा आहे. गंगा एक सुंदर, कलाकुसर निपुण, वाचनाची आवड असणारी सुशिक्षित स्त्री. आपल्यातील या गुणांचा गर्व असलेली गंगा कुणात मिसळत नाही. इतरांवर टीका करणे, त्यांच्यातले न्यून शोधून तिरस्कार करणे, चेष्टा करणे हा स्वभावच बनून गेला. लग्नासाठी प्रत्येक मुलात काही तरी खोड काढण्याच्या सवयीमुळे अखेर लग्नापासून वंचित रहावे लागले. त्याचे पर्यवसान रागीटपणा, चिडचिड यात होते. स्त्रीला तडजोड करावी लागेल हे तिला वेळेवर न उमजल्याने आयुष्याची फरफट अटळ ठरते. अक्कमा स्वभावत:च परोपकारी. गावातल्या कोणासाठीही कोणत्याही प्रसंगी तिला वडीलकीच्या नात्याने बोलावले जाते. कोणत्याही अडचणीतून खंबीरपणे मार्ग काढू शकणारी अक्कमा निरपेक्ष वृ्तीने लोकांसाठी झटते. पण लोक तिला गृहीत धरतात. कोणत्याही स्वरूपात त्याची परतफेड करण्याचे भानही ठेवत नाहीत. ‘कोणी किती कृतज्ञता ठेवायची हे प्रत्येकाला त्याच्या आईनं जेवढं, जसं शिकवलं असेल त्यावर अवलंबून असतं. ती सगळ्यांना जगणारी गोष्ट नाही.’ हे अक्कमाचं तत्त्वज्ञान तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. बण्णभट्ट व पार्वती या विजोड जोडप्याचं वर्णन लेखिका नर्मविनोदी शैलीत करते. ‘नॉट मेड फॉर इच अदर’ अशी स्पर्धा आयोजित केली तर पहिला पुरस्कार मिळेल, पार्वती अत्यंत देखणी, हौशी, लिहा-वाचायची आवड, सिनेमाची आवड, स्वच्छतेची आवड असणारी, नटणारी चैत्रगौरीसारखी स्त्री. याउलट बण्णभट्ट तेलकट चेहरा, पुढे आलेलं पोट, जुनकट कपडे, पान खाऊन लाल झालेले, पुढे आलेले दात असं ध्यान. दोघांचे स्वभावही विरुद्ध रसिक पार्वतीला स्वप्नातला राजकुमार भेटलाच नाही. तिच्या इच्छा-आकांक्षा त्याला उमजल्याच नाहीत. तो अलिप्तसाच राहिला. पण पार्वतीच्या मृत्यूनंतर अगदी लवकरच बण्णभट्टही गेला. मनात तिच्याविषयी ओढ असूनही स्वभाववैशिष्ट्यामुळे त्याच्या भावना अव्यक्त राहिल्या. पण तिचं जाणं मात्र तो सहन करू शकला नाही. काही काही व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात. त्यांच्यामध्ये हा अवगुण वारशाने येत असावा. आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच स्वत:वरची जबाबदारी टाळणे, स्वत:चं सुख, धन यापुढे पती, पुत्र यांचं प्रेमही दुय्यम ठरतं. सावित्री ही अशीच एक स्त्री. पराकोटीचा स्वार्थीपणा हेच त्यांचं असामान्यत्व! भागव्वा कणखर व्यक्तिमत्त्वाची, अपार आत्मविश्वास असणारी धाडसी, कोणत्याही परिस्थितीत मनाचं संतुलन ढळू न देता निर्णय घेऊ शकणारी स्त्री. बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण नाही आणि म्हणूनच बालपणीच लग्नबंधनात अडकलेली भागव्वा परिस्थितीला शरण जात नाही. तिचा नवरा रामण्णा स्वभावाने गरीब असल्याने जमिनीवर दिराचा कब्जा असतो. भागव्वा न घाबरता दिराकडे वाटणी मागते. कर्नाटकातल्या कडेकोट बंदोबस्तात, पुरुषप्रधान समाजाच्या बालेकिल्ल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसतो. दिराच्या शिव्या, धमक्यांना भीक न घालता किडूकमिडूक विकून ती कोर्टात जाते. केस जिंकून जमीन ताब्यात घेते, संसार सांभाळते. प्रचंड मानसिक बळ, लीडरशिप हे तिचे अंगभूत गुण. सौदामिनीची कथाच वेगळी. सर्वसाधारण रूपाची दामिनी हुशार, धीट, चांगल्या स्वभावाची मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात दामिनी पदवीधर होऊन बँकेत नोकरी करते. नशिबानं देखणा, डॉक्टर नवरा मिळतो. उत्कर्ष होऊन वैभव प्राप्त होतं. मग नातेवाईकांची, लोकांची, गरजूंची रीघ लागते मदतीसाठी. असं असूनही तिच्या मनात खंत आहे. दानधर्म केला तर तो काळा पैसा, केलेलं पाप फेडण्यासाठी देतात ही भावना. नाही दिले पैसे तर पेपरातून टीकास्त्र. लोकांची ही वृत्ती तिला व्यथित करते. फणीवेणी व नागवेणी या जुळ्या बहिणी. फणी चुणचुणीत, बुद्धिमान, सर्व विषयांत पहिला नंबर. म्हणून ‘फस्र्ट रँक फणी’. तर नागू सावळी, काटकुळी, सर्वसामान्य. त्यामुळे दोघींची नकळत तुलना होईल. दोघींमुळे स्नेह नव्हता. नागू अबोल. ती सामान्य स्थळी पडली पण सासरी कौतुक होतं. उलट फणीचं रूप, गुण, बुद्धिमत्ता हे अवगुण ठरले. नवरा अतिबुद्धिमान, गर्विष्ठ म्हणून फणीला दुय्यम मानून तिची अवहेलना होत राहिली. फणीची ‘ईर्षा’ नाहीशी होऊन तिचं मन कोमेजून जातं. पीएच. डी. करायची इच्छा अपूर्ण राहते. करिअर नाही, स्वत:चं अस्तित्वच उरत नाही. गुणी फणीच्या नशिबी असं जिणं येतं. शीनप्पा-सीताबाई हे मेड फॉर इच अदर जोडपं. दोघांनाही पैसा हेच सर्वस्व. त्यांच्या जीवनाची मूल्येच वेगळी. दोघंही गर्भश्रीमंत त्यामुळे फक्त बरोबरीच्या लोकांशीच संबंध ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही वृत्ती. गरिबांच्या वेदना, दु:खाशी त्यांचा काहीच संबंध नाही. पण कधी कधी काळाचा महिमा अगाध असतो. सून व मुलगी यांच्या उधळपट्टीमुळे, स्वार्थी वृत्तीमुळे संपत्तीस ओहोटी लागते आणि काळाच्या प्रवाहात सारे सामान्य होऊन जाते. सरसक्का सुंदर आहे पण बेताचं शिक्षण, बेताची परिस्थिती यामुळे रेड्यासारख्या श्रीपादशी विवाह होतो. श्रीमंत घराणं पण श्रीपाद अवगुणी, बाहेरख्याली असल्याने रोगग्रस्त असतो. फसवणूक झालेली सरसक्का वर्षभरातच विधवा होते आणि अपशकुनी म्हणून अवमानित होते. पण कोणाचं भाग्य कसं पालटेल ते कल्पनेच्या पलीकडचं असतं. तिचे कुटुंब बद्रीकेदारला यात्रेला जाते. तिथं लक्ष्मणझुल्यावर योगयोगाने सरसक्का व दीर श्रीहरी नदीत फेकले जातात. त्यांचा पत्ता लागत नाही पण ते सुदैवाने वाचतात. दूर निघून जाऊन विवाह करतात, सुखी होतात. जीवण्णा एक गर्भश्रीमंत माणूस, पण त्याच्या बाह्यरूपावरून व चिकट स्वभावावरून याची कल्पना येणेही कठीण. भिक्षुकासारखे कपडे, जेवणातही काटकसर. त्याच्या या स्वभावामुळे मुलगा व मुलगी दुरावले पण अर्धांगवायू व परावलंबित याने चिकट जीवण्णाला चांगलाच धडा शिकला. अंबक्का सर्वसामान्य पण सुगरण, स्वयंपाकघरात रमणारी गृहिणी. तिचा सुशिक्षित पती यामुळे कंटाळलेला पण तिच्या आजारपणामुळे तिचं महत्त्व पटतं. ताराबाईला भांडण अतिशय प्रिय. त्यासाठी तिला कोणत्याही प्रसंगाची गरज वाटत नाही. भांडण समोर आलं की तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. उत्साह द्विगुणित होतो. समोरच्याला हिणवण्यात, नामोहरम करण्यात तिचा हात कुणीही धरणार नाही पण भांडण संपल्यावर मन शांत होऊन त्याचा मागमूसही राहत नाही. अशा शब्दात लेखिका तिचं वर्णन करते. सीमा संधिसाधू, चतुर आहे. कुणी डोनेशन मागायला आलं तर सरळ सासूच्या हातात अधिकार आहेत म्हणून सुटका करून घेते. डब्बावाली नलिनी एक अजब व्यक्तिमत्त्व. कार्याला जायला जमलं नाही तर रिकामा डबा पाठवून देऊन कोणाकडून मागवते. वरकरणी हे विचित्र वायतं पण तिचं मन निर्मळ आहे, हेतू उदात्त आहे, डबा आणणाऱ्याशी बोलता येतं. स्वत: डबा पोचवायला, परत करायला जाते तेव्हा त्यांच्याशी बोलून त्यांची दु:खं हलकी करता येतात. सांत्वन करता येतं. मन मोकळं होतं, हा चांगला हेतू त्यामागे असतो. याची किती जणांना जाणीव असते? माणसामध्ये असलेले गुण-अवगुण हेरून ते शब्दबद्ध करताना लेखिकेने कुठेही वाईट हेतू किंवा अढी ठेवलेली नाही. माणसाच्या स्वभावाचे हे विविध पैलू उलगडणे एवढाच हेतू. माणूस कोणत्याही प्रांतातला, प्रदेशातला असो, त्याची भाषा, संस्कृती यात वेगळेपणा असो पण माणूस म्हणून तो अंतर्बाह्य फार वेगळा नसतो. त्याच्यामधील सत्-असत्, स्वार्थ, परोपकार, कठोरपणा, मृदुता, प्रेम, स्नेह, त्वेष, मत्सर, हेवा हे सारेच सर्वांच्या ठायी असतेच. अशा विविध गुणावगुणांनी युक्त माणसावर आपण प्रेम करतो. त्याच्यामधल्या अवगुणाकडे सहानुभूतीने पाहून त्याला जवळ करतो. मग त्यातच माणुसकीचं दर्शन घडतं. लेखिकेच्या अशा उदार दृष्टिकोनातून हे साध्य झालेलं दिसतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more