* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665642
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION OF SHORT STORIES ONCE AGAIN REVEALS THE STRENGTH DESAI`S WORDS POSSESS. IT REVEALS VARIOUS FEELINGS. THIS IS A COLLECTION OF HIS STORIES DURING HIS EARLY YEARS AS A WRITER WITH A MOSTLY A RURAL BACKGROUND. EGO, PRESTIGE, CLASS, HOSTILITY ARE BEAUTIFULLY WOVEN INTO EACH OTHER THROUGHOUT THE COLLECTION. THEY TOUCH OUR HEART LIKE NEVER BEFORE. WRITER IS SUCCESSFUL IN REVEALING SIMULTANEOUSLY TWO TOTALLY DIFFERENT ASPECTS OF LIFE; LOVE AND HATRED. IN HIS STORIES WE FIND PEOPLE WHO GIVE AWAY THEIR LIFE, SACRIFICE EVERYTHING THEY HAVE FOR THE PRESTIGE OF THEIR ANCESTRY AT THE SAME TIME WE COME ACROSS PEOPLE WHO DO NOT HESITATE TO TAKE AWAY SOMEBODY`S LIFE FOR THEIR SELFISHNESS.
रणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे. रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात कथांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. त्याच काळातला हा संग्रह. घराणं, इभ्रत, प्रतिष्ठा, गावकी, वैर या धाग्यांनी विणलेल्या कथा मनाच्या तळापर्यंत पोहोचतात. जिथं घराण्याची पत सांभाळण्यासाठी आपला जीव पणाला लावणारी माणसं, आप्तेष्टांच्या प्रेमापोटी सर्वस्व उधळणारी माणसं या कथांमधून भेटतात, तिथंच स्वार्थापोटी रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणारी माणसंही भेटतात. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Star MAHARASHTRA TIMES 09-04-1989

    रणजित देसाई हे मराठीतील एक मातबर लेखक. स्वामी आणि श्रीमान योगी या त्यांच्या कादंबऱ्यांनी ते जवळपास प्रत्येक मराठी वाचकापर्यंत पोचले. या दोन कादंबऱ्यांना व्यावहारिक यशही खूप लाभलं. या कादंबऱ्याखेरीजही त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली आणि थासुद्धा लिहिल्या. परंतु एवढं चौफेर लेखन करूनही आज ते जास्त परिचित आहेत ते स्वामीकार म्हणूनच! खरं तर स्वामीकारांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगदी या माती संस्कृतीमधली त्यांची अस्सल माणसं, त्यांची सुखं-दु:खं, त्यांचं जीवन याचे अत्यंत सुरेख चित्रण देसाई करतात. त्यांची कथाकथनाची शैली सरळ पण फार आकर्षक आहे. तिला उपमा-अलंकाराचा फाजील सोस नाही. जे त्यांना दिसलं भावलं त्याचं चित्रमय शैलीमध्ये अत्यंत वाचनीय असं चित्रण देसाई करतात. काही वेळा त्यांच्या कथा या त्या-त्या प्रदेशापुरत्या न राहता त्या सर्वव्यापी बनतात. अलीकडेच देसाई यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. हे कथासंग्रह देसाई यांच्या कथा लेखनाची सारी वैशिष्ट्य ठळकपणे दर्शविणारे आहेत. या तीन कथासंग्रहांमध्ये एकंदर चोपन्न कथा (प्रत्येकी अठरा) आहेत. यापूर्वी जाण आणि कणव हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. याच संग्रहातील कथांची विषयदार (देसाई यांच्या म्हणण्यानुसार) निवड करून त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या चोपन्न कथांमधील काही कथा खरोखरच लघुकथा म्हणता येतील अशा आहेत. आणि तरीही परिणामकारकतेत त्या कमी पडत नाही. भोग, दुष्काळ यासारख्या कथा परिस्थितीचा किती जबरदस्त काच माणसाला असतो याचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. तर मी आमदारकी का सोडली? भांडवलदार का राहिले? या अगदी वेगळ्या धाटणीच्या कथा आहेत. पूर नावाच्याच दोन कथा वैशाख आणि मेघ या कथासंग्रहात आहेत. दोन्हींची शीर्षके एक असली तरी मांडणी आणि परिणाम वेगवेगळा आहे. वैशाख संग्रहातील रक्त, मरण, शाळा या कथा अधिक स्मरणात रहाणाऱ्या आहेत. हे तीनही संग्रह रणजित देसाई यांच्या कथांचे सार विशेष उत्तमपणे मांडणारे आहेत. हे नक्की. -अनिरुद्ध शांडिल्य ...Read more

  • Rating StarLOKSATTA 9-4-1989

    रणजित देसाई यांच्या शालीन कथा वैशाख, मेघ, आषाढ दूरदर्शनसारख्या दूरगामी माध्यमातून रामायण, महाभारतासारख्या प्राचीन, सांस्कृतिक वारसांचा जीर्णोद्धार होण्याचे हे दिवस आहेत. व्यक्तिवेध, काव्यविचार, जीवनदर्शन इ. अनेक बाबतीत हे नवे दर्शन ढोबळ, अपुरे असल तरी ते निखालस खोटे किंवा पूर्ण निरुपयोगी असू शकत नाही. औद्योगिक संस्कृतीची कठोर गती आणि असह्य दडपण याखाली चिरडून मूल्यविचाराबाबत गोंधळून गेलेल्या समाजापुढे अर्ध्या कच्च्या रूपात का होईना पण निखळ प्रामाणिकपणाचे महत्त्व, सचोटीची किंमत, धैर्याचे मूल्य, मूढ आत्मसंतुष्टतेपेक्षा विशाल, निरागस त्यागातले साफल्य अशा गोष्टी ठेवल्या जाणे अगत्याचे आहे. अगदी अशाच पद्धतीने तीस-पस्तीस वर्षापूर्वी मावळत आलेल्या, परंपरागत सदाचाराची कास धरू पाहणाऱ्या सत्त्वशील पिढीच्या काही गोष्टी ‘आषाढ’, ‘वैशाख’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर येतात. या कथा पुनर्मुद्रित आहेत आणि लेखकाचे नावही नवे नाही. महाराष्ट्राचे लाडके लेखक ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्या लेखणीतून उतरलेल्या या कथा आहेत. जीवनाबद्द्ल प्रेम या कथांच्या वाटा आणि वळणे गुंतागुंतीची आणि दुर्बोध नाहीत. कथांचे संदर्भ केवळ प्रासंगिक आहेत, व्याप्तीही मर्यादित आहे, पण कथांच्या अभिव्यक्तीमध्ये त्या त्या लेखकांचे जीवनाबद्दलचे प्रेम आणि कुतुहल अत्यंत प्रांजळपणे, थेटपणाने प्रगट झाले आहे. रणजित देसार्इंच्याबाबतीत हे प्रेम खूपदा सौजन्याच्या चौकटींवर अधिक आहे. माणुसकीचा, उमदेपणाचा गौरव करणारी त्यांची प्रतिभा, खानदानी, अब्रुदार, सज्जन, सुसंस्कृत, लोकलाजेला भिणाऱ्या व्यक्तिशेषांची प्रभावी चित्रे अत्यंत सहज कौशल्याने रंगवते. या चित्रांचे रंग खूपदा नको इतके झगझगीत असतात. म्हणजे अमावस्येचे चित्रही निळ्या रंगाने रंगविण्याकडे कल असतो. दरोडेखोरही विशाल अंत:करणाचे असतात. तिथे इनामदार, पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे? खूपदा परीकथांशी साम्य सांगणाऱ्या या कथांच्या चौकटी आहेत. काही ठराविक टप्पे आणि कल्पनाबंध त्यात जाणवतात. त्यातून नकळत एक संदेश मिळतो. त्यांच्या प्रकाशात वाचणाऱ्यांचं माणुसपण उजळून निघतं. या एकाच सामथ्र्यामुळे आपल्या सर्व तथाकथित मर्यादा ओलांडून या कथा मोठ्या होतात. गंभीर जीवनदर्शन परंतु यापलिकडे झेप घेणारे काही सूक्ष्म तपशील गंभीर जीवनदर्शनाचीही चूणूक दाखवून जातात. रिकामटेकडा आणि नालायक असा धाकटा भाऊ सापासारखा घरात शिरताना असहायपणे डोळे गाळणाऱ्या विठूचे कासावीस हृदय (साप). स्रीत्वाच्या मादक आकर्षणात सापडून एका लहानशाच मर्यादेत पण अस्वस्थ भिरभिरत राहणारे मामाचे मन (चमेली). चारशे रुपये गाठीला घेऊन निघालेल्या म्हाताऱ्याबरोबर अपरात्री प्रवास करत चालत असताना दुर्दैवी जोतिबाच्या डोक्यात फिरणारा विचित्र विचारांचा भोवरा (भोवरा). आपल्याच एकेकाळच्या बायकोच्या आजारी नवऱ्याला वाचविण्यासाठी म्हणून भर पुरात डोण घालणाऱ्या एकाकी सखाच्या मेंदूत माजलेले वादळी काहूर (पूर). अशा कित्येक ठिकाणी त्या सामान्य असूनही जीवनाच्या असामान्य प्रेरणा अनुभवणाऱ्या व्यक्तींच्या जगण्यातली तडफड अगदी सहज व्यक्त झाली आहे. या व्यक्तींना द्यावा लागलेला संघर्ष हा नेहमीच दारिद्र्य, आजार, संकटे अशा ढोबळ संदर्भातला नाही. अनेकदा तो मूल्यांचा संघर्ष आहे. माणसांनीच माणसाला टाकावं, एकाकी करून सोडावं, या प्रकारात जो भीतीदायक एकटेपणा आहे तो प्रत्येकाच्या काळजात ओसाड माळरानाप्रमाणे पसरलेला असतो. तो तुडवताना जी दमछाक होते त्या दमछाकीच्या खुणा या कथांनी वारंवार दाखविल्या आहेत, मात्र यावर उतारा म्हणजे मनाचा मोठेपणा, वैराला प्रेमाने उत्तर असा लेखकाचा विश्वास आहे. नितळ मराठी शैली या दोन संग्रहाची शैली नितळपणे अस्सल मराठी आहे. संस्कृतप्रचुरतेचा तिला वास नाही की ती इंग्रजाळलेलीही नाही. बोली भाषेचा वंâटाळवाणा अतिरेक नाही. ती शुद्ध, निर्भेळ मराठी आहे. अदावत, पावलट, बुकाणा, दाडवान, लेकावळा, गत्या असल्या खास मऱ्हाठी शब्दांनी रुजलेली ही शैली प्रतिमारुपकांच्या अवघड वाटेला जात नाही. पण अभिव्यक्तीचे तिचे म्हणून एक सामथ्र्य आणि सौंदर्य आहे. या कथांनी ज्यांच्या कहाण्या सांगितल्या त्या सुसंस्कृत व्यक्तीविशेषांना शोभावी अशी ही शैली आहे. डोईवरला पदर हलू न देण्यातला शालीनपणा जपण्यात तिला रस आहे. रणजित देसार्इंच्या या कथासारख्या कथा आता कोणी लिहिणार नाही. कोणत्याच अर्थाने तसे वातावरण आता राहिले नाही. पण मागे वळून पाहताना थोडंसं रेंगाळायला हरकत नाही असा दिलासा देणाऱ्या या जुन्या कथा नव्याने वाचण्यासारख्या आहेत, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more