* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TRANSLATED BY MRINALINI GADKARI. THIS LIFE IS A HARMONIOUS BRAID WOVEN TOGETHER WITH THE BEAUTIFUL FEELINGS OF HUMAN BEINGS. NATURE IS ALWAYS IN ACCORDANCE WITH IT. RAVINDRANATH`S LITERATURE HOLDS A SPECIAL PLACE FOR HUMAN BEINGS AND NATURE. IN HIS STORIES, NATURE IS NOT THERE FOR THE SAKE OF BEING. IT IS THERE AS A SEPARATE CHARACTER. IT PLAYS IMPORTANT ROLE WITH THE MOOD SWINGS OF HUMAN BEINGS. ITS CHANGING NATURE REFLECTS THE CHANGING OF MOODS. THESE STORIES WHERE EQUAL WEIGHTAGE IS GIVEN TO MAN AND NATURE SHOWS RAVINDRANATH`S QUALITIES AS A WORLD FAMOUS POET, OF A SPECIAL, DIVINE HUMAN BEING.
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ यांना असाधारण स्थान आहे. त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणाऱ्या भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातूनफुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarPRABHAT 13-02-2008

    स्त्रीची विविध रुपे ... विश्वकवी म्हणून रवींद्रनाथ टागोरांना ओळखलं जातं. परंतु आशिया खंडात नोबेल पारितोषिकाने सन्मानिक झालेल्या टागोरांची एवढीच ओळख नव्हती. ते तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, कादंबरीकार णि कथाकारही होते. ‘माणूस’ आणि ‘निसर्ग’ हे त्यांचे आवडते विषय असल्याचे जाणवते. माणसामध्ये पुन्हा स्त्री आणि पुरुष हे भिन्नच त्यात स्त्रीच्या जीवनाची कहाणी काही वेगळीच. मुलगी, आई, पत्नी, प्रियसी, विधवा अशी स्त्रीची विविध रुपे असतात. काळानुसार ती आपल्यावर पडलेली भूमिका निभावत असतात. स्त्रीच्या या विविध रुपांचे कांगोरे टागोरांनी आपल्या ‘पोस्टमास्तर आणि इतर कथा’ या कथासंग्रहात उलगडून दाखविले आहे. या कथासंग्रहाचा अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी केला असून, मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. गावात आलेल्या पोस्टमास्तरची सेवा करणारी आणि त्याने गाव सोडताना आपल्याला बरोबर न्यावे, अशी मनोमन अपेक्षा करणारी अनाथ रतन, आपल्या जावेच्या मुलावर प्रेम करणारी विधवा कादंबिनी, दीराने केलेल्या खुनाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेणारी चंदरा, लिहिण्या-वाचण्यातील निर्भेळ आनंद घेणारी चिमुरडी उमा, नवऱ्याला कमीपणा नको म्हणून स्वत:च्या प्रतिभेला मुरड घालणारी निर्झरणी, प्रियकराला दिलेला शब्द पाळण्यासाठी चितेवरून उठून येणारी महामाया अशी विविध रूपे आणि भूमिकांतील स्त्रिया रवींद्रनाथांच्या या कथासंग्रहात आहेत. वाचकांशी सहज संवाद साधत कथा सांगण्याची रवींद्रनाथ टागोरांची खास शैली. त्याचा प्रत्यय हा कथासंग्रह वाचताना येतो. त्यांच्या मनात स्त्रीचे असलेले आदरणीय स्थान हेही अनुभवायला मिळते. एकीकडे दुर्लक्षित असलेल्या या नायिका केवळ परिस्थितीच्या गुलाम आहेत, असे नाही तर त्यांच्यातील प्रत्येकीच्या अंगी काहींना काही विशेष गुण आहे. परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी, सबल होण्यासाठी त्यांची धडपड चालू असल्याचेही जाणवते. स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथांच्या कथांमधून उलगडलेल्या या स्त्री जीवनाच्या विविध छटा आजही तशाच पहायला मिळतात. त्यामुळे या कथांना काळाचे बंधन जाणवत नाही. रवींद्रनाथांच्या कथांचा मराठी अनुवाद करताना मृणालिनी गडकरी यांनी कथांचा सहजपणा, ओघवतेपणा आणि संवाद साधण्याची शैली या बाबींना धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे अनुवादातही कथाचा ताजेपणा जाणवतो. वाचकाला भुरळ घालण्यात त्या यशस्वी होतात. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 15-06-2008

    अनंत मनोहर रवींद्रनाथजी म्हणजे गीतांजली, शांतिनिकेतन म्हणजे रवीबाबू आणि काबुलीवाला कथा म्हणजे तेच. गांधीजी आवर्जून भेटायला गेले होते ते टागोरजींना. पण रवींद्रनाथ यांनी, काबुलीवाला प्रमाणे अन्यही खूप कथा लिहिल्या, गीतांजली नंतरही कविता केल्या, हे आपलयाला माहित नसते. टागोरजींचा काबुलीवाला याच्या पाठोपाठ वाचकांसमोर ``पोस्टमास्तर आणि इतर कथा`` हा मृणालिनी गडकरी यांचा भाषांतरित संग्रह आला आहे. रवींद्रनाथ एका एकत्र कुटुंबात वाढले. त्यांची आई, वहिनी, पत्नी या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. जमीनदारीचा पसारा सांभाळताना त्यांचा जनसामान्यांशी संबंध येई. भारतीय स्त्री कष्टाळू, त्यागी, सोशिक किती आहे ते त्यांनी पाहिले होते.त्यांच्या मनात भारतीय स्त्रीची एक मनोज्ञ मूर्ती साकार झाली होती. तिचे दु:ख, तिच्या व्यथाभरल्या कहाण्या, तिचे कर्तुत्व, व्यक्तिमत्व, त्यागमयी जीवन, पतिपरायणता यांचे चित्रण रवीबाबूंच्या साहित्यात अनेकदा आले आहे. बंगाली विधवेचे जीवन आपल्याकडील गतधवेच्या आयुष्याप्रमाणे अति करुणामय असे. एवूâण त्या काळातील स्त्री हा समाजव्यवस्थेचा एक शापित घटक असे. तिची बुध्दी, शक्ती, समज, कलाप्रियता, तिची ज्ञानलालसा यांना काही किंमत नव्हती. टागोरजींच्या अनेक कथांचा केंद्रबिंदू तत्कालीन स्त्री व तिचे जीवन हा असतो त्याचे हे रहस्य आहे. ते स्त्रीचा कधीही अधिक्षेप करीत नसत. स्त्रीची प्रतिष्ठा जपणारी अशी त्यांची कथा असे. बंगाली स्त्री वेळप्रसंग आल्यास आत्मसन्मानासाठी समाजाविरुध्द बंड करुन उठत असते. तशी ती कणखर होती. रवींद्रनाथांच्या स्त्री व्यक्तीरेखा सबल आहेत. त्यातील काही उघडउघड बंड करतात. तर काही उघड बंड करीत नसल्या तरी त्या मूकपणे प्रस्थापितांना वैचारिक धक्के देतातच. त्यातून समाज पुढे सरतो. त्यात ता स्त्रियांचा स्वार्थ नसतो. त्यांच्या कृतीमागे प्रबल भावोत्कटतेपेक्षा डोळस विचार असतो आणि समाजगाड्याला चालना मिळावी ही प्रबळ इच्छा असते. रवींद्रनाथ कविहृदयी खरे परंतु ते वास्तवसन्मुख आहेत. त्याचं चटकन उदाहरण द्यायचं तर ते ``वही``कथेचं देता येईल. या कथेतील छोटी उमा तिचे मनोगत तिच्या वहीमध्ये लिहून ठेवायची. तिच्या सासरच्या लोकांना उमा लिहित्येय ही गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती. तीला हा हिशेब समजण्यासारखा नव्हता, तिच्या हातातून वही काढली गेली. ``गर्वहरण`` मधली निर्झरिणी ही लेखिका आणि तिचा नवरा दोघेही एका कथास्पर्धेत भाग घेतात. तिला पारितोषिक मिळते पण ती शहाणी व समजूतदार असते. ती स्वत:ची वही स्वत:च फाडून टाकते. ती आपल्या संसाराला जपण्यासाठी हा निर्णय घेते. पहिला नंबर आलेली अनिला तिला आत्मभान येताच घर सोडून निघून जाते. कारण नवऱ्याचं वागणं तिला असह्य झालेलं असतं. ``पत्नीच पत्र`` मधील मृणाल कुरूप बिंदूला आसरा देते. अन्यायापासून ती बिंदूचे रक्षण करू पाहते. शेवटी बिंदूने आत्मघात करून घेतला. मृणालच्या मनात हे असं का ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला. घर सोडण्याचा मृणालने कठोर निर्णय घेतला. घर सोडले, आपण हा निर्णय का घेतला हे तिने पतीला पत्राने कळवले. कधीकधी परिस्थिती एवढी प्रतिकूल ठरते की कळत असून या बुद्धिवान नायिकांना प्रतिकूल वास्तव स्वीकारावं लागतं. त्या अगतिक होतात. पण त्या आपलं असमाधान नोंदवून ठेवतात. कधीतरी समाजपुरुषाला स्त्रियांच्या या असंतोषाची दखल घ्यावीच लागते. सगळ्याच कथा अशा आहेत असं नाही. समाप्ती ही कथा विलक्षण ताकदीची, हळूवार अशी आहे. रवींद्रनाथांच्या कथांचे नायक म्हणजे तळागाळातील माणसं, अशिक्षित - सुशिक्षित, नाना स्वभावाची माणसं. उलापूर या अरिष्ट खेड्यातील अनाथ, निरक्षर रतन. सहृदय पोस्टमास्तरांच्या आसऱ्यामुळे त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मनात स्वप्न उमलू लागलेली रतन. पण पोस्टमास्तर बदली होत नाही म्हणून नोकरी सोडून निघून गेले आणि शिकण्याचं, माणूस होऊन जगण्याचं तिचं स्वप्न तुटून गेलं. अशा विविधरंगी पंधरा कथांचा हा गुच्छ. मृणालिनी गडकरी आणि मेहता प्रकाशन यांच्यामुळे मराठी वाचकाला रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कथा उपलब्ध झाल्या. पूर्वी मामा वरेरकर, अशोक शहाणे, थोडेफार पु. ल. देशपांडे अशा मूठभर मराठी लोकांनी थोडेफार अनुवाद केले होते. आता साहित्य अकादमी आणि मेहतांसारखे प्रकाशक यांनी अनुवादांचे जग विस्तृत केले आहे. आपण अनुवाद आवर्जून वाचायला हवेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more