* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ARE UNABLE TO KNOW THE ACTUAL MEANING OF LIFE UNTIL WE FIND THE ACTUAL MEANING OF DEATH. ONLY TAKING A BIRTH IS NOT ENOUGH. WE SHOULD RISE AFTER DEATH ! ONLY THEN WE COULD FIND THE MEANING OF LIFE. I TRIED TO FACE DEATH THREE TIMES, BUT CAUGHT WITH A SPECIFIC SCENE EVERY TIME . I LOST MY SENSES, FELT LIKE WHELMED WITH WATER IN MY HEAD, AS I CAN’T EVEN BREATH YET CAN’T STEP OUT. AS I’M TRYING TO RISE AND SOMEBODY IS PULLING MY LEG DOWN, SURROUNDED WITH BLACKISH GREEN… GOING DEEP AND DEEP AND DEEP…… THAT’S TRUE. WE CAN’T KNOW THE IMPORTANCE OF LIFE UNTIL WE PAY FOR IT. I HAVEN’T FACED A SITUATION LIKE THIS YET. NOT UNDERGONE A TERRIBLE DISTRESS YET TO ATTEMPT A SUICIDE. THEN, DO I KNOW THE IMPORTANCE OF LIFE ?? CAN I SAY YES I’M AWARE OF IT ?? HOW MY MEDITATION WORKS ?? BY READING AND INTERPRETATING ‘CLASSIC’ LITERATURE. ! TAKING AN EVENING WALK WITH THE COLD BREEZES IN THE AIR…. COFFEE AND DISCUSSIONS ON THE CHARACTERS OF A RECENT BOOK WE READ….TRYING NOT TO HURT ANYONE….!! IS LIFE THIS SIMPLE ???? NOT AT ALL…….
मरणाचा अर्थ समजेपर्यंत जीवन समजत नाही. केवळ जन्मणं त्यासाठी पुरेसं नाही. मरून जन्माला आलं पाहिजे. त्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ समजतो. तीन वेळा मरायचा प्रयत्न केला, तरी विशिष्ट प्रकारचाच अनुभव आला. शुद्ध गेल्यासारखं - डोक्यात पाणी भरल्यासारखं - श्वास कोंडून जीव गुदमरत असतानाही पाण्याबाहेर यायला जमू नये, तसं. चढायला धडपडत असताना कुणी तरी पुन्हा गर्तेत लोटून द्यावं, तसं. भोवताली काळपट हिरवेपणा भरून राहावा ... खोल बुडत जावं ... खरंय् हे. मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. मला असा अनुभव कधीच आला नाही. आत्महत्या करावी. इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे काय? ठाऊक आहे, असं म्हणता येईल काय? माझं चिंतन कशा प्रकारे चालतं? साहित्य वाचणं - ते ‘क्लासिक’ आहे, याची काळजी घेत! पुस्तकं विकत घेणं, संध्याकाळच्या थंड सुखद हवेत फिरून येणं ... उत्तम कॉफीचे घुटके घेत साहित्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं, प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो कुणालाही न दुखवता जगत राहणं! जीवन म्हणजे एवढंच? अंहं ...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARISHODH #ANVESHAN #परिशोध #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPA S.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विश्वनाथ नावाच्या मनस्वी तरुणाची भ्रमण-गाथा, कंठी जोईस, देशपांडे वकील, जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर– अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो. यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो ही प्रत्येकाची आपापल्या जीवनाचा परिशोध घेण्याची धडपड आहे. त्यातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी. तत्त्वचिंतक भैरपांचा एक जीवन-स्पर्शी लेखनानुभव! ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ ‘केवळ क्लासिक साहित्य वाचणं... उत्तम कॉफीचे घुटके घेत त्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं... जीवन म्हणजे एवढंच? अंहं– एका जीवघेण्या संघर्षाचा चिरंतन परिशोध. मराठी अनुवाद सौ. उमा. वि. कुलकर्णी यांच्या ओघवती भाषेत! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परिपूर्ण शोध… बिनीच्या कानडी कादंबरीकारांपैकी डॉ. शिवराम कारंथ, डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांच्याप्रमाणेच डॉ. एस. एल. भैरप्पा यांचेही नाव जाणकार मराठी वाचकाच्या परिचयाचे आहे. ‘गृहभंग’, ‘वंशवृक्ष’, ‘काठ’, ‘पर्व’ अशा त्यांच्या काही कादंबऱ्या मराठीत भाषांरित झाल्या आहेत. ‘परिशोध’ ही मराठीत येणारी त्यांची पाचवी कादंबरी. तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या भैरप्प्यांच्या कादंबऱ्यांतही तत्त्वचिकित्सेचा अंत:प्रवाह वाहात असतो. त्यांच्या कादंबऱ्यातील पात्रांना पडणारे प्रश्न वाचकाला तत्त्वज्ञानाच्या खोल आणि चक्रावून सोडणाऱ्या प्रवाहात खेचत नेतात, अंतर्मुख बनवतात आणि एकंदर मानवी जीवनाच्या (आणि मृत्युच्या) अर्थाचा विचार करायला लावतात. शोध घ्यायला प्रवृत्त करतात. ‘परिशोध’ ही कादंबरीही याला अपवाद नाही. ‘परिशोध’ हा शब्द काही मराठीत रुढ आहे, असे म्हणता येणार नाही. पण मूळ ‘अन्वेषण’ या शीर्षकाचा प्रतिशब्द म्हणून भाषांतरकर्त्या उमा कुलकर्णी यांनी तो चपखलपणाने योजला आहे. ‘अन्वेषण’ म्हणजे शोध. पण ‘शोध’ला ‘परि’ या उपसर्गाची जोड देऊन कादंबरीचे सार त्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न उमा कुलकर्णी यांनी केला आहे. ‘परिशोध’ म्हणजे परिपूर्ण शोध, अनेक तऱ्हांनी घेतलेला सखोल शोध. या कादंबरीच्या केंद्रबिंदूच्या जागी असलेल्या विश्वनाथचा, त्याच्याशी संबंध आलेल्या सर्वांनी घेतलेला शोध म्हणजे ‘परिशोध’ ही कादंबरी. हा शोध आहे तो पूर्वघटनांचे निवेदन व विश्लेषण यांच्याद्वारा, त्यामुळे वाचकाचा विश्वनाथशी प्रत्यक्ष संबंध कधीच येत नाही. विश्वनाथ उर्फ विश्व (ह्या नावातील प्रतिकात्मता सहज लक्षात यावी.) ह्या केंद्राभोवतीच्या परीघावर असलेल्या सात व्यक्तींच्या जाणीवप्रवाहात लेखक उतरतो आणि त्या द्वारा विश्वच्या जीवनातील घटना आणि त्याचे काही गुणविशेष बुद्धिमत्ता, निर्भयता, शिक्षणाची आवड, नैतिकता, निष्ठा - यांचा वाचकाला प्रत्यय येत जातो. अस्थिर ‘विश्व’चे अनुभव विश्वची आई नजंम्मा हिची शोकांतिका भैरप्पांनी ‘गृहभंग’ या कादंबरीतच साकार केली आहे. खवीस बाप. आळशी व अप्पलपोटा नवरा, छळ करणारी सासू आणि भोवतीच्या समाजातील इतर अनेकजण नंजम्माचे विविध प्रकारे शोषण करतात. सर्व प्रकारच्या प्रतिकुलतेशी झगडत ‘घर’ उभे करू पाहाणाऱ्या एका दुर्दैवी गृहिणीची कहाणी ‘गृहभंग’ मध्ये येते. ‘परिशोध’मध्ये तिच्या मुलाची परवड होताना दिसते. अनेक गुण अंगी असूनही मनस्वीपणा, परखडपणा, नैतिकतेबद्दलच्या स्वत:च्या कल्पनेशी प्रामाणिक राहाण्याचा अट्टहास यामुळे विश्व कुठेच स्थिर होऊ शकत नाही. भिक्षांदेही’ करून त्याला जगवू व शिकवू पाहाणाऱ्या महादेवय्या या जंगमाच्या (संन्याशाच्या) मृत्यूनंतर विश्वचे जीवन धारेला लागल्यासारखे होते. आत्महत्येचे प्रयत्न, संभोगाच्या व पोहोण्याच्या अनुभवातून निर्माण झालेली जीवनेच्छा, एका वकिलाच्या घरी काम, नाटक वंâपनीतील नोकरी, मुंबईच्या वेश्यावस्तीतील मुक्काम, तत्त्वजिज्ञासेमुळे एका साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे पत्नीच्या त्याग, आत्महत्या करण्याच्या तिच्या प्रयत्नात विश्वच्या मुलाचा मृत्यू - अशा क्रमाने विश्व भिरभिरत राहातो, त्यामुळे त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाला तो एक गूढ वाटत राहातो. पण कादंबरीच्या सात प्रकरणांतील सात व्यक्तीच्या माध्यमातूनच आपण विश्वला भेटत असल्यामुळे विश्व प्रत्यक्षात कसा आहे, हे वाचकाला समजत नाही, त्यामुळे वाचकही त्याचा ‘ शोध’ घेत राहातो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, ‘यशस्वी होणे’ या सर्वसाधारण गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत, गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे काय आहे हा प्रश्न त्याला पडतो आहे. शेवटच्या प्रकरणात त्याच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. कादंबरी संपते तीही प्रश्नचिन्हांवरच. विश्वला भेटायचं असं ठरणारे हेडमास्तर स्वत:लाच विचारतात : ‘‘समोर बोलत असतानाही तो कितपत सत्य सांगू शकेल? त्यातलं मी किती जाणू शकेन? संस्कृतीचा अडथळा नाही कादंबरीचा असा समर्थ प्रत्यय भाषांतरातूनही यावा, हे जेवढे लेखकाचे यश आहे, तेवढेच भाषांतरकर्तीचेही आहे. कन्नड नावे (व्यक्ती, स्थळे, खाद्यपदार्थ, वस्तू इ.), रीतीरिवाज, उपासनापद्धती, वेशभूषा, अशा अनेक गोष्टींतून आपल्याला कानडी संस्कृतीच्या अनेक वैशिष्टयांचा परिचय होतो, पण त्यांचा अडथळा मात्र वाटत नाही, हेही उमा कुलकर्णींच्या भाषांतराचे यश आहे. अर्थात काही ठिकाणी मराठीची थोडीशी मोडतोड झालेली दिसते. उदाहरणार्थ, ‘दुखणं उठलं होतं (पृ.१) ‘नतद्रष्ट नशिबावर शिव्यांची लाखोली वाहिली’ (पृ.८) ‘त्या क्षणी दोघांच्याही मनात परस्परांविषयी विश्वास जन्मून वाटल्याचं दोघांनाही जाणवलं. (पृ.२४) ‘नातू कुणाचा आणि वात्सल्य (•कळवळा) कुणाला ! (पृ.३७) ‘नादाला गेलं नाही’ (पृ. ३६) ‘बड्या देसायांच्या घरचे ते (•ती) लेक !’ (पृ.७१) ‘कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन (•स्वार्थ, अपेक्षा) नसलेलं...’ (पृ.७३) ‘यानं वाचायला हवी, अशी आशा निर्माण झाली’ (•हा वाचेल / यानं वाचावी) (पृ.७६), ‘तरीही त्यानं वाचावं अशी आशा मनात निर्माण झाली’ (पृ.७६) (‘परिहार मिळाल्यासारखं वाटलं’ (•झाल्यासारखं) (पृ.२०२) प्रसिद्धी पूर्व संस्कारात अशी स्थळे सहजपणे सुधारून घेता आली असती. मुद्रितशोधनातही अनेक चुका राहून गेल्या आहेत. उदा. – ‘काड्यापेटी’, ‘साडेचार’, ‘पंचवीस’, ‘संन्यासी’, ‘मुळं’ (•मुलं). पण अलिकडील संगणकीय जुळणीच्या व पडद्यावर करावयाच्या मुद्रितशोधाच्या युगात अशा चुका अपिरहार्य ठरू लागल्या आहेत. कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीला पूर्णपणे विशोभित आहे. त्यात कादंबरीच्या आशयाचे प्रतिबिंब नाही किंवा कादंबरीच्या सूत्राचेही सूचन नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more