* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DWIKHANDIT IS A THIRD PART OF BANGLADESHI AUTHOR TASLIMA NASREEN’S MEMOIR. IT CONTAINS MAINLY HER LIFE IN THIRTY’S & EXPERIENCES SHE HAD AS AN AUTHOR & DOCTOR. TASLIMA NASREEN’S LIFE IS FULL OF CONTROVERSIES, SUFFERING & BATTLE FOR RIGHTS. SHE PUTS HER MEMORIES IN WORDS IN HER MEMOIR. THIS BOOK NOT ONLY TALKS ABOUT TASLIMA’S LIFE, BUT IT PORTRAITS SITUATION OF WOMEN IN ISLAM.
तसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो. त्यांचे लेखन, त्यात आलेले अडथळे, कौटुंबिक वातावरण, लेखनाला झालेला विरोध, समर्थन, पुरस्काराचे राजकारण त्यांच्या लेखनाचे नेत्यांनी केलेले राजकारण सनातनी समाजातून होणारी टीका अशा सर्व अनुभवांतून जात असताना त्यांची मानसिक स्थिती त्यांनी मांडली आहे. त्यांना स्त्रियांच्या दुरवस्थेविषयी वाटणारी आस्था, त्यातून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यासाठी केलेले लिखाण, इस्लामवर त्यांनी बेधडकपणे केलेली टीका यामुळे बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी, निषेध, मोर्चे... अगदी त्यांचे शिर उडवण्यासाठी इनामही घोषित करण्यात आले; परंतु त्यांनी आपले लिखाण मात्र सुरूच ठेवले. रुग्णसेवा कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिल्या. जीवनाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, स्वप्न यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या. वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
TASLIMA NASREEN #BANGLADESH #NATIONAL RELIGION #ISLAM #YASMIN #DHAKA #SHANTI NIKETAN #LFTAAR PARTY #AANAND BAZAR #PATRIKA #SAKAL KAVITA PARISHAD #AVAKASH NIRVACHIT KALAM, GOLLA CHOOT, COULARA, VILAS GEETE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 02-09-2017

    लेखिकेची संघर्षकथा... बांगलादेशातील महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या, त्यासाठी प्रसंगी धर्माच्या विरोधात लेखन करणाऱ्या, त्यातून मूलतत्त्ववादी तसेच सरकारचा रोष ओढवून घेऊन अनेक जीवघेण्या संकटांना सामोरे गेलेल्या प्रसिद्ध, पण वादग्रस्त लेखिका तसलिमा नसरीन यांनी आपल्या सत्तावीस ते तीस वर्षे वयापर्यंतच्या आयुष्यातील घडामोडी ‘द्विखंडीत’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या ‘अमार मेयेबेला’ या आत्मकथनाचा हा तिसरा भाग आहे. विलास गीते यांनी त्याचा अनुवाद केला आहे. धर्मविरोधी, पुरुषद्वेष्टी अशी संभावना करत तस्लिमा यांच्याविरोधात बांगला देशात जी आंदोलने झाली, जो विरोध झाला, त्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. त्यांच्या विरोधात निघालेले मोर्चे, दैनिके, नियतकालिकांमधून त्यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेले लेख, मशिदीत नमाजानंतर त्यांना होणारी शिवीगाळ, त्यांचा खून करण्याचा निघालेला फतवा या साऱ्याला तोंड देत तस्लिमा कणखरपणे उभ्या राहिल्या. अर्थात काही साहित्यिकांनी, वृत्तपत्रांनी त्यांची बाजू उचलून धरली, पण तरीही देशभरातून होणारा विरोध प्रखर होता. या साऱ्या कालखंडात त्यांच्या खासगी जीवनातही अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या धर्मविरोधी लेखनाला तसेच मुक्त जगण्याला वडिलांचा मोठा विरोध होता. त्यातून तस्लिमा स्वतंत्र राहू लागल्या. वडील आणि त्या यांच्यामध्ये आईची होणारी फरपट, बहीण यास्मीन हिचे रवींद्र संगीताचे वेड, वडिलांचा रोष सहन न झाल्याने तिचे घर सोडून जाणे, तिने तडकाफडकी केलेले लग्न, पहिला पती रुद्र याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही तस्लिमा यांना त्याच्याविषयी वाटणारे प्रेम, ममत्व, त्याच्या कवितांविषयीचा आदर, रुद्रचा मृत्यू, रुद्रनंतर त्यांच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याशी असलेले नाते, या विषयी लेखिकेने मोकळेपणाने कथन केले आहे. सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिक गप्पा, कवी संमेलने, पुस्तकजत्रा यांच्या वर्णनांमधून लेखिकेने बांगलादेशातील साहित्य विश्वाची सफरही घडवून आणली आहे. हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही तर त्या काळातील बांगला देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे चित्रणही यात वाचायला मिळते. -नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarShabdruchee May 2017

    अस्वस्थ समाजाचा जाहीरनामा... तसलिमा नासरीन बांगलादेशी कादंबरीकार, स्तंभलेखक, कवी आणि स्त्रीवादाच्या ठाम पुरस्कर्त्या. द्विखंडित हे नासरीन यांच्या आत्मकथन मालिकेतील तिसरं पुस्तक. आमार मेयेबेला आणि उधाण वारानंतरचा हा भाग. नासरिन यांनी 1994 मध्ये बांलादेश सोडलं . मुलतत्ववादाला कडाडून विरोध आणि मानवतावादाच्या पुरस्कारानं तसलिमा यांचं नाव जागतिक पातळीवर गाजलं. पण या प्रसिद्धीच्या मागे तीव्र संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जिचा प्रत्यय द्विखंडित वाचताना येतो. या आत्मकथनात नासरिन यांच्या सामाजिक जीवनसोबत कौटुंबिक भोवताल आणि मित्रपरिवाराच्या गोष्टीही भेटतात. शिप्रा सारख्या मैत्रिणीचं जगणं असो की सुहृदयचं आयुष्य असो, त्यांच्या जीवनाची मांडणी करतानाही नासरिना बांगलादेशातील जीवनाचे निरनिराळे पैलू मांडतात. स्वतःच्या आयुष्याचा आलेख मांडताना त्यांचं समाजभान कुठेही हरवत नाही. बांगलादेशातील समाजजीवनाचं वास्तव दर्शन द्विखंडितच्या पानापानातून स्पष्ट होतं. पहिल्याच प्रकरणात इथल्या कुटुंब नियोजनाच्या प्रक्रियेचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. यात कुटुंब नियोजनाविषयीची इस्लाममधली मानसिकता स्पष्ट होतेच. पण गरिबीच्या शहारे आणणाऱ्या व्यथाही दिसतात. निव्वळ थोड्या चिल्लर पैशासाठी आपलं मातृत्व पणाला लावणाऱ्या बायकांचं चित्रण हेलावून सोडते. त्या लिहितात. ‘एक हलक्या दर्जाची सुती साडी आणि एकशेवीस रुपयांसाठी त्यांची आयुष्यभर निःसंतान राहण्याची तयारी असते. मला समजली माझ्या देशाची गरिबी. मी शहारले. मी रडले.’ जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं गहिरं आकलनही तसलिमा मांडतात. त्यांच्या आयुष्यातली संवेदनशील माणसं आणि त्यांचा मनोव्यापारही प्रत्ययाला येतो. नासरिन यांच्या देहात मुरलेली कवितेवरची श्रद्धा ‘तुला करु शकत नाही स्पर्श’ सारख्या प्रकरणात तीव्रतेनं व्यक्त होते. रुद्रच्या कवितांचे दाखले देताना नासरिन स्वतःच्या भावनांनाही नकळत वाट मोकळी करुन देतात. पण तसलिमांमधली कवियित्रीही यातल्या शब्दा-शब्दातून आपणास भेटते. त्यांच्या गद्यलेखनाच्या कथनशैलीतही कवितेचा प्रवाह अनुभवास येतो. रुद्रविषयी लिहिताना त्या स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहतात. ते निरिक्षण त्या तितक्याच काव्यात्म पद्धतीनं रेखाटतात. त्या म्हणतात... रुद्रबरोबरच्या सुंदर सहजीवनाचं जे रम्य स्वप्न मी पाहिलं होतं, त्या स्वप्नाची राख माझ्या सर्वांगाला चिकटून राहिली होती. रुद्रबरोबर जीवन व्यतीत करणं शक्य नाही हे मला समजलं होतं, आम्ही आता एकमेकांकडे पाठ करून उभे आहोत हे मला उमजलं होतं. आता ती सारी राख, धूळ, काजळी धुऊन टाकून स्वच्छ व्हायला हवं हेसुद्धा कळत होतं. तरीही काळ जातच राहिला. दिवस भकास उन्हात भाजत राहिले, जळत राहिले, रात्री अंधारात नागिणीसारख्या फूत्कारत राहिल्या आणि मी स्वतःला घेऊन अंगणातल्या अडगळीसारखी बसून राहिले. या जीवनाला घेऊन नक्की कुठं जावं, कुठं गेल्यावर ‘नाही-नाही’ म्हणणारा भणाण वारा माझ्या दिशेनं वेड्यासारखा झपाटत येणार नाही, हे काही समजत नव्हतं. जीवन कधी फुलासारखं, तर कधी दगडासारखं वाटे. हे जीवन कधी माझ्या मानेवर येऊन बसलं मला समजलंच नाही. माझी मान, पाठ या जीवनाच्याच भारामुळे वाकून गेली. या जीवनाला मी नीट ओळखत नव्हते, हे जीवन माझंच होतं; पण माझं नव्हतं. यात जे काही पाणी होतं ते मी अनेक वर्षांपासून दुस-याच्या ओंजळीत ओतून दिलं, स्वतःच्या तहानेचा विचार क्षणभरही माझ्या मनात आला नाही. द्विखंडित वाचताना एका स्त्रीचा व्यक्ती ते समाजजीवन असा पटच उलगडत जातो. तीव्र संवेदनशीलता, तितकचं गहिरं समाजभान यात प्रतिबिंबीत होतं. देश, समाज आणि स्वतःचं जगणं यांची सांगड घालताना गोंधळणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवं. तसलिमांच्या आयुष्यातील अनेक घटना या पुस्तकात साहित्यरुपात अवतरतात. या घटना निव्वळ एका स्त्रिच्या आयुष्यातील सर्वसामान्य घटना नाहीत. तर महिलांबाबत राबवण्यात येणारी धोरणं, त्यांच्या सुरक्षिततेविषयीची अनास्था अशा अनेक अनुषंगिक संदर्भातून मांडण्यात आलेला तो एका सामाजिक व्यवस्थेच्या निर्दयीपणाचा दस्तावेज वाटतो. द्विखंडितमधील प्रकरणाची नावंही तसलिमांच्या वादळी जीवनाची जाणीव देतात. ‘पारलैकिक गाजर’, ‘आम्ही अशाच वाहत जातो’, ‘गोल्लाछूटचा खेळ’, ‘पासपोर्ट जप्त’, ‘मानवरुपी सैतान’आणि ‘फतवा’सारखी प्रकरणे नासरीन यांनी अनुभवलेल्या संघर्षाचं इंत्यभूत चित्रण करतात. हे चित्रण अंगावर शहारे आणतं. अस्वस्थ करतं. अंतर्मूख करतं. आणि तथाकथित सामाजिक जडणघडणीबाबत नवे प्रश्नही उपस्थित करतं. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी वाचकांना स्त्रीवादी साहित्याच्या नव्या धाटणीचाही परिचय होईल, असा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यातील महत्त्वाचा दस्तावेज असणारे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित करुन मराठी वाचकांना मोठा ठेवा दिला आहे. एका मध्यमवर्गीय घरातील एका साधारण युवतीने कशा प्रकारे अनेक अडचणींना, संकटांना तोंड देत आपल्या आत्मशक्तीचा शोध लावला व ती अप्रतिम तसलिमा नासरिन बनली हे ‘द्विखंडित’ या पुस्तकात दिसते, हीच या पुस्तकाबाबतची महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्य खूप आहे. केवळ विषयाच्या महत्त्वामुळेच नव्हे, तर प्रसादगुणानेही आत्मकथेच्या या भागाला आकर्षक आणि वाचनीय केले आहे... ‘द्विखंडित’ एकाच वेळी साहित्य, एका असामान्य महिलेची कहाणी व एक देश आणि समाज यांच्यामधल्या वादळाची कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-05-2017

    तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाचा हा अनुवाद. तसलिमा यांनी वय वर्षं २७ ते ३० या काळातल्या घटना - घडामोडींवर लिहिलं आहे. त्यांच्या स्त्रीवादी लेखनाला आलेला वेग, त्यांचं स्तंभलेखन, कवितालेखन, कादंबरीलेखन आदी गोष्टींविषयी त्यांनी लिहिल आहे. ‘निर्बाचित कलाम’ हे पुस्तक आणि ‘लज्जा’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशामध्ये तयार झालेलं वातावरण, इतर साहित्यिकांची त्यांच्याबद्दलची मतं, वेगवेगळे वाद, त्या त्या वेळच्या भावना अशा सर्व गोष्टींवर तसलिमा यांनी स्पष्टपणानं लिहिलं आहे. तत्कालीन घडामोडी त्या मांडत असतानाच एक साहित्यिक आणि व्यक्तिमत्त्व घडत जाण्याची प्रक्रियाही त्यातून उलगडत जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more