* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TIMEPASS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177665031
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY THE PATH OF LIFE IS SO ZIGZAGGED AND THORNY FOR SOMEONE BORN AS A WOMAN? THIS IS A TRUE AUTOBIOGRAPHY WHICH GIVES US THE EXPERIENCE OF `TRUTH IS STRANGER THAN FICTION`. THIS AUTOBIOGRAPHY IS UNIQUE AS IT IS NOT WRITTEN BY ANYONE WHO IS FAMOUS OR WHO IS SOMEBODY SOMEWHERE. IT IS THE STORY OF A COMMON WOMAN, BORN IN A NORMAL FAMILY. BUT HER LIFE AFTER THE DEATH OF HER HUSBAND BECAME HELL FOR HER. SHE HAD TO FACE MANY DREADFUL FACTS. SHE HAD TO KEEP HER HOUSE RUNNING AND HAD TO STRUGGLE FOR THE SURVIVAL OF HER CHILDREN. SHE HAD TO ACCEPT PROSTITUTION TO EARN ENOUGH MONEY TO KEEP HER AND HER CHILDREN`S LIVING GOING. SHE HAD TO ACCEPT THE LIFE-STYLE BEYOND THE MORAL NORMS, VIRTUES, AND CULTURE. NO WONDER, HER WORDS, WHICH ARE FULL OF TRUTH; LEAVE US SPELLBOUND.
आपल्या समाजानं अगदी काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम न नियम मी मोडला. मी कसलीच बंधनं मानली नाहीत. मला जे जे करावसं वाटलं, ते ते मी केलं; अगदी सपाटून केलं. कोण काय म्हणेल याला मी काडीचीही किंमत दिली नाही. माझं तारुण्य, माझं लैंगिक जीवन, माझी बुद्धिमत्ता- सारं काही मी दिमाखानं मिरवलं. आणि हे सारं मी निलाजरेपणे केलंय. मी खूप जणांवर जीव ओतून प्रेम केलं, आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केलं...

No Records Found
No Records Found
Keywords
#PROTIMA BEDI #KABIR BEDI #POOJA BEDI #NRUTYAGRAM #SIDHARTH BEDI #MAZI OLAKH #MAZA PAHILA MRUTYU #UMALATE DIWAS #PAHILE PREM #PRATHAMTUZPAHTA #VIVAH #MAZIYUROPESAFAR #SHODHJIWANARTHACHA #FARKAT 3NAVIDISHAGAVASALI #SAMTANTECHYASHODHAT #MARMABANDHATLITHEVHI #VYARTHAPAYPEETH #AANDHARATIUDI #NAVI PRATIMA #NRUTYAGRAMCHI JADANGHADAN #MATRUTWACHIVEDANA #AATMASHODH #AAKHER.
Customer Reviews
  • Rating StarPratiksha Kharade Phale

    *आस्वादक समीक्षा - टाईमपास *प्रोतिमा बेदी (अनुवाद- सुप्रिया वकील) *किंमत- 220 रुपये *पाने- 345 *आवृत्ती- ऑगस्ट 2007 *प्रकाशक- मराठी अनुवाद- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे बीचवर शून्य कपड्यात धावलेली बाई, कबीर बेदी ची बायको या पलीकडची प्रोतिमा शी असेल? तिचं नाव कुठेही वाचलं की हा प्रश्न पडायचा. हो `ती` चं जिचं अख्ख आयुष्य माझ्यासमोर साडेतीनशे पानात बंदिस्त आहे, जिचं खाजगी जीवन तिने अगदी न डगमगता माझ्या समोर ठेवलं. तिला मी `प्रोतिमा`चं म्हणणार. सुरुवातीची आणि शेवटची पंधरा एक पान सोडली, तर संपूर्ण पुस्तकात प्रोतिमाचं तिचं आयुष्य आपल्याला उलगडून दाखवतेय. कित्येकदा तर असं वाटतं की दुःखाच्या काही गोष्टी अगदी डोळ्यात पाणी आणून ती माझ्याशी शेअर करतेय, कधीतरी मी भरल्या डोळ्यांनी हुंकार देत पुढे वाचू लागते, तेव्हा `सुप्रिया वकिलां`ना धन्यवाद देते की इतक्या छान छान प्रकारे त्यांनी मराठी अनुवाद आपल्यासमोर ठेवला आहे. 1949 ला जन्मलेली प्रोतिमा 1998 ला हे जग सोडते, तेव्हा नकळत डोळ्यात पाणी येते. ती कोणी सैनिक नव्हती, कोणी देशासाठी मेडल जिंकणारी खेळाडू ही नव्हती, पण ती सर्वसामान्य स्त्री नक्कीच नव्हती. ती धाडसी होती, स्पष्टवक्ती होती, ध्येयवादी होती, कर्तुत्ववान होती, ती असामान्य स्त्री होती. तिचं आत्मचरित्र वाचताना, खूपदा वाटत होतं कि तिने त्यात फक्त तिचीच बाजू मांडलीये, तिला सहन करावा लागणारा लागलेला त्रास मांडलाय, पण तिच्या मानसिक अस्वस्थतेचा जो आलेख या पुस्तकात डोळ्यासमोर येतो, तो नक्कीच सकारात्मकतेकडे जाणारा आहे. एके ठिकाणी प्रोतिमा म्हणते, "आपल्याला हवे ते मिळविण्याचा धैर्य त्यांना कधीच झालं नाही आणि माझ्यात ते धाडस होतं म्हणून त्यांना माझा तिरस्कार वाटत होता." ती असं का म्हणतेय ते पुस्तक वाचताना वेगवेगळ्या प्रसंगावरून लक्षात येतं. बालपणी झालेला छळ, सातव्या वर्षी जीवावर बेतलेलं संकट, आई-वडिलांशी केलेली बंडखोरी, कबीर बेदी सोबतचा विवाह, पूजा- सिद्धार्थ चा जन्म, तिचे अफेयर, युरोप सफर, कबीर बेदी अभिनेता असल्यामुळे एका अभिनेत्याची मानसिकता, अभिनेत्याचे जीवन, त्यानंतर कबीर बेदीसोबतचा घटस्फोट, शास्त्रीय नृत्याची आवड, त्यासाठी घेतलेले कष्ट, नृत्याचे कार्यक्रम, कालीमातेचे मंदिर, त्यासंबंधी घटना, राजकीय व्यक्तींशी जवळीक, मुलांमुळे होणारा मानसिक त्रास, जवळच्या माणसाचा मृत्यू, त्यावरून झालेली बदनामी, मानहानी, खऱ्या प्रेमासाठी शोधाशोध, पुन्हा मिळालेल्या ठेचा, पूजा सिद्धार्थचं प्रौढपण, त्यांची मानसिक जडण-घडण, पूजाचं लग्न, नृत्यग्राम, त्यासाठी केलेले दौरे, देणग्यासाठी फिरणे, तिला मिळालेली महत्वाची पदं, गुरु व त्यांच्या मुलामुळे झालेला त्रास, सिद्धार्थची आत्महत्या, पूजाच्या मुलीचा जन्म, हरिशचं आयुष्यात येण, हवं ते मिळालं ही भावना, सगळी कागदपत्र त्या त्या व्यक्तीकडे सोपवून कैलास मानस सरोवर यात्रेला जाणं, जाण्याआधी सगळ्यांना पत्र पाठवणं, जणू तिने ठरवून exit घेतली. सगळं नाट्यमय वाटत असलं तरी `ती हे जगलीये` कधी आनंदात कधी अश्रू ढाळत कधी डायरी लिहीत कधी मौजमजा करत तर कधी सगळा दोष स्वतःला देत या काही ठळक आणि अशा कितीतरी लहान-मोठ्या घटना प्रोतिमाच्या मनावर किती खोलवर परिणाम करत होत्या हे पुस्तक वाचताना समजते. एकाच बाजूने विचार करायचा झाल्यास प्रोतिमाने आयुष्यात खूप मौजमजा केली, ती चरित्रहीन स्त्री होती, ती आपल्या मुलांनाही नीट सांभाळू शकली नाही, मौजमजेसाठी पैसा हवा म्हणून तिने राजकारण्यांशी संबंध जोडले किंवा अजून असं बरंच, परंतु आस्वादक समीक्षा म्हटलं की सौंदर्यस्थळे शोधायचे आहेत, सकारात्मक काय आहे हे यात आपण शोधतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ती कोणी आदर्श व्यक्तिमत्व आहे की नाही हे आपण ठरवू शकत नाही, `नियती` तिच्या आयुष्याशी बालपणीच खेळ खेळू लागली आणि प्रोतिमा नियतीशी जिंकण्यासाठी `आयुष्यभर` लढत राहिली, ईतकंच आपण म्हणू शकतो. स्त्री म्हणून ती कशी होती, यापेक्षा व्यक्ती म्हणून ती कशी असेल? हा विचार पुस्तक वाचताना आपण मनात ठेवला, तर चित्रपटाची कथा तुमच्यासमोर सुरू राहते. तुम्ही तहान-भूक, वेळ-काळ विसरून पुस्तकाची पानं उलटत जातात. इतकं मात्र नक्की. तरीही वाचताना एक जाणवत राहते की पुस्तकाचं शीर्षक `टाईमपास` का असावं? कदाचित या पुस्तकातून आपलं फक्त मनोरंजन होत असावं म्हणून असेल, पण पूर्वग्रह मनात न ठेवता पुस्तक वाचत गेलं तर बरचसं सकारात्मकही आपल्या पदरात पडू शकतं. पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही पानांत प्रोतिमा म्हणते, " खरंतर आपल्याला सगळ्यांना शहाणंसुरतं, प्रौढ होऊनच जन्माला यायची आणि निष्पाप बालपणात मृत्यूला सामोरे जायची सोय हवी होती." तिचं हे वाक्य पुढे वाचत जाताना आपल्याला समजू लागते. अगदी एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असं आयुष्य प्रोतिमा जगली. हे बरंचसं नाटकी, रंगवलेलं, कृत्रिम वाटलं तरी पुन्हा एकदा `ती ते जगलीये.` हे शब्द पुरेसे वाटतात. साधारण अडीचशे पानापर्यंतचं प्रोतिमाचं आयुष्य आणि पुढची शंभर पानं असे दोन भाग तिच्या आयुष्याचे वाटतात. चाळिशीनंतर तिनं नृत्यग्रामचं पाहिलेले स्वप्न हे खरंतर तिचं धाडसच होतं. `नर्तकांचं गाव`, `नृत्याचं गाव` ही कल्पना कितीही छान असली, तरी त्यासाठी प्रोतिमाला ज्या दिव्यातून जावं लागलं, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. याच दरम्यान देणग्यांसाठी फिरणं, सिद्धार्थचं आजारपण, तिच्या गुरूकडून होणारा मानसिक त्रास, तिच्या मुलाची आत्महत्या या सर्व घटनांनी बहाल केलेले हृदयविकाराचे झटके तिने पचवले. प्रोतिमा हे एक भटकलेलं जहाज होतं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती जगण्याचं ध्येय शोधत राहिली, धक्क्यावर पोहोचायचं तिचं स्वप्न मृत्युने पूर्ण केलं. ती निसर्गाशी एकरूप झाली, तिचा मृतदेह सापडला नाही. ती कैलास मानस सरोवर यात्रेत असताना मुक्कामाच्या ठिकाणी, सगळे गाढ निद्रेत असताना दरड कोसळली आणि त्यांच्यातलं कोणीचं वाचलं नाही, कदाचित ती निसर्गात माती होऊनही मिसळली असेल. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पुस्तक वाचल्यानंतर न्याहाळलं की ती दोन पानं हाच प्रोतिमाचा जीवनाचा प्रवास वाटतो आणि मधली सगळी पानं म्हणजे तिने केलेल्या चुका, त्यातून तिला मिळालेले धडे वाटतात. शेवटी इतकंच म्हणेन की प्रोतिमा उत्साहाचा झरा होता, त्याला योग्य वळण मिळायला हवं होतं. अजूनही भव्यदिव्य कर्तृत्व ती करू शकली असती. भावनिक वादळं पेलण्यात ती स्वतःलाच दोष देत गेली आणि तिची बरीच ऊर्जा इथेच खर्च झाली. अध्यात्मातील तिची जाण मोलाची वाटते. प्रोतिमाचा शेवट मात्र तिला हवा तसा थरारकच झाला, हे मात्र नक्की. प्रतिक्षा खराडे फळे ...Read more

  • Rating StarMadhavi Shahade

    नेहमीच्या सरधोपट आयुष्यात आपण कल्पनाही करु शकणार नाही असं एक वेगळं खळबळजनक आयुष्य प्रोतिमा बेदी सत्तर ऐंशीच्या दशकात जगली. कबीर बेदीची (एके काळची) बायको, पूजाची आई आणि गोवा बीचवरती पळताना न्यूड फोटो काढलेली बाई इतपतच हिची आधी माहिती होती. पणयापलिकडेही अफाट , बेभान आणि मनस्वी वागणारी ही बाई होती. जेव्हा जे करावं वाटेल ते केलं. कपडे बदलल्यासारखे प्रियकर बदलले. (वाचताना नंतर नंतर मी नावं लक्षात ठेवायचं आणि एकूण आकडा मोजायचं सोडून दिलं‌.) त्या काळातले कॉंग्रेसचे मोठे नेते रजनी पटेल (अमिषाचे आजोबा) , पं.जसराजांपासून ते तेव्हाच्या एका रसिक नभोवाणी मंत्र्यांपर्यंत तिचे `संबंध` होते, चांगली वट होती. या नागपूरी मंत्र्यांचं पुस्तकात नाव `मनू` असलं तरी ते सहज ओळखू येतात. तिचा शब्द झेलायला हे लोक सदैव तयार असायचे. रजनी पटेलांनी तर तिला एकदा `मुंबईची मेयर होणार का?` विचारलं होतं. ती `हो` म्हणाली असती तर झालीही असती. तिला या सगळ्या राजकीय गोष्टींच्यात काही रस नव्हता, पण आपल्यासारख्या नगण्य स्त्रीला ते मेयर बनवू शकतात तर ब-याचशा पदावर बसलेली माणसं कशी बसली असावीत हे लक्षात येतं असं तिने लिहिलंय. दुर्दैवाने आजही ते तितकंच खरं आहे. घडलेल्या घटना अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याचं जाणवतं‌. वरुन कठोर दिसणारी आणि आतून हळवी असणारी ही बंडखोर बाई आपल्या टर्म्सवरती जगली , समाजाच्या नैतिकतेच्या कल्पनांना सुरुंग लावला. त्याचे परिणामही हिंमतीने स्वीकारले. तिच्या लिखाणाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लहानपणीच्या कटू आठवणी , लैंगिक अत्याचार , मॉडेलिंगचे अनुभव, आपण मनाला येईल तसं वागलो... मुलांना पुरेसा वेळ दिला नाही याची बोचरी जाणीव , आई म्हणून मुलांसाठी तीळतीळ तुटणं , एक बायको म्हणून वेळेला पझेसिव्ह होणं , नव-याच्या अफेअर्समुळे काळजीत असणं , त्याला आणि त्याच्या प्रेयसींना समजून घेणं , एक प्रेमिका म्हणून जीवाच्या आकांताने तडफडणं , एक भक्त म्हणून आलेले देवीच्या चमत्काराचे समाधानी अनुभव , गुरुंच्या, शिष्यांच्या आठवणी आहेत. घडलेल्या घटनांचा धांडोळा घेताना चुकांची कबुली, यशाचा उल्लेख आहे. तेही अगदी सहजतेने , कुठलाही आव न आणता‌‌. राजकीय नेते, त्यांची कुटूंबं आपल्यामुळे अडचणीत येऊ नयेत याची तिला जाणीव आहे. त्यासाठी तिने आणि पटेलांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे (जी तिला प्रकाशित करायची होती) तिने त्यांच्या मुलाला परत केली. प्रोतिमाच्यात सतत एक प्रेमिका, अभिसारिका जाणवते. लहानपणापासून मायेला, कौतुकाला पारखी झालेली ही मनस्वी मुलगी पुढे आयुष्यभर प्रेम शोधत राहिली. हातातून काहीतरी निसटून चाललंय आणि आत्ता या क्षणी ते पकडायलाच हवं अशा भावनेने जगण्याच्या प्रवाहात भटकत राहिली. अडखळत पावलं टाकत टाकत लहान मूल जसं फुलपाखरु पकडायचा प्रयत्न करेल.. पडेल...उठेल आणि परत चालेल अगदी तसंच तिचं आयुष्य जाणवतं. वयाच्या २६ व्या वर्षी गुरु केलुचरण महापात्रांच्याकडून ओडिसी नृत्य शिकून मग यातच काही करावं या ध्यासाने ती कर्नाटकात बेंगलुरू जवळ नृत्याचं गुरुग्राम उभा करते. गरजू मुलांना नृत्य शिकण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी धडपडते. नंतर योग्य व्यक्तींना ते हस्तांतरीत करुन त्यातून बाहेरही पडते. मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येनंतर ती ढासळते. पुढे कैलास मानस सरोवर यात्रेदरम्यान दरड कोसळून तिचं निधन होतं. पुस्तक वाचून संपल्यानंतर आपण काही काळ दिग्मुढ होतो. विषण्ण व्हायला होतं. एखाद्याचं आयुष्य किती प्रवाहपतीत असू शकतं असं वाटतं. दारु , ड्रग्ज , सेक्स , सोशल लाईफ , पार्ट्या हेच आयुष्य असणारी ही बाई अचानक नृत्य काय शिकते , त्यात प्राविण्य मिळवते , संस्था उभारण्यासाठी जीवाचं रान करते. मग ऐहिक गोष्टी त्यागून अध्यात्मिक होते, `स्व`चा अर्थ शोधायचा प्रयत्न करते. हे पुस्तक बायोपिक किंवा वेब सिरीजसाठी उत्तम आहे. सतत घडणा-या घटना , नात्यांची गुंतागुंत , परदेशातील अनुभव, प्रेम, अफेअर्स असं सगळ्या प्रकारचं वैविध्य यात आहे. सुप्रिया वकील यांनी मूळ पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. एकदाही आपण अनुवाद वाचतोय याची जाणीव होत नाही. ...Read more

  • Rating Starसुरेखा मोंडकर

    आपल्या समाजानं अगदी काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम न नियम मी मोडला . मी कसलीच बंधनं मानली नाहीत . मला जे जे करावसं वाटलं , ते ते मी केलं ; अगदी सपाटून केलं . कोण काय म्हणेल याला मी काडीचीही किंमत दिली नाही . माझं तारुण्य , माझं लैंगिक जीवन , माझी ुद्धीमत्ता - सारं सारं काही मी दिमाखानं मिरवलं .आणि हे सारं मी निलाजरेपणे केलं . मी खुप जणांवर जीव ओतून प्रेम केलं , आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केलं . " हे म्हणताहेत प्रोतिमा बेदी त्यांच्या टाईमपास ह्या आत्म चरित्रात ! . प्रोतिमा म्हणजे एक वावटळ होती , जमिनीपासून उंच आकाशात गरगरत जाणारं चक्रीवादळ होतं . ते तिलाच फक्त झेपत होतं . जो त्या वादळात सापडला त्याला सावरणं पण शक्य नव्हतं . तिच्या सहवासात येणार्यांवर तिच्या धुंद आयुष्य शैलीचं गारुड पडायचं . तिचं स्वच्छंद आयुष्य ती आपल्या जबाबदारीवर जगली . तिची लढाई , तिची बंडखोरी , तिचं बेफाम -बेफाट आयुष्य , तिचं यश ..अपयश , तिची बेमुर्वतखोरी , तिची आढ्यता आणि जगाच्या दृष्टीने असणारा निलाजरेपणा .. निर्लज्जपणा ह्या सगळ्याची बरी वाईट फळ तिने धाडसाने , ताठ मानेने भोगली , जगाची पर्वा न करता . . .१२ ऑक्टोबर १९४८मध्ये जन्मलेली प्रोतिमा लक्ष्मीचंद गुप्ता , चार भावंडांतील दुसरं अपत्य . लहानपणापासूनच तिच्यावर कोणी प्रेम करत नाही अशी तिची भावना होती . ह्या प्रेमाचा शोध ती आयुष्यभर शरीराच्या माध्यमातून शोधत राहिली . त्यातून अधिकाधिक लढाऊ वृत्तीची , बिनधास्त आणि बंडखोर बनत गेली . रूढार्थाने जी समाजमान्य आहे अशी प्रत्येक गोष्ट तिने फाट्यावर मारली . बेधडक धुडकावून लावली . तंग , शरीरप्रदर्शन करणारे .. झिरझिरीत , बिन पाठीचे , मोठ्या ,खोल गळ्याचे , टाचके कपडे घालणे . नशा करणे , पार्ट्यांमध्ये रात्र जागवणे , अनेक पुरुषांबरोबर जवळीकीचे संबंध ठेवणे ; ही तिची जीवनशैली घरी पसंत पडणं शक्यच नव्हतं . वडिलांनी हात उगारल्यावर , एका रात्री , तडकाफडकी , कसलाही विचार न करता तिने घर सोडलं . अशीच होती ती .. झोकून देणारी ; स्वतःच्या मर्जीने , स्वतःला आवडेल तशी जगणारी ; आणि त्यासाठी जबरदस्त किंमत मोजणारी . . ७० च्या दशकात ती नावाजलेली , प्रथमश्रेणीची मॉडेल होती . यशाच्या शिखरावर होती . स्तुतिपाठक भरपूर होते , तिच्या एका दृष्टीक्षेपासाठी कासावीस होणारे ! , पैसा , यश तिच्या पायाशी लोळण घेत होतं . १९६८च्या सप्टेंबर मध्ये एक देखणा , राजबिंडा , उंचापुरा मर्दानी मदनाचा पुतळा तिच्या सहवासात आला . अगदी ठरवून तिने त्याला तिच्या प्रेमात पाडलं . तो होता तेव्हांचा उगवता तारा , #कबीर_बेदी ! त्या काळात जेव्हां प्रेम चोरी चुपके केलं जात होतं तेव्हां ती बेछूटपणे त्याच्याबरोबर राहात होती . १९६९मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्या नंतर सात महिन्यांनी पूजा बेदी जन्माला आली . . . प्रोतिमा सर्व सिने मासिकांची आणि वृत्तपत्रांची अत्यंत आवडती होती . प्रदर्शन करणं आणि त्याचा गाजावाजा करणं तिला अत्यंत प्रिय होतं . ती ह्या सर्वांना खुशीने भरपूर मालमसाला पुरवायची . आता सिद्धार्थचा पण जन्म झाला होता . विवाहित , दोन मुलांची आई असुनही तिच्या वागण्यात काहीही फरक पडला नव्हता . जगप्रसिद्ध उद्योगपती , वंदनीय कलाकार , केंद्रीय मंत्री , देखणे परदेशी असे अनेक पुरुष तिच्या सहवासात होते . आणि १९७४मध्ये तिने एकच खळबळ उडवून दिली . तिने streaking केलं . जुहू बीचवर ती विवस्त्रावस्थेत धावली . सिने ब्लिट्झच्या मुखपृष्ठावर तिचा नग्न फोटो झळकला ; त्या मासिकाचा प्रचंड खप झाला आणि सर्वत्र एकच धुरळा उडाला . . . लहानग्या पूजाने तिला बिथरून जाऊन म्हटलं, " माझ्या शाळेतील सगळी मुलं म्हणतात , तू नंगी पळत सुटली होतीस ! " प्रोतिमाने धारदार स्वरात सांगितलं , " हे माझं आयुष्य आहे , मी ते कसं जगावं , हे मला सांगायचा कुणालाही अधिकार नाही ...ज्या माणसांची स्वतःची कंटाळवाणी आयुष्य असतात , त्यांना शिळोप्याच्या गप्पांसाठी मी खाद्य पुरवलं याचा मला आनंद वाटतो . ..! " तिच्या आयुष्यावर तिने कोणालाच अधिकार गाजवू दिला नाही . अगदी तिच्या मित्रांनाही ! त्यांनाही हवं तेव्हां जवळ केलं , नको तेव्हां भिरकावून दिलं. . .पूजा बेदी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणते , " तिचं चैतन्य ,तिच्यातील सर्जनशीलता , तिच्यातील अमर्याद ऊर्जा आणि तिचं बिनशर्त प्रेम , यांच्यामुळे सिद्धार्थच्या आणि माझ्या जीवनात सुखाची हिरवळ फुलली . अतिशय खुल्या मनाची आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होण्याची इच्छा असणारी आई लाभण हे आमचं खरोखरच भाग्य होतं . " . प्रोतिमा सगळीकडे पूजाला घेऊन जायची . अगदी डिनर डेटला पण ! मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या . मला कळत नव्हतं का वाचतेय मी हे पुस्तक ? वेळ फुकट घालवतेय . माझ्या मातृत्वाच्या , पालकत्वाच्या कल्पनां मध्ये हे सर्व बसत नव्हतं. तिच्यासारखं वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं आयुष्य अभावानेच आढळेल . या तिच्या अत्युत्कट स्मृती आहेत . धक्कादायक वाटतील इतक्या मुक्तपणे लिहिलेल्या . एक स्वच्छंद आयुष्य जगलेली , निर्भीड स्त्री ..काळाच्या खूप लवकर जन्माला आलेली ! खरं म्हणजे आजही तिच्यासारखं जगणार्या आणि ते उजळ माथ्याने कबूल करणाऱ्या स्त्रिया नाहीत .सगळं सगळं कबूल आहे , पण ते मला कळून माझा काय फायदा होणार आहे ! . भारतात नव्याने उदय पावणाऱ्या मुक्त जीवन पद्धतीचे प्रोतिमा आणि कबीर मूलाधार होते . पण आता हळूहळू त्यांच्यात दुरावा यायला लागला होता . दारिद्र्य , आजारपण , म्हातारपण , दु:ख अशा जगातल्या कुरूप गोष्टी कधी तिच्या जवळपास पण फिरकल्या नव्हत्या . मॉडेलिंग , इंटिरियर डिझाईनिंग , दागिने -कपडे यांचे डिझाईनिंग अशा विविध क्षेत्रात तिने भरपूर काम केलं . मुंबईत डिस्कोथेक , बुटिक सुरु करणारी ती सर्वात लहान वयाची उद्योजिका होती . पार्ट्या , क्लब , गाड्यांच्या शर्यती तिच्या जीवनाच्या अविभाज्य गोष्टी होत्या . सर्व कसं परिपूर्ण होतं . पण एक अनामिक बचैनी तिला छळत होती . १९७५च्या ऑगस्ट महिन्यात तिचं सगळं जीवनच बदलून गेलं . . .धो धो पाऊस कोसळत होता . डिनरला जाईपर्यंत कुठेतरी वेळ काढायचा म्हणून ती भुलाभाई ऑडिटोरियममध्ये शिरली . तिथे मंचावर जे नृत्य चाललं होतं ते बघून तिचं देहभान हरपलं . तो होता ओडिसी नृत्य प्रकार . त्या नृत्यासाठी ती व्याकूळ झाली . गुरु केलुचरण महापात्रा यांच्या समोर तिने अक्षरशः लोटांगण घातलं , पदर पसरला , त्यांचं शिष्यत्व देण्याची भीक मागितली . " इंडीयाज क्वीन ऑफ आउटरेज " हा किताब मिळवणारी आणि ते भूषण मानणारी प्रोतिमा नखशिखांत बदलून गेली .कटकमध्ये गुरुकुल पध्दतिने ती नृत्य शिक्षण घेऊ लागली . सुती साड्या हा तिचा वेश बनला .तिने व्यसनं सोडली . वयाच्या २६व्या वर्षी तिने ओडिसी नृत्याचा रियाज सुरु केला . रोज १२ ते १४ तास ती सराव करायची . नाचून पाय दुखायचे , पायांची कातडी सोलवटून निघायची . ती निरीश्वरवादी होती . पण ती कालीमातेच्या दर्शनाला जाऊ लागली . तिच्यात प्रत्यक्ष कालीमातेची प्रचिती येऊ लागली . तिचे गुरु ही एकमात्र व्यक्ती होती , ज्यांना तिने चरणस्पर्श करून वंदन केलं . अफाट श्रम , अथक मेहनत .. तिचं अवघं आयुष्य नृत्यमय झालं . थोड्याच काळात ती नामवंत ओडिसी नृत्यांगना झाली . १९७८मध्ये ती कबीर पासून विभक्त झाली . तिच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला .कबीरला जेव्हां नावलौकिक मिळत होता , तेव्हांच ती त्याच्यापासून दूर होती . त्याच्या यशाची चव आपल्यालाही मिळावी असं मनातून तिला वाटत होतं , पण तो आता परवीन बाबीच्या प्रेमात पडला होता . . नृत्य आता तिच्या जगण्याचा , अस्तित्वाचा भाग बनलं . तिने पृथ्वी थिएटरमध्ये स्वतःची नृत्य शाळा काढली . नंतर तिचं ओडिसी नृत्यकेंद्रात रुपांतर झालं . आता ते एसएनडीटी महिला विद्यालयाशी संलग्न आहे . . प्रोतिमा आणि कालीमातेत एक घट्ट दुवा तयार झाला . तिचं नृत्य अधिकाधिक अर्थपूर्ण आणि सखोल झालं . चैतन्यपूर्ण आणि उत्कट झालं . भारतभर , परदेशात तिचे आणि तिच्या शिष्यांचे कार्यक्रम होऊ लागले . तेव्हां सुद्धा सत्ताधारी तिच्या सहवासात होते . प्रोतिमा म्हणते ," जसजशी मी अधिक यशस्वी आणि श्रीमंत झाले , तशी स्वच्छंद वृत्तीच्या , माझ्यात रस घेणाऱ्या पुरुषांची संख्या कमी झाली . माझ्यापर्यंत कसं पोचावं , संभाषण कुठून सुरु करावं , तेच त्यांना कळायचं नाही . आपली तेवढी पात्रता नाही , वकूब नाही , याची जाणीव झाल्यामुळे कुणीही तसं धाडस करू धजत नसे . ..खंबीरपणे उभं राहण्याकरता त्याला अहंकाराचा भक्कम आधार हवा असतो ...तो नसेल तर तो अधिकाधिक दांभिक होत जातो . अहंकार हीच त्याची कवचकुंडले होतात . " . प्रोतिमाच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी होत होत्या .. ती म्हणते , " मी माझ्या वैयक्तिक लैंगिक सुखासाठी मी हवा तेव्हां अन्यत्र आश्रय घेत होते ; परंतु मला जे तीव्रतेनं , उत्कटतेनं हवं होतं ; ते समाधान दुर्दैवाने मला कुठंच लाभलं नव्हतं . " प्रोतीमाचा प्रवास साध्वी , भिक्षुणी होण्याकडे चालला होता . तिचा आयुष्यातला रस संपत चालला होता . पण तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण व्हायचं होतं .अथक प्रयत्न करून बेंगळूरुला गावाबाहेर तिने एक ओसाड जमीन मिळवली .गेरार्ड दा कुन्हा ह्या अशाच एका पछाडलेल्या वास्तुशिल्पकाराच्या सह तिने नृत्यग्राम उभारलं . तिथे ७ प्रकारच्या नृत्य शैली आणि मार्शल आर्टचे दोन प्रकार शिकवले जातात . १९९०मध्ये मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं . ह्या स्वप्नपूर्तीसाठी , त्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी तिने अनेक दारं ठोठावली . . ह्याच सुमारास प्रोतिमा बेदीची प्रोतिमा गौरी झाली . प्रोतिमा म्हणते , ` कानडी भाषेत बेदी म्हणजे पोट बिघडणं , जुलाब होणं . मला मिस डायरिया म्हणून ओळखलं जाण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे मी बेदी आडनाव वगळलं आणि मी गौरी अम्मा झाले . " नृत्यग्राममध्ये तिने हरितक्रांती केली , देखणी शिल्पं केली .तिला आणि गेरार्डला अनेक पुरस्कार मिळाले . पण प्रोतिमा विझत चालली होती . . तिचे आणि पुत्र सिद्धार्थचे भावबंध घट्ट होते . अमेरिकेला शिकत असणारा सिद्धार्थ हळू हळू मनोविकाराचा शिकार झाला . खूप औषधोपचार करूनही तो निराशेच्या गर्तेत कोसळू लागला . त्याला स्किझोफ्रेनियाने वेढलं . जुलै १९९७मध्ये त्याने आत्महत्या केली . आणि प्रोतिमा पूर्णपणे कोसळली .प्रोतिमाने संन्यास घेतला . मुंडण केलं . निळ्या रंगाची कफनी परिधान करू लागली .सिद्धार्थच्या मृत्यूच्या आधीपासूनच तिच्या अंतर्बाह्य परिवर्तनाला सुरुवात झाली होती . हृदयविकार होता . तीन झटके येऊन गेले होते . ती हिमालयात भ्रमण करीत होती . धम्मगिरी विपश्यना केंद्रात शांती शोधत होती . नृत्यग्रामची तिने नीट व्यवस्था लावली .त्याचं योग्य व्यक्तींकडे हस्तांतरण केलं . निपुण शिक्षकांची तिथे योजना केली . तिची इच्छा होती जिप्सी सारखं भारतभर फिरून साऱ्या जगावर करुणेचा वर्षाव करत , रंजल्या गांजल्यांची सेवा करत आपल्या पैशाचा योग्य विनियोग करावा . . हेमकुंड साहिब , गंगोत्री , हृषीकेश , तिरुपती आणि लडाखच्या मठांत ती यात्रा करीत होती . भविष्य कळल्यासारखी तिने सर्व निरवानिरव केली होती . कैलास मानसच्या खडतर यात्रेला निघाली . १७ ऑगस्ट १९९८ च्या रात्री तिच्या समूहाचा हिमालयात गढवालमध्ये पिठोरगड जवळ मालपा इथं मुक्कामाचा तळ पडला . त्या दिवशी बेभान पाऊस कोसळत होता . रात्री दरड कोसळली . यात्रेकरूंपैकी कोणीही वाचलं नाही (१८ ऑगस्ट ). प्रोतिमाच्या वस्तू आणि पासपोर्ट सापडला . मृतदेह मिळाला नाही . . तिला , तिचा शेवट निसर्गाच्या सोबत व्हावा असं वाटायचं . सर्वसामान्य , वेदनामय , क्लेशकारक मृत्यू आणि त्यानंतर एखाद्या रुक्ष स्मशानात देह अग्नीच्या स्वाधीन करणं , याकल्पनेने ती शहारायची .मृत्यूला कवटाळतानासुद्धा तिनं आपल्याला हवा तोच मार्ग तिने निवडला . . प्रोतिमाच्या जीवनाचे दोन भाग होतात . पण तिच्या बेफाम जीवनाचीच जास्त चर्चा होते .जशी ओशोंच्या `संभोगातून समाधीकडे ` ह्याचीच जास्त चर्चा होते ! तिच्या जीवनातील हा कर्तबगारीचा आणि अध्यात्माचा भाग तुमच्या पर्यंत पोचावा हीच इच्छा .. प्रोतिमाने हजारो कागद लिहून ठेवले होते . तिच्या मृत्युनंतर , त्यातील मजकुराची निवड करून मांडणी करायचं अत्यंत कठीण काम पूजा बेदीने केलं, त्याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला . टाईमपास ! त्या पुस्तकाच्या आधारेच , अपरिमित ऊर्जा आणि धैर्य असणाऱ्या ह्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी मी तुमच्यापर्यंत पोचवली आहे . पुस्तक विकत घेऊन जरूर वाचा .#सुरेखा_मोंडकर ...Read more

  • Rating StarShrinivas Ranjanikar

    अत्यंत बोल्ड आणि बिनधास्त आत्मचरित्र, भोगापासून आध्यात्मिक जीवन ,नृत्यशाळा,आणि अत्यंत विदारक मृत्यू,प्रोतिमा बेदी अतिशय सुंदर पुस्तक....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more