* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
  • Availability : Available
  • ISBN : 9789387319905
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. ANAND YADAV IS AN ACCOMPLISHED PERSONALITY IN THE FIELD OF MARATHI LITERATURE. THE LITERARY WORLD HAS BESTOWED TITLES LIKE,"GRAMIN SAHITYA CHALAVALICHE PRAVARTAK","GOTAVLAKAAR" "NATARANGKAAR" AND "ZOMBEEKAAR" UPON HIM. THE FORMER IS BECAUSE HE IS THE PIONEER OF RURAL LITERARY MOVEMENT IN MAHARASHTRA. HIS WRITING BROUGHT THE RURAL LIFE IN MAHARASHTRA IN THE SPOTLIGHT AND THE LATTER THREE PERTAIN TO HIS THREE FAMOUS NOVELS. EXPERIMENTATION IS THE PROMINENT STRENGTH OF DR. YADAV`S WRITING STYLE. HE HAS DABBLED IN ALMOST EVERY FORM OF WRITING, BE IT STORIES, NOVELS, POEMS, CRITIQUES OR BIOGRAPHIES. DURING HIS ILLUSTRIOUS CAREER, HE WAS HONORED WITH 40 PRESTIGIOUS AWARDS INCLUDING THE SAHITYA AKADEMI AWARD. "DR. ANAND YADAV: EKE SAHITYIK PRAVAS" IS A COLLECTION OF ARTICLES THAT DISCUSS THE DISTINCT NATURE OF DR. YADAV`S WRITING IN THE WORLD OF MARATHI LITERATURE, THE ROLE OF HIS CRAFT IN GIVING MARATHI LITERATURE A NEW DIRECTION, AND THE MERITS OF HIS WRITING STYLE.THIS BOOK CHRONICLES THE FIFTEEN-YEAR ODYSSEY OF DR. YADAV`S LEADERSHIP ROLE IN THE RURAL LITERARY MOVEMENT IN MARATHI LITERATURE. THE BOOK CONTAINS INTERVIEWS THAT HIGHLIGHT HIS CONTRIBUTION, HIS REALISTIC AND CRITICAL APPROACH TOWARDS RURAL MARATHI LITERATURE. APART FROM HIS REMARKABLE LITERARY VOYAGE, THE BOOK FEATURES VARIOUS HEART TOUCHING WRITE-UPS THAT TALK ABOUT DR. YADAV`S PERSONAL LIFE, MEMORIES OF HIS NEAR AND DEAR ONES, HIS CLOSE ASSOCIATION WITH NUMEROUS PEOPLE, AND HIS PURE UNFEIGNED PERSONA. THIS BOOK SHOWCASES DR. YADAV`S MULTIFACETED PERSONALITY. IT ALSO HAS A RARE COLLECTION OF NEVER BEFORE SEEN PHOTOGRAPHS CLICKED BY AN ACE PHOTOGRAPHER. THE BOOK IS A VALUABLE OFFERING FOR ACADEMICIANS AND CONNOISSEUR READERS.
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली. असे असले तरी स्वतःत न रमता, त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले; ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही सामाजिक बांधिलकी मोठी आहे. ‘कलावंत केवळ स्वतःत रमणारा असतो,’ या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकरऱ्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मतं देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले. वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे; परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले. यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. त्यांच्या दृष्टीने धरला. स्वतःच्या कथा, कविता, कादंबऱ्यामधून त्यांनी बोली भाषेतून निवेदन व संवादलेखन केले. स्वतंत्र लेख लिहून त्यांनी बोली भाषेचे सामथ्र्य जाणकारांच्या लक्षात आणून दिले. यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त झाले. अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरुवात केली. आजही ही परंपरा सुरू आहे. ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ’ सुरू करून यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले. विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाङ्मयीन दृष्टी प्राप्त करून दिली.
१.उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती २०१८, आपटे वाचन मंदिर,इचलकरंजी. २.भि.ग.रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार २०१८, भि.ग.रोहमारे ट्रस्ट, कोपरगाव

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating Starपद्मा अनंत अभ्यंकर

    मी डॉ.आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास हे पुस्तक वाचले.नेटके आणि वेधक असे या पुस्तकाचे संपादन केले आहे.या पुस्तकातून डॉ.यादव यांचे वाड़मयीन कर्तृत्व, त्यांनी प्रवर्तित केलेली ग्रामीण साहित्याची चळवळ आणि एक सहृदय माणूस म्हणून असलेले त्यांचे व्यक्तिमत्तव यांवर प्रकाश पडतो. यांतील लेखांच्या निमित्ताने पुन्हा डॉ.यादव यांची दर्जेदार पुस्तकं आठवली.झोंबी , नांगरणी ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तकं पुन्हा वाचायला घेतली.त्यांची स्पर्शकमळं, साहित्यिक जडणघडण ही ललित पुस्तकं पुन्हा एकदा वाचायची ठरवली आहेत. डॉ.यादव यांचे कौतुक अशासाठी वाटते की त्यांनी स्वत:चे आयुष्य तर घडवलेच!हे सर्व जण करीत असतात.पण ते आपल्या गावाकडच्या घराला, तेथील माणसांना विसरले नाहीत.त्यांनाही त्यांनी शिकवलं,त्यांचाही उत्कर्ष केला.याबाबतीत त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिली.समाजात हे भान फार कमी जणांकडे दिसतं. ...Read more

  • Rating Starदत्ताजीराव साहेब साळुंके

    मी डॉ.आनंद यादव: एक साहित्यिक प्रवास हे पुस्तक वाचले.त्यानंतर कोल्हापूरलाच रहायला असल्याने अनावर इच्छा होऊन डॉ.यादव यांच्या गावी कागल येथे जाऊन आलो.गावाचा परिसर,गैबीचे देऊळ फिरून आलो.त्यांचे सणगर गल्लीतील घर पाहिले.मन पार भरून आले. डॉ.यादव यांच्या क्या डॉ.कीर्ती मुळीक यांना फोन केला.त्यांच्याशी भरभरून बोललो. हे पुस्तक फार अप्रतिम केले आहे.लेखांच्या संपादनामागील संपादकांचे कष्ट आणि नेमकी दृष्टी लक्षात येते.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ.आनंद यादव यांचा देखणा फोटो, आतील पानांवर त्यांची बॅग, चष्मा इत्यादी वस्तूंचे फोटो... पुस्तक देखणे झाले आहे.मेहता पब्लिशिंग हाऊसने वाचकांना एक उत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 04-08-2018

    परिपूर्ण संपादनाचा वस्तुपाठ... ‘डॉ. आनंद यादव – एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकताच प्रकाशित केला आहे. आनंद यादव यांची समीक्षक कन्या डॉ. कीर्ती मुळीक आणि आप्पासाहेब जकाते यादव या दोघांनी या ग्रंथाचे साक्षेपी संपादन केले आहे. आंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या लेखकीय कारकिर्दीचा एक परिपूर्ण मागोवा या ग्रंथात घेतला गेला आहे. डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहे; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. त्याअगोदर ग्रामीण साहित्याची लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर असणारी एक लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु आनंद यादवांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन असे. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेले आत्मचरित्रात्मक कादंबरीचे चार खंड ग्रामीण साहित्याला नवे मापदंड बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले. ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. दलित्य साहित्याच्या मराठी समीक्षेप्रमाणे साहित्याच्या समीक्षाला एक नवा आयाम त्यांनी बहाल केला. एक प्रकारे ग्रामीण साहित्याच्या चळवळीतून एक नवा प्रवाहच मराठी साहित्यात दाखल झाला. या ग्रंथात डॉ. आनंद यादव यांच्या या महत्त्वपूर्ण बहुमोल योगदानाचा परामर्श विविध लेखकांनी घेतला आहे. त्यात त्यांच्या कवितांवर प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिले आहे. ते म्हणतात, ‘आनंद यादव हा खराखुरा पहिला शेतकरी कवी होता... यादवांच्या आधी लिहिलेली कविता ही मळ्याच्या मालकाने लिहिलेली कविता होती. आनंद यादवांची कविता मात्र मळ्यात राबणाऱ्या, मजुरी करणाऱ्या शेतमजुराची कविता आहे. म्हणूनच त्यांची कविता लेखन बंद केले याचे मला वाईट वाटते.’’ डॉ. मंदा खांडगे यांनी यादव यांच्या ललित लेखनाचा आस्थापूर्ण परामर्श घेतला आहे. ग्रामीण भागातील दिशाहीन, कसेबसे आयुष्य जगणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे आनंद यादव यांनी आपल्या जीवनानुभवातून समर्थ लेखणीने रेखाटली आहेत हे अधोरेखित करून मंदा खांडगे यांनी आनंद यादव यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. उदा. ‘पाटी आणि पोळी’ या ललित लेखात शिक्षणाने आपल्या स्वत:च्या जीवनात परिवर्तन झाले मात्र पाटीची संगत सुटलेल्या त्यांच्या भावाच्या – शिवाच्या जीवनात मात्र तसे परिवर्तन घडले नाही. स्वातंत्र्यानंतरही शेतमजुरांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही याची खंत यादव यांनी व्यक्त केली आहे. ‘फुला आत्ती’सारख्या लेखात सहा नातींनंतर नातू झाल्यावर सुनेला पोटाशी घेऊन घळाघळा रडणारी फुला आत्तीचे चित्रण आहे. ‘लई छळली बाई तुला. आता सुखानं बसून खा’ असं ती म्हणते तेव्हा सूनही हुंदके देऊन रडते’ अशा शब्दांत ग्रामीण स्त्रीचे दु:खपूर्ण आयुष्याचे चित्रच यादव यांनी रेखाटल्याचे मंदा खांडगे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये ठळक करताना ‘उखडलेली झाडे’पासूनच्या आनंद यादव यांच्या लेखनात कसा बदल होत गेला आहे याचा शोध घेतला आहे. ते म्हणतात, ‘येथेही ग्रामीण माणूस हाच चित्रणविषय आहे; परंतु हा माणूस खेड्यांतला मात्र नाही. खेड्यात जगणे कठीण होऊ लागल्याने खेड्यातील माणसे शहरात येऊ लागली आहेत किंवा रोजगारासाठी शहरांवर अवलंबून राहू लागली आहेत. या शहराच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण माणसाच्या जीवनाची बरेवाईट परिणामे आनंद यादव कथांमध्ये शोधू पाहत आहेत.’ याबरोबरच रवींद्र ठाकूर यांनी ‘यादवांचे कथाविश्व’, डॉ. शुभांगी पातूरकर यांनी ‘आनंद यादव यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’, डॉ. सुरेश देशपांडे यांनी ‘आनंद यादव आणि ग्रामीण साहित्य’ अशा विविध लेखांतून आनंद यादव यांच्या साहित्याचे मूल्यमापन केले आहे. त्याचबरोबर यादवसरांची बहीण, बंधू आप्पासहेब जकाते यादव, स्वत: कीर्ती मुळीक तसेच रा. रं. बोराडे, इंद्रजित भालेराव यांनी यादवांबरोबरचे वैयक्तिक स्नेहसंबंध उलगडणारे आस्थापूर्ण लेखन केले आहे, ते फार हृद्य झाले आहे. डॉ द.ता. भोसले, डॉ. तानाजी पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीतून डॉ. आनंद यादव यांची समीक्षकीय विचारव्यूह, त्यांची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर नेमका प्रकाश पडला आहे, तर डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ असलेल्या आनंद यादव यांच्या तत्संदर्भातील कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग, चिकित्सक आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे इतके प्रचंड, मूलगामी कार्य करणाऱ्या आनंद यादव यांना त्यांच्या कार्याला साजेसे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रीतसर मिळूनही त्यांना त्यावर विराजमान होता आले नाही, या कटू प्रसंगाच्या पडछायेचा परिणाम मनावर न घेता प्रत्येक समीक्षकाने फार निखळपणाने त्यांच्या साहित्यिक कामाचीच उचित दखल घेतली आहे. एक परिपूर्ण ग्रंथ वाचकांच्या हाती ठेवण्याचे श्रेय संपादकद्वयीला पूर्णपणाने द्यायला पाहिजे इतका आशयाने संपृक्त ग्रंथ त्यांनी सिद्ध केला आहे. त्याचबरोबर मुखपृष्ठ मांडणीपासून अत्यंत देखणे, उच्च निर्मितीमूल्य या ग्रंथास लाभले आहे. –अंजली कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 15-07-2018

    ग्रामीण साहित्य चळवळ अग्रणीचा साहित्यवेध... मराठीतील बहुचर्चित लेखक आनंद यादव यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आढावा घेणारा. ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ कीर्ती मुळीक’ आणि आप्पासाहेब जकाते यांनी संपादित केला आहे. या ग्रंथात एकूण १७ लेखसंकलित केले आहेत. पैकी पाच लेख आनंद यादवांसंबंधी आहेत आणि बारा लेख त्यांच्या विविध साहित्यकृतींची, ग्रामीण साहित्य चळवळीची चर्चा करणारे आहेत. यात दोन मुलाखतींचाही अंतर्भाव आहे. मराठीतील दलित साहित्य चळवळीनंतर ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय झाला. या चळवळीतील अग्रणी म्हणून आनंद यादव यांचा उल्लेख होतो. सर्जनशील लेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळीतील कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका त्यांनी निभावली. त्यांनी लेखनात विविध वाङ्मयप्रकार हाताळले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक सन्मान त्यांना मिळाले. ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे सहकारी नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांचेही लेख या ग्रंथात आहेत. इंद्रजित भालेराव यांनी यादवांच्या समग्र काव्यलेखनाचा परामर्श घेतला आहे. ‘यादव शेतकरी कवी आहेत. त्यांची कविता शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्याची कविता आहे. शेतकरी वास्तवाचा सच्चेपणा या कवितेत आहे. कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनातील शृंगार, सौंदर्य, दु:ख, दारिद्र्य, संघर्ष याचे चित्रण या कवितेत आहे,’ अशी निरीक्षणे भालेराव यांनी नोंदवलेली आहेत. यादवांचे व्यक्तिचित्रण करणारा भालेराव यांचाच दीर्घ लेखही या ग्रंथात आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच भालेरावांना यादवांचा सहवास लाभला. तो दीर्घकाळ टिकला. १५ वर्षे दोघांचा पत्रव्यवहार होता. प्रसंगपरत्वे त्यांच्या अनेक भेटी झाल्या होत्या. भालेरावांच्या या लेखात भारावलेपण असले, तरी एक प्रकारची तटस्थताही आहे. ‘ग्रामीण साहित्य चळवळीपेक्षा शरद जोशींची शेतकरी संघटनेची चळवळ व्यापक झाली. परंतु ग्रामीण साहित्य चळवळीने या चळवळीशी समन्वय ठेवला नाही’, अशी खंत भालेराव यांनी व्यक्त केली आहे. मंदा खांडगे यांनी यादवांच्या ललित गद्याची आस्वादक चिकित्सा केली आहे. त्यांनी यादवांच्या ललित गद्यातील काव्यात्मकता अधोरेखित केली आहे. यादवांच्या ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची समीक्षा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केली असून, त्यांच्या आधीच्या कथासंग्रहापेक्षा या कथासंग्रहाचे वेगळेपण काय आहे, हे त्यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले आहे. प्रारंभी आपल्या कथांमधून ग्रामीण जनजीवन चित्रित करणाऱ्या यादवांचा जाणीव विस्तार होत गेला, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि तो मान्य होण्यासारखा आहे. रवींद्र ठाकूर यांनी यादवांच्या एकूणच कथालेखनाचा आढावा घेतला आहे. यादवांच्या कथालेखनाचा विकास विषयाच्या आणि आविष्काराच्या अंगाने कसा होत गेला, त्यासंबंधी ठाकुरांनी भाष्य केले आहे. ‘आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’ (शुभांगी पातुरकर) व ‘यादव आणि ग्रामीण साहित्य’ (सुरेश देशपांडे) हे दोन लेख चिकित्सेऐवजी वर्णनात्मक अंगाने लिहिले गेले आहेत. पातुरकर यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांच्या प्रेमात इतक्या अडकून पडल्या आहेत की त्यांचे भारावलेपण या लेखातून ठायी ठायी जाणवते. वासुदेव मुलाटे यांनी यादवांच्या ‘ग्रामसंस्कृती’ आणि ‘साहित्यिक जडणघडण’ या दोन ग्रंथांची मीमांसा केली आहे. यादवांच्या चिंतनशीलतेचा परीघ कसा विस्तारलेला होता; हे नमूद करतातच; परंतु नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखकांसाठी ही पुस्तके कशी उपयुक्त आहेत, हेही ते नोंदवतात. ‘बहुआयामी लेखक’ (रवींद्र शोभणे) आणि ‘साहित्यातले काटकोनी वळण’ (सुनीलकुमार लवटे) या दोन लेखांतून यादवांची वाङ्मयीन वाटचाल उलगडण्यात आली आहे. त्यांच्या सर्वच लेखनाविषयी या लेखांतून काही मते मांडण्यात आली आहे. विशेषत: सुनीलकुमार लवटे यांनी यादवांच्या लेखनसामर्थ्याचा तिरकसपणे वेध घेतला आहे आणि जाता जाता एकूण वाङ्मयीन पर्यावरणासंबंधी भाष्य केले आहे. ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ या लेखात सुधाकर शेलार यांनी ग्रामीण साहित्य चळवळीची वाटचाल विस्तृतपणे मांडली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय, प्रेरणा आणि प्रयोजन यांचा आढावा घेऊन त्यांनी या चळवळीची भूमिका आणि सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक योगदान या अंगाने चर्चा करून या साहित्य चळवळीची नेमकी फलश्रुती काय आहे, त्याचा निर्देश केला आहे. हा निर्देश करताना या चळवळीतील अनेक लेखकांच्या मतांचा हवाला त्यांनी दिला आहे. तानाजी पाटील आणि द. ता. भोसले यांनी घेतलेल्या यादवांच्या मुलाखतीमधून यादवांची लेखक आणि समीक्षक म्हणून असलेली भूमिका समोर आली आहे. यादवांच्या निर्मितीप्रक्रियेवरही या मुलाखतीतून प्रकाश पडतो. लेखकाचा जीवनानुभव, वाङ्मयप्रकारांची अपरिहार्यता, कलावादी दृष्टिकोन, लेखकाची सर्जनशीलता आणि चिकित्सक वृत्ती असे वेगवेगळे मुद्दे या मुलाखतीमध्ये चर्चिले गेले आहेत. साहित्याच्या अभ्यासाला ते पूरक असेच आहेत. ‘आमचे बाबा’ या लेखात कीर्ती मुळीक यांनी यादवांमधील वडील चित्रित केले आहेत. त्यांचा कुटुंबवत्सलपणा वर्णन करतानाच महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान वडिलांना भूषवता आले नाही याची दुखरी बोच त्यांनी व्यक्त केली आहे. आप्पासाहेब जकाते यांनी यादवांचं मोठेपण, कर्तृत्व आणि कौटुंबिक जबाबदारीचं भान त्यांना कसं होतं, यासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. रा. रं. बोराडे यांनी यादवांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत. यादवांसोबत मतभेद असूनही त्यांनी त्या मतभेदांचा उल्लेख न करता, यादवांशी कशी मैत्री झाली, ग्रामीण साहित्यसंमेलने कशी व कुठे आयोजित करण्यात आली आणि ग्रामिण साहित्य चळवळीची बांधणी कशी झाली, याचा ऊहापोह केला आहे. बोराडे लिहितात, ‘ग्रामीण साहित्य परिषदेची घटना तयार झाली खरी, परंतु मनुष्यबळाअभावी तसंच आर्थिक पाठबळाअभावी ही घटना अमलात आली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला हळूहळू शैथिल्य येत गेलं...’ लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘मनात विचार आला, आनंद यादव अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या फंदात पडले नसते, तर त्यांना आणखी आयुष्य लाभलं असतं का?’ एकूणच ‘डॅ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकांना आणि लेखकांना तर उपयुक्त आहेच, परंतु त्या पलीकडे अभ्यास करणाऱ्यांनीही आवर्जून वाचावा असा आहे. – डॉ. मनोहर जाधव ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more