* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GANDHARVI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666991
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE CAN HEAR THE `SA` UP TO THE DEPTHS OF OUR LARYNX, THE `RE` UP TO THE DEPTH OF OUR HEART, `GA` UP TO THE DEPTHS OF OUR BELLY, BUT WE CANNOT HEAR IT ONCE IT REACHES THE DEPTHS OF OUR WOMB. THEN THE HEAVENLY VOICE CHANGES INTO A FAIRY. IF A CELESTIAL DIVINE FALLS ON THE EARTH, ALL OF A SUDDEN, THEN HIS SORROW KNOWS NO BOUNDS. HE TRIES TO GIVE AWAY AS MUCH AS HE CAN, HE EVEN INTENDS TO SHARE THE MOST THAT HE CAN, BUT NEITHER WE HUMANS NOR THE DIVINE BEINGS REALIZE THAT HUMANS ARE NOT CAPABLE OF HOLDING THE CELESTIAL THINGS.
कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पारावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते, पण आम्हा माणसांना–माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वानाही तरी ही कुठं कळतं!ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामथ्र्य आमच्यात कुठलं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GANDHARVI #GANDHARVI #गांधर्वी #FICTION #MARATHI #BANIBASU "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 29-10-2006

    गांधर्वी प्रकृती आणि मानवी मनातील संघर्ष... ‘गांधर्वी’ ही प्रसिद्ध बंगाली लेखिका बाणी बसू यांची कादंबरी आहे. डॉ. मृणालिनी गडकरी यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. डॉ. मृणालिनी गडकरी हे अनुवादित साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण असे नाव आहे. ‘ांधर्वी’ ही अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेली कादंबरी आहे. सुस्वर कंठ लाभलेल्या अपालाची ही कहाणी आहे. गाणं हाच तिचा श्वास होता. तिच्या जगण्याचा ध्यास होता. तिच्या रक्तातूनच गाण्याचा प्रवाह अविरतपणे वाहत होता. अपाला सोशिक, समजूतदार तितकीच जिद्दी होती. वडिलांच्या निधनामुळे पोरकी झालेली, काकांच्या दबावाखाली राहणारी, आईची अगतिकता समजून घेणारी, रामेश्वर ठाकूरांकडे मन लावून गाणे शिकणारी, सोहम दिपाली, मितूल यांच्याशी जिवाभावाची मैत्री करणारी, सासरच्या सर्वच लोकांना त्यांच्या स्वभावात दोषासह स्वीकारणारी, मुलांवर अपार प्रेम करणारी अशी ही अपाला सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व लाभलेली होती. तिच्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, महत्त्वाकांक्षा होती; पण तिच्यातील अहंकार कधीच टोकाला पोहोचलेला नव्हता. इतरांसाठी आपली ओंजळ रिती करणाऱ्या अपालाला काय मिळाले होते? संसार आणि संगीत या दोन्ही डगरींवर तोल सांभाळताना या कलावंत स्त्रीची घुसमट झाली होती. सासरच्या गाण्याबाबतच्या अज्ञानाला आणि उदासीनतेला मागे टाकून ती गात होती. म्युझिक कॉन्फरन्सला जात होती. चित्रपटांतून गात होती. घरातल्यांचे रोष पत्करून ती हे करत होती. तिच्या मनातली दु:खं तिच्या सुरातून बाहेर येत होती. सुरांच्या चढ-उतारातून, तालांच्या माध्यमातून तिची मनोव्यथा प्रगट होत होती. तिची सुखदु:खं, आनंद, संताप, अधीरता, अगतिकता या सगळ्या भावना गाण्यातून व्यक्त होत होत्या. एकीकडे गाणं होतं. ज्यात ती हरवली होती आणि दुसरीकडे भोवतालच्या माणसांचे पाश होते. ज्यांच्यात गुंतणं तिला क्लेषकारक होत होते. तिच्या आयुष्यात तिची गांधर्वी प्रकृती आणि मानवी मन यांच्यात इतका मर्मभेदक संघर्ष सुरू होतो, की त्याचा शेवट तिचा आवाज संपण्यात झाला. ती मूक झाली; पण तिच्यातला कलावंत मूक राहिला नाही. तो चित्रातून मुखर झाला. आवाज गेल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस तिने असंख्य चित्रे काढली. तिच्या हृदयातले गाणे तिने चित्रांच्या साह्याने कागदावर उतरवले. एका कलावंताची त्याच्या कलेशी असणाऱ्या बांधिलकीचे दर्शन या कादंबरीतून प्रत्ययाला येते. कलावंताचे मन आणि त्याच्या आजूबाजूचे वास्तव याचे वस्तुनिष्ठ चित्रण लेखिकेने या कादंबरीत केलेले आहे. त्यांच्या व्यक्तीचित्रणात, वातावरणनिर्मितीत, विषयाच्या मांडणीत सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता दिसून येते. ही उत्तम बंगाली कलाकृती अतिशय कौशल्याने मराठीत आणण्याचे श्रेय डॉ. मृणालिनी गडकरी यांच्याकडे जाते. -डॉ. जोत्स्ना आफळे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-02-2007

    तरल सौंदर्यानुभव... ‘कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पाावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते. पण आम्हा माणसांना - माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वांनाही तरी कुठे कळतं! ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामर्थ्य आमच्यात कुठलं! हे सारं आहे गांधर्वीचं! एक अशी कादंबरी, जी संगीताच्या प्रदेशात घेऊन जाते. तेथील रागदारीने मनावर अजब मोहिनीचे जाळं पसरते. त्या अनवरत सुरात, एक प्रकारच्या बेहोषीत धुंद व्हायला होतं आणि हेच सूर या वास्तवाशी फारकत घेऊन दिव्य अद्भूतांचा साक्षात्कार घडवितात. ही कथा आहे अपालाची. कोलकत्याची अपाला एक सच्ची कलावंत. भिडस्त, पापभीरू, शांत, संयत, दिसायला फारच साधी, परंतु तिच्या बाह्य वर्णनाश आपण थबकतच नाही. देवदत्त किन्नर कंठ लाभलेल्या अपालात आपण इतकं गुंतून जातो की तिच्या साऱ्या घुसमटीला हे समाजवास्तवच जबाबदार आहे. हेच विसरतो. शापित गंधर्वकन्येसारखी अपालाची कहाणी. अलौकिक सूरांचा गळा लाभूनही लग्नानंतर तिचे गाणे येणाऱ्या-जाणाऱ्यांना रिझवण्यासाठी वा क्लास काढून. थोड्याशा रियाझावर जगण्यासाठी बंदिस्त होतं... अपालाची कुचंबणा सोहम व मितूलच्या प्रसिद्धी प्रवासाने ठसठशीत होते... विशेष क्षमता नसलेली मितूल ‘मितश्री ठाकूर’ म्हणून लोकांच्या गळ्यातील ताईत बनते. मानसिक असंतुलनाच्या धक्क्यातून केवळ अपालामुळे सुरांच्या सान्निध्यात परतलेला सोहम देश परदेशात मैफिली गाजवतो. प्रेम वा लग्नासाठी व्याकुळणारी दिपाली अपालामुळेच परदेशात लग्न करून राहू शकते. अपालाच्या पैशांमुळेच मध्यमवर्गीय दत्तगुप्तांचं घर सुस्थितीत येतं... वास्तवात ती एक परिस वाटू लागते. तिच्या आवाजाची किंमत कुणी पैशात मोजतं.. मात्र अपाला! तिच्या पदरात नियतीने दु:खाचाच प्याला का द्यावा? गाणं हाच तिचा श्वास, तोच तिचा सहवास. त्याच्याशी तडजोड नको, म्हणत लखनौला नाजनीन बेगमकडे जाण्याची संधी मिळताक्षणी आनंदणारी... आणि नाजनीन बेगमचा उल्लेख ‘तवायफ’ असा झाल्याक्षणी हादरणारी... अपालाच्या गुरूंची मुलगी मितूल, जिला अपालातील या अद्भूत आवाजाचे मार्केटिंग केले की काय धमाल उडू शकेल. याचं प्रोफेशनल भान आहे. ती अपालाला निर्व्याज हेतूतून पैसा मिळवून देते. प्रसिद्धीची कवाडं खुली करून देते. गाणं हा या दोघींचाही धर्म, फक्त काळानुरुप बदललेलं त्याचं रूप मितश्री पकडून ठेवते. वेगवान कथानक, रहस्यमय घटनांची विखुरलेली बीजे, काळजावर कोरले जावे असे कैक प्रसंग, संगीताच्या परिभाषेचा नितांत सुंदर वापर. अभिजात संगीतावर मन:पूत प्रेम करणाऱ्या गुरुंचा, गुरु-शिष्यांचा स्वरसोहळा वाचकाला स्तिमित करतो. वाचका का? कशामुळे? च्या फेऱ्यात घुसमटतो. पुन्हा त्याची सुटकाही होते. ‘गांधर्वी’ अनेक प्रश्न निर्माण करते. मात्र नातेसंबंधाची विविध रूपे सामोरी आणण्यात ही कादंबरी यशस्वी ठरते. निकोप-विशुद्ध मैत्री, मुलगी आणि आई यांच्यातील नात्यातूनच लिहिला गेलेला उपसंहार. त्यात मुलीचे आलेले ‘कन्फेशन’ हे इतकं सच्चं, अस्सल की या अडीचशे पृष्ठांमध्ये आपल्या सामान्यतत्वाची प्रत्यही जाणीव व्हावी... परिसस्पर्श करणाऱ्याच्या सान्निध्यात असूनही आपण कोरडे ठणठणीत व निब्बर राहतो याची खंत झाल्यावाचून राहात नाही. बाणी बसू या सिद्धहस्त लेखिकेच्या लेखणीतून उतरलेली, मूळ बंगाली कादंबरी ‘गांधर्वी’चा हा मराठी अनुवाद आहे. हा अनुवाद न वाटता विलक्षण प्रत्ययकारी रितीने तो मृणालिनी गडकरींनी वाचकांसमोर ठेवला. बंगाली वातावरण, कुटुंबपद्धती, चालीरिती, परंपरा, गाणं व संगीताबद्दल येणारे उल्लेख कादंबरीची उंची वाढवितात. तरल असा हा सौंदर्यानुभव आहे. यात संघर्ष आहे. छंदासाठी आयुष्य कवटाळण्याची धडपड आहे. व्यक्तिचित्रणातले वैविध्य, ते संस्मरणीय करण्यासाठी येणारे निवेदन, वापरलेले संवाद सारेच केवळ अनुभवण्यासारखे आहे. कलावंतातील माणूसपण व त्याला छेद देणारे सामाजिक वास्तव यांच्या संघर्षासाठी तसेच अपालाच्या अघटित जीवनकहाणीतल्या रोमांचक प्रवासासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी. हे सारे अचूकपणे चंद्रमोहन कुलकर्णीनी मुखपृष्ठातून व्यक्त केले आहे. -वृन्दा भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 10-12-2006

    अभिजात संगीताचे तोषविणारे हृदय दर्शन… ‘गांधर्वी’ कादंबरीमध्ये जीवनाचे अधिष्ठानच संगीत असलेले अभिजात संगीताची जणू प्रत्यक्ष मैफलींना उपस्थित असल्याचा गहिरा आनंद वाचकांना गहिवरून टाकतो. मूळ बंगाली लेखिका बाणी बसू यांच्या मानवी मनाचा गुंता, कौटुंबिक अनबंध – स्तरांची वैशिष्ट्ये, संगीत, नृत्य, चित्रकला इ. कला, स्त्रीची मानसिकता इ. चा सखोल, सर्वंकष अभ्यासाची जाणीव ‘गांधर्वी’मध्ये होते. व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, विषय मांडणी, सामाजिक पार्श्वभूमी, स्वभाव भिन्नता, नियतीची खेळी इ. मधील सखोलता, सूक्ष्मता, तरलता, सहजता लेखिकेची खासियात ठरते. अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी पारदर्शकतेने बाणी बसू यांच्या प्रतिभासंपन्नतेचे, अभिजात अभिरुचीचे आणि संवेदनशीलतेचे सतेज दर्शन अनुवादाद्वारा घडविले आहे. मानवी स्वभावाच्या कंगोऱ्याचे, विविधतेचे, वास्तविकतेचे व संघर्षाचे मनोज्ञ दर्शन घडविताना समाजातील, कुटुंबातील कलानिपुण स्त्रीची तडफड, तळमळ, घुसमट अतिशय नेटकेपणाने, कोणत्याही कृत्रिम, अलंकारिक अतिशयोक्ती. इ. शैलीचा आधार न घेता भडकपणाच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठतेची कास लेखिकेने धरली आहे. अपाला, सोहेम, दीपाली, प्रशांत, विद्युत, मिताली, रामेश्वर ठाकूर, शिवनाथ इ. व्यक्तिरेखांमध्ये वाचक पूर्ण गुंततो. कलकत्ता, भारत, परदेश इ. कलावंताचे स्वत:ला असोशीने व्यक्त होणे, स्पर्धांतील राजकारण, योगायोग, स्वभावभिन्नतीचे परिणाम, कादंबरीची वाचनीयता वर्धित करतात. कलानैपुण्यप्राप्तीसाठी कलादर्शनासाठी, यशसिद्धीसाठी झोकून देणारे कलावंत, त्यांचे अपार कष्ट धडपड, प्रगल्भता, अपयश, अपमान ढासळणे... सगळेच अप्रतिम वाटते. माणसांतील गंधर्व, नृत्यनिपुन अप्सरा, तापसी गुरू ‘गांधर्वी’मध्ये भेटून थक्क करतात. स्वत:ची खास वैशिष्ट्ये, ढब, वकूब, आस, दृष्टिकोन, वृत्ती सावधपणे जपणारी, दुसऱ्यांमध्ये स्वत:चे अस्तित्व विरघळून टाकणारी पात्रे आपआपल्या पिढीचे ठसे गडद करतात, पात्रांच्या प्रीती, शृंगार, वासना, भावनिक गुंतवणूक, मनोभंग, प्रेमभंग, रक्तातून टाकणारी वंचना, वात्सल्य इ. भावनांचे आविष्कार वाचकाला कथानकाशी खिळवून ठेवतात. कादंबरीच्या पृष्ठापृष्ठांवर वाचकांना गुंतवणून टाकणारी जाळी जणू लेखिकेने लावली आहेत. स्वत:जवळचे जेवढे काही देता येण्यासारखे आहे ते देऊन टाकण्याचा लेखिकेचा प्रयत्न आवाक् करतो. मृणालिनी गडकरी त्या दातृत्वाचे दान अनुवादक म्हणून देत राहतात. शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, चित्रपट दिग्दर्शन इ. च्या क्षेत्रांमध्ये नसणाऱ्या वाचकांनाही मैफली, प्रयोग इ. ची सुगम वर्णने रसमयतेमुळे आकलनक्षम वाटतात. मनहारी तोषविणारी ठरतात. ईश्वरी देणगीमुळे मधुर स्वरकंठ, प्रगल्भ आकलनशक्ती, अनोखी ताकद लाभलेल्या अपालाचे गाणे हाच धर्म-सर्वस्व-प्रकृती-संस्कृती-प्रेम, श्वासोच्छ्वास! स्वर्गीय आवाजाच्या अपालाला कोणत्या वणव्यातून कोणाच्या प्रेरणा-संरक्षण-साथ, आधारामुळे वाटचाल करावी लागली? समस्यांच्या निबीड अरण्यांमध्ये समस्यांशी मुकाबला करताना कोणते शिखर तिने गाठले? वाचकांना विलक्षण अविस्मरणीय, अतुलनीत अनुभूती लेखिकेच्या आविष्कार, आशय, अभिव्यक्तीद्वारा लाभते. तन-मन-चेतापेशींना संपूर्णतेने कवेत घेणारा चित्रपटच पाहात असल्याचा ‘गांधर्वी’ वाचनाने प्रत्यय येतो. मेहता पब्लिशिंगच्या खानदानामध्ये शोभावेच असे बाह्यांग/अंतरंग लेखक लाभलेली ‘गांधर्वी’ संग्राह्य वाटते! -प्रा. अनुराधा गुरव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk