* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MARI MARI JAY SARIR
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745873
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
READING YOJANA’S POETRY ONE CAN FATHOM THE DEPTH OF HER WRITING WHICH HAS DEEP ROOTS IN HER STRONG BELIEF IN WOMEN LIBERATION WHICH SHE HAS BREATHED AS AN INDIVIDUAL AND AS A WRITER. AN INDIVIDUAL’S JOURNEY TOWARDS FREEDOM AND LIBERATION BREAKING CHAINS OF MORES AND VALUES IMBIBED ON MINDS OF MASSES CANNOT CORRESPOND WITH THE CHANGE THAT OCCURS AT SNAIL’S PACE IN A SOCIETY. THE RESULT IS OBVIOUS CONFLICT AND TUG-OF-WAR BETWEEN THE ENLIGHTENED AND EMPOWERED INDIVIDUAL AND THE SOCIETY THAT PREFERS STAGNANCY. THE REVERBERATIONS AND CONNOTATIONS OF THIS SKIRMISH REFLECT IN SENSITIVE MIND AND IF THE EXPRESSION IS IN FORM OF POETRY, IT IS OBVIOUS THAT ONE FINDS THESE REFLECTIONS ALL OVER IN WRITING, WHICH IS THE CASE WITH YOJANA’S POETRY. WHEN ONE LOCKS HORNS WITH THE SYSTEM WHICH IS SOCIALLY ACCEPTED HIERARCHAL STRUCTURAL OPPRESSION, IT IS PREDICTABLE THAT AN INDIVIDUAL WILL BE ISOLATED AND DEJECTED. BUT A STRONG MIND IS NOT EXASPERATED AND FACES THE STORM BRAVELY. ONE CAN SENSE THIS IN YOJANA’S POEMS. AND PROBABLY THIS IS WHY NOTWITHSTANDING WITH GLOOMY TONE IN THE BEGINNING, HER POETRY ASCENDS TOWARDS BRIGHTNESS. IT IS APPARENT THAT ROMANTICISM PEEPS INTO HER WORDS BUT THEN, THIS ROMANTICISM DOES NOT DWELLS IN DREAMS LEADING TO ILLUSION OF BLISS, BUT IS PIERCING AND FIERY INDICATION OF A REVOLT. HOWEVER, THIS POETRY DOES NOT TAKE FORM OF PROPAGANDA OF WOMEN LIBERATION, AND STICKS TO ITS CONTEMPORARY INDIVIDUALISTIC FORM.
योजनाची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण / संघर्ष सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंबं कवितेमध्ये उमटत रहातात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था ह्या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते.
१.रानकवी लक्ष्मण दुधाळ काव्य पुरस्कार , महाराष्ट्र साहित्य परिषद , मंगळवेढा शाखा २०१७ २.लक्षणीय पद्य साहित्यकृती पुरस्कार , आपटे वाचनमंदिर इचलकरंजी २०१७ ३.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद , बडोदा , सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह २०१७ ४. सुखदा नागेश स्मृती पुरस्कार , साहित्यप्रेमी भगिनी मंडळ,पुणे २०१७ ५.विशाखा काव्य पुरस्कार २०१८

No Records Found
No Records Found
Keywords
#MARI MARI JAY SARIR #YOJANA YADAV #मरी मरी जाय सरी #योजना यादव
Customer Reviews
  • Rating StarManoj V

    Hello! Although we do not know each other, thought of writing to you after reading your book of poems that I discovered while browsing Amazon. Enjoyed reading it a lots. Some of the poems reminded me of the poetry of Elizabeth Bishop. I could also dicern a subtle positive influence of Arundhati Roy in your writing, which is a great thing. My best wishes to you and your poems. Thank you!- Manoj ...Read more

  • Rating StarPramod Munghate

    योजना यादवची कविता... □ #मरीमरीजायसरीर “फुटपाथवर निजलेला बेवडा प्रार्थनेला शरण जात नाही करुणा भाकत नाही कुठल्या प्रेषिताची रहदारीला मोजत नाही मोकाट जनावरांनाही नाही आत्मभानाची सरहद ओलांडून कुठे पोहचतो कळत नाही” ‘आत्मभानची सरहद’ या कवयित्री योजना यादवच्या कवितेतील वरच्या ओळी आहेत. मी २००९ मध्ये फेसबुक साइन इन केलं, तेंव्हा अगदी सुरवातीला मित्रयादीत असलेली योजना यादव. त्यातही कविता करणारी, कविता वॉलवर शेअर करणारी, मिडियात संपादक काम करणारी म्हणून अधिक लक्षात राहिलेली. त्यानिमित्ताने बराच संवाद झालेला. तीनचार वर्षांपूर्वी तिचा नवीन आलेला ‘मरी मरी जाय सरीर’ हा कवितासंग्रह घ्यायला म्हणून पुण्यातील मेहताच्या आउटलेटला गेलो असताना भेटही झालेली. ‘मरी मरी जाय सरीर’ अधूनमधून कविता चाळत होतो. पण परवा एका लेखाच्या निमिताने तो हातात घेतला आणि समग्रच वाचून काढला. फार कमी कविता संग्रह असतात जे एका बैठकीत वाचून संपवायला भाग पाडतात. आणि संग्रहातील सगळ्या कविता मिळून एक महावाक्य सिद्ध व्हावे, असा संग्रह तर दुर्मिळच असतो. संपूर्ण संग्रहातील कवितांचा एकात्म अनुभव वाचकाला येणे या अर्थाने मी महावाक्य असे म्हणतो. ‘मरी मरी जाय सरीर’ या शीर्षकाचा प्रत्यय या संग्रहातील प्रत्येक कविता वेगवेगळ्या संदर्भात देते. कितीतरी पातळ्यांवर कवयित्रीला हे शरीर टाकून द्यायचे आहे. या देहत्यागाला अनेक परिमाणे आहेत. स्त्रीवाद, अध्यात्म, परात्मता आणि आत्मभानाची सरहद्द ओलांडण्याची असोशी या परस्पर विरोधी वाटणाऱ्या जाणिवा एकमेकात बेमालूम मिसळल्या आहेत. आणि त्यात कोणतीही विसंगती नसल्याचा कवयित्रीचा अनुभव प्रत्येक कवितेतून सारख्याच ताकदीने व्यक्त होतो. ‘आत्मभानाची सरहद’ याच शीर्षकाची ही कविता जणू या संग्रहाची शीर्षकविता आहे असे मला वाटते. आत्मभानाची सरहद, पुढची पायरी आहे. त्या आधी शरीर हाच मोठा अडसर आहे. देह आणि त्यातही स्त्रीदेह अध्यात्ममार्गातील धोंड वगैरे अशा पारंपरिक अर्थाने या कवितेतील शरीराचा विचार नाही. एक ‘स्त्री’ म्हणून, एक ‘माणू’स म्हणून सर्व सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थांच्या चौकटींचा त्याग करायचा असेल तर हाडामांसाच्या शरीरापलीकडे जाण्याची अगतिकता या कवितेच्या प्रत्येक शब्दाशब्दातून पराकोटीच्या आवेगाने व्यक्त होते. ‘जोहार’ या पहिल्याच कवितेत ती म्हणते, “पृथ्वीच्या या अंडाकृती कवचात आपण दोघेच आहोत असं समज अजून परंपरा उत्क्रांती अशा शब्दांची झाली नाही ओळख नैतिकतेच्या पाशाने शरीरं वेढलं नाही तू पुरुष, मी स्त्री अशी लेबलं नाहीत केवळ स्पर्शाचं भान आहे आपल्यात त्यासाठीच शरीराच्या मशाली पेटल्यात आत्मभानाचा विलोप आणि त्याचवेळी स्पर्शाचे भान, अशी अस्तित्वाची जाणीव म्हणजे आत्मभानाची सरहद ओलांडण्याचा प्रयत्न आहे. देहाचा किंवा आत्मभानाचा विलोप ही रूढ अध्यात्माच्या मोक्ष-मुक्तीच्या कल्पनेच्या विरुद्ध टोकाला जाणारी जाणीव आहे. मोक्ष-मुक्ती ही शरीरनिरपेक्ष अवस्था असते. पण इथे शरीराचे सर्व भोग, वासना-विकार आणि कामभावनेचे सर्व विभ्रम अस्तित्वात आहेतच. पण शारीरभोगाच्या टोकावरील आत्मभानाचे विलोपन अपेक्षित आहे. किंवा या संग्रहातील ‘अचानक’ ही तिसरीच कविता पहा: “अचानक माझ्याच हातून पाझरते तुझ्या स्पर्शाची ऊब घट्ट आलिंगनात मावळत्या सूर्याची आठवण शरीरभर तेजाळत राहते तुझ्या पायांवर तोल सांभाळते सारी सृष्टी ओठांवरून सरकू लागतात ढग घट्ट घट्ट होत जातं आलिंगन वारा शरमून, संकोचून संथ वाहू पाहतो तुझ्यातून माझ्यात अशी उतरते लहर मर्यादा घोंगाळू लागल्या पायात की शब्दांना हाकलून लावतो आपण अचानक अचानक विसरून जातो माणूस असण्यातला भ्रम” किंवा ‘शरीर’ या कवितेच्या शेवटी ती लिहिते “विलगल्यावर तुझं तुला सलत राहतं माझं मला शरीर” ही सल आहे ती शरीरनिरपेक्ष नाही. “विलगल्यावर तुझं तुला सलत राहतं माझं मला शरीर” या ओळीतून विलग झाल्यावरचे दु:ख व्यक्त केले आहे. शरीरांच्या उत्कट मिलनातून अलौकिक मुक्तीचा ध्यास आहे. पण अडसर आहे तो आत्मभानाचा. हे आत्मभान जड शरीराचेच एक परिमाण आहे. या अर्थाने ती म्हणतेय, ‘मरी मरी जाय सरीर’. देहाच्या लौकिक अस्तित्वाचे सगळे बंध वितळून गेल्यावर मुक्तीचा जो अनुभव असतो, तो पारंपरिक अध्यात्माच्या परिभाषेतील ‘मोक्षा’चा नसतो. तो अधिकाधिक इंद्रियसंवेद्य भोगाच्या अत्युच्च टोकावरचा असतो. असे सरहद्दीवरचे क्षण शारीरिक मिलनात कवयित्रीच्या शब्दात “स’मिती’वर” येताना अनुभवता येतात, पण ते आपले नसतात, आपल्या हातातून सुटून जातात, ही तगमग आहे. पण हेच अनुभव कवयित्रीला जणू सत्याचा साक्षात्कार वाटतात. (उदा. ‘पळभर’ या कवितेत “छोटी मोठी बतावणी/ चिरडून जाईल/ इतकी घट्ट/ मिठी मारली/ आपण एकमेकांना/ओठातून ओठात उतरल्या /सत्याचे/ झालो धनी /पळभर का होईना” ) ही जाणीव या संग्रहातील अनेक कवितातून वेगवेगळ्या रूपाने व्यक्त झाली आहे. ‘सिल्विया’ ही या संग्रहातील एक आवडलेली कविता. सिल्विया प्लाथ ही मरणोत्तर पुलित्झर पुरस्काराने सन्मानित अमेरिकन कवयित्री. गस ओव्हन मध्ये झोकून देऊन जिने स्वतःला संपवले होते. योजना लिहिते: “सिल्विया प्लाथनं आत्महत्या केली नाही फक्त फेकून दिला देह आत्म्याआड येणारा” आत्मभानाच्या विलयाची असोशी असलेल्या कवयित्रीला उत्क्रांतीच्या साच्यातील जगणेही शिक्षा वाटते. लौकिकाकडून जाणारा हा अलौकिकाचा प्रवास आहे. शरीर आहे, आत्मा आहे, आत्मभान आहे पण हे सगळे निरस्त करायचे आहे. जगण्याच्या प्रवासात व्यक्त-अव्यक्त, दृश्य-अदृश्य सांस्कृतिक धारणा आणि मूल्यांचे ओझे आहेत. नितळ आणि निरागस अशा अलौकिकाच्या बिंदूची सम गाठण्याच्या प्रवासात ते धारणा आणि मूल्यांचे ओझे कवयित्रीला जड झाले आहे. जड शरीराचेच जणू अवयव झाले आहेत, म्हणून शरीराकडून गर्भाकडे आणि तिथून पुन्हा एका शून्याकडे जायचे आहे. म्हणूनच ‘कळप’ या कवितेत ती म्हणते, “तुमची सर्टिफाईड दु:खं / सर्टिफाईड आनंद / संवादाचा हव्यास /आहे ज्यांच्या /जगण्याचा आधार / त्यांना तुमचे / कळप लखलाभ / ज्यांना / एकट्याने /भोगता उपभोगता येतं /त्यांना ओढु नका कळपात...” या अर्थाने ही कवयित्री म्हणतेय, ‘मरी मरी जाय सरीर’. ‘कळपाची’ ही संज्ञा अलीकडच्या ग्लोबल काळात अधिक अदृश्य झाली आहे. ती दिसत नसल्याने अधिक आक्रमक आणि हिंसक-शोषक झाली आहे. दृश्य पातळीवर ई-नागरिक हा आत्यंतिक व्यक्तिवादी जगात जगत असतो. पण ते खरे नसते. अदृश्य पातळीवर चोहोबाजूंनी त्याच्यावर असंख्य कॅमेरे रोखलेले असतात. उपग्रहाच्या माध्यमातून शोरूमच्या चार भिंतीच्या ट्रायल रूममध्ये स्त्री एकटी कधीच नसते. अनेक मल्टीन्याशनल ब्रान्डसने तिच्या शरीरावर ताबा मिळवलेला असतो. खासगीकरणाच्या संस्कृतीत स्त्रीचे शरीर बाजाराचा एक ब्रांड असतो. ‘डिझायनर’ या कवितेत योजना लिहिते, “स्पायकरच्या ट्रायल रूममध्ये कपडे उतरवत असताना रोखलेले असतात डिझायनरचे डोळे आपल्यावर पायाच्या घोटापासून कंबरेपर्यंतचा आकार मांड्यांचा घेराव , स्तनांचा विस्तार स्कॅन होत राहतो आरशापल्याड जीन्स चढवतात ते हात आपले नसतात पायही बहुदा आपले नसतात नव्या कपड्यात खुललेला अहं तो ही नसतोच आपला डिझायनर बेमालूम घुसलेला असतो शरीरात दुकानात पाय ठेवल्यापासून.” या अशा कवितांमधून व्यक्त होणारी स्त्रीवादी जाणीव एकरेषीय स्त्री-पुरुष संघर्षातील नाही. ती त्यापलीकडे जाणारी आहे. एरवी मराठीतील स्त्रीवादी जाणिवांच्या आवाजी कवितेत स्त्री-पुरुष संबंधातील काच, वैय्यर्थ आणि शोषणाच्या संदर्भात स्त्रीवादाचे सुलभीकरण असते. या पार्श्वभूमीवर योजना यादवच्या कवितेतील स्त्रीवादी जाणिवा सूक्ष्मरीतीने समजून घ्याव्या लागतात. ‘रेखा’ शीर्षकाची एक छोटीशी पण सुंदर कविता या संग्रहात आहे. “रेखा, तुझ्या असीम सौंदर्यानं आत्महत्या केली होती त्या दिवशी ज्या दिवशी तुला कळलं होतं सौदर्यापेक्षा औदार्यानं पुरुष जिंकता येतात” किंवा ‘समर्पनाची मृत्युघंटा’ कवितेत ती लिहिते, “किती खोदणाराय मी? /खोदता खोदता /सीतेचं एखादं नख /केस/ वा हाडच लागेल हाताला/ त्यात दिसेल/ तिच्यातून माझ्यापर्यंत /पोहोचलेला डीएनए/ वळवळताना/ संकरासाठी आसुसलेल्या/ निरुपद्रवी गांडुळासारखा/ राम शाम मनू सनू/ कुणीही भोगा /त्याला शिकवा एकवचनाची भाषा/ उभा करा आरसा/ अन् दाखवा /समर्पण संपल्यावर /कुरूप होतात बाया” स्त्रीच्या शारीर सौंदर्याचे सत्य हे स्त्रीवादाचे एक परिमाण कसे आहे ते या कविता पुनःपुन्हा अधोरेखित करतात. ‘सौदर्यापेक्षा औदार्यानं पुरुष जिंकता येतात’ किंवा ‘समर्पण संपल्यावर कुरूप होतात बाया’ या ओळींमधून ही कवयित्री स्त्रीवादी जाणीव वेगळ्याच रीतीने व्यक्त करते. स्त्रीपुरुषसंबंधांचा शरीराच्याच संदर्भात पण शरीराच्या पलीकडे जाणारी ही जाणीव आहे. या संदर्भात योजनाच्या कविता मला माया एंजेलो या अमेरिकन कवयित्रीच्या भूमिकेशी नाते सांगणाऱ्या वाटतात. ‘नापीक जमिनीचे संदर्भ’ या कवितेच्या अखेरीस ती लिहिते, “गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासारखी असते बाई भाबड्या पुरुषासारखी ज्याला उमजत नाही , की, सालोसाल एकच बी पेरलं तर नापीक होते जमीन.” योजना यादवच्या या कविता २०१०च्या दशकातील आहेत. त्यामुळे नव्वदनंतरच्या जागतिकीकरणाला ही कवयित्री कशी सामोरे जाते हा प्रश्न टाळून पुढे जाता येणार नाही. जगाच्या ग्लोबल व्हिलेजमध्ये सांस्कृतिक परंपरांचे अवमूल्यन झाले असे म्हणतानाच स्थानिक परंपरा व धार्मिक संकेत-व्यवस्थांचे पुनरुज्जीवन झाल्याचेही आपण पाहतो. समाजातील धार्मिक-पारंपारिक धारणांचे बाजारीकरण स्वाभाविक होते. ‘बाजार’ हे मूल्य वर्तमान जीवनाला सर्व पातळीवर कसे वेढून राहिले आहे, हा अनुभव मराठीतील नव्वदोत्तर कवितेत मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. त्रुटीत, विस्कळीत आणि बहुकेंद्री जीवनशैली ही या काळातील नागरी समाजाची जणू अगतिकताच झाली. (खाजगीकरण व उदारीकरणाने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनही व्यापले गेले.) नव्वदोत्तर कवितेत माणसाच्या व्यक्तित्वाचे असे खंडित व विघटीत रूप हे मध्यवर्ती अनुभवसूत्र असल्याचा परिणाम कवींच्या अभिव्यक्तीवरही दिसतो. पुढे त्यात साचेबद्धपणा आला. अभिव्यक्तीच्या पातळीवर असा प्रभाव योजनाच्या कवितेवर दिसत नाही. प्रा. वसंत पाटणकर यांनी एका लेखात फार छान म्हटले आहे की जागतिकीकरणाला कवीने प्रतिसाद देणे म्हणजे “कॉम्प्युटर, सायबर विश्व, इंटरनेट, इमेल, वेब, सर्किंग किंवा मॉलमधील वस्तू, वातावरण किंवा मॅकडोनल्ड पिझ्झा, बर्गर किंवा `एम` टीव्ही, `व्ही` टीव्ही, ब्रेकिंग न्यूज किंवा टीव्हीवरील शेकडो चॅनल्स आणि त्यांद्वारे प्रसारित होणारे प्रातिभासिक वास्तव इत्यादी गोष्टींविषयी लिहिणे वा यासंबंधीचे शब्द, संज्ञा, प्रतिमा-प्रतीके पेरत कविता लिहिणे नव्हे.” यातून आपली कविता किती समकालीन आहे हे दाखविण्याचा प्रयत्न काही कवी करतात. पण ते खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाविषयी बोलत नाहीत, असे त्यांना वाटते. योजनाच्या वर उल्लेख केलेल्या ‘डिझायनर’सारख्या कवितेत बाजार संस्कृतीचा अनुभव असा प्रतीकात्मक नाही, तो भावात्मक आहे. उलट जागतिकीकरणाच्या संदर्भातील स्त्रीवादाचे नवे परिमाण ती व्यक्त करते. आपल्या एकूण जगण्याचे वस्तूकरण झाले आहे अशी जाणीव असणे वेगळे आणि त्यातून बाहेर पडण्याची तगमग असणे वेगळे. त्यासाठी एक मूल्यचौकट कवीच्या एकूण व्यक्तित्वातच असावी लागते. ती योजनाच्या कवितेच्या मुळाशी आहे. त्याचाच परिणाम म्हणून वर्तमानाच्या विघटीत-विस्कळीत जीवनशैलीत जगत असताना या कवयित्रीच्या एकूण अभिव्यक्तीत एकात्मता आढळते. नव्वदोत्तर कवितेत हा विशेषही दुर्मिळ आहे. योजनाची कविता समकालीन जगण्यातील असंबद्धता व्यक्त करीत असली तरी ती मूल्यभावाचा एकात्म प्रत्यय देणारी आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रभावात ती कविता संभ्रमित झालेली नाही. ती एकूणच संभ्रमावस्थेकडे गांभीर्याने पाहते. म्हणून डिजिटल युगातील किंवा ई-विश्वातील निव्वळ चमत्कृतीपूर्ण प्रतिमांच्या भाराने वाकलेल्या कवितेपेक्षा योजना यादवची कविता मला अधिक महत्त्वाची वाटते. सभोवतालच्या वास्तवाचे आकलन असणे आणि त्याची स्वतःच्या अस्तित्वजाणीवेला आच असणे, एव्हढाच अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता पुढे आवर्तात सापडतात. मग त्या कवितांमध्ये काहीच सापडत नाही असा अनुभव आहे. स्वप्न हे योजना यादवच्या अनुभूतीचे एक रूपक आहे. सत्याच्या निकट जाण्यासाठी सभोवतालच्या वास्तवापेक्षा पुष्कळदा स्वप्नांतील फैंटेसी अधिक अर्थपूर्ण ठरते. ‘स्वप्न’ या कवितेत ती लिहिते : “शरीरात रुतून बसलीयत माणसं दाटीवाटीनं नवरा योनीच्या तळघरात पोरगी त्याच्या मांडीवर पोटाच्या मध्यभागापर्यंत उरलेले भाग मिळतील तसे वाटून घेतलेत प्रत्येकानं अन् आई मात्र उभीच आहे शरीरात नखशिखान्त” पितृसत्ताक संस्कृतीच्या संदर्भात कवयित्रीने केलेले हे विधान आहे. “ आई मात्र उभीच आहे शरीरात नखशिखान्त” असा आईविषयक एक बंध अनेक कवितांमध्ये आढळतो. तो मला जागतिकीकरणाचा प्रभाव पचविलेल्या कवितेच्या संदर्भात विशेष वाटतो. ‘स्वप्न स्वप्न स्वप्न’ या आणखी एका कवितेत ती म्हणते, “गर्भाशय समुद्रासारख आहे आतून आणि आई पृथ्वीसारखी मी स्वतः भोवतीच फिरतो तिच्या उदरात पाय रोवून बाप चंद्रासारखा दूर आहे कुठंतरी इतकंच माहित आणि नातीबीती नसतात कुमारीमातेच्या पोराला एक बागुलबुवा असतो समाज नावाचा आई घाबरत नाही त्याला आई घाबरत नाही क्षणभंगुर वावटळीला ........” अनेक कवितातून बापाचा सुद्धा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून शोध घेताना दिसते. ‘संग कवितेशी’ ही कविता या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. या कवितेत ती म्हणते, “मुळात मलाच सर करणं जमणार नाही जोखता येणार नाही माझ्या देहापल्याडची तटबंदी यायचं तर पुरुषार्थाची सारी अस्त्रं फेकून एकदा पायतळी या त्याआधी फेका गुर्मीची भाषा भ्रमिष्ट होऊ द्या तुमच्यातल्या आदिपित्याला अन्यथा माझ्या नादीच लागू नका कवितेशी संग करायला जन्म फुंकता यायला हवा” अशा अनेक संदर्भात कवयित्री आपली भूमिका नेमक्या शब्दात मांडते. ‘पुरुषार्थाची सारी अस्त्रं फेकून’ आणि ‘भ्रमिष्ट होऊ द्या तुमच्यातल्या आदिपित्याला’ या ओळीतून ती जसे परंपरागत सांस्कृतिक सत्तेला आव्हान आव्हान देते. ते देताना कवयित्री आपली कविताच पणाला लावते. कवितांविषयक अनेक कविही या संग्रहात आहेत. ‘अभिव्यक्ती’, ‘शब्द’, ‘बयो कविते’ या शीर्षकाच्या कवितांमधून योजना यादवची कवितेची कल्पना स्पष्ट होते. भाषा असते समूहाची म्हणून कविताही असे ती म्हणते. शब्दांची सुई करून शरीरात टोचता येत नाही अशी अगतिकताही ती बोलून दाखवते. “जळजळीत दु:खाचे / थरावर थर साचून / त्यातून तू उगवणार असशील / तर / बयो कविते / माझ्यापासून तू दूरच राहा” असेही सांगते. या कवितेचा एकूण सारांश सांगायचा झाला तर असे म्हणता येईल की, या कवितेला शरीरसापेक्ष पण अलौकिक क्षणाच्या साक्षात्काराच्या अनुभवाची असोशी आहे. त्यासाठी या कवितेला आत्मभान विसरायचे आहे. ही असोशी इतक्या टोकावर जाते की या कवितेला शरीराचाची अडसर वाटावा. आत्मभानाच्या विलयाची तीव्र आस असली तरी या कवितेत मूल्यभानाचा विसर नाही, हे मला महत्वाचे वाटते. (या संदर्भात ही कविता उत्तरआधुनिकवादी की आधुनिकवादी असेही मूल्यमापन करण्याची गरज इथे नाही, असे मला वाटते. कारण त्या मूल्यसंकल्पनाव्युहात ही कविता कुठे बसते हा आणखी वेगळा मुद्दा आहे.) योजनाच्या कवितेतील मूल्यभान संग्रहाच्या अखेरच्या दोन कवितांतून अधोरेखित होते असे मला वाटते. शेवटच्या ‘सरहद्दीवर बुद्ध’ या कवितेत ती म्हणते, “मालकीच्या लोभात भरकटणाऱ्या अस्वस्थ आत्म्यांना म्हणूनच कळत नाहीत त्याच्या मिटलेल्या पापण्यांतले भाव बुद्धवाटेवर चालणारा मात्र शोधत असतो चिरनिद्रेचा इलाज” आणि त्या आधीच्या ‘निरंतर शांतीच्या शोधात’ या कवितेत ती लिहिते, “निसटलंच हातून सारं तर निरंतर शांतीच्या शोधातला बुद्ध तरी जन्मतोच आपल्यात..” □ -प्रमोद मुनघाटे ...Read more

  • Rating StarP.R Ramdasi

    आपल्या "मरी मरी जाय सरीर"काव्यसंग्रहातील कविता ब-याचदा वाचल्या. मी कुणी समीक्षक नाही किंवा काव्यक्षेत्राचा जाणकार नाही. केवळ एक वाचक म्हणून कविता वाचल्यावर मनांत जे आले ते कळवित आहे। बहुतांशी कवितांमधून ( बुद्ध, स्वप्न , दुःखाचं अँडिक्शन इ.) स्त्रमनाची अलवार स्पंदनं आणि पौरुषत्वाची अपार असंवेदनशीलता याचं वर्णन अल्पाक्षरात साधलेलं आहे. बुद्ध वाचताना सजग मनात प्रश्न येतो की बुद्धाच्या अंतःकरणातील करुणा कधीच कां स्त्रीच्या वाट्याला येणार नाही ?  स्त्रीदेहाची आसक्ती अनादीअनंत आणि इतक्या पराकोटीची की त्या देहात माझ्याइतक्याच किंबहुना कांकणभर जास्तच संवेदना आहेत याचं पुरुषांना भान राहू नये ? "त्यानंतर " वाचल्यावर वाटलं की ही  विरहवेदना की प्रेमभंगाची व्यथा ...जी त्याचं नव्हे तर तिचंच प्राक्तन ठरतं ! " संग कवितेशी " ही कविता मला वैयक्तिक पातळीवर आवडली. ज्यामधे एका निर्भिड स्रीनं दिलेलं आव्हान लक्षणीय आहे. देह सर करता येतो पण स्रीमनाची अभेद्य तटबंदी, गुर्मी बाळगून कदापि लांघता येणार नाही. ती ओलांडायची असेल तर आदिपुरुषापासून रुजलेली आणि रुजवली गेलेली,  पुरुषार्थ या नावानं, परजली जाणारी अस्त्रं त्यागावी लागतील. गृहकृत्यदक्ष, आदरातिथ्य असलेल्या गृहिणी स्त्रीची सुप्तभावना excuse me कवितेत, विशेषतः शेवटच्या ओळींमध्ये to the point व्यक्त झाली आहे. वर्षानुवर्षं लादल्या गेलेल्या आणि तेच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता समजल्या गेलेल्या आदरातिथ्याला मे नाँट बी अँव्हेलेबल हेच धाडसी उत्तर असू शकतं. "बीज क्षेत्र न्याय" या एका लेखिकेनं ( मला नांव आठवत नाहीय.) मांडलेल्या तत्वाची आठवण होते.."नापीक जमिनीचे संदर्भ " वाचताना.  आणि "आत्महत्या " वाचताना समस्त स्रीवर्गापुढचा यक्षप्रश्न उमजतो की लाज कोळून प्यावी की शरीरच संपवावं ! कारण डिझायनर तर पावला-पावलावर आहेतच शरीराचे वक्राकार, चढउताराला दर्शनीय बनविण्यासाठी टपलेले ! आणि उमजलेल्या कवितांमधील शेवटची.. "सरहद्दीवर बुद्ध "--- जे आहे ते अपूर्ण आणि जे नाही ते पूर्ण ....हा अट्टाहास मानवी जीवन कलंकित करतो., ओंजळी गळक्या आहेत हे जाणून-उमजूनही, अजाण बनून, ओंजळी भरण्याचा निष्फळ प्रयत्न करुन शेवटी रिकाम्या हातांनी जातो.. काही कविता मला माझ्या सीमित आकलनशक्ती मुळे सखोल कळल्या नाहीत. वरील मजकूर म्हणजे यथाशक्ती रहग्रहण आहे. परीक्षण नव्हे. तो माझा प्रांत नाही आणि हक्क तर नाहीच नाही.  आपल्या पुढच्या काव्यसंग्रहाची प्रतिक्षा राहील हे निश्चित !  वरील मजकुरात काही औधत्य वाटल्यास क्षमस्व. सर्वांगिण शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-11-2018

    वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या कविता... योजना यादव यांची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते, तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण- संघर् सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंब कवितेमध्ये उमटत राहतात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते. या काव्य संग्रहात एकूण ७४ कविता समाविष्ट आहेत. लहानलहान असल्या तरी कविता अर्थपूर्ण व आशयघन आहेत. शब्दांचे जंजाळ किंवा अवडंबर कुठेच नाही जसे पहिलीच कविता ‘जोहार’– ‘केवळ स्पर्शाचं भान आहे आपल्यात त्या साठीच शरीराच्या, मशाली पेटल्यात जगण्याचा अट्टाहास, एवढ्यापुरताच, आणि माझा जोहार, तेवढ्यापुरता.’ ‘गुलाम कवितेत – ‘सरावलो साशंक मनाला, तरच होऊ शकतो बेफिकीर मावळत्या सूर्याच्या साक्षीनं. नात उजळवू शकतो एखादा क्षण.’ अशी ही योजना यादव यांची कविता यथार्थतेचे दर्शन घडविणारी, काळजाला भिडणारी आहे. –डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more