NA
"ज्येष्ठ लेखक वसन्त सं. पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या `जीवनलहरी` ते `महावृक्ष` या काव्यसंग्रहांतील निवडक कवितांचे संपादन करून हा काव्यसंग्रह साकारला आहे. या संग्रहातील बऱ्याच कविता कुसुमाग्रजांच्या काव्यजीवनाच्या उत्तरकालखंडातील आहेत. कुसुमाग्रज मानवतेचे कवी आहेत; पण त्यांच्या कवितेतून माणसाला निराशेच्या अंधारात मनोबल मिळते, प्रकाश दिसतो; म्हणून ते `प्रकाशाचे कवी` आहेत. या कवितांमध्ये केवळ रविकिरण तळपले नाहीत, तर साक्षात सूर्यही प्रकाशला आणि नुसते सप्तर्षी झळकले नाहीत, तर अथांग तारकाविश्व झळकताना दिसले. त्यांनी सूर्याला नुसते अभिवादन केले नाही, तर त्याला आवाहनही केले. अतिदूरस्थ तारकासंभाराशी जवळचा संवाद साधला. पृथ्वीप्रमाणे त्यांची कविताही अनेक रूपांनी, प्रकारांनी सूर्याभोवतीच परिक्रमा करीत राहिली, हे त्यांच्या काव्याचे पृथगात्मत्व आहे. कुसुमाग्रजांच्या समग्र काव्यात मनात भरणारा विशेष म्हणजे, त्यांची प्रकाशपूजा. या पूजेसाठी ते सदैव आपल्या लाडक्या सूर्यदैवताकडे धाव घेतात; त्याचे सहचर चंद्र, तारे, नक्षत्रे आणि या सर्वांना उदरात घेणारे अथांग आकाश यांच्यापुढे ते नतमस्तक होऊन जातात. त्यांची कविता सूर्यमय, उषामय आणि आकाशमय आहे. कुसुमाग्रजांच्या निसर्गप्रेमाच्या सुवर्णभांडारात गहननील आकाश व त्यातील चिरंतन रहिवासी सूर्य, चंद्र, तारका यांनाच अत्यंत गौरवाचे स्थान आहे. कारण या प्रकाशविश्वात गूढता, गंभीरता व उदात्तता एकत्र नांदत आहेत. सूर्याचा आग ओकणारा प्रखर प्रकाश, चंद्राची शीतल प्रभा आणि ताऱ्यांचा, नक्षत्रांचा `आद्र्र दयाशील` मंद विलास ही सारी मोह घालणारी आहेत. या संग्रहात सूर्य-चंद्रांच्या मानाने आकाश-तारकांचे संदर्भ असलेल्या कविता अधिक आहेत, असे दिसून येईल. त्यात परिणतप्रज्ञ कवीची वैचारिक प्रगल्भता आणि गंभीरता रसिक वाचकास पदोपदी जाणवेल.
"