* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WASTED
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980196
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARKJOHNSON`S FATHER HAD `LOVE` TATTOOED ACROSS HIS LEFT HAND, BUT THAT DIDN`T STOP THE BEATINGS. THE JOHNSON CHILDREN WOULD TURN UP TO SCHOOL BATTERED AND BRUISED, BUT NO ONE EVER THOUGHT OF INVESTIGATING THEIR HOME LIFE. MARK JUST SLIPPED THROUGH THE CRACKS AND KEPT ON FALLING. FOR YEARS. BROUGHT UP IN A HOME SIMMERING WITH VIOLENCE AND DARK SECRETS, MARK FELL INTO BAD HABITS AT AN EARLY AGE. CONSTANTLY IN TROUBLE AT SCHOOL, HE BEGAN STEALING _T THE AGE OF SIX, WAS DRINKING BY THE AGE OF EIGHT AND TOOK HIS FIRST HIT OF HEROIN AGED ELEVEN. A SENSITIVE AND INTELLIGENT BOY, HE COULD NEVER STAY ON THE RIGHT PATH, AND THOUGH ART COLLEGE BECKONED, HE ENDED UP IN PORTLAND PRISON INSTEAD. WITH SEARING HONESTY, WASTED DOCUMENTS MARK`S DESCENT INTO THE VERY DEPTHS OF ADDICTION AND CRIMINALITY. HOOKED ON HEROIN AND CRACK, HOMELESS ON THE STREETS OF LONDON AND WITH A PRICE ON HIS HEAD, NO ONE - LEAST OF ALL MARK - BELIEVED HE WOULD SURVIVE, NEVER MIND RECOVER. _ND YET HE SOMEHOW FOUND THE STRENGTH`_O PULL THROUGH, AND NOW RUNS HIS OWN THRIVING TREE SURGERY BUSINESS, EMPLOYING AND HELPING OTHER RECOVERING ADDICTS. HIS STORY IS AT ONCE SHOCKING AND INSPIRATIONAL - A HEARTBREAKING AND COMPELLING ACCOUNT OF ONE MAN`S STRUGGLE TO SAVE HIMSELF, AND HELP SAVE OTHERS IN THE PROCESS.
मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षं त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करू लागला आणि आठव्या वर्षी तो दारू पिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचं सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि व्रॅÂकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही- स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नव्हता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला ‘झाडांची शल्यचिकित्सा’ हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्य सेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #WASTED #SNEHALJOSHI #MARKJOHNSON #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating Starदर Pramod Bankhele

    वेगळ्या विषयावरचं खुपच वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं पुस्तक,प्रामाणिक भाषांतर ,हे पुस्तक म्हणजे त्याच्या आठवणी चे तुकडे आणि घटना आहेत,जाऊ द्या,"पुस्तक "मिळावा आणि हाती घ्या--एक वेगळं विश्व अनुभवा!!

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 06-09-2009

    जीवनात हरवलेल्या माणसांसाठी… माणूस व्यसनात का अडकतो? माणसाचं माकड होतं म्हणजे नक्की काय होतं? व्यसनांमुळे किंवा त्या जीवनात प्रचंड गुरफटल्यामुळे एखादा माणूस चांगल जगणं सोडून भीक मागू शकतो? बरं, आयुष्याची इतकी हेळसांड झाल्यानंतर एखाद्याला त्यातून बाहर पडावंसं वाटलं, तर बाहेर पडता येतं? तो पुन्हा एकदा नवा डाव मांडू शकतो? तो डाव यशस्वी होऊ शकतो? या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, एका व्यसनी माणसाचं, गर्दुल्ल्याचं आयुष्य जवळून पाहायचं असेल, त्याचा व्यसनात गुरफटण्यापासून ते त्यातून मुक्त होईपर्यंतचा प्रवास अनुभवायचा असेल, तर मार्क जॉन्सन यांचं ‘वेस्टेड’ वाचायला हवं. हे त्यांचं आत्मकथन आहे. सत्य घटना आहे. ही कथा आहे, एका बालपण हरवलेल्या मुलाची. प्रेमाचा ओलावा शोधता शोधता, रखरखीत घरापासून मनानं दुरावलेल्या मुलाची. त्या शोधात लागलेल्या कुसंगतीची. त्यातून जडलेल्या व्यसनांची. व्यसनांमुळे विखुरलेल्या आयुष्याची. त्यानं भोगलेल्या तुरूंगवासाची आणि रस्त्यावरच्या जगण्याची. ही कथा आपल्याला सुन्न करते. आतून हलवून टाकते. माणूस व्यसनी का होतो, याचं उत्तर या प्रवासातून कुठंतरी सापडत जातं. व्यसनी आहे, असं म्हणून हिणवण्यापेक्षा किंवा झटकून टाकण्यापेक्षा, त्यांच्याकडे कशा पध्दतीनं पहायला हवं, हे यातून लक्षात येतं.सिगारेटपासून सुरवात करून हेरॉइन आणि क्रॅकच्या अधीन गेलेल्या मार्कचा फक्त व्यसनांचाच नव्हे, तर मानसिक प्रवास, त्याची आंदोलनं आपल्याला भिडतात. मार्कनं केलेल लग्न, त्याची तशीच व्यसनी बायको, नंतर झालेली मुलं, त्या मुलांची झालेली ससेहोलपट, हे वाचता वाचता आपण अंतर्बाह्य हादरतो. पुढे तर त्याचं रस्त्यावरचं भिकारी होऊन जगणं. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यातच गुरफटत जाणं, हा प्रवास आपणही सुन्न मनानंच करतो; पण प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा साक्षात्काराचा क्षण असतोच. तो क्षण समजला आणि पकडता आला, तर आयुष्याचं सोनं होतं, नाहीतर माती. मार्क तो क्षण पकडतो. त्याआधीही त्यानं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो; पण प्रत्येक वेळी त्यापासून तो दूर पळतो. या वेळी मात्र तो निर्धारानं उतरतो. व्यसन सोडणं अजिबात सोपं नाही. शारीरिक त्रासासोबत मानसिक अडथळेही प्रचंड आहेत. शारीरिक त्रासावर औषधोपचार हा उपाय आहे; पण मानसिक त्रासाचं काय? तो सोसलाच पाहिजे. त्याला तोंड द्यायलाच हवं आणि त्यातून पार पडायलाच हवं. ही प्रक्रिया खूप अवघड असते. मुळात आपण व्यसनात गुरफटलेले आहोत, त्यातून बाहेर पडणं आपल्याला जमत नाही, हे मान्य करणंच खूप अवघड असतं. ‘छे, मी कधीही सोडू शकतो,’ हीच भूमिका व्यसनी लोकांची असते. तावून-सुलाखून निघणं म्हणजे काय, याचा अनुभव मार्क आपल्याला देतो. एकदा व्यसनमुक्त झाल्यानंतरचा मार्कचा प्रवासही तेवढाच भव्य आहे. मुळात तो झाडांचा शल्यचिकित्सक आहे. व्यसनांच्या आवरणाखाली त्याचं हे अंग झाकलं गेलं आहे. ते आवरण दूर होताच तो मोकळा होतो. पुन्हा एकदा डाव मांडतो. आत्मविश्वासानं व्यवसायात उतरतो आणि चक्क यशस्वी होतो.नव्या वाटेवर चालतानाही तो जुने दिवस विसरत नाही, हे विशेष! तो आपल्यासारख्या पूर्वायुष्यातील गुन्हेगार आणि व्यसनी मंडळींना नोकरी देतो. त्यांनाही पुन्हा उभं करतो. मार्क जॉन्सन आज एक यशस्वी व्यावसयिक आहेत. ते आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहतात. गुन्हेगार आणि व्यसनी तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचं पुर्नवसन करण्याचं कामही ते करत आहेत. मार्कची ही कहाणी आणि त्याची गगनभरारी मराठीत अगदी उत्तम रीतीनं पोचवली आहे स्नेहल जोशी यांनी. मार्क यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी ती लिहिली,असं सातत्यानं वाटत राहतं, हेच त्यांचं यश आहे. हे उत्तम पुस्तक उत्तम रीतीनं मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे आभारच मानायला हवेत. जाता जाता एकच. पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि त्यातील विचार खूप महत्त्वाचा आहे. मार्क म्हणतो, ‘हे पुस्तक जीवनात हरवलेल्या माणसांना अर्पण. जर माणसं बदलली, तर जग बदलेल.’खरंच असंच व्हावं, हीच मनापासून इच्छा! - अभिजित थिटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more