* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE TALIBAN CRICKET CLUB
  • Availability : Available
  • Translators : AMRUTA DURVE
  • ISBN : 9789386745279
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"“A MOVING, SPLENDIDLY REALIZED STORY OF COURAGE AND GRIT IN MODERN-DAY KABUL.” —VIKAS SWARUP, AUTHOR OF SLUMDOG MILLIONAIRE A HARROWING YET TENDER NOVEL—BEND IT LIKE BECKHAM IN A BURKA—THE TALIBAN CRICKET CLUB IS A MOVING AND UNFORGETTABLE TALE OF ONE WOMAN’S COURAGE AND GUILE IN THE FACE OF TERROR AND TYRANNY. SET IN WAR-TORN KABUL, AFGHANISTAN, THIS EXTRAORDINARY NEW FICTION BY TIMERI N. MURARI, ACCLAIMED AUTHOR OF THE INTERNATIONAL BESTSELLER, TAJ, IS A SWEEPING STORY OF LOVE, FAMILY, RESILIENCE, AND SURVIVAL, FEATURING AN UNFORGETTABLE HEROINE DETERMINED TO HELP HER LOVED ONES WIN THEIR FREEDOM WITH A BAT AND A BALL. "
ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. ती काबूलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण ‘स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर,’ असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी; नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भरवण्याची. अर्थातच फक्त पुरुषांसाठी. यात जिंकणारी टीम पुढच्या कोचिंगसाठी पाकिस्तानात जाणार आणि जगभरात अफगाणिस्तानाचं नेतृत्व करणार. रुख्साना दिल्लीच्या वास्तव्यात टीमसाठी क्रिकेट खेळलेली आहे़ आता ती जबाबदारी घेते आपल्या भावंडांना क्रिकेट शिकवण्याची. तालिबानच्या राज्यात रुख्साना त्यात यशस्वी होते का, क्रिकेटच्या माध्यमातून अफगाणिस्तानातून सुटका करून घेण्याची संधी तिला आणि तिच्या भावंडांना मिळते का, हे जाणून घेण्यासाठी ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ वाचलंच पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THETALIBANCRICKETCLUB #THETALIBANCRICKETCLUB #दतालिबानक्रिकेटक्लब #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AMRUTADURVE #TIMERIN.MURARI "
Customer Reviews
  • Rating Starसामना २८-२-२०२१

    झुंजार मुलीची कथा.... कॅनडातील वृत्तपत्रकार तिमिरी एन मुरारी यांची `द तालिबान क्रिकेट क्लब` ही कादंबरी आतापर्यन्त आठ देशामध्ये प्रसिद्ध झाली आहे. तिचा मराठी अनुवाद अमृता दुर्वे यांनी केला आहे. काबूलमधील सर्वस्तरीय वास्तव सांगणारी हेलावून ाकणारी विलक्षण कथा या कादंबरीत आहे. प्रेम, धैर्य, दृढ, आकांशा, भावावेग, आकर्षण, आवड, आणि जुलूम या संबधीची चित्रणे तित आहेत. क्रिकेट माध्यमातून स्वातंत्र्य मिळविण्याच्या संधीकरिता धडपडणाऱ्या अफगाण तरुण-तरुणीची ही जिगरबाज गोष्ट आहे. तथापि हरएक अफगाण माणसाला नित्य आयुष्यात धोके कसे पत्करावे लागतात आणि प्राथमिक, साध्या गोष्टीपासून कसे वंचित राहावे लागते याची जरी ही कहाणी असली तरी प्राप्त धोकेदायक परिस्थितीतूनही सुंदर आयुष्य घडविण्याची उमेद लोकांमध्ये कशी आहे.याचाही निर्देश या कादंबरीत आहे. ही गोष्ट आहे तरुण रुखसानाची... अफगाणिस्तानातल्या `काबूल डेली` नामक वृत्तपत्र कचेरीत ती पत्रकार म्ह्णून ती काम करत आहे. घरी आजारी म्हातारी आई आणि धाकटा भाऊ जहान यांची ती जीवापाड काळजी घेत राहते. तथापि तालिबानच्या राज्यात तिचे आयुष्य तिच्या लेखणीमुळे एका वेगळ्याच संकटात सापडते आहे. अशा वेळी अफगाणिस्तानची पर्यायाने तालिबानची जगात वेगळी अस्तित्व प्रतिमा घडवण्यासाठी तालिबान क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा करतात. जिंकणारी टीम पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरते. त्यातून जगभरात अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व होणार असते. याबाबत रुखसाचे दुःख वेगळे आहे. तालिबान हे क्रिकेट खेळ नियमानुसार व खेळाच्या सचोटीने कधीच होऊ देणार नाहीत याची तिला मनोमन खात्री आहे. टीम तयार करण्याची मुभा सर्वांनाच आहे. पण हा खेळ अफगाणिस्तानात कोणी कधीही खेळलेला नाही. रुखसानाशिवाय हा खेळ कुणालाच येत नाही. तिला स्वातंत्र्य, मोकळीक हवी आहे. अफगाणिस्तानातील तालिबान हे स्वात्रंत्त्य, मोकळीक कुणासही देऊ इच्छित नाहीत ही कादंबरी म्हणजे तिचं अंतस्थ आत्मकथन आहे. ही कादंबरी दोन भागात आहे. दुसऱ्या भागात परवेझ आणि वीर याचं कथन आहे. अखेर ती आपल्या भावी पतीसह-वीरसह पाकिस्तानात पोहचते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अन्वर खान त्याचं स्वागत करतो. स्टेट टीमचे पासपोर्टही न उघडता ते प्रदेशीय पाहुणे या अर्थाने त्यांना समजून घेतलं जाते. तरीही "पक्ष्याला किंवा प्राण्याला त्याच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघड दिसावा, तसं आमचं झालं होतं. पलीकडच्या स्वातंत्र्याची आम्हाला भीती वाटत होती. यात काही धोका तर नाही" पृ. २९४ हा ताण म्हणजे अनोळखी व्यक्तींपासून असणारा ओळखीचा धोका होता. वीर आणि रुखसाना कराचीत विमानानं उतरतात. त्यात परवेझ, कवाद, नामदार, ओमेद तिच्यासोबत होते. ते क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यानिमित्ताने पाकिस्तानात होते. अशीही स्वांतत्र्य ध्यासाची गोष्ट आहे. अफगाणिस्तानात स्त्रीवर प्रचंड पारंपरिक धार्मिक अशी कुबंधने आहेत. मानसिक गुलामी व शारीरिक छळवाद यामुळे स्त्री जीवन कोमेजून जाळून खाक रोज होत आहे. अशावेळी मुक्तिमार्ग - क्रिकेट प्रशिक्षणाच्या माध्यमाने शोधणारी नायिका येथे आपल्याला दिसते. विशेष म्हणजे ती कौशल्याने जाचातून मुक्त होते. ही कादंबरी म्हणजे तिच्या मुक्तीची गाथा आणि जाहीरनामा आहे. मुक्तीचे प्रतिनिधित्व रूप म्हणजे ही नायिका होय. संबंध कादंबरी ताण, संघर्ष मानसिक नाट्य यांच्या सुरेख उभारणी आहे. तिमिरी एन. मुरारी यांनी हि कादंबरी लिहून जगातील स्त्री वर्गाला जागृत केले आहे. हे विशेष होय. प्रतिवर्षी धर्म माणसाला किती निःसत्व करतो याचेच हे लक्षण म्हणता येईल. विशेष म्हणजे अमृता दुर्वे यांनी केलेला अनुवाद अस्सल मराठी भाषेचे सौष्ठव घेऊन आला आहे. कुठेही वाचन अडखळत नाही. एवढी ओघवती मराठी शैली अमृता दुर्वेची आहे. एक वेगळे अफाट अनुवादविश्व समजून घेण्यासाठी रसिक वाचकांनी ही कादंबरी आवर्जून लक्षात घ्यावी. अशीच महत्वाची आहे. ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    रुखसना एक तरुण पत्रकार मुलगी. नजीबुल्ला सरकारच्या काळात ती काबुल न्यूजमध्ये पत्रकारिता करत होती.पण अचानक तालिबान सरकार आले आणि सगळी परिस्थिती पालटली. अध्यक्ष नजीबुल्ला आणि त्याच्या साथीदारांना भर रस्त्यात फाशी दिले गेले .मनात येईल तेव्हा तालिबानी धर्विरोधी चुका शोधून डोक्यात गोळ्या घालू लागले .मग रुखसना टोपणनावाने हिंदुस्थान टाईम्ससाठी लिहू लागली . तिच्या घरी आजारी आई आणि लहान भाऊ आहे . तरीही ती धोका पत्करून काबुलमधील तालिबान विरोधी बातम्या जगभरात पोचवू लागली . सरकारचा तिच्यावर संशय आहे . पण अजूनही तिच्यावरचा संशय सिद्ध झाला नाही . अचानक तिला एक दिवस मंत्रालयात बोलावणे येते .तालिबान अफगाणिस्तान आणि स्वतःची प्रतिमा जगभरात उंच करण्यासाठी क्रिकेटचे सामने भरविण्याचे ठरविते. जी टीम जिंकेल तिला पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल असे घोषित करते. क्रिकेट हा खेळ अफगाणिस्थानात कोणालाच माहीत नसतो. तर रुखसना दिल्लीत शिकत असताना विद्यापीठाकडून काही सामने खेळलेली असते .तालिबान खऱ्या नियमानुसार आणि खिळाडूंवृत्तीने हा खेळ खेळणार नाही याची खात्री सर्वानाच आहे . टीम तयार करायची मुभा सर्वानाच आहे आणि त्यामार्गे पाकिस्तानात जाण्याची संधी ही .पण रुखसना स्त्री आहे आणि तिथे स्त्रियांना एकट्याने फिरायची ही बंदी आहे . तरीही कुठेतरी आशेचा एक किरण आहे . ती संधी रुखसनाला गमवायची नाही . आता काय करेल ती ......????? लेखकाने तालिबान राजवटीचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केले आहे . किड्या मुंग्यांना मारावे तसे माणसांना मारणारे तालिबानी. स्त्रियांची घुसमट ,गरिबी,अध्यक्षांना भर चौकात दिलेली फाशी यांचे वर्णन भयानक आहे . ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - APRIL 2018

    अफगाणींच्या नजरेतून तालिबान!... आज इस्लामिक स्टेट किंवा आयसिसबद्दल जे लिहिले बोलले जात आहे तेच काही वर्षांपूर्वी तालिबानबद्दल होत होते. वास्तविक तालिब म्हणजे धार्मिक शिक्षण घेणारा विद्यार्थी. तालिबचे अनेकवचन तालिबान. पण गणित इतके साधेसोपे राहिले नाह. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील सत्तासंघर्ष, त्यात अमेरिका, रशियासारख्या महासत्तांचा हस्तक्षेप, या संघर्षाला लाभलेली कट्टर धार्मिक किनार यातून ते प्रकरण अधिकच चिघळत गेले. आज तालिबान म्हटले की अनेकांना आठवते ती एक क्रूर, जुलुमी राजवट. तिने अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील जनजीवन तर बदलून टाकलेच. पण ९/११ च्या अमेरिकेतील अफगाणिस्तानात चालवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमुळे त्याला जागतिक परिणामही प्राप्त झाले. अखेर तालिबानचा भर थेडा ओसरू लागला आणि त्यांच्याशी संबंधित साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. त्यातून नेहमीच्या वार्तांकनाच्या पलिकडील अफगाणिस्तान आणि तेथील लोकजीवन बाहेरील जगाला कळू लागले. अशा पुस्तकांच्या बहुतांशी इंग्रजी आवृत्ती प्रथम बाजारात येऊ लागल्या. आता त्यातील बरेचसे साहित्य मराठीतही अनुवादित होत आहे. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ आणि ‘माझे तालिबानी दिवस’ ही दोन पुस्तके वाचनीय आहेत. आणि ‘माझे तालिबानी दिवस’ हे पुस्तक ‘माय लाइफ विथ द तालिबान’ या इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. मूळ पुस्तक अलेक्स स्ट्रिक्स व्हान लिन्शोटेन आणि फेलिक्स क्यून यांनी लिहिले आहे. त्यात अब्दुल सलाम झैफ या माजी तालिबानीची हकिकत आहे. तर ‘द तालिबानी क्रिकेट क्लब’ या पुस्तकाचे मूळ लेखक तिमिरी मुरारी. त्याचा अनुवाद केला आहे अमृता दुर्वे यांनी आणि पुस्तकाचे मूळ नाव तसेच ठेवले आहे. यामध्ये रुख्साना नावाच्या अफगाण मुलीची कथा आहे. कथेला पार्श्वभूमी आहे ती तालिबानने प्रतिमावर्धनासाठी भरवलेल्या क्रिकेट सामन्यांची. या दोन्ही पुस्तकांना एकाच विषयाची पार्श्वभूमी असली तरी त्यातून तालिबान आणि अफगाण जीवनाचे वेगवेगळे कंगोरे वाचकांसमोर येतात. डॉ. प्रमोद जोगळेकर तसेच अमृता दुर्वे या दोघांनीही या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद चांगला केला आहे. त्यामुळे ओघवत्या भाषेतील ही पुस्तके वाचनीय झाली आहेत. सोव्हिएत रशियाने १९७९ साली अफगाणिस्तानामधील साम्यवादी सरकारला पाठिंबा देण्याच्या मिषाने तेथे अतिक्रमण केले आणि पुढील दशकभर तेथे तळ ठोकला. सोव्हिएत आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी स्थानिक मुजाहिद्दीन लढवय्ये हाती शस्त्र घेऊन उभे ठाकले. त्यांना अमेरिकेने भरपूर मदत केली. अमेरिकेच्या सीआयए या हेरसंस्थेकडून पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इटेलिजन्स (आयएसआय) या संस्थेच्या माध्यमातून मुजाहिद्दींनांना पैसा आणि शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाला. त्यात पाकिस्ताननेही हात धुवून घेतला. अफगाण-पाकिस्तान सीमेवर असलेल्या निर्वासित छावण्या, मदरसे यातून मुजाहिद्दीनांची भरती होऊन त्यांना तेथील तळांवर प्रशिक्षण दिले गेले. अ‍ेखर १९८९ साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली. त्यानंतर तेथे अनेक वर्षे सत्तासंघर्ष सुरू होता. देशाचे विविध भाग वेगवेगळ्या गटांच्या प्रभावाखाली होते. त्याच दरम्यान पाकिस्तानाच्या मदतीने तालिबान प्रबळ बनत गेले. १९९६ साली तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भूभागावर सत्ता स्थापन केली. त्यानंतर २००१ सालापर्यंत तेथे तालिबानची सत्ता होती. या काळात तालिबानने तेथे शरियतवर आधारित कट्टर इस्लामी राजवट स्थापित केली. त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप पावला. पुरुषांना दाढी राखणे, पाच वेळा नमाझ अदा करणे, सक्तीचे झाले. फुटबॉल सामने, सिनेमा यावर बंदी आली. स्त्रियांचे जिणे तर आणखीच हालाखीचे बनले. बुरख्याच्या आणि बंद दारांच्या आड त्यांचे जीवन होरपळले जाऊ लागले. या नियमांचा थोडा जरी भंग झाला तरी भर मैदानात डोक्यात गोळ्या घालून मरण ठरलेले. २००१ साली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला झाला आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. त्यानंतर तालिबानचे दिवस फिरले. पण त्या संघर्षात संपूर्ण देशाच्या पायाभूत व्यवस्थांचे, जनजीवनाचे धिंडवडे निघाले. आजही तेथील जनतेचे वर्तमान होरपळत आहे आणि भविष्य झाकोळले आहे. बाहेरील जगासाठी अफगाणिस्तान-पाकिस्तान हा प्रदेश म्हणजे दहशतवादाचा मूलस्रोत आहे. पण तेथील स्थानिकांच्या दृष्टीतून तो प्रदेश कसा आहे, याचे थोडे फार दर्शन ‘माझे तालिबानी दिवस’ या पुस्तकातून घडते. अब्दुल सलाम झैफ हा तालिबानचा पाकिस्तानमधील वकील होता. दक्षिण अफगाणिस्तानमध्ये १९६८ साली त्याचा जन्म झाला. सोव्हिएत रशियाविरुद्धच्या लढ्यात तो मुजाहिद्दीन म्हणून लढला. थालिबान राजवटीत त्याने विविध पदांवर प्रशासकीय काम केले. ११ सप्टेंबर २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर त्याला पकडून ग्वांटानामो तुरूंगात ठेवण्यात आले. २००५ साली सुटका झाल्यापासून तो सार्वजनिक जीवनात सक्रिय असून अमेरिकेच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या हमीद करझाई सरकारवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो सध्या काबुलमध्ये राहतो. त्याच्या मते परदेशी फौजा त्यांच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानमध्ये घुसल्या. त्यांनी तेथील लोकांवर बॉम्बहल्ले केले. त्यात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले. आमच्या देशाचा विनाश केला. त्याविरुद्ध शस्त्र उचलल्यावर आम्हीच गुन्हेगार ठरलो. आता पुन्हा आमच्या मरणयातना सुरू आहेत. अमेरिका आणि युरोपच्या नागरिकांना जगण्याचा जितका अधिकार आहे तितकाच तो येथील नागरिकांनाही आहे. आमच्या नागरिकांनाही त्यांचे धार्मिक आणि अन्य प्रकारचे स्वातंत्र्य प्रिय आहे. आमची संस्कृतीही महत्त्वाची आहे आणि ती टिकली पाहिजे, हे सांगण्याच्या भावनेतून त्याने लिखाण केले आहे. त्यातून तालिबानच्या दुष्कृत्यांचे परिमार्जन होत नसले तरी संघर्षाची दुसरी बाजूही वाचकांसमोर येते. झैफचे त्याच्या भूमीवर नितांत प्रेम आहे. तेथील संस्कृतीचा परकीयांकडून झालेला नाश त्याला पाहावत नाही. त्यांचे हाल त्याला अस्वस्थ करतात. संघर्षग्रस्त नागरिक शेजारील पाकिस्तानमधील निर्वासितांच्या छावण्यात आश्रय घेतात. आंतरराष्ट्रीय राजकारण्याच्या वेढ्यात अडकून आणि जिहादच्या कल्पनांना भुलून सशस्त्र लढ्याचे प्रशिक्षण घेतात. त्यानंतर केलेल्या कारवाया, सोव्हिएत संघाचे परतणे, त्यानंतरची सत्तापोकळी, त्यातील गटागटांचे संघर्ष, मग तालिबानची सरशी, त्यावेळचे बदललेले जीवन, राजकारणात भूमिका बजावण्याची मिळालेली संधी आदी बाबींचे वर्णन झैफ करतो. तसेच २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर अमेरिका चवताळून परत हल्ला करणार हेही त्याच्या नजरेतून सुटत नाही. पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जशी अमेरिका चवताळून उठली आणि हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले, तसेच हल्ले अफगाणिस्तानावर होतील हे तो साथीदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो, आदी वर्णन वाचनीय आहे. मात्र झैफची बाजू वाचकांना पूर्णपणे पटेलच असे नाही. त्याचे कथन बरेच सरळ असले तरी त्याने काही गोष्टी चतुराईने लपवलेल्या आहे आणि काही कृतींचे समर्थन करण्यासाठी इस्लामचा आधार घेतला आहे. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्याच्या घटनेबाबत तो काहीच बोलत नाही. धर्माच्या बाबतीत तालिबानी इतके कट्टर का वागतात हे कदाचित या पुस्तकातून समजू शकेल. बामियानाच्या बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचे त्यांना काहीच वाटत नाही किंवा त्यात चूक आहे वाटत नाही, कारण आपला धर्म आणि त्याचा ग्रंथ याशिवाय वेगळं मत किंवा त्याच्यापलीकडे सत्य असूच शकत नाही, अशी त्यांची कडवी भूमिका आहे. याचा संघर्षाचा आणखी एक कंगोरा ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ या पुस्तकातून पुढे येतो. रुख्साना ही अफगाण तरुणी काबूल डेली नावाच्या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत असते. घरी आजारी म्हातारी आई आणि धाकटा भाऊ जहानची जिवापाड काळजी घेत असते. पण तालिबानच्या राजवटीत रुख्सानाचं आयुष्य एका वेगळ्याच वादळात सापडतं. त्याच वेळी अफगाणिस्तानची आणि तालिबानची प्रतिमा जगात चांगली करण्यासाठी तालिबानी क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा करतात. जिंकणारा संघ पाकिस्तानामध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आणि अफगाणिस्तानाचं जगभरात प्रतिनिधित्व करणार असतो. थालिबान हा खेळ खऱ्या नियमांनुसार, सचोटीने कधीच होऊ देणार नाही याची रुख्सानाला खात्री आहे. टीम तयार करण्याची सर्वांना मुभा आहे. पण अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव कोणलाच नाही. याला अपवाद म्हणजे रुख्साना. ती दिल्लीत असताना क्रिकेट खेळली आहे. यातून जे नाट्य आणि ताणतणाव निर्माण होतात त्यांचे दर्शन या पुस्तकात होतेच पण त्या अनुषंगाने अफगाण जीवनाची दाहकताही समोर येते. रुख्सानाला तिच्या भावाला व इतरांना क्रिकेट शिकवायचे असते. पण तालिबानी राजवटीत मुलींनी बुरखा काढणे किंवा घराबाहेर पडणेही मुश्कील. तेव्हा हे जमवण्याची कसरत तिला करावी लागते. त्यासाठी वेश बदलणे, पुरुषांप्रमाणे वागणे, प्रसंगी खोटी दाढी लावणे अशा क्ऌप्त्या लढवाव्या लागतात. या सगळ्या प्रयत्नांतून या पात्राने उभ्या केलेल्या अडचणी ओलांडतना तिचा जीव मेटाकुटीला येतो. त्यातच तिच्या दिल्लीतील वास्तव्यात जुळलेल्या प्रेमसंबंधांच्या कथानकाचीही जोड आहे. क्रिकेट हा त्यांच्यासाठी केवळ एक खेळ उरत नाही. थर या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्याठी, स्वातंत्र्याची अनुभूती देणारा मार्ग ठरतो. पण तोही किती आश्वासक ठरतो हे मुळातच वाचले पाहिजे. तिमिरी मुरारी हे मूळचे भारतीय, पण गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पत्रकारितेत वावरत आहेत. त्यांच्या अनुभवातून मूळ पुस्तक साकारले आहे. त्याचे तितकेच प्रवाही आणि परिणामकारक सार अनुवादात उतरले आहे. ‘माझे तालिबानी दिवस’ ही तसेच उद्बोधक आहे. ही दोन्ही पुस्तके अफगाणिस्तान विषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त आहेत. या दोन्ही पुस्तकांना जशी ऐतिहासिक आणि जागतिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे, तसाच मोठा भौगोलिक कॅन्व्हासही लाभला आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील घडामोडींपासून भारत आपल्याला अलग ठेवू शकत नाही. एके काळी अफगाणिस्तानशी भारताचे खूप सौहार्दपूर्ण संबंध होते. ते आताही तसे असले तरी तेथील परिस्थिती बदलली आहे. रशिया आणि अमेरिकेच्या माघारीनंतर आता पाकिस्तान तेथे आपले हात-पाय पसरत आहे. अफगाणिस्तानमधील भारतीय हितसंबंधांना बाधा निर्माण करत आहे. तसेच तेथील दहशतवाद भारतात पसरत आहे. अफगाणिस्तानात नेमके काय चालते हे कुतूहल वाढते आहे. अशा स्थितीत या पुस्तकांचे भारताच्या दृष्टीने महत्त्व आणखी वाढते. -सचिन दिवाण ...Read more

  • Rating StarNews Paper review

    एका मुस्लिम पत्रकार तरुणीच्या धाडसाची कहाणी... मुस्लिम देशांमध्ये स्त्रियांवर असणारे जाचक निर्बंध आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी एखाद्या स्त्रीने दिलेला निकराचा लढा, अशा स्वरूपाची काही पुस्तके लिहिली गेली. ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ हे काहीसं अशाचस्वरूपाचं पुस्तक आहे; पण ते थोडं वेगळं ठरतं ते त्याला लाभलेल्या क्रिकेटच्या पार्श्वभूमीमुळे. या कादंबरीचे मूळ लेखक आहेत तिमिरी एन. मुरारी आणि अनुवाद केला आहे अमृता दुर्वे यांनी. ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. ती काबूलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण ‘स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर,’ असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी. नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत रुख्साना लपूनछपून भारतीय वर्तमानपत्रासाठी बातम्या पाठवते. या सगळ्यात एक दिवस तिला बोलावणं येतं ते सरकारच्या ‘प्रपोगेशन ऑफ व्हच्र्यू अँड द प्रीव्हेन्शन ऑफ व्हाइस’मंत्रालयाकडून. हे खातं सगळ्यांवर लक्ष ठेवतं की लोकं धर्माचं आणि तालिबानच्या आदेशांचं नीट पालन करतात का यावर. घाबरलेली रुख्साना तिथे जाते. तिथे तिला तालिबानच्या क्रौर्याचं दर्शन घडतंच; पण सोबतच तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भरवण्याची. अर्थातच फक्त पुरुषांसाठी. टीम तयार करण्याची मुभा सर्वांना आहे. यात जिंकणारी टीम पुढच्या कोचिंगसाठी पाकिस्तानात जाणार आणि जगभरात अफगाणिस्तानाचं नेतृत्व करणार. रुख्सानाचे लग्न ठरलेय सध्या अमेरिकत असलेल्या शाहीनशी. शाहीन आपल्यासाठी पैसे पाठवेल आणि आपण इथून निघून जाऊ या आशेवर ती आहे. रुख्सानाने दिल्लीत राहून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेय. आणि त्या वेळी ती टीमसाठी क्रिकेट खेळलेली आहे. आता ती जबाबदारी घेते आपल्या भावंडांना क्रिकेट शिकवण्याची; पण बुरखा घालून क्रिकेट कसे खेळणार, आणि एक स्त्री मुलांना क्रिकेट खेळायला शिकवतेय, हे तालिबानला कसे चालणार; पण तिच्या भावंडांकडे तिच्याशिवाय दुसरा कोणीही क्रिकेट कोच नाही. एकीकडे रुख्साना घराच्या अंगणातच भावांना क्रिकेट खेळायला शिकवतेय. आईची तब्येत खालावत चालली आहे. झोराक वाहिदी त्याच्या भावासाठी रुख्सानाला मागणी घालतो. शाहीन परस्पर अमेरिकेत लग्न करतो. रुख्साना मुलाचा वेष धारण करून बाबर या नावाने वावरत असते. तिच्या आईचं निधन होतं आणि ती दिल्लीतील तिच्या मित्राला वीरला बोलावून घेते. रुख्साना क्रिकेट टीम तयार करू शकते का आणि त्या टीमसह ती अफगाणिस्तानातून बाहेर पडू शकते का, याचं उत्तर पुस्तक वाचल्यावरच मिळू शकतं. स्त्रीला जिथे हीन लेखलं जातं, अशा ठिकाणी रुख्सानाने क्रिकेट टीमचा कोच होणं, कौतुकास्पद वाटतं; तसेच घरातील पुरुषांची (भावांची) साथ तिला मिळाली आहे, तिचा मित्रही तिच्या मदतीला तयार आहे, हे सकारात्मक चित्र या पुस्तकातून दिसतं. धाडस दाखवलं तर टोकाच्या विपरीत परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो, असा संदेशही या पुस्तकातून मिळतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more