* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE TALIBAN CRICKET CLUB
  • Availability : Available
  • Translators : AMRUTA DURVE
  • ISBN : 9789386745279
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"“A MOVING, SPLENDIDLY REALIZED STORY OF COURAGE AND GRIT IN MODERN-DAY KABUL.” —VIKAS SWARUP, AUTHOR OF SLUMDOG MILLIONAIRE A HARROWING YET TENDER NOVEL—BEND IT LIKE BECKHAM IN A BURKA—THE TALIBAN CRICKET CLUB IS A MOVING AND UNFORGETTABLE TALE OF ONE WOMAN’S COURAGE AND GUILE IN THE FACE OF TERROR AND TYRANNY. SET IN WAR-TORN KABUL, AFGHANISTAN, THIS EXTRAORDINARY NEW FICTION BY TIMERI N. MURARI, ACCLAIMED AUTHOR OF THE INTERNATIONAL BESTSELLER, TAJ, IS A SWEEPING STORY OF LOVE, FAMILY, RESILIENCE, AND SURVIVAL, FEATURING AN UNFORGETTABLE HEROINE DETERMINED TO HELP HER LOVED ONES WIN THEIR FREEDOM WITH A BAT AND A BALL. "
ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. ती काबूलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण ‘स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर,’ असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी; नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भरवण्याची. अर्थातच फक्त पुरुषांसाठी. यात जिंकणारी टीम पुढच्या कोचिंगसाठी पाकिस्तानात जाणार आणि जगभरात अफगाणिस्तानाचं नेतृत्व करणार. रुख्साना दिल्लीच्या वास्तव्यात टीमसाठी क्रिकेट खेळलेली आहे़ आता ती जबाबदारी घेते आपल्या भावंडांना क्रिकेट शिकवण्याची. तालिबानच्या राज्यात रुख्साना त्यात यशस्वी होते का, क्रिकेटच्या माध्यमातून अफगाणिस्तानातून सुटका करून घेण्याची संधी तिला आणि तिच्या भावंडांना मिळते का, हे जाणून घेण्यासाठी ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ वाचलंच पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THETALIBANCRICKETCLUB #THETALIBANCRICKETCLUB #दतालिबानक्रिकेटक्लब #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AMRUTADURVE #TIMERIN.MURARI "
Customer Reviews
  • Rating Starसामना २८-२-२०२१

    झुंजार मुलीची कथा.... कॅनडातील वृत्तपत्रकार तिमिरी एन मुरारी यांची `द तालिबान क्रिकेट क्लब` ही कादंबरी आतापर्यन्त आठ देशामध्ये प्रसिद्ध झाली आहे. तिचा मराठी अनुवाद अमृता दुर्वे यांनी केला आहे. काबूलमधील सर्वस्तरीय वास्तव सांगणारी हेलावून ाकणारी विलक्षण कथा या कादंबरीत आहे. प्रेम, धैर्य, दृढ, आकांशा, भावावेग, आकर्षण, आवड, आणि जुलूम या संबधीची चित्रणे तित आहेत. क्रिकेट माध्यमातून स्वातंत्र्य मिळविण्याच्या संधीकरिता धडपडणाऱ्या अफगाण तरुण-तरुणीची ही जिगरबाज गोष्ट आहे. तथापि हरएक अफगाण माणसाला नित्य आयुष्यात धोके कसे पत्करावे लागतात आणि प्राथमिक, साध्या गोष्टीपासून कसे वंचित राहावे लागते याची जरी ही कहाणी असली तरी प्राप्त धोकेदायक परिस्थितीतूनही सुंदर आयुष्य घडविण्याची उमेद लोकांमध्ये कशी आहे.याचाही निर्देश या कादंबरीत आहे. ही गोष्ट आहे तरुण रुखसानाची... अफगाणिस्तानातल्या `काबूल डेली` नामक वृत्तपत्र कचेरीत ती पत्रकार म्ह्णून ती काम करत आहे. घरी आजारी म्हातारी आई आणि धाकटा भाऊ जहान यांची ती जीवापाड काळजी घेत राहते. तथापि तालिबानच्या राज्यात तिचे आयुष्य तिच्या लेखणीमुळे एका वेगळ्याच संकटात सापडते आहे. अशा वेळी अफगाणिस्तानची पर्यायाने तालिबानची जगात वेगळी अस्तित्व प्रतिमा घडवण्यासाठी तालिबान क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा करतात. जिंकणारी टीम पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरते. त्यातून जगभरात अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व होणार असते. याबाबत रुखसाचे दुःख वेगळे आहे. तालिबान हे क्रिकेट खेळ नियमानुसार व खेळाच्या सचोटीने कधीच होऊ देणार नाहीत याची तिला मनोमन खात्री आहे. टीम तयार करण्याची मुभा सर्वांनाच आहे. पण हा खेळ अफगाणिस्तानात कोणी कधीही खेळलेला नाही. रुखसानाशिवाय हा खेळ कुणालाच येत नाही. तिला स्वातंत्र्य, मोकळीक हवी आहे. अफगाणिस्तानातील तालिबान हे स्वात्रंत्त्य, मोकळीक कुणासही देऊ इच्छित नाहीत ही कादंबरी म्हणजे तिचं अंतस्थ आत्मकथन आहे. ही कादंबरी दोन भागात आहे. दुसऱ्या भागात परवेझ आणि वीर याचं कथन आहे. अखेर ती आपल्या भावी पतीसह-वीरसह पाकिस्तानात पोहचते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अन्वर खान त्याचं स्वागत करतो. स्टेट टीमचे पासपोर्टही न उघडता ते प्रदेशीय पाहुणे या अर्थाने त्यांना समजून घेतलं जाते. तरीही "पक्ष्याला किंवा प्राण्याला त्याच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघड दिसावा, तसं आमचं झालं होतं. पलीकडच्या स्वातंत्र्याची आम्हाला भीती वाटत होती. यात काही धोका तर नाही" पृ. २९४ हा ताण म्हणजे अनोळखी व्यक्तींपासून असणारा ओळखीचा धोका होता. वीर आणि रुखसाना कराचीत विमानानं उतरतात. त्यात परवेझ, कवाद, नामदार, ओमेद तिच्यासोबत होते. ते क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यानिमित्ताने पाकिस्तानात होते. अशीही स्वांतत्र्य ध्यासाची गोष्ट आहे. अफगाणिस्तानात स्त्रीवर प्रचंड पारंपरिक धार्मिक अशी कुबंधने आहेत. मानसिक गुलामी व शारीरिक छळवाद यामुळे स्त्री जीवन कोमेजून जाळून खाक रोज होत आहे. अशावेळी मुक्तिमार्ग - क्रिकेट प्रशिक्षणाच्या माध्यमाने शोधणारी नायिका येथे आपल्याला दिसते. विशेष म्हणजे ती कौशल्याने जाचातून मुक्त होते. ही कादंबरी म्हणजे तिच्या मुक्तीची गाथा आणि जाहीरनामा आहे. मुक्तीचे प्रतिनिधित्व रूप म्हणजे ही नायिका होय. संबंध कादंबरी ताण, संघर्ष मानसिक नाट्य यांच्या सुरेख उभारणी आहे. तिमिरी एन. मुरारी यांनी हि कादंबरी लिहून जगातील स्त्री वर्गाला जागृत केले आहे. हे विशेष होय. प्रतिवर्षी धर्म माणसाला किती निःसत्व करतो याचेच हे लक्षण म्हणता येईल. विशेष म्हणजे अमृता दुर्वे यांनी केलेला अनुवाद अस्सल मराठी भाषेचे सौष्ठव घेऊन आला आहे. कुठेही वाचन अडखळत नाही. एवढी ओघवती मराठी शैली अमृता दुर्वेची आहे. एक वेगळे अफाट अनुवादविश्व समजून घेण्यासाठी रसिक वाचकांनी ही कादंबरी आवर्जून लक्षात घ्यावी. अशीच महत्वाची आहे. ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    रुखसना एक तरुण पत्रकार मुलगी. नजीबुल्ला सरकारच्या काळात ती काबुल न्यूजमध्ये पत्रकारिता करत होती.पण अचानक तालिबान सरकार आले आणि सगळी परिस्थिती पालटली. अध्यक्ष नजीबुल्ला आणि त्याच्या साथीदारांना भर रस्त्यात फाशी दिले गेले .मनात येईल तेव्हा तालिबानी धर्विरोधी चुका शोधून डोक्यात गोळ्या घालू लागले .मग रुखसना टोपणनावाने हिंदुस्थान टाईम्ससाठी लिहू लागली . तिच्या घरी आजारी आई आणि लहान भाऊ आहे . तरीही ती धोका पत्करून काबुलमधील तालिबान विरोधी बातम्या जगभरात पोचवू लागली . सरकारचा तिच्यावर संशय आहे . पण अजूनही तिच्यावरचा संशय सिद्ध झाला नाही . अचानक तिला एक दिवस मंत्रालयात बोलावणे येते .तालिबान अफगाणिस्तान आणि स्वतःची प्रतिमा जगभरात उंच करण्यासाठी क्रिकेटचे सामने भरविण्याचे ठरविते. जी टीम जिंकेल तिला पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल असे घोषित करते. क्रिकेट हा खेळ अफगाणिस्थानात कोणालाच माहीत नसतो. तर रुखसना दिल्लीत शिकत असताना विद्यापीठाकडून काही सामने खेळलेली असते .तालिबान खऱ्या नियमानुसार आणि खिळाडूंवृत्तीने हा खेळ खेळणार नाही याची खात्री सर्वानाच आहे . टीम तयार करायची मुभा सर्वानाच आहे आणि त्यामार्गे पाकिस्तानात जाण्याची संधी ही .पण रुखसना स्त्री आहे आणि तिथे स्त्रियांना एकट्याने फिरायची ही बंदी आहे . तरीही कुठेतरी आशेचा एक किरण आहे . ती संधी रुखसनाला गमवायची नाही . आता काय करेल ती ......????? लेखकाने तालिबान राजवटीचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केले आहे . किड्या मुंग्यांना मारावे तसे माणसांना मारणारे तालिबानी. स्त्रियांची घुसमट ,गरिबी,अध्यक्षांना भर चौकात दिलेली फाशी यांचे वर्णन भयानक आहे . ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - APRIL 2018

    अफगाणींच्या नजरेतून तालिबान!... आज इस्लामिक स्टेट किंवा आयसिसबद्दल जे लिहिले बोलले जात आहे तेच काही वर्षांपूर्वी तालिबानबद्दल होत होते. वास्तविक तालिब म्हणजे धार्मिक शिक्षण घेणारा विद्यार्थी. तालिबचे अनेकवचन तालिबान. पण गणित इतके साधेसोपे राहिले नाह. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील सत्तासंघर्ष, त्यात अमेरिका, रशियासारख्या महासत्तांचा हस्तक्षेप, या संघर्षाला लाभलेली कट्टर धार्मिक किनार यातून ते प्रकरण अधिकच चिघळत गेले. आज तालिबान म्हटले की अनेकांना आठवते ती एक क्रूर, जुलुमी राजवट. तिने अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील जनजीवन तर बदलून टाकलेच. पण ९/११ च्या अमेरिकेतील अफगाणिस्तानात चालवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमुळे त्याला जागतिक परिणामही प्राप्त झाले. अखेर तालिबानचा भर थेडा ओसरू लागला आणि त्यांच्याशी संबंधित साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. त्यातून नेहमीच्या वार्तांकनाच्या पलिकडील अफगाणिस्तान आणि तेथील लोकजीवन बाहेरील जगाला कळू लागले. अशा पुस्तकांच्या बहुतांशी इंग्रजी आवृत्ती प्रथम बाजारात येऊ लागल्या. आता त्यातील बरेचसे साहित्य मराठीतही अनुवादित होत आहे. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ आणि ‘माझे तालिबानी दिवस’ ही दोन पुस्तके वाचनीय आहेत. आणि ‘माझे तालिबानी दिवस’ हे पुस्तक ‘माय लाइफ विथ द तालिबान’ या इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. मूळ पुस्तक अलेक्स स्ट्रिक्स व्हान लिन्शोटेन आणि फेलिक्स क्यून यांनी लिहिले आहे. त्यात अब्दुल सलाम झैफ या माजी तालिबानीची हकिकत आहे. तर ‘द तालिबानी क्रिकेट क्लब’ या पुस्तकाचे मूळ लेखक तिमिरी मुरारी. त्याचा अनुवाद केला आहे अमृता दुर्वे यांनी आणि पुस्तकाचे मूळ नाव तसेच ठेवले आहे. यामध्ये रुख्साना नावाच्या अफगाण मुलीची कथा आहे. कथेला पार्श्वभूमी आहे ती तालिबानने प्रतिमावर्धनासाठी भरवलेल्या क्रिकेट सामन्यांची. या दोन्ही पुस्तकांना एकाच विषयाची पार्श्वभूमी असली तरी त्यातून तालिबान आणि अफगाण जीवनाचे वेगवेगळे कंगोरे वाचकांसमोर येतात. डॉ. प्रमोद जोगळेकर तसेच अमृता दुर्वे या दोघांनीही या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद चांगला केला आहे. त्यामुळे ओघवत्या भाषेतील ही पुस्तके वाचनीय झाली आहेत. सोव्हिएत रशियाने १९७९ साली अफगाणिस्तानामधील साम्यवादी सरकारला पाठिंबा देण्याच्या मिषाने तेथे अतिक्रमण केले आणि पुढील दशकभर तेथे तळ ठोकला. सोव्हिएत आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी स्थानिक मुजाहिद्दीन लढवय्ये हाती शस्त्र घेऊन उभे ठाकले. त्यांना अमेरिकेने भरपूर मदत केली. अमेरिकेच्या सीआयए या हेरसंस्थेकडून पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इटेलिजन्स (आयएसआय) या संस्थेच्या माध्यमातून मुजाहिद्दींनांना पैसा आणि शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाला. त्यात पाकिस्ताननेही हात धुवून घेतला. अफगाण-पाकिस्तान सीमेवर असलेल्या निर्वासित छावण्या, मदरसे यातून मुजाहिद्दीनांची भरती होऊन त्यांना तेथील तळांवर प्रशिक्षण दिले गेले. अ‍ेखर १९८९ साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली. त्यानंतर तेथे अनेक वर्षे सत्तासंघर्ष सुरू होता. देशाचे विविध भाग वेगवेगळ्या गटांच्या प्रभावाखाली होते. त्याच दरम्यान पाकिस्तानाच्या मदतीने तालिबान प्रबळ बनत गेले. १९९६ साली तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भूभागावर सत्ता स्थापन केली. त्यानंतर २००१ सालापर्यंत तेथे तालिबानची सत्ता होती. या काळात तालिबानने तेथे शरियतवर आधारित कट्टर इस्लामी राजवट स्थापित केली. त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप पावला. पुरुषांना दाढी राखणे, पाच वेळा नमाझ अदा करणे, सक्तीचे झाले. फुटबॉल सामने, सिनेमा यावर बंदी आली. स्त्रियांचे जिणे तर आणखीच हालाखीचे बनले. बुरख्याच्या आणि बंद दारांच्या आड त्यांचे जीवन होरपळले जाऊ लागले. या नियमांचा थोडा जरी भंग झाला तरी भर मैदानात डोक्यात गोळ्या घालून मरण ठरलेले. २००१ साली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला झाला आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. त्यानंतर तालिबानचे दिवस फिरले. पण त्या संघर्षात संपूर्ण देशाच्या पायाभूत व्यवस्थांचे, जनजीवनाचे धिंडवडे निघाले. आजही तेथील जनतेचे वर्तमान होरपळत आहे आणि भविष्य झाकोळले आहे. बाहेरील जगासाठी अफगाणिस्तान-पाकिस्तान हा प्रदेश म्हणजे दहशतवादाचा मूलस्रोत आहे. पण तेथील स्थानिकांच्या दृष्टीतून तो प्रदेश कसा आहे, याचे थोडे फार दर्शन ‘माझे तालिबानी दिवस’ या पुस्तकातून घडते. अब्दुल सलाम झैफ हा तालिबानचा पाकिस्तानमधील वकील होता. दक्षिण अफगाणिस्तानमध्ये १९६८ साली त्याचा जन्म झाला. सोव्हिएत रशियाविरुद्धच्या लढ्यात तो मुजाहिद्दीन म्हणून लढला. थालिबान राजवटीत त्याने विविध पदांवर प्रशासकीय काम केले. ११ सप्टेंबर २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर त्याला पकडून ग्वांटानामो तुरूंगात ठेवण्यात आले. २००५ साली सुटका झाल्यापासून तो सार्वजनिक जीवनात सक्रिय असून अमेरिकेच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या हमीद करझाई सरकारवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो सध्या काबुलमध्ये राहतो. त्याच्या मते परदेशी फौजा त्यांच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानमध्ये घुसल्या. त्यांनी तेथील लोकांवर बॉम्बहल्ले केले. त्यात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले. आमच्या देशाचा विनाश केला. त्याविरुद्ध शस्त्र उचलल्यावर आम्हीच गुन्हेगार ठरलो. आता पुन्हा आमच्या मरणयातना सुरू आहेत. अमेरिका आणि युरोपच्या नागरिकांना जगण्याचा जितका अधिकार आहे तितकाच तो येथील नागरिकांनाही आहे. आमच्या नागरिकांनाही त्यांचे धार्मिक आणि अन्य प्रकारचे स्वातंत्र्य प्रिय आहे. आमची संस्कृतीही महत्त्वाची आहे आणि ती टिकली पाहिजे, हे सांगण्याच्या भावनेतून त्याने लिखाण केले आहे. त्यातून तालिबानच्या दुष्कृत्यांचे परिमार्जन होत नसले तरी संघर्षाची दुसरी बाजूही वाचकांसमोर येते. झैफचे त्याच्या भूमीवर नितांत प्रेम आहे. तेथील संस्कृतीचा परकीयांकडून झालेला नाश त्याला पाहावत नाही. त्यांचे हाल त्याला अस्वस्थ करतात. संघर्षग्रस्त नागरिक शेजारील पाकिस्तानमधील निर्वासितांच्या छावण्यात आश्रय घेतात. आंतरराष्ट्रीय राजकारण्याच्या वेढ्यात अडकून आणि जिहादच्या कल्पनांना भुलून सशस्त्र लढ्याचे प्रशिक्षण घेतात. त्यानंतर केलेल्या कारवाया, सोव्हिएत संघाचे परतणे, त्यानंतरची सत्तापोकळी, त्यातील गटागटांचे संघर्ष, मग तालिबानची सरशी, त्यावेळचे बदललेले जीवन, राजकारणात भूमिका बजावण्याची मिळालेली संधी आदी बाबींचे वर्णन झैफ करतो. तसेच २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर अमेरिका चवताळून परत हल्ला करणार हेही त्याच्या नजरेतून सुटत नाही. पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जशी अमेरिका चवताळून उठली आणि हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले, तसेच हल्ले अफगाणिस्तानावर होतील हे तो साथीदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो, आदी वर्णन वाचनीय आहे. मात्र झैफची बाजू वाचकांना पूर्णपणे पटेलच असे नाही. त्याचे कथन बरेच सरळ असले तरी त्याने काही गोष्टी चतुराईने लपवलेल्या आहे आणि काही कृतींचे समर्थन करण्यासाठी इस्लामचा आधार घेतला आहे. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्याच्या घटनेबाबत तो काहीच बोलत नाही. धर्माच्या बाबतीत तालिबानी इतके कट्टर का वागतात हे कदाचित या पुस्तकातून समजू शकेल. बामियानाच्या बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचे त्यांना काहीच वाटत नाही किंवा त्यात चूक आहे वाटत नाही, कारण आपला धर्म आणि त्याचा ग्रंथ याशिवाय वेगळं मत किंवा त्याच्यापलीकडे सत्य असूच शकत नाही, अशी त्यांची कडवी भूमिका आहे. याचा संघर्षाचा आणखी एक कंगोरा ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ या पुस्तकातून पुढे येतो. रुख्साना ही अफगाण तरुणी काबूल डेली नावाच्या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत असते. घरी आजारी म्हातारी आई आणि धाकटा भाऊ जहानची जिवापाड काळजी घेत असते. पण तालिबानच्या राजवटीत रुख्सानाचं आयुष्य एका वेगळ्याच वादळात सापडतं. त्याच वेळी अफगाणिस्तानची आणि तालिबानची प्रतिमा जगात चांगली करण्यासाठी तालिबानी क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा करतात. जिंकणारा संघ पाकिस्तानामध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आणि अफगाणिस्तानाचं जगभरात प्रतिनिधित्व करणार असतो. थालिबान हा खेळ खऱ्या नियमांनुसार, सचोटीने कधीच होऊ देणार नाही याची रुख्सानाला खात्री आहे. टीम तयार करण्याची सर्वांना मुभा आहे. पण अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव कोणलाच नाही. याला अपवाद म्हणजे रुख्साना. ती दिल्लीत असताना क्रिकेट खेळली आहे. यातून जे नाट्य आणि ताणतणाव निर्माण होतात त्यांचे दर्शन या पुस्तकात होतेच पण त्या अनुषंगाने अफगाण जीवनाची दाहकताही समोर येते. रुख्सानाला तिच्या भावाला व इतरांना क्रिकेट शिकवायचे असते. पण तालिबानी राजवटीत मुलींनी बुरखा काढणे किंवा घराबाहेर पडणेही मुश्कील. तेव्हा हे जमवण्याची कसरत तिला करावी लागते. त्यासाठी वेश बदलणे, पुरुषांप्रमाणे वागणे, प्रसंगी खोटी दाढी लावणे अशा क्ऌप्त्या लढवाव्या लागतात. या सगळ्या प्रयत्नांतून या पात्राने उभ्या केलेल्या अडचणी ओलांडतना तिचा जीव मेटाकुटीला येतो. त्यातच तिच्या दिल्लीतील वास्तव्यात जुळलेल्या प्रेमसंबंधांच्या कथानकाचीही जोड आहे. क्रिकेट हा त्यांच्यासाठी केवळ एक खेळ उरत नाही. थर या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्याठी, स्वातंत्र्याची अनुभूती देणारा मार्ग ठरतो. पण तोही किती आश्वासक ठरतो हे मुळातच वाचले पाहिजे. तिमिरी मुरारी हे मूळचे भारतीय, पण गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पत्रकारितेत वावरत आहेत. त्यांच्या अनुभवातून मूळ पुस्तक साकारले आहे. त्याचे तितकेच प्रवाही आणि परिणामकारक सार अनुवादात उतरले आहे. ‘माझे तालिबानी दिवस’ ही तसेच उद्बोधक आहे. ही दोन्ही पुस्तके अफगाणिस्तान विषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त आहेत. या दोन्ही पुस्तकांना जशी ऐतिहासिक आणि जागतिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे, तसाच मोठा भौगोलिक कॅन्व्हासही लाभला आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान या प्रदेशातील घडामोडींपासून भारत आपल्याला अलग ठेवू शकत नाही. एके काळी अफगाणिस्तानशी भारताचे खूप सौहार्दपूर्ण संबंध होते. ते आताही तसे असले तरी तेथील परिस्थिती बदलली आहे. रशिया आणि अमेरिकेच्या माघारीनंतर आता पाकिस्तान तेथे आपले हात-पाय पसरत आहे. अफगाणिस्तानमधील भारतीय हितसंबंधांना बाधा निर्माण करत आहे. तसेच तेथील दहशतवाद भारतात पसरत आहे. अफगाणिस्तानात नेमके काय चालते हे कुतूहल वाढते आहे. अशा स्थितीत या पुस्तकांचे भारताच्या दृष्टीने महत्त्व आणखी वाढते. -सचिन दिवाण ...Read more

  • Rating StarNews Paper review

    एका मुस्लिम पत्रकार तरुणीच्या धाडसाची कहाणी... मुस्लिम देशांमध्ये स्त्रियांवर असणारे जाचक निर्बंध आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी एखाद्या स्त्रीने दिलेला निकराचा लढा, अशा स्वरूपाची काही पुस्तके लिहिली गेली. ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ हे काहीसं अशाचस्वरूपाचं पुस्तक आहे; पण ते थोडं वेगळं ठरतं ते त्याला लाभलेल्या क्रिकेटच्या पार्श्वभूमीमुळे. या कादंबरीचे मूळ लेखक आहेत तिमिरी एन. मुरारी आणि अनुवाद केला आहे अमृता दुर्वे यांनी. ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. ती काबूलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण ‘स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर,’ असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी. नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत रुख्साना लपूनछपून भारतीय वर्तमानपत्रासाठी बातम्या पाठवते. या सगळ्यात एक दिवस तिला बोलावणं येतं ते सरकारच्या ‘प्रपोगेशन ऑफ व्हच्र्यू अँड द प्रीव्हेन्शन ऑफ व्हाइस’मंत्रालयाकडून. हे खातं सगळ्यांवर लक्ष ठेवतं की लोकं धर्माचं आणि तालिबानच्या आदेशांचं नीट पालन करतात का यावर. घाबरलेली रुख्साना तिथे जाते. तिथे तिला तालिबानच्या क्रौर्याचं दर्शन घडतंच; पण सोबतच तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भरवण्याची. अर्थातच फक्त पुरुषांसाठी. टीम तयार करण्याची मुभा सर्वांना आहे. यात जिंकणारी टीम पुढच्या कोचिंगसाठी पाकिस्तानात जाणार आणि जगभरात अफगाणिस्तानाचं नेतृत्व करणार. रुख्सानाचे लग्न ठरलेय सध्या अमेरिकत असलेल्या शाहीनशी. शाहीन आपल्यासाठी पैसे पाठवेल आणि आपण इथून निघून जाऊ या आशेवर ती आहे. रुख्सानाने दिल्लीत राहून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेय. आणि त्या वेळी ती टीमसाठी क्रिकेट खेळलेली आहे. आता ती जबाबदारी घेते आपल्या भावंडांना क्रिकेट शिकवण्याची; पण बुरखा घालून क्रिकेट कसे खेळणार, आणि एक स्त्री मुलांना क्रिकेट खेळायला शिकवतेय, हे तालिबानला कसे चालणार; पण तिच्या भावंडांकडे तिच्याशिवाय दुसरा कोणीही क्रिकेट कोच नाही. एकीकडे रुख्साना घराच्या अंगणातच भावांना क्रिकेट खेळायला शिकवतेय. आईची तब्येत खालावत चालली आहे. झोराक वाहिदी त्याच्या भावासाठी रुख्सानाला मागणी घालतो. शाहीन परस्पर अमेरिकेत लग्न करतो. रुख्साना मुलाचा वेष धारण करून बाबर या नावाने वावरत असते. तिच्या आईचं निधन होतं आणि ती दिल्लीतील तिच्या मित्राला वीरला बोलावून घेते. रुख्साना क्रिकेट टीम तयार करू शकते का आणि त्या टीमसह ती अफगाणिस्तानातून बाहेर पडू शकते का, याचं उत्तर पुस्तक वाचल्यावरच मिळू शकतं. स्त्रीला जिथे हीन लेखलं जातं, अशा ठिकाणी रुख्सानाने क्रिकेट टीमचा कोच होणं, कौतुकास्पद वाटतं; तसेच घरातील पुरुषांची (भावांची) साथ तिला मिळाली आहे, तिचा मित्रही तिच्या मदतीला तयार आहे, हे सकारात्मक चित्र या पुस्तकातून दिसतं. धाडस दाखवलं तर टोकाच्या विपरीत परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो, असा संदेशही या पुस्तकातून मिळतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more