* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CLIENT
  • Availability : Available
  • Translators : MADHAV KARVE
  • ISBN : 9788177663624
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MARK SWAY, AN ELEVEN YEARS OLD CHILD, NAUGHTY BUT VERY INTELLIGENT, ACCIDENTLY GETS INVOLVED IN A SERIES OF BAD HAPPENINGS. HE WITNESSES A SUICIDE WHICH FURTHER LEADS INTO A SERIES OF CALAMITIES. THERE ARE MANY SECRETS BEHIND THIS SUICIDE. FBI IS TRYING TO GET TO THE ROOT OF IT, FOR THEM MARK IS THE ACE; FBI IS BEHIND MARK, WANTING HIM TO SOLVE THE MYSTERY FOR THEM. THIS SUICIDE SHATTERS THE UNDERWORLD TOO. THE CRIMINALS ARE ALSO BEHIND MARK WHEN HE MEETS AN ADVOCATE; REGGIE LOVE. TOGETHER, MARK AND REGGIE START SHAKING THE VERY FOUNDATION OF THE LEGAL SYSTEM, REVEALING THE HIDEOUS SECRETS OF THE UNDERWORLD; ONE BY ONE. THEY INTERCEPT THE VERY CORE OF AMERICAN SOCIETY, BRINGING FORTH THE TIE UPS BETWEEN THE LAW AND ORDER AND THE UNDERWORLD, SHATTERING THE COMMON MINDS.
मार्क स्वे... एक अकरा वर्षांचा, काहीसा उनाड पण हुषार पोरगा अचानक एका दुष्टचक्रात गुरफटला जातो. त्याच्या डोळ्यासमोर एक आत्महत्या घडते आणि संकटांची मालिका सुरु होते. ह्या आत्महत्येमागे बरीच रहस्यं दडलेली असतात.. ‘एफबीआय’ ह्या रहस्याचे धागेदोरे जुळवू पहात असल्यामुळे मार्क त्यांचं हुकुमाचं पान ठरतं.... मार्कनं ही रहस्यं उघड करावीत म्हणून ‘एफबीआय’ची यंत्रणा हलत राहते... दुसरीकडे ह्या आत्महत्येमुळे गुन्हेगारी वर्तुळही धोक्यात येतं.... गुन्हेगारांच्या काळ्या सावल्या मार्कचा पाठलाग करत राहतात. ह्या जीवघेण्या पाठलागात मार्कला भेटते एक वकील... रेगी लव्ह... मार्क आणि रेगी आता न्याययंत्रणा हलवू लागतात आणि गुन्हेगारी जगताचा रहस्यभेद होऊ लागतो... अमेरिकन समाजाचा छेद घेत राजकारण आणि गुन्हेगारी जगतामधल्या दुव्यांना हात घालणारी मार्क स्वेची ही लढत खिळवून ठेवते.... अंंतर्मुख करते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA

    न्यायसंस्था अन् गुन्हेगारीला वेगवान हुलकावणी... असं म्हणतात की एखाद्या राष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण जाणून घ्यायची असेल तर तिथलं साहित्य वाचावं. सध्याच्या जागतिकीकरणाच्या लाटेत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे जग जवळ येत असताना सामान्यंसाठी जगाच्या खिडक्या उघडणं अत्यावश्यकच आहे. अनुवादित साहित्याचं महत्त्व त्यामुळेच अलीकडच्या काळात वाढलेलं आहे. अर्थात प्रत्येक भाषेचं जरी स्वत:चं असं वेगळं सांस्कृतिक जग असलं तरी मृत्यूचं भय, दु:खांची जाणीव आणि परिस्थितीमुळे होणारी मनाची घालमेल या मानवी भावना सारख्या असतात. फक्त प्रतिक्रिया मात्र वेगळ्या पद्धतीने उमटत असतात. जॉन ग्रिशॅम यांच्या ‘क्लायंट’ या कादंबरीनेदेखील हीच गोष्ट अधोरेखित केली आहे. सदर कादंबरी अमेरिकन न्यायप्रणालीवर प्रकाश टाकतेच, परंतु त्याचबरोबर माणसांच्या संवेदनाही व्यक्त करते. जॉन ग्रिशॅम यांचा अमेरिकन न्यायसंस्थेच्या कार्यपद्धतीचा अतिशय चांगला अभ्यास आहे. अमेरिकेतील वकिलाचं विश्व हा त्यांच्या कादंबऱ्यांचा विषय असतो. ‘द फर्म’, ‘टाइम टू कील’ या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यांच्या कादंबऱ्यांतील नावीन्यपूर्ण कथानक वाचकाला खिळवून ठेवते. त्याचप्रमाणे एखाद्या गुन्हेगारी कथानकात किती विविधता असू शकते, याचीही जाण वाचकाला होते. ‘द क्लायंट’ कादंबरीत एक अकरा वर्षांचा मुलगा केंद्रस्थानी आहे. या मुलाचं नाव आहे मार्क. तो त्याचा लहान भाऊ रिकी आणि त्यांची परित्यक्ता आई यांचं एक छोटंसं विश्व आहे. त्याचे वडील सगळा वेळ पिण्यात आणि शिवीगाळ करण्यात घालवायचे. आता त्यांची ब्याद नसल्याने मार्कने सुटकेचा श्वास सोडला आहे. गेली ५ वर्षे तो रिकीचा सांभाळ करतो आहे आणि त्यामुळे त्याला पोक्तपणा प्राप्त झाला आहे. परिस्थितीने आलेला हा पोक्तपणा आणि त्याचं ‘मूल’ पण यांचं अनोखं मिश्रण संपूर्ण कादंबरीत जाणवत राहातं. एके दिवशी मार्क त्याच्या भावाबरोबर घरामागच्या जंगलात रमतगमत जात असताना एक चमत्कारिक घटना बघतो. एक वकील त्याच्यासमोर आत्महत्या करतो. आत्महत्येपूर्वी त्याचा आणि मार्कचा संवाद होतो. मृत्यू.. भीती आणि क्रूरतेचं एक वेगळं जग त्याच्यासमोर अस्पष्टपणे उलगडत राहतं. चक्रावून टाकणारं ते माणसाचं अनोखं जग त्याच्या बालमनाला झेपतंय का? बरं, बोलण्याच्या ओघात त्या वकिलाने गुन्हेगारी जगतातली काही रहस्ये उघड केलेली आहेत. त्यांचं काय? मार्कच्या पोटात गोळा उठतो. पाय बधिर होतात. त्याच्यासमोर असतो मरणापूर्वी रहस्य सांगून गेलेला एक मृत माणूस. त्याने सांगितलेलं सगळं खरं का? ...आता भविष्यात काय?... मार्कने टीव्हीवर अनेक कार्यक्रम पाहिलेले होते. त्यामुळे त्याला पोलिसांचा ९११ हा नंबर माहीत होता. तो पोलिसांना आपल्या घरामागील जंगलात एक मृतदेह पाहिल्याचं फोन करून सांगतो. मार्क ठरवतो, बस्स एवढंच सांगायचं. बाकी कोणाला काही सांगायचं नाही. पण इतकं सोपं असतं का सगळं?... पोलिसांचा ससेमिरा सुरू होतो... गुन्हेगारी जगतही कार्यरत होतं. प्रकरण गंभीर असतं. या प्रकरणाचा संबंध एका सिनेटरच्या खुनाशी असतो. न्यायसंस्थेची दृष्टीने तो एक महत्त्वाचा साक्षीदार असतो. एक दुष्टचक्र सुरू होतं. अशातच घडलेल्या घटनेचा त्याच्या लहान भावाला मानसिक धक्का बसतो. रिकीला हॉस्पिटलमध्ये ठेवतात. त्याच्या आईचं सगळं लक्ष धाकट्या मुलांवर केंद्रित होतं. आता मार्ग काढायचा कसा? ...उत्कंठावर्धक घटनांची मालिका सुरू होते आणि रेगी लव्ह या स्त्री वकिलाच्या समोर हा छोटा क्लायंट येऊन पोहोचतो. इवल्याशा मुठीत ‘एक डॉलर’ ही तिची फी देऊन आपली कैफियत तिच्यासमोर मांडतो आणि सुरू होतं एक विलक्षण नाट्य. एक जीवघेणा पाठलाग. न्यायसंस्थेला आणि गुन्हेगारी वर्तुळात दोघांना दिलेली हुलकावणी अतिशय वाचनीय झालेली आहे. कथानकातील विविध घटना तेथील गुन्हेगारी वर्तुळाबरोबरच सामाजिक प्रश्नांवरही प्रकाश टाकतात. उदाहरणार्थ मार्कच्या आईची नोकरी जाते तो प्रसंग. त्या छोट्याशा उपकथानकाने कथेला वेगळे परिमाण दिलेले आहे. वस्तुत: कोणत्याही देशात पदोपदी घडणारा हा प्रसंग. परंतु रेगीची तो प्रसंग हाताळण्याची पद्धत किती परिणामकारक! एकूणच सत आणि असत यांचा हा संघर्ष चितारताना जॉन ग्रिशॅम माणसांच्या संवेदनांकडेही सूक्ष्म नजर ठेवतात. कादंबरीतील प्रत्येक व्यक्तिरेखा सुस्पष्ट आहे. अगदी मार्कची सुरुवातीला चौकशी करणारा हार्डी नावाचा पोलीसही त्याला अपवाद नाही. असो माधव कर्वे यांनी उत्तमरित्या केलेल्या या अनुवादाचे मुखपृष्ठही कल्पक आहे. -डी. व्ही. कुळकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 28-09-2003

    रोमहर्षक आणि थरारक… अमेरिकेमधील एका सिनेटरचा माफियाकडून खून होतो. या माफियाचा वकील या प्रकरणातील एक महत्त्वाचे गुपित कळल्यावर प्रचंड अस्वस्थ होतो. जगणे त्याला असह्य होते आणि तो आत्महत्त्या करतो. त्याची ही आत्महत्या दोघे शाळकरी भाऊ प्रत्यक्ष बघतात- ए ११ वर्षांचा, तर दुसरा आठ वर्षांचा. धाकटा भाऊ मोठा मानसिक धक्का बसून मनोरुग्ण होतो. मोठा मात्र हे सगळे प्रकरण अतिशय कौशल्याने हाताळत शेवटास नेतो अवघ्या आठ-दहा दिवसांत घडणाऱ्या या घडामोडी जॅन ग्रिशॅम यांनी रोमहर्षक रीतीने शब्दबद्ध केल्या आहेत. न्याययंत्रणा, गुन्हेगारी वर्तुळ आणि राजकारण यांचे धागेदोरे गुंतलेल्या या कथानकात समाजाच्या विविध स्तरांतील व्यक्तिरेखांची त्यांनी केलेली हाताळणी थक्क करून सोडणारी आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा माधव कर्वे यांनी केलेला अनुवाद तितकाच सुरेख झाला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more