* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAMSANSKRUTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619764
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 212
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING THE 50 YEARS AFTER INDEPENDENCE, THE RURAL LIFE AND CULTURE HAS UNDERGONE A TOTAL CHANGE. THIS CHANGE ALMOST DESTROYED THE VILLAGES PRIOR TO INDEPENDENCE. A FEW TRACES OF THESE PREINDEPENDENT PERIOD VILLAGES ARE NOW SEEN IN THE REMOTEST ‘ADIVASI` PART OF THE HILLY REGIONS OF MAHARASHTRA. ANAND YADAV HAS TRIED TO PICTURIZE THE SOCIAL, FINANCIAL, EDUCATIONAL, PHYSICAL, CULTURAL SIDE OF THESE CHANGED VILLAGES IN THIS BOOK. HE HIMSELF HAS WITNESSED THE TRANSFORMATION INTO THIS NEW ERA. THE READERS REALIZE THIS AS THROUGHOUT THE BOOK YADAV`S EXPERIENCES COME TO MEET US. THIS CAN BE THE FIRST MARATHI BOOK TO GUIDE THE MARATHI PHILOSOPHERS, REFORMERS, LITTERATEURS, PROFESSORS, ACTIVISTS, AND THE YOUNG GENERATION. IT WILL IGNITE ALL THE MINDS; YOUNG OR OLD.
स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षांत ग्रामजीवन आणि ग्रामसंस्कृती यांच्यात मूलगामी स्थित्यंतरे झाली. त्यांतून स्वातंत्र्यपूर्वकाळातील खेडे जवळजवळ नष्ट झाले. त्याचे फार थोडे अवशेष महाराष्ट्राच्या पार आंतरिक भागात, डोंगरकपारींच्या आदिवासी मुलखात शिल्लक राहिले. महाराष्ट्राच्या या बदलत्या खेड्याचे एकूणच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्राकृतिक, सांस्कृतिक अंतरंग प्रस्तुत ग्रंथात उकलून दाखविण्याचा आनंद यादवांनी प्रयत्न केला आहे. आनंद यादव या नवयुगसदृश स्थित्यंतराचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे बदलते खेडे प्रत्यक्ष अनुभवल्याचा प्रत्यय या ग्रंथात पानोपानी येतो. मराठी विचारवंत, सुधारक, साहित्यिक, प्राध्यापक, कार्यकर्ते, संस्कृतिउपासक, चळवळकर्ती तरुण पिढी, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि जाणकार वाचक या सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरक ठरेल अशा योग्यतेचा हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे.
रा.ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार २००२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-06-2000

    ग्रामीण महाराष्ट्रातील परिवर्तनांचा मागोवा... १९६० पासून ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह मराठी साहित्यात जोर धरु लागला त्याचे आघाडीचे शिलेदार होते डॉ. आनंद यादव. ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शन त्यांनी आपल्या ‘गोतावळा’, ‘झोंबी’ आणि इतर कादंबऱ्यांतून तसेच थांतून घडवले. विशेष म्हणजे ग्रामीण साहित्याची संकल्पना मांडून, परंपरा दाखवून, समिक्षेसाठी उपयुक्त असे निकषही त्यांनी रुजवले, त्यांच्या ललित लेखनातून आणि समिक्षेतून त्यांची ग्रामजीवनाबद्दलची ओढ, ग्रामीण संस्कृतीत होणाऱ्या विघटनाबद्दलची खंत सातत्याने दिसते. ‘ग्रामसंस्कृती : दशा आणि दिशा’ या त्यांच्या लेख-संग्रहात आनंद यादव भारताचा कणाच असणाऱ्या एकेकाळच्या ‘ग्रामसंस्कृती’त होत गेलेली स्थित्यंतरे वाचकांसमोर मांडतात. मुळात हे लेख म्हणजे ‘दैनिक सकाळ’ च्या रविवार आवृत्तीत (१९९८ मध्ये) प्रसिद्ध झालेले सदर आहे. सर्वसामान्य वाचकवर्ग डोळ्यांसमोर असल्यानेच बहुधा सोप्या, सुटसुटीत भाषेत ग्रामीण संस्कृतीची निर्मिती कशी झाली येथपासून ते आज ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास का होतो आहे येथपर्यंतचा मागोवा यादवांनी घेतला आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांतील नाते स्पष्ट करीत संस्कृती हा मानवी मूळ स्वभावाचाच एक भाग कसा आहे हे आनंद यादव स्पष्ट करतात. संस्कृती चांगल्या कृतींची आणि गतिमान असते. स्वास्थ्य मिळाल्यावरच माणूस संस्कृती निर्माण करु शकतो हे पहिल्या लेखातून स्पष्ट होते. ‘अंतरंगातील एकता’ या लेखात भारतात ग्रामसंस्कृतीचा आत्मा आहे आणि भारतात शेती कधीच संपुष्टात येणार नाही हे ठसवलं गेलं आहे. याच लेखात, भारतात ऐक्य राखणाऱ्या हिंदू धर्माच्या लवचिकतेबद्दलही थोडे विवेचन येते. पूर्वापार हिंदूंनी मुसलमान व खिश्चनांना सोबत घेऊनच विकास केला आहे. ‘अंतरंगातील एकात्मता हाच भारतीय संस्कृतीचा गाभा आहे’ असे विधान यादवांनी केले आहे. भारतीय संस्कृतीत अंतरंगात एकात्मता असली तरी बहिरंगात विविधता कशी आहे त्याबद्दल लगेचच पुढल्या लेखात लेखकाने सांगितले आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागातील प्राकृतिक वैशिष्टये वेगळी असल्याने तेथील माणसांची घरे, शेतीतील उत्पादने, पोशाख, राहणी या सगळ्यांतच फरक पडला आहे. याखेरीज त्या-त्या गावाची म्हणून काही वैशिष्टये असतात. (उदा. कोल्हापूरच्या तालमी) आणि त्यामुळेही ते गाव सांस्कृतिकदृष्टया इतर गावांहून कसे वेगळे ठरते याचे सोदाहरण विवेचन आनंद यादवांनी केले आहे. शेतकऱ्याची निसर्गाबद्दलची जाण कशी असते, दिवसाचा कोणता प्रहर आहे हे त्याला कसे चटकन समजते, नुसत्या आवाजावरुन तो पक्षी कसा ओळखतो हे सांगत शेतकरी ‘निसर्गाचं लेकरुच’ असतो, असे यादव सांगतात. सुशिक्षितांपेक्षा शेतकऱ्यांची भाषाही कशी वेगळी असते याचेही नमुने त्यांना दिले आहेत. कष्टाचं, साधं पण सुखी-समाधानी आयुष्य जगणाऱ्या शेतकऱ्याचं एक आदर्श चित्रच यादवांनी वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ‘ग्रामसंस्कृती’ या पुस्तकाचं स्वरुप बरंचसं माहितीवजा आहे. क्वचित लेखकाने स्वत:चे व्यक्तिगत अनुभव सांगितले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा एकूण दिनक्रम कसा असतो, मोट जुंपून शेताला पाणी कसे दिले जाते, भांगलण-खुरपण सतत कशी करावी लागते, त्यासाठी कोणती साधने वापरतात याबद्दल बारकाईने माहिती आणि निरीक्षणे लेखकाने नोंदवली आहेत. प्रतिभावंत कवी ‘पावसाची गाणी’ लिहितात पण त्यांना पावसाने शेतकऱ्याची केलेली दैना दिसत नाही. तसेच ग्रामीण साहित्य लिहिणारे प्रारंभीचे लेखक इनामदार, पाटील, कुलकर्णी यांच्याच घरांची चित्रणे कशी करीत याबद्दलही यादव उपरोधाने लिहितात. गावाची जीवनसरणी कशी असते, विशेषत: बलुतेदारी पद्धत कशी चालत होता, गावात पूर्वापार सहकाराने कामे कशी चालत, लग्नसोहळे गावकऱ्यांच्या मदतीनेच कसे पार पडत, जत्रेच्या दिवसात गावातला उत्साह कसा असे, सणांचा फराळ बायका एकत्र येऊन कसा करीत याबद्दल लेखक सांगतो. एकंदर, पूर्वीचा गाव व्यक्तिवादी संस्कृती मानत नव्हता, तरीही गावातच व्यक्तीचा, कुटुंबाचा आणि गावाचाही सर्वांगीण विकास कसा होत असे, याबद्दलची रोचक माहिती यादवांनी दिली आहे. पूर्वी ग्रामसंस्कृतीवर निसर्गाचे निरंकुश नियंत्रण कसे असे याबद्दलही यादव सांगतात. शेती करण्यापूर्वी शेतकरी पाच मावल्यांची पूजा करी, शेतावर कीड, टोळधाडी कशा येत, उंदीर कसे नुकसान करीत, शेतकऱ्याची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष चलनाखेरीजच कशी चाले, पैसे घेऊन धान्य विकणे शेतकऱ्याला कमीपणाचे कसे वाटे, लोकसंख्येवर कोणाचेच नियंत्रण कसे नसे, रोगराईत माणसे कशी मरत, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती या पुस्तकात आहे. शेतकऱ्याचं काम हे निर्मितीचं आणि सृजनाचं कसं असतं हे काम किती हळुवारपणे, दक्षतेनं करावं लागतं या संदर्भातला एक लेख सदर पुस्तकात आहे. विहिरींचेही वेगवेगळे प्रकार कसे असतात याबद्दलची माहिती जिज्ञासूंना मजेशीर वाटेल. ‘मातीत उगवणारी मुलं’ या लेखात यादव ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृतीची तुलना करताना दिसतात. गावातील मुलं ‘मातीत पेरलेल्या बियाणासारखी’ सहज कशी वाढतात याबद्दल यादव सांगतात. शहरी व ग्रामीण घरांची तुलना एका लेखात येते. शहरातली घरं म्हणजे बंद ब्लॉक्स अगदी ‘छानदार घरकुलं’ असतात, परंतु शेतकऱ्याचं रानातलं घर कसं सामान-सुमानाने भरलेलं, उंदीर, घुशींनाही आसरा देणारं असतं याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र घरात लग्न ठरलं की मग मात्र गावातली घरं कशी रुप पालटतात तेही कळतं.’ गावातली अस्वास्थ्याचीही कारणमीमांसा आनंद यादवांनी केली आहे. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे गावातील शेतजमिनीवर खाणाऱ्या तोंडाचा भार अधिक पडू लागला, कुटुंबं मोडली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. गावातल्या अस्वास्थ्याचं हे पहिलं कारण होतं, चातुर्वण्र्य व्यवस्थेमुळे कनिष्ठ जाती, भरडल्या जाऊ लागल्या हे अस्वास्थ्याचं दुसरं कारण सांगितलं आहे. व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र नसल्याने, गावगाड्यात उपाशी राहणाऱ्या जमाती चोऱ्या करु लागल्या हेही गावातील अस्वस्थतेला कारण ठरलं, अज्ञान, अंधश्रद्धा, संशयीपणा, वैर यामुळेही गावाचं स्वास्थ्य नेहमीच बिघडताना दिसतं. या अस्वास्थ्यामुळे, असुरक्षिततेमुळेच गावकरी खूप श्रद्धाळू बनतात आणि अघोरी शक्तींवरही विश्वास ठेवताना दिसतात. ‘अवनतीचा काळ’ या लेखापासून पुढचे सुमारे वीस -- महाराष्ट्रातील ग्रामजीवन कसे विस्कळीत, विघटित आणि उध्वस्त होत गेले ते सांगणारे आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे गावांची स्वयंपूर्णता नष्ट झाली, वस्तुविनिमय पद्धत मागे पडून चलनाला महत्व आले. औद्योगिक क्रांतीचे परिणाम म्हणून आगगाडी, मोटारी आल्या आणि गाव हळूहळू बदलू लागला. गुजराती, मारवाडी व्यापारी महाराष्ट्रात येऊन लुबाडू लागले, इंग्रज तर कच्चा माल त्यांच्या देशात पाठवून गावांची लुबाडणूक करीतच होते. फायदे झाले ते एवढेच की गावात आरोग्यसोयी वाढल्या आणि शिक्षण दिले जाऊ लागले. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यासारख्या नव्या मूल्यांमुळे एकंदर भारताचे चित्रच बदलू लागले. भौतिकवाद, प्रवृत्तीवादाला महत्व आले. समाजसुधारणा चळवळी सुरू झाल्या. बहुजन समाजातूनही सुधारक मतांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. म. फुले यांनी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या दु:स्थितीकडे लक्ष वेधले. आनंद यादव तर त्यांना नव्या ग्रामसंस्कृतीचे आद्य प्रवर्तक म्हणतात. ते महाराष्ट्राचे मार्क्स होते असेही त्यांना वाटते. त्याखालोखाल शाहू राजांनी केलेल्या समाजसुधारणेच्या प्रयत्नांचाही ते गौरवाने उल्लेख करतात. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने शेतकऱ्यांना काम करता-करता शिकण्याची संधी दिली हेही महत्वाचे होते. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ ही घोषणा केल्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना ते कसे ‘आपले’ वाटले आणि त्यांचा काँग्रेसकडे ओढा कसा राहिला याबद्दलही यादव सांगतात. दुसऱ्या महायुद्धाची झळ भारतीय खेंड्यांना कशी लागली, रेशनिंग आले आणि शेतकरी मोठ्या संख्येने शहराकडे कसे धावू लागले हे सांगून ‘‘गांधीजी आणखी काही वर्षे राहिले असते तर ग्रामीण समाजात आणि संस्कृतीत मूलभूत परिवर्तने झपाट्याने घडली असती... आता ते स्वप्न फार दूर गेले आहे,’’ अशी खंत आनंद यादवांनी व्यक्त केली आहे. पंचवार्षिक योजना आल्या, पण त्याचे फायदे बडे शेतकरीच खाऊन गेले आणि सामान्य शेतकरी मात्र भुके, कंगाल झाले हे वास्तव पुढे मांडले आहे. ग्रामीण जनतेची पिळवणूक स्वातंत्र्योत्तर काळात गावागावांत सतावणारा अस्पृश्यतेचा प्रश्न धसाला लागला. डॉ. आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांमुळे अस्पृश्यांची स्थिती थोडीफार सुधारली पण आज लोकसंख्यावाढीमुळे सगळीकडेच बेकारी दिसते आहे. ‘कूळ कायदा’ ही आणखीन एक सकारात्मक गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळात आली, पण इथेही बड्या जमीनदारांनी स्वतःचा फायदा करून घेऊन गरीब शेतकऱ्यांना नागवले. ही वस्तुस्थिती सांगून ‘‘देशाच्या विकास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विभागात जाणारे एस.टी.चे धूळमार्ग किंवा रेल्वेचे रुळमार्ग खेड्यांच्या विकासासाठी न जाता प्रत्यक्षात शोषणासाठीच गेले,’’ अशी खंत आनंद यादव व्यक्त करतात. नव्या काळात शेतीसाठी नवी बियाणं, नवी खतं आली, पण त्याने उत्पादन वाढलं तरी चव गेली. मोट जाऊन आज विहिरींवर विजेचा पंप आला, पण त्याचा कारभार वीजपुरवठ्याच्या मर्यादेवर अवलंबून. तो बिघडला तर शेतकऱ्याला नवा खर्च. ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आली आणि बैलांचं महत्व कमी झालं, पण या सगळ्यामुळे नैसर्गिक जीवनचक्रापासून शेती दूर गेली आणि आत्मनिर्भर असलेला शेतकरी परावलंबी झाला. शहरात आहे ते आपल्याकडेही हवं या ईर्षेपोटी शेतकऱ्याचा आत्माच हरवला. मोटरसायकल, रेडिओ, टी.व्ही. इ. गोष्टींमुळे गावात वरवरची आधुनिकता आली. सहकाराच्या नावाखाली बड्या शेतकऱ्यांनी राजकीय सत्ता राखल्या आणि छोट्या शेतकऱ्यांना लुबाडून स्वत: गब्बर झाले. ही परिवर्तने ग्रामीण संस्कृतीला विघातक ठरली. जातीव्यवस्था हे ग्रामसंस्कृतीचे वैशिष्टय आणि आधुनिकतेतील अडचण. आज वरवर जाती विसरल्या गेल्या आहेत, पण त्या आहेतच ! फरक एवढाच की राजकारण आता जातीपेक्षा पैसा पणाला लावून खेळलं जातंय ! आज ग्रामीण कलांचा ऱ्हास होतो आहे, शिक्षणसंस्था राजकीय सत्ता टिकविण्याच्या नादात पैसे खेचण्याची केंद्रे बनल्या आहेत. ग्रामीण तरुणाला कुठेच काम मिळत नसल्याने तो गोंधळला आहे, नेतृत्व बहुजन समाजातलं असलं तरी भ्रष्टाचार, लाचलुचपतीने डागाळलेलं आहे. चळवळींमुळे थोडा आशावाद आहे. या साऱ्यांची कारणमीमांसा आनंद यादवांनी शेवटच्या काही प्रकरणांतून दिली आहे आणि यातूनही कसा मार्ग काढता येईल हे सांगणारे काही उपायही नोंदवले आहेत. ‘ग्रामसंस्कृती’ हा माहिती देणारा लेखसंग्रह असल्याने काही वैशिष्टयपूर्ण शब्द आनंद यादव वापरतात. त्यांचं स्पष्टीकरणही ते देतात. कित्येक ठिकाणी यादवांची भाषा लालित्यपूर्ण होते. उदा. ‘या वाटा किंवा रस्ते लेकुरवाळे वाटतात’, ‘पेहलवानांचे कळप हत्तीच्या कळपासारखे दिसत’, फताड्या शिंगांच्या म्हशींना ‘ओव्हरटेक’ करणं ट्रक ड्रायव्हरलाही महाकठीण!’ लेखांना दिलेली शीर्षकही बोलकी आहेत. उदा. ‘निसर्गाचं लेकरु’, ‘मोकळे राज्य’,‘मातीत उगवणारी मुलं’, दूर गेलेले स्वप्न’, ‘रस निघून गेलेला ऊस’, ‘नासलेल्या शिक्षणसंस्था’ इत्यादी. एकंदर, ग्रामीण समाजशास्त्राच्या आणि ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकाला उपयुक्त वाटणारा आणि जिज्ञासू वाचकाला नव्या - जुन्या ग्रामसंस्कृतीद्दल बरीच माहिती देणारा असा हा आनंद यादव यांचा हा लेखसंग्रह आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more