* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GATULA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662153
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GATHUL MEANS A BUNDLE OF CLOTHES AND PERHAPS A FEW HUMBLE BELONGINGS. THIS NOVEL RELATES THE STORY OF A BOY FROM A PAVEMENT –DWELLING FAMILY IN MUMBAI.
चर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या श्री. रवींद्र बागडे यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी. यातला ‘ना-या’ हे लेखकाचंच प्रतिरूप. कमालीचं दारिद्र्य, दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची धूळधाण करणारा बाप आणि नव-याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई; सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावरांच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुरंगी, बहुढंगी मुंबई हे ना-याचं प्राक्तन. त्यामुळे त्याच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवांचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथनात केवळ चर्मकार समाजाचं दर्शन घडत नाही, तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्र उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार यांचं विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे ! आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी? यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी? बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.
* सह्यनागरी २००१ . * भि.ग.रोहमारे पुरस्कार २००१ . * आशिर्वाद २००२ . * को.म.स.प. २००३. * नाथ माधव २००३ . * साहित्यरत्न २००३ . * वारणेचा वाघ २००४ . * राज्य पुरस्कार २००२-०३ . * बापूसाहेब धाक्रे स्मुर्ती पुरस्कार २००४. * संत प्रसाद २००५ . * आंबेकर श्रमगौरव २०११ . * राष्ट्राशाहीर अमर शेख २०१२ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRA BAGADE #BOCHAKA #GATULA "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GATULA #GATULA #गटुळं #FICTION #MARATHI #RAVINDRABAGDE #रवींद्रबागडे "
Customer Reviews
  • Rating StarSadahana Patil

    Mala he pustak manapasun avadle 2 veles vachle ahe

  • Rating StarRavindra Bagade

    सर्वात आवडते आत्मचरित्र

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विदारक अनुभवांचं ‘गटुळं’... मुंबईसारख्या महानगरात कित्येक मुलं आणि मुली गल्ल्यांमधून रेल्वे गाड्यांमध्ये, स्टेशनजवळच्या बकान जगांमध्ये नजरेला पडतात. काही आपल्याला झेपेल त्या पद्धतीनं लहान-मोठी कामं करत जगतात आणि आपल्या भावंडांना जगवतात. हजारो मध्यमव्गीय प्रवासी रोज त्यांना बघतात. त्यांची कीव करतात, तिरस्कार करतात. पण नंतर त्यांना विसरून कामालाही लागतात. काय भवितव्य असतं या मुलांचं, घर हरवलेली-दुरावलेली ही मुलं उद्या कोणत्या वाटेवर जाणार, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. हेही एक भयाण वास्तव आहे, असं म्हणून सगळेच जण त्याकडे पुन्हा नजर न वळवता आपला रस्ता धरतात. कधी काळी काहीसं असंच भरकटलेलं आयुष्य जगलेल्या रवींद्र बागडे नामक लेखकाचं ‘गटुळं’ हे पुस्तक भरकटलेल्या अनुभवाचं चित्रण करतं. चर्मकार समाजात जन्मलेला लेखक मुंबईतल्या आपल्या जगण्यातून जे शिकत गेला, जे अनुभव घेत गेला त्याचं दर्शन या लेखनात घडतं. कादंबरीचा नायक नारायण-नाऱ्या हे लेखकाचंचं दुसरं रूप आहे. दारूड्या बाप, त्याची मारहाण सतत सहन करत, कष्ट उपसत मुलांना वाढवणारी आई आणि रस्त्यावरचा त्यांचा उघडा संसार... दारिद्र्य हा या घराचा स्थायीभावच होऊन गेलेला. पारंपरिक काम न करता नाऱ्याचा बाप भाजी विकायचा धंदा करणारा. पण दारूच्या व्यसनानं त्याला पुरतं गिळून टाकलेलं, अशा परिस्थितीत पाच पोरांना खाऊ घालणं हे त्यांच्या आईवरच येऊन पडलेलं. तरीही नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तक नाही म्हणून त्याला शाळेत हाकलून लावलं. असे अनेक अनुभव घेत नाऱ्या मॅट्रिक झाला. रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपण यातून आपण वर यायचं आहे ही भावना मनात जपत धडपडणारा नाऱ्या ज्या चाकोरीतून गेला, ती मध्यमवर्गीय माणसाला मानसिक धक्का देणारी आहे. कोवळ्या वयातलं नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवती भयंकर वास्तव याचं या कादंबरीतलं चित्रण जण्याचा कुरूप चेहरा समोर ठेवतं. नाऱ्याच्या डोक्यावरचं अनुभवाचं हे ‘गटुळं’ विदारक सामाजिक परिस्थिती, गरीब माणसाची परवड, चुकीच्या रस्त्याला लागलेली मुलं, व्यसनामुळे उद्धध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जगणं अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. नाऱ्या भाजी विकून आईला मदत करतो, पण शाळेतली वर्गमैत्रीण भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. शाळेतली त्याची टिंगल होते. नाऱ्याचं संवेदनशील वयातलं मानस कादंबरीत उलगडून समोर येतं. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबईचं चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाऱ्यानं या वाटचालीत अनेकविध अनुभव घेतले. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन वणवण फिरला. दारूड्या बापाशी भांडला-तंटला... त्याला झटापटीत मारहाणही केली. शाळेतल्या चंचल या मुलीशी त्याची मैत्री झाली, पण नाऱ्याची पार्श्वभूमी कळताच ही मैत्री झटकन तुटलीही. नाऱ्याचं जगणं, शिकणं भरकटणं, त्याला बरंच काही शिकवून गेलं. नाऱ्याच्या या अनुभवांमध्ये त्याचं वेश्यावस्तीतला शब्दांमध्ये गुंतणंही आहे. अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्या यातून जाताना मदत करणारे, वाट दाखवणारेही भेटले. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. यापुढचा लेखकानं लिहिलेला भाग प्रसिद्ध व्हायचा आहे. आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा आहे आईची. आईच्या कष्टांचा, तिच्या डोळ्यातील पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल चीड बाळगणारा लेखक बापानं आपल्याला माझ्यासारखं वागू नकोस म्हणून कसं सांगितलं होतं तेही लिहितो. नाऱ्याच्या जीवनातले हे खळबळजनक, वेदनापूर्ण दिवस समाजापुढे काही प्रश्न ठेवतात. त्याला जाबही विचारतात. बोली भाषेचा वापर, विस्कळित जगणं तशाच पद्धतीने मांडणारी शैली आणि नाऱ्याचं ‘मी’पण उलगडून सांगणारं प्रांजळ निवदेन यामुळे ‘गटुळं’ मनाला भिडतं. त्यातला सूर नुसताच तक्रारीचा नाही. तक्रारीपेक्षा वास्तवाचं दर्शन थेटपणे घडवण्याला लेखकानं महत्त्व दिलं आहे. आपल्याबरोबर इतरांच्याही वेदना कळत-नकळत चित्रित केल्या आहेत. लेखकाची ही सहवेदना या लेखनाला एक निराळी उंची प्राप्त करून देते. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 11-05-2003

    विदारक परिस्थितीचं भेदक दर्शन… जाती, धर्म यांच्या भेदाभेदांनी पोखरलेल्या आणि आर्थिक उच्चनीचतेच्या उतरंडीने माणसाला श्रेष्ठकनिष्ठा देणाऱ्या भारतीय समाजात, दैववशात् लाभलेला जन्मच कुणाला कधी सुखाच्या शिखरावर बसवू शकतो, तर कुण्या दुर्भाग्याला विनाअपराध ु:ख-अपमानाच्या नरकात लोटू शकतो. त्या प्रतिकूलतेला मूकपणे शरण जाणाऱ्यांचा एक गट बहुसंख्येने आढळतो. दुसरा गट आढळतो तो ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ असा आक्रस्ताळेपणा करीत आपल्या समाजाच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांचा! तिसरा गट तुलनेने ‘अल्पसंख्याक’ असतो, पण तोच या समाजाला विधायक वळण लावत असतो. या गटातील सूज्ञ, दैवजात दु:खांबद्दल आकांडतांडव न करता, जिद्दीने जन्मजात प्रतिकूलतेशी झगडून तिच्यावर मात करतात आणि स्वत:चे एक स्थान तथाकथित उच्चवर्णियांत निर्माण करतात. चर्मकार समाजात जन्मलेले मुंबईतील एक समाजसेवक रवींद्र बागडेलिखित ‘गटुंळ’ ही आत्मकथनपर कादंबरी वाचताना वरील सारे विचार मनात येतात. त्यामुळेच मुंबईतल्या पदपथावर अमानुष जिणे जगत वाएलेल्या लेखकाचे स्वत:च्या जिण्याबद्दलचे हे चित्रण वाचल्यानंतही वाचक खचून जात नाही; उलट हे पुस्तक त्याला जगण्याची उमेद देऊन जाते. ‘गटुळं’ नायक नाऱ्या हे मुंबईतल्या फूटपाथवर वाढलेल्या लेखकाचेच प्रतिरूप! कमालीचे दारिद्र्य, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची धूळदाण उडवणारा बेजबाबदार बाप, नवऱ्याचा मार खात सात पोरांच्या पोटाला घालण्यासाठी सतत कष्ट करणारी आई आणि सभोवतालच्या बहुरंगी, बहुढंगी मुंबापुरीच्या झगमगत्या पार्श्वभूमीवर वाट्याला आलेले घाणेरड्या फूटपाथवरचे ढोरागत हेच नशिबी आलेल्या नाऱ्याच्या भावविश्वात अनेक जहरी अनुभवांचे ‘गटुळं’ आहे. यातले फूटपाथवरच भाज्यांच्या हाऱ्यांत, फळांच्या खोक्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, चिरगुटं ठेवत वर्षानुवर्षे जगणाऱ्या नायकाचे भयानक कौटुंबिक जीवन, वेश्याव्यवसायाचे जगावेगळे जग, रेस/जुगार यांचे भोवंडून टाकणारे विश्व या साऱ्यांचे लेखकाने प्रत्ययकारकतेने केलेले चित्रण संवेदनशील पांढरपेशा वाचकांच्या मनाला भोवळ आणते. मग तो ढोर चाळीत यल्लमाच्या आरतीच्या वेळी भग्या जोगत्याकडून कोवळ्या नाऱ्याला आलेला विकृत लैंगिक अनुभव असो की, शाळेला दांडी मारून सिनेमा बघायला गेला असता, शेजारी बसलेल्या पुरुषांनी त्याच्याशी केलेले लैंगिक चाळे असोत. लेखक ते सारे घृणास्पद अनुभव काहीही हातचे न राखता वर्णन करतो. पण ते सारे जीवनाचा अटळ भाग आहे, हे उमजल्यामुळे, ती वर्णने वाचक कडू औषणाप्रमाणे रिचवतो. लेखकाची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे अशा या कडवट प्रसंगांबरोबरच संबंधित व्यक्तींच्या व्यक्तिरेखाही तो हुबेहूब साकारतो. त्यामुळेच बायकोच्या मंगळसूत्रवाटीचे पैसे घराच्या भाड्याऐवजी दारूत उडवून टाकणारा, नाऱ्याच्या पहिल्या पगाराचे कौतुक करण्याऐवजी तो चोरून दारूवर उधळणारा, पतीचे/पित्याचे कोणतेही कर्तव्य न बजावताही पत्नीवर नवरेशाही गाजवणाऱ्या बापाचे चित्रण लेखक यथायोग्य करतो. लेखकापासून पोटुशी राहिलेल्या शबनम या वेश्येचे, कष्टाळू आई सायत्रा, त्याच्यावर प्रेम करणारी पण तो भाजीविक्रेता आहे हे कळल्यावर त्याच्याकडे पाठ फिरवणारी वर्गमैत्रीण चंचगल, घरची रोजची भांडणं सहन न होऊन विष खाणारा भाऊ नामदेव या साऱ्या व्यक्तिरेखा लेखकाने नेमकेपणाने उभ्या केल्या आहेत. सभ्यतेची बंधने झुगारून, रांगड्या, बोलीभाषेत सहज उलगडत जाणारी ‘गटुळं’ कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते आणि वाचकाला अंतर्मुख करते. -नीला उपाध्ये ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more