* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A COLLECTION OF POEMS THAT VIVIDLY CAPTURES THE ESSENCE OF AMRAVATI OVER THE PAST FIFTY YEARS—ITS SQUARES, STREETS, STATUES, INDUSTRIES, CINEMAS, THEATERS, SHOPS, HOTELS, WELLS, INSTITUTIONS, NOTABLE PERSONALITIES, SCHOOLS, COLLEGES, MARKETS, HOSPITALS, FAIRS, SPORTS, LOCAL DELICACIES, AND EVEN DRAINS AND CANALS. MOST IMPORTANTLY, IT PORTRAYS THE RICH DIVERSITY OF HUMAN CHARACTER AND BEHAVIOR. WRITTEN BY A NATIVE OF AMRAVATI, THE POEMS HUMOROUSLY AND AFFECTIONATELY HIGHLIGHT THE QUIRKS, HABITS, AND DISTINCTIVE TRAITS OF THE CITY AND ITS PEOPLE—WITTY, LIGHT-HEARTED, AND DEEPLY TOUCHING.
अमरावतीचे छप्पन स्वभाव…हा कवितासंग्रह गेल्या पन्नास वर्षांतील अमरावतीचे चौरस, रस्ते, पुतळे, उद्योग, टॉकीज, सिनेमा, दुकाने, हॉटेल, विहिरी, संस्था, थोर पुरुष, शाळा, महाविद्यालय, बाजार, दवाखाने, यात्रा, खेळ, पदार्थ, अगदी चर आणि नाले यांचे तसेच माणसांच्या स्वभावाचे वैविध्यपूर्ण चित्रण करतो. एका अमरावतीकराने हसत-खेळत टिपलेली अमरावतीची आणि अमरावतीकरांची वैशिष्ट्ये हे नर्मविनोदी आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #काव्यसंग्रह #अमरावतीचेछप्पनस्वभाव #जी.बी.देशमुख # MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOK #POETRY #AMARAVATICHECHHAPPANSWABHAV #G.B.DESHMUKH
Customer Reviews
  • Rating Starआबासाहेब कडू, अमरावती.

    एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

  • Rating Starबाबाराव घोरमाडे, अमरावती

    प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

  • Rating Starवा. पां. जाधव अमरावती

    `अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

  • Rating Starज्योती चेडे, मुंबई.

    अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.