* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANGANGA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661330
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR LAST SEVEN DECADES, THE SOUL RESIDED IN THIS PARTICULAR BODY WHICH WAS NOW EXTREMELY TIRED. HOW LONG IT COULD BE USED SUCH? HOW LONG CAN ONE STAY IN PARENTAL HOUSE? THIS BODY WAS BESTOWED WITH THE PRIME FUNCTION OF RELEASING THE SOUL. THERE WAS NO LUST TOWARDS THE BODY, RATHER A FEELING OF TOTAL RETIREMENT COMBINED WITH EAGERNESS TO GET DISSOLVED WITH ‘THE ULTIMATE’. THE MELODIOUS TANPURA WAS ACCOMPANYING BEGUM. SHE WAS SINGING: ‘NAIHAR CHHUTO JAI’… AS I LEAVE MY PARENTAL HOME. APART FROM THE BRIGHT WHITE LIGHT THE EYES COULD NOT SENSE ANYTHING ELSE. OH, THERE IS A BLUE LAKE AS WELL. AND WHAT IS IT AT ITS FAR END? A SNOW-COVERED MOUNTAIN PEAK. THE VERY TALL PEAK…KANCHANGANGA. FOR THE FIRST TIME IN HER LIFE, MAI COULD SEE VALUKESHWAR DEEP IN MEDITATION. OH, SO THIS DISPASSION HAD A MEANING AFTER ALL? IT ENABLED HER TO VIEW HIM THUS. ANJANI’S LIFE REACHED THE FLOW OF THE GANGA. HER PATH WAS LINED WITH KACHNAR FLOWERS. ANJANI HAD BECOME AS HOLY AS THE GANGA NOW. NOW THERE WAS NOTHING BUT ‘NADBRAHMA’ THE SOUND OF GOD…
गेली सात तपं...हा आत्मा या शरीरात वस्ती करुन होता. हे शरीर...आता थकलं होतं. ते किती वर्षं वापरायचं? नैहर झालं, म्हणून काय झालं?ज्या आत्म्याच्या उध्दारासाठी म्हणून हे शरीर लाभलं होतं, त्या शरीराची आता आसक्ती नव्हती, तर निवृत्ती होती. त्या भव्य सुरात आपला सूर मिळवण्याची आतुरता! तंबोरा झंकारत होता. बेगमचा आवाज कानांवर पडत होता. नैहर छुटो जाय... आता...मिटलेल्या डोळ्यांसमोर फक्त पांढराशुभ्र प्रकाश दिसत होता. एक निळं सरोवर...आणि त्या पलीकडलं हिमालयाचं बर्फाच्छादित शिखरही... एक उत्तुंग शिखर...कांचनगंगा! त्या शिखरावर ध्यानस्थ झालेला वालुकेश्वर माईला आज प्रथमच स्पष्ट दिसला. तो नजरेसा दिसावा, म्हणूनच तर होतं हे वैराग्य! कांचनाच्या पायघड्यांवरुन चालणारं, अंजनीचं जीवन पार गंगेच्या प्रवाहापाशी पोचलं होतं. गंगेइकंच् पवित्र, विशाल. अंजनी स्वतच बनली होती कांचनगंगा! जिथं..फक्त. नादब्रम्ह झंकारत होतं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarSmita Kawale

    Interesting read!

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-05

    एक वाचनीय चरित्रात्मक कादंबरी... माधवी देसाई यांची ‘कांचनगंगा’ ही चरित्रात्मक कादंबरी! गोमंतकन्या अंजनीबाई मालपेकर, हिरबाई पेडणेकर आणि सुरंगा मुळगावकर अशा तीन तेजस्वी स्त्रियांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी जितकी मनोरंजक तितकीच माहितीपूर्णही आहे. यातीन तेजस्विनींचे अप्रकाशित जीवन या कादंबरीने प्रकाशात आणले, हा या कादंबरीचा उल्लेखनीय विशेष! मराठी नाट्यवाङ्मयात स्त्री नाटककरांची आजही वानवाच आहे. अशा क्षेत्रात हिराबाई पेडणेकर या ‘महाराष्ट्रातील पहिली नाटक लेखिका’ म्हणून ओळखल्या जाणे अपूर्वाईचे आहे. त्यांच्या घरी होणाऱ्या साहित्यचर्चा, मोठमोठे नाटककार, लेखक यांचे येणे-जाणे याबद्दल अंजनीबाई आणि सुरंगा या आपल्या मैत्रिणीजवळ हिराबाई बोलत असतानाच, त्यामागे असलेली पुरुषीदृष्टी हिराबार्इंना अस्वस्थ करून सोडणारी आहे. ते आपल्या घरी कशासाठी येतात हे हिराबार्इंना चांगलं ठावूक असतं. या संबंधी त्या आपल्या मैत्रिणींजवळ म्हणतात- ‘त्या सर्वांना हवा असतो माझा सहवास. त्यांना माझ्या सौंदर्याचं वेड आहे म्हणून माझ्या घरी नट येतात, लेखक येतात. त्यांच्या पदांना मी चाली लावते. पण ते खरं नाही. मला त्यांचे हेतू समजतात.’ (पाठ नं. १२१) हिराबाई पेडणेकरांच्या या उद्गारातून तत्कालीन विदुषीकडे पुरुष कोणत्या दृष्टीने बघत यावर विदारक प्रकाश पडतो. कलावंत स्त्रीकडे येणार पुरुष केवळ कलेच्या वेडानं येतात असं नाही. त्यांनी केलेली स्तुती, त्यांचं गोड वागणं हे बरेचदा खोटं खोटं असतं. हिराबार्इंसारख्या विदुषीला हे खोटेपण कळत नाही असं नाही. तरीही आपल्याला हे सारं आवडतं कारण याचीही एक नशा असते. ‘कुणा एकावर आपण मनापासून प्रेम करावं, त्यानं आपल्याला फसवावं अशावेळी आधार देण्यासाठी तिसराच कुणी यावा, आपल्या भावूक अवस्थेचा त्यानंही फायदा घ्यावा आणि मग त्याचीच नशा चढत जाते...’ हे यावर हिराबार्इंचं उत्तर. स्त्रीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं. त्याला तडा जाता कामा नये. हिराबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी फार समंजस. त्या हिराबार्इंना समजवतात. आपलं चारित्र्य जपायला सांगतात. ‘हिरा, बाईचं खरं सौंदर्य कशात असेल तर ते तिच्या चारित्र्यात. ते चारित्र्य भंगलं की सारं संपलं. आपण कलावंत घरच्या मुली! आपण वयात येण्यापूर्वीच साऱ्याचं लक्ष आपल्यावर असतं.’ हिराबार्इंची मैत्रीण अंजनी मालपेकर हिच्या या उद्गारातून साऱ्या स्त्रीजातीच्या वाट्याला आलेल्या भागावर किती विदारक प्रकाश पडला आहे. अंजनीबाई मालपेकर ही एक श्रेष्ठ गायिका! भेंडीबाजार घराण्याचे अतिथी नजीरखां यांची अंजनी ही पट्टशिष्या. अंजनी अठरा वर्षांची असतानाच गाण्याची बैठक करू लागली होती. लावणी ठुमरी, गझल, दादारा हे सारं तयारीनं गाणारी अंजनी शास्त्रीय संगीतातही तरबेज होती. शास्त्रीय संगीताचा दळदार आवाज तिने तयार केला होता. उर्दू, हिंदी, संस्कृत, गुजराती, मराठी साऱ्या भाषा ती शिकली होती. मिशनरी शाळेत तिने शिक्षण घेतलं होतं. गोहरजान, चुन्ना, वैष्णवसंप्रदाय या सर्वांच्या गायकीचा तिने अभ्यास केलाय. उच्चार, भाव, शब्दफेक, ताल, लय यात ती तरबेज आहे. कलावंताला आसनाचा मान असायला हवा हा तिचा हट्ट! आजवर कुण्याही स्त्री कलावंतानं हा हट्ट केला नाही. रात्रभर अदा करून, उभ्याने ठुमरी, दादरा कव्वाली पेश करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या बैठकी अन् लोडाला टेकून त्यांना वाहवा देणारे श्रीमंत श्रोते या परंपरेविरुद्ध आवाज उठवणारी अंजनी ही पहिली कलावंत! अन् राष्ट्रपतींच्या हातून पहिली नाट्य आणि संगीताची फेलोशिप प्रदापन केली गेली, अशी श्रेष्ठ गायिका! ‘बॉम्बे म्युझिकल सोसायटी’ या एका नव्या संस्थेचा मुंबईत शुभारंभ करणारी अशी श्रेष्ठ गायिका आणि सरतेशेवटी अगदी तृप्त मनाने तिने घेतलेला गानसंन्यास! अंजनी मालपेकरांची या कादंबरीतली व्यक्तिरेखा अशी चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान साकारली आहे. या कादंबरीतील तिसरी तेजस्विनी आहे सुरंगा मुळगावकर. राजा रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्ररेणा! हिरा, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्रेरणा! हिर, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्माच्या चित्रामधील सीता, शकुंतला, उर्वशी, दमयंती, पार्वती या सर्वामध्ये हुबेहूब उतरली ती सुरंगाच! राजाजींची पत्नी माहेरी राहते. कारण त्यांच्या प्रदेशात लग्न झालं की पुरुषानं पत्नीच्या घरी राहायला जायचं ही पद्धत. पण राजाजींना ती मान्य नाही. ते आपल्याच घरी राहतात. चित्रकलेच्या निमित्तानं अनेक स्त्रियांशी त्यांचा संबंध आलेला. त्यातही राजा रविवर्मा अन् सुरंगा यांच्यातले संबंध म्हणजे रेशीमबंधच! सुरंगामुळे राजाजींच्या कुंचल्यात एक वेगळीच जादू आलेली. अन् राजाजींच्या प्रेमानं सुरंगाचं झालेलं कृतकृत्य जीवन. सुरंगा राजाजींच्या प्रेमाबद्दल म्हणते, ‘त्यांनी मला कोणतीही जहागिरी दिलेली नाही. पण माझं प्रेम अजरामर केलं. या सुरंगाला त्यांनी केव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं? यापेक्षा आणखीन काही सुंदर असेल?’ सुरंगाच्या या उद्गारात राजाजींच्या प्रेमाबद्दल किती कृतज्ञता भरून राहिली आहे. हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर आणि सुरंगा मुळगावकर या तीन बाल मैत्रिणींच्या जीवनावरची ही कादंबरी! नवीवाडीमधील गोयंकारांचं जीवन, त्यांचे जगण्याचे संकेत या तीन मैत्रिणींचा असीम त्याग, त्यांचा संघर्ष या साऱ्यांचं मनोहारी चित्रण या कादंबरीतून आले आहे. या तिघींनाही एकमेकींच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. हिरा पेडणेकर अंजनीच्या गाण्याबद्दल म्हणते, ‘आज तू मोठी गायिका म्हणून नावलौकिक मिळवलास.’ सुरंगाबद्दल म्हणते, ‘आमचं’ हे नाजूक सुरंगीचं फूल राजाजींसारख्या कलावंताच्या हाती सुखरूप आहे. अंजनी हिराबद्दल म्हणते, ‘आपणा तिघीत खरी विदुषी तूच आहेस. आजवर कुणी बाईमाणसानं नाटक लिहिलंय्?’ कविता केल्या आहेत तुझ्यासारख्या? की गाण्याला चाली दिल्या आहेत?’ या तिघीही अशा एकमेकींच्या सुखदु:खात समरस झाल्या आहेत. ह्या कादंबरीचे कथाबीज लेखिकेच्या मनात कसे पडले? लेखिकेला या तिघींच्या जीवनावर कादंबरी का लिहावीशी वाटली? तर रणजित देसाई यांची ‘राजा रविवर्मा’ ही कादंबरी लेखिकेच्या वाचनात आल्यावर या कादंबरीची नायिका सुरंगा हिने लेखिकेच्या मनात घर केले. पुढे केव्हा तरी म्हापसा गोवा इथे अंजनीबाई मालपेकर संगीत सम्मेलन आविष्कार या संस्थेतर्फे अंजनीबार्इंवर बोलण्याचं निमंत्रण माधवी देसार्इंना आलेले. त्या निमित्ताने अंजनी मालपेकरांच्या जीवनाचा त्यांनी घेतलेला शोध. अन् मग अंजनी, हिरा आणि सुरंगा या तिघीही बालमैत्रिणी असल्याचा लेखिकेला लागलेला शोध. नवीवाडी, गिरगाव इथं वाढलेल्या, गोमंतकात जन्मलेल्या या तीन बालमैत्रिणी, त्यांचं मूकजीवन शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवण्याची लेखिकेच्या मनात निर्माण झालेली आकांक्षा अन् या आकांक्षेतून मूर्त रूपात साकारलेली ‘कांचनगंगा’ ही माधवी देसार्इंची कादंबरी! सुरंगाचं विषप्राशन, हिराबार्इंचा विजनवास आणि अंजनीचा गानसंन्यास या तीन घटनांची साखळी म्हणजे कांचनगंगा! या तीन बालमैत्रिणींच्या जीवनकहाणीत लेखिकेने काल्पनिकतेचे रंग भरताना अलंकारिक भाषेचा केलेला वापर, बरेच ठिकाणी पाल्हाळीकपणे केलेली वर्णनं यामुळे ही कादंबरी काहीशी पसरट आणि कृत्रिम व्याज झालेली असली तरी या तीन विदुषींचे अपरिचित जीवन या कादंबरीने वाचकांसमोर आणले हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 03-06-2001

    गानतपस्विनीच्या जीवनावरील लोभस कादंबरी... माधवी देसाई यांचं ‘कांचनगंगा’ हे तेरावं पुस्तक आहे. अंजनीबाई मालपेकर या सुप्रसिद्ध गायिकेच्या जीवनावर ही कादंबरी आधारलेली आहे. महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका हिराबाई पेडणेकर आणि ‘राजा रविवर्मा’ या महान अशाहिंदुस्थानी चित्रकाराची प्रेरणा असलेल्या सुरंगा मुळगावकर या अंजनीबार्इंच्या मैत्रिणींची आयुष्यंही लेखिकेने जोडून घेतली आहेत. अंजनीबाईसारख्या गोमंतक कन्येविषयी, तिच्या गानतपस्येविषयी, आणि तत्कालीन समाजाविषयी, परंपरेविरुद्ध केलेल्या संघर्षाविषयी आणि जपलेल्या मूल्यांविषयी लेखिकेने मोठ्या आस्थेनं लिहिलं आहे असं लक्षात येतं. गोमंतकात जन्म घेतलेल्या, छत्तीस वर्षे संगीत साधना केलेल्या आणि थोर गायक-कलावंत असलेल्या अशा अंजनीबाईच्या लावण्याविषयी कादंबरीत अनेकदा उल्लेख आलेले आहेत. “मोत्यासारखे स्वच्छ सूर, त्या सुरांना असणारी एक मुलायम किनार, प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार, अर्थाप्रमाणे चेहऱ्यावर उमटणारे भाव, अत्यंत शालीन वर्तन आणि डाळिंबी रंगाच्या इंदोरी साडीमधून उठून दिसणारं त्या गायिकेचं लावण्य पाहून सारेजण भारावून गेले होते.” असे लेखिका सहज लिहून जाते. अशा स्वर्गीय सौंदर्याची धनीण असलेल्या अंजनीबार्इंनी आपल्या गुरू नाजिरखाँकडे जाहीर बैठकीपूर्वी एक अट स्पष्टपणे घातली होती : “मी उभं राहून गाणार नाही. कलावंत एक स्त्री म्हणून तिनं उभ्यानं गायचं ही कुठली परंपरा? मला हा फरक मान्य नाही.” आश्चर्य म्हणजे, त्रिभुवन शेटजींकडे होणाऱ्या पाहिल्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या वेळी चिंतामण शास्त्रींनीसुद्धा स्पष्टपणे सांगितले, “मित्रहो, या आसनावर आजची गायिका बसणार आहे. हा मान आपण सर्वजण तिला देणार आहो. आजवर आपण हे कधी केलं नाही. आपण टेकून बसत होता आणि कलावती स्त्री रात्रभर उभी राहून गाताना ऐकत होता. हा एक फार मोठा उपमर्द आपल्या हातून होत होता. कलाकार कलेचा उपासक असतो. त्याने खडतर तपश्चर्या केलेली असते. सभागृहात येणाऱ्या अतिथी कलाकाराला आपण प्रथम आसन देणं उचित नव्हे का?” खाँ साहेब, पं. भातखंडे, त्रिभुवनशेठ आनंदले व अंजनीबार्इंना आसनाचा मान लाभला. परंपरेविरुद्ध बंड केल्याचा हा परिणाम होता. अंजनीबार्इंना धनाढ्य माणसांकडून, राजेरजवाड्यांकडून आमंत्रणे येऊ लागली तेव्हा आईनं जबाबदारीची जाणीव देऊन म्हटलं होतं, “बाय, आजवर तू या घरात सुखरूप होतीस. पिलाला पंख फुटले की, ते आभाळात प्रथम झेप घेतं, तो एकच क्षण काळजीचा असतो. नंतर मात्र त्याला आपोआपच समजायला लागतं की, आभाळाभर भरारी मारूनही घरट्यांत सुखरूप कसं परतावं आणि त्याच्या पंखांत आपोआपच उडण्याची शक्तीही येते.” अंजनीबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी तेवढ्या कणखर निघाल्या नाहीत. हिरा पेडणेकरच्या कविता कुठे कुठे छापून येत होत्या. तिच्या सौंदर्यानं लोभावून नट, लेखक, नाटककार येत पण त्यांच्या मनातले हेतू स्वच्छ नव्हते हे तिला उशिरा कळले. एका विद्ध हरिणीसारखी ती जगली. दुसरी मैत्रीण सुरंगा रविवर्म्याच्या चित्रांतून साकारली गेली तरी लोकांच्या टीकेला ती बळी पडली. विष प्राशन करून तिनं पुढं मृत्यूलाच कवटाळलं. हे दोन्ही प्रसंग आणि त्यातून कलावंत मनाची होणारी तगमग लेखिकेनं यथार्थपणे मांडली आहे. अंजनीबाईला वसनजी वेद या धनिकाचा आश्रय लाभतो. त्याच्याशी विवाह होऊन ती एका मुलाची आई बनते आणि गाण्याच्या बैठकीतून तिला अमाप असं यश पदरी पडते. तरीही प्रापंचिक आसक्तीतून ती विरक्त होत जाते. तिच्यावर केडगावच्या नारायण महाराजांच्या विचारांचा पगडा बसू लागतो. काही काळ ती नवऱ्यापासूनही दुरावते. नवरा कर्जबाजारी झाल्यावर त्याला धंद्यात उभं करण्यासाठी भांडवल गोळा करते, परंतु काही दिवसांतच नवऱ्याच्या मृत्यूनं ती पार कोसळते. उरलंसुरलं अवसानही गळून पडतं. हे कथानक अतिशय ओघवत्या शैलीतून मांडण्यात आलं आहे. अंजनीबार्इंचं व्यक्तिमत्त्व केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर वाचनानं, अनुभवानं, चिंतनानं परिपक्व झालेलं असं दर्शविलं आहे. नेपाळ ते कन्याकुमारीपर्यंतचा सारा भारत त्यांनी आपल्या स्वर्गीय गायकीनं जिंकला. चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान अशा गोमंतक कन्येच्या रूपात माधवी देसाई यांनी अंजनीबार्इंचं कादंबरीतून रेखाटलेलं चित्र मोठं विलोभनीय झालं आहे. एका गान-तपिस्विनीवर लिहिलेली ही कादंबरी मोठी वाचनीय आणि लोभस झाली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 03-06-2001

    श्रेष्ठ कलावतीची हृदयस्पर्शी जीवनगाथा-कांचनगंगा… कांचनगंगा ही माधवी देसाईची कादंबरी भेंडीबाझार घराण्याचे गायक नजिरखाँ यांची परमशिष्या गोमंतक कन्या अंजनीबाई मालपेकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अंजनीबाईनी आपल्या स्वर्गीय गायकीने सारा भारत जिंकला. त्याच्या जाण्यामुळे कला आणि सांस्कृतिक प्रांगणात फार मोठी पोकळी निर्माण झाली. अंजनीबाईच्या दोन मैत्रीणी - हिराबाई पेडणेकर महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका आणि संगीततज्ज्ञ कवयित्री आणि दुसरी सुरंगा मूळगावकर ही राजा रविवर्मा या श्रेष्ठ चित्रकाराची प्रेरणाशक्ती या तिघी गायन, लेखन, चित्र या कलाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या स्त्रिया. त्यांच्या जीवनप्रवासाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठीच लेखिकेने हे शब्दशिल्प निर्माण केले आहे. अंजनीला सौंदर्य आणि मधुर आवाज या दैवी देणग्या लाभल्या होत्या. तसेच तिचे नशीबही बलवत्तर होते. म्हणूनच नजिरखॉसारख्या संगीत शिक्षक मिळाला. त्याने बिदागीची अपेक्षा न ठेवता आपल्या संगीतज्ञानाचे पूर्ण भांडार या शिष्येच्या स्वाधीन केले. शिष्येने निष्ठेने ज्ञान आत्मसात केले. कमीत कमी स्वरात जास्तीत जास्त आशयपूर्ण फुलोरा असणारे स्वरशिल्प निर्माण करण्यात आपले कसब दाखवले. वाचनाची आवड असलेली आणि गाण्याचे वेड असलेली अंजनी, वसनजी या देखण्या, दिलदार, संगीत रसिकाची पत्नी झाली. वसनजी गिरण्यांचा मालक, उत्तम व्यापारी आणि शेअर दलाला होता. आर्थिक सुबत्ता असूनही त्याने अंजनीला गाण्याच्या बैठका घेण्यास अनुमती दिली. कारण गाणे हा तिचा श्वास आहे हे जो जाणून होता. त्याचे अंजनी आणि तिचे गाणे या दोन्हीवर अकृत्रिम प्रेम होते. अंजनी स्वतंत्र बंगलीत छानदार मोठ्या प्रशस्त जागेत आई-आजीसह राहूल लागली. श्रेष्ठ गायिकेचे मानमरातब तिला मिळत गेले. कीर्ती वाढली. प्रतिष्ठ उंचावली तरीही ती आपल्या जुन्या मैत्रिणींना आणि गुरूंना मुळीच विसरली नाही. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत राहिली. अनुभवातून अधिक परिपक्व होत गेली. तिची वर्गमैत्रिण सुधा जातीने ब्राह्मण केवळ आठव्या वर्षी विधवा झाली. त्यावेळी शाळेच्या फादरने आणि सेवाभावी शिक्षिका मेरीने दु:ख व्यक्त करताना जे विचार मांडले ते अंजनीच्या काळजात घर करून राहिले. तेव्हाच परंपरा हा शब्द असा काही तिच्या हृदयात रुतला की भावी आयुष्यात परंपरा तोडण्यात ती सतत पुढाकार घेत गेली. परंपरेच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करून कृती करू लागली. मैत्रिणींनादेखील तिने घातक परंपरा न मानण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांना भावनिक आधार दिला. तिघींनी व्यक्तिगत जीवनात परिस्थितीचे चटके सोसले. कलेची पूजा करताना परंपरा मोडण्याचे धाडस केले. त्यामुळे समाजाकडून विरोधाचे घाव बसले. ह्या सोसले, चारित्र्य आणि निष्ठा ही जीवनाची मूल्य बघून कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली. अशी ही तीन तेजस्वीनींच्या जीवनावरची सुंदर कादंबरी आहे. कादंबरीचे निवेदन ओघवत्या शैलीतील भावपूर्ण आहे. अंजनीची आजी कुटुंबियांची गोमंतकीय बोली तर नजिरेखा इ. ची उर्दू मुस्लीम मिश्रीत मराठी यांचा मार्मिक वापर लेखिकेने केला आहे. शास्त्रीय गायकीतले बारकावे, संदर्भ परिश्रमपूर्वक मिळवून योग्य प्रकारे वापरल्याचे जाणवते. वाचकाचे शीर्षकाला संगीताचे ज्ञान नक्कीच वाढते. मुखपृष्ठ विषयाला व शीर्षकाला साजेलसे आहे. -डॉ. विभा शहा ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more