- Sadahana Patil
Mala he pustak manapasun avadle 2 veles vachle ahe
- Ravindra Bagade
सर्वात आवडते आत्मचरित्र
- NEWSPAPER REVIEW
विदारक अनुभवांचं ‘गटुळं’...
मुंबईसारख्या महानगरात कित्येक मुलं आणि मुली गल्ल्यांमधून रेल्वे गाड्यांमध्ये, स्टेशनजवळच्या बकान जगांमध्ये नजरेला पडतात. काही आपल्याला झेपेल त्या पद्धतीनं लहान-मोठी कामं करत जगतात आणि आपल्या भावंडांना जगवतात. हजारो मध्यमवर्गीय प्रवासी रोज त्यांना बघतात. त्यांची कीव करतात, तिरस्कार करतात. पण नंतर त्यांना विसरून कामालाही लागतात. काय भवितव्य असतं या मुलांचं, घर हरवलेली-दुरावलेली ही मुलं उद्या कोणत्या वाटेवर जाणार, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. हेही एक भयाण वास्तव आहे, असं म्हणून सगळेच जण त्याकडे पुन्हा नजर न वळवता आपला रस्ता धरतात.
कधी काळी काहीसं असंच भरकटलेलं आयुष्य जगलेल्या रवींद्र बागडे नामक लेखकाचं ‘गटुळं’ हे पुस्तक भरकटलेल्या अनुभवाचं चित्रण करतं. चर्मकार समाजात जन्मलेला लेखक मुंबईतल्या आपल्या जगण्यातून जे शिकत गेला, जे अनुभव घेत गेला त्याचं दर्शन या लेखनात घडतं. कादंबरीचा नायक नारायण-नाऱ्या हे लेखकाचंचं दुसरं रूप आहे.
दारूड्या बाप, त्याची मारहाण सतत सहन करत, कष्ट उपसत मुलांना वाढवणारी आई आणि रस्त्यावरचा त्यांचा उघडा संसार... दारिद्र्य हा या घराचा स्थायीभावच होऊन गेलेला. पारंपरिक काम न करता नाऱ्याचा बाप भाजी विकायचा धंदा करणारा. पण दारूच्या व्यसनानं त्याला पुरतं गिळून टाकलेलं, अशा परिस्थितीत पाच पोरांना खाऊ घालणं हे त्यांच्या आईवरच येऊन पडलेलं. तरीही नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तक नाही म्हणून त्याला शाळेत हाकलून लावलं. असे अनेक अनुभव घेत नाऱ्या मॅट्रिक झाला. रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपण यातून आपण वर यायचं आहे ही भावना मनात जपत धडपडणारा नाऱ्या ज्या चाकोरीतून गेला, ती मध्यमवर्गीय माणसाला मानसिक धक्का देणारी आहे. कोवळ्या वयातलं नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवती भयंकर वास्तव याचं या कादंबरीतलं चित्रण जण्याचा कुरूप चेहरा समोर ठेवतं.
नाऱ्याच्या डोक्यावरचं अनुभवाचं हे ‘गटुळं’ विदारक सामाजिक परिस्थिती, गरीब माणसाची परवड, चुकीच्या रस्त्याला लागलेली मुलं, व्यसनामुळे उद्धध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जगणं अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. नाऱ्या भाजी विकून आईला मदत करतो, पण शाळेतली वर्गमैत्रीण भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. शाळेतली त्याची टिंगल होते. नाऱ्याचं संवेदनशील वयातलं मानस कादंबरीत उलगडून समोर येतं. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबईचं चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाऱ्यानं या वाटचालीत अनेकविध अनुभव घेतले. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन वणवण फिरला. दारूड्या बापाशी भांडला-तंटला... त्याला झटापटीत मारहाणही केली. शाळेतल्या चंचल या मुलीशी त्याची मैत्री झाली, पण नाऱ्याची पार्श्वभूमी कळताच ही मैत्री झटकन तुटलीही.
नाऱ्याचं जगणं, शिकणं भरकटणं, त्याला बरंच काही शिकवून गेलं. नाऱ्याच्या या अनुभवांमध्ये त्याचं वेश्यावस्तीतला शब्दांमध्ये गुंतणंही आहे. अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्या यातून जाताना मदत करणारे, वाट दाखवणारेही भेटले. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. यापुढचा लेखकानं लिहिलेला भाग प्रसिद्ध व्हायचा आहे.
आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा आहे आईची. आईच्या कष्टांचा, तिच्या डोळ्यातील पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल चीड बाळगणारा लेखक बापानं आपल्याला माझ्यासारखं वागू नकोस म्हणून कसं सांगितलं होतं तेही लिहितो. नाऱ्याच्या जीवनातले हे खळबळजनक, वेदनापूर्ण दिवस समाजापुढे काही प्रश्न ठेवतात. त्याला जाबही विचारतात. बोली भाषेचा वापर, विस्कळित जगणं तशाच पद्धतीने मांडणारी शैली आणि नाऱ्याचं ‘मी’पण उलगडून सांगणारं प्रांजळ निवदेन यामुळे ‘गटुळं’ मनाला भिडतं. त्यातला सूर नुसताच तक्रारीचा नाही. तक्रारीपेक्षा वास्तवाचं दर्शन थेटपणे घडवण्याला लेखकानं महत्त्व दिलं आहे. आपल्याबरोबर इतरांच्याही वेदना कळत-नकळत चित्रित केल्या आहेत. लेखकाची ही सहवेदना या लेखनाला एक निराळी उंची प्राप्त करून देते.
- MAHARASHTRA TIMES 11-05-2003
विदारक परिस्थितीचं भेदक दर्शन…
जाती, धर्म यांच्या भेदाभेदांनी पोखरलेल्या आणि आर्थिक उच्चनीचतेच्या उतरंडीने माणसाला श्रेष्ठकनिष्ठा देणाऱ्या भारतीय समाजात, दैववशात् लाभलेला जन्मच कुणाला कधी सुखाच्या शिखरावर बसवू शकतो, तर कुण्या दुर्भाग्याला विनाअपराध दु:ख-अपमानाच्या नरकात लोटू शकतो. त्या प्रतिकूलतेला मूकपणे शरण जाणाऱ्यांचा एक गट बहुसंख्येने आढळतो. दुसरा गट आढळतो तो ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ असा आक्रस्ताळेपणा करीत आपल्या समाजाच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांचा! तिसरा गट तुलनेने ‘अल्पसंख्याक’ असतो, पण तोच या समाजाला विधायक वळण लावत असतो. या गटातील सूज्ञ, दैवजात दु:खांबद्दल आकांडतांडव न करता, जिद्दीने जन्मजात प्रतिकूलतेशी झगडून तिच्यावर मात करतात आणि स्वत:चे एक स्थान तथाकथित उच्चवर्णियांत निर्माण करतात.
चर्मकार समाजात जन्मलेले मुंबईतील एक समाजसेवक रवींद्र बागडेलिखित ‘गटुंळ’ ही आत्मकथनपर कादंबरी वाचताना वरील सारे विचार मनात येतात. त्यामुळेच मुंबईतल्या पदपथावर अमानुष जिणे जगत वाएलेल्या लेखकाचे स्वत:च्या जिण्याबद्दलचे हे चित्रण वाचल्यानंतही वाचक खचून जात नाही; उलट हे पुस्तक त्याला जगण्याची उमेद देऊन जाते.
‘गटुळं’ नायक नाऱ्या हे मुंबईतल्या फूटपाथवर वाढलेल्या लेखकाचेच प्रतिरूप! कमालीचे दारिद्र्य, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची धूळदाण उडवणारा बेजबाबदार बाप, नवऱ्याचा मार खात सात पोरांच्या पोटाला घालण्यासाठी सतत कष्ट करणारी आई आणि सभोवतालच्या बहुरंगी, बहुढंगी मुंबापुरीच्या झगमगत्या पार्श्वभूमीवर वाट्याला आलेले घाणेरड्या फूटपाथवरचे ढोरागत हेच नशिबी आलेल्या नाऱ्याच्या भावविश्वात अनेक जहरी अनुभवांचे ‘गटुळं’ आहे.
यातले फूटपाथवरच भाज्यांच्या हाऱ्यांत, फळांच्या खोक्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, चिरगुटं ठेवत वर्षानुवर्षे जगणाऱ्या नायकाचे भयानक कौटुंबिक जीवन, वेश्याव्यवसायाचे जगावेगळे जग, रेस/जुगार यांचे भोवंडून टाकणारे विश्व या साऱ्यांचे लेखकाने प्रत्ययकारकतेने केलेले चित्रण संवेदनशील पांढरपेशा वाचकांच्या मनाला भोवळ आणते.
मग तो ढोर चाळीत यल्लमाच्या आरतीच्या वेळी भग्या जोगत्याकडून कोवळ्या नाऱ्याला आलेला विकृत लैंगिक अनुभव असो की, शाळेला दांडी मारून सिनेमा बघायला गेला असता, शेजारी बसलेल्या पुरुषांनी त्याच्याशी केलेले लैंगिक चाळे असोत. लेखक ते सारे घृणास्पद अनुभव काहीही हातचे न राखता वर्णन करतो. पण ते सारे जीवनाचा अटळ भाग आहे, हे उमजल्यामुळे, ती वर्णने वाचक कडू औषणाप्रमाणे रिचवतो.
लेखकाची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे अशा या कडवट प्रसंगांबरोबरच संबंधित व्यक्तींच्या व्यक्तिरेखाही तो हुबेहूब साकारतो. त्यामुळेच बायकोच्या मंगळसूत्रवाटीचे पैसे घराच्या भाड्याऐवजी दारूत उडवून टाकणारा, नाऱ्याच्या पहिल्या पगाराचे कौतुक करण्याऐवजी तो चोरून दारूवर उधळणारा, पतीचे/पित्याचे कोणतेही कर्तव्य न बजावताही पत्नीवर नवरेशाही गाजवणाऱ्या बापाचे चित्रण लेखक यथायोग्य करतो. लेखकापासून पोटुशी राहिलेल्या शबनम या वेश्येचे, कष्टाळू आई सायत्रा, त्याच्यावर प्रेम करणारी पण तो भाजीविक्रेता आहे हे कळल्यावर त्याच्याकडे पाठ फिरवणारी वर्गमैत्रीण चंचगल, घरची रोजची भांडणं सहन न होऊन विष खाणारा भाऊ नामदेव या साऱ्या व्यक्तिरेखा लेखकाने नेमकेपणाने उभ्या केल्या आहेत. सभ्यतेची बंधने झुगारून, रांगड्या, बोलीभाषेत सहज उलगडत जाणारी ‘गटुळं’ कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते आणि वाचकाला अंतर्मुख करते.
-नीला उपाध्ये
- DAINIK JANMAT 05-01-2003
रविंद्र बागडे यांची ‘गटुळं’ ही आत्मकथात्मक जबरदस्त अविस्मरणीय कादंबरी…
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रविंद्र बागडे यांच्या वृत्तपत्रीय स्तंभलेख संग्रहास ‘टकूर’ह्या ग्रंथास भारताचे उपराष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हिदायतुल्ला यांच्या शुभहस्ते ‘सोविएत लॅण्ड नेहरु अॅवॉर्ड’ हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता आणि त्यांचीचच आत्मकथात्मक एक जबरदस्त ‘गटुळं’ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्यामार्फत प्रकााित झालेली असून तिचे वाचकांनी व सुप्रसिद्ध नामवंत साहित्यिकांनी कौतुक केले आहे. त्या संदर्भात समीक्षण करणे संयुक्तिक ठरेल. तत्पूर्वी नामवंत साहित्यिकांचे विश्लेषण लक्षात घेवू या. ‘रविंद्र बागडे यांचे लेखन अस्वस्थतेचं विलक्षण प्रत्यय देणारं आहे. दलितांची एवढी आत्मचरित्रे, स्वचरित्रात्मक साहित्य मी वाचल्या आहेत. पण फुटपाथवरील उघड्या आभाळाखालील जगणे एवढ्या वास्तवतेने कोणी चित्रित केलेले नव्हते. पुस्तक वाचल्यानंतर काही वाचू नये असे वाटते. तुमच्या वाट्याला आलेले जगणे त्यावरील लेखन स्तुत्य वे प्रत्ययकारी उतरले आहे. त्यासाठी माझे हार्दिक अभिनंदन! याचा पुढील भाग मी वाचावयास उत्सुक आहे.
– मधु मंगेश कर्णिक
रविंद्र बागडे यांनी उघड्या आभाळाखालील फुटपायारीवरचं जीवन एवढ्या वास्तवतेने मांडलेले आहे की ते काळीज भेदून टाकते. या कादंबरीद्वारा तुम्ही एक वेगळेच जीवनदर्शन घडविले आहे. जीवन विविध स्तरावर व विविध संघर्षाच्या रुपात पसरले आहे. त्यांना स्पर्श करण्याची, ते शब्दांकीत करण्याची समर्थ शक्ती तुमच्या लेखनात आहे. साठोत्तरी पीढीतील हे एक मोठेच सृजनात्मक भान आलेले आहे. आपणही त्यापैकीच एक समर्थ लेखक आहात याचा आनंद होतो. शुभेच्छा!
– नारायण सुर्वे
जीवन विविध स्तरावर संघर्षाच्या स्वरुपातील रंगलेलं असून जुगार, सट्टा, रेस, वेश्या व्यवसाय यांचे मार्मीक चित्रण वास्तवतेतून मांडलेले आहे.
आपल्या संघर्षमय जीवनाचे वास्तवदर्शी प्रत्येकार हे चित्रण कादंबरीत आहे. ते अंतर्मुख आहे. या जीवनाच्या अनुषंगाने आपणही उपस्थित केलेले प्रश्नही महत्त्वाचे आहेत. विरोध भिडला तो सकारात्मक दृष्टीकोन व आपली ओघवती भाषा. एक चांगली कादंबरी वाचल्याचे समाधान मिळाले. त्याकरिता आपले मन:पूर्वक अभिनंदन करते.
– विजया राजाध्यक्ष.
रविंद्र बागडे यांचा या कादंबरीतील सकारात्मक दृष्टीकोन वाखाणण्यासारखा असून ओघवती भाषाशैली मनाला आकर्षून घेते आणि वाचक ह्या कादंबरीत आपोआप नकळतपणे गुंतला जातो. त्यामुळे ही आत्मकथा कादंबरी श्रेष्ठ ठरते. मन रमते, मन गमते आणि जीवन कहाणीचा अर्थ मन समजून घेते. त्यामुळे ओघवती शब्दशैली मनाला भिडतेच भिडते.
एक वाचक श्री. चंद्रकांत वाळींजकर हे आयकर खात्यात सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांनी ही कादंबरी एवढ्या तन्मयतेने वाचली की, अंधेरी स्टेशन सोडून त्यांचा प्रवास जोगेश्वरी पर्यंत गेला. ते म्हणाले जी कादंबरी मनाला तन्मयता लावते ती कादंबरी किंवा साहित्य निश्चितच चांगले असते. आणि ‘गटूळं’ ही कादंबरी एवढी चांगली व चित्तवेधक झालेली आहे की, ती वाचतच राहावी असे वाटते. ही कादंबरी राहावी असे वाटते. ही कादंबरी त्यांना एवढी आवडली की, तिच्या दहा प्रति विकत घेऊन त्यांच्या मित्रांना वाचावयास दिल्या.
मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे, विजया राजाध्यक्ष तसेच अरुण साधु यांनीही लिहिले आहे. ते म्हणतात की, ही कादंबरी एक दमात वाचून काढली परंतु वाचताना मनात निरनिराळे विचार येऊ लागले.
यावर एखादी दूरदर्शनवरील मालिका देखील येऊ शकेल. ही कादंबरी डॉ. जी. पी. माळी यांनी वाचली आणि लिहिले आहे की, रविंद्र बागडे यांनी ‘मी’चा घेतलेला शोध जेवढा वाचनीय, चिंतनीय तेवढाच अविस्मरणीय आहे.
मलपृष्ठावर म्हटलेले आहे की, चर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या रविंद्र बागडे यांची आत्मकथात्मक कादंबरी यातला नाऱ्या हे लेखकाचेच प्रतिरुप, कमालीचं दारिद्र्य, दारुच्या व्यसनापायी कुटुंबाची धुळधाण करणारा बाप आणि नवऱ्याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई, नवऱ्याकडून अतोनात छळ सहन करून ही मुलाबाळांसह एकत्र जीवन जगणारी कुटुंबवत्सल सावित्री, सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावराच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुढंगी, बहुरंगी मुंबई हे नाऱ्याच प्राक्तन. त्यामुहे त्यांच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवाचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथात केवळ गरीब समाजाचं दर्शन घडत नाही. तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्रण उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार आणि विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे.
आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी? त्यांच्या पोटाची सोय होत नाही तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी? बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.
ही समस्या फक्त मुंबईच्या फुटपाथवरच्या नारायणाची नाही तर जगातल्या सर्व गरीब देशातल्या दीन दलित समाजाची आहे. गटूळं मधील जीवन हे केवळ त्याच एक प्रतीक आहे.
कचऱ्याच्या डब्याजवळ कुत्री, मांजरी, अन्न शोधतात तशी पोरंही येतात. कचऱ्यातून कागद गोळा करणाऱ्या बायाही आढळतात. अन्नाला मोहताज असणाऱ्या त्या दुर्दैवी पोरांचा कुणी वाली असतो? असतील तर आपल्यासारखेच त्यांचेही आईबाप असतील, त्यांनाही कुणीतरी काढून ठेवलंच ना? या सगळ्या विचारांची साखळी नाऱ्याच्या मनात वाटाय लागली. स्वत:वर परिस्थिती ओढावल्यामुळे कचऱ्याच्या डब्यातून अन्न शोधणाऱ्या हिंदू स्थानातल्या तमाम पोरांची किव नाऱ्याला त्याक्षणी आली.
कोवळ्या वयातील नाऱ्याच्या वाटेला आलेलं जीवन किती कटू आणि कठोर होतं, याची कल्पना प्रस्तुत वर्णनावरून येण्यास हरकत नाही. मराठी साहित्यातील भाषेचे वेगळेपण या कादंबरीत आढळते. मुळची सातारा ढंगाची ग्रामीण भाषा आणि हिंदीच्या प्रभावातील खास बम्बई छाप मराठीभाषा यांचं बोलाचालीतलं मिश्रण चित्तवेधक झालेलं आहे. त्यामुळे हा साहित्य कथानुरुप प्रतिभाशाली ओघवत्या वळणाचे वाचनीय, चिंतनीय व अविस्मरणीय झालेलं आहे. यातील घटना व काही प्रसंग आपल्याच घरातील आहे हे जाणवायला लागतेच. प्रस्तुत लेखकाच्या आई सावित्रीबार्इंचे वर्णन मदर इंडियातली आठवण देऊन जाते. ह्या देशातल्या गरीबीचं, दिन दारिद्र्याचं भयानक दर्शन या कादंबरीत ओथंबून भरलेले आहे. दलित आत्मकथानाची ही कादंबरी लेखकाने मोठ्या खुबीने नकळतपणे परंतु सहजगत्या केलेली आहे. या कादंबरीतील आत्मकथनकातील ‘मी’मीचं वर्णन करत नसून स्वत: लेखक त्याचं वर्णन करत आहे. तो म्हणजे मीच आहे हे मनोगतात दर्शनीच सांगितलेलं आहे. मराठी साहित्यातला हा एक वेगळा प्रकार आहे असे एक वाचक अॅडव्होकेट राम जाधव यांनी सांगितले. शिवाय मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण कांबळे यांनी देखील तेच सांगितलेले असून ही कादंबरी आवडल्याचे ही मनोगत व्यक्त केले आहे. प्रा. केशव मेश्राम यांनी देखील या संदर्भात चांगली प्रतिक्रिया व्यक्त करून लेखकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
– दत्तात्रय टोणपे
- SAPTAHIK CHANDRPRABHA 14-20 DEC 2001
गटुळं : सामान्य माणसाच्या संघर्षाची कथा…
श्री. रवींद्र बागडे यांची ‘गटुळं’ ही कादंबरी म्हणजे एका सामान्य माणसाच्या आयुष्यातील जगण्याच्या संघर्षाची कथा आहे. ही कादंबरी म्हणजे लेखकाच्या जीवनात घडलेल्या आणि त्याच्या आठवणीत राहिलेल्या महत्त्वाच्या घटनांचे हे गाठोडे आहे. संवेदनशील मनाला त्या त्या वेळेला जाणवलेल्या विविध भाव भावनांचे पदर उलगडून दाखवितांना स्वत: लेखक अलिप्तपणे सांगत जातो.
मनोगतात लेखक आपण शूद्र जातीत जन्माला आल्याचा फक्त उल्लेख करतो. परंतु संपूर्ण कादंबरीभर, त्याला भोगावे लागलेले फुटपाथवरील जगणे, प्रकर्षाने एका वेगळ्या आणि अस्सल जाणीवेने समोर येते. दारुच्या व्यसनामुळे कुटुंबाला शिवीगाळ करून पैशासाठी बायकोला मारहाण करणारा बाप स्वत: दारु पितो पण शाळा बुडवून सिनेमाला जाणाऱ्या नारायणाला मात्र रागावतो. ‘नारायण’ हा या कादंबरीचा नायक किंबहुंना; ही नारायणाची आत्मकथाच आहे. त्यात फुटपाथवरील एका आयुष्याचा आलेख आहे. दारिद्र्यामुळे माणलसा किती हीन दर्जाचे जिणे जागावे लागते त्याचे वास्तव चित्रण आहे. हे सगळे सांगतातना नारायणाच्या मनात प्रस्थापितांबद्दल चीड नाही. त्याल वाटते की हे त्याच्या नशिबाचे भोग आहेत. त्यासाठी तो कुणालाही जबाबदार ठरवित नाही. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत राहतो. रस्त्यावर भाजीचा धंदा करणारे हे संपूर्ण कुटुंब एका बाकड्यावर आपला संसार करत. नारायणाची आई, सावित्री म्हणजे कष्टमूर्तीच! मुलांच्या भल्यासाठी ही बाई सतत धडपड करीत असते. त्यांना शिक्षण देण्याची तिची फार इच्छा असते. नवऱ्याचे दारु व जुगारात पैसे उडविणे आणि पैशासाठी सगळ्या कुटुंबाला मारहाण करणे, शिवाय नेहमीच पैशाची असणारी चणचण, काबड कष्ट करून सुद्धा मुलांना पोटभर न मिळणारे जेवण या सगळ्या अगतिकतेमधून नवऱ्याशी भांडताना मनातील राग उफाळून येतो आणि त्याला सर्रास शेलक्या शिव्या घालते. अशाच एका भांडण प्रसंगी हा सगळा ताण असह्य होऊन नारायण बापाला डोके फुटेस्तोवर मारतो.
एकदा नवरा दारुच्या नशेत सावित्रीवर घाणेरडा आरोप करतो त्यामुळे व्यथित होऊन ती मुलांना घेऊन माहेरी जायचे ठरविते. त्यासाठी नवऱ्याच्या मित्राकडून खर्चासाठी पेसे घेते आणि तिकीट काढून स्टेशनवर येते. तिथे सुद्धा नवरा तमाशा करतो. ती बिचारी पुन्हा मुंबईच्या फुटपाथवर येते. नाराण पहाटे उठून हॉटेलमधील एका कोपऱ्यात बसून अभ्यास करतो. त्याची शिकण्याची तीव इच्छा पाहून ती एकदा बिऱ्हाड माहेरी हलविते. पण येथे सुद्धा तो दारू पिवून धिंगाणा करतो. त्यामुळे माहेरी अपमानित होऊन ती पुन्हा फुटपाथवर संसाराला लागे. हे सारे जीवन जगाताना त्याच्या जीवनात आलेल्या मुलींच्या तात्कालीक प्रेमाची हिरवळ सुद्धा मध्येच येऊन जाते. अशाच अडचणींवर मात करून जिद्दीने तो एस्. एस्. सी. पास होतो आणि त्याच्या आयुष्याला स्थिरता लाभायला लागते. येथे एका प्रसंगाची आठवण येणे स्वाभाविक आहे. नारायण नोकरीला लागून पहिला पगार रुपये एकशेतीस घेतो. एकरक्कमी. एवढे पैसे तो प्रथमच पाहत असल्याने त्या खर्चाच्या संदर्भात अनेक मनोरथ पण त्याने रचलेले असतात. पण पुन्हा एकदा त्याचा बाप ते पैसे चोरुन तो जुगार खेळतो. त्याचा संताप अनावर होऊन तो बापाला मारतो! त्याचा संवेदनशील मनाला त्रास होतो व तो पश्चात्ताप सुद्धा करतो.
अशा अनेक प्रसंगांनी ही कादंबरी भरलेली आहे. फुटपाथवरच्या जीवनाचा हा एक अस्सल आलेख आहे. घरात दारिद्र्यामुळे हताश होऊन कसे लाजिरवाण जिणे जगतो याचे सुंदर चित्रण आहे. माणूस समाजापासून सतत शिकत असतो. पण नारायणाला मात्र समाजाने दिले नैराश्य! पण या दाहक वास्तवाचे चटके सोसूनही तो एस्.एस्.स. पर्यंत शिकतो. त्याच्या जीवावर तो आपला जगण्याचा स्तर फुटपाथवरून बऱ्यापैकी झोपडपट्टीतील जगण्यापर्यंत उंचावतो. येथे कादंबरी संपते. या कादंबरीत जरी पददलित समाजाचे वास्तव दर्शन असले तरीही हा नायक त्रूाचा राग प्रस्थापितांवर काढीत नाही. आपल्या दरिद्री जीवनातून मार्ग काढीत वर सरकण्याचा प्रयत्न करतो. या कादंबरीतील भाषा साधी सोपी आणि बोलीभाषा आहे. यामुळे चर्मकरांच्या धंद्यातले शब्द जसे अपरिहार्यपणे येतात तसेच फुटपाथवरील कचकचीत शिव्यासुद्धा! मात्र हे सगळे सांगतातना लेखक फक्त अलिप्तपणे एकेक अनुभव सांगत सांगत जातो आणि त्या अनुषंगाने येणारे नायकाचे विचार! यात खलनायक आहे. ती ‘परिस्थिती’ त्यामुळे ही कादंबरी एकांगीपणे उगाचच दु:खाचा बागुलबुवा करीत नाही. तर या कष्टप्रद जीवनातून सुद्धा प्रयत्नाने बाहेर पडता येते आणि तुमचे प्रयत्न जर सच्चे असतील तर समाजातील घटक तुम्हाला मदतच करतील अशी आशादायक भावना मनात निर्माण करते. जीवनातील संघर्ष अलिप्तपणे भोगता येतो, याचे वास्तव दर्शन या कादंबरीत आहे. यातील अनुभवाच्या सच्चेपणासाठी ही कादंबरी जरुर वाचावी.
-रवींद्र पारकर
- DAINIK SAMANA 04-03-2002
गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याचे वास्तव चित्रण…
कुणाच्या पोटी आणि कशा परिस्थितीत जन्म घ्यावा हे जरी आपल्या हातात नसले तरी आयुष्यात किमानपक्षी अभिप्रेत असलेले आयुष्य सुखाने घालवायला मिळावे ही माणसाची इच्छा असते; परंतु काही वेळाने नियतीचे फासे इतके विरूद्ध पडतात की जगूच नये असे वाटू लागते. तरीही काहीजण परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाला आकार देतात. त्यांची ही धडपड सार्थकी लागते. ‘गटुळं’ या रवींद्र बागडे यांच्या आत्मकथनात्मक कादंबरीचे स्वरूप नेमके असेच आहे. चर्मकार समाजाच्या जीवनाची पार्श्वभूमी या कथानकाला लाभली आहे.
घरात अठराविश्वे दारिद्र्य, ढोर मेहनत, काबाडकष्ट करून संसार चालवणारी सायमाबाई, तिचा दारूड्या, व्यवसनाधीन व बायकामुलांना मारणारा नवरा, पोराबाळांचे लेंढार, हातावरचं पोट त्यामुळे दोन वेळची चूल पेटेल की नाही याची भ्रांत, गलिच्छ फुटपाथवरचे उघडेनागडे जग व जनावराच्या मोलाचे जगणे असे सारे गणित असताना नाराण उर्फ ‘नाऱ्या’ परिस्थितीला टक्कर देत मोठा होतो. त्याची धडपड, त्याने इतक्या विदारक स्थितीतही जपलेली स्वप्ने आणि सामाजिक जाणीव वाचकांना अंतर्मुख करते.
सायमाबाई ही मोलमजुरी करणारी. कष्टाने पैसा मिळवावा, पोराबाळांना शिकूनवरून मोठे करावे आणि कुणाची उधारी कर्ज न घेता सुखाने राहावें अशी आशा बाळगणारी पण तिच्या साऱ्या स्वप्नांना छेद देणारा तिचा नवरा. घरात पैसा आला की दारू, जुगार, रेस यात उडवणारा. त्यामुळे घरभाड्याशी वानवा. कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारा, सतत नातेवाईक किंवा ओळखीच्यांवर अवलंबून राहणारा. त्यात अधिक म्हणजे ५-७ पोटांचा पोटवडा. त्यांनाही धड शिक्षण नाही, पोटाची भूक कधी भागेल, कधी नाही आणि समोर आईवडिलांची रोजची मारामारी, शिवीगाळाची भाषा त्यामुळे त्त्यांचे कोमल मन करपून गेलेले. अशावेळी ‘नाऱ्या’ ला कळून चुकते की याच चिखलात रुतून बसलो तर काही खरं नाही. म्हणून तो भाजी विकायला लागतो, शाळा शिकतो, पहाटे उठून केळकरांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून अभ्यास करतो, शाळा झाल्यावरन भाजी विकून आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. उत्तम अभ्यास करून मॅट्रिक होतो. आता त्याला नोकरीचे वेध लागतात. कारण पैसा हवा असतो. त्याचवेळी या मोहमयी मुंबापुरीच्या कवेतले सारे अनुभव घेतो. पण त्याला कळून चुकते की आपल्यासारख्या इतरांनाही आपण मदत केली पाहिजे, त्यांचे संघटन करायला हवे ही नवी जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून मग त्याच्या भोवतालच्या सर्व भाजीवाल्यांना महानगरपालिकेकडून भाजी विकण्याचा परवाना मिळवून देतो. मित्रांच्या संगतीने वेश्यांचे जगही तो पाहतो. त्यांचे जीणे पाहून अस्वस्थ होतो. इतके की शबनम नावाच्या वेश्येबरोब राहताना तू माझ्याशी लग्न करशील का असे विचारतो. नंतर बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या करतो, परंतु तिथेही त्याला वेगवेगळी माणसे भेटतात, त्यांचे प्रश्न भेडसावतात. मध्यमवर्गीय लोकांच्या जगातले बरेवाईट अनुभव घेत राहतो. अशावेळी त्याचा मामा लग्नासाठी तयार हो म्हणून मागे लकडा लावतो; परंतु आपल्या परिस्थितीची डोळस जाणीव असल्यामुळे स्वत:चे घर असल्याशिवाय लग्नाचा विचार झेपणार नाही असे ठासून सांगणारा नाऱ्या वाचकांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. मित्रांच्या मदतीने तो घर घेतो आणि योगायोगाने मामाकडे लोणंदला जातो. मामा राजकारणा असल्याने लहान-मोठी समाजसेवेची कामे त्याच्याकडे असायची. त्याच्याच दूरवरच्या नात्यातली एक मुलगी लोणंदला नोकरीसाठी आली होती. तिची राहायची सोय मामाने आपल्या घरात केली होती. त्या ठिकाणी ऊर्मिलेची आणि नारायणाची भेट होते. ओळख होते. मनामनाच्या गाठी जुळू लागतात. ऊर्मिलेचे पूर्वायुष्य ऐकून नारायणाचे मन हेलावते. आपल्या आयुष्याशी हिचे आयुष्य मिळतेजुळते आहे असे कळून चुकते. तो ऊर्मिलेकडून तिच्या वडिलांचा मुंबईचा पत्ता घेतो. बापलेकीची भेट घडवतो आणि नारायणाच्या जीवनात ऊर्मिला येते. नवीन घर आकाराला येते. नारायणाचा संसार फुलायला लागतो आणि ‘गटुळं’ घेऊन नारायणाची आई आणि ऊर्मिलेची सासू नव्या घरात येते. सायमाबाई, तिची मुले, नारायण-ऊर्मिला आणि नवे घर सारं फुलू लागते. आकार घेऊ लागते. ऊर्मिला त्या ‘गटुळ्याकडे’ पाहत राहते. जणू काही सारे पूर्वायुष्यच त्यात बांधले गेले आहे.
पुस्तक वाचताना रवींद्र बागडे यांनी जे विश्व दाखविले आहे, त्यात एक सच्चेपणा आहे. उगाच प्रसंग ओढूनताणून आणलेले नाहीत. एका भयाण वास्तवाचे चटके मात्र वाचकाला सतत बसतात. त्यामुळे सारे चित्रण जिवंत वाटते. या सर्व माणसांचे जग, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची स्वप्ने सारे काही खूप वेगळे आहे. पुस्तक वाचताना जयवंत दळवींच्या ‘चक्र’ कादंबरीची आठवण होते. पांढरपेशा लोकांच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळे, धक्का देणारे जग बागडे यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने मांडले आहे. यानिमित्ताने अनेक प्रश्न सहज उभे राहतात. ‘नाऱ्या’सारखी असंख्य माणसे अशा परिस्थितीत कशी जगतात? याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कुणासाठी? आधी पोटाची व्यवस्था करून मग चरितार्थासाठी पैसा कमविणे हे गणित सोडवू पाहणारी ही माणसे कशी राहतात? मात्र ‘नाऱ्या’सारखी अस्मिता असणाऱ्यांना या पुस्तकाद्वारे निश्चितच पाठबळ मिळेल, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेपावणारा नाऱ्या, कादंबरीचा नायक अनेक तरुणांना स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही.
-रवींद्र लागू
- DAINIK SAKAL 20-01-2002
दरिद्री ‘नारायणा’ची संघर्षपूर्ण जीवनकहाणी…
नारायण रामभाऊ बागडे उर्फ नाऱ्याच्या दाहक जीवनानुभवांची कहाणी रवींद्र बागडे यांच्या ‘गटुळं’ या आत्मकथात्मक कादंबरीतून प्रकट झालेली आहे. दलित समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या पदपथावर वाढलेल्या बागडे यांची दर्दभरी जीवनकहाणी वाचत असताना वाचक नाऱ्याच्या व्यथा-वेदनेशी केव्हा आणि कसा एकरूप होतो कळतच नाही. कारण हे केवळ नाऱ्याचे चित्रण आहे, असे वाटतच नाही. त्याच्याच शब्दात सांगायचे तर ‘‘ही समस्या फक्त मुंबईच्या फुटपाथवरच्या ‘नारायणा’ची नाही. जगातल्या सर्व गरीब देशातल्या दीन-दलित समाजाची आहे. ‘गटुळं’ मधील जीवन हे केवळ त्याचे एक प्रतीक आहे.’’
रामभाऊ आणि सायत्रा यांच्यापोटी जन्माला आलेला नारायण हा सात पोरांच्यापैकी सर्वांत मोठा. वडिलोपार्जित चालत आलेला चांभारकीचा धंदा सोडून रामभाऊ भाजीपाला विकण्याचा धंदा करायचं ठरवून सातारा जिल्ह्यातील लोणंहून मुंबईला येतो. एका पाठोपाठ एक अशी सात मुलं जन्माला घालतो; पण स्वत: मात्र दारूच्या आणि जुगाराच्या व्यसनात आकंठ बुडून जातो. सायत्रा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते. पोरांसाठी वाट्टेल तेवढे कष्ट उपसते, नवऱ्याचा मार खाते, प्रसंगी भीक मागून का होईना पण मुलाबाळांना सांभाळते. शिवराळ आणि व्यसनाधीन बाप आणि नवऱ्याच्या छाळाला तोंड देत देत मुलांना सांभाळणारी आई यांच्या सहवासात नाऱ्याच्या जीवनाची वाटचाल सुरू होते. या कादंबरीतील घटना साधारणपणे १९५५ ते ६८ या काळातल्या आहेत. बालपणापासून विवाहापर्यंतचा काळ या कादंबरीत चित्रित झालेला आहे. बालपण, शिक्षण, तरुणपण, बेकारी, नोकरी आणि विवाहापर्यंतचे नाऱ्याचे जीवन म्हणजे दारिद्र्य, व्यसनाधीनता, पिळवणूक, मानहानी, उपासमारी, भटकंती इत्यादींचं ‘गटुळं’च होय.
ही कादंबरी असली तरी यात कल्पनाविलासाला स्थान नाही. धगधगते वास्तव हाच या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. काही पात्रांची नावे आणि ठिकाणे मात्र बदलेली आहेत. यातील बहुतांश भाग मुंबईच्या विविध भागात घडत असल्याने ही जशी नाऱ्याची तशीच भौतिक प्रगती आणि नैतिक अधोगतीच्या चक्रात अडकलेल्या बकाल मुंबईचीही शोकपूर्ण कहाणी आहे. वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा मुंबईतला विशिष्ट परिसर, जुगारांचे अड्डे, रात्रीच्या निवाऱ्यासाठी बेघर मुंबईकरांची जीवघेणी केविलवाणी व किळसवाणी स्पर्धा, गर्दीतील प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीसाठी अपरिहार्यपणे चालणारी संघर्षपूर्ण वाटचाल या सर्वांचे चित्रण करताना लेखकाची प्रामाणिक तळमळ प्रकर्षाने जाणवते.
‘उपरा’, ‘उचल्या’, ‘बलुतं’, इत्यादी आत्मकथनांमधील नायकाची वेदना ही प्रामुख्याने समाजव्यवस्थेवर अवलंबून आहे, तर ‘गटुळं’मधील नायकाच्या दु:खाला प्रामुख्याने अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. जात-धर्म यापेक्षा सर्वव्यापी दारिद्र्याशी त्याला सातत्याने निकराची झुंज द्यावी लागते.
‘कचऱ्याच्या डब्याजवळ कुत्री, मांजरी अन्न शोधतात तशी पोरंही येतात, कचऱ्यातून कागद गोळा करणाऱ्या बायाही आढळतात. अन्नाला महाग असणाऱ्या त्या दुर्दैवी पोरांचा कुणी वाली असतो? असतील तर आपल्यासारखेच त्यांचेही आई-बाप असतील. त्यांनाही कुणीतरी काढून ठेवलंय ना! या सगळ्या विचारांची साखळी नाऱ्याच्या मनात वाटाय लागली. स्वत:वर परिस्थिती ओढवल्यामुळं कचऱ्याच्या डब्यातून अन्न शोधणाऱ्या हिंदुस्थानातल्या तमाम पोरांची कीव नाऱ्याला त्याक्षणी आली.’’ कोवळ्या वयातील नाऱ्याच्या वाट्याला आलेलं जीवन किती कटू आणि कठोर होतं, याची कल्पना प्रस्तुत वर्णनावरून येण्यास हरकत नाही.
नाऱ्याचे जीवन मुंबईत व्यथित होत असल्याने मूळची सातारी ढंगाची ग्रामीण भाषा आणि हिंदीच्या प्रभावातील खास ‘बम्बई’ छाप मराठी भाषा यांचे मिश्रण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावयास मिळते. नाऱ्याच्या बापाचा शिवराळपणा, आईचा तोंडाळपणा, वेश्या वस्तीतील स्त्री-पुरुषांचा फटकळपणा प्रकट करताना लेखकाच्या भाषेचे सामर्थ्य आणि कौशल्य लक्षात येते. आई आणि सर्व भावंडांविषयीची लेखकाची सहानुभूती आणि ओढ प्रकट होत असतानाच बापाच्या वर्तनामुळे आलेली कटुताही वेळोवेळी व्यक्त झालेली आहे. कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, भाषाशैली, निवेदनशैली इत्यादी घटकांच्या दृष्टीने विचार करता ‘गटुळं’ला कादंबरी म्हणण्याऐवजी दलित आत्मकथन असेच संबोधणे अधिक संयुक्तिक वाटते. जयवंत दळवींच्या ‘चक्र’ या कादंबरीची आणि बहुतेक सर्व दलित आत्मकथनांची परंपरा पुढे चालवणारी ही कलाकृती असली तरी अधिकाधिक व्यापकपणाने संपूर्ण समाजाचे चिंतन करून केलेले लेखन यात आढळते. नीळकंठराव खाडिलकर, माधवराव गडकरी, आत्मराव सावंत, विद्याधर गोखले यांसारख्या वृत्तपत्रसृष्टीतील दिग्गजांच्या प्रेरणेतून लिहिलं गेलेलं. ‘गटुळं’ म्हणजे दलित आत्मकथनाच्या वाटचालीतील वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अपत्य आहे. लेखकाचे मनोगत आणि शेवटी देण्यात आलेली शब्दावली ‘गटुळं’ समजून घेण्यास उपयुक्त ठरते. डोक्यावर परिस्थितीचं ‘गटुळं’ घेऊन लेखकाने केलेली वाटचाल आणि ती करत असताना सातत्याने ‘मी’चा घेतलेला शोध जेवढा वाचनीय चिंतनीय तेवढाच अविस्मरणीय होय.
-डॉ. जी. पी. माळी