* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COME ON GET SET GO...
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788177665703
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARE YOU INTERESTED TO KNOW ABOUT ` * YOUR RIGHTS WHILE BEING QUESTIONED BY POLICE. * AT THE TIME OF ARREST. * YOUR RIGHTS IN PRISON. * YOUR RIGHTS WITH GOVERNMENT/COURT. * YOUR FUNDAMENTAL HUMAN RIGHTS. -HUMAN RIGHTS- IS ONE OF ITS KIND OF BOOK WHICH ENTAILS ABOUT YOUR BASIC AND FUNDAMENTAL RIGHTS. READ THIS BOOK AND BE AWARE OF YOUR RIGHTS AND HENCEFORTH, FUNCTION AS A MORE RESPONSIBLE AND ACTIVE CITIZEN.
यशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं. खरा यशस्वी माणूस आणि यशस्वी असल्याचं ढोंग करणारा माणूस, ह्यांच्यातला सूक्ष्म फरक हे पुस्तक तुम्हांला सांगतं. हे पुस्तक तुम्हांला स्वत:चा शोध घ्यायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हांला `सर्वात उत्तम` बनवत नाही, पण ते तुम्हांला `कोणापेक्षाही कमी नाही` असं बनवतं. लोक टीका करतात, तक्रार करतात आणि स्वत:ची कीव करतात. लोक कृत्रिमपणे वागतात, मत्सर करतात, उद्धटपणानं वागतात. लोक बढाया मारतात, त्यांची प्रगती खुंटते आणि सर्वात कमाल म्हणजे, हे सर्व ते कबूल करत नाहीत. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मधे बदल घडवून आणायला प्रेरणा देतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 28-08-2005

    स्वत:मध्ये बदल घडवू इच्छिणाऱ्यांसाठी... कोणत्याही व्यक्तीने पहिल्यांदा स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. त्यानंतरच स्वत:च्या अंगभूत गुणांची जाणीव होते. यशस्वी होण्यासाठी जीवनाच्या वाटचालीत पदोपदी संघर्ष करावा लागतो. त्या वेळी निरनिराळ्या तऱ्हेच्या व्यक्ती भटतात. त्यांचे स्वभाव, दुर्गुण यांचा अभ्यास करूनच त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, लोकांशी वांद कसा साधावा याविषयी पती-पत्नी लेखकांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अनेक विषय समजावून दिले आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. स्वत:मध्ये बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-08-2005

    यशाच्या दिशेने... आज दैनंदिन स्पर्धा, तणाव मिनिटागणिक वाढत आहेत. या तणावांना, स्पर्धेला तोंड देणे सगळ्यांनाच शक्य होते, असे नाही. प्रत्येकजण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. त्यात काही यशस्वी होतात. काहींना ते जमत नाही. त्यामधून मग नैराश्याचा भवरा निर्माण होतो. या अडचणी मग दैनंदिन वाटचालीत माणसाला अधिकच अडचणीत टाकतात. त्यातून निर्माण होते नकारात्मक मानसिकता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक पुस्तके प्रकाशित होत असून त्यांचा उपयोगही होत आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी माणसाला मार्ग दाखविण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरत आहेत. याच पठडीतील ‘चला! उठा! कामाला लागा’ या पुस्तकाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. स्वाती व शैलेश लोढा यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या या पुस्तकांचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला काय करावे’ यापेक्षा काय करू नये’ याचा अंदाज येत नाही. कोठे कसे वागावे, बोलण्याच्या पद्धती, आवाजाचा सूर, याचे यथायोग्य ज्ञान नसल्यामुळे माणसे बऱ्याचदा त्यांचा मुद्दा बरोबर असूनही हकनाक अडचणीत येतात. त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. आत्मविश्वासाचा अभाव, हे त्यामागचे आणखी एक कारण! आपल्याला मिळालेले यश, आपली प्रगती आदी गोष्टी ज्यांत बहुसंख्यांना फारसा रस नसतानाही त्याबद्दलची टिमकी मारणे, बढाया मारणे या गोष्टींमुळे आपण कसे इतरांमध्ये अप्रिय ठरू शकतो. आदी मुद्द्यांचा ऊहापोह ‘चला! उठा!...’ या पुस्तकात नेमकेपणाने करण्यात आला असून आपल्यातील लहान-मोठ्या गुणदोषांचा आरसाच जणू आल्यासमोर येतो. त्यामधून वाचकाला मिळते नवी दृष्टी! तुम्ही स्वत:मधील दोष, आळस झटकून टाका आणि कामाला लागा, असा संदेश देणारे हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवेल, असा लेखकांनी केलेला दावा निश्चितच अवास्तव वाटत नाही! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 11-09-2005

    हे पुस्तक तुम्ही वाचलंत तर तुम्ही स्वत:ला समजू शकाल. या पुस्तकावर तुम्ही विचार केलात, तर तुम्ही स्वत:ला आवडू लागाल. तुम्ही तुमच्या मनात हे पुस्तक ठसवलंत, तर तुम्ही स्वत:वर प्रेम करू लागाल. यशस्वी होण्यासाठी तुमचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक या पुस्काच्या रूपाने हजर आहे. मूळ इंग्रजी लेखक स्वाती शैलेश लोढा या स्वत:च एक आदर्श आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच यांचा पहिला लेख प्रकाशित झाला होता. त्याचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय अचंबित करणारा होता. सध्या त्या श्वाश या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंटच्या कार्यक्रम संचालिका आहेत. शैलेश लोंढा यांचे ‘अ‍ॅन इव्हिनिंग वीथ शैलेश लोढा’ हा व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम जगभरात यशस्वी झाला आहे. हास्य आणि शिक्षण यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात असतो. तुमच्यापर्यंत अतिशय साध्या आणि ओघवत्या मराठीमध्ये हे पुस्तक आणले आहे. अंजनी नरवणे या गुणी लेखिकेने आणि अर्थातच पब्लिशक आहेत पुण्याचे मेहता पब्लिशिंग हाऊस. संधी ही देवासारखी असते. ती सर्वत्र असते आणि सर्वशक्तिमान असते, यशस्वी होण्यासाठी आपली मनोवृत्ती बदलणे आणि बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे, असे मित्रत्वाचे सल्ले देणाऱ्या या पुस्तकात यशस्वी होण्यासाठी प्रथम काय करू नये ते शिका. मग काय करावं ते शिका असा थोडा हटके सल्ला दिलेला आहे. यशस्वी व्यक्ती आणि यशस्वीतेचे ढोंग करणारी व्यक्ती यांच्यातील फरक हे पुस्तक उलगडून दाखवते. हे पुस्तक तुम्हाला सर्वांत उत्तम बनवित नाही पण कोणापेक्षाही कमी नाही, असे बनविते. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देते. आम्ही एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असते. असा स्वाती आणि शैलेश लोढा यांचा विश्वास आहे. ‘काहीच न शिकणारे अयशस्वी, कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, दिखाऊ यशस्वी, खरे यशस्वी अशा प्रकारचे वर्गीकरण करून समाजातील विविध पातळीवर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि खास करून तरुण वर्गांच्या स्वभावाची माहिती यात दिलेली आहे. नकारात्मक स्वभाववैशिष्ट्ये कशी दूर करायची आणि सकारात्मकता अंगी कशी बाळगायची ते उदाहरणांनी समजावून दिलेले आहे. हे पुस्तक आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते प्रगल्भ करण्यासाठी कोणते उपाय आणि बदल करणे गरजेचे आहे हे अचूक सांगते. सातत्याने प्रयत्न करणारेच पुढे जातात व यशस्वी होतात पण या मिळालेल्या यशातही सातत्य टिकविणे आवश्यक आहे. संधी गुपचुप चालू येत असते. तुमच्या कानांना त्याच्या पावलांचा आवाज ओळखायला शिकवा. आपल्यातील आत्मविश्वास अपयश आले म्हणून कमी होवू देऊ नका. टीका करणे, तक्रार करत राहणे, आत्म-विश्वासाचा अभाव, प्रश्नाचा डोंगर, निष्कारण नकारात्मक वटवट, स्वत:ची सतत किव करणे, अशा सवयी जर तुम्हाला असतील तर वेळीच सावध होण्याचा सल्ला हे पुस्तक देते, कारण या सवयी म्हणजेच तुम्ही. अयशस्वी असयाची लक्षणं आहेत. सर्वार्थाने वेगळे व प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला शिकविणारे हे पुस्तक मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच एक खजाना आहे. स्वत:शी नव्याने संवाद साधायला लावणार हे पुस्तक सांगते की, ध्येय ही आयुष्याबरोबर मैलाच्या दगडासारखी जात असतात. आपण एकापर्यंत पोचलो की आपली नजर पुढच्या ध्येयाकडे लागते. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचालच... चला! वाचायला लागा. लेखकाप्रमाणे माझी खात्री आहे की, हे पुस्तक वाचून संपवाल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगले असाल, हे बदल टिकवून ठेवा... ...Read more

  • Rating StarLOKMAT 17-9-2006

    स्वाती शैलेश लोढा यांच्या ‘कम ऑन - गेट सेट गो’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. लोढा पतिपत्नी बुद्धिमान, धाडसी आणि उत्साही असून, त्यांनी राजस्थानात ‘स्वाश’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था लोकांमध्ये प्रगी घडवून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देते. त्या कार्यशाळेत गेलेल्या लोकांची मनोवृत्ती व वर्तन यांत लक्षणीय बदल घडून येतात. स्वाती जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची कार्यकारी संचालिका आहे. तर स्टेजवर सादर होणारे शैलेशचे व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम देश-परदेशात गाजलेले आहेत. प्रशिक्षणाच्या त्यांच्या अनुभवाचे फलित म्हणजे हे पुस्तक. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे, हे सांगणारी पुस्तके आहेत; पण हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी काय करू नये, हे सांगण्यावर भर देते. ते वाचकांना स्वत:मध्ये आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करते, आत्मशोध घ्यायला प्रवृत्त करते. जीवनाच्या वाटचालीच्या दृष्टीने मौलिक मार्गदर्शन घडवते. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देते. म्हणूनच ते महत्त्वपूर्ण ठरते. या वेगळ्या विषयावरील विवेचनाची विभागणी सात प्रकरणांमध्ये केली आहे. कोष्टके, रेखाचित्रे, महत्त्वपूर्ण वाक्यांचे स्वतंत्र चौकटीत केलेले उल्लेख यामुळे पुस्तक लक्षवेधी झाले असून, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठाने त्याचे सौंदर्य वाढले आहे. ‘हे प्रकरण न वाचता पुस्तक वाचू नका’ असे बजाविणाऱ्या प्रस्तावनते दुसऱ्या व्यक्तीचे दोष शोधत न बसता, स्वत:मधील उणिवांचा विचार करावा, असे सुचविले आहे. लेखकाने या पहिल्याच प्रकरणात चार प्रकारच्या लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत - १) काहीच न शिकणारे अयशस्वी, २) कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, ३) दिखाऊ यशस्वी व ४) खरे यशस्वी. दुसऱ्या प्रदीर्घ प्रकरणात ‘अयशस्वी होण्याच्या लायकीचे लोक’ सतत तक्रारी व टीका कसे करीत राहतात, स्वत:ची कीव कशी करतात, त्यांच्या मनात कोणतेही काम करताना ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती कशी असते, स्वत:च्या अडचणींचे वर्णन करून ते लोकांची सहानुभूती कशी मिळवितात, त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव कसा असतो, ते सतत भूतकाळाबद्दल बोलत कसे राहतात, याचे वर्णन आहे. असे लोक मनातून मत्सरी असतात. ते आळशी असतात, त्यांच्यामध्ये स्वयंनिर्णयाची कुवत नसते. त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. लेखकाच्या मते, असे अयशस्वी लोक मनाने लाकडी पुतळ्यासारखे असतात. तिसऱ्या प्रकरणात ‘दिखाऊ यशस्वी लोकां’ची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे लोक अहंमन्य असतात. ते स्वत:चे यश फुगवून सांगतात आणि इतरांचे यश तुच्छ मानतात. ते आत्मसंतुष्ट असतात आणि त्यांना बढाया मारण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते; पण त्यांचे हे दोष सामान्य लोकांच्या लक्षात न आल्याने लोक त्यांना यशस्वी समजत असतात. ‘शिकण्यासाठी दिशानिर्देश’ या चौथ्या प्रकरणात अपयशातून काय शिकता येईल, याबाबतीतील मार्गदर्शन आहे. आपल्यावर दुसऱ्याने टीका केली, तर ते आपल्याला आवडत नाही; पण आपण मात्र सतत दुसऱ्यावर टीका करीत असतो, हे वास्तव आहे. टीका केलीच तर ती सरळपणे व नेमकेपणाने केलेली असावी. तिच्यात कडवटपणा असू नये. कोणाबद्दल तक्रार करायची असेल तर तीही समर्पक शब्दात, अतिशयोक्ती न करता करावी. संशयी वृत्ती सोडून दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिकावे. कोणत्याही कामासंदर्भात चालढकल न करता कार्यरत राहावे, अडचणींवर मात करायला शिकावे. बढाया न मारता स्वत:बद्दल वास्तवपूर्ण मत बाळगावे, आत्मसन्मान ठेवावा, आपली जिज्ञासा व सर्जनशीलता वाढवावी. अशा लहानसहान सूचना लेखकाने केल्या आहेत. अशाप्रकारे पहिल्या चार प्रकरणांमध्ये अयशस्वी माणसांचे वर्णन आहे. पाचव्या प्रकरणात मात्र ‘सोप्या भाषेत यश’ म्हणजे काय असते आणि काय नसते, याचे वर्णन आहे. प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. सामान्यत: ज्याच्याकडे संपत्ती व कीर्ती आहे, तो यशस्वी असे मानले जाते; पण लेखकाच्या मते, चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्याला यशस्वी म्हणणे योग्य नाही. प्रसिद्धीच्या संदर्भातही केवळ गुणवत्ता पुरेशी ठरत नाही. संधी मिळणे, स्वत:ची जाहिरात करता येणे हेही महत्त्वाचे असते. संधी मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असते. ‘बदल : सतत चालू राहणारा लढा’ या सहाव्या प्रकरणात यशस्वी होण्यासाठी १) आपली मनोवृत्ती बदलणे - सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि २) आपल्या बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे - आत्मविश्वास व कल्पकता यांचा वापर करणे या दोन गोष्टींची आवश्यकता स्पष्ट केली आहे. ‘यशाच्या दारात’ या शेवटच्या सातव्या प्रकरणात आयुष्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करता यावा, यश मिळवता यावे म्हणून चिकाटीने प्रयत्न करायला हवेत, मिळालेल्या संधीचा फायदा घेता यायला हवा, उत्साही-आनंदी वृत्ती हवी, थोडी सामाजिक बांधिलकी व आत्मविश्वास हवा, सर्जनशीलता हवी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. लेखकाच्या अपेक्षेप्रमाणे खरोखरच हे पुस्तक स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देणारे आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला, त्याबद्दल अभिनंदन! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more