* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IGIN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664065
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORIES BY MAHADEV MORE HIGHLIGHT THE LIVES OF THE DOWNTRODDEN, OF THE LOWEST LOWER CLASS. SOME OF THEM HAVE A SERIOUS APPROACH WHILE SOME REFLECT HUMOUR. ON THE OUTSKIRTS OF THE VERY FEW MIDDLE CLASS PEOPLE LAYS THE VASE UNIVERSE OF THE WORKERS, DALIT, ETC. THESE STORIES ARE ALL ABOUT THEIR LIVES, THEIR STYLES, THEIR PROBLEMS, THEIR MOMENTS OF HAPPINESS, ETC. THE VERSATILITY OF SUBJECTS IS THE PECULIAR FEATURE OF THESE STORIES. THE AUTHOR HAS SPENT HIS LIFE WITH THEM, HE HAS LABORED ON THE FARMS, WORKED IN AN AUTOMOBILE WORKSHOP, DRIVEN A TAXI, RUN A FLOUR MILL. DURING THIS JOURNEY, HE CAME ACROSS MANY SEEDS FOR STORIES. HE HAS SOWN THEM AND NURTURED THEM. HIS STORIES ARE NOT JUST ENTERTAINING, THEY HAVE THE QUALITIES TO MAKE US STOP AND THINK ABOUT OTHERS. HE HAS NOT CAPTIVATED HIS LANGUAGE IN ANY OF THE ARTISTIC PRESENTATION. HIS WORDS ARE VERY SIMPLE. YET, HE HAS ADDED SUBSTANTIALLY TO THE MARATHI LITERATURE.
महादेव मोरे यांच्या ‘ईगीन’ या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखित करतात. काही गंभीर, तर काही गमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलितपददलितांचे, कष्टकऱ्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्षखेदाच्या, व्यथाविवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायिंव्हग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे व आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणाऱ्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मितहास्याची रेषा फुलविणाऱ्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तिचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 08-08-2004

    वास्तवतेचा स्पर्श असलेला कथासंग्रह : ईगीन महादेव मोरे हे नाव मराठी साहित्यात विपुल लेखनामुळे चांगलेच परिचित झाले आहे. कथा, कादंबरी आणि ललित लेखन करणाऱ्या मोरे यांचा ‘ईगीन’ हा नवा कथासंग्रह आहे. शोषित समाजाच्या व्यथा व वेदना मांडणाऱ्या कथांचा समावेश सलेले हे पुस्तक ग्रामीण वाचकाला आपलेसे करून टाकणारे आहे. या कथांमधील पात्रं त्यांच्या भाषेत बोलतात आणि विशेष म्हणजे, या कथांमध्ये काल्पनिकता नसल्यामुळे या कथा एका वेगळ्या वास्तव जगात घेऊन जातात. एकूण पंधरा कथांचा समावेश असलेल्या या पुस्तकात बेळगाव भागातील कानडीमिश्रित हिंदी व मराठी भाषा असून, त्या प्रदेशातील खास शब्दांचा वापर आलेला आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसांच्या जीवनातील विविध बरे-वाईट अनुभव व अस्सल वास्तव जीवन चित्रित करतात. मोरे यांनी जीवनात बालपणी अनुभवलेल्या अनेक प्रसंगांना कथांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या कथांमध्ये कुणाचेही अनुकरण नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्वत:चा वेगळा चेहरा घेऊन या कथा वाचकांपुढे प्रकट होतात. ग्रामीण भागातील चपखल शब्द, नवे नवे प्रयोग मराठी भाषेत मोरे यांनी या कथांमध्ये आणल्याचे दिसते. ‘पार्ट्या’ आणि ‘हिसका’ या दोन कथा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके चित्रण करतात. पार्ट्या ही कथा सरपंच व आबा नाना या दोन व्यक्तींमधून रंगत जाते. ‘बेत’ ही कथा केवळ दागिन्यांच्या लोभापायी एका परिचारिकेची हत्या होते, पण यातील गुन्हेगार मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटतो, असे कथानक असणारी ही कथा गुन्हेगाराला शिक्षा होईलच, याविषयी साक्षंकता व्यक्त करते. तळागाळातील माणसांचे दु:ख मांडणे, हा या कथांचा स्थायीभाव असून, ‘रुक्की’ ही कथा अशाच प्रकारची आहे. गरिबीत जीवन जगणाऱ्या स्त्री व पुरुषांचे हाल कसे होतात, ते अत्यंत सूक्ष्मपणे लेखकाने टिपले आहे. जीवनात एखाद्या घटनेमुळे माणसाच्या चारित्र्याला डाग लागला, की तो शेवटपर्यंत जात नाही, असे म्हणतात. एक व्यापारीही अशाच वाईट घटनेमुळे तुरुंगात जातो; पण त्याच्या मुलांनाही त्याच्या या कृत्याचा त्रास होतो, असे सांगणारी ही कथा वाचकाला विचार कराला लावते. याशिवाय ‘लग्गा’, ‘जिगर’, ‘छडीटांग’, ‘जीव’, ‘अजुनी चालतोचि वाट’ या कथाही चांगल्या झाल्या आहेत. काही कथांमध्ये असलेले विनोदी किस्सेही रंगतदार झाले आहेत. मोरे यांची या पुस्तकातील कथा स्वतंत्र विचार मांडणारी आहे. त्यात बऱ्याच कथा शेवटी अपेक्षित उंची गाठतात. अनोखे जग या कथांमध्ये वाचकांपुढे लेखकाने उभे केले असून, समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकांना मराठी साहित्यात या कथांच्या माध्यमातून आणले आहे. विशेषत: कथांमधील पात्रांची नागर भाषा हे या कथांचे वेगळे वैशिष्ट्य असून ही माणसं उपमा व अलंकारिक शब्द वापरून मनोरंजनही करतात. एकूणच ‘ईगीन’मधील कथा वास्तवतेच्या स्पर्शामुळे वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाल्या आहेत. त्यामुळे नवीन कथा वाचू इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक वाचणे जरुरीचे आहे. -विलास पगार ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 07-11-2004

    तळागाळाच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब… महादेव मोरे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक असून आतापर्यंत त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या व दोन ललित गद्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सांप्रतचा ‘ईगीन’ हा पंधरावा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहात १५ कथा समाविष्ट केल्य आहेत. आतापर्यंत मराठी साहित्यात अपवाद वगळता पांढरपेशा वर्गाचे चित्रण झालेले आहे. याला धक्का दिला दलित साहित्याने. याबरोबर मग ग्रामीण साहित्यही आकार घेऊ लागले. परंतु खेड्यातील कष्टकरी जनतेचे एक विशाल जग असते याची जाण फार थोड्या मराठी साहित्यिकांना आहे. यामुळे अशा लोकांचे हर्ष खेद दु:ख यांचे चित्रण साहित्यात झालेले नाही. ‘ईगीन’ हा कथासंग्रह हे जीवन उभे करतो. लेखकाला मोटर वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीतून राबणे यातून जो प्रत्यक्ष अनुभव आला त्याने तो आपल्या समर्थ लेखणीने कथांद्वारे फुलविला आहे. या कथांतील भाषा जिवंत व रसशीत आहे. लेखकाचे वास्तव बेळगाव जिल्ह्यात असल्यामुळे भाषेला कानडी-मराठीचा मृदगंध आहे. लेखकाने कथांमध्ये कलेचा संयम राखला असून कोठेही भडकपणा दाखविलेला नाही. तसेच तत्त्वज्ञान न सांगता ज्याला भावेल ते त्याने घ्यावे असे दर्शविले आहे. मराठीतील दुसरे एक साहित्यिक अनिल अवचट यांनीही आपल्या साहित्याद्वारे पीडित, शोषित लोकांची दु:खे मांडली आहेत. परंतु ती गद्यस्वरूपात आहेत. मोरे यांनी ती कथांद्वारे मांडली आहेत. दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे खेड्यातील जनता तामसीवृत्तीची बनली आहे. आणि मग दारू पिणे, हाणामारी, फसवणूक आदी अनिष्ट गोष्टीत त्यांचा जीवनक्रम चालू असतो. ‘ईगीन’ आदी कथा याचे प्रत्यंतर आहे. लेखकाची शैली वैशिष्ट्यपूर्ण असून या कथातून उभी केलेली पात्रे स्वत:च्याच भाषेत बोलतात असे वाटते. व्यक्तिचित्रेही ठसठशीत आहेत. त्यामुहे हा कथासंग्रह तळागाळाच्या लोकांचा असूनही वाचावासा वाटतो. या ठिकाणी एक-दोन गोष्टींकडे लेखकाचे लक्ष वेधावेसे वाटते. ग्रामीण लोकांच्या दैनंदिन व्यवहारात मुखाद्वारे शिव्या सहजगत्या निघत असतात. या साहित्यात उमटाव्या का? कारण या कथांत दोन-तीन ठिकाणी अस्सल शिव्या वापरल्या आहेत, त्या टाळल्या असत्या तर बरे झाले असते. नाही तर कालांतराने मराठी साहित्यात शिव्या या ओव्या होऊन बसतील ही भीती. तसेच काही महत्त्वाच्या शब्दांना मराठी प्रतिशब्द जोडायला पाहिजे होते. मोरे यांनी उपेक्षित समाजातील लोकांवर आणखी कथा लिहाव्यात असे सुचवावेसे वाटते. संग्रहाला प्रा. अनंत मनोहर यांची मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. कथासंग्रह केवळ वाचनीय नसून संग्राह्य असा आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-06-2004

    भणंग जगण्याच्या गोष्टी… अगदी सुरुवातीला मराठी लेखक हे पांढरपेशा मध्यमवर्गातले होते. त्यामुळे मराठी साहित्यात मध्यमवर्गाच्या जीवनाचे चित्रण होते. आपल्या लेखकांचे अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. हा आक्षेप सतत असायचा आणि काही अपवाद वगळता तो खराही होता. नतर मात्र मराठी साहित्यात अनेक नवे, जोरकस प्रवाह आले. ग्रामीण, दलित जीवन प्रतिबिंबित झाले आहे अशा अनेक चांगल्या कथा, कादंबऱ्या, आत्मकथने यांनी आपले भावविश्व व साहित्यविश्व समृद्ध केले. असे असूनही साहित्यावरचा ‘मध्यमवर्गीय’ हा छाप काही मिटत नाही. या प्रस्तावनचे कारण म्हणजे महादेव मोरे यांचा नवीन कथासंग्रह ‘ईगीन’. पंधरा कथासंग्रह, अठरा कादंबऱ्या इतके विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. ईगीनमधील कथा १९९२ ते १९९९ दरम्यान विविध मासिकांतून आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत. महादेव मोरे यांनी स्वत: शेतमळ्यात मजुरी करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे अशा प्रकारे आपले आयुष्य झेललेले आहे. या खडतर जगण्यात जे अनुभव वाट्याला आहे. जे जगणे पहायला मिळाले, तेच या कथांमधून आपल्याला सांगितले आहे. काही कथा पात्राच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवाचे चित्रण करतात तर काही कथा पूर्ण आयुष्याची चित्तरकथा रेखाटतात. ‘हौस’ या पहिल्या कथेत टुरिस्ट टॅक्सी चालवणाऱ्या बापलेकांच्या आयुष्यातील एक दिवस दाखवला आहे. पंधरा रुपयाच्या भाड्यासाठी हे बापलेक तीन ठिकाणी गाडी ओढ्यात टाकतात, रात्रभर उपाशी राहतात, धोका पत्करतात. परत येताना त्यांची गाडी ओढ्यात फसते, ती बाहेर काढायला त्यांना पंधरा रुपये लागतात. मिळालेले सगळे भाडे खर्च होते. हालअपेष्टा, मेहनत लक्षात घेतली तर तोटाच झाला. मग बाप मुलाला विचारतो, ‘हा असा धंदा आहे, आता हौस फिटली का?’ ‘अजुनी चालतेचि वाट’ ही तरल, भावस्पर्शी ग्रामीण कथा लिहिणाऱ्या एका लेखकाची गोष्ट. साहित्य वर्तुळातील लोकांना ती कोणावर आधारित आहे हे सांगता येईल. पण वाचकांना लेखनाचे एक तत्व माहित होते. लेखकांचे लिखाण त्यांच्या अनुभवावर आधारित असते. पण तो अनुभव गाळून घ्यावा लागतो. अनेक फेरफार करावे लागतात. खेड्यातील गटबाजी, आपापसातील भांडणे यावर आधारित ‘पार्ट्या’ व ‘हिसका’ या दोन कथा आहेत. दोन्ही कथेत भांडणारी विरुद्ध बाजूंची जी दोन प्रमुख पात्रे आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी मात्र पळून जावून लग्न करतात आणि आपल्या वडिलांचे गावात हसे करतात. ठसठशीत व्यक्तिरेखा उभ्या करणे हे मोरे यांचे ठळक जाणवणारे वैशिष्ट्य. भाषाशैली चांगली आहे. नगर वा ग्रामीण दोन्ही भाषा वापरलेल्या आहेत. निवेदन बहुधा नागर वा ग्रामीण दोन्हा भाषा वापरलेल्या आहेत. निवेदना बहुधा नागर भाषेत आहे. ग्रामीण भाषाही आपल्याला समजणारी आहे. ‘ईगीन’ म्हणजे विघ्न-संकटे असा एखाद्या माहीत नसलेल्या शब्दाचा अर्थ पटकन कळतो. चार-पाच कथांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व कथा आत्यंतिक दारिद्री माणसांच्याच आहेत. हे जगणेच निरर्थक, अगदी हीन पातळीचे जगणे ही शोकांतिका आणि मरण म्हणजे सुटका या व्यक्तिरेखांचे काय मनोव्यापार, मनोविश्लेषण रंगवणार? लेखकाने सर्व कथा, गोष्ट सांगणे या पातळीवर ठेवल्या आहेत. पात्रांच्या स्थितीचे, दु:खाचे कढ आणणारे वर्णन नाही. सामाजिक प्रश्नांची पात्रांकरवी चर्चा नाही. सामाजिक भाष्य नाही, जातीव्यवस्थेला दूषणे देणे नाही. तत्वचिंतन नाही, नैतिक मूल्यांचा बडेजाव नाही. डाव्या किंवा तत्सम विचारसणीचा पुरस्कार नाही. नियतीवाद नाही. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे साहित्यावरचा मध्यमवर्गीय छाप कमी करायचा असेल तर आपण ईगीनमधील कथा अधिक समजून घेतल्या पाहिजेत. उदा. गंडगब्रु कथेतील हा कथानायक, कानातला मळ काढून देऊन त्यावर उपजीविका करणारे आपल्याला माहित आहे. याचा व्यवसाय ‘डोळ्यातलं खंड काढणं’ म्हणजे डोळ्यातील कचरा साफ करून देणे एवढी दारिद्री परिस्थिती त्यात आणखी वागणे सरकलेले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more