* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175410
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORY ABOUT A FAMILY AFFECTED BY HEMOPHILIA
या कादंबरीत चार पिढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. हिमोफिलिया हा भयंकर रक्तदोषाचा आजार रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा पुढल्या पिढीकडे संक्रमित झाला आहे. आपल्या समाजातील एका संपन्न घराण्याची ही प्रातिनिधिक कहाणी आहे. या स्त्रिया या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या भयानक वेदनामय, दुःखी जीवनासाठी आपण कारणीभूत आहोत,या वास्तवाची त्यांना पुसटशी कल्पनाही नाही. श्रुतीच्या मातुल घराण्याच्या तीन पिढ्यांच्या तीन स्त्री-प्रतिनिधींची ही कथा आहे. ‘हिमोफिलिया’ नामक रोगाने, महाराक्षसाने, त्यांचे सुख-चैन खाऊन टाकले. पहिल्या दोन पिढ्या तर या भयंकर व्याधीविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होत्या. श्रुतीच्या आईची- अंजलीची प्रथम या वास्तवाशी ओळख झाली. त्याच वेळी तिच्या आजीलाही हे भयंकर कटू सत्य कळले आणि ती कोसळलीच! ‘हिमोफिलिया’ हा जरी या कथनाचा मुख्य विषय असला, तरी त्या अनुषंगाने प्रत्येक पिढीच्या, कालप्रवाहाच्या ओघात बदलणाऱ्या सामाजिक, आर्थिक, भौतिक, मानसिक वातावरणाशीही वाचकांची ओळख व्हावी, त्या काळातसुद्धा, गाव आणि शहरी जीवनातील राहणी, सुखसोयींतला फरक कळावा, अशी लेखिकेची मनापासून इच्छा होती. म्हणूनच श्रुतीच्या पणजीचे, आजीच, आईचे बालपण, शालेय जीवन, लग्न, सासरची माणसे, सणवार, रूढी, परंपरांचे सविस्तर वर्णन रेखाटण्याचा प्रयत्न या कहाणीत करण्यात आला आहे. कादंबरीच्या शेवटी त्या अनुषंगाने सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या भाषेत या रोगाचा इतिहास, लक्षणे, खबरदारीचे उपाय, सामान्यांना सजग करणे हे सर्व कादंबरीमार्फत मोठ्या कौशल्याने लेखिकेने केले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HEADIMAHEANTIMA #SUVARNA DHOBLE #HAEMOPHELIA #HAEMOPHELIAFEDERATIONOFINDIA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 13-07-2018

    कादंबरीच्या माध्यमातून हिमोफिलियाविषयी जागृती... हिमोफिलियाची शिकार ठरलेल्या चार पिढ्यांचा जीवनप्रवास म्हणजे ‘हे आदिमा हे अंतिमा’ ही कादंबरी! आदि आणि अंत हेच या सजीव सृष्टीमागचे सूत्र आहे. कादंबरीचे शीर्षक वाचकांचीच उत्सुकता वाढवते. लेखिका सुवर्णा ढबळे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत चार पिढ्यांचा प्रवास वर्णन केला आहे. आणि तो प्रत्येक काळ त्यांनी उत्तमरीत्या उभा केला आहे. आपण ही कादंबरी वाचताना त्या-त्या काळात आपल्या नकळत कधी जाऊन पोहोचतो हेही उमगत नाही, इतकी सहज आणि ओघवती भाषा हे या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. ही गोष्ट आहे ‘हिमोफिलिया’ या रोगाला बळी पडलेल्या चार पिढ्यातील स्त्रियांची. या हिमोफिलियाचे शिकार होतात पुरुष आणि त्याला कारणीभूत ठरतात स्त्रिया! स्त्रिया या रोगाच्या वाहक असतात आणि हा रोग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो. रक्तदोष व्याधी मातुल पिढ्यांकडून येते. हा आजार अनुवंशिक आहे. या आजाराला राजवंशाचा आजार म्हणतात. याला कारण की राणी व्हिक्टोरिया हिच्या घराण्याकडून हा आजार इतर देशात अनुवंशिकतेने विस्तारित झाला. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे हिमोफिलिक रुग्णाला जखम झाल्यास त्याचे रक्त वाहणे लवकर थांबत नाही. कारण रक्त गोठण्यास लागणारे घटक त्यांच्या रक्तात नसतात. सांध्यांमध्ये किंवा मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास ही व्याधी उग्र रूप घेते व त्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकते. ‘हिमोफिलिया’ या रोगाबद्दल लेखिकेने अतिशय अभ्यासपूर्वक व अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लेखिकेचा ही कादंबरी लिहिण्याचा हेतू म्हणजे या रोगाची वाचकांना शास्त्रीय माहिती मिळावी आणि त्याचप्रमाणे हिमोफिलिक व्यक्तींनी योग्य उपचार घेतल्यास हा रोग एका मर्यादेपर्यंत ताब्यात ठेवता येतो हे सांगणे. हिमोफिलिया सोसायट्या या सर्वांसाठी मदतीला तयार आहेत. त्या योग्य प्रकारे समुपदेशन करून योग्य उपचारांचे ज्ञान देतात. त्यायोगे अशा रुग्णांचे मनोधैर्यही वाढते. योग्य मार्गदर्शनामुळे योग्य उपचारांचा मार्ग निवडता येऊन हिमोफिलिया आपण रोखू शकतो. रमा, सुधा, अंजली आणि श्रुती या चार पिढ्यांतील स्त्रिया! रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा हा आजार पुढच्या पिढीकडे संक्रमित झाला. रमा आणि सुधाला या आजाराविषयी कसलीही कल्पना नव्हती, तर अंजलीला ही कल्पना आली पण ती आपल्या कुटुंबाला हे सांगू शकली नाही. यामध्ये स्वत:बद्दलची वाटलेली भीती तर कारणीभूत होतीच, परंतु कुटुंबाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल की काय याची धास्तीही होती. पिढ्यानपिढ्या या रोगाचा वारसा चालवीत आलेल्या या स्त्रिया या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या भयानक, वेदनामयी जीवनासाठी आपण कारणीभूत आहोत या वास्तवाशी रमा आणि सुधा फार फार दूर होत्या. या चौघींचीही प्रातिनिधिक व्यक्तिचित्रणे लेखिकेने अतिशय बोलकी केली आहेत. या कादंबरीतील घटना, व्यक्तिरेखा यामुळे चार पिढ्यांतील बदललेल्या काळातील पात्रांबरोबर यातील प्रत्येकजण आपल्या आजूबाजूला वावरताना जाणवत राहत यातच लेखिकेचे शब्दसामर्थ्य व्यक्त झालं आहे. या स्त्रियांच्या विचारधारेतील प्रगतीही उत्तमपणे रेखाटली आहे. काळाप्रमाणे बदललेली परिस्थिती आणि त्याचप्रमाणे बदलत गेलेले राहणीमान, विचार लेखिकेने समर्थपणे उभे केले आहेत. कादंबरीत असे अनेक प्रसंग आहेत, जे वाचताना अंगावर काटा उभा राहतो. विजय, रवी आणि अंजूचा तान्हा यांचा बालवयातला मृत्यू ज्यांची कारणे सारखीच असली, तरी त्या तिघांनाही याची कल्पनाही नव्हती. अंजू हिमोफिलियाची वाहक नाही हे समजताच अंजूबरोबर आपण वाचकही सुस्कारा सोडतो. श्रुतीला आपल्या आईकडून चार पिढ्यांचा इतिहास समजतो आणि आपण वाहक असण्याची शक्यता आहे, असे समजताच तिच्या मनाची झालेली घालमेल, तिच्या मनात उडालेला मानसिक गोंधळ लेखिकेने अप्रतिमपणे पोहोचवला आहे. त्याचबरोबर या रोगाबद्दल लेकीला सांगताना आईने दाखवलेले धैर्य हे वाखाणण्याजोगेच आहे. वाहक स्त्रीने ‘अपत्यजन्माचा’ त्याग करणे हेच या रोगाला रोखण्याचा उपाय आहे हे लेखिकेने समर्पकपणे वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. शेवटी श्रुतीने घेतलेला निर्णय! ती हिमोफिलियाची वाहक म्हणून पॉझिटिव्ह ठरते. त्याबरोबर तिचा निर्णय होता. हिमोफिलियाचा प्रारंभ कुणाच्याच हातात नाही, पण अंत मात्र त्या वाहक असणाऱ्या स्त्रीच्या हातात आहे. हेच श्र्रृती जाणते आणि ती नियतीला ठणकावून सांगते हे आदिमा, चार पिढ्यांपासून सुरू केलेला हिमोफिलियाचा हा क्रूर खेळ मी संपवणार! मी मातृत्व नाकारणार! तिचा हा निर्णय एखाद्या स्त्रीसाठी खरंच कठीण आहे, पण समाजाच्या दृष्टीने आणि रोगावर मात करण्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य असाच होता यात शंका नाही. हिमोफिलिया हा महाभयानक रोगाची माहिती देणारी ही कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी अशीच आहे. -मनीषा फडके ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL SAPTRANG 1-1-2017

    हिमोफिलिया या असाध्य आजाराला बळी पडलेल्या चार पिढ्यांचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी सुवर्णा ढोबळे यांनी लिहिली आहे. हिमोफिलिया हा रक्तदोषातून निर्माण होणारा अनुवांशिक आजार. स्त्रिया या रोगाच्या वाहक असतात आणि पुरुषांना तो होतो, असा हा विचित्र आजार ढोबळे यांनी या आजाराची संपूर्ण माहिती घेऊन, संशोधन करून ही कादंबरी लिहिली आहे. मात्र, ती केवळ माहितीपर नाही, एका घराण्यातल्या तब्बल चार पिढ्यांवर या आजाराचं कसं सावट पडतं आणि त्यातून पुढं काय होत जातं, हे नाट्यमय पद्धतीनं त्या सांगतात. कादंबरीचा कालखंड बराच मोठा असल्यानं त्या त्या काळातल्या चालीरीती, परिस्थिती, वागण्याच्या तऱ्हा या गोष्टींचाही अभ्यास ढोबळे यांनी करून त्याला शब्दरूप दिलं आहे. वैद्यकीय विषयांवरच्या कादंबरी मराठीत तुलनेनं कमी असताना ढोबळे यांनी एक चांगला प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Rating StarPRIYA DANDGE 9-12-2016

    मानवाचे आयुष्य हे अनेक धाग्यांनी बांधलेले असते. नियती ही मानवी जीवनावर प्रभाव टाकणारा सर्वांत ठळक घटक होय. आपल्या वाट्याला काय यावे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य माणसाला नसते. माणसाला नियतीची आपल्यावरील ही पकड जेव्हा जाणवू लागते तेव्हा आयुष्य कदाचितअधिक निरर्थक किंवा अर्थपूर्ण जाणवू शकते. आनुवंशिक आजारामुळे वाट्यास आलेले दु:ख भोगणाऱ्या चार पिढ्यांतील चार स्त्रियांची कहाणी सांगणारी ‘हे आदिमा, हे अंतिमा’ ही कादंबरी वाचकांच्या भेटीस येते आहे. सुवर्णा ढोबळे लिखित या कादंबरीमध्ये ‘हिमोफिलिया’ या आनुवंशिक आजाराच्या वाहक असलेल्या, नात्यात बांधलेल्या चार स्त्रिया आहेत. हिमोफिलिया हा आजार फक्त पुरुषांना होतो; परंतु स्त्रिया त्याच्या वाहक असतात. स्त्रियांकडून त्यांच्या पुरुष अपत्यांना हा आजार होतो. हिमोफिलिया आजारात माणसाची रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही, त्यामुळे अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे रुग्ण मरण पावतो. रशियाचा राजा सार (शेवटचा) याच्या मुलाला हा आजार होता. त्याला अत्यंत जपावे लागे. एवढीशी जखम होऊ नये म्हणून पहारा द्यावा लागे. झार आणि राणी दोघेही आपल्या एकुलत्या वारसासाठी अखंड काळजीत असत. याच त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेऊन रास्पुटीनने आपले बस्तान बसवले. झार आणि राणी दोघेही रास्पुटीनच्या तालावर नाचू लागले. पुढे रशियन राज्यक्रांती झाली आणि झारशाहीच नष्ट झाली, असा रक्तरंजित इतिहास असणाऱ्या आजाराची पार्श्वभूमी ‘हे आदिमा, हे अंतिमा’ या कादंबरीला लाभली आहे. रमाबाई, सुधा, अंजली आणि श्रुती या पणजी, आजी, आई आणि मुलगी या चार पिढ्या. त्या चौघीही हिमोफिलियाच्या वाहक. पहिल्या तीन पिढ्यांमधील स्त्रियांचे मुलगे या आजाराचे बळी ठरले आहेत. ‘पुत्रप्राप्तीशिवाय स्त्रीजन्म अपूर्ण’ अशा गाढ समजुतीचा पगडा असणाऱ्या काळातील या तिघीजणींना पुत्रपाप्ती तर होते; पण त्यांचे मुलगे दीर्घायुषी होत नाहीत, याचे कारण त्यांना दुर्दैवाने माहीत नाही. आपल्या घराण्यात पुरुष जगत नाहीत, या समजुतीत त्या नशिबाला दोष देत जगत राहतात. श्रुती या साखळीतील अंतिम कडी. तिला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळतो. त्यानंतर त्या काळातील चालीरीती, जीवनशैली, समजुती ओघवत्या शैलीतून आपल्यासमोर येतात. त्याकाळचे स्त्रीजीवन, त्यातील बदल, स्त्रीचे समाजातील, कुटुंबातील स्थान, यात कसकसे बदल होत गेले हे तपशीलासह वाचकांना कळते. संबंधित काळातील जीवन आपल्यासमोर उभे राहते. कादंबरीत हिमोफिलिया आजाराची शास्त्रीय माहिती, त्यासंबंधाची जनजागृती, आजारासाठी सुरू असलेले काम याची विस्तृत माहिती कथानकाच्या ओघात येते. त्यामुळे कळण्यास सोपी जाते. अशा प्रकारच्या कादंबरीचा मराठीतील हा पहिलाच प्रयोग आहे. वाचकांना ही प्रयोगशील कादंबरी नक्कीच आवडेल. पिढ्यान् पिढ्या संक्रमित होणारा एखादा आजार माणसाची नियती कशी बदलून टाकतो, त्या आजाराविषयी अनभिज्ञ असणारी माणसं नशिबाला दोष देत राहतात. याची अभ्यासपूर्वक तरीही रंजक मांडणी करणारी ‘हे आदिमा, हे अंतिमा’ ही कादंबरी एक वेगळा विषय मांडते. ‘हिमोफिलिया’ हा आजार फक्त पुरुषांना होतो; पण त्याच्या वाहक असतात स्त्रिया. ‘हे आदिमा, हे अंतिमा’ ही सुवर्णा ढोबळे यांची कादंबरी चार पिढ्यांचा जीवनप्रवास मांडते. या रोगाच्या वाहक असणाऱ्या चार पिढ्यांतील चार स्त्रिया, त्यांचं जीवन, त्यांचं दु:ख, वेदना प्रभावीपणे या कादंबरीतून वाचकांच्या समोर येते. सामान्य वाचकांनाही ‘हिमोफिलिया’ या आजाराची माहिती, आजाराचे स्वरूप कळते. याचबरोबर चार पिढ्यांमधील चार स्त्रिया, ज्या नात्याच्या बंधात एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. त्या या आजाराकडे कशा पाहतात, हेही वाचकांसमोर येते. ही कादंबरी चार पिढ्यांचे स्त्रीजीवन, समाजातील स्त्रियांचे समाजातील आणि कुटुंबातील त्यावेळचे स्थान याची विस्तृत मांडणी करते. एका आजाराचा मानवी जीवनावर होणारा विविधांगी परिणाम मांडणारी मराठीतील ही पहिली कादंबरी ठरावी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more