AALOCHANA - JULY, 1967सफाईदार पोशाखाची कथा...
मराठी भाषेच्या कथाविषयांचे दालन समृद्ध होत असल्याचा निर्वाळा कथासंग्रहांवर सातत्याने होण्याच्या चर्चा-समीकरणाद्वारे दिला जातो. नवीन कथासंग्रहांचीही झपाट्याने भर पडते आहे. वाचकवर्गात तडाख्याने वाढ झालेली दिसून येते. या सगळ्या रिस्थितीवरून कथांबाबतचे निदान केले जात आहे. पण हे बरोबर नाही. इतकेच नव्हे तर संपूर्ण उलट आहे. समृद्धि हा शब्द संख्यावैपुल्यदर्शक ह्याच अर्थाने अभिप्रेत असावासा वाटतो. काही मोजके अपवाद वगळले, तर मराठीत ‘बरी’ कथा सफाईदार, पोशाखी आणि चकवणारी अशी आहे. तीच फार मोठ्या प्रमाणांत निर्माण होते. खुणवली जाते. ग्रंथगत केली जाते.
‘वलय’ हा श्री. वसंत पुरुषोत्तम काळे ह्या परिचित व प्रसिद्ध लेखकाचा नवा कथासंग्रह. बारापैकी दोन अपवादात्मक कथा सोडल्या तर बऱ्या, सफाईदार आणि पोशाखी कथांच्या हा संग्रह. श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या वैशिष्ट्यांनी आणि मर्यादांनी पूर्ण असलेला.
श्री. काळे यांचे पहीले वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कथा अत्यंत आकर्षक आणि बांधेसूद असते. जो कथाभाग ते सांगतात, त्यांतील अनेक छोटेमोठे मार्मिक तपशील देऊन ते वाचकांना स्तिमित करून सोडतात. ‘स्वप्नवेडी’ ही पहीलीच कथा ह्या दृष्टीने तपासता येईल. विषय हा सर्वपरिचित असणारा, रोज सकाळच्या धमाल गर्दीत ऑफिसची वेळ गाठण्यासाठी जिच्यावर उदार होऊन चालत्या गाडीत चढणारी तरुणी, तिला सावरणारा तरूण, भेटीगाठी, तिचे नाव कळणे, मध्ये तिचे अजिबात ओळख न देणे, गैरसमज, दिलजमाई, त्या मुलीच्या-मृणालिनी तिचे नाव-वडिलांकडे जाणे आणि अखेर धक्का देणारा खुलासा. सगळे कसे हिंदी बोलपटांतल्यासारखे. ‘अशा एखाद्या तरुणीला आपणालाही सांवरता आलं तर...’ असा विचार करीत काळ्यांच्या कथांचा वाचक चर्चगेट बोरी बंदर यायच्या आंत ती संपवितो आणि बेकार असल्याने यावर परिणाम झालेली मृणालिनी ह्या एका तरुण मुलीच्या आयुष्याची शोकातिका आपल्या मनावरून पुसून टाकतो.
फारशी गरज नसताना वडिलांनी तिला आपला मुलगाच असल्याची चेष्ट केल्यामुळे कारकुनी आयुष्याची सुखदु:खे आत्मसात करणारी, पाचं वर्षे नोकरीचा (गरज नसताना) सातत्याने प्रयत्न करणारी आणि डोक्यावर परिणाम करून घेणारी ही मुलगी काळ्यांनी रसिकाची सहानुभूति मिळविण्याइतकी जिवंत उभीच केली नाही. ऑफिसला जाणारी, पुरुषाचा प्रियकर-मित्र म्हणून आधार शोधणारी सुसंस्कारी हळवी तरुणी त्यांनी इथे उभी केली. फक्त पगाराच्या तारखेला ते वेड परमावधीला जाते, एवढ अन्वयार्थ सामान्यत: लागतो.
‘शेखर वर्गात बसला आहे.’ ह्या कथेतील नायिका ‘मंगला’ हीसुद्धा वर्षभर शाळेच्या ठराविक वेळांत मोटार अपघाताने दगावलेल्या भाच्याला आणण्यासाठी, त्याच्या अभ्यासाची चौकशी करण्यासाठी नेहमी शाळेत जाते. कथानिवेदकाच्या मुळाशी गट्टी करते. त्याला पत्ता लागतो तो बापट ह्या हेडमास्तरांकडून. ‘स्वप्नवेडी’ कथेतील वेडी ‘मृणालिनी’ आणि ‘शेखर वर्गात बसला आहे’ ह्या कथेतील ‘मंगला’ ह्यांना असे वागू देणारी त्यांची वडीलधारी मंडळी आणि सततच्या वेडाचे कोड पुरवून भावना जपणारे मुख्याध्यापक बापट श्री. काळ्यांच्या कथांतच मिळतात!
श्री. काळे यांच्या कथा ह्या नाट्यात्मक असतात. नाटक आणि नाटक्यांचे आयुष्य ह्यावर ह्या संग्रहांत दोन कथा आहेत : ‘लाट’ आणि ‘वलय.’पण ह्या निव्वळ नाटक्यांच्या जीवनावरील कथांव्यतिरिक्त ज्या कथा आहेत त्या भडक आहेत. वास्तवाच्या कक्षा ओलांडून कल्पकतेच्या जगतांत डोळे मिटून मन भरून गेल्याशिवाय ह्या कथा वाचतांना न अडखळणेंच कठीण. कथांतली सगळीच पात्रे अव्यवहारी, अतिधुंद, स्वप्नाळू, नाट्यवेडी आणि दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी आसुसलेली अशी आहेत.
‘नरमादी’ कथेतील आपली व्यभिचारी बायको खरी प्रेयसी कशी हवी पटवून देणारे व तिच्या बरोबर सुखाने संसार करणारे यशस्वी खरे वकील, ‘विश्वास’ कथेमधील ‘प्यून’चा मॅनेजर झालेला, कलंकित, व्यभिचारी, मालकाच्या रत्नप्रभा नावाच्या मुलीचा नवरा झालेला विश्वास पंडित, ‘सुख विकणे आहे’ ह्या विषय-कल्पनांचे केवळ नावीन्य असलेल्या कथेतील पात्रे, ‘पिऊन बीज मी फुले फुलविली’ मधील कॅन्सरच्या विकाराने त्रस्तग्रस्त असलेली लावण्यवती मंजू आणि अविनाश हे जोडपें, ही सगळी पात्रे अतिधुंद आहेत, म्हणून वास्तवाबाहेरची, असंभाव्य अथवा क्वचित् संभाव्य अशी असल्याने ह्या कथा जिव्हाळा निर्माण करू शकत नाहीत.
‘दिशाभूल’ आणि ‘हातमोजा’ ह्या दोन यशस्वी कथांचा मात्र आवर्जून उल्लेख करावा लागेल. एका कथेंतील साध्या घरगुती वातावरणात व संस्कारांत आणि संशयाच्या गोष्ट पारखून घेण्याच्या व्यवहारात मैत्री, माणुसकी व जगरहाटी ह्यांतील बदलांचे, विरोधांचे अत्यंत सूक्ष्म चित्रण श्री. काळे यांनी केले आहे. नियतीच्या व व्यवहाराच्या रहाटगाडग्यात मनामनांतील प्रगाढ बंधनांना भेदूनही कशी करुण रम्य ‘दिशाभूल’ होते, हे समर्थपणे काळ्यांनी रेखाटले आहे.
‘हातमोजा’ मध्ये भूयोनी आणि मानवी वासना व संस्कारांचा पगडा ह्यांतील अंर्तद्र्वद्व खेळकरपणे त्यांनीं चित्रांकित केले आहे.
काळे यांच्या ह्या संग्रहाच्या ज्या मर्यादा जाणवतात त्यांचे एक कारण म्हणजे त्यांची शैली. त्यांची शैली ही संस्कारी आहे. तशी ती प्रत्येक लेखकाची असते. पण हळूहळू तो त्यांतून मुक्त होऊन स्वतंत्रपणे ताठ उभा राहतो. काळ्यांची निवेदनशैली खुसखुशीत आहे. निवेदनाचे तंत्र कथानकाच्या दृष्टीनें मांडले तर जे घडते तेच नेमके त्यांच्याबद्दल घडले आहे. ‘अर्ध्यावर विरले गीत’ किंवा ‘पिऊन बीज मी फुले फुलविली’ ही काव्यमय शीर्षके, ‘माझ्या मना बन दगड’ हा करंदीकरांच्या कवितेचा उल्लेख, ह्यावरून त्यांच्या रसिक व्यक्तिमत्वाची जाणीव होते. पण हेच रसिक व्यक्तित्व जेव्हा निर्मिती करू पाहाते, तेव्हांही ते वेगळे होत नाही. मग धुंदी, असोशी, काव्यमयता, ही वरच्या श्रेणीने कथांत येऊन मिसळतात व रसिकांच्या सुजाणतेला सुरूंग लावतात.
कथांच्या रसभंगाचे आणखीही एक स्पष्ट कारण दाखविता येईल. प्रत्येक साध्या विधानाला कुठलातरी तात्त्विक आधार असलाच पाहीजे, अशी जी जुन्या निबंधकारांची धारणा, तिचाही पगडा श्री. काळे यांच्या लिखाणत जाणवतो. सानेगुरुजी, खांडेकर, आदि लेखकांच्या लिखाणांत शोभावीत अशी कितीतरी वेचक तत्त्वसूत्रे ह्यांतून काढून देता येतील. वस्तुत: लेखकाचे, निवेदकाचे भाष्य किंवा मत पात्रांच्या सहज संवादांत सुव्यक्त व्हावे, पण येथे ते उपरे वाटते. काहीतरी अचाट-वेगळं आपण सांगतो, ही जाणीव निर्माता विसरू शकत नाही व ही तत्त्वचर्चा शैलीशी व्यक्तीशी, भाषेशी व रसिकतेशी जुळत नाही.
‘लोंबकळणारी माणसें,’ हा श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांचा पहीला संग्रह. ह्या पहील्या संग्रहांत जी धार, समज आणि रचनापद्धती व्यक्त झाली होती तिचा यथायोग्य आविष्कार झाला असता, तर गंगाधर गाडगीळ, जी. ए. कुलकर्णी, श्री. दा. पानवलकर, चिरमुले आणि बाबुराव बागुल ह्या अगदी स्वतंत्र व समर्थ लेखकाच्या सोबतच श्री. काळे यांच्या नावांचा उल्लेख करणे भाग पडते. पण वेळ काढू मासिकांची मागणी, ऑफिसमधली अनेक वाचनालये व मिळणारा पैसा प्रसिद्धी, ह्यानें लिखाणाचा झपाटा आणि पुस्तकांच्या संख्येत वाढ होते. कस अणि स्वत्व, मात्र नष्ट होऊन जाते.
‘लोंबकळणारी माणसे’ ह्या पहील्याच संग्रहाने ज्याने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत, त्या लेखकाचा हा ताजा संग्रह वाचताना वाचकाचा फार मोठा अपेक्षाभंग होतो. प्रा. फडक्यांचे स्वप्नरंजन, खाडेकरांची अलंकारी शैली व मासमय तत्त्वसूत्री गुंफण, आणि पु. भा. भावे यांच्या कथात आढळणारी अनावर ओढ, ह्या त्रिकोणांत हा लेखक चमत्कारिकपणे अडकल्याचे आढळते. ‘वलय’ यात गुरफटणे ही वास्तवात खरी पण त्याला भेदून जाण्याची जिद्द प्रगट होणे हे श्रेष्ठ कलावंतांचे गमक श्री. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्यासारख्या रसिक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या लेखकाने ओळखायला हवे आहे. ...Read more
MENAKA - SEP 1967पंख फुटलेली प्रतिमा...
माणसाला चमत्कृतीची एक उपजतच आवड असते. वाचकाला, तशीच लेखकालाही ती असल्यास नवल नाही. व. पु. काळ्यांना ती तशी आहे. नुसती आहे नाही, विशेष आहे. ‘वलय’ हा त्यांचा नवा कथासंग्रह याचाच आणखी एक पुरावा.
कुठल्याही लेखकाचा मूळ उद्देश अखेरमाणसं शोधायचा असतो. ही माणसं जगाच्या अवाढव्य पसाऱ्यांत, व्यापात हरवलेली असतात, त्यांतली काही लपून बसलेली असतात. त्यांना शोधताना तो कथानकाचा आधार घेतो. म्हणजे कथानक जुळवणं आलं. हे कथानक जुळविण्यासाठी काळे बहुश: चमत्कृतींचा आधार घेतात.
ही माणसंही काहीशी तशीच चमत्कारिक. जगातलीच असूनही जगावेगळी. शहाणी, मूर्ख, व्यवहारी, स्वप्नवेडी–अनेक तऱ्हेची माणसं. अशी माणसं असतात का? याचं उत्तर फक्त ‘असू शकतात’एवढंच द्यावं लागेल. त्यांना समजून घ्यायला नाना प्रकारच्या अनुभवांतून जायला हवं. हे अनुभव म्हणजेच या बारा कथा.
ऑफिसला न जाता नेहमीच ऑफिसच्या वेळी बाहेर पडून संध्याकाळी परतणारी, सदैव ऑफिसच्याच गप्पा मारणारी मृणालिनी म्हणायची की ‘स्वप्न वेडी?’ ते वेडच खरं पण त्याची छटा चटका लावणारी. टी. बी. झालेल्या मुलीशी लग्न करून तिच्यासाठी आपलं जीवन वाहून टाकणारा, पण ती आजारी आहे म्हणून फक्त तिच्या गालाचंच चुंबन घेणारा दिना काही सामान्य मनुष्य नाही. ‘अर्ध्यावर विरलेलं’ हे गीत म्हणूनच न संपणारं ठरतं. ‘सुख विकणे आहे’ ही अशीच आणखी एक चमत्कृतीजन्य कथा. सुख विकण्याचं दुकान ही कल्पनाच जगावेगळी. इतरांना सुखाचा शोध देताना स्वत:चं सुख न समजलेल्या, किंवा गमावून बसलेल्या माणसांची ही कथा शेवटी मेलोड्रॅमॅटिक असली तरी त्याही मागचं तत्त्वज्ञान काही काळ विचार करायला लावील. ‘लाट’ची नायिका, तिची विभूतीपूजा, भक्ती सारंच काही नवलाईचं. व्यक्तिरेखेची उंची हीमालयापेक्षाही वाढविणारं!
आधुनिक वातावरणात स्त्री-पुरुष अनेक क्षेत्रांत एकत्र येतात. त्यांच्यात नसलेले संबंध जोडले जातात. कुत्सित नवरा नाही ते अर्थ काढतात. अशाच एका नाटकात काम करणाऱ्या एका स्त्रीच्या पतीला तिच्याविषयी इषारा देण्याचा उच्च (?) हेतूनं भेटतो. त्या पतीनं दाखविलेली तटस्थता, धुडकावून लावलेली त्याची सूचना ऐकून प्रथम धक्काच बसतोच पण पति-पत्नीमधील नात्याचा विश्वास, त्या नात्याचा अर्थ कळल्यावर ती व्यक्तिरेखा प्रभावी ठरते. त्याला शहाणपण सांगायला गेलेला गृहस्थ म्हणजे पर्यायायानं तुम्ही-आम्हीच कोता ठरतो. ‘नर-मादी’ मधील वकीलसाहेब मोठे ठरतात.
त्या मानानं ‘हातमोजा’, ‘शेखर वर्गात बसला आहे’ या कथा या संग्रहात न बसणाऱ्या वाटतात. ‘हातमोजा’वर मानसशास्त्राची थोडी झाक असली तरी तो एक रहस्यकथेचाच प्रकार वाटतो. त्यातही चमत्कृती आहेच. ‘शेखर वर्गात बसला आहे’ ही कथा एखाद्या स्त्रियांच्या मासिकात शोभून दिसणारी, ‘वलय’ कथासंग्रहातली ती तशी नव्हे.
लांब, पल्लेदार वाक्यांनी भाषेला जसा जोर येतो, तसा छोट्या, तुटक वाक्यांनीही आणता येतो. काळ्यांची भाषा दुसऱ्या प्रकारची. वर्णनावर त्यांचा भर नाही. संवादांतून निवेदनावर अधिक भर. तत्त्वज्ञानही ते कमीत कमी शब्दांत सांगतात. वाचकांनही बरंच समजून घ्यायचं असतं. ते काम काळे वाचकांवरच सोपवतात. वाचकाला म्हणूनच भरपूर खाद्य मिळतं नि त्यांच्या कथा वाचकांच्या डोक्यात सदैव घोळत राहतात. ...Read more
विनायकवास्तवतेच्या आभासाचा भूलभूलैय्या...
वसंत पुरुषोत्तम काळे नाव माठी साहीत्यसृष्टीत अपरिचित राहीलेली नाही. काळ्यांचे सर्व जीवन शहरात गेले असल्याने असेल कदाचित, पण त्यांच्या प्राय सर्व कथा शहरी वातावरणातच वावरणाऱ्या असतात. प्रस्तुत कथासंग्रहही त्याला अपाद नाही. या संग्रहात सुख विकण्याचे दुकान आहे, टी. बी. झालेला असतानाही केवळ कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी नोकरीत झिजत राहीलेली मिस केळकर आहे, बायकोचा एका प्रसिद्ध नाटाशी अनैतिक संबंध असलेला एक नामवंत वकील आहे. नामवंत नटाची भक्ती करणारी आणि (घरी त्याची लग्नाची बायको हे माहीत असूनही) त्याला तनमन अर्पण करणारी रसिक स्त्री आहे, दिवस दिवस रमीच्या कैफात घर विसणारा अनंत आहे आणि हजारो रुपयांचे पडदे तयार करून घेऊन पैसे द्यावयाच्या वेळी टाळाटाळ करणारी चंदनवाडा ड्रेस कंपनीही आहे.
काळ्यांची प्रतिमा अशी विलक्षण की या परिचित विश्वातील सहसा दुर्लक्षणीय असणारा पैलू ते नेमका टिपताता आणि त्याच्याभोवती कथेचे एक वेगळे विश्व उभे करतात. या वेगळ्या विश्वात गेल्यावर वाचक क्षणकाळ अवाक होतो आणि मग स्वत: काळ्यांनीच एका कथेत विचारलेली प्रश्नमालिका त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. बुद्धिबळातला राजा खरा असतो? परी कथेतल्या पऱ्या खऱ्या असतात? नाटकातली पात्रे खरी असतात? बिरबलाच्या कथेतील त्या तीन्ही प्रश्नांप्रमाणे या प्रश्नांचे उत्तरही ‘नाही’ असे देता येईल. पण बुद्धिबळाचा डाव एकदा सुरू झाला की मग राजा ‘चाल’ करू लागतो, परीकथेतील पऱ्यांना पंख फुटतात, आणि रंगभूमी वरील मुखवटे जिवंत होतात.
पण काळ्यांच्या कथांविषयी हेच म्हणता येईल. अनेक कथा अशा आहेत की त्यांतील काही पाने वास्तव सृष्टीत शोधूनही सापडू नयेत. पण काळे कथांचा परिपोष अशा बहारीने करतात, व्यक्ती आणि प्रसंग यांना जोडणारा धागा अशा कौशल्याने विणतात की हे अवास्तवही वास्तव बनून जाते. जीवंतपणाचे वलय कथेभोवती उभे राहावे. स्वप्नवेडी, शेखर वर्गात बसलाय, पिऊन बीज मी फुले फुलविली या कथा या संदर्भात वाचनीय आहेत.
शहरी संस्कृतीमध्ये जे नवे नवे नैतिक प्रश्न निर्माण होत आहेत त्याची चाहूल या संग्रहातील काही कथांमध्ये स्वाभाविकपणेच लागते. ‘नरमादी’ आणि ‘लाट’ या दोन कथांचा या दृष्टीने विशेषत्वाने उल्लेख केला पाहीजे. एखाद्या प्रतिष्ठित वकिलाच्या बायकोचा परपुरुषाशी संबंध असणे वा एखाद्या नामवंत नटाचा तो विवाहीत असूनही अन्य स्त्रीशी शारीरिक संबंध असो, आमच्या शहरी वातावरणात असंभवनीय नाही. पण हे असंभवनीय नसले तरी समर्थनीय आहे काय? अनुकरणीय आहे काय? या साऱ्यां गोष्टींचे– त्यांना मानसशास्त्राची गोंडस झालर लावून समर्थन करण्याचा प्रयन कथालेखकाने केला आहे. (की अशा गर्हणीय गोष्टींचे मानसशास्त्राचा आधार घेऊन समर्थन करण्याची सभ्यताही शहरी संस्कृतीत निर्माण होत आहे हेच काळे यांना सांगायचे आहे?) आपली पत्नी अन्य पुरुषाशी संबंध ठेवते हे ठाऊक असूनही काळ्यांचा कथानायक वकील या अनैतिक संबंधाची माहीती द्यावयास आलेल्या गोखल्यांनाच उलट समजावू लागतो– ‘माझी पत्नी विद्याकुमारकडे जाते तेव्हा ती मला समजणार नाही अशा रीतीने जाते. पण तिथून परत आल्यानंतरचं तिचं स्वरूप काय सांगू? माझ्या जवळ येताना तिला भलताच आवेग येतो. निर्माण झालेलं अंतर संपवून टाकण्याकरता विलक्षण भावनोत्कटतेने येते. तिचं नंतरचं प्रत्येक आलिंगन, प्रत्येक चुंबन म्हणजे तिच्या पापाची कबुली असते. अशा वेळी मी एका निराळ्याच सोहळ्याची मैफल लुटतो. पुरुषाला पत्नी हवी असते, पण त्याहीपेक्षा त्याचे मन प्रेयसीसाठी भुकलेले असते. माझ्या लग्नाला इतकी वर्षे झाली, पण अजूनही माझी पत्नी माझ्याकडे ‘प्रेयसी’ बनून येते आणि त्याच वेळी माझ्यातील ‘प्रियकर’ जागृत बनविण्याचे सामर्थ्य तिच्यात निर्माण होते.’
‘लाट’ कथेतील प्रदीप या नटाला सर्वस्व अर्पण करणाऱ्यां रसिकेच्या भोवतीही अशीच मानसशास्त्राची महीरप उभी करण्यात आली आहे. ती म्हणते– ‘आपल्या आराध्य दैवताच्या पूजेसाठी कोणी फुले घेतो, कोणी सुवर्ण घेतो. साधनं नाममात्र असतात. प्रश्न असतो भक्तिभावाचा. मला जे प्रामाणिकपणानं द्यावंसं वाटलं ते मी दिलं. माझ्या दृष्टीने ते पूजन होत. तुम्ही व्यभिचार म्हणा त्याला.’
काळ्यांनी या कथांच्या माध्यमातून जे एक वेगळे वैचारिक वलय निर्माण केले आहे त्याची कल्पना याची यासाठी या दोन कथांचा एवढ्या विस्ताराने उल्लेख केला आहे.
अर्थात काळ्यांच्या कथांतील सारे विश्वात विकृतीला सद्गुण मानून मिरवणारे महाभाग आहेत, तद्वत सद्गुणाची पराकाष्ठा झाल्याने व्यवहारी जगाच्या दृष्टीने मॅडचॅप ठरलेली माणसेही आहेत. सारे काही विलक्षण. विचारांना चालना देणारे आणि अनेकदा धक्काही. त्यामुळे कथा वाचत असताना वाचक या विश्वात रंगून जातो. आणि कथा संपल्यावर त्याच्या मनात एक अनामिक हुरहुर तरळून जाते. खरेच हे असे असेल? आणि असेलच तर मला का दिसले नाही आजवर?
– आणि या हुरहुरीतच ‘कथा’कार काळे दडलेले आहेत. ...Read more