* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177668865
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NAINA IS BEAUTIFUL, AMBITIOUS AND ADVENTUROUS. AS A SMALL TOWN JOURNALIST FROM JHALAWAR, SHE RUSHES TO DELHI TO JOIN HER LOVE ABHAY DEFYING HER PARENTS. LUCKY TO FIND A JOB IN A DAILY, HER LIFE GETS BUSIER.
या कादंबरीचा विषय पत्रकारितेभोवती फिरणारा आहे. पत्रकारिता व राजकारण यांचं एक बेमालूम रसायन असतं. त्यामध्ये चढाओढ, कुरघोडी, काटछाट, रस्सीखेच, डावपेच ही राजकारणाची अंगप्रत्यंगही पाहावयास मिळतात. विविध प्रलोभनांचीही खिरापत चालू असते. काहीजण त्यात अडकतात अन् स्वत्व गमावून बसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता ध्येयवादानं भारलेली होती. कालमानानुसार त्यात बदल झाले, काही चांगले, काही न रुचणारे. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सर्व गोठींचा वापर करणारेही अनेक असतात. व्यवसायात प्रवेश करून कालांतरानं राजकारणात उडी घेणारे आणि तेथे हात पोळले की व्यवसायात परतणारेही आहेत. त्याचप्रमाणे प्रवाहात वाहून जाणारे, हात पोळल्यावर सावरणारे, परिस्थितीशी झुंज देणारे, जाळ्यात अडकणारे असे अनेक प्रकार आढळतात. बहुतेकांचं जीवन चाकोरीबद्ध असतं. रेल्वेच्या रूळांसारखे समांतर रेषेत चालणारे अनेक. स्थानक जवळ यायला लागलं की, गाडी रूळांच्या निरनिराळ्या सांध्यावरून वळणं घेत पुन्हा समांतर रूळांवर येते, तशी काहींची स्थिती. काहीजण त्रिकोणात तर काही चौकोनात फिरताना दिसतात; इच्छेनुसार मार्ग आखणारेही असतात; पण सर्वांनाच हवं ते ध्येय गाठता येतं, असं नाही. ’जयपूर पत्रिका’मध्ये काम करणारी नैना अशीच एक पत्रकार. ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल रजपूत यांची उच्चशिक्षित कन्या. अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली. संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी; पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. अभयशी लग्न होऊन दहा वर्षं झाली होती. या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं. मूलबाळ नसल्यानं तिला घरची तशी ओढ राहिलेली नव्हती. म्हणूनच पत्रकारितेच्या व्यवसायात तिनं पूर्ण झोकून देण्याचं ठरविलं. अभयचा व्यवसाय म्हणावा, तसा ठीक चाललेला नव्हता. तो व्यवसायात स्थिर होत नव्हता. पैशाची नेहमीच ओढाताण होत असे. तिच्या नोकरीमुळे कसंबसं घर चालत होतं. त्यातच पत्रकारितेच्या व्यवसायात असलेली असंख्य प्रलोभनं तिच्याभोवती रुंजी घालीत होती. तिने आजवर त्यांना चार हात दूर ठेवलं होतं, परंतु त्यांना कायमचं दूर ठेवता येईल काय? याचं उत्तर मात्र तिच्याकडं नव्हतं. भोवतालच्या परिस्थितीचा प्रत्येकावर काही न काही परिणाम होत असतो. प्रवाहाच्या उलट दिशेनं जाण्याचं धैर्य फारच कमी लोकांमध्ये असतं. आजवर टिकवून ठेवलेलं धैर्य खचेल काय, अशी शंका तिला येत असे. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य हळूहळू प्रलोभनांच्या भोवर्यात गुरफटू लागलं. आशा-आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरू झाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही. आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो की अन्य कोणी या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRIKON #TRIKON #त्रिकोण #FICTION #MARATHI #NAIKVIJAY "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 31-08-2008

    राजकारणाचे रूप... विजय नाईक हे दिल्लीतील मराठी पत्रकार. गेल्या २५ ते ३० वर्षांतल्या बदलांचे साक्षीदार, राजकीय व्यक्तींची सत्तास्पर्धा आणि हेवेदावे यांची कथाचौकट त्यांनी ती ‘त्रिकोण’ कादंबरीत फिट बसवली आहे. ‘त्रिकोण’ कादंबरीपूर्वी त्यांची एक-दोन पुसतके प्रसिद्ध झालेली असली तरी आता ते लेखक म्हणून चांगले स्थिरावतील याची खात्री पटते. नैना ही ध्येयवादी पत्रकार, राजकारणात मुरलेले मंत्री शिवेंद्रराज, सामाजिक मूल्यांची आस धरून चळवळीच्या कामात झोकून दिलेला नैनाचा पती अभय आणि नैनाच्या वाटचालीत सहाकारी झालेला मित्र मनोहर अशा चौकोनात नाट्य खुलते. नाट्यात पत्रकारिता, राजकारणातले ढोंग आणि क्रौर्य तसेच सामाजिक चळवळीतले प्रामाणिक भाबडेपण यावर भाष्य येते. नवी दिल्ली हे राजकारणातले सर्वांत मोठे सत्ताकेंद्र. हे केंद्र सामाजिक सेवेचे क्षेत्र राहिले नसून, ते व्यावसायिक कसे झाले आहे याचा पानोपानी प्रत्यय येतो. परदेशात परिषदा होतात. शिष्टमंडळे जातात. त्यांची निवड कशी होते यावरही मग प्रकाश पडतो. नैना ही या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. ती राजस्थानातल्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी. अभयच्या प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याशी लग्न करते आणि दोघेही दिल्लीत येतात. संसार रेटण्यासाठी नैना पत्रकार बनते. धडाडीमुळे तिची राजकीय वर्तुळात उठबस वाढते. राजकारणातली मुरब्बी माणसे पत्रकाराला बातम्या देतात ते त्यांच्या फायद्यासाठी. ‘त्रिकोण’मध्ये केंद्रीय मंत्री शिवेंद्रराज यांना नैनाचा सहवास हवासा वाटण्यातून लुब्ध होऊन तिला ते बातम्या देतात. याचसाठी नैना ज्युनिअर असी तरी संपादकाला फोन करून ते परदेशातल्या दौऱ्यात तिची वर्णी लावून देतात. पुढे लंडनालाही घेऊन जातात. पण शिवेंद्रराज यांचा आव असा की, तिच्या अडचणीच्यावेळी ते भल्या माणसासारखे मदतीसाठी सदैव तयार आहेत असा. तिला पैसे मिळण्यासाठी ते अनेकांचा विरोध पत्करून पैसे मिळवून देणाऱ्या माहितीपटाचे कामही देतात. मात्र हे सारे तुम्ही का करीत आहात हे नैना कधीच त्यांना विचारीत नाही. माहितीपटाच्या कामात तिच्या कार्यालयातल्या मनोहर मदत करतो. एखाद्या तरुणीसाठी मंत्र्याने नियम वगैरे तोडून कारभार करण्याचा बभ्रा होण्याला वेळ लागत नाही. योगायोग असा की, इकडे राजकीय पटही बदलू लागतो. शिवेंद्रराज हे नैनाला उमेदवारीही मिळवून देतात. पर्यटन मंडळाचे अध्यक्षपदही देतात पण नैना निवडणूक हरते. ते स्वत: निवडून येतात. याच काळात नैना आणि अभय यांच्यात भांडणे होतात, तेव्हा मनोहर तिच्याजवळ येतो. पुरते जाळे पसरल्यानंतर आणि पैशांनी अंकित केल्यानंतर शँपेनच्या नशेत शिवेंद्राज नैनाचा उपभोग घेतात. त्याहीवेळी नैना संतापत नाही. एकेकाळी संघर्षशील असणारी नैना प्रलोभनाच्या भोवऱ्यात सापडून घसरते. तिच्या आयुष्यात सतत तडजोडच येते. त्या तुलनेत तिचा नवरा सुखांना लाथाडत जातो. आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक माणसाला असावी. पण ती गाठताना फरफट होऊ नये. राजकीय लाभ घेतल्याने नैनाची नोकरी जाते. अभय दूर होतो आणि मनोहरला जवळ करताना मूल होणार नाही यावर डॉक्टरी शिक्कामोर्तब होते. तेव्हा मूल दत्तक घेण्याचा निर्णय नैना घेते. अपघातात शिवेंद्रराज मरण पावतात, पण त्यापूर्वीच त्यांनी इच्छापत्र तयार करून नैनासाठी २५ लाखांची तरतूद केलेली असते. नैनाचे आयुष्य कोठून कोठवर येते याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. राजकारणातील चढाओढ, कुरघोडी, शह आणि काटशह, डावपेच आणि पत्रकाराला वश करण्यासाठी सरकारी खिरापतीची खैरात आपल्याला अस्वस्थ करते. राजकारणाचे अंगप्रत्यंग किती किळसवाणे असते याची जाणीव ही कादंबरी करून देते. नाईक यांनी घटनांचा मालमसाला ठासून भरलाय. तो वाचकांना भोवंडून टाकेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    तीन कोनांतून उलगडलेले कथानक… जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्थळ, माणसं, समाज, वेगवेगळ्या समाज व्यवस्था, घडणारे प्रसंग, घटना, त्यांना प्रतिसाद देणारी स्वत:सहित भोवतालची इतर माणसे यांच्यासह जगण्याचे संदर्भ चिकटलेले असतात. स्थळ-काळ यांच्या बरोबरीनेच रूढसाज व्यवस्था आणि व्यक्तिसमूह यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया परस्परांची आयुष्यं घडवीत-बिघडवीत असतात. या सर्व गोष्टींचे जगण्यातून भान येणे आणि त्यानंतरचा नवा भोवताल कसा दिसतो/दिसला याचे चित्रण कादंबरीकार कादंबरीतून करत असतो. व्यवस्थेचे, जगण्याचे, जगताना श्रेयस-प्रेयस काय, यांची जाणीव झाल्यानंतर व्यवस्थेशी तडजोड करणे किंवा व्यवस्थेशी जुळवून घेणेच अशक्य आहे हे समजणे, त्यानंतर व्यवस्थेशी झगडणे, असा जाणिवेचा होणारा प्रवास कादंबरीतून व्यक्त होत असतो. कथानक, वेगवेगळ्या घटना, पात्रे, प्रसंग, पात्रांच्या जाणिवेचा विकास या सर्व घटकांच्या एकरूप रचनेतून कादंबरी आकार घेते. प्रसिद्ध पत्रकार विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण’ या कादंबरीचे सार जाणून घेण्यापूर्वी कादंबरी या साहित्य प्रकाराचे सामर्थ्य आणि तिच्या रचनेचे वैशिष्ट्य कोणते, हे जाणणे निकडीचे वाटते. या कादंबरीला जागतिकीकरणाच्या रेट्यातील प्रसारमाध्यमे, पत्रकारिता, हितसंबंधाची जाणीवपूर्वक जोपासना करीत यशस्वी होण्याचे, अधिकाधिक पैसा मिळवीत श्रीमंत होण्याचे संदर्भभान लाभलेले आहे. विशिष्ट काल-परिस्थितीमधून बदलणारी जीवनमूल्ये माणसाच्या जगण्याचा ताबा घेतात. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या जगण्यावर अधिकार गाजविणाऱ्या लहान-मोठ्या घटना, एका अर्थाने प्रवापतित होऊन जगावे लागत असल्याची जाणीव होणे, याचा अनुभव आपण घेत आहोत. असा व्यापक समकालीन जगण्याचा संदर्भ ‘त्रिकोण’ या कादंबरीला लाभलेला आहे. परंतु लेखकाला जाणवलेला जगण्याचा अर्थ त्याने कादंबरीच्या चौकटीत कसा मांडलेला आहे, जगण्यातल्या प्रसंगांना मोकळेपणाने भिडणे, त्याच्याबरोबर त्यातले बारकावे टिपत, खोलवर जाणवलेला जगण्याचा अन्वयार्थ मांडण्याचा प्रयत्न लेखकाकडून घडतोय काय, या दोन प्रश्नांच्या उत्तरामधून कादंबरीचे यशापयश निश्चित होत असते. या दृष्टीने विजय नाईक यांच्या ‘त्रिकोण या कादंबरीचा विचार करणे आवश्यक आहे. नैना’ ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल यांची उच्चशिक्षित मुलगी ही कादंबरीची नायिका आहे. अभयच्या प्रेमापोटी आई-वडिलांची पर्वा न करता ती दिल्लीत येते. संसाराला हातभार लावणे, या हेतूने ती पत्रकार होते. कामाच्या निमित्ताने तिच्या आयुष्यात आलेले पुरुष, व्यवसायात यश मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांशी तिने सूत जमविणे, त्याच वेळी अभयबरोबर थाटलेल्या संसारात अपयशी होणे, यांचे चित्रण कादंबरीत आलेले आहे. नैनाला वाटणारी मातृत्वाची ओढ, व्यवसायात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत आयुष्यात सहचर असण्याची नैनाला वाटणारी गरज अशा तीन कोनांभोवती कादंबरीचे कथानक रचलेले आहे. कादंबरीत वेगवेगळ्या घटना-पात्रे-प्रसंग-उपप्रसंग परस्परांशी संबंधित नाहीत असे वाटणारी प्रकरणे आलेली आहेत. कादंबरीमध्ये फार मोठ्या परिघात विषयसूत्रे विस्कळितपणे पसरलेली आहेत. कथनपर साहित्यकृती रचण्यासाठी लेखकाजवळ आवश्यक असणारी कल्पकता हा घटकही कादंबरींच्या कथानकाच्या रचनेमध्ये आढळून येत नाही. कथानकाची उकल करणे, पात्रांच्या आंतरिक जाणिवेचा प्रवास उलगडत जाणे, या दोन्हींच्या परस्पररचनेतून एकसंध कादंबरी वाचत असल्याची जाणीव ‘त्रिकोण’ कादंबरीतून जोरकसपणे होत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more