* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9789353170950
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 736
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : COMBO SET
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HAMLET, ROMEO AND JULIET, KING LEAR, AND THE TEMPEST ARE NOT JUST PLAYS, BUT IMMORTAL PIECES OF LITERATURE BY ONE OF THE GREATEST PLAYWRIGHTS TO HAVE EVER LIVED, WILLIAM SHAKESPEARE. THIS SERIES PRESENTS A THOUGHTFUL SELECTION OF TWENTY-TWO PLAYS BY SHAKESPEARE, WHICH HAVE BEEN SUITABLY ABRIDGED AND UPDATED FOR YOUNG READERS. THE ADAPTED NARRATIVE STYLE IS ACCESSIBLE, AND COUPLED WITH UNIQUE ILLUSTRATIONS THAT WILL ENGAGE CHILDREN AND SUPPORT THEM AS THEY BEGIN THEIR JOURNEY OF READER DEVELOPMENT AND LITERARY INTEREST.
जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. शोकांतिका, सुखांतिका आणि एतिहासिक नाटकांचे तीन प्रकार शेक्सपिअरनी नाटकांसाठी वापरले. त्यात शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष गाजल्या. शेक्सपिअरनं जागतिक रंगभूमीला नवे आयाम दिले. चारशेहून अधिक वर्षे जागतिक साहित्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या साहित्यिकाची कुमारांना ओळख व्हावी , यासाठी शेक्सपिअरची नाटकं या मालिकेत विशेष शैलीत सादर करण्यात आली आहेत. शेक्सपिअरच्या बावीस लोकप्रिय नाटकांचा यात समावेश आहे. अ मिडसमर नाइट्स ड्रीम, अ‍ॅज यू लाइक इट,ट्वेल्थ नाइट,द टू जेन्टलमेन ऑफ व्हेरोना सारखी कल्पनारम्य नाटके, ऑथेल्लो,किंग लियर,मॅकबेथ,रोमियो अ‍ॅन्ड ज्यूलिएट,हॅम्लेट सारख्या शोकांतिका आणि द टेंप्टेस्ट, द विंटर्स टेल,सिंबेलाईन सारखी सौंदर्यवादी नाटके यात समाविष्ट आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 07-04-2019

    विश्वविख्यात साहित्यिकाचं विविधरंगी कथाविश्व... विल्यम शेक्सपिअर – विश्वविख्यात नाटककार आणि कवी. आज एकविसाव्या शतकातही त्याच्या साहित्याचं गारूड वाचकांच्या मनावर कायम आहे. शेक्सपिअरने दु:खांतिका आणि सुखांतिकाही लिहिल्या. त्याच्या दु:खांतिकांमधून मानी जीवनातील दु:खाची अटळता त्याने नाट्यमय रीतीने अधोरेखित केली. त्यामुळे त्याच्या दु:खांतिकांनी जागतिक साहित्यात इतिहास घडवला. अशा या विश्वविख्यात साहित्यिकाच्या साहित्यकृती कथारूपात मराठीत आणण्याचं श्रेय जातं मेहता पब्लिशिंग हाऊसकडे. शेक्सपिअरच्या साहित्यावर आधारित कथांची तब्बल बावीस पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊसने बाल/ कुमार वाचकांच्या भेटीसाठी आणली आहेत. या पुस्तकांचा अनुवाद केला आहे मंजूषा आमडेकर यांनी. ‘अ मिडसमर नाईट्स ड्रीम’मध्ये जंगलात गेलेले चार प्रेमिक, तिथे परीराज्यातील राजाराणीशी झालेली त्यांची भेट आणि त्यांच्याशी भेट झाल्यानंतर या प्रेमिकांच्या विश्वात उडालेला गमतीदार गोंधळ, याचं अतिशय खुसखुशीत चित्रण केलं आहे. ‘ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल’ या सुखान्तिकेमधून अनाथ हॅलेना आणि सरदाराचा मुलगा बट्र्राम यांची प्रेमकहाणी सामोरी येते. रोमन जनरल अँटोनी इजिप्तची राणी क्लिओपात्राच्या प्रेमात पडतो. प्रेम आणि साम्राज्याची जबाबदारी यांच्यात सुरू असलेली अँटोनीच्या कसरतीचं कथारूपात चित्रण केलं आहे ‘अँटोनी आणि क्लिओपात्रा’मध्ये. ‘अ‍ॅज यू लाइक इट’मध्ये हद्दपार ड्यूकची मुलगी रोझलिंड आणि ओरलँडो यांच्यातील नाजूक भावबंधांचं विलक्षण दर्शन घडतं. ‘सिंबलिन, किंग ऑफ ब्रिटन’ ही युद्ध आणि होरपळीच्या धाग्यात विणलेली, सिंबलिनची मुलगी इमोजन आणि पोस्थुमससचीr प्रेमकहाणी आहे. ‘हॅम्लेट, प्रिन्स ऑफ डेन्मार्क’ म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या हॅम्लेटची दु:खान्तिका आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरच्या ‘हेन्री फाइव्ह’ मध्ये इंग्लंडचा बेताल राजकुमार आदर्श राजा कसा होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण आहे. ‘ज्यूलियस सीझर’मध्ये ज्यूलियस सीझर या रोमन लोकशाहीच्या सिनेटमधल्या शूर आणि तडफदार सिनेटरचा काही सिनेटर्स खून करतात. सीझरचा परममित्र अँटोनी खुन्यांचा सूड घेऊन रोममध्ये लोकशाही आणतो; पण अंतर्गत दुफळीमुळे ती लयाला जाते, असं कथानक आहे. ‘राजा लिअर’मध्ये ब्रिटनच्या स्तुतिप्रिय लिअर राजाची कथा आहे. त्याच्या तीन मुलींपैकी त्याची स्तुती करणाऱ्या दोन मुलींना तो सगळी संपत्ती देऊन टाकतो आणि स्तुती न करणाऱ्या मुलीला काहीच देत नाही; संपत्ती मिळालेल्या दोन्ही मुली त्याला चांगली वागणूक देत नाहीत आणि जिला लिअरने काहीच दिलेलं नसतं, ती मुलगी त्याला मदत करते. ‘मच अ‍ॅडो अबाउट नथिंग’मध्ये मसिनाचा गव्हर्नर लिओनाटोची मुलगी हेरो आणि तिचा प्रेमिक क्लाउडिओ यांच्यात गैरसमज झाल्यामुळे ते दुरावतात आणि नंतर ते कसे एकत्र येतात, याचं चित्रण आहे. ‘ऑथेल्लो’ हे शेक्सपिअरचं प्रभावशाली नाटक. ऑथेल्लो आणि डेस्डिमोनाच्या प्रेमाचं विवाहात झालेलं रूपांतर, डेस्डिमोनाबद्दल ऑथेल्लोच्या मनात निर्माण झालेला संशय आणि त्यातून उभं राहिलेलं सूडनाट्य...असा या कथानकाचा प्रवास होतो. ‘राजा रिचर्ड’ म्हणजे शेक्सपिअरनं रंगवलेला क्रूर खलनायक. त्याच्या स्वगतातून हे कथानक फुलत जातं. त्याच्या क्रूरतेला विनोदाची झालर लावलेली असल्यामुळे कथानकात रंगत येते. शेक्सपिअरच्या रोमॅन्टिक नाटकांपैकी सर्वाधिक गाजलेलं नाटक ‘रोमियो अँड ज्युलिएट.’ इटलीतल्या वेरोना शहरातल्या सरदार घराण्यांमधील रोमियो-ज्युलिएट एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्या दोघांच्या घराण्यांमध्ये असलेल्या कट्टर वैराला ते बळी पडतात. जगभरातल्या सिने-नाट्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलेलं शेक्सपिअरचं नाटक ‘द कॉमेडी ऑफ एरर्स.’ सरॅकसचा वृद्ध व्यापारी एगॉन, त्याची जुळी मुलं आणि त्यांचे जुळे नोकर नाटकात एकच धमाल उडवून देतात. ‘अंगूर` नावाचा धमाल हिंदी विनोदी चित्रपट याच नाटकावरून बेतला गेला आहे. ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ ही कथा आहे शायलॉक या अत्यंत दुष्ट आणि लबाड ज्यू सावकाराची. पोर्शिया नावाची तरुणी शायलॉकचे दात त्याच्याच घशात घालून, त्यानं स्वत:च विणलेल्या जाळ्यात त्याला कशी अलगद अडकवते, याचं रंगतदार चित्रण या कथेमध्ये केलं आहे. ‘द टेमिंग ऑफ द श्रू’ या शेक्सपिअरच्या खुसखुशीत, गमतीदार विनोदी नाटकात कॅथेरीन या आगाऊ, उद्धट आणि कजाग मुलीला पेट्रूशिओ नावाचा तरुण समजंस बायको बनवायचा निश्चय करतो आणि त्याच्या या प्रयत्नात घडलेल्या अनेक गमतीदार प्रसंगांचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. आपल्या भावाकडून फसवला गेलेला प्रॉस्पेरो आणि त्याची लहान मुलगी, मिरांडा एका जादुई बेटावर पोहोचतात. एरिएल या आत्म्यांच्या प्रमुखाच्या मदतीनं प्रॉस्पेरो आपला विश्वासघात करणाऱ्यांना अद्दल घडवतो आणि आपलं राज्य परत मिळवतो, असं कथानक आहे ‘द टेम्पेस्ट’चं. तीन चेटकिणींच्या भविष्याच्या प्रभावाखाली क्रौर्य आणि सत्तालालसेची परिसीमा गाठलेल्या लॉर्ड मॅकबेथची कथा आहे ‘द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ.’ गहन, गूढ घटनाक्रम आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे ही कथा विशिष्ट उंची गाठते. ‘द टू जंटलमन ऑफ व्हेरोना’ची कथा रोमॅन्टिक, विनोदी आहे. प्रोटियस आणि व्हॅलेंटाइन हे दोन जिवलग मित्र असतात. त्यांच्यातल्या मैत्रीत दरी निर्माण होते. ज्युलियाच्या प्रेमात असणारा प्रोटियस व्हॅलेंटाइनची प्रेमिका सिल्व्हियाच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या प्रेमात दरी निर्माण करतो; पण ज्युलिया आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी युक्तीचा वापर करते. ‘द विंटर्स टेल’ ही कथा आहे सिसिलीचा राजा लिओन्टेस याची. आपली बायको आणि आपल्या परम मित्राविषयी राजा संशय घेतो. त्याच्या या संशयी वृत्तीमुळे सगळ्यांच्याच आयुष्याची धूळधाण होते. ‘टिमॉन ऑफ अथेन्स’ - टिमॉन हा अथेन्समधला श्रीमंत माणूस आपल्या मित्रांवर आणि गरजूंवर पैशाची उधळण करून एक दिवस कफल्लक होतो. त्यानंतर इतके दिवस त्याच्या जिवावर मजा मारणारे सगळेजण त्याला टाळायला लागतात. हताश झालेला टिमॉन सरळ जंगलात निघून जातो. त्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जातो. ‘ट्वेल्थ नाईट` ही एक हलकीफुलकी मजेदार प्रेमकथा आहे. सरदार घराण्यात जन्मलेली व्हिओला आणि तिचा जुळा भाऊ सेबॅस्टिन एका जहाजातून प्रवास करत असताना ते जहाज फुटतं. त्यांची ताटातूट होते. व्हिओला आयलिरियाच्या ड्यूकचा नोकर बनून मुलाच्या रूपात वावरू लागते. आणि ड्यूकचं जिच्यावर प्रेम असतं ती ऑलिव्हिया मुलाचा वेष धारण केलेल्या नोकराच्या प्रेमात पडते आणि एकच गोंधळ उडतो. तर असं हे शेक्सपिअरचं कथाविश्व विविधरंगी, विविधढंगी व्यक्तिरेखांनी गजबजलेलं आणि जीवनाभिमुख आहे. त्याच्या सुखांतिकांमधून प्रसन्नतेचे तुषार उडतात, तर दु:खांतिकांमधून मनोवेदनेचे डोंब उसळतात. या कथांमधील घटना आणि व्यक्तिरेखांना साजेशी पावडर शेडिंगमधली चित्रं, हे या पुस्तकांचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावं लागेल. शेक्सपिअरचा कल्पनाविलास आणि त्याचं माणसाच्या अंतर्मनात शिरण्याचं सामर्थ्य या कथांमधून जाणवत राहतं. राजा-राणी, पऱ्या त्याच्या या कथांमध्ये आहेत, पण इतर बालकथांपेक्षा वेगळ्या स्वरूपात त्या भेटतात. शेक्सपिअरची नाटकं अनेक भाषांमध्ये भाषांतरित/रूपांतरित झाली; पण त्याच्या कथा भाषांतराच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिल्या. त्या कथा आता या बावीस पुस्तकांच्या निमित्ताने बाल/कुमार वाचकांसमोर आल्या आहेत. मंजूषा आमडेकर यांचा अनुवादही सरस झाला आहे. शेक्सपिअरसारख्या जगत्विख्यात साहित्यिकाची ओळख इतक्या उत्तमोत्तम कथांमधून बाल/कुमार वाचकांना होणार आहे. माणसाच्या स्वभावाच्या विविध छटांचं दर्शन घडविणाऱ्या या कथा बाल/कुमार वाचकांचं मनोरंजन तर करतीलच; पण त्यांना मार्गदर्शकही ठरतील, असं वाटतं. तेव्हा या महान साहित्यिकाच्या या साहित्यकृती बाल आणि कुमारांबरोबरच मोठ्यांनीही अवश्य वाचाव्या अशा आहेत. –अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more