* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS BASED ON THE EPIC MAHABHARATA BY MAHARISHI VYAS. ALL THE CHARACTERS IN THIS ARE DIVINE YET EACH REMEMBERS BEING HUMAN. THEY ALL HAVE THEIR FEET SET FIRMLY ON THIS SOIL. EACH ONE FACES LIFE DIFFERENTLY. EACH ONE STRUGGLES THROUGHOUT. EACH ONE HAS A DIFFERENT PERSONALITY. EACH ONE POSSESSES DIFFERENT INITIATIVES AND EACH ONE FACES DIFFERENT DESTINY. ALONG WITH THIS, WE SEE VARIOUS DIVINE MIRACLES, CURSES AND BLESSINGS. THIS STORY TAKES US TO LEVELS DIFFERENT THAN THAT OF A HUMAN. DR. S. L. BHAIRAPPA THE LEADING NOVELIST, THE PHILOSOPHER FROM KARNATAKA HAS TRIED TO GIVE A MEANING TO ALL THESE MARVELS, THESE CURSES AND BLESSINGS. HE REVEALS THE CHARACTERS HIDDEN BENEATH THEM. HE PICTURES THEM DIFFERENTLY IN THE LIGHT OF MODERN HUMAN SCIENCES, SOCIAL CONCEPTS GIVING THEM A NEW MEANING, PERSONALITY, MAKING THEM UNIQUE AND SENSATIONAL.
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.
म.सा.प.-स.ह.मोडक पुरस्कार १९९२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarHrishikesh Vidar

    *पर्व* साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये मी रत्नाकर मतकरींची `ऍडम` ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर मधले २ महिने कुठलेच नवीन पुस्तक वाचले नव्हते. काही दिवसांपूर्वी सहज चाळण्यासाठी `पर्व` हातात घेतली. डॉ.एस.एल. भैरप्पांनी लिहिलेली आणि उमा कुलकर्णींनी नुवाद केलेली ही मी वाचत असलेली पहिलीच कादंबरी. ८६७ पानांची ही कादंबरी `वाचून होईल की नाही` या साशंकतेसह वाचता वाचता ३ दिवसात संपली. मी कधीच कल्पना केली नव्हती अशी महाभारताची बाजू माझ्यासमोर `पर्व`मुळे आली. या कादंबरीचे मला सर्वात आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील सर्व पात्रे ही `माणसे` म्हणून आपल्या समोर येतात. कदाचित, त्यामुळेच कादंबरी जास्त जवळची वाटते. महाभारतातील कुंतीला मिळालेले मंत्र, भीष्माचे इच्छामरण, चिरंजीवत्वाची संकल्पना, शस्त्रास्त्रे इ. चमत्कृतीपूर्ण गोष्टींबद्दल प्रत्येकाला खूप कुतूहल असते. तसेच ते मलाही होते. पण ही कादंबरी वाचून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. या घटना अशाच घडल्या असतील किंवा नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु अशा घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे नक्की. असे वाटण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे डॉ. भैरप्पांच्या लेखनातून समोर येणारे महाभारतकालीन भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीविषयक संदर्भ. इसवी सन पूर्व बारावे शतक हा महाभारताचा काळ या कादंबरीत आहे. त्या काळात असणाऱ्या चालीरीती, राज्यांच्या सीमा, आचार-विचार, भौगोलिक रचना, नगररचना, सामाजिक उतरंड इथपासून ते अगदी प्रत्येक राज्यानुसार आहाराच्या सवयींमध्ये होणारा बदलही आपल्याला वाचायला मिळतो. इतका सूक्ष्म अभ्यास करून ही कादंबरी लिहिली असल्याने काही काळानंतर आपण खरा खुरा घडलेला इतिहास वाचत असल्याचे आपल्याला जाणवू लागते. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे या कादंबरीतील सर्व पात्रे ही `माणसं` म्हणून वापरतात. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाला, बुद्धीचातुर्याला, सहनशीलतेला, वयोमानाला मर्यादा जाणवतात. त्यामुळे महाभारताच्या या आवृत्तीचा कोणीच नायक नाही. बहुतेकांना खरं वाटणार नाही पण या कादंबरीत `देव` अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. तसेच श्रीकृष्ण हा दैवी अवतार म्हणून नव्हे तर यादवांचा राजा म्हणून आपल्याला वावरताना दिसतो. हे पुस्तक वाचताना मला नरहर कुरुंदकरांच्या एका वाक्याची राहून राहून आठवण झाली. ते वाक्य काहीसं या अर्थाचं होतं की, `इतिहासातील पात्रांचे एकदा दैवतीकरण झाले की त्या काळाचा अभ्यास करणे शक्य होत नाही. कारण, इतिहासाचा अभ्यास हा त्या काळातील सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचा अभ्यास असतो. ऐतिहासिक पात्रांना एकदा देव केले की असा अभ्यास करणे शक्य होत नाही.` भैरप्पांनी महाभारताची केलेली ही मांडणी यामुळेच तो काळ डोळ्यांसमोर उभा करून जाते. वाचताना प्रत्येक व्यक्तिरेखेचा भैरप्पांनी केलेला सखोल अभ्यास आपल्याला सहज दिसून येतो. भीष्म, द्रोण, कृष्णद्वैपायन, धृतराष्ट्र, युधिष्ठिर, भीम, दुर्योधन, कर्ण, कुंती, द्रौपदी अशा सर्व पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये भैरप्पांनी जबरदस्त रंगवली आहेत. त्यांवर वयोमान, गर्व, हट्ट, धर्म-अधर्माच्या तत्कालीन संकल्पना, मानापमानाचे अनुभव, लहानपणापासून मिळत आलेली वागणूक इ. सर्व गोष्टींचा प्रभाव जाणवतो. उमा कुलकर्णींनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद करताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्याचे दिसून येते. मराठीतच लिहिलेली कादंबरी वाटावी इतक्या सहजसुंदर भाषेत त्यांनी हा अनुवाद केला आहे. तसं पाहायला गेलं तर महाभारत ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. मूळ कथेत काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्थळ, काळानुसार त्यात फरकही जाणवतो. त्यामुळे महाभारताची कोणतीच आवृत्ती १००% सत्य आहे हे आपण सांगू शकत नाही. तरीही, मी महाभारतावर आजवर वाचलेल्या कादंबऱ्यांपैकी `पर्व` सर्वात वेगळा दृष्टिकोन देणारी आणि `ही बाजुदेखील असू शकते` हे सांगणारी ठरली आहे. - हृषिकेश विदार ...Read more

  • Rating StarMahendra Pangarkar

    `लॉकडाऊन`च्या कृपेने, `पर्व` ही जवळपास आठशे पानी कादंबरी सलग वाचण्याचा योग आला. या अनोख्या, गृहितांना धक्के देणाऱ्या, कादंबरीबद्दल.. `पर्व - एक वास्तववादी महाभारत` `महाभारत` या महाकाव्यास आत्तापर्यंत अनेक लेखकांनी आपापल्या परीने न्याय द्यायचा ्रयत्न केलाय. `अमर चित्र कथा` ते `मृत्युंजय` पर्यंत, महाभारत व त्यातील पात्रे अनेक वेळा आपल्याला भेटत आली आहेत. परंतु लेखक, तत्त्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी `पर्व` मधून मांडलेलं `महाभारत` म्हणजे एकामाद्वितीय. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही चमत्कार किंवा कोणत्याही पात्राचे दैवतीकरण नाही. सारं काही आहे ते मानवीय पातळीवर. बरं त्यांनी हे मनाला येईल तसं कल्पनारम्य लिहिलंय असंही काही नाही बरं. मी तर म्हणेन यापूर्वी कुणीही कधी महाभारत एवढं अभ्यासपूर्ण लिहिलेलं नसावं. चौदा वर्षे अभ्यास करून, महाभारतातील प्रत्येक स्थळांना भेटी देऊन, तिथल्या बारीकसारीक तपशिलांचा अभ्यास करून, महाभारतावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांशी चर्चा करून, त्यांनी हे महाभारत लिहिलंय. म्हणूनच हे महाभारत वाचल्यानंतर, आत्तापर्यंत महाभारतावर वाचलेल्या कादंबऱ्या आपल्याला बाल वाङ्मय न वाटल्या तर नवलच! यात महाभारताची कथा आहे, पण त्यात नाहीत कोणतेही चमत्कार, नाहीत कुणी देव वा नाहीत कुणी दानव.आहेत ते तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणसं, राजे, योद्धे इ. इ., प्रेम, राग, लोभ, मोह, मत्सर, मैथुन इ साऱ्या मानवीय गुण अवगुणासह. यातील `कृष्ण` कोणी देव नसून एक राजा आहे, जो चतुर आहे, बोलण्यात वाकबगार आहे, सगळ्या आर्यवर्ताची, आजूबाजूची माहिती ठेवणारा, पांडवांचा सखा आहे. इतकेच नव्हे तर `राक्षस` हे सुद्धा कोणी मायावी शक्ती असलेली दृष्ट प्रवृत्ती नसून ते जंगलात राहणारी, शरीराने धष्टपुष्ट, कच्चे मांस खाणारी, काहीशीे अप्रगत (तेंव्हाच्या इतरांच्या तुलनेत) असलेली जमात आहे. या महाभारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील पात्रांचे तरल मनोविश्लेषण. यावितिरिक्त यात आहेत त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन (त्यावेळच्या नकाशा सहित!) म्हणजे त्यावेळचे विविध राज्ये, त्याच्या सीमा, लगतचे प्रदेश, रस्ते, परिसर इत्यादी सारं तपशीलवार दिलेलं आहे. याबरोबरच त्यावेळची संस्कृती, चालीरीती, रूढी, आहार विहार, युद्धाची पद्धत, धार्मिक आचरण, आर्यांमधील पोटजाती, आर्येतर समाज, समाजांतील परस्पर विवाह आणि लैगिक संबंध, तत्कालीन अरण्य व कृषिभूमीचा तपशील याचीही जोड आहे. या साऱ्या गोष्टी कथेचाच एक भाग बनून येतात, त्यामुळे कथेची विश्वासार्हता नक्कीच वाढते. इथं आपण महाभारतातील आत्तापर्यंत वाचत आलेल्या प्रत्येक दैवी चमत्काराऐवजी तर्कसंगत, अभ्यासपूर्ण पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ, यात संजयला कोणतीही दिव्यदृष्टी नाही तर तो हस्तिनापूरहुन घोड्यावरन युद्धाच्या ठिकाणी जातो, व हालहवाला बघून धृतराष्ट्राला सांगायला येतो. यात हस्तिनापूरहून युद्धभूमीचं अंतर, तो निघून पोहचणे यासाठी लागणारी वेळ, तोपर्यंत धृतराष्टाची होणारी तगमग हे सारं इतकं अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलं आहे की `दिव्यदृष्टी` आपल्याला विनोद वाटू लागते. आणि असे तर्कनिष्ठतेचे अधिष्ठान असल्यामुळेच द्रौपदीचे पांडवांशी नातेसंबंध, कुंतीची पुत्रप्राप्ती ह्या व इतर अनेक गोष्टी सरळ, परखडपणे, कोणताही आड पडदा न ठेवता, स्पष्टपणे मांडण्याची हिम्मत ते करतात. पुस्तक वाचायला घेतल्यावर, पुस्तकाची जातकुळी आपल्याला सुरवातीलाच लक्षात येते व मग पुढील कथेत आपण आत्तापर्यंत ऐलेल्या चमत्काराऐवजी कक्की के घडलं असेल, त्याचं कोणतं लॉजिक असेल, ती घटना म्हणजे नक्की काय असेल ही उत्सुकता पानागणिक वाढत जाते आणि ही जवळपास 800 पानी कादंबरी कधी हातावेगळी होती ते कळतसुद्धा नाही. `पर्व` मध्ये महाभारतातील `त्या` महायुद्धाचे अगदी तपशीलवार वर्णन तर आहेच, याशिवाय हे युद्ध सुरू होण्याआधी दोन्ही बाजुंनी केलेली सैन्याची जमवाजमव, त्यासाठी दूर दूर वेगवेगळ्या राज्यांत जाऊन, दूत पाठवून, आपली बाजू भक्कम करण्याचा केलेला प्रयत्न, यध्यमागची मानसिकता, नीतिशास्त्र, हे सारं तपशीलवार दिलंय. युद्धभूमी, त्यातील सहभागी सैन्य, त्यांची मनस्थिती, त्यांची व्यवस्था, युद्धभूमीवर जाणवणाऱ्या समस्या, दिवसागणिक बदलत जाणारी युद्धभूमी, युद्धान्तरची विदारक परिस्थिती, इत्यादी सारं बारीकसारीक तपशिलासह दिलंय. म्हणूनच आपण वाचताना फक्त वाचक न राहता प्रत्यक्ष युद्धभूमी अनुभवतो... आपणही सामील होतो युद्धाच्या तयारीत, आपणही अनुभतो तो संहार, अनुभवतो ती योध्यांमधली अपरिहार्यता... आपलेही पावले अडखळतात त्या पडलेल्या प्रेतांच्या खचामध्ये... ...आणि म्हणूनच हे महाभारत वाचून संपले तरी आपल्याला त्या काळातून, त्या मनस्थितीतून बाहेर यायला काही काळ जातो. - महेंद्र पांगारकर ...Read more

  • Rating StarVijay ingole

    फारच छान आणि उत्कृष्ट कादंबरी आहे

  • Rating StarVijay Saravate

    #पर्व लेखक - डॉ. एस. एल. #भैरप्पा अनुवाद : उमा कुलकर्णी व्यास लिखित महाभारत म्हणजे एक अद्भुत महाकाव्य, जे काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलं. नंतरच्या कालखंडात त्यात आणखीही काही श्लोकांची भर पडली. या महाकाव्यातली पात्रं इतकी भव्य नि भारदस्त कि अदी देवत्वाला पोहोचलेली. हल्ली तर त्यातील केवळ एकाद-दुसऱ्या पात्रावरही महान महान लेखकांनी ग्रंथनिर्मिती केली. तर या उदात्त आणि देवत्वाला पोहोचलेल्या पात्रांना पुन्हा साधारण माणसं भैरप्पांनी पर्व मध्ये केली. हे करताना त्यांनी शाप - वरदान वगैरे गोष्टींना फाटा मारला. त्यामुळं त्यातून त्याकाळचा समाज, समाजव्यवस्था, त्यांची नीतिमूल्ये वगैरे गोष्ठीवर चांगला प्रकाश पडतो. इतिहासाचार्य वि. का. #राजवाडे (#भारतीय #विवाहसंस्थेचा इतिहास) यांची विचारधारा पर्व मध्ये भैरप्पांनी अधोरेखित केली आहे. वानगीदाखल काही उदाहरणे द्यायची झाली तर पांडव जन्म, पंडूचा शाप, भीष्माचं शरपंजरी मरण वगैरे वगैरे. आता इथं गंमत अशी आहे की कालानुरूप सामाजिक व्यवस्था, नीतिमूल्ये बदलत गेली त्यामुळे पूर्वीच्या काही चालीरीती नंतरच्या पिढयांना कालबाह्य व नीतिभ्रष्ठ वाटू लागली, परिणाम व्यासांना ते काहीतरी मखलाशी करून लपवावंस वाटलं असावं. त्यातूनच कदाचित स्त्री-पुरुष संभोगाशिवाय मुलं जन्माला घालण्याची कथा दैवी गोष्ट मध्ये टाकून लपवून टाकली (पांडव जन्म कथा). दम ऋषी मृगीसोबत संग करताना पंडू राजाकडून मारला गेला आणि त्याने पंडुला शापदग्ध केलं, इथं हे लोक पशुसोबतही मैथुन करीत असं न लिहिता व्यासांनी ते रूप पालटून कामक्रीडा करीत होते असं लिहिलं अथवा पंडू राजाच्या सहमतीने कुंतीला ३ परपुरुषांपासून (विवाहापूर्वीचा पकडून ४) आणि माद्रीला २ परपुरुषांपासून पुत्रप्राप्ती झाली. हि काही शे वर्षांपूर्वीची उघडीनागडी कथा व्यासांना धर्म - नीतीला गौण आणणारी वाटली त्यामुळे त्यांनी हि पुत्रप्राप्ती देवांकडून झाली असे लिहिले. पण केवळ असे प्रथम व्यासांनीच केले असे वाटत नाही. कुमारी मेरीला कोना परपुरुषापासून ख्रिस्त झाला, पण यालाही यहुद्यांनी दडवून त्यालाही देवपुत्र केले. कारण, व्यास आणि हे ख्रिस्ती पंडित यांना हे धर्मबाह्य वर्तन वाटलं म्हणून त्यांचा हा आटापिटा. अतिशय उत्तम आहे, किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. विजय सरवते १०-११-२०२० ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more