* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NASHTYA MAEYER NASHTYA GADYA
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788171619221
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 1999
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME OF THE BOOK IS NASHTA MEYER, NASHTA GADYA. THE SOCIETY CONSIDERS ME TO BE NASHTA THAT IS THE ONE WHO IS NOW OUT OF HAND. BUT, I PREFER BEING CALLED THAT. BECAUSE IT IS A FACT THAT WHEN A WOMAN WANTS TO OVERCOME HER PAIN, POVERTY AND MISERY; WHEN SHE TRIES TO OPPOSE THE FILTHY RULES OF RELIGION, SOCIETY AND THE COUNTRY, WHEN SHE OPPOSES THE RIGHTS WHICH INSULT HER, WHEN SHE IS ALERT ABOUT HER RIGHTS, THEN THE SO CALLED GENTLEMEN OF THE SOCIETY CALL HER `NASHTA`. IF A WOMAN WANTS TO IMPROVE THEN THE FIRST CONDITION IS SHE HAS TO FORGET HERSELF, SHE HAS TO PERISH HERSELF. UNLESS AND UNTIL A WOMAN IS PERISHED FROM THE SOCIETY, SHE CANNOT BE RELIEVED FROM THE SOCIETY. ON THE CONTRARY THE WOMAN WHO IS PERISHED IN THE EYES OF THE SOCIETY IS IN TRUE SENSE THE HEALTHIEST AND INTELLIGENT HUMAN BEING.
या पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वत:चं दु:ख, दैन्य, दुर्दशा दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छनियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाया गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक `नष्ट` म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं `नष्ट` व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं `नष्ट` झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन
उत्कृष्ट अनुवादासाठी रणजीत देसाई पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 28-05-2004

    जगाकडे बघण्याची लख्ख दृष्टी... स्वत:च्या सन्मानासाठी आणि तत्त्वांसाठी लढा देत आलेली आणि म्हणूनच बदनाम ठरलेली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरिन जगभरच्या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. स्वत:चा देश सोडून तिला परागंदा व्हावं लागलं, अनेक आरोपांना सामोरं जवं लागलं, पण तिने स्वत:च्या मनाचा सूर ऐकला... कसलीही भीती न बाळगता ती आपल्या पद्धतीने जगत, बोलत आणि लिहित राहिली. पुरुष संस्कृतीच्या आक्रमक स्वार्थीपणाविरुद्ध आणि धर्ममार्तंडाच्या ढोंगाविरुद्ध तस्लिमाने जे लेखन केलं ते एकीकडे तिला अपराधी ठरवून गेलं, तर दुसरीकडे तेजस्वी, ‘लज्जा’, ‘निर्बाचित कलाम’, ‘अमार मेयेबेला’, ‘शोध’, अशा अनेक पुस्तकांतून तस्लिमाने केलेलं लेखन विलक्षण प्रत्ययकारी आहे. तस्लिमाचं आणखी एक विलक्षण पुस्तक म्हणजे ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’ तिच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हेही मराठीत अनुवादित झालं आहे. मृणालिनी गडकरी यांनी ते मराठीत आणलं आहे. तस्लिमाला आक्रस्ताळी, धर्मभ्रष्ट ठरवून तिच्याकडे तिच्या आप्तांनी, मित्रांनी आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली. तिला बहिष्कृतच केलं. बंगाली अशा व्यक्तीला ‘नष्ट’ म्हणतात. वाया गेलेली, नतद्रष्ट आणि नाठाळ बाई म्हणून तस्लिमाची नाचक्की करण्यात आली, तेव्हा या नतद्रष्ट मुलीने केलेलं लेखनही तसंच असणार अशा कल्पनेनं तिने या पुस्तकाला तेच शीर्षक दिलं! स्वतंत्र जाणिवा घेऊन जगणारी तस्लिमा या लेखनातून आपले मुक्त विचार व्यक्त करते. मुख्यत: बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी ती लिहित असली, तरी तिचं लिखाण जगभरातील स्त्रीची व्यथा-वेदना बोलून दाखवणारी आहे. छोटेखानी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक लेखिकेच्या मनात खदखदणारा क्षोभ आणि असंतोष दाखवनू देते. पुरुष वर्चस्वाच्या दुनियेत स्त्रीवर पदोपदी अन्याय होतो आणि तिला नेहमीच गौण स्थान मिळतं. हा अन्याय आहे असं बोलून दाखवणारी तस्लिमा रोषाला निमंत्रण देणारी ठरते हे ओघाने आलंच. तस्लिमाने या लेखांमध्ये स्त्रियांच्या आणि मुलींच्या जीवनाला वेढणाऱ्या प्रश्नांची दखल घेतलेली दिसते. शाळांमधून मुलींची गळती सुरू असणं तिला खटकतं तेव्हा ती या वास्तवाची नोंद घेते. जाहिरातींच्या क्षेत्रात स्त्री-देहाचा व्यापर करण्याची बोकाळलेली वृत्ती तिच्या मनात संताप जागवते. तोंडी तलाक, मुलगा-मुलगी असा भेद करण्याची परंपरा, स्त्रीची स्वत:च्याच घरात होणारी उपासमार, स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीवरच घेणं टाळलं जातं त्याबद्दलही ती कडक शब्दांमध्ये लिहिते. अशा लहान-मोठ्या विषायांमधून ती अतिशय गंभीर प्रश्नांना संवेदनशीलतेने वाचा फोडते. भाषेबाबत जागरूक असणाऱ्या तस्लिमाला भाषेच्या पारंपरिक वापराबद्दलाही आक्षेप घ्यावेसे वाटतात. ‘सर्व मुले औरस असतात.’ या लेखात ती स्त्रीला औरस-अनौरस कल्पनेच्या रूपानं नैतिक जाळ्यात अडकविण्याच्या पुरुषी काव्यावर टीका करते. स्त्रीला बंधनामध्ये जखडून स्वत: मोकळाच राहणारा पुरुष दोषी आहे, असं ती म्हणते. हा ‘अनौरस’ शब्दच शब्दकोशातून हद्दपार केला पाहिजे असं तस्लिमाचं म्हणणं आहे. या लिखाणातून तस्लिमाच्या कविमनाचंही दर्शन घडतं. तस्लिमा म्हणजे केवळ अन्याय-अत्याचाराच्याच गोष्टी करणार या समजुतीला खोटं पाडत ती आपल्या विविध अनुभवांबद्दल लिहिते. शांतिनिकेतनातील वसंतोत्सव तिला फार मोहक वाटतो. आयुष्यातल्या सुंदरतेचा वेध ती त्याबद्दल लिहिताना घेते. रवींद्रनाथ, रवींद्रसंगीत आणि वसंत ऋतूच्या दिवसांमध्ये आनंदाच्या रंगाने न्हाऊन उठलेलं शांतिनिकेतन तस्लिमाच्या मनावर पसरत जातं... तस्लिमाचं हे लिखाण मनाला अंतर्मुख करून जातं. जगाकडे बघण्याची तिची स्वत:ची जी लख्ख दृष्टी आहे, तिचा प्रत्यय ते वाचताना येतो. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    बंडखोर लेखिकेचे अंतर्मुख करणारे वेधक लेख… आपले विचार प्रामाणिकपणे आणि परखड मांडणारी तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगलादेशी लेखिका म्हणजे अनेक गोष्टींना मुळापासून उघडेवाघडे करून दाखवणारे एक वादळच आहे. स्वातंत्र्याची आंतरिक ऊर्मी घेऊन जाणारी तस्लिमा जगाकड बघण्याची एक लख्ख अशी दृष्टी बाळगते आणि मनाला कसलीही भीती न वाटू देता आपल्या विचारांना आणि भावनांना लेखणीद्वारे वाट करून देते. स्वत:च्या या मुक्तपणाची किंमतही तिने भरपूर चुकवली आहे. अशा निडर, बंडखोर व्यक्तीला समाज नेहमी नावेच ठेवतो. त्यातूनही ती जर स्त्री असेल तर ती अधिकच बदनाम ठरते. तस्लिमावरही अशा अनेक शेलक्या विशेषणांचा आणि विविध आरोपांचा वर्षाव झाला, पण आपले लेखन तिने सुरूच ठेवले. ‘लज्जा’, ‘निर्वाचित कलाम’, ‘आभार मेयेलेला’ ‘निर्वाचित मेयेर नष्ट गद्य’ आणि आता ‘शोध’ तस्लिमाचा लेखनप्रवास तिच्या जंगप्रवासाइतकाच प्रत्ययकारी. बांगलादेशातील तथाकथित धर्मरक्षक डोळ्यांवर झापडे बांधलेले लोक आणि राजकीय आसन सुरक्षित काकाच्या उद्योगात गुंतलेले राज्यकर्ते अशा सर्वांनीच तस्लिमाकडे पाठ फिरवली. तिला ‘वाया गेलेली बाई’ समजून जणू बहिष्कृतच केले. अशा ‘वाया गेलेल्या’ व्यक्तीला बंगाली भाषेत ‘नष्ट’ म्हणतात. तर या ‘नष्ट’ म्हणजे ‘नाठाळ’ किंवा ‘नतद्रष्ट’ बाईने केलेले लेखनच एका पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आले. ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’, म्हणजे नतद्रष्ट मुलीचे नतद्रष्ट लेखन ! मराठीत या पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. छोट्या आकाराच्या लेखांचे हे संकलन तस्लिमाच्या मनातील खदखदणाऱ्या क्षोभाचे दर्शन घडवते. पुरुष वर्चस्वाच्या समाजरचनेत स्त्री पदोपदी दुय्यम ठरत जाते आणि अन्यायाची शिकार बनते, त्यामुळे अनेक गोष्टीमधला भेदभाव किंवा अन्याय हा समाजाच्या इतका अंगवळणी पडला आहे, की तो अन्याय आहे हे अनेकांना उमजतच नाही आणि कोणी तसे लक्षात आणून दिले तर त्यांना ते पटत नाही. तस्लिमाच्या लेखनावर गहजब होतो तो याच कारणाने. तस्लिमा प्रामुख्याने बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी लिहित असली, तरी एकूणच जगातील स्त्रियांच्या आयुष्याशी तिच्या या लेखनाच्या प्रश्नाविषयीही तिने लिहिले आहे. या पुस्तकातून तिचे विविध विषयांवरील विचार वाचकांसमोर येतात. तिचे अनुभव आणि भावना शब्दबद्ध होऊन खुलेपणाने आपले अस्तित्व जाणवून देतात. स्त्रीजीवनाबद्दल तस्लिमा अगदी तळमळीने लिहिते. शाळांतून मुलींची रोडावत चाललेली संख्या, जाहिरात क्षेत्रात होत असलेला स्त्रीदेहाचा वापर, मुलींचा वारसा हक्क, तलाकचा प्रश्न अशा अनेक विषयांचे संदर्भ घेऊन तस्लिमा लिहिते. ‘सर्व मुले औरस असतात’ या लेखातून ती स्त्रीला अनौरस-औरस कल्पनांच्या नैतिक जाळ्यात अडकवून पुरुष मात्र मोकळा राहतो. यावर ती टीका करते. ‘अनौरस’ हा शब्दच नष्ट व्हावा अशी मागणी तस्लिमा करते. मुलगा-मुलगी भेद, नवऱ्याचे वर्चस्व, दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याची दूरदर्शन निवेदकांवर असलेली सक्ती, स्त्रीची घरात होणारी उपासमार, चारित्र्य या संकल्पनेचा फक्त स्त्रियांच्याच संदर्भात होणारा विचार, अशा अनेक मुद्द्यांवर तस्लिमा स्पष्ट शब्दांत लिहिते. स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीची संधीच न देण्याच्या प्रवृत्तीवर ती टीका करते. लग्नासाठी मुलगी पाहण्याची प्रथा, स्त्री-पुरुष समानता आणि पतिपत्नी संबंध, बांगलादेशचा ‘पाकिस्तान’ करण्यासंबंधी लहान मुलांवर आजही केले जाणारे संस्कार अशा अनेक घटना व अनुभव तिचे लेखनविषय बनतात. तस्लिमा कविमनाची स्त्री आहे, हे तिच्या लेखनशैलीवरून जाणवत राहते. केवळ अन्याय-अत्याचाराच्या पलिकडचे जीवनही ती एखाद्या लेखात शब्दबद्ध करते. शांतिनिकेतनमधील वसंतोत्सवाबद्दल लिहिताना तिची लेखणी आयुष्यातील सुंदरतेचा वेध घेते. रवींद्रनाथ, रवींद्र संगीत, वसंत ऋतूतील आनंदात रंगलेले शांतिनिकेतन या साऱ्यांनी भारावलेली तस्लिमा ढाक्याला आल्यावरही त्या सुंदर वातावरणातून परतलेलीच नसते. लेखांचा अनुवादही तस्लिमाच्या शैलीचा स्पर्श हरवू न देण्याचा प्रयत्न करणारा आहे. फक्त यात ‘पडदा’ ऐवजी ‘बुरखा’, ‘सावताळ’ ऐवजी ‘संथाळ’ असे मराठीत रूढ असलेले शब्द योजणे अधिक स्वाभाविक ठरले असते असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more