* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME OF THE BOOK IS NASHTA MEYER, NASHTA GADYA. THE SOCIETY CONSIDERS ME TO BE NASHTA THAT IS THE ONE WHO IS NOW OUT OF HAND. BUT, I PREFER BEING CALLED THAT. BECAUSE IT IS A FACT THAT WHEN A WOMAN WANTS TO OVERCOME HER PAIN, POVERTY AND MISERY; WHEN SHE TRIES TO OPPOSE THE FILTHY RULES OF RELIGION, SOCIETY AND THE COUNTRY, WHEN SHE OPPOSES THE RIGHTS WHICH INSULT HER, WHEN SHE IS ALERT ABOUT HER RIGHTS, THEN THE SO CALLED GENTLEMEN OF THE SOCIETY CALL HER `NASHTA`. IF A WOMAN WANTS TO IMPROVE THEN THE FIRST CONDITION IS SHE HAS TO FORGET HERSELF, SHE HAS TO PERISH HERSELF. UNLESS AND UNTIL A WOMAN IS PERISHED FROM THE SOCIETY, SHE CANNOT BE RELIEVED FROM THE SOCIETY. ON THE CONTRARY THE WOMAN WHO IS PERISHED IN THE EYES OF THE SOCIETY IS IN TRUE SENSE THE HEALTHIEST AND INTELLIGENT HUMAN BEING.
या पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वत:चं दु:ख, दैन्य, दुर्दशा दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छनियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाऱ्या गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक `नष्ट` म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं `नष्ट` व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं `नष्ट` झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन
उत्कृष्ट अनुवादासाठी रणजीत देसाई पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 28-05-2004

    जगाकडे बघण्याची लख्ख दृष्टी... स्वत:च्या सन्मानासाठी आणि तत्त्वांसाठी लढा देत आलेली आणि म्हणूनच बदनाम ठरलेली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरिन जगभरच्या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. स्वत:चा देश सोडून तिला परागंदा व्हावं लागलं, अनेक आरोपांना सामोरं जवं लागलं, पण तिने स्वत:च्या मनाचा सूर ऐकला... कसलीही भीती न बाळगता ती आपल्या पद्धतीने जगत, बोलत आणि लिहित राहिली. पुरुष संस्कृतीच्या आक्रमक स्वार्थीपणाविरुद्ध आणि धर्ममार्तंडाच्या ढोंगाविरुद्ध तस्लिमाने जे लेखन केलं ते एकीकडे तिला अपराधी ठरवून गेलं, तर दुसरीकडे तेजस्वी, ‘लज्जा’, ‘निर्बाचित कलाम’, ‘अमार मेयेबेला’, ‘शोध’, अशा अनेक पुस्तकांतून तस्लिमाने केलेलं लेखन विलक्षण प्रत्ययकारी आहे. तस्लिमाचं आणखी एक विलक्षण पुस्तक म्हणजे ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’ तिच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हेही मराठीत अनुवादित झालं आहे. मृणालिनी गडकरी यांनी ते मराठीत आणलं आहे. तस्लिमाला आक्रस्ताळी, धर्मभ्रष्ट ठरवून तिच्याकडे तिच्या आप्तांनी, मित्रांनी आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली. तिला बहिष्कृतच केलं. बंगाली अशा व्यक्तीला ‘नष्ट’ म्हणतात. वाया गेलेली, नतद्रष्ट आणि नाठाळ बाई म्हणून तस्लिमाची नाचक्की करण्यात आली, तेव्हा या नतद्रष्ट मुलीने केलेलं लेखनही तसंच असणार अशा कल्पनेनं तिने या पुस्तकाला तेच शीर्षक दिलं! स्वतंत्र जाणिवा घेऊन जगणारी तस्लिमा या लेखनातून आपले मुक्त विचार व्यक्त करते. मुख्यत: बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी ती लिहित असली, तरी तिचं लिखाण जगभरातील स्त्रीची व्यथा-वेदना बोलून दाखवणारी आहे. छोटेखानी लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक लेखिकेच्या मनात खदखदणारा क्षोभ आणि असंतोष दाखवनू देते. पुरुष वर्चस्वाच्या दुनियेत स्त्रीवर पदोपदी अन्याय होतो आणि तिला नेहमीच गौण स्थान मिळतं. हा अन्याय आहे असं बोलून दाखवणारी तस्लिमा रोषाला निमंत्रण देणारी ठरते हे ओघाने आलंच. तस्लिमाने या लेखांमध्ये स्त्रियांच्या आणि मुलींच्या जीवनाला वेढणाऱ्या प्रश्नांची दखल घेतलेली दिसते. शाळांमधून मुलींची गळती सुरू असणं तिला खटकतं तेव्हा ती या वास्तवाची नोंद घेते. जाहिरातींच्या क्षेत्रात स्त्री-देहाचा व्यापर करण्याची बोकाळलेली वृत्ती तिच्या मनात संताप जागवते. तोंडी तलाक, मुलगा-मुलगी असा भेद करण्याची परंपरा, स्त्रीची स्वत:च्याच घरात होणारी उपासमार, स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीवरच घेणं टाळलं जातं त्याबद्दलही ती कडक शब्दांमध्ये लिहिते. अशा लहान-मोठ्या विषायांमधून ती अतिशय गंभीर प्रश्नांना संवेदनशीलतेने वाचा फोडते. भाषेबाबत जागरूक असणाऱ्या तस्लिमाला भाषेच्या पारंपरिक वापराबद्दलाही आक्षेप घ्यावेसे वाटतात. ‘सर्व मुले औरस असतात.’ या लेखात ती स्त्रीला औरस-अनौरस कल्पनेच्या रूपानं नैतिक जाळ्यात अडकविण्याच्या पुरुषी काव्यावर टीका करते. स्त्रीला बंधनामध्ये जखडून स्वत: मोकळाच राहणारा पुरुष दोषी आहे, असं ती म्हणते. हा ‘अनौरस’ शब्दच शब्दकोशातून हद्दपार केला पाहिजे असं तस्लिमाचं म्हणणं आहे. या लिखाणातून तस्लिमाच्या कविमनाचंही दर्शन घडतं. तस्लिमा म्हणजे केवळ अन्याय-अत्याचाराच्याच गोष्टी करणार या समजुतीला खोटं पाडत ती आपल्या विविध अनुभवांबद्दल लिहिते. शांतिनिकेतनातील वसंतोत्सव तिला फार मोहक वाटतो. आयुष्यातल्या सुंदरतेचा वेध ती त्याबद्दल लिहिताना घेते. रवींद्रनाथ, रवींद्रसंगीत आणि वसंत ऋतूच्या दिवसांमध्ये आनंदाच्या रंगाने न्हाऊन उठलेलं शांतिनिकेतन तस्लिमाच्या मनावर पसरत जातं... तस्लिमाचं हे लिखाण मनाला अंतर्मुख करून जातं. जगाकडे बघण्याची तिची स्वत:ची जी लख्ख दृष्टी आहे, तिचा प्रत्यय ते वाचताना येतो. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    बंडखोर लेखिकेचे अंतर्मुख करणारे वेधक लेख… आपले विचार प्रामाणिकपणे आणि परखड मांडणारी तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगलादेशी लेखिका म्हणजे अनेक गोष्टींना मुळापासून उघडेवाघडे करून दाखवणारे एक वादळच आहे. स्वातंत्र्याची आंतरिक ऊर्मी घेऊन जाणारी तस्लिमा जगाकड बघण्याची एक लख्ख अशी दृष्टी बाळगते आणि मनाला कसलीही भीती न वाटू देता आपल्या विचारांना आणि भावनांना लेखणीद्वारे वाट करून देते. स्वत:च्या या मुक्तपणाची किंमतही तिने भरपूर चुकवली आहे. अशा निडर, बंडखोर व्यक्तीला समाज नेहमी नावेच ठेवतो. त्यातूनही ती जर स्त्री असेल तर ती अधिकच बदनाम ठरते. तस्लिमावरही अशा अनेक शेलक्या विशेषणांचा आणि विविध आरोपांचा वर्षाव झाला, पण आपले लेखन तिने सुरूच ठेवले. ‘लज्जा’, ‘निर्वाचित कलाम’, ‘आभार मेयेलेला’ ‘निर्वाचित मेयेर नष्ट गद्य’ आणि आता ‘शोध’ तस्लिमाचा लेखनप्रवास तिच्या जंगप्रवासाइतकाच प्रत्ययकारी. बांगलादेशातील तथाकथित धर्मरक्षक डोळ्यांवर झापडे बांधलेले लोक आणि राजकीय आसन सुरक्षित काकाच्या उद्योगात गुंतलेले राज्यकर्ते अशा सर्वांनीच तस्लिमाकडे पाठ फिरवली. तिला ‘वाया गेलेली बाई’ समजून जणू बहिष्कृतच केले. अशा ‘वाया गेलेल्या’ व्यक्तीला बंगाली भाषेत ‘नष्ट’ म्हणतात. तर या ‘नष्ट’ म्हणजे ‘नाठाळ’ किंवा ‘नतद्रष्ट’ बाईने केलेले लेखनच एका पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आले. ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’, म्हणजे नतद्रष्ट मुलीचे नतद्रष्ट लेखन ! मराठीत या पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. छोट्या आकाराच्या लेखांचे हे संकलन तस्लिमाच्या मनातील खदखदणाऱ्या क्षोभाचे दर्शन घडवते. पुरुष वर्चस्वाच्या समाजरचनेत स्त्री पदोपदी दुय्यम ठरत जाते आणि अन्यायाची शिकार बनते, त्यामुळे अनेक गोष्टीमधला भेदभाव किंवा अन्याय हा समाजाच्या इतका अंगवळणी पडला आहे, की तो अन्याय आहे हे अनेकांना उमजतच नाही आणि कोणी तसे लक्षात आणून दिले तर त्यांना ते पटत नाही. तस्लिमाच्या लेखनावर गहजब होतो तो याच कारणाने. तस्लिमा प्रामुख्याने बांगलादेशातील स्त्रीजीवनाविषयी लिहित असली, तरी एकूणच जगातील स्त्रियांच्या आयुष्याशी तिच्या या लेखनाच्या प्रश्नाविषयीही तिने लिहिले आहे. या पुस्तकातून तिचे विविध विषयांवरील विचार वाचकांसमोर येतात. तिचे अनुभव आणि भावना शब्दबद्ध होऊन खुलेपणाने आपले अस्तित्व जाणवून देतात. स्त्रीजीवनाबद्दल तस्लिमा अगदी तळमळीने लिहिते. शाळांतून मुलींची रोडावत चाललेली संख्या, जाहिरात क्षेत्रात होत असलेला स्त्रीदेहाचा वापर, मुलींचा वारसा हक्क, तलाकचा प्रश्न अशा अनेक विषयांचे संदर्भ घेऊन तस्लिमा लिहिते. ‘सर्व मुले औरस असतात’ या लेखातून ती स्त्रीला अनौरस-औरस कल्पनांच्या नैतिक जाळ्यात अडकवून पुरुष मात्र मोकळा राहतो. यावर ती टीका करते. ‘अनौरस’ हा शब्दच नष्ट व्हावा अशी मागणी तस्लिमा करते. मुलगा-मुलगी भेद, नवऱ्याचे वर्चस्व, दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याची दूरदर्शन निवेदकांवर असलेली सक्ती, स्त्रीची घरात होणारी उपासमार, चारित्र्य या संकल्पनेचा फक्त स्त्रियांच्याच संदर्भात होणारा विचार, अशा अनेक मुद्द्यांवर तस्लिमा स्पष्ट शब्दांत लिहिते. स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते, म्हणून त्यांना नोकरीची संधीच न देण्याच्या प्रवृत्तीवर ती टीका करते. लग्नासाठी मुलगी पाहण्याची प्रथा, स्त्री-पुरुष समानता आणि पतिपत्नी संबंध, बांगलादेशचा ‘पाकिस्तान’ करण्यासंबंधी लहान मुलांवर आजही केले जाणारे संस्कार अशा अनेक घटना व अनुभव तिचे लेखनविषय बनतात. तस्लिमा कविमनाची स्त्री आहे, हे तिच्या लेखनशैलीवरून जाणवत राहते. केवळ अन्याय-अत्याचाराच्या पलिकडचे जीवनही ती एखाद्या लेखात शब्दबद्ध करते. शांतिनिकेतनमधील वसंतोत्सवाबद्दल लिहिताना तिची लेखणी आयुष्यातील सुंदरतेचा वेध घेते. रवींद्रनाथ, रवींद्र संगीत, वसंत ऋतूतील आनंदात रंगलेले शांतिनिकेतन या साऱ्यांनी भारावलेली तस्लिमा ढाक्याला आल्यावरही त्या सुंदर वातावरणातून परतलेलीच नसते. लेखांचा अनुवादही तस्लिमाच्या शैलीचा स्पर्श हरवू न देण्याचा प्रयत्न करणारा आहे. फक्त यात ‘पडदा’ ऐवजी ‘बुरखा’, ‘सावताळ’ ऐवजी ‘संथाळ’ असे मराठीत रूढ असलेले शब्द योजणे अधिक स्वाभाविक ठरले असते असे वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more