* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357201513
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2023
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HUMANS ARE SELFISH, GREEDY, LUSTFUL, AND EVIL. HUMANS HAVE INFINITE QUALITIES SUCH AS PRESERVING HUMANITY, LOVING, WORRYING, GRIEVING, FEELING THE PAIN OF OTHERS, LAUGHING AND EVEN CRYING. NISHIKANT WHO IS A MILLIONAIRE WITH TURNER SYNDROME PROBLEM AND IS CAUGHT BETWEEN WEALTH AND HUMANITY, IS MARRIED TO AMRUTA. ANAMIKA IS SOMEONE WHO IS SOLD BY HER OWN HUSBAND AS A SEX WORKER.A STORY OF AN UNKNOWN MAN WHO, EVEN IN HIS OLD AGE, STILL LIVES IN THE MEMORIES OF HIS COLLEGE FRIEND KUMUD. URMILA IS SOMEONE WHO CANNOT FATHOM THE PRESENCE OF A MYSTERY WOMAN WHO WAS PRESENT DURING HER HUSBAND’S DEATH. ALSO A STORY OF MANOHAR AND MADIRA, WHO TAKE DOWN TWO DANGEROUS GOONS. SAVITA WHO IS A DIVORCEE, CAUGHT IN A STORM OF EMOTIONS AND THOUGHTS. ASHOK, WHO IS OVERWHELMED BY THE DAILY GRIND. TWO YOUNG WOMEN , GAURI AND SANVI, WHO MEET EACH OTHER ON A JOURNEY. VITTHAL ,WHO STILL ATTENDS AN INTERVIEW WEARING A TORN SHIRT EVEN AFTER BEING CAUGHT BY THE POLICE. THIS BOOK TALKS ABOUT HOW PEOPLE ARE MULTI-COLORED AND HOW THEIR STORIES ARE MULTI-FACETED.
माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, चिंतावणारी, खंतावणारी, दुसर्‍याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्‍याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्‍याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्‍या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठी साहित्य #कथासंग्रह #माणसं अशी आणि तशी #रवींद्र भगवते # मराठी पुस्तक # मेहता पब्लिशिंग हाऊस #MARATHI LITERATURE #STORYBOOK #MANSA ASHI ANI TASHIHI #RAVINDRA BHAGVATE #MARATHI BOOK # MEHTA PUBLISHING HOUSE
Customer Reviews
  • Rating Starठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

    कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more