* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GARBHASANSKAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668988
  • Edition : 19
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : PREGNANCY AND CHILD CARE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`GARBHASANSKAR` IS ACTUALLY CODE OF CONDUCT FOR A PREGNANT WOMAN AS DESCRIBED IN `AYURVEDA`. THIS BOOK PRESENTS THE AUTHOR`S GUIDELINES ABOUT EVERY MINUTE ASPECT IN A PREGNANT WOMAN`S LIFE. DR. BORKAR HAS STUDIED THIS SUBJECT IN DETAILS BEFORE PUTTING IT INTO WORDS. SHE GUIDES ABOUT THE DIET, THE LIFE-STYLE, THE THOUGHT PROCESS OF A PREGNANT LADY. THIS BOOK ALSO TELLS US ABOUT THE SPECIFIC MEDICINES THAT A PREGNANT LADY SHOULD TAKE DURING EACH MONTH OF HER PREGNANCY FOR AN OVERALL BETTER GROWTH OF THE CHILD. TODAY`S WORLD IS OF NUCLEAR FAMILIES. THIS BOOK WILL SURELY HELP AS A PREGNANCY GUIDE TO THE WOULD BE MOMS AND DADS AND ALSO WHO HAVE ALREADY PLANNED THEIR FAMILIES.
‘गर्भसंस्कार’ म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या आधारे वर्णन केलेली गर्भवती स्त्रीसाठीची आचारसंहिता (CODE OF CONDUCT) आहे. गर्भवती स्त्रीचा आहार-आचार-विचार यासंबंधीचे मार्गदर्शन, तसेच गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार व उत्कृष्ट अवयवनिर्मितीसाठी गर्भशास्त्रात सांगितलेली औषधे इत्यादींचा या पुस्तकात समावेश आहे. डॉ. गौरी बोरकर यांचे गर्भसंस्कारविषयक संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आजच्या ‘हम दो हमारे दो’ किंवा ‘हमारा एक’च्या जमान्यात हे पुस्तक PREGNANCY GUIDE म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GARBHASANSKAR #GARBHASANSKAR #गर्भसंस्कार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKAR #गौरीबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 12-01-2008

    आई-बाप घडविणारे पुस्तक... ‘गर्भसंस्कार’ हे पुस्तकाचं नाव आणि लेखिका डॉ. गौरी बोरकर एवढं पाहिलं की गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे, हे कळतंच. विवाहित मध्यमवर्गीय मराठी तरुणींच्या डोळ्यांसमोरून लगेचच या विषयावरील अनेक सदरं, मासिक सापताहिकांतले लेख, क्वचित एक-दोन पुस्तकंही तरळून जातात अनुकूल पूर्वग्रह आणि वाचनाचा पूर्वांनुभव मनात ठेवून पुस्तक उघडल्यावर मात्र चांगल्या अर्थाने अपेक्षाभंग होतो. कारण गर्भावर संस्कार कसे करावेत, हे सांगण्यापुरतंच या पुस्तकाचं प्रयोजन नाही, तर सुजाण आई-बाप आणि आरोग्यपूर्ण कुटुंब घडवणारं हे पुस्तक आहे, हे त्याच्या पाना-पानांतून उलगडत जातं. बऱ्याच वाचकांना या डॉक्टर लेखिका यापूर्वी वर्तमानपत्री लिखाणातून भेटलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ आजार, आहार आणि औषधाविषयीच सांगत नाहीत, जीवशैलीही घडवतात, हे आपल्याला माहीत आहेच. एका वाक्यात सांगायचं तर ‘गर्भसंस्कार : उद्याच्या बुद्धिमान व आरोग्यसंपन्न संततीसाठी’ हे पुस्तक बाळ आणि आई-बाप घडवणारं पुस्तक आहे. अपत्योत्सुक जोडप्याची आचारसंहिता कशी असावी, हे आयुर्वेदाशास्त्राच्या आधारे या पुस्तकात सांगितलेलं आहे. स्थळं पाहून किंवा प्रेमात पडून लग्न होतं तेव्हा प्रथम ते नवविवाहित पती-पत्नी परस्परांच्या चालीरीती, स्वभाव, नोकरी-व्यवसायातील प्राध्यान्यक्रम समजून घेण्यात व्यग्र होतात. दरम्यान, नव्या पाहुण्याची चाहूल लागते आणि आणखी काही समजून घेण्याचंही बाकी राहिलंय, असं त्यांना अस्पष्टपणे जाणवतं. ते नेमकं स्पष्ट करतं- ‘गर्भसंस्कार’, आपण सुशिक्षित असलो, विविध प्रकारचं वाचत, ऐकत, पाहत असलो, तरी आणखीही कितीतरी गोष्टी समजून घेणं बाकी आहेत, हे समजावून सांगतं हे पुस्तक! नवा जीवन जन्माला येण्याआधी पती व पत्नी दोघानीही शरीर व मन योग्य स्थितीत राखलं पाहिजे. याबाबत काय पावलं उचलावीत, शरीर-मनाचं आरोग्य कसं ओळखावं, हे सुरुवातीलाच विशद केलं आहे. गर्भधारणेसाठी आपली पूर्वतयारी झाली आहे, हे पक्कं झाल्यानंतर जोडप्याला त्यानुसार नियोजन करता येईल. प्रत्यक्ष गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यावी, इथपासून गर्भवती स्त्रीचा आहार-विहार, गर्भाच्या वाढीचे दर महिन्यांतील टप्पे आणि त्या टप्प्यांतील दुखणी, वैशिष्ट्ये, बारकावे इथपर्यंत वैद्यकीय अंगाने या पुस्तकात विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संशोधित औषधे, आयुर्वेदोक्त औषधे, प्राणायाम, योगासने याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. गर्भवतीच आहार व आचरणातून पोटातल्या बाळावर एक प्रकारे संस्कार होतच असतात, त्याचबरोबर जाणीवपूर्वक संवाद साधून संस्कार कसे करता येतात, हेही यातून समजतं. प्रसतीपूर्व काळजी, सुलभ प्रसूती, प्रसूतीपश्चात घ्यावयाची काळजी याविषयीही वाचकांशी संवाद साधत लेखिकेने मार्गदर्शन केलं आहे. गर्भावरचे संस्कार या ठिकाणी पूर्ण होत नाहीत, तर अर्भकाच्या जन्मानंतरही त्याला दिसामाने वाढवताना पावलोपावली संस्कार आवश्यक असतात. शैशवाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर संस्कार कसे करावेत, ते किती महत्त्वाचे आहेत, हे डॉ. बोरकर यांनी समजावलं आहे. ओघवती भाषा आणि सुटसुटीत प्रकरणे हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्या-त्या प्रकरणातील महत्त्वाचा मजकूर प्रकरणाच्या शेवटी तक्त्याच्या रूपात देऊन तो ‘एका नजरेत’ समजावून घेण्याची सोय लेखिकेने केली आहे. त्यामुळे पुस्तकाची मांडणी साधी असली, तरी ते अत्यं उपयुक्त झाले आहे. संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर टाळून (उदा. शीर्षके इ.) भाषेत आणखी सोपेपणा आणणे शक्य होते व त्यायोगे वाचकांच्या अधिक जवळ जाता आले असते. आज स्पर्धा हा परवलीचा शब्द झालेला असताना या धकाधकीच्या आयुष्यक्रमात थोडं थांबून आपल्याला काय हवं आहे, याचा मनाशी विचार करायला हे पुस्तक उद्युक्त करतं. एकाच अपत्यानंतर कुटुंबाचा आकार मर्यादित करण्याच्या आजच्या काळात त्या अपत्याकडून आई-वडिलांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अपत्य सर्वगुणसंपन्न असावं आणि त्याचे सगळे गुण झळाळून समोर यावेत म्हणून त्यांचं आरोग्यही उत्तम असावं, असं पालकांना वाटतं. अशा परिस्थितीत आपलंही काही कर्तव्य आहे हे त्यांना जाणवलेलं नसतं. अशा पालकांना सावध करत हे पुस्तक सांगतं की, शाळेत जाणाऱ्या मुलांकडून स्पर्धेत टिकण्याची अपेक्षा करण्याअगोदर अनेक वर्षे आपण त्याकरता आवश्यक ती मशागत करायला हवी. अर्थात हे सारं आपल्या धर्मात, शास्त्रांत प्राचीन काळीच सांगून ठेवलेलं आहे. पुस्तकावर अभिप्राय देणाऱ्या डॉक्टरांनी- हे पुस्तक तरुणांनी लग्नापूर्वीच वाचावं, असं सुचविलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती विरत चालल्यामुळे वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन अलभ्य होत असताना एका आश्वासक, अनुभवी स्नेह्याची भूमिकाही हे पुस्तक पार पाडतं. गैरसमज व अनाठायी गंड दूर करून ते गर्भवतीला धीर देतं, तसेच भावी पित्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देतं. डॉ. बोरकर यांची अभ्यासू वृत्ती आणि समाजाला आपल्या परीने चांगलं देण्याची तळमळ पानोपानी जाणवत राहते. वाचकाच्या मनात आशादायक चित्र तयार करण्यात हे पुस्तक त्यामुळे यशस्वी होतं. -सुलेखा नलिनी नागेश ...Read more

  • Rating Stardr shalini kamble

    I read many books related to GARBHASANSKAR, but this book by Dr. Gauri Borkar is really authentic and scientific.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more