Vikram Bhagwatद्रुतगत ते विलंबित खयाल ते द्रुतगत अशी स्वतःची स्वतंत्र मांडणी असणारी कादंबरी.
फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी वाचायला मला डिसेंबर २०१९ उजाडले ह्यातच माझ्या वाचनाची सध्या जी परवड झाली आहे तिचे चित्र स्पष्ट व्हावे. अर्थात २०२०च्या सुरवातीपासूनच ह्यावर काही कठोर उपाय मी योजायचे ठरवले आहे. ते जाहीर करायची ही जागा नव्हे.
मी जे शीर्षक दिले आहे त्यातच ‘फोर सिझन्स’ चे मला जाणवलेले वैशिष्ट्य मी मांडले आहे. एखादी कादंबरी मला का आवडते? ह्याचे एका वाक्यात द्यायचे उत्तर, “तिने मळलेली पायवाट मोडून तोडून फेकून द्यावी. तिने प्रस्थापित संकेत झुगारून देऊन, स्वतःचे संकेत निर्माण करायचा प्रयत्न करावा. भले त्यात यश येवो अगर अपयश” आणि ह्या एका मापदंडावर शर्मिलाची कादंबरी एकदम खरी उतरते. मुळात एका झंझावातात ही कादंबरी सुरु होते. मग ती शांत डोहात उतरते आणि पुन्हा एकदा झंझावातात ती परावर्तीत होते आणि एका गूढतेत ती संपते.
अंजनमाळावर सुरुवात होते...आणि तिथे पडलेल्या स्वप्नात कामयानी काळातून प्रवास करीत आठवणीच्या प्रदेशात उतरते. त्या आठवणी भूतकाळाच्या कपाटात बंदिस्त असतात. त्यांना आता वर्तमानात थारा नसतो. त्या नको असतात कारण त्या खूप दुखावणाऱ्या असतात. पण अशा आठवणींचा प्रवास अनिवार्य असतो. तो केल्याशिवाय त्या पूर्ण आकळत नाहीत आणि त्यांच्यामधून बाहेर पडता येत नाही.
कामयानी युरोपमधून मुंबईत पहाटे उतरलेली आहे. आणि तशीच ती खारला तिच्या बंगल्याकडे प्रवास करते आणि तिथे पोचते तो काय? बंगला भुईसपाट, त्या जागेवर नवे बांधकाम सुरु झाले आहे. ती उन्मळते, आणि तिथूनचा ७५ पानांपर्यंतचा प्रवास एका वादळी स्त्रीव्यक्तीमत्वाच्या मनोवस्थेचा आहे. ती काय आहे? तिचे प्रश्न काय आहेत? तिचा गोंधळ काय आहे? हे कादंबरी वाचताना लक्षात येईल. त्याबद्दल लिहायची आवश्यकता नाही. पण त्या ओघात आलेल्या व्यक्तीर्रेखा, इरादी, जोसेफ, अनिर्बन, टॅक्सी चालवणारा सरदार, रघु, अश्विन मधोक,(माझ्या मनावर खोलवर रुजलेली व्यक्तिरेखा), बलदेव, सर्व व्यक्तिरेखा लांबी रुंदीचा विचार न करता ठसशीत उभ्या राहतात. अगदी खूप पार्श्वभूमीवर असलेली कामयानीची आई, सुनीता सुद्धा.
मग पुढे कामयानीचे अंजनमाळावर, पर्यावरण टुरिझमच्या संदर्भात कन्सल्टंट म्हणून येणे,,,इथे कादंबरी द्रुतगतीतून विलंबित खयालात प्रवेश करत. आता व्यक्ती व्यक्ती असल्यातरी त्यांचे अस्तित्व निसर्गाशी संबंधित असे उरते. निसर्ग नसेल तर त्यांच्या वैयक्तिक जाणीवांवर कामायनी फारसा प्रकाश टाकत नाही. तिला त्याची गरज वाटत नाही. Their existence is limited to Nature, the Eco Tourism, the environmental travel of Anjanmal. हे इतके स्पष्ट होते की कामयानी शेवटाकडे येईपर्यंत स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक जाणिवांबद्दल सुद्धा फक्त ह्याच संदर्भात बोलू शकते. मग ती मार्गारेटच्या सापडलेल्या नोट्स किंवा डायरी असू देत, राणू, एशा, विहान, आस्ताद, मणी, युरोपमधला एरिक, श्रीरंजन, नाडकर्णी, सर्वजण Nature Manipulation चे एक वेगळे अनोखे चित्र आपल्यासमोर उभे करतात. त्यातले काही पॅसिव्ह आहेत काही अॅक्टिव्ह आहेत. ह्या विलंबित खयालातील जाणिवांची प्रतवारी वेगळी आहे. त्या खूप अपरिचित आहेत आणि म्हणूनच त्या विलंबित खयालात आल्या आहेत असे वाटते. इथे प्रत्येक पानापाशी थबकून ते समजून घ्यावे लागते. हा झगडा मानवी भावानांइतका उद्दीपित नाही...तो खूप सटल आहे. पण तो मांडण्यात शर्मिला खूपच यशस्वी झाली आहे.
इथून पुढे कादंबरी पुन्हा एकदा द्रुतगतीमध्ये येते...आणि इथे मात्र शर्मिलाने आपल्याजवळचे सर्व व्यक्तिरेखांना देऊन टाकले आहे. त्यांची मानसिक आंदोलने, शारीरिक आंदोलने...सगळे इतक्या प्रखरपणे आपल्या समोर येते कि काही वेळ आपण स्तब्ध होतो. विशेषतः कामयानी आणि जोसेफ मधला प्रसंग....जोसेफ आणि सुनीता ह्यांचे संबंध त्याचा कामयानी आणि तिच्या वडिलांवर झालेला परिणाम....अनिर्बन मधील तिची गुंतवणूक, सुंदरबनचा तिचा प्रवास, विहानमधील झालेली तिची गुंतवणूक(मानसिक आणि शारीरिक), शरीराच्या अनिवार लाटा सर्वच...ताकदीने येते...आणि अनिवार्यपणे येते. ती टिटवी एक प्रतिक बनून राहते आणि एका खोल डोहांत कादंबरी त्याक्षणी संपते. कदाचित तिथेच पुढची सुरु होते.
ह्या कादंबरीचा आकृतिबंध काहीसा डायरीचा, काहीसा आत्मनिवेदनाचा, तर काहीसा तृतीयपुरुषी निवेदनाचा असा मिश्र आहे. हे बदलते आकृतिबंध वाचकाला कादंबरीशी बांधून ठेवतात.
मी शर्मिला फडके ह्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर अलीकडेच ह्याच कादंबरीसाठी त्यांना सोलापूरच्या लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाचे पारितोषिक मिळाले आहे त्यासाठी पण त्यांचे अभिनंदन करतो.
मी त्यांच्या पुढील कादंबरीच्या प्रतीक्षेत.
...Read more
HARSHAD SAHASTRABUDDHEशर्मिला फडकेंची ‘फोर सीझन्स’ ही नवी मराठी कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण केली. त्यांचे कलाविषयक ब्लॉग आणि लेख मी काही वर्षांपासून फॉलो करतो आहे. मिनिमलीझमबद्दलचं पूर्वी प्रकाशित झालेलं त्यांचं सदरही मी अधूनमधून आवर्जून वाचत असतो. त्यांची भाषा अतिशय सुरेखआहे. विषयानुसार ही भाषा बदलती असते. जेव्हा तुम्ही काही वर्षे एखाद्या लेखकाला फॉलो करत असता, तेव्हा त्याचा लेखक म्हणून साधारण स्वभाव तुम्हाला परिचित असतो. एखाद्या विषयाची मांडणी हा लेखक कशी करेल, त्याने वापरलेली भाषा कशी असेल, लेखाचे टप्पे साधारण कसे असतील इत्यादी आडाखे तुम्ही मनात बांधून ठेवता. त्या लेखक / लेखिकेचं पुढचं आर्टिकल / पुस्तक / नवं काम कधी एकदा येतंय याकडे तुमचं एक वाचक म्हणून लक्ष असतं. यामुळेच, जेव्हा शर्मिला फडकेंची कादंबरी येते आहे असं ऐकलं तेव्हा त्याविषयीची उत्सुकता वाढली. प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी मी ही कादंबरी आणली. केव्हाची वाचायची होती पण राहून जात होतं. एकदाचा मुहूर्त लागला. कामायनी नावाची अतिशय हुशार पण आयुष्यात आलेल्या काही वेगळ्या वळणांमुळे आत्मविश्वास गमावलेली मध्यमवयीन व्यक्ती, फोर सीझन्सची नायिका आहे. कादंबरीची सुरवात होते तेव्हा, सुरवातीची काही पाने वाचून टिपिकल अर्बन टर्ब्युलन्स कैद करू पाहणारी, आजकालच्या तरुण पिढीची अस्वस्थता टिपू पाहणारी ही कादंबरी आहे असा ग्रह होतो. पण साधारण पहिल्या तीस पानांनंतर कादंबरी आपली वेगळी वळणे घेणं सुरु करते. सुरवातीची शंभर एकशेवीस पाने ग्रीपिंग आहेत. या नंतर कादंबरी वेगवेगळे ट्रॅक्स घेते ज्यामुळे ती किंचित भरकटल्यासारखी वाटते. ही कादंबरी वाचकाला खिळवून वगैरे ठेवते, असं मी म्हणणार नाही. ही कादंबरी घटनाप्रधान अजिबातच नाही. अनेक पाने वाचून झाल्यावर याची साधारण कथा काय, असा विचार करता, फारसं ठोस काहीही आठवत नाही. लक्षात राहतील अश्या मेजर घटना यात घडत नाहीत. अतिशय संथ गतीने, आपल्या लयीत चालणारी ही कादंबरी आहे. लेखिका आपल्याला पाहिजे तितका वेळ घेते आणि या निवांत वेगाशी जुळवून घेऊनच वाचकाने ही कादंबरी वाचावी अशी तिची अपेक्षा आहे. सध्या येणाऱ्या नव्या मराठी कथा अथवा कादंबऱ्या वाचल्या, तर त्या फास्ट पेस्ड, असंख्य घटनांनी भरलेल्या, अनेक पात्रे असलेल्या, वैचित्र्यपूर्ण भाषा वापरणाऱ्या, मराठी-हिंदी-इंग्रजीची भेळ असणाऱ्या आहेत असं दिसून येतं.
यातल्या बऱ्याचश्या कादंबऱ्या, एकतर शहरात घडतात नाहीतर गावात. काही कादंबऱ्या समाज, त्यातल्या व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट जातीपुरत्या किंवा एखाद्या विशिष्ट समूहापुरत्याच मर्यादित असल्याचं दिसून येतं. मॉडर्निझमच्या नावाखाली उगीचच काहीतरी क्लटर निर्माण केलेलं दिसून येतं. विचित्र भाषा, विकृत प्रसंग, कृत्रिमरीत्या केलेले अर्धवट शेवट, हे अनेकदा पहायला मिळतं. अनेक प्रसंग, पात्रे व घटनांची भेळ करता करता कथानकाची वीण कधी उसवते हे लेखकाच्या लक्षात येत नाही असं खूपदा वाटतं. लेखकाने मूळ कथानकाला जोडलेली ठिगळे, वाचक स्वच्छ पाहू शकतात. कादंबरी कुठे फसली हे अगदी साफसाफ कळू शकतं. आपण वाचलेली कादंबरी लेखकाने नेमकी कश्याकरता लिहिली असावी हे ही बरेचदा कळत नाही. `सध्या हे असलंच चालतं, तेव्हा हेच खपवा` असा धंदेवाईक विचार त्यातून दिसून येतो. या सर्व गोष्टींना, शर्मिला फडकेंची नवी कादंबरी ‘फोर सीझन्स’ मोठा अपवाद ठरते. बॉटनी तथा वनस्पतीशास्त्र हा लेखिकेचा अभ्यासाचा विषय. त्यांचं शिक्षण याच विषयातलं आहे. या विषयाची नाळ, पर्यावरण या अतिशय महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयाशी जुळलेली आहे. चित्रसमीक्षा, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठं कार्य केलेली, विदेशात पर्यटन केलेली, विविध अनुभव घेतलेली उच्चशिक्षित व्यक्ती जेव्हा पहिल्या कादंबरीकरता ‘पर्यावरण’ हा विषय निवडते, तेव्हा विशेष कौतुक वाटतं. पण, त्याचबरोबर, अश्या विषयावरची कादंबरी कशी असेल, याची नेमकी कल्पनाही डोळ्यासमोर नेमकी साकारत नाही. ही कादंबरी तिच्या विषयापासूनच इतर समकालीन कादंबर्यांच्या तुलनेत वेगळी ठरते. या कादंबरीच्या केंद्रस्थानी कामायनी ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असणारी स्त्री आहे. आयुष्यात पूर्वी घेतलेल्या अनुभवांमुळे ती डिप्रेशनमधे आहे. यातून बाहेर काढण्यासाठी जोसेफ नावाचा तिचा जुना वयस्कर मित्र तिला सर्वतोपरी मदत करतो. त्याने दिलेला मदतीचा हात कामायनी स्वीकारते आणि मुंबईपासून बऱ्याच दूरवर असणारं एक प्रोजेक्ट स्वीकारते. विदेशात काम पाहिलेली कामायनी नव्या उमेदीने `ग्रीन कन्सल्टंट` म्हणून नवं काम स्वीकारते आणि शहरापासून दूर असणाऱ्या, आपल्याच लयीत चालणाऱ्या एका वेगळ्या जगाचा भाग होऊन जाते. विकास आणि पर्यावरण या दोन्ही बाबी एकत्र नांदू शकत नाहीत हे कडवट सत्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या गोष्टी एकत्र नांदाव्यात, याकरता ग्रीन कन्सल्टंट काम पाहतात. पण, सचोटीने काम पाहणं आणि केवळ कागदी परवानग्या आणून प्रोजेक्ट `ओके` करून देणं यात फार मोठं अंतर असतं.
सचोटीने काम पाहणारी व्यक्ती जेव्हा निसर्गावर मनापासून प्रेम करणारी असेल आणि दुसरीकडे तिला जेव्हा कामाचा भाग म्हणून नियमबाह्य गोष्टीदेखील चालवून घ्याव्या लागतात, तेव्हा तिची मोठीच कुचंबणा होते. अशीच कुचंबणा कामायनीची होते आहे. ग्रीन कन्सल्टंटची भूमिका ही तारेवरून चालण्याच्या कसरतीसारखीच. सेन्सिटिव्ह मनाची व्यक्ती अनेक गोष्टी मनाला लावून घेत असते. जर पूर्वायुष्यात खालेल्या फटक्यांची या संवेदनशील मनाला जोड असेल, तर आत्मविश्वास पुरेसा डळमळीत झालेला असतो. एखादं काम आपल्याला जमेल की नाही, याची खात्री वाटत नसते. आयुष्य अर्थहीन वाटू लागतं. अश्या परिस्थितीत अडकलेली कामायनी या नव्या कामाच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेते. पूर्वायुष्याचा धांडोळा घेते. सध्याचं आयुष्य आणि गत-आयुष्य यांचे धागे जोडू पाहते. काय चूक काय बरोबर, याचा अदमास घेते. `फोर सीझन्स` मधे असलेली फर्स्ट आणि थर्ड पर्सनची सरमिसळ फार विशेष आणि वेगळी आहे. थर्ड पर्सन वेगळ्याच पद्धतीने मांडायचा अनोखा प्रयोग ही कादंबरी करते. यात बरीच पात्रे आहेत पण ती जाणीवपूर्वक योजलेली आहेत. पात्रांची फुकट भाऊगर्दी आणि विनाकारण केऑस होत नाही. यात ठोस घटना म्हटलं तर फारश्या नाहीत. टाईमलाईन्स बर्याचश्या आहेत. त्यांची सरमिसळ आहे. पण हे सगळं पुरेसा वेळ घेऊन संथ गतीने केलं जातं. शहर आणि गाव या भिन्न प्रवृत्तींचा सुरेख मेळ यात साधला जातो. फारश्या घटना आणि पात्रे नसलेली वर्णनात्मक कादंबरी लिहिणं हे अतिशय अवघड काम आहे. वाचकाला ही कादंबरी गुंगवून ठेवत नाही. पण, `पुढे काय` ची उत्कंठाही लागते. त्याचबरोबर हे सांगावंसं वाटतं, की घाईने वाचून एकदाची संपवून टाकायची ही कादंबरी नाही. हाताशी भरपूर वेळ असताना, कादंबरीमधल्या वातावरणाशी एकरूप होत, त्याच्या संथ,शांतपणाचा आस्वाद घेत, त्यातला हळुवारपणा अनुभवत वाचायची ही कादंबरी आहे. पृष्ठसंख्या १०० ते साधारण २४४ हा भाग बऱ्यापैकी ताणलेला वाटतो. तो पन्नासएक पानांनी कमीदेखील चालला असता असं वाटतं. साधारण २४५ व्या पानापासून ते शेवटपर्यंत कादंबरीमधे अनेक घटना घडू लागतात. कामायनीच्या गतआयुष्यातील रहस्ये उलगडू लागतात. पुढे काय? ची उत्तरे हळूहळू मिळू लागतात. पण २४४ व्या पानावर येईपर्यंत मधल्या साधारण सव्वाशे पानांमध्ये वाचकाचा पेशन्स पणाला लागतो. निसर्ग, पर्यावरण याची फारशी आवड नसलेल्यांना किंवा या गोष्टींचा दुरून, तटस्थपणे विचार करणाऱ्या व्यक्तींना हा भाग निश्चितपणे रटाळ वाटू शकेल.
ग्रीन कन्सल्टन्सी, आर्किटेक्चर, एखाद्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधले बारकावे, शासकीय बाबी इत्यादी बराचसा टेक्निकल भागही यात बऱ्याच तपशीलात येतो. या फील्डशी तुम्ही फारसे संबंधित नसाल, त्याविषयी तुम्हाला फारशी आस्था नसेल, यासंबंधीची वृत्ते, बातम्या इत्यादी तुम्ही फारश्या वाचत नसाल तर तुम्हाला हा भाग समजायला किचकट वाटू शकेल. एक नक्की आहे, की ही कादंबरी करमणूक म्हणून वाचण्याकरता नाही. वर्ल्ड सिनेमा किंवा एखादं अमूर्त चित्र अथवा शिल्प पाहण्याकरता जसा भरपूर पेशन्स आवश्यक असतो, तितक्याच दर्जाचा पेशन्स ही कादंबरी वाचताना ठेवावा लागतो. २४४ पानांपर्यंत आल्यावरही अजून काहीही घडलेलं नाही, असं फीलिंगही वाचताना येऊ शकतं. आधीच सांगितल्याप्रमाणे, ही एकदा वाचून संपवायची गोष्ट नाही. ही एक वेगळी अनुभूती देणारी गोष्ट आहे. यातलं सज्ञान व डोळस जंगलवाचन / निसर्गवाचन रम्य आहे. फोर सीझन्सकरता पुरेसा वेळ हाती हवा. यातल्या वातावरणात रमायची तयारी हवी आणि लेखिका नेईल त्या वाटेने, त्या वाटेवरचा संथ-शांतपणा अंगी भिनवत वाचायची तयारीही हवी. कामायनीची मनोभूमिका समजून घेत, त्यात वर्णन केलेलं वातावरण डोळ्यांसमोर आणत, त्याचा फील घेत घेत, त्यातली पात्रे जी गाणी ऐकतात ती स्वतः ऐकत त्यात रमतरमत वाचायची मजा और आहे. ही फक्त वाचण्याची कादंबरी नसून फील घेत, रमत, मुरत करायची एक सुंदर, तरल गोष्ट आहे. मी अनेकदा म्हणतो, की हल्ली पुस्तके ‘चांगली’ असतात’ पण ती ‘संग्राह्य’ असतीलच असं नाही. ‘फोर सीझन्स’ ही कादंबरी चांगली तर आहेच. पण ती संग्राह्य देखील आहे. यातली भाषा, यातलं वातावरण, कथानक उलगडताना यात केलेले प्रयोग, वाक्य / परिच्छेद अर्धवट तोडायची यातली शैली, डायरीसारख्या छोट्या नोंदी, डायरीच्या आत आणि क्षणात डायरीच्या बाहेर, मनाच्या आतला संवाद, प्रत्यक्षात घडणारा संवाद अशी सतत बदलती असणारी रचना हे सगळं उत्तम आहे. कादंबरीचा एकूण आवाका, तिचा परीघ बराच व्यापक आहे. वेगवेगळ्या टाईमलाईन्स एकमेकांत सहजी गुंफून केलेलं कथनही एरवीपेक्षा वेगळं आहे. ‘पर्यावरण’ या, कादंबऱ्यांमधून फारश्या न-आढळणाऱ्या विषयाला वाहिलेली, बुद्धीला खाद्य देणारी, काही महिने उलटले की पुनर्वाचन करावं असं वाटायला लावणारी, अलीकडच्या काळातली ही एक उत्तम कादंबरी आहे.
...Read more
Shruti Tambeफोरसीझन्स वाचली. आवडली. पुरवून वाचली. बरेच दिवस ती संपूच नये असं वाटत होतं.
अभयारण्यं पाहिलेली आहेत. पण ग्रासलॅन्डचं नैसर्गिक, वरवर अनाकर्षक वाटणारं सौंदर्य, अभयारण्यामुळे उखडून टाकले गेलेले साधेभोळे लोक, निसर्गासोबत जगणारे आदिवासी-राक्षसी विकासाचया कल्पना आणि अतिशय संवेदनशीलतेनं हे पाहून बदलणारी एमराल्ड!-हे सुरेख बांधलं गेलंय.
सगळ्यात मनाला भिडली उभ्याआडव्या पसरलेल्या माळरानांची वर्णनं-टोचऱ्या, खुरट्या गवतापासून ते मोठ्ठ्या वृक्षांपर्यंतची सगळी दुनिया सांभाळणारं माळरान. भारत हा खरं तर निम्मापाऊण माळरानच आहे. या माळरानाची शान असणारे तरस, कोल्हे, लांडगे, हरणं, ससे-सगळंच मनोहारी. तुम्ही हे सगळंच रेखाटलंयत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदरबन, मुंबई, माळरान आणि इटली ही जगं वेगळीही आहेत आणि एकात्मही. हे तुम्ही मनाला भिडेल आणि पोहचवेल असं सांगितलंय.
कादंबरीचे तुकडे वाचतावाचता मुंबईकर विकासवादी मुलगी ते मानवी जीवन, स्थलांतरं, शोषण, अगतिकता, नैसर्गिकता, प्रयत्नवाद हे समजून घेणारी एक प्रगल्भ शहाणिव हळूहळू तिच्यात कशी येते ते तुम्ही उलगडून दाखवलंय.
कामासाठी सध्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अभयारण्यात फिरत्येय. ओसाड होत चाललेली माळरानं, बेमुर्वत फोफावणारी ऊसशेती, जंगलात माणसं घुसत गेल्यानं धुपणारा निसर्ग, "मोठ्ठ्या" विकासाच्या स्वप्नात आंधळी झालेली मध्यमवर्गीय लक्षावधीची झुंड यात तुमची फोर सीझन्स एक समजुतदार, प्रगल्भ असा सूर लावते.
इतकं सुरेख प्रवाही गद्य बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळालं ते तुमच्या या कादंबरीमुळे.
त्याबद्दल थॅंक्यू. आणि तुम्ही यापुढेही असंच सकस आणि सरस लिहित राहाल अशी शुभेच्छा.
आपली,
श्रुती तांबे
...Read more