* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662603
  • Edition : 4
  • Publishing Year : 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-34 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE PROCESS OF GENERATING LITERATURE: (PUBLISHED IN 1989) THIS NOVEL OF DR. ANAND YADAV UNTANGLES THE PERPLEXING PROCESS OF THE BIRTH OF LITERATURE. I WOULD RATHER SAY THAT IT IS A UNIQUE AND UNRIVALLED PIECE OF LITERATURE WITH A PHILOSOPHICAL BASE. HOW IS THE SEED FOR GENERATION SOWN IN AN ARTISTIC MIND? HOW DOES THE ARTISTIC MIND TRAVEL FROM THE FORMAL EXPERIENCES TO THE ARTISTIC EXPERIENCES? WHY DOES THE ARTIST FIND THE EXPRESSION MORE IMPORTANT THAN THE FORM OF LITERATURE? WHY A RIFT DEVELOPS BETWEEN THE ARTIST`S CONVENTIONS AND THE READER`S EXPERIENCE? THE AUTHOR HAS HONESTLY TRIED TO ANSWER ALL THESE QUESTIONS IN HIS FULLEST CAPACITY. TO GIVE MORE DEPTH TO THIS DESCRIPTION, HE NEUTRALLYCRITICIZES HIS OWN CREATIVE LITERATURE LIKE "NATARANG`, "GOTAVALA`, AND `BHAY.` THIS IS A MASTER PIECE IN THE WORLD OF LITERATURE. IT IS THE FIRST OF ITS TYPE IN THE FIELD OF A NEW FACULTY; "THE WRITER`S SKILLS`.
डॉ. आनंद यादव यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, ‘साहित्याची निर्मिती कशी होते?’ या जटिल प्रश्नाची उकल करणारा एक महत्त्वाचा तात्त्विक ग्रंथ होय. मराठीत तरी हा ग्रंथ एकमेव, नि अजोड म्हणावा लागेल. कलावंताच्या मनात कलाबीज कसे पडते, कलावंताचा व्यावहारिक अनुभवाकडून कलाअनुभवाकडे प्रवास कसा होतो, साहित्यप्रकारापेक्षाही, व्यक्त होणाऱ्या अनुभवाचीच मातब्बरी कलावंताला कशी वाटत राहते, नव्या साहित्यप्रकाराच्या शोधात कलावंत केव्हा नि कसा गुरफटतो, साहित्यिकाचा निर्मितिगत कलानुभव आणि रसिकाचा आस्वादगत कलानुभव यांमध्ये तफावत का पडत जाते इत्यादी विविध प्रश्नांची सखोल, साधकबाधक मीमांसा डॉ. यादव या ग्रंथात करतात. मुख्य म्हणजे ही चर्चा सफल व्हावी; म्हणून ते ‘गोतावळा’, ‘नटरंग’, ‘भय’ यांसारख्या आपल्या ललितकृतींच्या निर्मितिप्रक्रियांचा त्रयस्थ नि तटस्थ दृष्टीकोणातून शोध घेतात. डॉ. यादवांसारख्या एका प्रथितयश कलावंताने स्वमनातील चिंतनाच्या आधारे लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे ‘कलावंताची लेखनविद्या’ या मराठीतल्या नव्या अभ्यासशाखेचा आरंभबिंदू होय. — डॉ. दत्तात्रय पुंडे

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 18-06-1989

    साहित्य अभ्यासकांना उपयुक्त… ‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ हा डॉ. आनंद यादव यांचा ग्रंथ म्हणजे साहित्याची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न. सत्यकथा, साहित्यसूची, प्रतिष्ठान इत्यादी दिवाळी अंकांतून प्रसिद् झालेले लेख प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेले आहेत. त्यामुळे यादवांची निर्मितीप्रक्रियेच्या संदर्भातील मते साहित्याच्या अभ्यासकांना यापूर्वीच माहिती झालेली आहेत. त्या लेखांचे संकलन प्रस्तुत ग्रंथात केल्यामुळे साहित्याच्या अभ्यासकांना निर्मिती विषयक विचार एकत्रितपणे सापडतील. त्याच्या दृष्टीनी या ग्रंथाची उपयुक्तता खूपच आहे. निर्मितीप्रक्रियेचा विचार यापूर्वी मराठी साहित्यात झालाच नाही असे नाही. ना.सी. फडक्यांच्या ‘प्रतिभासाधन’मध्ये तो सर्वप्रथम झाला. परंतु बा.सी. मर्ढेकरांनी जेवढ्या मूलभूतपणे तो केला असता मर्ढेकरपूर्वकाळात तो कधीच झाला नव्हता. पण त्यानंतरही गंगाधर गाडगीळ, दिलीप चित्रे, विंदा करंदीकर आदी मान्यावर साहित्यिकांकडूनही निर्मितीप्रक्रियेचा विचार म्हणावा तेवढा झाला नाही. गद्य साहित्याच्याबाबतच समीक्षकांनी साहित्यनिर्मिती कशी होते या प्रश्नाची आपापल्या परीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. कित्येकांनी निर्मितीप्रक्रियेत गुढगुंजन, उत्स्फूर्तता किंवा अगम्य रहस्याचाच जास्त भाग असल्याचे सांगितले. तर कित्येकांनी तो विचार अतिशय ढोबळपणे केला. (रा. भा. पाटणकर, प्रभाकर पाध्ये, प्रा. गंगाधर पाटील, डॉ. सुधीर रसाळ इत्यादींचा अपवाद वगळता) सर्जन प्रक्रिया ही पूर्णपणे गूढ, रहस्यमय किंवा अज्ञेय अशी मानता येत नाही, असे यादवांचे मत असल्यामुळे सर्जनशील शक्तीचे रहस्यमय स्वरूप शोधणारे प्रश्न यादवांनी या ग्रंथात कुठेही उपस्थित केलेले नाहीत. निर्मितीचा अचेतनाच्या पातळीवरील भाग लेखकाच्याही स्वाधीन नसल्यामुळे सचेतन मनाच्या कक्षेत येणाऱ्या निर्मितीप्रक्रियेपुरताच विचार यादवांनी या ग्रंथात केला आहे. ‘मराठी साहित्यव्यवहार आणि निर्मितीप्रक्रिया’ या लेखात साहित्य कृतीच्या मूल्यमापनाच्या संदर्भात चुकीच्या कल्पना कशा रुजल्या जातात आणि त्याच चुकीच्या कल्पनांचे मानदंड लावून साहित्यकृतीचे मूल्यमापन कसे चुकीच्या पद्धतीने केले जाते हे साधार स्पष्ट केलेले आहे. स्वत:च्या निर्मितीप्रक्रियेचे भान नसल्यामुळे किंवा ते न ठेवल्यामुळे साहित्यिकाचे निर्मितीक्षम मन पृथक्करणशीलतेच्या अभावी मूल्यमापन करताना चुकीच्या पद्धतीने कसे करते याची उदाहरणे यादवांनी या लेखात दिली आहेत. जी. ए. कुलकर्णी व व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेचे मूल्यमापन करणाऱ्या गंगाधर गाडगीळांच्या लेखांची फेरतपासणी करण्याची कशी गरज आहे हे या संदर्भात यादवांनी सुचविले आहे. निर्मितीप्रक्रिया व समीक्षा व्यवहाराचा काही संबंध नाही हे पूर्णपणे चूक असल्याचेही मत यादवांनी या लेखात व्यक्त केले आहे. ‘व्यावहारिक अनुभव आणि कलानुभव’ या लेखात दोन्ही अनुभवाच्या जातकुळीतला फरक स्पष्ट करून कलावंताच्या निर्मितीक्षम मनाचा व्यावहारिक अनुभवाकडून कलानुभवाकडे प्रवास होताना कोणत्या संक्रमणावस्थेतून जावे लागते याची मीमांसा केली आहे. व्यावहारिक अनुभवातून कलानुभवाची प्रेरणा घेण्याची मूळ प्रकृती असणाऱ्या कलावंतांना कलात्मकतेचे भान ठेवून निर्मितीच्या प्रदेशातून प्रवास करण्यास यादवांनी सुचविले आहे. निर्मितीच्या अंगाने वस्तुसापेक्ष व व्यक्तिसापेक्ष असे कलानुभवाचे दोन प्रकार पाडून साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात प्रयोगशीलता कशी अवतरत असते याची साधकबाधक चर्चा ‘कलानुभव आणि साहित्यिक’ या लेखात केलेली आढळते. बौद्धिक शिस्तीचा प्रश्न ‘समीक्षाव्यवहाराला असते त्याप्रकारची बौद्धिक शिस्त निर्मितीव्यवहाराला नसते’ हे साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रकार या लेखातील यादवांचे मत मात्र सर्वमान्य होईलच असे नाही. ‘प्रारंभीच्या काळात साहित्यप्रकाराचे स्वरूप काय याचा अभ्यास करून त्यानंतरच साहित्यनिर्मिती करावी असे साहित्यिकाकडून सहसा घडत नाही असे यादवांचे मत आहे. परंतु साहित्यिक एखादा कलानुभव आपल्या कलाकृतीचा विषय बनवतो, जेव्हा अभिव्यक्तीपूर्वी साहित्यप्रकाराच्या आकृतीबंधाचा मनाच्या अचेतन पातळीवरही तो विचार करतोच. त्याने स्वीकारलेल्या साहित्यप्रकाराचा आकृतिबंध डोळ्यासमोर ठेवूनच त्या अनुषंगाने कलानुभवाला कलारूप देण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे प्रारंभीच्या काळातही निर्मितीप्रक्रियेत बौद्धिक शिस्त कमीअधिक प्रमाणात असतेच. पुढे पुढे तर अव्वल दर्जाचा साहित्यिक त्या साहित्यप्रकाराचा नियोजित आकृतिबंध झुगारून देण्यासाठी बंड करतो - (उदा. मर्ढेकर, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यांचया कविता बेडेकरांची ‘रणांगण’ किंवा तेडुंलकराचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक) तेव्हा तर निर्मितीव्यवहाराला जाणतेपणीच शिस्त लाभलेली असते. याच लेखातील ‘बाह्य घटनांवर आधारित अनुभवापेक्षा मानसिक पातळीवरील अनुभवातून माणसू अधिक प्रमाणात व अधिक सत्य स्वरूपात व्यक्त होतो. या यादवांच्या मताशी मात्र सर्वचजण निर्विवादपणे सहमत होतील. ‘साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रकार’ यांच्या परस्पर संबंधाचा विचार करून ‘प्रिन्सिपल ऑफ क्रिटिसिझमचे’ लेखक रेनेवेलेकनी सांगितलेल्या पद्य (कविता) गद्य आणि नाटक या साहित्यप्रकारांच्या तीन मूळ जातींच्या अंगभूत वैशिष्ट्याची यादवांनी अभ्यासपूर्ण मीमांसा केली आहे. चित्रकार निर्मितीप्रक्रियात मुक्त राहू शकतो पण साहित्यिकावर मात्र बंधने पडतात. कारण कोणत्या क्रमाने साहित्यकृती उलगडली म्हणजे आपणास हवा तो प्रत्यय मिळू शकेल याचे भाप साहित्यिकाला ठेवावे लागते. हा विचार ‘नव्या साहित्यप्रकाराच्या शोधात’ या लेखात आहे. यादवांनी प्रामुख्याने आपल्या कथा व कांदबऱ्याची उदाहरणे घेऊन निर्मितीप्रक्रियेची उकल करून दाखविण्यासाठी लिहिलेले आहेत. गोतावळा व नटरंग या त्यांच्या दोन प्रमुख कादंबऱ्यांची निर्मितीप्रक्रिया कोणकोणत्या लेखनावस्थातून गेली हे जिज्ञासूंना या लेखातून समजू शकेल. भय या ललित लेखाच्या निर्मितीप्रक्रियेतील शैलीच्या स्वरूपाचा शोध यादवांनी अतिशय तटस्थपणे पण तेवढ्याच कलात्मकपणे घेतला आहे. निर्मितीप्रक्रियेचा हा विचार एका कलावंत साहित्यिकाने केलेला असल्यामुळे तो प्रामुख्याने आत्मानुभूतीवरच जास्त भर देणारा आहे. प्रत्येक साहित्यिकाच्या दृष्टिकोनातून तो यापेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे. -दीपक शेडगे ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT, NAGPUR

    तटस्थ आत्मशोधातून नव्या प्रश्नांना चालना देणारे पुस्तक -‘साहित्याची निर्मितिप्रक्रिया’... मराठी ग्रामीण साळित्याची चळवळ हिरीरीने उभारणारे डॉ. आनंद यादव हे सशक्त ग्रामीण कथालेखक म्हणूनही सर्वपरिचित आहेत. १९६० नंतरची कथाकाराची जी पिढी नव्याने उदयाला आी. त्या भावकवितंचा दर्जा घेऊन पुढे आलेली जातिवंत ग्रामीण कथा आनंद यादवांचीच त्याबरोबरच साहित्यातील नवनव्या अंगाचा अधिक सूक्ष्म वेध घेणं हे आनंद यादवांच्या चिकित्सक प्रज्ञेचे वैशिष्ट्य आहे. साहित्याची निर्मितीप्रक्रिया हे त्यांचे नवे पुस्तक आहे. वाङ्मयाचा अभ्यास हा आस्वाद व समीक्षा या दोन दृष्टिकोनामधून सर्वसाधारणपणे केला जातो. मात्र निर्मितिप्रक्रियेच्या अंगांने साहित्याचा अभ्यास का होऊ नये? निर्मिती- आस्वाद- समिक्षा या क्रमवार अध्ययनाने साहित्य क्षेत्रात निश्चितच योग्य बदल घडून येईल. साहित्यिकाच्या प्रतिभेने उपजविलेले अनुभवबीज, त्याचा आविष्कार करताना अनुभवाला स्वत:चेच रूप घेऊ देण्याची त्या कलावंताची ताकद. नवे वाङ्मयप्रकार प्रसावण्याची किंवा अस्तित्वात असलेल्याच वाङ्मय प्रकारामध्ये संवादविरोध- समतोलात्मक नवीनता दर्शविण्याची त्याची क्षमता रसिकांच्या अंगाने घडत जाणाऱ्या साधारणीकरण प्रक्रियेप्रमाणेच कलावंताच्या अंगाने किंवा कवि-श्र मुखाने घडत जाणारी साधारणीकरण प्रक्रिया, या कलावंताच्या निर्मितिप्रक्रियेतील बारकाव्यांबरोबरच, छंदज्ञान, अलंकार, प्रतिमा, प्रतीक याबद्दलचेही नेमके मार्गदर्शन नवनिर्मात्यांना मिळू शकेल. त्यामुळे सैद्धांतिक आकलन वाढत जाऊन, त्याचाही लाभ कलावंत, निर्माता म्हणून त्यांना मिळू शकेल. साहित्याची निर्मितीप्रक्रिया या ग्रंथात डॉ. आनंद यादवांनी काही तात्त्विक आणि काही उपयोजित या दोन्ही अंगांनी आपले निर्मितीविचार मांडलेले आहेत. ते मांडताना स्वत:च्याच काही कलाकृतीतणून बऱ्याच तटस्थपणे आत्मशोध घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परंतु एखाद्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाबरोबरच, त्या पुस्तकातील विषयावरील सर्व प्रथम संपुष्टात येतात असे नाही. उलटपक्षी अनेक प्रश्नांच्या उत्तरामधूनच नीवन प्रश्न देखील उत्पन्न होऊ शकतात. अर्थात, ही त्या लेखकाची मर्यादा समजली जाऊ नये. कलावंत, आस्वादक आणि कलानुभव प्रतिभाशक्तीचे व्यवहार हे पूर्णत: नेणिवेच्या पातळीवरच चालत नाहीत. ही प्रतिभाशक्ती ‘अपूर्व-वस्तूनिर्माणक्षेम्’ असली तरी नेणीव व जाणीव या दोहांच्या सुरेख पद्मबंधातून ती कार्य करताना दिसते. प्रतिभावान कलावंत हा लौकिक आयुष्यात त्याला आलेला अनुभव जसाच्या तसा रसिकांच्या समोर ठेवत नाही. बरेच मागे जाता आले, तर भारतीय साहित्यशास्त्रकारांनी या बाबतीत काही निश्चित सिद्धांत सांगितलेले आढळतात. ‘कवीचा लौकिक अनुभव त्याच्या प्रतिभेतून उजळून निघालेला असतो. कवीच व्यक्तिबंध किंवा त्याची ‘परिमितप्रमातृता’ यातून ही प्रतीती निसटते. कवी आपल्या प्रतिभाबलाने आपला अनुभव लौकिक, व्यक्तिगत पातळीवरूनच वर उचलतो व त्याला साधारण्याच्या भूमीवर ठेवता. हे साधारण्या सुद्धा परिमित नसते. कवीचा साधारणीभूत अनुभव सर्व विश्वाला व्यापील एवढा व्यापक होतो.’ (भा.सा.पृ.३६४) किंवा ‘‘दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसिकाला येणारी प्रतीती ही कविगत प्रतीतीच असते. कवीला आलेला साधारणीभूत प्रत्यय आणि रसिकाला काव्यवाचनाने येणारा साधारणीभूत प्रत्यय एकच म्हणजे एकजातीयच असतात. हाच हृदयसंवाद किंवा वासनासंवाद होय.’’ (भा.सा.पृ.३६५) म्हणजेच काव्यातील किंवा नाट्यातील अनुभव हा अलौकिक असतो आणि व्यवहारातील अनुभव हा लौकिक असतो, त्यामुळे काव्यातील आणि व्यवहारातील रसिकाला येणाऱ्या अनुभवात कोटिभिन्नता आहे. ‘काव्यास्थात्म ध्वनि:’ ही प्रसिद्ध उपपत्ती कवीपासून तर रसिकांपर्यंत येणाऱ्या प्रतीतीच्या अखंडतेवर आधारलेला आहे. या प्रतीतीसाठी साहितयाची निर्मितिप्रक्रिया कशी हवी? साहित्यातील अनुभव हा आपपरतटस्थ भावाने युक्त असावा. त्यासाठी साहित्य हे व्यंगार्थप्रधान, प्रतीयमान स्वरूप असावयास हवे. ते गणीभूतलक्षकाव्य किंवा चित्रकाव्य नसावे. ध्वनिकाव्य असावे. साहित्यातील शब्दांना वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ यातून व्यंग्यार्थाचे धुमारे फुटले पाहिजेत. अन्यथा ते व्याजकाव्य किंवा कृतक्काव्य होईल. साहित्यिकाला भाषाप्रभू म्हणण्याचे मुख्य कारण हेच की शब्दांच्या सर्व शक्ती तो सीमांत रीतीने साहित्यात वापरु शकतो. या शक्ती साहित्यात वापरल्या गेल्याच पाहिजेत. हे भारतीय साहित्यशास्त्राचे म्हणणे अतिशय मार्मिक आहे. वक्ता व श्रोता किंवा कवी व रसिक यांच्यात अशा साहित्याद्वारे साधारणीकरण प्रक्रिया होऊन आपापरतटस्थ भाव मावळून जीवनाचे जीवनमूल्यात्मक दर्शन, वस्तुनिष्ठपणे घडल्याचा अलौकिक आनंद हे भारतीय साहित्य-शास्त्रानुसार काव्याचे अंतिम प्रयोजन आहे. तेव्हा, साहित्य निर्मिता प्रक्रिया विचारात घेताना, आस्वादप्रक्रियेशी कर्तव्य नसणे, आस्वाप्रक्रियेला वगळून केवळ निर्मिती प्रक्रियेचाच विचार करणे (पृ.११) हे बरेचसे एकांगी ठरू शकते. त्याचप्रमाणे आस्वादकांच्या आणि कलावंताच्या पातळीत मुलत:च तफावत किंवा भिन्नता निर्माण होते आणि ती अनिवार्य आहे, असे डॉ. आनंद यादव जेव्हा म्हणतात. (पृ.९७) तेव्हा कलावंत कलाकृती आणि आस्वादक या सर्वच संदर्भामध्ये काही प्रश्न नव्याने उपस्थित होतात. व्यावहारिक अनुभवांमधून कलानुभवाकडे होणारा कलावंताचा प्रवास मात्र लेखकाने अतिशय सुक्ष्मपणे दर्शविला आहे. विकसित साहित्यपरंपरा कलानुभव आणि साहित्यिक या प्रकरणात साहित्यपरंपरांचाही विचार लेखकाने केला आहे. परंतु मराठीत साहित्यपरंपरा या शब्दाची निश्चित परिभाषा अस्तित्वात नाही. ‘रुची’ मासिकाच्या मे ८८च्या अंकात टी. एस. इलिएट यांच्या १९१९ साली लिहिलेल्या ‘टे्रडिशन अँड इन्डिव्हिज्युअल टॅलेण्ट’ या लेखातील विचारांचा आजही जाणवणारा ताजेपणा आणि त्यातील बारकावे, डॉ. द. भि. कुळकर्णी यांनी वर्णन करून सांगितले आहेत. परंपरा म्हणजे नेमके काय, हे त्या लेखातून (आशय आणि अन्वयार्थ) स्पष्ट होते. केवळ पाश्चात्य तत्त्वज्ञान म्हणून ते टाळले जाऊ शकत नाही. भारतीय साहित्यशास्त्रातील अलौकिकतावादाशी या परंपरेची चपखल सांगड घातली जाऊ शकते. समग्र मानव जातीचे वांशिक संचित आपल्या अंतर्मनात, नेणिवेत दडलेले आहे. आदिमानवाचे रम्यभीषण अनुभव आपल्या अंतर्मनाच्या तळाशी गोठलेले आहेत. एका अर्थाने आपण आदिमानवाच्या प्रतिमाच आहोत. अनेक रुपाने या आदिप्रेरणा आपल्यात वसत असतात. जगातल्या प्रत्येक महाकाव्यात वनवास आढळतो. तो या प्रेरणांमुळेच. म्हणजेच या अनुभवांच्या प्रतिमा नाना रुपात साहित्यकृतीत प्रकटतात. हेच मूलबंध किंवा आदिबंध होत. प्रत्येकालाच शेवटी आपल्या संस्कृतीच्या संदर्भात. आपल्या अंतर्मनात रुजलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. यामुळेच देशी व विदेशी संस्कृतीतील एक झुंज संवेदनशील कलावंताला द्यावी लागते. त्यात समन्वय साधला गेला पाहिजे. दोन संस्कृतीच्या समन्वयाचा हा पेच विश्राम बेडेकरांनीही समोर आणला आहे. मन, भाषा, वाक्प्रचार यात रुजलेली ही मुळे आहेत. हा समन्वय साधला गेला नाही, तर साहित्यातील चित्रण अगदी एकांगी होते. परंपरेची पूजा करणे, अन्यथा ती संपूर्ण नाकारणे, हे दोनच मार्ग स्वीकारले जातात. या पंरपरेचे विकसन होत असताना, नवे पैलू घडत असतानाचा साहित्यातील प्रयोगशीलता निर्माण होते. या प्रयोगशीलतेचा विचार लेखकाने विस्तृतपणे केला आहे. परंतु गाडगीळ, मर्ढेकर, तेंडूलकर, नेमाडे यांच्या बरोबरीने, किंबहुना त्यांच्यापेक्षाही स्वसंस्कृतीतून विलक्षण बळ मिळालेला उमदार लेखक म्हणजे पु. शि. रेगे, डॉ. यांदवांनी त्यांचा उल्लेख या संदर्भात केलेला नाही. साहित्यातील परंपरा विकासातील जाणीवपूर्वक प्रयोगनिर्मिती रेग्यांचीच आढळते. विराट, वैश्विक पार्श्वभूमी निवडून रेगे जे अनुभव चित्रित करतात. ते मानवाच्या हृदयाच्या हृदयातील असतात. केवळ ३९ पत्राच्या ‘सावित्री’त सगळे जागतिक संदर्भ देऊन, शिवाय मातृत्व हे केवळ जीवशास्त्रीयच नाही, हा विलक्षण आशय अतिशय काव्यात्मतेने रेगे व्यक्त करू शकतात. वैश्विक, राष्ट्रीय प्रसंगांचे संदर्भ देऊन - त्या पार्श्वभूमीवर व्यक्तिमनातील अतिशय मूलभूत व आशावादी संवेदना व्यक्त करणे, हा रेग्यांचा यशस्वी प्रयोग आहे. त्यांच्या कादंबऱ्यांची शीर्षकेही या दृष्टीने लक्षणीय आहेत. स्व-संस्कृती व पाश्चात्य-संस्कृती यातील एक सूक्ष्म आदानप्रदान, विराट व व्यापक दर्शन देऊन काव्यात्मक रीतीने चित्रित करून परंपरेचे विकसन करण्याचे कार्य पुष्कळ प्रमाणात गाडगीळ, मेर्ढेकर यांनीही केले. वाङ्मयीन प्रयोगात नकळतपणा नसतो. जाणीवपूर्वकता, साहित्यिकाचा प्रयत्न यात गृहीत असतो. दुसरी गोष्ट नावीन्य किंवा वैचित्र्याची. जुन्या गोष्टींच्या सरसहा अनुकरणाला प्रयोग म्हटले जात नाही. तिथं पुथगात्मता हवी. रुढिभंजनातून पृथगात्मता निर्माण होते. आणखी एक गोष्ट म्हणजे वाङ्मयीन प्रयोग हा मुख्यत: आणि मूलत: वाङ्मयकृतीच्या अभिव्यक्तीशी निगडित असतो, असे म्हटले जाते. तरीही केवळ अभिव्यक्तिसापेक्ष, वैचित्रहव्यासाने आलेला प्रयोग व्याजप्रयोगच होय. विशिष्ट आशयाला किंवा वास्तवतेला परिपूर्णतेने अभिव्यक्त करण्यासाठी एका वाङ्मयीन अपरिहार्यतेतून निर्माण झालेला प्रयोग हा उचित प्रयोग होय. म्हणजेच वरवर अभिव्यक्तींशी संबंधित वाटणारा प्रयोग, आशय- अभिव्यक्तीच्या मुलसंबंधावर आणारित असतो. म्हणून कलात्मक अपरिहार्यता ही प्रयाकगशीलतेची पहिली सैद्धांतिक अट ठरते. परंपरेच्या विकासाचा एक टप्पा म्हणून निर्मितिप्रक्रियेच्या दृष्टीने प्रयोगशीलतेला साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले असले तरी इथे आणखी एक प्रश्न समोर उभा राहतो. संपूर्ण साहित्यकृतीचे मूल्यमापन त्याद्वारे होऊ शकते, की साहित्यकृतीत आवश्यक असा एक घटक एवढ्याच अर्थानं त्याचे अस्तित्व कायम राहते. तात्त्विक समीक्षेनंतर उपयोजित समीचेचाही एक भाग प्रस्तुत पुस्तकात आहे. स्वत:च्याच, भय, नटरंग, गोतावळा या कलाकृतीच्या इतरांकडून करवलेल्या परिशीलनातून ही उपयोजित समीक्षा डॉ. यादवांनी केलेली आढळते. शैलीच्या निर्मितीप्रक्रियेचे स्वरूपही उपयोजित समीक्षेद्वारे लेखकाने सांगितले आहे. आशय, अनुभव आणि अभिव्यक्ती यातील परस्परसंबंध आणि परसपरविरोध लेखकाने सूक्ष्मपणे दर्शविला आहे. त्यासाठी रेगे, गाडगीळ, ग्रेस यांच्या साहित्याची रूपसौंदर्यासाठी, तर वॉर अ‍ॅण्ड पीस, पण लक्षात कोण घेतो? या साहित्यकृतींची आंतरिक गुणात्मक सौंदर्यासाठी लेखकाने समयोचित उदाहरणे घेतलेली आहेत. ‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ या ग्रंथातून आत्मशोध घेताना एका नेमक्या मार्गाने डॉ. आनंद यादव चाचले आहत, हे निश्चित जाणवते. त्यामुळेच या विषयाला इथे पूर्णविराम मिळत नाही. अनेक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या या तटस्थ आत्मशोधातख् आत्ममग्नता कुठेच डोकावत नाही, हेही थोडं नाही. डॉ. अरुणा ढेरे यांचे ‘अंधाराचे कवडसे’ किंवा प्रभाकर अत्रे यांचे ‘कथा सृजनाची’ या पुस्तकांच्याच कक्षेतला पण थोडा निराळ्या दिशेने जाणारा विचार प्रस्तुत पुस्तकात केला गेला आहे. निर्मिती प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतानाच अनेक वाङ्मयीन संज्ञा, परिभाषा, सामान्य वाचकाच्या आवाक्याबाहेरच्या ठरल्या आहेत. अशा पुस्तकांचा वाचकवर्गही त्यामुळे मर्यादितच राहतो. नवनिर्माते आणि नवअभ्यासक यांच्या दृष्टीने मात्र निर्मिती प्रक्रियेचे रुप असे योजकतेने पुढे येणे, ही लहान गोष्ट नव्हे. त्या दृष्टीने हा ग्रंथ निश्चितच स्वागतार्ह ठरतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more