* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANI KUTHAVAR AALA GA BAI...
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618187
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 56
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SECOND COLLECTION OF POEMS AFTER DAYA PAWAR`S KONDWADA. HIS AUTOBIOGRAPHY ` BALAUTAM` CONTRIBUTED VALUABLE TO MARATHI LITERATURE AND AT THE INTERNATIONAL LEVEL. HE ALSO REACHED HIS COSMIC `BALAUTAM`. IN SPITE OF THIS. DAYA PAWAR’S ORIGINAL ORIGIN REMAINS AS A GENUINE CONTEMPORARY POET. HE WROTE HIS OWN POEM IN KONDWADA. THERE IS A SIMPLE, EASY TO- USE AND NON -ACCELERATED MOVE TO REBEL AGAINST REBELLION. THIS DISCOVERY HAS BEEN SHOWN IN MORE COMPLEXITY AND OVERALL IN WHERE DID WATER COMES FROM? DAYA PAWAR SENSITIVITY IS ANOTHER IMPORTANT ASPECT IN THIS COLLECTION. THE HARD WORK OF THE YOUNGEST, THE OPPRESS WOMEN, THE MISERY OF THE DALIT WOMEN`S PAIN HAS PERSISTENTLY KEPT ON MANY PLATFORMS. FROM THE TOP OF THE COLLECTION ` WHERE DID WATER COMES FROM? IT IS UNDERSTOOD THAT IN THE LIFE OF DALIT WOMEN- IN HER Q- LEVEL, MERCY PAWAR EXPERIENCE A WHOLE SYSTEM.
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ नंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. त्यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनानं मराठी साहित्याला मोलाचं योगदान दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचा लौकिक ‘बलुतं’मुळंच पोहोचला. असं असलं तरी दया पवारांचा मूळ पिंड हा अखेरपर्यंत अस्सल समकालीन कवीचाच राहिला. ‘कोंडवाडा’मधून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी कविता नोंदवली. विद्रोहाच्या तप्त आवाजाच्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐकू येणारी साधी, संयत आणि न एकारलेली. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ मध्ये हा शोध अधिक प्रगल्भतेनं आणि समग्रपणे व्यक्त झाला आहे. दया पवारांच्या संवेदनशीलतेला या संग्रहात आणखी एक महत्त्वाचं परिमाण लाभलं आहे. सर्वांत पायतळी असलेल्या कष्टकरी, दलित स्त्रीच्या अपार दु:खाचं. लोकगीताच्या देशीय रूपबंधातून दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवारांनी अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं जागता ठेवला. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ या संग्रहाच्या शीर्षओळीपासूनच हे जाणवतं की, दलित स्त्रीच्या जगण्यात – तिच्या अस्तित्वात, दया पवार सबंध व्यवस्थेचं प्रतिरूप अनुभवतात. भारताच्या सांस्कृतिक बेटांमधली दरी नाहीशी व्हावी यासाठी ‘माझी कविता बळी पडली तरी चालेल,’ असे दया पवारांनी कोंडवड्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे... ‘धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात, तसं आपण हसत मरावं...’ त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’मधूनही शेवटपर्यंत जाणवतो. कवी दया पवारांचे ‘समकालीनत्व’ अधोरेखित करणारा हा संग्रह मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरावा. प्रा. प्रज्ञा लोखंड
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #KONDVADA #PANIKUTHVARALAGBAI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-12-1999

    दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर... आपल्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानांविषयीची व प्रचलित काव्यविचार व परंपरेने चालत आलेली मराठी कविता यांच्यापेक्षा आपल्या कवितेच्या वेगळेपणाविषयीची जाणीव बहुसंख्य दलित कवींनी आपल्या कवितेतून प्रकट केली आहे. दया पवा हे या कवींमध्ये महत्त्वाचे नाव आहे. कोंडवाडा नंतरच्या त्यांच्या कविता पाणी कुठंवर आलं गं बाई ’ या संग्रहात चित्रित करण्यात आल्या आहेत. हा संग्रह त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाला प्रकाशित करण्यात आला. पवारांच्या कवितेचे वेगळेपण ‘कोंडवाडा’ मध्येच प्रकट झाले होते. दलित कवितेच्या महालात त्यांची साधी, संयत ठाम उभी होती. पवारांनी भोगलेले बरेवाईट सर्व अनुभव मनात साठवलेले आणि नंतर संयमशील वृत्तीने त्या अनुभवांचे प्रकटीकरण केलेले दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेत विद्रोह असला तरी आक्रस्ताळेपणा नाही. ती चिंतनशील कविता आहे. आपल्या उरातल्या जखमा हळुवारपणे,सौम्यपणे ती उघड्या करून दाखवते. आर्त स्वरात व्यथा गुंफून आवेगाने कड्यावरून कोसळणारी अशी ही कविता आहे. वाट्याला आलेला अनुभव कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ते मांडतात. ज्वालाग्राही अनुभव मनात खदखदत ठेवून ते सौम्यपणे त्याचा आविष्कार करतात. त्यामुळे येथे दलित वेदना आक्रस्ताळ्या भाषणबाजीत न सापडता चिंतनशील काव्यरूप घेतात. दया पवारांच्या कवितेचे हे विशेष ‘कोंडवाडा’तच दिसले होते. मग ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ या नव्या संग्रहाचा विशेष कोणता? सामूहिक दु:खाचा शोध ते येथे अधिक प्रगल्भतेने घेतात आणि अधिक समग्रपणे व्यक्त करतात. वैयक्तिक अनुभवांतून सामूहिक आविष्कार हे या कवितेचे स्वरूप आहे. कवीचे अनुभव व कविता यांच्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व उभे असते. अनुभवाचा अर्थ शोधणे व त्या अथानुरूप मूळ अनुभवाचा आकार व घाट साधणे, ही प्रक्रिया ते व्यक्तिमत्त्व करीत असते. येथे दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवार यांच्या संवेदनशीलतेला नवे परिमाण मिळवून देतो. स्त्रीचे दु:ख व्यक्त करण्यासाठी त्यांना लोकगीतांचा देशीय रूपबंध सहज हाती लागतो. ‘कोंबडा’, ‘बाजार’, ‘लोणी’, ‘आडाचं पाणी’, ‘चिलमाचं गाव’, ‘पाणी कुठवर आलं गं बाई’, ‘धरण’ या त्यांच्या कवितांना लोकगीतांच्या अर्थाला सादृश्य असा अर्थ व घाट लाभतो. ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ आणि ‘बाई मी धरण बांधीते, माझं मरण कांडीते’ या विद्रोहाच्या अंगार फुलवणाऱ्या कविता नर्मदा आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. दया पवारांनी कवितेला लढ्याचे साधन मानले आहे. त्यामुळे या कविता एखाद्या आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहणे म्हणजे त्यांनी प्रेयस प्राप्त करण्यासारखेच आहे. नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला सामाजिक संदर्भाची अपरिहार्यता प्रदान करणारी कविता दिली. तोच प्रकार पवारांच्या कवितेबाबत झाला आहे. सामाजिक संदर्भात बोलत असूनही ही कविता प्रचारकी थाटाची होत नाही, तर दलित जिण्याचा आलेख काढते. ती लढ्याचे साधन बनल्याने निराश होत नाही. जीवनातील एवढे भोग भोगूनही ती उदास बनत नाही. भविष्यकाळाची उत्तेजक स्वप्ने तिच्याजवळ आहेत. वेदनांच्या चित्रणाने भरलेली असूनही ती प्रचंड आशावादी आहे. दया पवार यांचा विकास व जागृती यांच्याशी त्यांची कविता समांतरपणे वाटचाल करीत राहिली, म्हणूनच प्रत्यक्ष जीवनानुभवाशी थेट नाते सांगणारी ठरली आहे. एका संयमित मनाने जीवनाच्या वेदनांचा समर्थपणे घेतलेला हा शोध आहे. संघर्षापेक्षा समर्पणशीलतेकडे झुकणारी ही कविता झपाटून टाकत नाही, पण समंजस मनाने घेतलेला मागोवा वाचकाला, श्रोत्याला अस्वस्थ करीत राहतो. -संतोष शेणई ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    लोकगीताच्या रूपबंधातून कष्टकरी स्त्रीच्या वेदनेचा करूण स्वर आळवणाऱ्या दया पवार यांच्या रचना बलुतंकार दया पवार यांच्या ‘बाई मी धरण, धरण बांधते’ आणि ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या कविता अत्यंत गाजल्या. दलित स्त्रीच्या जगण्यातले जीवघेणे दु:ख त्यांच्या या कवतांद्वारे वाचकांच्या हृदयाला चटका देऊन गेले. ‘कोंडवाडा’नंतरच्या त्यांच्या कवितांचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या. प्रा. प्रज्ञा लोखंडे यांनी सिद्ध केला आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने तो ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या शीर्षकाने प्रकाशित केला आहे. अडतीस कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, येशू खिस्त, भगवान बुद्ध, पंढरीचा राया यांना उद्देशून केलेल्या कविता आहेत. ‘माय मराठी’, ‘गुणगान’ करणारी एक रचना आहे. दलित स्त्रीच्या भाव-भावनांचा विविध पातळ्यांवरचा आविष्कार करणाऱ्या काही कविता आहेत, भारताच्या सद्य:स्थितीतल्या विषमतेच्या चटक्यांचीही जीवघेणी वेदना बहुतेक कवितांमधून या ना त्या स्वरूपात प्रकट होत राहते. कलंक कायमच आपण या देशात, या समाजात नेमके कुठे आहोत याबद्दलचा संभ्रम सतत त्यांना सतावत राहतो. ‘मी तळ्यात की मळ्यात’ असा प्रश्न पडतो. अहंकाराचा बुडबुडा फुटला तरी माथ्यावरचा कलंक अजून पुसला गेलेला नाही, अद्वैताचा नाडा हाती लागत नाही, खाली पाय ठेवावा, तर निसरड्या शेवाळावरच तो पडतो. (किती पायऱ्या उतराव्या), या तुमच्या दुनियेत, तुमच्या संस्कृतीत आपल्या पायाखाली सतत रक्ताचे सडेच पसरलेले दिसतात. तुमच्या पोशाखी संस्कृतीत आपले नाकडेपणच उठून दिसते. तुमचा मुखवटा घालून जगणे अशक्य होते. आपण सतत वधस्तंभाकडेच चाललोय, अशी पदोपदी जाणीव होते. (वधस्तंभ), अशी आपली घुसमट ते व्यक्त करतात. अमेरिकेतही भारताची आठवण अमेरिकेच्या दौऱ्यातील प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या काही कविता या संग्रहात आहेत. मारूतीसारखे सातासमुद्रापलीकडे उड्डाण करून गेल्यावर कोकणच्या राजा झिम्मा खेळतो - हेच गाणे ओठावर येते. तेथील पितळी कुंडीतले कॅक्टस बघून तुळशीवृंदावन आठवते, नाइट क्लबमधील स्ट्रिपटीझ बघताना रासलीला आठवते. निग्रो वस्तीचे हार्लेम बघताना गोलपाठीचे स्मरण होते. त्या कोणा अक्करमाशाच्या आईच्या गाईसारख्या डोळ्यात आपलीच आई दिसते. अशी सारखी त्यांना भारताची सतत आठवण होत राहते. आर यू इंडियन ? न्यूयॉर्कमधला स्वातंत्रता देवीचा पुतळा प्रथम हसताना दिसतो, नंतर त्यावर आपलेच थेंब थेंब रक्त सांडताना दिसते. पंचतारांकित हॉटेलात पाणी मागितल्यावर मद्याची सुरई घेतलेली काळी राणी ‘आर यू इंडियन’ असा प्रश्न विचारते, तेव्हा त्या प्रश्नाने जिव्हारी बाण लागल्यासारखी जखम होते. भारतात पाणी मागितल्यावर जात आठवते; येथे स्वतंत्रता देवीच्या देशातही तेच भागधेय वाट्याला येते. कुठेही गेले तरी जात वा देश विचारला जातोच (स्वतंत्रदेवतेचा पुतळा) हा जय कुणाचा ? पराभव कुणाचा ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडा-शहरात चला असा संदेश दिला. शहरात धर्मांधता-कर्मकांड-भेदभाव यांनी अपमानित व्हावे लागणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. परंतु आता या शहरातूनही चौकाचाकात धर्मांधता उफाळून आलेली दिसते, याबद्दलची खंत प्रकट केली आहे. (बाबा, कालपरवाची गोष्ट), बाबांच्या नावाचा ध्यास घेऊन इतकी वर्षे बरबाद केली म्हणून तुम्ही हसत तर नाही ना ? असा सवाल करून मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले, तेव्हा ही काही एका दिवसाची कमाई नव्हे, पुन्हा पुन्हा खांडववन पेटून हरळीच्या मुळीसारखे तक्षक तरले म्हणून आजचा दिवस उगवला असे कवी म्हणतो. बाबा, तुमच्या नावाचा विटाळ आज संताच्या भूमीत धुतला गेला हा जय कुणाचा - पराभव कुणाचा दिव्याने दिवा पेटत गेला मनामनात दडलेला काळोख मिटला (बाबा) येशू खिस्त आणि भगवान बुद्ध येशू खिस्ताचा जन्म गोठ्यात झाला. गावकुसाबाहेर झाला. मानवमुक्तीसाठी तो एकाकी लढला. सत्तेचे जुलमी तख्त त्याने उलथवले, क्रूसावर रक्त सांडूनही सर्वांवर दयेची पाखर घातली. गाईच्यासारख्या त्याच्या डोळ्यातून करुणेचा पान्हा उमळून आला. ‘येशू तू आमच्यासाठी हंबरलास’ अशी आपली भावना ते प्रकट करतात. भगवान बुद्ध अजंठ्याच्या लेण्यातील आडव्या फत्तराप्रमाणे चिरनिद्रा न घेता विकलांग आम्रपालीच्या जखमा धूत होता आणि हाताने तिला विझवणारा घालत आहोत; म्हणून कवी आपला आदरभाव व्यक्त करतो. पंढरीच्या रायावर मात्र तो धारेवर धरणाऱ्या सवालांची एकापुढे एक सरबत्ती करतो. पंढरीच्या राया चोखा का बाहेरी ? तूच खरा डोंगा दाविली पायरी तुझे भक्तगण देवळाच्या दारी निर्मिली रे भिंत कर कढेवरी का रे घबरशी, लपशी गाभारी ? आणि नंतर कवी त्याच्या दांभिकपणावरच सरळ हल्ला चढवतो. उन्हापावसात कण्हते पायरी छत्र चामरात तू आत भरजरी चांदीचे डोळे तुझे गाले गारगोटी (पायरी) माझा कोंबडा कुणी मारला बाई (कोंबडा) घुसळ घुसळीने बाई - अजून लोणी का ग न्हाई, (लोणी), मांडव रचता रचता उभी हयात ग गेली (मांडव), आडाचं पाणी बाई खोलवर, हाताचा आले फोड (आडाच पाणी), केलं रक्ताचं शिपान येल मांडवाला गेली, गोऱ्या गोऱ्या दंडावर बाई चोळी मी गोंदली, (चोळी), सोन्याची बाई सुरी तिला चांदीची ग धार, कोन दळती दळती जात्यात, बाई मी चिधीत ग सांधीत, जात्यावरचा वरचा दिसता हात कोन हसती हासती बाई सुपात (चिलमाचं गाव), या लोकगीतांच्या लयीतल्या गीतांच्या बाज स्त्री जीवनातल्या सुखदु:खांना समर्थपणे कवटाळतो. ‘‘बाई मी धरण, धरण बांधीते, माझं मरण, मरण कांडीते’’ आणि ‘‘पाणी कुठवर आलं ग बाई’’ या दोन गीतांनी तर अनेकांना भुरळ घातली आहे. तुझे पांग कसे फेडू ? ‘माय मराठी’ या कवितेतूनही दया पवार आपली अंतरीची वेदना प्रकट करतात. धर्ममार्तंडाची कोट रचल्याने पोथी-पुराणात मराठी भेटली नाही, पण जात्यावरच्या ओव्यांत मराठी भेटली, धुळपाटीवर शब्द गिरवता आले, मूक नायकाच्या हाती लेखणी आल्यावर आता दु:खाची गाणी वेशीवर टांगण्याचे बळ लाभले. आता मात्र ‘माय मराठी गे तुझे पांग कसे फेडू’ असे गदगदून आले आहे. दया पवार यांच्या अल्पाक्षरी कवितेतील स्त्री मनाचे भावदर्शन आणि एक दलित म्हणून भोगाव्या लागलेल्या दु:खाचे निवेदन संवेदनाक्षम मनावर नक्कीच आघात करील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more