- Smita Kawale
Interesting read!
- DAINIK TARUN BHARAT 20-05
एक वाचनीय चरित्रात्मक कादंबरी...
माधवी देसाई यांची ‘कांचनगंगा’ ही चरित्रात्मक कादंबरी! गोमंतकन्या अंजनीबाई मालपेकर, हिरबाई पेडणेकर आणि सुरंगा मुळगावकर अशा तीन तेजस्वी स्त्रियांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी जितकी मनोरंजक तितकीच माहितीपूर्णही आहे. या तीन तेजस्विनींचे अप्रकाशित जीवन या कादंबरीने प्रकाशात आणले, हा या कादंबरीचा उल्लेखनीय विशेष!
मराठी नाट्यवाङ्मयात स्त्री नाटककरांची आजही वानवाच आहे. अशा क्षेत्रात हिराबाई पेडणेकर या ‘महाराष्ट्रातील पहिली नाटक लेखिका’ म्हणून ओळखल्या जाणे अपूर्वाईचे आहे. त्यांच्या घरी होणाऱ्या साहित्यचर्चा, मोठमोठे नाटककार, लेखक यांचे येणे-जाणे याबद्दल अंजनीबाई आणि सुरंगा या आपल्या मैत्रिणीजवळ हिराबाई बोलत असतानाच, त्यामागे असलेली पुरुषीदृष्टी हिराबार्इंना अस्वस्थ करून सोडणारी आहे. ते आपल्या घरी कशासाठी येतात हे हिराबार्इंना चांगलं ठावूक असतं. या संबंधी त्या आपल्या मैत्रिणींजवळ म्हणतात- ‘त्या सर्वांना हवा असतो माझा सहवास. त्यांना माझ्या सौंदर्याचं वेड आहे म्हणून माझ्या घरी नट येतात, लेखक येतात. त्यांच्या पदांना मी चाली लावते. पण ते खरं नाही. मला त्यांचे हेतू समजतात.’ (पाठ नं. १२१) हिराबाई पेडणेकरांच्या या उद्गारातून तत्कालीन विदुषीकडे पुरुष कोणत्या दृष्टीने बघत यावर विदारक प्रकाश पडतो. कलावंत स्त्रीकडे येणार पुरुष केवळ कलेच्या वेडानं येतात असं नाही. त्यांनी केलेली स्तुती, त्यांचं गोड वागणं हे बरेचदा खोटं खोटं असतं.
हिराबार्इंसारख्या विदुषीला हे खोटेपण कळत नाही असं नाही. तरीही आपल्याला हे सारं आवडतं कारण याचीही एक नशा असते. ‘कुणा एकावर आपण मनापासून प्रेम करावं, त्यानं आपल्याला फसवावं अशावेळी आधार देण्यासाठी तिसराच कुणी यावा, आपल्या भावूक अवस्थेचा त्यानंही फायदा घ्यावा आणि मग त्याचीच नशा चढत जाते...’ हे यावर हिराबार्इंचं उत्तर.
स्त्रीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं. त्याला तडा जाता कामा नये. हिराबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी फार समंजस. त्या हिराबार्इंना समजवतात. आपलं चारित्र्य जपायला सांगतात. ‘हिरा, बाईचं खरं सौंदर्य कशात असेल तर ते तिच्या चारित्र्यात. ते चारित्र्य भंगलं की सारं संपलं. आपण कलावंत घरच्या मुली! आपण वयात येण्यापूर्वीच साऱ्याचं लक्ष आपल्यावर असतं.’ हिराबार्इंची मैत्रीण अंजनी मालपेकर हिच्या या उद्गारातून साऱ्या स्त्रीजातीच्या वाट्याला आलेल्या भागावर किती विदारक प्रकाश पडला आहे.
अंजनीबाई मालपेकर ही एक श्रेष्ठ गायिका! भेंडीबाजार घराण्याचे अतिथी नजीरखां यांची अंजनी ही पट्टशिष्या. अंजनी अठरा वर्षांची असतानाच गाण्याची बैठक करू लागली होती. लावणी ठुमरी, गझल, दादारा हे सारं तयारीनं गाणारी अंजनी शास्त्रीय संगीतातही तरबेज होती. शास्त्रीय संगीताचा दळदार आवाज तिने तयार केला होता. उर्दू, हिंदी, संस्कृत, गुजराती, मराठी साऱ्या भाषा ती शिकली होती. मिशनरी शाळेत तिने शिक्षण घेतलं होतं. गोहरजान, चुन्ना, वैष्णवसंप्रदाय या सर्वांच्या गायकीचा तिने अभ्यास केलाय. उच्चार, भाव, शब्दफेक, ताल, लय यात ती तरबेज आहे. कलावंताला आसनाचा मान असायला हवा हा तिचा हट्ट! आजवर कुण्याही स्त्री कलावंतानं हा हट्ट केला नाही. रात्रभर अदा करून, उभ्याने ठुमरी, दादरा कव्वाली पेश करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या बैठकी अन् लोडाला टेकून त्यांना वाहवा देणारे श्रीमंत श्रोते या परंपरेविरुद्ध आवाज उठवणारी अंजनी ही पहिली कलावंत! अन् राष्ट्रपतींच्या हातून पहिली नाट्य आणि संगीताची फेलोशिप प्रदापन केली गेली, अशी श्रेष्ठ गायिका! ‘बॉम्बे म्युझिकल सोसायटी’ या एका नव्या संस्थेचा मुंबईत शुभारंभ करणारी अशी श्रेष्ठ गायिका आणि सरतेशेवटी अगदी तृप्त मनाने तिने घेतलेला गानसंन्यास! अंजनी मालपेकरांची या कादंबरीतली व्यक्तिरेखा अशी चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान साकारली आहे.
या कादंबरीतील तिसरी तेजस्विनी आहे सुरंगा मुळगावकर. राजा रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्ररेणा! हिरा, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्रेरणा! हिर, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्माच्या चित्रामधील सीता, शकुंतला, उर्वशी, दमयंती, पार्वती या सर्वामध्ये हुबेहूब उतरली ती सुरंगाच! राजाजींची पत्नी माहेरी राहते. कारण त्यांच्या प्रदेशात लग्न झालं की पुरुषानं पत्नीच्या घरी राहायला जायचं ही पद्धत. पण राजाजींना ती मान्य नाही. ते आपल्याच घरी राहतात. चित्रकलेच्या निमित्तानं अनेक स्त्रियांशी त्यांचा संबंध आलेला. त्यातही राजा रविवर्मा अन् सुरंगा यांच्यातले संबंध म्हणजे रेशीमबंधच! सुरंगामुळे राजाजींच्या कुंचल्यात एक वेगळीच जादू आलेली. अन् राजाजींच्या प्रेमानं सुरंगाचं झालेलं कृतकृत्य जीवन. सुरंगा राजाजींच्या प्रेमाबद्दल म्हणते, ‘त्यांनी मला कोणतीही जहागिरी दिलेली नाही. पण माझं प्रेम अजरामर केलं. या सुरंगाला त्यांनी केव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं? यापेक्षा आणखीन काही सुंदर असेल?’ सुरंगाच्या या उद्गारात राजाजींच्या प्रेमाबद्दल किती कृतज्ञता भरून राहिली आहे.
हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर आणि सुरंगा मुळगावकर या तीन बाल मैत्रिणींच्या जीवनावरची ही कादंबरी! नवीवाडीमधील गोयंकारांचं जीवन, त्यांचे जगण्याचे संकेत या तीन मैत्रिणींचा असीम त्याग, त्यांचा संघर्ष या साऱ्यांचं मनोहारी चित्रण या कादंबरीतून आले आहे.
या तिघींनाही एकमेकींच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. हिरा पेडणेकर अंजनीच्या गाण्याबद्दल म्हणते, ‘आज तू मोठी गायिका म्हणून नावलौकिक मिळवलास.’ सुरंगाबद्दल म्हणते, ‘आमचं’ हे नाजूक सुरंगीचं फूल राजाजींसारख्या कलावंताच्या हाती सुखरूप आहे. अंजनी हिराबद्दल म्हणते, ‘आपणा तिघीत खरी विदुषी तूच आहेस. आजवर कुणी बाईमाणसानं नाटक लिहिलंय्?’ कविता केल्या आहेत तुझ्यासारख्या? की गाण्याला चाली दिल्या आहेत?’ या तिघीही अशा एकमेकींच्या सुखदु:खात समरस झाल्या आहेत.
ह्या कादंबरीचे कथाबीज लेखिकेच्या मनात कसे पडले? लेखिकेला या तिघींच्या जीवनावर कादंबरी का लिहावीशी वाटली? तर रणजित देसाई यांची ‘राजा रविवर्मा’ ही कादंबरी लेखिकेच्या वाचनात आल्यावर या कादंबरीची नायिका सुरंगा हिने लेखिकेच्या मनात घर केले. पुढे केव्हा तरी म्हापसा गोवा इथे अंजनीबाई मालपेकर संगीत सम्मेलन आविष्कार या संस्थेतर्फे अंजनीबार्इंवर बोलण्याचं निमंत्रण माधवी देसार्इंना आलेले. त्या निमित्ताने अंजनी मालपेकरांच्या जीवनाचा त्यांनी घेतलेला शोध. अन् मग अंजनी, हिरा आणि सुरंगा या तिघीही बालमैत्रिणी असल्याचा लेखिकेला लागलेला शोध. नवीवाडी, गिरगाव इथं वाढलेल्या, गोमंतकात जन्मलेल्या या तीन बालमैत्रिणी, त्यांचं मूकजीवन शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवण्याची लेखिकेच्या मनात निर्माण झालेली आकांक्षा अन् या आकांक्षेतून मूर्त रूपात साकारलेली ‘कांचनगंगा’ ही माधवी देसार्इंची कादंबरी! सुरंगाचं विषप्राशन, हिराबार्इंचा विजनवास आणि अंजनीचा गानसंन्यास या तीन घटनांची साखळी म्हणजे कांचनगंगा!
या तीन बालमैत्रिणींच्या जीवनकहाणीत लेखिकेने काल्पनिकतेचे रंग भरताना अलंकारिक भाषेचा केलेला वापर, बरेच ठिकाणी पाल्हाळीकपणे केलेली वर्णनं यामुळे ही कादंबरी काहीशी पसरट आणि कृत्रिम व्याज झालेली असली तरी या तीन विदुषींचे अपरिचित जीवन या कादंबरीने वाचकांसमोर आणले हे विशेष!
-डॉ. सुनंदा देशपांडे
- DAINIK SAMANA 03-06-2001
गानतपस्विनीच्या जीवनावरील लोभस कादंबरी...
माधवी देसाई यांचं ‘कांचनगंगा’ हे तेरावं पुस्तक आहे. अंजनीबाई मालपेकर या सुप्रसिद्ध गायिकेच्या जीवनावर ही कादंबरी आधारलेली आहे. महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका हिराबाई पेडणेकर आणि ‘राजा रविवर्मा’ या महान अशा हिंदुस्थानी चित्रकाराची प्रेरणा असलेल्या सुरंगा मुळगावकर या अंजनीबार्इंच्या मैत्रिणींची आयुष्यंही लेखिकेने जोडून घेतली आहेत. अंजनीबाईसारख्या गोमंतक कन्येविषयी, तिच्या गानतपस्येविषयी, आणि तत्कालीन समाजाविषयी, परंपरेविरुद्ध केलेल्या संघर्षाविषयी आणि जपलेल्या मूल्यांविषयी लेखिकेने मोठ्या आस्थेनं लिहिलं आहे असं लक्षात येतं.
गोमंतकात जन्म घेतलेल्या, छत्तीस वर्षे संगीत साधना केलेल्या आणि थोर गायक-कलावंत असलेल्या अशा अंजनीबाईच्या लावण्याविषयी कादंबरीत अनेकदा उल्लेख आलेले आहेत.
“मोत्यासारखे स्वच्छ सूर, त्या सुरांना असणारी एक मुलायम किनार, प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार, अर्थाप्रमाणे चेहऱ्यावर उमटणारे भाव, अत्यंत शालीन वर्तन आणि डाळिंबी रंगाच्या इंदोरी साडीमधून उठून दिसणारं त्या गायिकेचं लावण्य पाहून सारेजण भारावून गेले होते.” असे लेखिका सहज लिहून जाते. अशा स्वर्गीय सौंदर्याची धनीण असलेल्या अंजनीबार्इंनी आपल्या गुरू नाजिरखाँकडे जाहीर बैठकीपूर्वी एक अट स्पष्टपणे घातली होती : “मी उभं राहून गाणार नाही. कलावंत एक स्त्री म्हणून तिनं उभ्यानं गायचं ही कुठली परंपरा? मला हा फरक मान्य नाही.” आश्चर्य म्हणजे, त्रिभुवन शेटजींकडे होणाऱ्या पाहिल्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या वेळी चिंतामण शास्त्रींनीसुद्धा स्पष्टपणे सांगितले, “मित्रहो, या आसनावर आजची गायिका बसणार आहे. हा मान आपण सर्वजण तिला देणार आहो. आजवर आपण हे कधी केलं नाही. आपण टेकून बसत होता आणि कलावती स्त्री रात्रभर उभी राहून गाताना ऐकत होता. हा एक फार मोठा उपमर्द आपल्या हातून होत होता. कलाकार कलेचा उपासक असतो. त्याने खडतर तपश्चर्या केलेली असते. सभागृहात येणाऱ्या अतिथी कलाकाराला आपण प्रथम आसन देणं उचित नव्हे का?” खाँ साहेब, पं. भातखंडे, त्रिभुवनशेठ आनंदले व अंजनीबार्इंना आसनाचा मान लाभला. परंपरेविरुद्ध बंड केल्याचा हा परिणाम होता.
अंजनीबार्इंना धनाढ्य माणसांकडून, राजेरजवाड्यांकडून आमंत्रणे येऊ लागली तेव्हा आईनं जबाबदारीची जाणीव देऊन म्हटलं होतं, “बाय, आजवर तू या घरात सुखरूप होतीस. पिलाला पंख फुटले की, ते आभाळात प्रथम झेप घेतं, तो एकच क्षण काळजीचा असतो. नंतर मात्र त्याला आपोआपच समजायला लागतं की, आभाळाभर भरारी मारूनही घरट्यांत सुखरूप कसं परतावं आणि त्याच्या पंखांत आपोआपच उडण्याची शक्तीही येते.”
अंजनीबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी तेवढ्या कणखर निघाल्या नाहीत. हिरा पेडणेकरच्या कविता कुठे कुठे छापून येत होत्या. तिच्या सौंदर्यानं लोभावून नट, लेखक, नाटककार येत पण त्यांच्या मनातले हेतू स्वच्छ नव्हते हे तिला उशिरा कळले. एका विद्ध हरिणीसारखी ती जगली.
दुसरी मैत्रीण सुरंगा रविवर्म्याच्या चित्रांतून साकारली गेली तरी लोकांच्या टीकेला ती बळी पडली. विष प्राशन करून तिनं पुढं मृत्यूलाच कवटाळलं. हे दोन्ही प्रसंग आणि त्यातून कलावंत मनाची होणारी तगमग लेखिकेनं यथार्थपणे मांडली आहे. अंजनीबाईला वसनजी वेद या धनिकाचा आश्रय लाभतो. त्याच्याशी विवाह होऊन ती एका मुलाची आई बनते आणि गाण्याच्या बैठकीतून तिला अमाप असं यश पदरी पडते. तरीही प्रापंचिक आसक्तीतून ती विरक्त होत जाते. तिच्यावर केडगावच्या नारायण महाराजांच्या विचारांचा पगडा बसू लागतो. काही काळ ती नवऱ्यापासूनही दुरावते. नवरा कर्जबाजारी झाल्यावर त्याला धंद्यात उभं करण्यासाठी भांडवल गोळा करते, परंतु काही दिवसांतच नवऱ्याच्या मृत्यूनं ती पार कोसळते. उरलंसुरलं अवसानही गळून पडतं. हे कथानक अतिशय ओघवत्या शैलीतून मांडण्यात आलं आहे.
अंजनीबार्इंचं व्यक्तिमत्त्व केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर वाचनानं, अनुभवानं, चिंतनानं परिपक्व झालेलं असं दर्शविलं आहे. नेपाळ ते कन्याकुमारीपर्यंतचा सारा भारत त्यांनी आपल्या स्वर्गीय गायकीनं जिंकला. चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान अशा गोमंतक कन्येच्या रूपात माधवी देसाई यांनी अंजनीबार्इंचं कादंबरीतून रेखाटलेलं चित्र मोठं विलोभनीय झालं आहे. एका गान-तपिस्विनीवर लिहिलेली ही कादंबरी मोठी वाचनीय आणि लोभस झाली आहे.
- DAINIK PUDHARI 03-06-2001
श्रेष्ठ कलावतीची हृदयस्पर्शी जीवनगाथा-कांचनगंगा…
कांचनगंगा ही माधवी देसाईची कादंबरी भेंडीबाझार घराण्याचे गायक नजिरखाँ यांची परमशिष्या गोमंतक कन्या अंजनीबाई मालपेकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अंजनीबाईनी आपल्या स्वर्गीय गायकीने सारा भारत जिंकला. त्यांच्या जाण्यामुळे कला आणि सांस्कृतिक प्रांगणात फार मोठी पोकळी निर्माण झाली. अंजनीबाईच्या दोन मैत्रीणी - हिराबाई पेडणेकर महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका आणि संगीततज्ज्ञ कवयित्री आणि दुसरी सुरंगा मूळगावकर ही राजा रविवर्मा या श्रेष्ठ चित्रकाराची प्रेरणाशक्ती या तिघी गायन, लेखन, चित्र या कलाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या स्त्रिया. त्यांच्या जीवनप्रवासाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठीच लेखिकेने हे शब्दशिल्प निर्माण केले आहे.
अंजनीला सौंदर्य आणि मधुर आवाज या दैवी देणग्या लाभल्या होत्या. तसेच तिचे नशीबही बलवत्तर होते. म्हणूनच नजिरखॉसारख्या संगीत शिक्षक मिळाला. त्याने बिदागीची अपेक्षा न ठेवता आपल्या संगीतज्ञानाचे पूर्ण भांडार या शिष्येच्या स्वाधीन केले. शिष्येने निष्ठेने ज्ञान आत्मसात केले. कमीत कमी स्वरात जास्तीत जास्त आशयपूर्ण फुलोरा असणारे स्वरशिल्प निर्माण करण्यात आपले कसब दाखवले.
वाचनाची आवड असलेली आणि गाण्याचे वेड असलेली अंजनी, वसनजी या देखण्या, दिलदार, संगीत रसिकाची पत्नी झाली. वसनजी गिरण्यांचा मालक, उत्तम व्यापारी आणि शेअर दलाला होता. आर्थिक सुबत्ता असूनही त्याने अंजनीला गाण्याच्या बैठका घेण्यास अनुमती दिली. कारण गाणे हा तिचा श्वास आहे हे जो जाणून होता. त्याचे अंजनी आणि तिचे गाणे या दोन्हीवर अकृत्रिम प्रेम होते. अंजनी स्वतंत्र बंगलीत छानदार मोठ्या प्रशस्त जागेत आई-आजीसह राहूल लागली. श्रेष्ठ गायिकेचे मानमरातब तिला मिळत गेले. कीर्ती वाढली. प्रतिष्ठ उंचावली तरीही ती आपल्या जुन्या मैत्रिणींना आणि गुरूंना मुळीच विसरली नाही. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत राहिली. अनुभवातून अधिक परिपक्व होत गेली. तिची वर्गमैत्रिण सुधा जातीने ब्राह्मण केवळ आठव्या वर्षी विधवा झाली. त्यावेळी शाळेच्या फादरने आणि सेवाभावी शिक्षिका मेरीने दु:ख व्यक्त करताना जे विचार मांडले ते अंजनीच्या काळजात घर करून राहिले. तेव्हाच परंपरा हा शब्द असा काही तिच्या हृदयात रुतला की भावी आयुष्यात परंपरा तोडण्यात ती सतत पुढाकार घेत गेली. परंपरेच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करून कृती करू लागली. मैत्रिणींनादेखील तिने घातक परंपरा न मानण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांना भावनिक आधार दिला. तिघींनी व्यक्तिगत जीवनात परिस्थितीचे चटके सोसले. कलेची पूजा करताना परंपरा मोडण्याचे धाडस केले. त्यामुळे समाजाकडून विरोधाचे घाव बसले. ह्या सोसले, चारित्र्य आणि निष्ठा ही जीवनाची मूल्य बघून कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली. अशी ही तीन तेजस्वीनींच्या जीवनावरची सुंदर कादंबरी आहे.
कादंबरीचे निवेदन ओघवत्या शैलीतील भावपूर्ण आहे. अंजनीची आजी कुटुंबियांची गोमंतकीय बोली तर नजिरेखा इ. ची उर्दू मुस्लीम मिश्रीत मराठी यांचा मार्मिक वापर लेखिकेने केला आहे. शास्त्रीय गायकीतले बारकावे, संदर्भ परिश्रमपूर्वक मिळवून योग्य प्रकारे वापरल्याचे जाणवते. वाचकाचे शीर्षकाला संगीताचे ज्ञान नक्कीच वाढते. मुखपृष्ठ विषयाला व शीर्षकाला साजेलसे आहे.
-डॉ. विभा शहा
- DAINIK LOKSATTA 01-07-2001
असामान्य कलावतीचा संघर्षमय जीवनप्रवास…
प्रत्येक शतकावर तत्कालीन सामाजिक संकेताचा खुणा उमटलेल्या असतात. तत्कालीन प्रचलित परंपरा, रूढी, मूल्य हा त्या समाजजीवनाचा पाया असतो. अशा सामाजिक संकेतानुसार जीवन जगताना प्रामुख्याने स्त्रीवर्गाला जे चौकटबद्ध जीवन जगावे लागते त्याचे जीवनचित्रण माधवी देसाई यांच्या ‘काचंनगंगा’ या कादंबरीत येते. प्रस्तुत कादंबरीचा काळ शतकापूर्वीचा. म्हणून गेल्या शतकातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ देत कादंबरीचा प्रवास दोन पातळ्यांवर होत राहतो.
अंजनीबाई मालपेकर, हिराबाई पेडणेकर व सुरंगा मुळगावकर या तीन बालमैत्रिणीच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी. शतकापूर्वीच्या समाजात स्त्रीच्या पायातल्या रूढी परंपरेच्या बेड्या झुगारून देण्याचे धैर्य असलेल्या या तीन तेजस्विनींच्या संघर्षाची ही कहाणी. गोमंतकाच्या या तीन कन्यकांचे सारे जीवन मात्र मुंबईसारख्या शहरात गेले. कादंबरीत मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचे उल्लेख येतात. त्या काळात समाजाच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर व सामाजिक पातळीवरही सुधारकांचा लढा सुरू होता. ब्रिटिशांच्या अमदानीत इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे सुधारणावादी विचार समाजात रुजू लागले होते. तरीही कर्मठ हिंदू धर्माने रूढीपरंपरांच्या उभारलेल्या भिंतीत स्त्रीजीवन चिणले जात होते. बालविवाह, बालविधवा, केशवपनसारख्या अनिष्ट रूढींचा पगडा उच्चवर्णीय हिंदू धर्मात, समाजात दिसून येत होता. स्त्रीकडे बघण्याची संकुचित वृत्ती तिच्या सर्वांगीण उन्नतीच्या मार्गातील प्रमुख अडसरच होता. यासाठी समाजात वैचारिक परिवर्तन होणे आवश्यक होते. काही तत्कालीन सुधारक तसा प्रयत्नही करत होते, पण समाज बदलत नसेल तर स्त्रीने बदलायला हवे असा एक विचार हळूहळू रुजत होता. हे सारे टिपत एकूण मुंबई नगरीचा तत्कालीन चेहरा वाचकांसमोर उभा केला जातो.
कादंबरीचा प्रारंभ अंजनीबाई मालपेकर या गायिकेच्या आयुष्यातील अंतिम पर्वातील एका अत्युच्च आनंदाच्या प्रसंगाने होतो. दिल्लीतील दरबार हॉलमध्ये या तपस्वी कलावतीला स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक संगीत आणि नाटक अकादमीचा फेलोशिप प्रदान करण्याचा हा सोहळा लेखिकेने कुशलतेने रंगविला आहे. या प्रसंगवर्णनात अनेक संदर्भ आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले दशक, महात्मा गांधी, पंडित नेहरूंचे युग, भारतीय जनतेच्या मनातील त्यांचे स्थान, तत्कालीन राष्ट्रनिष्ठ नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वांनी भारलेली सामान्य जनता, गोमंतकाबद्दलची नेहरूंची, जनतेची स्वाभाविक ओढ हे सारे जणू त्या व्यक्तिरेखेच्या मनात शिरून शब्दबद्ध केल्यासारखे अस्सल अनुभव वाटतात. अंजनीबाई मालपेकर केवळ एक गायिका नव्हती तर वाचनाने, अनुभवाने, चिंतनाने परिपक्व बनलेले असे एक सुसंस्कृत, कलासक्त व्यक्तिमत्त्व होते. आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा, कलेचा तिला थोडादेखील अहंकार नव्हता. एखाद्या शांत नंदादीपाप्रमाणे त्या झगमगाटात ती भासत होती अशा नेमक्या आणि नेटक्या शब्दात अंजनीबार्इंचे उभे व्यक्तिमत्त्वच लेखिका रेखाटते. अशा अत्युच्च आनंदाच्या शिखरावर असताना माणसाचे मन भूतकाळाकडे धाव घेते. अंजनीबार्इंच्या मनात दाटलेल्या आठवणींनी कादंबरी त्यांच्या बालजीवनापासून पुढे सरकत जाते. गोव्यातील कलावंताच्या घरात जन्म झाला असल्याने गायिकेचा पेशा पत्करणे अपरिहार्य होते. लहानपणापासूनच गायकीचे धडे गिरवणे आवश्यक होते, पण कलेसाठी, पोटासाठी मुंबईस गिरगाव येथे आल्यानंतर शिक्षणाची संधी मिळाली. पारतंत्र्याच्या त्या काळात द्रष्ट्या समाजसुधारकांनी काळाची पावले ओळखून स्त्री-शिक्षणास चालना दिली होती. अंजनीबार्इंना शाळेत हिराबाई पेडणेकर व सुरंगा मुळगावकर या मैत्रिणी लाभल्या. ही मैत्री दीर्घकाळ टिकली. एकमेकींच्या आयुष्यातल सुखदु:खाच्या त्या साक्षीदार ठरल्या.
मुंबईत असूनही आपले पारंपरिक रीतिरिवाज, पूजा-अर्चा यांचे संस्कार अंजनीबार्इंवर आई-आजीमुळे झाले. शिक्षणाची संधी मिळाली तरी मूळ गायकीचा व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना मात्र शाळाच अधिक आवडे, नजीरखाँ हे त्यांचे गुरु. त्यांच्याकडून संगीताची दीक्षा, शिक्षण घेऊन पुढे आपल्या कलेत पारंगत होऊन त्या श्रेष्ठ गायिका झाल्या. यासाठी त्यांना अनेकांचे मार्गदर्शन लाभले. परंपरागत व्यवसाय पत्करावा लागल्याबद्दल त्यांच्या मनात खंत दिसून येत नाही, पण परंपरांनी जखडून गेलेल्या समाजाबद्दल मात्र त्यांच्या मनात खंत, सूक्ष्म रागही असावा. एक कलाकार म्हणून त्याचं आयुष्य समृद्ध होतं. बालपणी एका ब्राह्मण मैत्रिणीच्या आजोबांनी वर्तविलेली, ‘भाग्यवान आहेस पोरी! राजयोग आहे नशिबात. पायात सोनसाखळ्या घालशील, चांदीच्या आसनावर बसशील. पण या राजयोगापेक्षा तुझा संन्याययोग प्रबळ आहे. भाग्ययोग म्हणतात त्याला.’’ ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. यशासाठी जो कठोर जीवनसंघर्ष त्यांनी केला त्यातूनच त्यांचे जीवन उजळून निघाले. असा जीवनसंघर्ष परंपरेविरुद्धचा झगडा या तिघी बालमैत्रिणींनी आयुष्यभर केलेला दिसतो. त्यासाठी चटके सोसले. वेदना सोसल्या. हा तेजस्वी जीवनपट उलगडून दाखवताना त्यांच्या मूक वेदनांना वाचा फोडण्याचे कार्य लेखिकेने केले आहे. प्रस्तुत कादंबरीत येणारा आणखी एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे ब्रिटिश राजवटीत आलेली भयंकर प्लेगची साथ, जिने सारे जनजीवन ढवळून गेले होते. याचे पडसाद साऱ्या देशभर उमटले होते. अंजनीबार्इंचे कुटुंब फार मोठ्या दु:खाला सामोरे गेले. त्यांचे वडील, भाऊ, बहीण अशा तीन मृत्युंचा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला. या घटनेने त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. प्लेगच्या साथीमुळे मुंबईतून गोव्यात गेलेले त्यांचे कुटुंब नंतर, पोटापाण्यासाठी मुंबईत परतले तेव्हा अंजनीचे बालपण संपले होते. कुटुंबाच्या जबाबदारीचा भार पडला. इथून पुढे गायकीचे धडे गिरवताना नाजिरखाँ, छानूखॉ, हुसेन, पं. भातखंडे असे जातिधर्माच्या पलीकडचे एक विशाल कुटुंब बनले होते. अलौकिक संगीताच्या स्पर्शाने या क्षुद्र भिंती गळून पडतात याचा प्रत्यय त्यांना आला. मुंबईतील तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचा संदर्भही येतो. गणपती उत्सव, नाटक कंपन्या, संगीत जलसे, कलावंतांचा, कलेचा आदर करणारा, रसज्ञ धानिक वर्ग, कलावंतांना मिळणारा लोकाश्रय, गुणग्राहकता असे समाजचित्र दिसते.
अंजनीबार्इंनाही लोकाश्रय, रसिक श्रोत्यांचे प्रेम, नेपाळ नरेशांनी केलेला बहुमोलाचा सन्मान, वसनजीसारख्या धनाढ्य माणसाचे पत्नीपद, बडे गुलाम अली खाँसारख्या महान कलावंताची भेट या साऱ्यातून आनंदाचा अनमोल ठेवा प्राप्त झाला. पण त्याबरोबर आपल्याला एखादा शिष्य न घडवता आल्याचा सल, सुरंगा-हिरा-सुधा या सख्यांच्या दु:खानं व्यथित झालेलं संवेदनशील मन, तत्कालीन समाजावरील परंपरेचा पगडा, त्यातून दु:खाने झाकोळलेलं स्त्रीजीवन या साऱ्याची एक वेदना त्यांच्या अंतर्यामी दाटून राहिली होती. संगीत साधना करताना हळूहळू त्यांच्या मनाचा प्रवास भजनाकडे होऊ लागला आणि एका क्षणी त्यांनी गानसंन्यास घेतलेला दिसतो. संसारातील सारी सुखे भोगून त्यांचं मन अखेर संन्यस्त वृत्तीकडे झुकू लागलेलं दिसतं. एका कलावंताचा मुक्त आत्मा बर्फाच्छादित कांचनगंगेसारखा निर्मळ, पारदर्शी होऊन जातो. स्वत:च्या, स्वजनांच्या दु:खानेही, त्यांचा चांगुलपणावरचा विश्वास अटळ आहे. म्हणून कुठेही तक्रारीचा सूर नाही. एका असामान्य कलावतीचा हा संघर्षमय जीवनप्रवास आहे.
-माधुरी महाशब्दे