* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AATMACHARITRA MIMANSA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617722
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE WERE TREMENDOUS CHANGES SEEN IN THE SOCIAL, CULTURAL, CULTURAL, EDUCATIONAL, FINANCIAL, POLITICAL, INDUSTRIAL, TECHNOLOGICAL LIFE IN MAHARASHTRA DURING THE 50 YEARS POST INDEPENDENCE. THIS ALL NATURALLY AFFECTED THE LITERATURE, AS THE VIEWS OF THE LITTERATEUR CHANGED A LOT. NEW LINES AND FORMS OF LITERATURE CAME INTO PRACTICE. INITIALLY, THEY SUCCEEDED IN MAKING THE OLD APPEAR DULL, BUT WITH THE TIME, THEY ALSO LOST THEIR SPEED. ON THIS BACKGROUND, ANAND YADAV STANDS IN TO SEARCH THE MENTALITY CHANGED WITH THE TIME; HE TRIES TO UNDERSTAND THE DIFFERENT LINES AND FORMS OF LITERATURE, HE WORKS ON THEIR INITIATIVES, THEIR SIMILARITIES, THEIR DIFFERENCES, THEIR BACKGROUNDS WITH ALL HIS WIT AND WILL. HE HIMSELF IS A VERY SENSITIVE LITTERATEUR AND A CONTEMPLATIVE CRITIC.
आत्मचरित्राची वाङ्मयीनदृष्ट्या सर्वांगीण आणि तात्त्विक चर्चा करणारा स्वतंत्र असा ग्रंथ नव्हता. त्या दृष्टीने `आत्मचरित्र मीमांसा` हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. आत्मचरित्राच्या प्रेरणा, विषय, लेखनाची पूर्वतयारी, आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म, आत्मचरित्र आणि कादंबरी, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा या ग्रंथाच्या निमित्ताने प्रथमच मराठीमध्ये उपलब्ध होत आहे. एवढेच नव्हे तर, आत्मचरित्राचे अनेक प्रकार असतात याची जाणीव डॉ. यादव मराठी वाचकांना प्रथमच करून देत आहेत. आत्मचरित्र आणि चरित्र यांच्या स्वरूपात मुळात भेद कसा आहे, हे मराठीत प्रथमच डॉ. आनंद यादव सांगत आहेत. आत्मचरित्राचे वाचन कोणत्या हेतूने करावे, आत्मचरित्राचे मूल्यमापन वाङ्मयीनदृष्ट्या कसे करावे, याविषयीचा डॉ. यादवांचा दृष्टिकोन या ग्रंथात लक्ष वेधून घेतो. स्वातंत्र्योत्तर काळातील, विशेषत: १९७० नंतरच्या आत्मचरित्रांची समीक्षा कशी करावी याविषयीचे मौलिक मार्गदर्शन या ग्रंथात सूत्ररूपात मिळते. डॉ. आनंद यादव स्वत: आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत आत्मचरित्राचे लेखन १९८० ते १९९६ असे १५१६ वर्षे केले. या चिंतनशील आणि संवेदनशील लेखकाच्या स्वानुभवचिंतनातून उतरलेल्या आत्मचरित्रमीमांसा या ग्रंथाचे मोल त्यामुळे आणखी वृद्धिंगत होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES

    ‘जीवघेण्या’ साहित्य प्रकाराची मीमांसा... झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत ज्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे, त्या डॉ. आनंद यादव यांनी आत्मचरित्राची वाङ्मयीन व तात्त्विक चर्चा करण्यासाठी ‘प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच’ केला आहे. कथा-कादंबीपेक्षा हा साहित्यप्रकार वेगळा कसा, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, स्वातंत्र्योत्तर काळात आत्मचरित्रे कथा-कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात का आली, तरीही त्यांची एकूण संख्या कमी का, अशा तऱ्हेचे विवेचन कुठेही डॉ. यादव यांना मराठत आढळले नाही. ही उपेक्षा दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आत्मशोध ही कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात पूर्वीपासूनच असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच मराठीत आत्मचरित्रे येऊ लागली आहेत. त्यामध्ये ‘स्व’चा भौतिक शोध असला, तरी पाश्चात्त्य आत्मचरित्रांपेक्षा ती भारतीय दृष्टिकोनामुळे वेगळी झालेली आहेत. आत्मचरित्र लेखनामागे विविध प्रेरणा असू शकतात. दादोबा पांडुरंग किंवा बाबा पदमनजी यांच्या आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक जीवन गौण स्थानी; तर सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्यावर भर हाता. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध अशा व्यक्ती, आपल्याबद्दल गैरसमज होऊ नयेत म्हणून आत्मवृत्त लिहितात. व्यक्तिगत इतिहास लिहिणे ही काही आत्मचरित्रांची प्रेरणा असते. तर काही भूतकाळात रमण्याच्या उद्देशान लिहिली जातात. लिखाणाच्या प्रेरणेप्रमाणं त्या त्या आत्मचरित्राला विशेष आकार प्राप्त झालेला असतो. आत्मचरित्र हा चरित्राचाच उपप्रकार आहे हे आन्द्रे मौरॉज यांचे मत डॉ. यादव यांना मान्य नाही. ‘नायकाच्या व्यक्तिमत्त्वावरून आत्मचरित्रांचे अंतर्मुख व बहिर्मुख आत्मचरित्रे संकुचित होतात. उदाहरणार्थ, आनंदीबाई विजापुरे, कांचन घाणेकर, कमल पाध्ये यांची आत्मचरित्रे. आत्मचरित्रे ही झाडाझडती नसून त्यात घटनांची निवड केलेली असते. निवडीचा दृष्टिकोन लेखकाचा असतो आणि तो मान्य करूनच आत्मचरित्र वाचायचे असते, असे डॉ. यादव सांगतात. ‘आत्मचरित्र हा एका व्यक्तीने स्वत:च, स्वजीवनाचा नेटकेपणाने काढलेला चैतन्यपूर्ण व कलात्मक आलेख असतो.’ या वस्तुस्थितीद्वारे आत्मचरित्र समीक्षेची सुत्रे निश्चित करता येतील असे मत मांडून अखेर आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार आहे, असा समारोप डॉ. यादवांनी केला आहे. प्रत्यक्ष जीवन जगलेला ‘मी’ आणि आत्मचरित्र लिहिणारा ‘मी’ यांच्यातील सखोल ताणाचा अपरिहार्य परिणाम अभिव्यक्तीवरही होणारच! आत्मचरित्रांसंबंधी स्वतंत्र असे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘चरित्र आणि आत्मचरित्र’ या श्री. सदा कऱ्हाडे यांच्या ग्रंथात आत्मचरित्रावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे; परंतु त्यातल्या पहिल्याच वाक्याशी डॉ. यादव सहमत नाहीत. ते वाक्य असे, ‘‘आत्मचरित्र हा चरित्राचाच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्राच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्रातील सत्यासत्यता हा फारच गुंतागुंतीचा प्रश्न वाटतो. स्वाभाविक विस्मरण, औचित्यासाठी केलेला सत्यापलाप, आठवणींची कल्पनाशक्तीने केलेली भरपाई, इत्यादींमुळे आत्मचरित्रातील सत्य धूसर बनत जाते. चरित्रातील सत्याप्रमाणे ते पडताळून पाहता येत नाही, हे खरेच आहे; परंतु आत्मचरित्राच्या वाचकांनी लेखकावर पूर्ण विश्वास टाकावा, की इतर मार्गांनी त्याच्या लेखनातील खरेखोटेपण शोधून काढावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे व ‘प्रांजळपणा’ हे मूल्य कसे सिद्ध करता येईल, ते कळत नाही. असे प्रकार करता येतील. त्यातील पहिला प्रकार वैयक्तिक, प्रापंचिक, आत्मकेंद्रित असा असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे बहिर्मुख स्वरुपाची असतात. लेखनाच्या मांडणीला प्राधान्य देऊन आत्मचरित्रांचे तत्त्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्यरूपी असे वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक असतात. कादंबरीच्या स्वरुपात लिहिलेली ‘पोएटिक’ आत्मचरित्रे (श्यामची आई, तुंबाडचे खोत) ही डॉ. यादवांच्या मते कादंबऱ्याच असतात; कारण त्यात काल्पनिक घटना व पात्रे निर्मिलेली असतात. ‘साहित्यरूपात्मक आत्मचरित्र मला आत्मचरित्रच वाटत नाही,’ असे ते म्हणतात. निदान ६० वर्षांचे होईपर्यंत आत्मचरित्र लिहू नये, असे सांगून डॉ. यादव म्हणतात की, १९७० नंतर नवजागृत समाजातल्या तरुण पिढीने लिहिलेली आत्मचरित्रे रोचक असली तरी अर्धकच्ची झाली आहेत. स्वत:पासून अलिप्त होऊन स्वत:बद्दलचा विचार करण्याची एक विघटनाची प्रक्रिया आत्मचरित्रात असते. घटनाची निवड, रचना, त्यातून आकृतिबंध व नीटसपणा यासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. त्यात स्मरणशक्ती, संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता इत्यादींचाही सहभाग असतो. आत्मचरित्रातील संभाव्य दोघांबद्दल विवेचन करतानाच ते कसे टाळता येतील, अशीही चर्चा डॉ. यादव यांनी केली आहे. विस्मरण, निवडक स्मरण, वस्तुस्थिती विपर्यास, लज्जास्पद गोष्टी टाळणे असे अनेक धोके या लिखाणात संभवतात. त्यावर कालिक परिणामही होतो. मराठीत आत्मचरित्रांची लाट आल्यावर जी आत्मचरित्रे लिहिली गेली, त्यात उत्साह जास्त, अभ्यास कमी होता. तत्कालीन प्रश्नांना प्राधान्य दिल्याने ती खूप प्रसिद्धी पावली; पण नंतर कालबाह्य ठरली. ‘जो ललित लेखक असतो तो आपल्या कथा, कादंबरी किंवा नाटकात एक प्रकारे आत्मचरित्रच लिहित असतो... त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचे समग्र साहित्य हे त्याचे एका अर्थाने परिपूर्ण आत्मचरित्रच असते,’ असे मत जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. परंतु डॉ. यादव यांच्या प्रत्यक्ष घटना व त्यावर ‘एका पानाची कहाणी’च्या प्रस्तावनेत आत्मकथा हा लेखनाचा सर्वांत अवघड प्रकार आहे असे मान्य करून वि. स. खांडेकर म्हणतात, की ‘‘पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं, आणि म्हणून त्यांनी आत्मकथा लिहिली. तर आत्मचरित्र हा एक लपवाछपवीचा खेळ आहे, असे जयवंत दळवींचे मत असल्याने ते आत्मचरित्राऐवजी लेख लिहितात! घटनांच्या निवडीइतकेच त्यांचे शब्दांकनही कठीण असते. कारण लेखनसरावाचा आत्मचरित्राला उपयोग होऊ शकत नाही. हे म्हणजे, ‘पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जोखीम’ आहे, अशा योग्य शब्दात डॉ. यादव त्याचे वर्णन करतात. ज्या आत्मचरित्रांमध्ये स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अतिशयोक्ती दिसते ती ‘आत्मपूजेची खाजगी देवळे वाटतात’ हे विवेचनही अतिशय नेटके वाटते. तर ‘मनातली मळमळ व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्रे लिहिणे म्हणजे ढेकूण, डास मारण्यासाठी तोफा डागण्याचा प्रकार असतो’ या विधानात त्यांना आत्मसमर्थनाची वाटणारी चीड व्यक्त होते. ‘विशेषत: स्त्रियांची आत्मचरित्रे संकुचित भावनेने प्रेरित होऊन पूर्व घटनांच्या केवळ स्मरणावर लिहिली जात असावीत’ हे डॉ. यादव यांचे मत सहजी मान्य होईलसे वाटत नाही. नवजागृत समजातल्या तरुण पिढीची आत्मचरित्रे आयुष्यात फार लवकर लिहिलेली म्हणून अर्धीकच्ची राहतात, असे डॉ. यादव म्हणतात; तर चंद्रकुमार नलगे व डॉ. गंगाधर पानतावणे यांना असे वाटते की, त्या आविष्काराला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथन म्हणावे. आत्मचरित्र आयुष्याच्या मावळतीला लिहिली जातात. प्रौढत्वामुळे ती स्थिर व संयमी असू शकतील; परंतु आत्मकथने आयुष्याच्या ऐन उमेदीत लिहिलेली असतात. त्यात तारुण्याच्या तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यात प्रवाह असतो. आत्मकथेने बहुतांशी नाकारलेल्या समाजघटकांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. त्यात आत्मपरीक्षण आढळते, इतिहासलेखन नव्हे. आधारित साहित्यकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साहित्यिक आत्मचरित्र लिहू शकतो व त्यात त्या त्या घटनांचा साहित्याचा कसा वापर केला हेही सांगू शकतो; परंतु अनेक साहित्यिकांची आत्मचरित्रे फसली आहेत. कारण त्यात जीवनाचा सर्वांगीण अभ्यास दिसत नाही. ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ हा डॉ. यादवांना वदतोव्याघात वाटतो. कारण आत्मचरित्र हे घटित; तर कादंबरी काल्पनिक असते. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखनकौशल्य हवेच. घटनांची काटेकोरपणे निवड न केल्यास ‘कऱ्हेचे पाणी-तल्या प्रमाणे अस्ताव्यस्तपणा येतो. निवडीत अतितटस्थता आली तर ते महर्षी कर्वे यांच्या ‘आत्मवृत्ता’प्रमाणे कोरडे होते. एकाच हेतूने लिहिलेली प्रत्येक माणसाला स्वतंत्र व्यक्तित्व असते; म्हणून सैद्धान्तिकदृष्ट्या प्रत्येकच जण आत्मचरित्राचा विषय आहे; परंतु प्रत्यक्ष आत्मचरित्र लेखन हा साहित्यप्रकार किती कसोट्यांमधून उतरावा लागतो हे ‘आत्मचरित्रमीमांसा’ वाचल्यावर लक्षात येते, म्हणूनच तो ‘जीवघेणा’ आहे, या डॉ. आनंद यादव यांच्या मताशी आपण सहमत होतो! -उषा तांबे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL

    चरित्र लिहिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक... आपल्याला आलेल्या अनुभवांचे कथन करावे, विविध प्रकारच्या संकटांशी कशी झुंज दिली हे विस्ताराने सांगावे तसेच स्वत:चे गुण-दोष तपासून योग्य ते आत्मपरीक्षण करावे, असे नेहमी नसले तरी काही वेळा मनात येते. परंतु हे सर्व शातपणे मनापासून ऐकून कोण घेणार? अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्तीही त्याच त्या गोष्टी प्रसंग, आठवणी ऐकून कंटाळलेली असतात. आपले अनुभवाचे बोल ऐकण्यास श्रोता नसणे यासारखी दु:खद गोष्ट दुसरी कोणतीही नसेल. मनातील विचार शब्दबद्ध करून अनेकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आत्मचरित्र’ या साहित्यप्रकाराकडे व्यक्ती जेव्हा वळते त्यावेळी मात्र अनेक वाचक ‘त्या’चे विचार जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करतात. त्या व्यक्तीच्या जीवनाप्रमाणे आपले जीवन आहे का? किंवा त्यांचे कौटुंबिक जीवन कसे आहे? आपण त्याच्यापेक्षा सुखी आहोत का ती व्यक्ती आपल्यापेक्षा समाधानी आहे? इत्यादी प्रश्नाची उत्तरे वाचक ‘त्या’च्या आत्मचरित्रातून शोधत असतात. अशा अनेक कारणांसाठी वाचकवर्गाला अन्य कोणत्याही साहित्यप्रकारापेक्षा आत्मचरित्र हा साहित्यप्रकार अधिक भावत असावा. आत्मचरित्राचे लेखन हे स्वत:भोवती गुंफलेले असल्याने नीर-क्षीर तत्त्व अभावाने आचरले जाते आणि शीर्षकाप्रमाणेच केवळ स्वत:चे चरित्र लिहिले जाते. आत्मचरित्राचेही प्रकार असतात, विषय असतात. आत्मचरित्र म्हणजे स्वचरित्र नाही. प्रस्तुत विषयाचे यथायोग्य आकलन होण्यासाठी आनंद यादव यांनी ज्ञानवर्धक असे ‘आत्मचरित्र मीमांसा पुस्तक वाचकांसमोर ठेवलेले आहे. भावी आत्मचरित्रकार, वाचक यांना पुस्तक उपयुक्त तर आहेच पण त्याचबरोबर मराठी वाङ्मयाच्या अभ्यागतांना संशोधनात्मक मार्गदर्शक ठरणारा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. श्री. यादव यांनी ग्रंथ शीर्षकानुसार आत्मचरित्राची मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना यादव यांनी मराठी वाङ्मयाच्या इतिहासापासून आजपर्यंतच्या आत्मचरित्राचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्याप्रमाणेच हा प्रकार कमीअधिक प्रमाणात का लिहिला गेला असावा याबाबतीत शोध घेतलेला दिसून येतो. सुरुवातीला आत्मचरित्र या शब्दांची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. पाश्चात्य आत्मचरित्रे आणि भारतीय आत्मचरित्रे यामधील तुलानात्मक फरकाचे विवेचन केले आहे. आत्मचरित्र लिहिण्यामागील प्रेरणांचा शोध लेखकाने पुढील प्रकरणात घेतलेला आहे. या प्रेरणाबरोबरच आत्मचरित्र म्हणजे काय याबद्दलही विस्तृत विवेचन केले आहे. यानंतरची प्रकरणे अभ्यागतांना आणि भावी आत्मचरित्रकारांना अत्यंत उपयुक्त आहेत. या प्रकारणामुळे वाचकांनाही कोणतेही आत्मचरित्र वाचताना ते अधिक जाणीवपूर्वक वाचल्यामुळे आनंदप्राप्ती होईल. आनंद यादव यांच्या प्रस्तुत पुस्तकाचे मुखपृष्ठ छोटे, ठसठशीत आणि कमालीचे बोलके आहे. व्यक्तीच्या हातामधील दर्पणात त्याचा चेहरा दर्शविण्याऐवजी जीवनातील विविध रंग दर्शविलेले आहेत. हे रंग एकमेकांत मिसळूनही पूर्णपणे एकरून झालेले नाहीत. प्रत्येक रंग हा स्वतंत्र आहे. जीवनातील अनुभवांतही असेच अनेक रंग असतात. आत्मचरित्रकाराने अलिप्तपणाने प्रत्येक रंग नव्याने कागदावर उमटावयाचा असतो. विविधरंगी जीवनवस्त्राचा आविष्कार या चित्राद्वारे साधलेला आहे. असे वाटते. ग्रंथ शीर्षकामुळे आणि मलपृष्ठावरील मजकुरामुळे पुस्तकाच्या अंतरंगाची कल्पना येते. ग्रंथ शीर्षकापासून मलपृष्ठांपर्यत वाचनीय असे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या अखेरीस संदर्भ ग्रंथ सूची दिलेली आहे. आत्मचरित्र या वाङ्मयप्रकारचे विवेचन करणारे हे पुस्तक अभ्यागतांनी अभ्यासावे. ‘आत्मचरित्राचे प्रकार आणि त्यांचे योगदान’ हा विषय पीएच.डी साठी अभ्यागतांना सुचवावासा वाटतो. यादृष्टीनेही यादव यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल. वाचक, जिज्ञासू, अभ्यागतांना सहज समजेल अशी भाषाशैली आहे. एकंदरीत यादव यांचे ‘आत्मचरित्र मीमांसा’ हे पुस्तक मराठी वाङ्मय क्षेत्रात मोलाची भर टाकू शकेल, यात शंका नाही. आपल्या ग्रंथालयातील कपाटामध्ये एका पुस्तकाची भर टाकण्यापेक्षा आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी, संशोधनात्मक कार्य करण्यासाठी, साहित्यिकांनी आत्मचरित्र लिहावे का या प्रश्नासाठी भावी आत्मचरित्रकारांच्या मार्गदर्शनासाठी पुस्तक उपयुक्त आहे. -भागश्री कुलकर्णी ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचे सर्वांगीण विवेचन... मराठीमध्ये कथा, कादंबरी नाटक इ. जो अनेक साहित्य प्रकार आहेत त्यांचे मूलभूत घटक कोणते, स्वरूप काय याचे सविस्तर मार्गदर्शनवर विवेचन असणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. पण आत्मचरित्रावर मात्र असे एकही पुस्तक नाह, ही उणीव आनंद यादव यांनी ‘आत्मचरित्रमीमांसा’ लिहून दूर केली आहे. आणि मराठीच्या अभ्यासकांची ही चांगलीच सोय केलेली आहे यात शंका नाही. आत्मचरित्र या शब्दांचा अर्थ काय, स्वचरित्रापेक्षा हाच शब्द योग्य कसा, पाश्चात्य व भारतीय संस्कृती भेद, वेगळी मानसिकता यामुळे आत्मचरित्रांतही मूलभूत फरक कसा पडला याचे सुंदर विवेचन पहिल्या प्रकरणात केले आहे. पाश्चात्य संस्कृती व्यक्तिकेंद्रीत म्हणून व्यक्तीचा स्वभाव, मन, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, प्रमादांची चर्चा हे आत्मचरित्राचे ध्येय समजले जाते, तर भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्त्व म्हणून व्यक्तींच्या गुणदोषांपेक्षा समाज संस्कृती देश यासाठी केलेल्या कार्याला जास्त महत्व दिले जाते. आत्मचरित्र लेखनाच्या प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न दुसऱ्या प्रकरणात केला आहे. इतिहास लेखनाची प्रेरणा जी प्रबोधन काळात विशेष प्रमाणात दिसते अशा प्रकारच्या आत्मचरित्रात व्यक्तिगत इतिहास असतो, पण गौण स्थानावर आणि सामाजिक सांस्कृतिक कार्याचा घेतलेला आढावा हा महत्त्वाचा असतो. कारण तो तरुणांपुढे आदर्श म्हणून मांडायचा असतो. याच्या मर्यादा काय, याचे महत्त्व काय, इतिहास म्हणून याचे स्वरूप काय याचे सविस्तर विवेचन यादवांनी केले आहे. याचे आणखी एक वेगळे स्वरूप म्हणजे व्यक्तिगत इतिहास लेखनचे. पण चुकीची माहिती वा बातम्या कशा चुकीच्या आहेत हे सांगण्यासाठी लिहिलेले आत्मचरित्र, गतकाळात रमण्याची प्रेरणा असलेले, ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अभाव असलेले म्हणून ललित गद्य, वाङ्मयीन गुणवत्ता असणारे पण आशयाच्या दृष्टीने दुय्यम ठरणारे केवळ अनुभवाची रास वाटणारे असे आत्मचरित्र आत्मप्रतिमेच्या जाणिवेची प्रेरणा असणारे; पण त्याबरोबर समाज, कुटुंब, शासन इत्यादीचे विविधांगी योगदान दुर्लक्षून आत्मपूजक व एकांगी आत्मचरित्र. ज्याचा स्वत:च्या अन्यायाला वाचा फोडताना दुसरी बाजू मुळीच नसते वा असलीच. तर सोयीची तेवढीच दिली जाते. आत्मशोधाची प्रेरणा असणारे उच्च कोटीचे संत, तत्त्वज्ञ यांचे आत्मचरित्र हा आणखी एक प्रकार तर आत्मविष्काराची प्रेरणा असलेले रोमॅण्टिक प्रकृतीचे कलावंत व साहित्यिक यांचे आत्मचरित्र याची कारणमीमांसा अगदी सविस्तर केलेली आहे. चरित्र हा शब्द तरी ‘लीळाचरित्र’ ‘हर्षचरितम’ आदींमध्ये असला तरी चरित्र या साहित्यिक संज्ञेला या कलाकृती उतरत नाहीत आणि पाश्चात्य साहित्य संपर्कानंतर चरित्र व आत्मचरित्राचा उदय मराठीत झाला हे दाखवून यादव पुढे स्पेनमन यांनी दिलेले आत्मचरित्राचे प्रकार वर्णन करतात. नायकाला प्राधान्य देऊन सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणारे कारखानदार, उद्योगपती, कार्यकर्ते इ. चे आत्मचरित्र व दुसरा खासगीरित्या वैयक्तिक जीवन जगणारे कलावंत, नट, नट्या इ. आत्मचरित्र. या दोन्ही प्रकारांतील मांडणीची भिन्नता, त्यांचे स्वरूप उदाहरणे यांचा सखोल परामर्श घेऊन पुढे मांडणीला प्राधान्य देऊन झालेले तीन प्रकार - (१) तत्त्वज्ञानात्मक (२) इतिहासात्मक (३) साहित्यरूपात्मक यादव सांगतात. या तिन्ही प्रकारांचा सखोल व सोदाहरण उहापोह यादव करतात, पण तिसऱ्या प्रकाराबाबत स्वत:ची मतभिन्नत का व कशी यांचे जे सांगोपांग विवेचन त्यांनी केले आहे ते मुळातून वाचून अभ्यासण्याजोग झाले आहे. याबरोबर आत्मचरित्राला जवळचे असणारे स्मृतिचित्रे, संस्मरणे, दैनंदिनी इत्यादीचाही विचार मांडला आहे. मानव आणि समाज निसर्ग व स्वत: मी यांची अटळता, आत्मचरित्राच्या ‘मी’च्या जीवनाचे स्वरूप, वैशिष्ट्ये, त्याचे इतरांपेक्षा असलेले वेगळेपण, अर्धकच्ची आत्मचरित्रे कोणती व कशी, कालिकदृष्ट्या योग्य वेळ कोणती, कोठे थांबावे, आत्मचरित्राचे स्वयंप्रकाशिपण यांची मीमांसा आत्मचरित्राचा विषय मध्ये येते. आत्मचरित्राची प्रक्रिया तार्किक पद्धतीने कोणत्या ४ कारणांनी सिद्ध होते व सोपा वाटणारा हा प्रकार अभ्यासाअंती कशी गुंतागुंतीची निर्मिती प्रक्रिया आहे हे यादव लक्षात आणून देतात. आत्मचरित्र दर्जेदार व कलात्मक होण्यासाठी कशाकशाची जरूरी आहे याचे सुबोध स्पष्टीकरण आत्मचरित्र लेखनाची पूर्वतयारीमध्ये आले आहे. आत्मचरित्र लेखनातील संभाव्य दोष हे आहे पुढचे प्रकरण. यात संभाव्य धोके कोणते, त्यावर इतरांची उत्तरे याची चर्चा, आत्मनिष्ठा प्रांजळ वा एकांगी आत्मचरित्रावरचे दोन प्रकारचे कालिक परिणाम, लाटेवर आरूढ होऊन वा उपेक्षांना वाचा फुटावी म्हणून लिहिलेले आत्मचरित्र कालबाह्य, अर्धागविकल किंवा आत्मगौरव गाथा कसे बनते याचे दिग्दर्शन केले आहे. आणखी एका नैतिक स्वरूपाच्या समस्येचा उहापोह केला आहे. समकालीन व्यक्तीविषयक लिहिणे गैरसोयीचे असल्यास पर्याय कोणते तसेच पुननिर्मिती अशक्य असल्यामुळे विसंवादी व्यक्तींची भूमिकासुद्धा समजून घेण्याची गरज कशी आहे, शेवटी या चर्चेत फलित व आत्मचरित्र कशामुळे महान साहित्यकृती बनते याचे विवेचन आले आहे. कथा, कादंबरीसारख्या साहित्य प्रकाशन लेखकाचे अनुभव पर्यायाने आत्मचरित्र प्रतिबिंबीत होत असताना वेगळ्या आत्मचरित्राची गरज काय? यामुळे होणारी पुनरुक्ती किंवा त्रुटी या निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग कसा काढावा, साहित्यिक असूनही आत्मचरित्रे का फसतात याचा विचार साहित्यिकाने आत्मचरित्र लिहावे काय याच्या अनुषंगाने घेतली आहे. आत्मचरित्र आणि कादंबरी यातील साम्यस्थळे, भेद, दोघांच्या हेतूतील फरक, प्रकारातील फरक, दोघांत असलेले योगायोगाचे स्थान तसेच आत्मचरित्रात्मक कादंबरी या शब्दप्रयोगाचे दोन अर्थ, त्यातील निवेदन, नावाबद्दल घेतलेले स्वातंत्र्य, चरित्रात्मक कादंबरीची केलेली तुलना हे सर्व विवेचन आत्मचरित्र आणि कादंबरी या प्रकरणात येते. आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म या पुढच्या प्रकरणात असाहित्यिक व्यक्तींना मोलाचे मार्गदर्शन यादवांनी केले आहे. कच्च्या सामग्रीची संकलन, आत्मचरित्राचे हेतू, विषय या निश्चितता, त्याच्या अनुरोधाने घट प्रसंग यांची निवड गौणप्रधानता इ आवश्यकता आत्मचरित्र रेखीव घाट होण्यासाठी प्रतिपादली आहे. कलावंताना अलिप्ततेची गरज, संकुचित वृत्ती येणारी एकाग्रता, इतर .... जीवनहेतूकडे त्यामुळे होणारे दुर्लक्ष आयुष्यातल्या मोठ्या चुकांबाबत प्रांजळ मीमांसेची अभाव, त्यामुळे येणारा अप्रमाणिकपणा, गाजलेले आत्मचरित्रांची कारणे व त्यांचा ... अंतर्मुख वृत्तीने अनुभव व घडामोडी याचे येणारे जिवंतपण या सर्वांची दखल प्रकरणात घेतली आहे. आत्मचरित्र वाचनाने जीवनाला कशी समृद्धता, सुंदरता, उत्साहाची अनुभव मिळते याचे विवेचन केले आहे. आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार कसा आहे, चरित्राचा तो एक उपप्रकार कसा नाही यांचा शोध प्रकरणात घेतला आहे. मुखपृष्ठ अन्वर्थक, चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले आहे. एवढं सगळ्या विवेचनाला जर एखादे आत्मचरित्र घेऊन त्याची समीक्षा आनंद यादवांनी केली असती तर पूर्णत्व आले असते असे वाटते. एवढे सोडले अभ्यासकांना संग्राह्य, महाविद्यालयात वाचनालयात हे पुस्तक असणे आवश्यक आहे यावर दुमत नसावे. -गीता देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA

    आत्मचरित्राचे आत्मचरित्र… आत्मचरित्रमीमांसा हे आत्मचरित्रांचे आत्मचरित्र विशद करणारे आनंद यादव यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यास व विशेषत: आत्मचरित्र या साहित्यप्रकारात विशेष रुची ठेवणाऱ्या वाचकास एक देणगीस्वरूप ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहिण्यामागचाप्राथमिक हेतू यादवांनी आपल्या ‘आत्मगतात’ स्पष्ट केला आहे अन् तो म्हणजे सध्या आत्मचरित्रांचा विद्यापीठीय पातळीवर मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे. पदव्यांसाठी संशोधनात्मक लेखन केले जाते, परंतु कथा-कादंबरी या साहित्यप्रकारापेक्षा आत्मचरित्र. या साहित्यप्रकाराचा अभ्यास त्यामानाने खूपच विरळा अन् दुबळा वाटतो. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या अभ्यासाच्या वेगळेपणाच्या वाटा दाखविण्याचा किंवा नव्या दिशा शोधण्याचा कुणी जाणकार समीक्षकाने मन:पूर्वक प्रयत्न केलेला दिसत नाही. आनंद यादव हे स्वत: एक चांगले लेखक आहेत. झोंबी, नांगरणी, घरभिंती अन् काचवेल अशा चार भागांत वाचकांना दिले आहे. जवळजवळ १५-१६ वर्षांच्या प्रदीर्घ काळाचे चिंतन अन् मंथन यादव यांनी आपल्या या चार खंडांच्या आत्मचरित्रात संवेदनशील लेखनशैलीत मांडलेले आहे. स्वत:लाच सतत शोधीत राहण्याचा वास्तव आविष्कार म्हणजे आत्मचरित्र. कथा-कादंबऱ्यांचा ज्याप्रमाणे एक विशिष्ट वाचकवर्ग असतो तसा आत्मचरित्र या वाङ्मयाच्या वाचकांची संख्या कमी असेल, परंतु हा वाङ्मयप्रकार स्वातंत्र्योत्तर काळात अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. याचबरोबर आत्मचरित्राची मराठी साहित्यसृष्टीतील उपेक्षा पाहूनही यादव यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. ‘आत्मचरित्रमीमांसा’ या पुस्तकाची मांडणी, विशेषत: ‘मीमांसा’ या विषयाचा मूलाधार पकडून अनुक्रमाने तात्त्विक अन् सर्वांगीण चर्चा वाचकांना सूत्र रूपात मिळते, आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म आत्मचरित्र अन् इतर साहित्यप्रकार इत्यादीविषयी सविस्तर चर्चा या ग्रंथाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहे. असा होरा प्रकाशकाने केला आहे. प्रस्तुत ग्रंथ वाचल्यानंतर हा होरा मान्य करण्यास कुठलीच हरकत राहत नाही. स्वत:च स्वत:ला समजून घेण्याचा, स्वत:च स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करण्याचा आत्मचरित्र हा सामर्थ्यवान व अजोड साहित्यप्रकार आहे. आत्मचरित्राच्या वाचनामुळे समाजातील समसंवेदन जनांना जगायला, काहीतरी करायला आत्मस्पर्शी बळ निर्माण होते. कधी कधी हे आत्मबळ जीवनाच्या नव्या वाटा दाखवून जाते, तर कधी आपण जगतो आहोत त्या जीवनातही नवी ऊर्मी निर्माण होऊन जीवन आकलन होण्याची नवी खिडकी उघडते. अर्थातच अशा आत्मचरित्रात लेखकाची आत्मनिष्ठ प्रांजळ व प्रामाणिक असावी लागते, अशी टिपणी डॉ. यादव यांनी आत्मचरित्राच्या लेखनगुणाची मीमांसा करताना केली आहे. वर मी म्हटल्याप्रमाणे या ग्रंथाची सूत्रबद्ध मांडणी अशी आहे की, सुरुवातीसच ‘आत्मचरित्र’ या शब्दाची संकल्पना विस्तृतपणे सांगितली आहे तर त्यानंतर आत्मचरित्राची लेखनप्रेरणा जी आत्मप्रेम, आत्मशोध व आत्मपरीक्षणाद्वारे निर्माण होते याची मीमांसाही बऱ्याच दीर्घपणे केली आहे. पुढे या आत्मचरित्राचे प्रकार, चरित्रलेखनाचे विविध विषय व विषयानुरूप त्याच्या लेखनाची पूर्वतयारी व लेखनशैली याविषयी सांगून आत्मचरित्र का लिहावे अथवा का लिहिले जाते, आत्मचरित्र लेखनातील संभाव्य दोष कसे टाळावे, साहित्यिकाने आत्मचरित्र लिहावे का, आत्मचरिकाराचे लेखकीय गुणधर्म याविषयी अभ्यासपूर्ण खाणाखुणा मोठ्या खुबीने समजावून दिल्या. आहेत. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराची बांधेसूद चर्चा केल्यानंतर शेवटच्या एक दोन प्रकरणात एखादे आत्मचरित्र लोकप्रिय का होते किंवा वाचक अशा आत्मचरित्र वाचनाकडे का वळतो, मानवी जीवनाशी आणि अनुभवांशी संबंधित असलेल्या व स्वत:च्याच जीवनाचा अलिप्तपणे विचार व चिंतन करणाऱ्या या लेखनप्रकारची लोकप्रियता व वाचनीयता वाढीस कशी लागेल याबाबतही डॉ. यादवांमधील आत्मचरित्रकार लेखकाने मोठ्या खुबीने व अभ्यासपूर्ण वर्णनाने सांगितले आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे विविधरंगी मुखपृष्ठही ग्रंथशीर्षकाशी सुसंगत आहे. यादवांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नाने आता वाचकांसमोर असा पहिलावहिला ग्रंथ आला आहे. अशी प्रकाशकाची गर्वोक्तीही खरी ठरावी. आत्मचरित्राची मराठी साहित्यसृष्टीतील सर्वांगीण उपेक्षा अल्पशा प्रमाणात तरी कमी व्हावी म्हणून हा ग्रंथ मी लिहिला आहे. असे यादव प्रांजळपणे सांगतात, त्यांच्या या ग्रंथामुळे मराठी साहित्यातील आत्मचरित्राची तात्त्विक चर्चा गतिमान होवो, मराठी समीक्षकांनी केलेली या ग्रंथप्रकाराची उपेक्षा ही आनंद यादव यांच्या ‘आत्मचरित्रमीमांसा’ या ग्रंथामुळे थांबली नाही तरी प्रतिभा व काल्पनिक साहित्यप्रकारांच्या वाचनापेक्षा आत्मचरित्राचे वाचन अधिक प्रमाणात करणारा वाचकवर्ग वृद्धिंगत होवो. कारण या वृद्धीतच आत्मचरित्र या साहित्यप्रकाराची समृद्धी दडली आहे. यात दुमत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more