MANISH UGALE इंजिनिअर असलेल्या नायकाचं बोट पकडून आपण सौराष्ट्राच्या प्रवासाला निघतो. सागर किनाऱ्यावरच्या एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या मागासलेल्या प्रदेशात नायकाची नियुक्ती झालेली आहे. रासायनिक कारखाने उभे करण्यासाठी सरकारी जमिनींची मोजणी करायला तो आलाय. दूरवरच्याएका गजबजलेल्या शहरातून एकदम या वैराण प्रदेशात येऊन पडल्यावर तो काहीसा निराश आणि अस्वस्थ झाला आहे.
या भूमीत पाऊल टाकल्यापासून जसा अभावग्रस्त जीवनाला तो सामोरा जातो आहे, त्याच जोडीला त्याला भेटत आहेत ती इथली अनोळखी माणसावर सुद्धा जीवापाड प्रेम करणारी माणसं. ज्यांच्या घरात खायला दाना नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, आरोग्याच्या सोयी तर सोडाच पण होड्या, गाढवं आणि एखादा घोडा याशिवाय वाहतुकीची साधनं नाहीत अशी वंचित माणसं इतकी आनंदी आणि उदार मनाची कशी? हे पाहून नायक चकित होतो.
नायकाला रहाण्यासाठी आणि ऑफिस थाटण्यासाठी एक सरकारी हवेली मिळाली आहे. समुद्रकिनारी इतक्या उजाड परिसरात उभ्या असलेल्या या एकमेव वास्तूच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. हवेलीवर साहेबाला (नायकाला) मदत करण्यासाठी काही स्थानिक स्टाफ नेमलेला आहे.
अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेला नोकर सबूर, या वैराण प्रदेशात निगुतीनं वाढवलेल्या बाभळींवर आणि पक्ष्यांवर प्रेम करणारा जंगलअधिकारी नूरभाई, दर्यादेव येऊन राहतो त्या एका भेंसल्यावर की जिथे कोणीही जायची हिंमत करत नाही अशा ठिकाणी जाऊन येणारा शूर तांडेल किष्ना अशी काही इंटरेस्टिंग पात्रं साहेबाला या प्रदेशात भेटतात. सगळ्यात रोचक पात्रं आहेत ती म्हणजे बंगालीबाबा आणि अवल. किड्यामुंग्यांपासून समुद्रासोबत सुद्धा बोलू शकणारा बंगालीबाबा हा एक गूढ मनुष्य आहे. निसर्गाची भाषा त्याला अवगत आहे.
अवल ही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्त्री आहे, ती कोण आहे, हवेलीशी तिचा काय संबंध आहे हे जाणून घेणं फार रंजक आहे.
स्थानिक जीवनाशी जुळवून घेताना साहेब हळूहळू इथलाच एक होऊन जातो. या भूमीवर, समुद्रावर आणि माणसांवर त्याचा जीव जडतो. ही भावनाशीलता त्याला `नेमून दिलेलं काम करू नकोस` असा आंतरिक साद घालू लागते.
निसर्ग आणि मनुष्यजीवन यांचा सहसंबंध कथानकातून हळुवारपणे उलगडताना लेखकाने केलेलं सुरेख चिंतन या कादंबरीतून आढळतं. हे केवळ कथेसाठी कथा सांगणं नाही. घटनांतल्या `मधल्या` जागांतून जीवनाकडे बघण्याचा लेखकाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो.
काम पुढे नेऊ की राजीनामा देऊ या द्वंद्वात सापडलेला साहेब पुढे काय करतो? समुद्री वादळाबद्दल बंगालीबाबाने वर्तवलेल्या भाकिताचं पुढे काय होतं? साहेबाची गूढ भेंसल्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होते का?
कादंबरी वाचताना ही सारी रहस्ये उलगडत जातात.
बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर भव्य निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षा माणूसप्राणी बाळगून असतो. पण सर्वव्यापी, सर्वपोषी आणि सर्वनाशी क्षमता बाळगून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, त्याला समजून घेतल्यावर माणसाच्या वृत्तीत, विचारांत कसा बदल होत जातो याची ही गोष्ट आहे.
थोर गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या `समुद्रान्तिके` या गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचा अनुवाद अंजली नरवणे यांनी `सागरतीरी` नावाने केला आहे.
साहित्य अकादमी मिळण्यासारखं या कादंबरीत काय विशेष आहे हे ती वाचायला घेतल्यावर लगेचच लक्षात येतं.
ध्रुव भट्ट हे गुजरातीतले फार महत्त्वाचे लेखक आहेत. कथासूत्राला व्यक्तीकडून समष्टीकडे नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कथानक `प्रेडिक्टेबल` नसणं हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणखी गंमत तर यात आहे की ध्रुव भट्टांच्या कादंबरीतील नायकाचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि तरीही तो आपल्याला आपल्यातलाच एक वाटत राहतो.
आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी आणि जीवनाची भव्यता दाखवणारी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे.
- मनीषा उगले
(एका सन्मित्राने ध्रुव भट्ट यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली, त्याच्या ऋणात रहायला मला आवडेल.) ...Read more
Ranjeet Waghmare तस्करी, गोळीबार, खंडणी, एन्काऊंटर आणि बरंच काही...
--------
मुंबईच्या डोंगरी भागातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, पोलिसांचा वापर करून मुंबईत दादागिरी करतो. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कैक दोन नंबर धंदे, अनेक वस्तूंची तस्करी करतो. मुंबई पोलिसांकरव (एन्काऊंटर च्या माध्यमातून) विरोधकांना संपवतो. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट अन मुंबईतून दुबईला पलायन, पाकिस्तानात आश्रय आणि शेवटी मुंबई पोलीसच त्याच्या मागावर. असा थक्क करणारा प्रवास म्हणजे लेखक एस. हुसैन झैदी यांचं `डोंगरी टू दुबई` हे दाऊद वरील पुस्तक.
या पुस्तकामध्ये `दाऊद`ला डॉन करण्यापर्यंत छोटा राजन, छोटा शकील व त्याचे मित्र, मद्रासी गुंडांच्या व पठाणांच्या टोळ्या, दाऊद-गवळी यांच्या गॅंग मधील टोकाची दुश्मनी, हाजी मस्तानची दहशत, 1960 साली दारूच्या धंद्यातून वर्षाला 12 कोटी रुपये कमावणारा वरदराजन, तर बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांची BRA ही टोळी. मन्या सुर्वे, करीम लाला अशा अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये कधी दोस्ती तर जास्त करून दुश्मनी. विरोधकांवर गोळीबार, खून हे नित्याचेच. `खून का बदला खून` हे सूत्र ठरलेले. कहर म्हणजे भर दिवसा हायकोर्ट व तुरुंगात जाऊन विरोधकांवर गोळीबार करून बदला घेणे. तर वेळप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गुंडांचे देशो-देशी पलायन. खंडणीसाठी उद्योजक, बिल्डर, बॉलिवूडकरांना धमक्या, अपहरण. वेळप्रसंगी खून हे या जगातील उठाठेवी. या सर्वांचा निपटारा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून एखाद्या गुंडाचा नियोजित पद्धतीने एन्काऊंटर करणे (थोडक्यात पोलिसांकडूनही खुनच) असे हे `याच जगातील वेगळे जग` `डोंगरी ते दुबई` या पुस्तकात डोकावल्यास समजू शकते. एका वेगळ्या व फिल्मी स्टाईल परंतु सत्य अशा जगाचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. सर्वकाही ईथे सांगणे योग्य नाही, बाकी वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचून बघावे. ...Read more