- Avinash Pandit
हे पुस्तक २००६ साली मी संपादित केले. १४०० पानांचे हस्तलिखित होते. त्यातील त्यावेळी न्यायप्रविष्ट असलेला भाग, अशिष्ट भाषा, व्यक्तींची नांवे, भडक प्रसंग वगळून मी ते २५० पानांपर्यंत आणले. मला ज्या ठिकाणी शंका होत्या त्याचे निरसन वर्षाने योग्य ठिकाणी चौकशी करून केले. वर्षाने उत्तम प्रास्ताविक लिहिले.
टाईम्स हाऊसमध्ये झालेल्या प्रकाशन समारंभात या पुस्तकाचे चूक कोणाची इ. न सांगता वक्त्यांनी योग्य मूल्यमापन केले. माझ्याकरता सांगायचे तर एक दाहक सामाजिक समस्या सांंगणारा दस्तऐवज प्रकाशित करण्यात माझा खारीचा वाटा होता.
मी हस्तलिखित वाचायला सुरुवात केली तेव्हा तो शिव्यांचा शब्दकोश आहे, कामसूत्र आहे की बारबालेची गोष्ट आहे तेच कळेना. पत्नीच्या सूचनेवरून काळा मार्कर आणून बरबटलेला मजकूर काळा केला जेणे करून तो वाचता येणार नाही. सुनील मेहतांनी मला संपादन करायला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.
पुस्तक वाचल्यावर वैशालीने आपण चुकलो हे कबूल केले. जवळजवळ ३० बारबालांनी आमचे पुस्तक तुम्ही करा असा आग्रह धरला. संवेदनशील विषय कसा हाताळायचा हे मी शिकलो. माझ्या या प्लस पॉईंट्समध्ये भर पडली म्हणजे या विषयावरील वर्षाच्या व्याख्यानावेळी वहिनी, भावजी आणि पैठणी यात रमणारे कार्यक्रम सोडून व्याख्यानाला मोठ्या संख्येने आले.
- Suhas Birhade
बारबालेचं आत्मचरित्र- बारच्या झगमगाटीमागील धगधगीत वास्तव
``कुणी स्वखुशीने वेश्याव्यवसाय किंवा बारबाला बनत नाही`` हे आपण नेहमी ऐकतो. मग असं काय घडतं की मुली या अनैतिक व्यवसायाकडे वळतात. या प्रश्नाचे उत्तर खुद्द बारबाला असलेल्या वैशाली हळदणकरच्या आत्मचरित्रातील मिळतं आणि बारच्या झगमगाटामागिल विदारक वास्तव उघड होतं. कलावंत वडील, अभिजन वर्गातील आई अशी पार्श्वभूमी असलेली मुलगी का बारबाला बनते, काय आय़ुष्यात घडतं ते पुस्तकात वाचायला मिळतं. अविश्वसनीय वाटावे असे प्रसंग एकामोगामाग एक उलगडत जातात. सिंगर पासून नबारबाला ते फ्री सर्व्हिस असा वैशालीचा प्रवास तिने प्रामाणिकपणे आणि उलगडला आहे. बारबालांवर अनेक सिनेमे, पुस्तकं आहेत. परंतु बारबालेचं आत्मचरित्र दुर्मिळच.
बारबालांच जीवन कसं असतं, त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं ते आत्मचरित्रातून कळतं. बारसंस्कृतीची इत्यंभूत माहितीही वाचकांना होते. वैशाली हळदणकराचं आयुष्य शोकांतिकाच. आत्मचरित्रात अनेक गोष्टी दडवलेल्या असतात. परंतु वैशालीने अगदी बेधडक सर्व काही लिहिलंय. पुरूषी मानसिकता, ढोंगी समाज दिसून येतो. अनेकदा अंगावर काटा यावा असे हे प्रसंग वाचायला मिळतात. मुंबईसह परदेशातील डान्सबार मध्ये वैशालीने काम केलं. तिच्या आय़ुष्यात आलेले पुरूष, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार याची तिने कसलीही भीडभाड न बाळगता माहिती दिलेली आहे. वैशालीचं आत्मचरित्र तिचं असलं तरी ते बारबालांच्या जीवनावचा पट प्रातिनिधिक स्वरूपात उलगडतो.
बारबालांची संघटना बांधणाऱ्या वर्षा काळे यांनी वैशालीला आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि एक माहितीपुर्ण दस्तावेज पुस्तकाच्या रुपात वाचकांना उपलब्ध झाला आहे.
- Manisha Rohit Joshi
Khup sundar pustak ahe.. Must read..
- Atmaram Godbole
वेगळ्या विश्वाची ओळख ...
- DAINIK LOKMAT
ती आहे बारबाला. तिचं नाव वैशाली हळदणकर. ‘बारबाला’ हे तिचं आत्मकथन नुकतंच प्रकाशित झालं आहे. मुंबईमधल्या दीडशे बारमधले अनुभव गाठीला बांधून ती वयाच्या चाळिशीला येऊन टेकली आहे. अर्थातच तिला अजूनही विसावा नाही. स्थैर्य नाही. पण बारबाला संघटनेच्या संपर्कात आल्यामुळे या अनुभवविश्वाचा दरवाजा वाचकांसमोर उघडला गेला आहे.
ती बारबाला आहे म्हणजे नक्की काय करते? गाते? नाचते की वेश्या व्यवसाय करते? खरं तर या तिन्ही गोष्टी एकच नाहीत. ही ओळखही या आत्मकथनाचा एक प्रमुख भाग आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकार डान्स बार बंद करायला निघालं तेव्हा एकीकडे या हॉटेलातून नाचणाऱ्या मुली तब्बल २२ दिवस आंदोलनात उतरल्या. आझाद मैदानात पंधरा वीस हजार जणी जमल्या. चॅनल्सच्या कॅमेऱ्यात बंद होताना बऱ्याच जणींनी दुपट्ट्यांनी स्वत:चा चेहराही लपवला. तेव्हा विचारांची वादळंही उठली. अनेक टीकांचे बाण त्यांच्यावर बरसले. सिनेमा स्टाइल नाचून, ‘आयटेम’ दाखवून श्रीमंत पुरुषांना लुभावतात. दोन नंबरच्या धंदेवाल्यांच्या आश्रयानं त्या गडगंज श्रीमंत होतात, असा एकूण सूर होता; पण काहीजण आणि काही स्त्री संघटना म्हणत होत्या, डान्स बार बंद झाले तर त्या वेश्या व्यवसायात ढकलल्या जातील, आणि अजूनच उद्ध्वस्त होतील.
आज डान्स बारवर बंदी आहे. वैशालीचा प्रवास बारमध्ये गाणं म्हणण्यापासून सुरू होतो. तसं तर हे आत्मवृत्त म्हणजे शहरी भागातील रोजचं जीवन सुरळीतपणे जगायचं कसं या प्रश्नात गुदमणाऱ्या हजारो स्त्रियांच्या व्यथा घेऊन उभं राहत. ती दलित समाजातल्या गायक वडिलांची आणि ब्राह्मण समाजातल्या आईची मुलगी आहे. वडील शास्त्रीय संगीत शिकवायचे; पण आईवडिलांचा प्रपंच सुरळीत तर नव्हताच. हिच्या वाट्याला मुलगी म्हणून आणि इतर कारणाने हेटाळणी आणि मार खाणं आलं. लहानपणापासून प्रेम न मिळाल्याची एक विषण्ण जाणीव तिला वेगळ्याच समस्यांमध्ये ढकलत गेली. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी एका माणसाने तिच्याशी संबंध केला. तिथूनच तिच्या शारीरिक आणि मानसिक यातनांचा प्रारंभ झाला. अर्धवट राहिलेलं शिक्षण, आईचं घर सोडून निघून जाणं आणि हिंच एकटेपण! मग त्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे प्रेम करण्याचा. लग्नाआधीच गर्भारपण. मग लग्न. मुलं. जगण्याचे वाढणारे असंख्य प्रश्न. त्यातच नवऱ्यानं संशय घेणं आणि छळणं सुरूच. खरं तर तिनं प्रपंच रेटण्यासाठी वेगवेगळी कष्टाची कामं केली. बालवाडी शिक्षिका होण्याचा प्रयत्न. मोलकरीण म्हणून काम. पण कशातूनच संसार सावरता येत नाही हे लक्षात आल्यावर बारमध्ये गाण्याचं काम मिळवून नशीब अजमवायचा तिचा जाणीवपूर्वक निर्णय झाला. हा निर्णय घेताना स्वत:ला कलाकार म्हणून जिवंत ठेवण्याची आकांक्षा. पण बारमध्ये सिनेमातली गाणी म्हणणंही तिच्यासाठी आव्हानच होतं. गाण्यांचा स्टॉक पाहिजे. तालाचं ज्ञान पाहिजे. शब्दोच्चारण नीट पाहिजे. आणि या सगळ्यासाठी तयारीला किमान रेडिओ तरी पाहिजे. स्वास्थ्य पाहिजे. वेळ पाहिजे. या सगळ्याचीच वानवा होती.
ती काम शोधत फिरत होती. हा बार तो बार अशी या उलाढातील तिचे वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध येत गेले या सगळ्या संबंधाचा अर्थ लावण्याचा तिने केलेला प्रयत्न हेही तिच्या कहाणीतलं वैशिष्ट्य आहे.
यात अखेरचा बार आहे, मानसिक व्याधी असलेल्या पोटच्या पोराकडून झालेल्या बलात्काराचा. मानवी संबंधांच एक टोकाचं वास्तवदर्शी कथन त्यात आहे. अभ्यास करणाऱ्यांना आव्हान देणारे अनेक पैलू त्यात सापडतात. स्त्री-पुरुष संबंधातल्या लैंगिक संबंधाबाबत असंख्य गैरसमजुती आणि दडपणं समाजात आहेत. हे संबंध मानवाच्या अगदी मूलभूत संबधांपैकी आहेत. इतिहासाचार्य राजवाडे यांनी विवाह संस्थेचा इतिहास लिहिला आणि सांगितलं. आई, वडील, मुलगा, मुलगी अशी नातीच माहित नसलेला समाज होता. सरमिसळ लैंगिक संबंध होते. सांस्कृतिक विकासाबरोबर समाज बदलत गेला. स्त्री-पुरुष संबंधही बदलले; पण अजूनही ते संपन्न होण्याचे रस्ते का तयार झालेले नाहीत? शिक्षण आणि मूलभूत गरजा यापासून वंचित असणाऱ्यांच्या वाट्याला या संबंधांचा केवळ दाहच का यावा? हे उत्तर शोधणं एक आव्हान आहे.
वैशालीच्या या आत्मकथनामुळे स्त्री-पुरुष आणि इतरही मानवी नात्यांच्या अनेक आव्हानात्मक छटा आपल्या समोर उभ्या ठाकतात. म्हणूनच काही तरी सनसनाटी वाचायला मिळेल. या नजरेतून या पुस्तकाकडे बघितलं तर चूक ठरेल. हे सगळं लिहिताना वैशालीला जीवघेणा मानसिक त्रास झाला. पण तरी तिने बाराशे पानं लिहिली. बारबाला संघटनेच्या वर्षा काळे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने त्याला योग्य आकारात आणतं. वर्षानं पुस्तकाच्या प्रास्ताविकात या प्रश्नाचे बरेच पैलू चांगल्या रीतीनं स्पष्ट केले आहेत. दुहेरी नीतिमत्तेत जगणाऱ्या आजच्या समाजाला हे पुस्तक आव्हान देतं.
-मुक्ता मनोहर
- DAINIK LOKSATTA 01-06-2008
दोन-अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक सामाजिक वादळ उठले होते. तथाकथित पांढरपेशा आणि मध्यमवर्गाला आपल्या नादाला लावून त्यांना आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणाऱ्या ‘बारबाला’ संस्कृतीवर बंधने आणण्याची जोरदार मागणी झाली आणि आरोप प्रत्यारोपांच्या उडालेल्या राळेतून राज्य सरकारने ‘बारबंदी’ विधेयक आणले. चर्चा बरीच झाली आणि त्याच वेगाने ते सगळे शांतही झाले. पण बारमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य नेमके कसे असते, त्यांचे शोषण नेमके कोण करते हेच कोणी जाणून घेतले नाही. जाणवली ती शितावरून भाताची परीक्षा’ करणारी सामाजिक मनवादी मानसिकता! तरन्नूम खान या बारबालेचे ऐशआरामी जीवन सगळ्याच बारबालांचे म्हणजे बारमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे असते, आणि त्या सगळ्याच वाईट चालीच्या असतात असे समजून त्यांच्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या याच तथाकथित पांढरपेशांनी चेहऱ्यावर ओढलेल्या ‘आम्ही नाही त्यातले’ संस्कृतीचा बुरखा टराटरा फाडून टाकणाऱ्या कहाण्या याच काळात प्रसिद्ध झाल्या. पण या कहाण्या कपोलकल्पित आहेत, असे सांगून नामानिराळे होणाऱ्यांना या बारसंस्कृतीमधील महत्त्वाचे अंग असणाऱ्या ऑर्केस्ट्राची अंधारी दुनिया आणि त्यात गाणाऱ्या गायिकांचे होणारे शोषण कळलेच नाही. त्यांना झगमगत्या रंगीत प्रकाशात अंगविक्षेप करणाऱ्या स्त्रियांची उघडी अंगे लक्षात राहिली पण अंधारात त्यांच्या होणाऱ्या अत्याचारांनी त्यांची मने कशी मेली हे कधी समजलेच नाही.
बार संस्कृतीतल्या ऑर्केस्ट्रामध्ये (वाद्यवृंद) गाणाऱ्या वैशाली हळदणकर या मराठमोळ्या मुलीने याच अंधारातल्या अत्याचारांची कहाणी उघड केली आहे. मात्र तिने घेतलेला अनुभव सगळ्याच मुलींना आला आहे, असे नाही. तरी बहुसंख्य मुलींनी तो अनुभव कमी-अधिक प्रमाणात घेतला आहे. दादरमध्ये चालणाऱ्या एका शास्त्रीय संगीत शिकविणाऱ्या क्लासचे संचालक असलेल्या आणि अनेक नावाजलेल्या (यात अनिल मोहिलेंचाही समावेश आहे.) संगीत दिग्दर्शकांचे मित्र असलेल्या एका संगीत शिक्षकाच्या एकुलत्या एका मुलीची-वैशालीची-ही कहाणी आहे. तिच्या आयुष्याचे निघालेले धिंडवडे म्हणजे वैशाली हळदणकरचे आतापर्यंतचे आयुष्य! दादरला मराठी मध्यमवर्गीय तथाकथित सुसंस्कृत वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चाळीत राहत असताना वयाच्या पाचव्या वर्षी नकळत्या वयात पोटाची भूक भागविण्यासाठी, शेजारच्या काकांनी आपली कामवासना भागविण्यासाठी वैशालीचा प्रथम उपभोग घेतला. आई-वडील असूनही त्यांच्या प्रेमाला पारखी झाल्याने आजूबाजूच्या मंडळींकडून निस्वार्थी प्रेम मिळेल म्हणून वैशाली भटकली. अशा प्रेमाच्या मृगजळापाठी धावताना होणाऱ्या अत्याचारांनी घायाळ होत तिने मन मारले. कधीतरी आपली स्वप्ने पूर्ण होतील म्हणून विश्वासातल्या मंडळींनीही केलेला अमानुष मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत, पोटाची खळगी भरण्यासाठी वैशाली ‘हॉटेल टू हॉटेल’ भटकली. याच प्रवासात भेटलेली वेगवेगळ्या स्तरातील मंडळी, सहकारी यांचा अनुभव घेतलेली वैशाली म्हणजे समाजात पांढरपेशांकडून होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक अत्याचाराच्या बळींचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हरकत नाही. आपला पाय घसरला पण नंतर आपल्या अगतिकेचा फायदा कसा आणि कोणी कोणी घेतला याचे खुले आम वर्णन, त्या व्यक्तींच्या नावासह तर कधी त्या व्यक्तींच्या वर्णनासह वैशालीने या पुस्तकात केले आहे.
वैशाली सारख्या अनेक मराठी, उच्चशिक्षित मुली बारमधल्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणी म्हणतात. वेटरचे काम करतात आणि काहीजणी तर उत्तम नृत्याविष्कारही सादर करतात. त्यातील काहीजणी अधिक पैशाच्या लालसेपोटी शरीरविक्रयही करतात पण म्हणून सगळ्याच तशा असतात, असे म्हणणे चुकीचे आहे. वैशालीने आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना तिला आलेले अनुभव खुलेआम लिहिले आहेत. त्यामुळे ‘बार ऑर्केस्ट्रा’ म्हणजे तद्दन वाईट असे म्हणता येणार नाही. वैशालीने काही कलावंतांची नावे दिली आहेत, जी मंडळी सध्या नामवंत म्हणून गाजत आहेत. या वाद्यवृदांमध्ये या व्यक्तींनी आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. करत आहेत आणि तेथे होणाऱ्या दौलतजाद्याने आपल्या संसाराची मीठभाकर जोडत आहेत. फरक इतकाच असतो की काहीजण किंवा काहीजणी वैशाली सारखे आपले आयुष्य उधळून टाकत नाहीत. घरातल्यांकडून योग्य वयात योग्य प्रेम, जिव्हाळा मिळाला असता तर कदाचित् वैशाली हळदणकरचे आयुष्य पार बदलून गेले असते आणि ती एखादी सर्वसामान्य गृहिणी झाली असती किंवा एखाद्या गाण्याचया स्पर्धेत महागायिकाही झाली असती. पण तसे झाले नाही. वैशालीसारख्या आणखीही काहीजणींची वाट चुकली असेल, पण म्हणून बारमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच वाईट चालींच्या म्हणत नाके मुरडणाऱ्या संस्कृतीच्या रक्षकांनी याच स्त्रियांवर होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अत्याचारांच्या वेळी कधी मदतीचा हात पुढे केला नाही. हात पुढे केला असेल तर तो केवळ त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठीच!
वैशालीने तिच्या आयुष्यात घडलेल्या बहुतेक घटना या पुस्तकात लिहिल्या आहेत. नोकरीचे आमीष दाखवून, तिच्या भोळेपणाचा फायदा उठविणाऱ्यांमध्ये समाजात सोज्वळतेचा आव आणणारे अनेकजण होते. मराठी आणि हिंदी नाट्य सिनेसृष्टीत काम करणारे कलावंतही वैशालीशी संबंध ठेऊन होते आणि अनेकांनी तिच्याशी अनेक प्रकारचे व्यवहार केले आहेत. लैंगिक अत्याचारांना आणि सांसारिक कटकटींना कंटाळलेल्या वैशालीने ओशे रजनीशांची विचारसरणी जवळ केली; पण ओशो अनुयायांचाही तोच अनुभव तिला आला. वैशालीचे लैंगिक शोषण करणाऱ्यांमध्ये केवळ तिचे मित्र, सहकारी, मैत्रिणी, घरची मंडळीच नव्हती तर तिचा स्वत:चा मोठा मुलगा देखील होता. हे वाचताना तिच्यावरील अत्याचारांनी सीमा पार केल्याचे लक्षात येते. या सगळ्यांना पुरुन उरत वैशालीने परदेशवारी केली. आज स्वत:चे शिक्षण पूर्ण करीत वेगळ्या वाटेने सन्मानाने जगण्यासाठीची तिची धडपड सुरू आहे.
मात्र तिच्यासारखेच या क्षेत्रातील सर्वांचे आयुष्य असेल असे नाही. काहीजणींचे आयुष्य यापेक्षा वाईट असेल तर काहीजणींचे चांगले असेल. काहीजणींवर हे आयुष्य लादले गेले असेल तर काही राजीखुशीने या प्रांतात आल्या असतील. बारबालांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या वर्षा काळे यांची या पुस्तकाला असलेली प्रस्तावना ‘बारसंस्कृती आणि झापडबंद शासकीय धोरण’ यावर नेमका प्रकाशझोत टाकणारी आहे. वैशालीचे आत्मचरित्र वाचताना कुठेही अश्लीलता जाणवत नाही. पण त्याचवेळी तिच्याविषयी सहानुभूतीही वाटत नाही. ‘हमामखाने में हर एक नंगा होता है’ अशा अविर्भावात लिहिलेले हे आत्मचरित्र विचार करायला लावते. आपण योग्यच वागलो असा दावाही वैशालीने केलेला नाही. या व्यवसायातून बाहेर पडण्याचा तिचा प्रयत्न पुरुषप्रधान संस्कृतीने हाणून पाडला असला तरी ती हरलेली नाही. शिक्षण पूर्ण करीत तिला आता नव्याने आयुष्य सुरू करायचे आहे. बारमधील ऑर्केस्ट्रा हा व्यवसाय बदनाम आहे, असे सांगून त्या व्यवसायातील महिलांवर चिखलफेक करणाऱ्या तथाकथित संस्कृतिरक्षकांचा पांढरपेशा बुरखा फाडून टाकताना हे शेवटी सगळे ‘स्त्री ही भोगवस्तू आहे,’ याच दृष्टीने पाहतात, हे पुस्तक वाचताना जाणवत राहते. वैशालीसारख्या अनेकजणी अशा अत्याचारांना बळी पडल्या आहेत, पडत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी समाजाचीच दृष्टी बदलण्याची गरज आहे, हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहते.