- सई (पुस्तकप्रेमी समूह)
ही कथा ज्या स्त्रीभोवती गुंफली आहे, तिला आयुष्याच्या एका टप्प्यावर गुन्हेगार ठरवलं जातं आणि काही वर्षे तुरूंगात काढावी लागतात.
तुरूंग ही जागा तिला “माणूस” म्हणून समृद्ध बनवते . एक महिला संघटना तिच्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून निकाला चा पुनर्विचार कोर्टाला करायला भाग पाडते व तिची या जीवघेण्या जगातून मुक्तता करते ,, ज्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला गवसतो.
हा झाला सर्वसाधारण गोषवारा.
पण हे पार पडताना तिला युगं लोटल्यासारखी वाटली असतील.
राहिल गुप्ता ने तिची मुलाखत घेतली आहे , तिला सांभाळून घेत, तिला अधिक त्रास न देता.
सुरूवातीला मुलाखत देताना ही काही तपशील तिला कमीजास्त आठवत होते. काही दुःखदायक होते, काही खाजगी , न सांगण्यासारखे होते.
पण हळूहळू सगळ्याला सरावत जात , मोकळं होत ती खुलेपणाने बोलू लागते.
एक सर्वसाधारण भारतीय संस्कारी घरात जन्माला आलेली मुलगी किशोरावस्थेत तिच्या आईवडिलांना अंतरते.
आपल्या भावांच्या प्रेमाच्या छायेत वाढलेली, सुखाच्या राशीत लोळलेली “किरणजीत“ लग्नायोग्य झाल्यावर भावांच्या चिंतेचे कारण बनते.
तिला लग्नापेक्षा शिक्षणात रूची असते. तिचं कोणी ऐकत नाही. ती तिच्या भावाकडे जाते तिथे दिपक तिला पहायला येतो.
आपल्या व्यक्तिमत्वाने व मधाळ बोलण्याने तो सर्वांची मने जिंकतो . अखेर ‘हो नाही ‘करत त्यांचे लग्न पार पडते.
दिपक , त्याची प्रतिमा, त्याचे घर , त्याची माणसे या सगळ्या चित्राला लवकरच मोठे खिंडार पडते ,, तिच्या सगळ्या स्वप्नांची माती होते. अपेक्षा धुळीला मिळतात.
दिपक खूपच unpredictable असतो. त्याचा मूड कधी बदलेल, नूर कधी पालटेल, रागाचा पारा कधी चढेलउतरेल,, स्वतःच्याच माणसांना तो कधी चांगलं म्हणेल, त्यांना कधी वाईट बोलेल.
त्याच्या घरची माणसेही किरण ला कधी चांगलं म्हणतील, वाईट बोलतील,, सगळंच अवघड आणि विचित्र होऊन बसलेलं होतं.
किरण आशेवर दिवस ढकलत होती. लग्न जुनं होऊ लागलं तसं परिस्थिती गंभीर होत होती.
जबरदस्तीने तिच्यावर दोन बाळंतपणं लादली गेली.
दिपक चा राग अत्याचारांत बदलू लागला होता.
तिला ढकलणे, मारणे, केस पकडणे , गालांवर मारणे हे सामान्य होतं .
पैशांच्या तंगीमुळे, वाढत्या गरजा भागवण्यासाठी किरण बाहेर पडू लागली, थोडेफार पैसे मिळवू लागली ,,, तसं घरी पैसे कमी देणे, बाहेरख्यालीपणा करणं दिपकचं सुरू झालं .
ती खूप सोसते, सहन करते , त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. दोन दिवस नीट वागून परत “ये रे माझ्या मागल्या” .
ती भारताच्या एका ट्रीपमधे इंग्लंडला सासरी न जाण्याचं ठरवते ,,, पण तिच्या माहेरकडची मंडळी तिला समजावून , दिपकला धमकावून परत पाठवतात.
एका भांडणात तो तिला इस्त्रीचा चटका देतो चेहरयावर आणि ती प्रक्षुब्ध होऊन उठते.
शेवटी ते पाऊल ती उचलते .
आणि
सगळं संपतं
तिला
नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते.
बाहेरच्या जगात लेक नावे ठेवत असले तरी तुरूंगात तिला सगळे आधार देतात. तू याआधीच असं करायला पाहिजे होतं असं म्हणतात.
तिला रीतसर एक वकील मिळते जी तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण किरण कोर्टात लाजेमुळं साक्ष देत नाही.
जन्मठेपेची शिक्षा होते. किरणचा जीव मुलांसाठी तुटत असतो.
तिचे बहीणभाऊ ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.
प्रग्ना पटेल , साउथ हॅाल सिस्टर्सतर्फे ( एशियन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे) तिच्या आयुष्यात आशेचा किरण बनून येते. खूप धडपड, खटपट करून ती तिची केस तयार करते.
इकडे तुरूंगात तिची खास मैत्रीण झालेली सारा तिला प्रथितयश वकील मिळवून देते.
प्रग्ना तिच्यासाठी जनजागृती करून तिच्या कहाणीला लोकचळवळीचं स्वरूप देते.
तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो. आधीच्या ज्युरींना तिची केस नीट कळवली च गेली नाही.
असा प्रसार होतो.
तेव्हा कायद्यात ;मानसिक छळ होऊन,, विचारस्थिती कमकुवत होऊन केला गेलेला एखादा गुन्हा यासंदर्भात तरतूदच नव्हती.
पण शेवटच्या सुनावणीत तिची सुटका होते आणि ते जिंकतात.
एका हरलेल्या दुःखाच्या क्षणी तिनं सगळं कसं घडवून आणलं हे सांगितलं गेलंय,,,,
शेवटी मुलांसोबत ती राहू लागते.
खूप अंगांनी विचार करायला लावणारे पुस्तक आहे.
तिच्या विचारांची आंदोलनं, कायद्याचे तपशील, घटनांचा क्रम, पात्रांची मांडणी इतकी खोलात जाऊन केलीय
की त्याला तोड नाही.
“प्रोव्होक्ड” हा ऐश्वर्या राय अभिनित चित्रपट यावर बनवलाय
पुस्तक हिमनग आहे
आणि
हा परिचय तसेच चित्रपटसुद्धा हिमनगाचे टोक आहे.
“तुला शिकविन चांगलाच धडा तुझ्या पापांचा भरलाय घडा”” असं म्हणून किरणने जे त्याचे दहन केले , तेव्हा तिला वाटलं पण नसेल कि ती जगप्रसिद्ध होईल आणि ब्रिटिश कायद्यातल्या तरतुदी बदलण्याचं काम करेल.
कितीतरी जणींना त्यानंतर तिने प्रेरणा दिलीय.
तिची मुलं सुस्थितीत आहेत.
तिचं सर्कल ॲाफ लाईट पूर्ण झालंय.
सर्वांचे आभार!!
- Vaibhav Salunke
कहाणी महिषासुरमर्दिनीची...
काही वर्षांपूर्वी(२००७) ‘प्रोव्हेक्ड’ Provoked नावाचा एक सिनेमा येऊन गेला. ऐश्वर्या रॉयने यात प्रमुख भूमिका केली होती. कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची दखल घेतली गेली. असं काय होतं या चित्रपटात? मला टिव्हीवर हा सिनेमा बघायला मिळाला.
एक भारतीय सुशिक्षित मुलगी जिच्या डोळ्यात लग्नाची, संसाराची अनेक स्वप्ने असतात; ती परदेशात नातेवाईकांकडे जाते काय, तिथलंच एक स्थळ तिच्यासाठी येऊन लग्न पार पडतं काय आणि तिचा संसार सुरू होतो काय? सगळंच कल्पनेतलं वाटावं पण वास्तव. या वास्तवाशी तिचा सामाना होतो तोच नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा अनुभव घेत. सासू-सासरे, दीर-नणंद, नवरा अशा एकत्र पद्धतीच्या कुटुंबात ती दाखल होते. नववधूला त्या अनुभवातून, परीक्षेतून जावे लागते. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रसंग किरणच्या आयुष्यात येतात. नवऱ्याचा सततचा आक्रमक पवित्रा, आरडाओरड, आक्रस्ताळेपणा करण्याचा स्वभाव, हतबल सासू-सासरे, पदरी दोन मुलं असं सगळं किरण सहन करत होती. तिच्यावरचे अन्याय करणारे प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा वर्षं किरण आज ना उद्या चांगले बदल होतील या आशेवर छळाचे विष पचवत राहिली. जेव्हा नवऱ्याचे शंभर अपराध भरले शिशुपालांसारखे किरणने त्याला यमसदनी पाठवले. त्याचीच गोष्ट ‘प्रोव्हेक्ड’ मध्ये होती. किरणजीत अहलूवालिया या पंजाबी स्त्रीने सोसलेले चटके या ‘सर्कल ऑफ लाईट’ मधून तुम्हाला वाचायला मिळतील. काही स्त्रियांना पुरुषांकडून अनन्वित छळ सहन करावा लागतो. त्यांच्या सहनशक्तीनुसार त्या सहन करतात. मात्र, कधीतरी तिलासुद्धा रणचंडिकेचा अवतार धारन करावा लागतो. किरणजीतच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना तिची बाजू पटते आणि तिने नवऱ्याला निजधामाला पाठवले यात तिचं काहीही चुकलेलं नाही, हे पुन्हा सिद्ध होते. किरणजीतवर खटला चालतो, तिला तुरुंगवासात रहावे लागते; परंतु तिच्या वकिलांनी, मैत्रिणींनी तिच्यावरचा अन्याय जगासमोर आणला. जनमत किरणजीतच्या बाजूने झुकते.किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा! भारतातल्या एका सधन कुटुंबात जन्मलेली किरणजीत अहलुवालिया विशेष परिचित नसलेल्या माणसाशी विवाह करण्यास म्हणून १९७९ मध्ये इंग्लंडला आली. ती एक हसरी, खेळकर आणि आशावादी स्वभावाची, सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती; परंतु लग्न झाल्याच्या दिवशीच तिच्या लक्षात आलं होतं की कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं होतं. पुढचा दहा वर्षांचा काळ म्हणजे क्रूर पतीकडून सतत होणारी शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ असा एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होता. ती कोणालाही मदतीसाठी विनवू शकत नव्हती. कारण ब्रिटनमधल्या आशियाई वंशाच्या बहुतेक स्त्रिया, कौटुंबिक आणि वैवाहिक अत्याचार हा विषय चर्चिला जाणं, हे निषिद्ध मानतात. घराची इज्जत, अब्रू, घराण्याचं नाव यालाच प्रमुख महत्त्व दिलं जातं. अनन्वीत छळामुळे आणि अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या, सहनशक्तीची सीमा संपलेल्या किरणजीतनं तिला जगणं नकोसं करून सोडणाऱ्या नवऱ्याला १९८९ मध्ये शेवटी मारून टाकलं. खटल्याच्या कामकाजातलं तिला विशेष असं काही समजायचं नाही. अखेरीस खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ‘साऊथहॉल ब्लॅक सिस्टर्स’ या बेताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संघटनेने चळवळ सुरू करून तिच्या खटल्याच्या कामातील त्रुटी आणि उणिवा जनतेसमोर आणल्या. तिच्या खटल्याने देशभराचं लक्ष वेधून घेतलं आणि शेवटी १९९२ मध्ये तिची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर किरणजीत एकदा प्रिन्सेस ऑफ वेल्स (राजकुमारी डायना) ला भेटली. तेव्हा तिने किरणला तिच्या जीवनातल्या अनुभवांवर पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केलं. ‘सर्कल ऑफ लाईट’ हेच ते पुस्तक! सद्य परिस्थितीमधलं एका वादग्रस्त आणि ज्वलंत विषयाच्या स्वानुभवाचे बोल म्हणजे हे पुस्तक होय. किरणजीत अहलुवालियाचा हा खटला खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण असून, ब्रिटनमध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील लपलेलं भयानक सत्य त्यामुळे उघड झालं आहे.
- Sandeep Chavan
मी वाचले हे पुस्तक
कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण आहे
काही लोक देश सोडून परदेशात गेले तरी त्यांची रूढी परंपरावादी भारतीय मानसिकता सहजासहजी बदलत नाही हे या घटनेतून दिसते
- Eknath Marathe
सधन कुटुंबात वाढलेली, शिकलेली किरण लंडन मध्ये जातीतल्या तरुणाशी साग्रसंगीत विवाह करते. लग्न झाल्यावर तिचा नवरा , दीपक आपला मूळ रंग दाखवतो. सतत 10 वर्षे तिचा तो सर्व प्रकारे अनन्वित छळ करतो. "खानदान की इज्जत" व दोन लहान मुले सांभाळण्यासाठी ती हे सर्व सहन करते. पण एक दिवस या सगळ्याचा कडेलोट होतो व ती नवऱ्याला अद्दल घडवायचा निश्चय करते. त्याचे पाय जाळून त्याला वेदना म्हणजे काय ते दाखवून देण्याच्या तिच्या प्रयत्नात नवरा जळून मरतो व तिच्यावर कट करून नवऱ्याला ठार केल्याचा आरोप सिद्ध होतो व जन्मठेप, 25 वर्षे कारावासाची शिक्षा, ठोठावली जाते. नवऱ्याच्या छळाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी लढणाऱ्या संघटना , तिची कहाणी ऐकल्यावर तिला न्याय मिळावा म्हणून लढा उभारतात. त्यासाठी खूप मोठी मोहीम उघडतात. सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करण्यास भाग पाडतात. किरणने केलेला नवऱ्याचा खून हा कट नसून त्याने तिच्या वर सतत केलेल्या अत्याचाराचा परिपाक आहे हे अनेक अंगांनी सिद्ध करतात. शेवटी किरणची मुक्तता होते.
हा सर्व अनुभव किरणने लिहून काढलेला आहे.
नव-याकडून होणारा स्त्रीचा छळ, "खानदान ची इज्जत" सांभाळण्याची तिच्यावर समाजाने टाकलेली सांस्कृतिक जबाबदारी, छळ करणाऱ्याची व तो सहन करणारा मानसिकता, यासंबंधी असलेले सामाजिक कायदे कानून, सरकार व न्यायालयांची या संबंधातली भूमिका, कायद्याचे कंगोरे या सर्व अंगावर पुस्तकात सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक.
- DAINIK DESHDOOT 11-12-2010
कहाणी महिषासुरमर्दिनीची...
काही वर्षांपूर्वी ‘प्रोव्हेक्ड’ नावाचा एक सिनेमा येऊन गेला. ऐश्वर्या रॉयने यात प्रमुख भूमिका केली होती. कान्स चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची दखल घेतली गेली. असं काय होतं या चित्रपटात? मला टिव्हीवर हा सिनेमा बघायला मिळाला तेव्हाच अंतर्बाह्य धक्के बसले. एक भारतीय सुशिक्षित मुलगी जिच्या डोळ्यात लग्नाची, संसाराची अनेक स्वप्ने असतात; ती परदेशात नातेवाईकांकडे जाते काय, तिथलंच एक स्थळ तिच्यासाठी येऊन लग्न पार पडतं काय आणि तिचा संसार सुरू होतो काय? सगळंच कल्पनेतलं वाटावं पण वास्तव. या वास्तवाशी तिचा सामाना होतो तोच नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा अनुभव घेत. सासू-सासरे, दीर-नणंद, नवरा अशा एकत्र पद्धतीच्या कुटुंबात ती दाखल होते. नववधूला त्या अनुभवातून, परीक्षेतून जावे लागते. त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रसंग किरणच्या आयुष्यात येतात. नवऱ्याचा सततचा आक्रमक पवित्रा, आरडाओरड, आक्रस्ताळेपणा करण्याचा स्वभाव, हतबल सासू-सासरे, पदरी दोन मुलं असं सगळं किरण सहन करत होती. तिच्यावरचे अन्याय करणारे प्रसंग वाचून डोळ्यात पाणी येते. तब्बल दहा वर्षं किरण आज ना उद्या चांगले बदल होतील या आशेवर छळाचे विष पचवत राहिली. जेव्हा नवऱ्याचे शंभर अपराध भरले शिशुपालांसारखे किरणने त्याला यमसदनी पाठवले. त्याचीच गोष्ट ‘प्रोव्हेक्ड’ मध्ये होती. किरणजीत अहलूवालिया या पंजाबी स्त्रीने सोसलेले चटके या ‘सर्कल ऑफ लाईट’ मधून तुम्हाला वाचायला मिळतील. काही स्त्रियांना पुरुषांकडून अनन्वित छळ सहन करावा लागतो. त्यांच्या सहनशक्तीनुसार त्या सहन करतात. मात्र, कधीतरी तिलासुद्धा रणचंडिकेचा अवतार धारन करावा लागतो. किरणजीतच्या दुर्दैवाचे दशावतार वाचताना तिची बाजू पटते आणि तिने नवऱ्याला निजधामाला पाठवले यात तिचं काहीही चुकलेलं नाही, हे पुन्हा सिद्ध होते. किरणजीतवर खटला चालतो, तिला तुरुंगवासात रहावे लागते; परंतु तिच्या वकिलांनी, मैत्रिणींनी तिच्यावरचा अन्याय जगासमोर आणला. जनमत किरणजीतच्या बाजूने झुकते.
- DAINIK NAVSHAKTI 04-07-2010
एक बंड...
`सर्कल ऑफ लाईट’ ही किरणजीत अहलुवालिया हिची आत्मकथा १९९७ मध्ये प्रथम इंग्रजीत प्रसिध्द झाली. `पुरुषांच्या हातून अनन्वित छळ झालेल्या समस्त महिलांना’ ती अर्पण करण्यात आली आहे. भारतात पंजाबमध्ये, फगवाडा शहराजवळच्या चक-कलाल या छोट्या गावातील शीख कुटुंबातील पाच भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा गोतावळा असलेली किरणजीत अहलुवालिया वयाच्या २४ व्या वर्षी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या दीपक या शीख तरुणाशी विवाह करण्यासाठी क्रॉले या भागात राहणाऱ्या विवाहित बहिणीच्या घरी पोचते. दीपकचे घर तेथून जवळच असते. लग्नाची खरेदी चालू असताना किरणजीतला दीपकच्या स्वभावातला रागीटपणा अनुभवायला मिळतो. मैत्रिणीकडे जाण्याचे ती टाळते तेव्हा तो रागाने म्हणतो, मला नाही हिच्याशी लग्न करायचे. समजते काय ही स्वत:ला? खोटारडी, वाया गेलेली मुलगी आहे ही. मी नाही हिचे नखरे चालवून घेणार. मैत्रिणीकडे आधी येते म्हणाली. आता नाही म्हणतेय. मी थकलेय म्हणतेय. महाराणीच लागून गेलीय जणू’’
दीपकची आई त्यावर त्याला फैलावर घेते. ``अरे, इतक्यातच आपलं खरं रुप तिला दाखवतोस काय? तिने आपल्या घरच्या लोकांना हे सांगितलं तर लग्न मोडतील ते. माझी लाज बाहेर काढणार तू’
किरणजीतला वाटते हे लग्न करु नये. घरच्यांना आताच सांगावे. पण पुन्हा स्थळ धुंडाळणे...परत तेच दिव्य. दरम्यान किरणजीतचा हात मुठी तळताना भाजतो. हा अपशकुनच झाला असे तिला वाटते. लग्नाच्या आदल्या दिवशी दीपकच्या घरी नाचगाण्याचा मोठा कार्यक्रम होतो. त्यांच्या घरातलं पहिलं लग्न असल्याने सर्वांचाच उत्साह शिगेला असतो. लंडनमधल्या साऊथहॉल भागातील एका सार्वजनिक हॉलमध्ये लग्न होते. ग्रंथसाहिबभोवती फेरे चालू असताना किरणजीतला वडिलांची आठवण येऊन रडू अनावर होते. किरणजीत चार महिन्यांची असतानाच ते पेनिसिलीनच्या इंजेक्शनची रिअॅक्शन येऊन मरण पावले होते. मामा, मावशी, भावंडे, भावजया, आई यांच्या प्रेमाच्या वर्षावात ती लहानाची मोठी झालेली असते. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच दीपकचा आडदांड धसमुसळेपणा किरणजीतला खूप वेदनादायक ठरतो. दीपकच्या स्वभावातील संशयीपणा, लंपटपणा, छळवादीपणा कायम राहतो. किरणजीतला मारहाण करणे, टाकून बोलणे, अपमान करणे, केस ओढत फरफटत नेणे वगैरे प्रकार सर्रास चालू राहतात. किरणजीतला दिवस जातात. मुलगी होते. त्यानंतरही दीपकच्या वागण्यात काही फरक पडत नाही.
१९८१ मध्ये किरणजीत बेल अँड चर्च या कॉस्टिक सोडा फॅक्टरीत तिच्या आईच्या शिफारशीने व प्रयत्नाने नोकरी मिळवते. पुढे गॅटविक विमानतळावरच्या रेस्टारंटमध्ये ग्राहकांना शीतपेये व खाद्यपदार्थ देण्याचा जॉब या मायलेकींना मिळतो. १९८३ मध्ये किरणजीत टॉमी या आपल्या भावाला सांगते, `दीपकबरोबर राहून माझ्या वाट्याला दु:खाखेरीज काहीही आलेलं नाही. त्याला कायमचं सोडून द्यावं असं मला वाटतंय.’ या फोनची माहिती मिळाल्यावर दीपक किरणजीतला मारहाण करतो. तिला कामावर जाऊ देत नाही. स्वत:ही कामावर जात नाही. तिच्यावर जणू पहारा देत बसतो. त्याच दिवशी किरणजीत पॅरासिटॅमलच्या २० गोळ्या गिळून टाकते. आपल्या नऊ भावंडांना निरोपाची पत्रे लिहते. तेवढ्यात टॉमी तिला भेटायला येतो - आमच्याबरोबर चल. तुला घेऊन जायला आलोय, असे म्हणतो.
त्यावर ती उत्तर देते, ``आता खूप उशीर झाला तुला. मला जगावंसंच वाटत नाही. या बघ - या गोळ्या मी घेतल्यात ही पत्रं वाच.’ टॉमी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. वाटेत उलट्या होतात. तिच्या पोटातून विषारी द्रव्य धुऊन बाहेर काढतात. रात्री तिला हॉस्पिटलमध्ये ठेवतात. १९८९ मध्ये किरणजीतला एक फोन येतो, तुमच्या नवऱ्याचं बाहेर एक प्रेमप्रकरण चालू आहे.’ दोघांत पुन्हा वाद सुरु होतो. दीपकशी बोलण्याचा शेवट किरणजीतच्या मारहाणीत व्हायचा. दीपकचे एका गोऱ्या बाईबरोबरचे अफेअर चालू असल्याचे स्पष्ट होते. ८ मे १९८९ रोजी मध्यरात्री दीपकच्या खोलीत जाऊन किरणजीत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण तो काही न बोलता झोपून राहतो. किरणजीत पेट्रोलचा कॅन त्याच्या गादीवर रिकामा करते.
प्लॅस्टिकच्या कपात पेटती मेणबत्ती ठेवून ती गादीजवळच्या टेबलावर ठेवते. पेटता पलिता दीपकच्या खोलीत टाकून तिचे दार बाहेरुन लावून घेते. खोली पेट घेते. लोक रस्त्यावर गर्दी करतात. दीपकचे पाय पेटलेले असतात. ते ब्लँकेटमध्ये गुंडाळलेले असतात. अँब्युलन्स येते. अग्निशामक दलाचे बंब येतात. किरणजीतचे हातही भाजलेले असतात. हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. आठ दिवस दीपक मृत्युशी टक्कर देत असतो. नंतर त्याचा जीव जातो. किरणजीतला जन्मठेपेची शिक्षा होते. परंतु तिची केस पुढे साऊथ हॉल ब्लॅक सिस्टर्स (एमबीबीएस) संस्थेच्या नजरेला येते. किरणजीतवरील खटला नव्याने चालवला जातो. किरणजीतची निर्दोष म्हणून सुटका होते. २००१ चे एशियन वुमेन्स अॅवॉर्ड तिला देण्यात येते. साऊथ हॉल ब्लॅक सिस्टर्सच्या संपादिका राहिला गुप्ता किरणजीतच्या केसची माहिती घेऊन तिचे आत्मकथन सिध्द करतात. तिच्यावर बेतलेला `प्रव्होक्ड हा चित्रपट २००७ मध्ये कान्स महोत्सवात गाजतो. घरगुती हिंसाचाराविरुध्द लढण्याचे पाठबळ देणारी ही आत्मकथा अनेक पीडित, व्यथित महिलांच्या जीवनात नवा प्रकाश आणणारी आहे.
- एक वाचिका
‘सर्कल ऑफ लाईट’ हे आपले अनुवादित पुस्तक वाचनात आले. केवळ पतीने समजून न घेतल्याने भारतीय स्त्रीचे परदेशातील वास्तव्य किती दु:खद, त्रासदायक होते हे जाणवले. प्रत्येक स्त्रीच्या आशाअपेक्षा सर्वसाधारण सारख्या असतात. अन्यायाची, सहनशक्तीची मर्यादा संपल्यावर काय होते हे किरणजीतच्या जीवनप्रवासातून समजते. परदेशातील भारतीयांनी, इतरांनी तिला दिलेली साथ तिला आशेचा किरण देऊ शकली याचे सविस्तर वर्णन पुस्तकात चांगले केले गेले आहे.
ही सत्यकथा म्हणजे समाजमन जागृत करणारा इतिहास आहे. न्यायी, दु:खी स्त्रीचं दु:खी स्त्रीला जाणू शकेल.
लग्नव्यवस्थेचा फोलपणाही दिसून येतो. प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची प्रेरणा मिळते.