- Uma Gade
सुप्रसिद्ध कथालेखक, गीतकार , संवादलेखक ,दिग्दर्शक गुलजार यांचा अप्रतिम कथासंग्रह .अत्यंत वाचनीय आहे
- Snehal Potdar
सुंदर पुस्तकं
- E Sahitya Pratishthan
खूप अस्वस्थ करतं हे पुस्तक. गुलजार त्यांची सेनेमॅटोग्राफ़ी आणि धक्कातंत्र इथेही वापरतात.
- Shalaka Naringekar
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला हे पुस्तक वाचण्यासाठी म्हणून दिलें. मला सआदत हसन (मंटो) यांचं लिखाण आवडतं म्हंटल तेव्हा गुलज़ार यांचं रावीपार हे ही आवडेल असं तिने म्हंटल. या पुस्तकात गुलज़ार यांनी भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेल्या निर्वासितांवर व त्यावेळी दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या लोकांना तसचं देशभरात सर्वधर्मीयांना सहन कराव्या लागलेल्या घटनांविषयी सुंदर कथात्मक वर्णन केलेलं आहे. गुलज़ार यांच्या चाहत्यांना आवडेल असं हे पुस्तक आहे.
- गौरी दाभोळकर
युवाभारतीमधील ‘रावीपार’ ही सुप्रसिद्ध लेखक व कवी गुलजार यांची कथा वाचली अन कितीतरी दिवस त्या कथेतील बापाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. फाळणीसंबंधी कित्येक सिनेमे-कादंबऱ्या झाल्या असतील, पण या कथेत जाणवणारी संवेदनशिलता वेगळीच होती. माझे हिंदी वाचन जवळजवळ शून्य असले तरी सुट्टीत मुंबईत आयडीयलमध्ये मराठी पुस्तके चालताना मराठीतले रावीपार हातात आले. आणि तत्क्षणी मी त्या कथांच्या प्रेमात पडले. २६ कथांचा हा छोटेखानी संग्रह जीवन-मृत्यूविषयीचे मोठे तत्त्वज्ञान सांगून जातो. काही कथा केवळ ३-४ पानांत बरेच काही शिकवून जातात. गुलजारांनी आदिमानव, प्राणी, फाळणीतील बेघर यांपासून ते अगदी मायकेल एंजेलोपर्यंत विविध स्थल-कालाच्या पलीकडे जाऊन सर्वांची भावना लेखणीत बद्ध केली आहे. मराठी भाषांतरही चांगले झाले आहे.
- DAINIK SAMANA 17-6
फाळणीच्या वेदनांची कथारूपे ...
‘गुलजार’ हे नाव हिंदी चित्रपटासृष्टीशी चांगलेच निगडित असल्याने ते सर्वपरिचित आहे. गीतकार, संवादलेखक आणि दिग्दर्शक या तिन्ही नात्यांनी त्यांची त्या क्षेत्रातील कामगिरी आहे. पण याहून एक वेगळा असा त्यांचा पैलू प्रथम उर्दू भाषकांना आणि नंतर इंग्रजी वाचकांना परिचित झाला, तो म्हणजे कथालेखनाचा! ‘रावीपार’ या नावाने मराठीत या कथा आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी. गुलजार यांच्या कथांचा हा मराठीतील पहिलाच अनुवाद.
‘रावीपार’मध्ये एकूण सत्तावीस कथा आहेत. यातली कोणती कथा कोणत्या अनुवादकाने अनुवादित केली, ते नमूद करण्यास हरकत नव्हती. या अनुवादित कथासंग्रहाचे श्रेय जरी दोघांचे असले तरी त्यांच्या वैयक्तिक कौशल्याची ओळख वाचकांना झाली असती आणि ती प्रतिमा निश्चितपणे चांगलीच उमटली असती. कारण या सगळ्याच कथा समर्थपणे अनुवादित केल्या गेल्या आहेत.
सनसेट बुलेवार्ड, रावीपार, फाळणी, हाबूची आग, बखर एका जंगलाची मायकेल एंजेला या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. एक गोष्ट मात्र जाणवते. की चित्रपट या दृश्यमाध्यमासाठी आवश्यक असलेली ‘नजर’ या कथालेखनात प्रभाव गाजवते. नुसता लिखित शब्द आणि दृश्यात्मक परिणाम साधणार लिखित शब्द यांमधील अंतर गुलजार चांगलेच जाणतात. या कथालेखनात काही ठिकाणी कळत-नकळत चित्रपटासाठी आवश्यक असणारा दृश्यात्मक परिणाम साधलेला दिसतो. ‘रावीपार’ ही कथा किंवा त्यातील मूळ घटना ही कुठेतरी वाचलेली किंवा त्यातील दृश्य कुठल्याही चित्रपटात पाहिलेले आहे, असे आठवते.
फाळणी ही हिंदुस्थानच्या हृदयावरची फार मोठी जखम आहे. त्याची वेदना यातील कथांमध्ये विविध रूपांत व्यक्त झालेली आहे. भय, धूर, रावीपार, फाळणी, जांभळाचे झाड या कथांमध्ये फाळणीमुळे मानवी मनांची झालेली होरपळ, त्यावेळी घडलेल्या धक्कादायक घटना कलात्मकतेने व्यक्त झालेल्या आहेत. काही राजकीय निर्णयांमुळे माणुसकी, जिव्हाळा, करुणा या शब्दांचे अर्थच कसे उलटेपालटे होऊन जातात. सामान्य जीवांची कशी ससेहोलप होते, याचे मन व्याकूळ करणारे दर्शन या कथा घडवितात.
सनसेट बुलेवार्ड, सीमा, बिमलदा, दहा पैशाचं नाणं आणि आजी या कथा वेगवेगळ्या पद्धतींनी चित्रपटसृष्टीशी नाते सांगणाऱ्या आहेत. व्यक्तिचित्रण, संवाद, दृश्यात्मकता हे प्रभावी घटक यात दिसतात.
गुड्डो ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या, उमलत्या यौवनाची नुकतीच जाणीव झालेल्या, चित्रपटसृष्टीचे आकर्षण असलेल्या मुलीची कथा मानसशास्त्रीयदृष्ट्याही परिणामकारक आहे. पु. भा. भावे यांची ‘सतरावे वर्ष’ ही कथा येथे आठवते. (शिरीष पै यांचीही याच विषयावरची एक कथा आहे.) अद्धा, पुरुष, कागदाची टोपी या कथा तरुण मुलांच्या मनाची विविध स्पंदने व्यक्त करणाऱ्या कथा आहेत. या कथांमधून लेखकाचे व्यक्तिदर्शनाचे सामर्थ्य जाणवते. चारूजी, डलिया, अद्धा, गुड्डो, बिमलदा या व्यक्तिरेखा लक्षात राहणाऱ्या आहेत.
रावीपार, मायकेल एंजेलो, दहा पैशाचं नाणं आणि आजी; परंतु जीवन आणि मृत्यू या कथांमध्ये धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवून कथेची एक वेगळेची अखेर परिणामकारकरितीने साधण्याचे कसब येथे दिसते.
बखर एका जंगलाची आणि हाबूची आग या लेखकाच्या प्रतिभासामर्थ्याचे, कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या विलक्षण कथा आहेत. जंगले, पशुपक्षी याकडे पाहण्याचा एक निराळाच दृष्टिकोन येथे व्यक्त होतो. पर्यावरणासंबंधीची चर्चा आपण नित्य ऐकतो. पण प्रत्यक्षात माणूस आपल्या बुद्धिसामर्थ्याने निसर्गातील पशुपक्ष्यांवर वर्चस्व गाजवू पाहतो. त्यामुळे त्यांचे विश्व कसे उद्ध्वस्त होते, ते कसे विस्थापित होतात याचे अतिशय नावीन्यपूर्ण चित्रण ‘बखर एका जंगलाची’ मध्ये दिसते.
प्राणीविश्वात खूप उलथापालथ होते आणि पक्षीप्रेम सलिम अली एक फलक लावतात. यातील कारुण्य, उपरोध, विसंगती मनाला भिडणारी आहे. आगीबद्दलच्या हाबूच्या कल्पना विलक्षण आहेत. टोळ्यांनी राहणाऱ्या आदिमानवांना पंचमहाभूताविषयीचे कुतूहल कसे झपाटून टाकीत असेल, त्याचा कल्पनासामर्थ्यावर मांडलेला खेळ या कथेत दिसते. या दोन कथांची, त्यांच्या वेगळेपणाबद्दल विशेष नोंद घेतली पाहिजे.
एकूण गुलजार यांचे भावविश्व, मानवी जीवनातील आणि निसर्गातील विविध घटना, माणसामाणसांतील तसेच निसर्ग आणि माणूस यांच्यातील नातेसंबंध, त्यांचे व्यक्तिगत आणि सामाजिक परिणाम अशा मूलभूत गोष्टींनी व्यापून गेलेले दिसते. या सगळ्यांतून मानवी मनाची स्पंदने, माणसाच्या जगण्याला असलेले विविध कंगोरे ते उलगडून पाहतात. जीवन जगण्यातील व्यापक आशय शोधू पाहतात. मानवाच्या आदिम प्रेरणांचा मूलस्त्रोत दृष्टीआड न करता आदिमानवापासून संस्कृतीच्या उच्च स्तरांपर्यंत प्रगती करीत गेलेला मानव पुन्हा आपल्या मूलस्वरूपाकडेच कसा जातो, स्वनिर्मित उच्च मूल्यांचा त्याला कसा विसर पडतो याचे भेदक दर्शन या लेखनात घडते. कथांचे विषय, आशय, तंत्र आणि व्यक्तिचित्रणे यातील विविधता लक्षणीय आहे. अवश्य वाचायला हवा, असा हा कथासंग्रह आहे.
-डॉ. मेधा सिधये
- Meghagauri Ghodke
खुप वाचण्या सारखं व विचार करायला लावणारं...
- MAHARASHTRA TIMES 29-07
कवितेचा स्पर्श असलेल्या कथा...
गुलजार हे दिग्दर्शक, गीतकार, लेखक अशा अनेक नात्यांनी आपल्याला परिचित असले, तरी त्यांच्या विविधांगी आविष्काराचा मूलस्रोत कविवृत्तीचा आहे. कविता मिताक्षरी असते आणि जनसामान्यांपासून विदग्ध रसवृत्तीपर्यंत, सर्वांना मोहीत करण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. गुलजार यांचे चित्रपट जसे सर्वांना भावतात, तशीच त्यांची कविता. आणि आता कथादेखील! ‘रावीपार’ हा गुलजार यांचा मूळ उर्दू भाषेत प्रकाशित झालेला संग्रह. त्याचा मराठी अनुवाद विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी केला आहे. अनुवाद अतिशय सहज आणि मूळ कथांमधली काव्यात्मता जपणारा झाला आहे.
मराठीत अशा प्रकारची कथा फारशी लिहिली गेली नाही आणि आज तर अशा प्रकारची कथा लिहिण्यासारखे मराठी साहित्यात वातावरणदेखील दिसत नाही. या संग्रहावरचे गुलजार हे नाव काढून टाकले, तर कदाचित या कथांची संभावना कृत्रिम आणि तंत्राच्या आहारी गेलेल्या म्हणूनही केली जाईल! अर्थातच या कथांमध्ये लघुकथेचे तंत्र असले,रूपकथेत शोभावी अशी चमत्कृती आणि प्रतिकात्मता असली आणि रंजक साहित्यातील भावपूर्णता असली, तरी त्याहीपलीकडे जाणारी एक मूल्यात्मक जाणीव आहे. तीन-चार कथांचे अपवाद सोडले, तर यातील बहुतेक कथा त्यातील सौंदर्यपूजक अभिजाततेमुळे कलात्मक उंची गाठतात. भोवतालचे भेसूर आणि कंगाल वास्तवदेखील गुलजार यांच्या कथेत कलाकृतीचा एक आर्त, पण आस्वाद्य घटक म्हणून येते.
या संग्रहात एकूण सत्तावीस कथा आहेत. सीमा किंवा ‘जांभळाचे झाड’ यासारख्या शेवटच्या तीन-चार कथा सोडल्या, तर बहुतेक कथा चार-पाच पानांच्या छोट्या कथा आहेत. फाळणीच्या काळात झालेली ताटातूट, स्त्री-पुरुषांमधील बदलती नाती, जीवन आणि मृत्यु यांच्यातील निवड, चित्रपट, नज्ञटकाचे आभासी विश्व असे या कथांचे विषय आहेत. कधी व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून, तर कधी चमत्कृतीचा आधार घेऊन गुलजार या कथा सांगतात. बरेच वेळा या कथांमध्ये वास्तवाला कलाअणी देणारी एखादीच घटना अथवा साक्षात्काराचा क्षण असतो. कधी कधी एखादे सनातन सत्य सांगण्यासाठी गुलजार वास्तवाचाच प्रतिकात्म वापर करतात. ‘सातरंग्या’, कथेतील खैरू किंवा ‘हाबूची आग’ मधील हाबू यांची निर्मिती मानवी जीवनातील कलेची महती आणि जिज्ञासा यांना मूर्तरूप देण्यासाठी झालेली आहे. ‘जांभळाचे झाड’ देखील भोवताली घडणाऱ्या जीवनसंघर्षाचे साक्षीदार आहे. ‘रावीपार’ ही या संग्रहातील सर्वांत उत्कृष्ट कथा आहे. गुलजार यांच्या शैलीची सारी वैशिष्ट्ये तिच्यात आहेत. एकाच वेळी फाळणीचे भीषण वाज्ञतव सांगणारी आणि नियतीपुढे माणसाची निर्णयशक्ती फोल ठरवणारी रूपककथा म्हणून तिचे महत्त्व आहेच पण एकूण मानवी जीवनाबद्दल ती काही सांगू पाहते. या कथेत दर्शनसिंह, या पत्नी आणि दोन तान्ह्या मुलांसह, गाडीच्या टपावर बसून, निर्वासितांच्या लोंढ्यासह भारतात चालला आहे. हा एक जीवनमूल्याचा संघर्ष आहे. त्यात एक मूल मृत्यू पावले. अंधारात रावी नदीच्या ....वरून गाडी जाऊ लागते, तेव्हा दर्शनसिंह जड अंत:करणाने त्या मुलाला खाली फेकून देतो. पण मुलाला मुक्ती दिल्याचे समाधान क्षणभरच टिकते; कारण दर्शनसिंहने चुकून जिवंत पोरालाच जलसमाधी दिलेली असते! या कथेतील प्रत्येक तपशील अर्थवाही प्रतिमा बनलेला आहे. मेलेल्या मुलाला कवटाळून बसलेली शाहनी आणि जिवंत मुलाला गफलतीने टाकून देणारा दर्शनसिंह दोघांच्याही नशिबी जगण्याऐवजी मृत्यूचे कलेवर हाती येते. रावीपार ही फक्त निर्वासितांची आस राहत नाही, ती अंधाऱ्या जीवनसरितेची उत्कट प्रतिमा बनते. तान्ही मुले हीसुद्धा या जोडप्याच्या वाट्याला येणारे भीषण वास्तव अधोरेखित करतात. जीवनप्रवासात माणसापुढे अनेक पर्याय असतात, पण निवडीचे स्वातंत्र्य असतेच असे नाही. अटळ प्रवासातला तो एक भासही असू शकतो, असे सांगणारी ही कथा.
कलांचे स्वायत्त विश्व आणि वस्तुनिष्ठ वास्तव यांच्यातील संवादी आणि विरोधी वातावरण टिपणे, हा गुलजार यांच्या कथेचा एक प्रमुख धागा आहे. माणसांच्या नात्यांमधील अज्ञात आणि अगम्य ओढ हेदेखील त्यांच्या कथांमधून आढळणारे समान सूत्र आहे. काळ हा या नात्यांचा एक अविभाज्य आहे. कधी तो फाळणीसारख्या सामाजिक घटनांच्या भूतकाळाचे रूप घेऊन येतो. (‘फाळणी’), कधी व्यक्तिगत आयुष्यातील जुन्या, पुसता न येणाऱ्या प्रेमबंधाच्या स्वरुपात येतो (‘सीमा’), तर कधी मृत्यूच्या अंतिम सत्याचे रूप घेऊन येतो. (बिमलदा’ आणि ‘दहा पैशाचं नाणं आणि आजी’), ‘मायकेल एंजेलो’ किंवा ‘हाबूची आग’ मधील कथांमधील काळ निवेदनाच्या पातळीवर रेनेसान्स किंवा प्रागैतिहासिक असा असला, तरी त्याचा रोख सनातन काळाकडे आहे.
‘फाळणी’ आणि ‘बिमलदा’ या कथांमध्ये खऱ्या व्यक्ती आणि कल्पितांचे मिश्रण आहे. ‘फाळणी’ कथेतील हरभजनसिंग यांना शोध लागतो की, कथेचा निवेदक, म्हणजेच गुलजार फाळणीच्या दिवसांत ताटातूट होऊन हरवलेला त्यांचा मुलगा आहे. परोपरीने ‘मी तुमचा मुलगा नाही,’ असे गुलजार यांनी सांगूनही हरभजनसिंग यांचा विश्वास बसत नाही. आपल्या ताटातूट झालेल्या मुलांना शोधणारे आई-बाप आणि समांतर आयुष्यांना जोडणाऱ्या अनामिक नात्यांचे बंध या कथेत हळुवारपणे आले आहेत. ‘सीमा’ ही कथा इतर कथांच्या तुलनेत दीर्घकथा आहे. त्यातील सुधीर आणि सीमा विभक्त होऊन वर्ष झालेले आहे. टी. के. शी तिने संसार थाटला आहे. पण मन अबोध पातळीवर सुधीर मध्ये गुंतलेले आहे. सुधीरला आता आपली गरज नाही हे उमजते, तेव्हाच ती सुधीरच्या स्मृतिपाशांतून मुक्त होते. ‘फाळणी’मधील आई-वडील आपल्या मुलांना आपण परत मिळवल्याच्या भ्रामक आनंदात राहू पाहतात, सीमाला मात्र भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातल्या सीमारेषेचे भान येते.
‘बिमलदा’ कथा बिमल रॉय यांच्या अखेरच्या दिवसांचे चित्रण करणारी आहे. ‘सीमा’ कथेत नाटक आणि वास्तव जीवन यांचे रंग एकमेकांत मिसळलेले आहेत. ‘बिमलदा’मध्ये ते करीत असलेला कुंभमेळ्यावरचा चित्रपट आणि बिमलदांचा मृत्यूकडे चाललेला प्रवास यांचे धागेदोरे एकमेकांत गुंतलेले आहेत. मृत्यूची भयग्रस्त करणारी जाणीव आणि कलात्मक तसेच वास्तव पातळीवर येणारी मृत्यूची अनुभूती हा या कथेचा विषय आहे. ‘दहा पैशांचं नाणं आणि आजी’ या कथेत चकूला म्हातारीच्या मृत्यूने बाहेरच्या जगाचे जे दर्शन घडते, ते असेच त्याला अंतर्बाह्य बदलून टाकणारे आहे.
गुलजार यांच्या कथेत चमत्कृती, अनपेक्षित कलाटणी अशा युक्त्यांचा वापर अनेकदा येतो. ‘मायकेल एंजेलो’ कथा या रेनेसान्सकालीन प्रसिद्ध चित्रकारावर असली, तरी गुलजार यांनी म्हटले, तर काल्पनिक, म्हटले तर ऐतिहासिक गोष्टीचा वापर इथे जीवनातील सनातन सत्य सांगण्यासाठी केला आहे. ज्या लहान मुलाचा येशूचे चित्र काढण्यासाठी मॉडेल म्हणून वापर केला, त्याचीच निवड मोठेपणी मायकेल एंजेलो नकळतपणे करतोख्, ती ज्युडासचे चित्र काढण्यासाठी! माणसामधली निर्व्याजता कालांतराने निबर होते, ती परिस्थितीने तामसी बनतो, हे गुलजार यांना कलात्मक पद्धतीने सांगितले आहे.
जीवनातील सत्य सांगण्यासाठी कल्पनेचा कधी कधी आश्रय घ्यावा लागतो. गुलजार यांनी अनेकदा तो घेतलेला आहे. भोवतालच्या निबर वास्तवाच्या मुळाशी दडलेली निर्व्याजता टिपणे हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांच्या कथांना कवितेचा स्पर्श झालेला आहे.
- DAINIK PUDHARI 30-06-2001
गुलजार लेखणीतून उमटलेलं ‘रावीपार’...
‘गुलजार बोलतो त्याची कविता होते’ गुलजारच्या चाहत्यांची त्यांच्याबद्दलची अशी तरल भावना असते. हिंदी चित्रपटांतल्या गीतांतून, संवादांतून, दिग्दर्शनातून आणि कवितांतून गुलजार आपल्या परिचयाचे आहेत. त्यांच्या कथांचा आजवर मराठीत संग्रह निघालेला नव्हता. गुलजारांच्या कथांचा ‘रावीपार’ हा मराठीत अनुवादित झालेला पहिलाच संग्रह आहे.
गुलजार म्हणतात की, मानवी संबंधाचे पदर उलगडत असताना एक नवा नातेसंबंध दृष्टिपथात आला की, त्यावर कथा लिहून व्हायची. चित्रपटांच्या पटकथेत समाविष्ट होऊ न शकणारी पात्रंही वेगळी नोंदवून त्यांची कथा झाली.
भोवतालची परिस्थिती, वातावरण आणि समाज सगळ्यांच्याच भोवती असतं, पण अभिजात प्रतिभासंपन्न, गुलजार चित्रदर्शी शैलीनं वास्तवाचं सू़क्ष्म चित्रण करून एखादा प्रसंग वाचकांपुढे ठेवतात तेव्हा व्यक्त होणारी तरल संवेदनशीलता काळजाला भिडते. ‘रावीपार’मध्ये अशा सत्तावीस चित्रदर्शी वर्णनाच्या कथांचा समावेश आहे. निरनिराळी पार्श्वभूमी असलेल्या, संवादात्मक शैली असलेल्या या कथा जीवनाचे निरनिराळे रंग सूक्ष्मपणे टिपून एक आगळी अनुभूती देतात आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर कथा असा दंश करतात की पुढं कित्येक दिवस घायाळ असावं.
हा कथासंग्रह प्रथम उर्दू भाषेत प्रसिद्ध झाला आहे. या कथांचा अनुवाद विजय पाडळकर आणि कै. मोहन वेल्हाळ यांनी केला आहे. आजव गुलजारांच्या ‘शायरी’वर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना गद्य ‘रावीपारी’ नक्कीच आवडेल असं आहे.
- NEWSPAPER REVIEW
समृद्ध आकलनशक्तीचा सौंदर्यपूर्ण आविष्कार…
प्रसिद्ध हिंदी कवी, गीतकार, संवादलेखक, दिग्दर्शक गुलजार यांनी लिहिलेल्या कथांचा हा पहिलाच कथासंग्रह. गुलजार यांनी मुळात उर्दूत लिहिलेल्या कथांचा श्री. विजय पाडळकर व मोहन वेल्हाळ यांनी केलेला ‘रावीपार’हा मराठी अनुवाद.
शायरीलेखन करणाऱ्या गुलजारांनी कथेसारख्या गद्यसाहित्य प्रकारात पदार्पण केले ते एका विशिष्ट प्रेरणेतून असे दिसते. गद्यसाहित्याचे वाचन करताना कधी एखादी कथा त्यांच्या मनाला दंश करायची, इतकी की पुढेही कित्येक दिवस लेखकाचे मन विदीर्ण झालेले असायचे. कथेची नशा महिनोन् महिने उतरायची नाही. अशा मानसिक अवस्थेत कथा लेखनाचा प्रयत्न करण्याची प्रेरणा गुलजार यांना मिळाली. कथालेखनासाठी लेखणी उचलल्यावर कथा विषयांची अडचण लेखकाला कधीच जाणवली नाही. कथाबीज धबधब्यासारखी कोसळत त्यांच्यासमोर उभी ठाकायची तर कधी कथाच संपूर्ण आकारासहित डोळ्यांसमोर उभी राहायची.
साहित्यात नाटक या साहित्यप्रकाराला दृश्यकाव्य असं संबोधलं जातं. याचं कारण नाटक पाहण्यासाठी असते; तर कथा, कादंबरी, कविता इ. प्रकार वाचण्यासाठी असतात. अशा वाचनात वाचक लेखकाच्या बोटाला धरून तो ज्या ज्या ठिकाणी नेईल तिथे जातो, तेथील निसर्गदृश्यांचा आनंद लुटतो, वातावरण अनुभवतो, एखाद्या व्यक्तीरूपाशी एकरूप होतो वा एखाद्या प्रसंगातील विचार, भाव यांची आंदोलने तन्मयतेने स्वत: अनुभवतो. नाटकात मात्र समोर येतात त्या घटना, प्रसंग व त्या त्या संदर्भात कृती करणाऱ्या व्यक्ती. अशी नाटकातील दृश्ये व विशिष्ट परिस्थितीत व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या कृती यांचा थेट परिणाम पे्रक्षकांच्या मनावर होत असतो. असाच काहीसा प्रकार ‘रावीपार’ या कथासंग्रहात दिसतो. चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद लिहिण्याचा सराव असल्यामुळे असेल कदाचित; पण विलक्षण नाट्य निर्माण करून जबरदस्त प्रभाव टाकणाऱ्या कथांची निर्मिती या ‘रावीपार’ संग्रहात पाहावयास मिळते.
या कथा वाचकांसमोर येतात ती सकस, सोलीव कथावस्तू म्हणून. लांबलचक वर्णने, स्पष्टीकरणे, समर्थने, भावांदोलने, विचारांदोलने व त्यांची नाजूक, कोमल, कठोर शब्दातील अभिव्यक्ती यांना या कथांत स्थान जवळ जवळ नाहीच. घटना, घटनेमागील परिस्थिती आणि दोन्हीही संदर्भ ज्या व्यक्तींशी आहे अशा व्यक्तींच्या हातून घडणाऱ्या कृती यांचे नाट्यात्मक चित्रदर्शी आविष्करण लेखक करतो. या कृतींना उक्तींची जोड निश्चितच आहे. पण तीही अत्यंत नेटक्या, चपखल व मितव्ययी शब्दावलीची आहे. एखादा प्रसंग शब्दांकित होऊन त्याचा वाचकामनावर परिणाम साधला जात असतानाच पुढचे दोन-तीन प्रसंग झपाट्याने घडताना वाचक कथेत बघतो आणि मानवी जीवनातील सत्य, त्याच्या भोवतीची परिस्थिती व मानवी संबंधाची गुंतागुंत यांचे वेढे-वळसे वाचकमनाला समजून येतात.
संवाद, प्रसंगचित्रे व वास्तव घटिते यांची या कथांतील निर्मिती दृश्यकाव्याचा परिणाम साधणारी आहे, असे म्हटल्यास उचित होईल, कथांमधील अनुभव थेट हृदयाला जाऊन भिडतो. तो ‘रावीपार’मधील कथांच्या अशा या आकृतीबंधामुळे व कथेच्या अपारंपारिक कथनशैलीमुळे होय. कथेची परिणामकारकता चरण सीमेला पाहोचविण्यास हेच घटक मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत ठरतात. घडणाऱ्या घटना बदलती परिस्थिती व तद्नुसार बदलणाऱ्या मनोवस्था यांचे दर्शन घडवीत कथासूत्र अशा पद्धतीने लेखक गुंफतो की व्यक्तिविशिष्ट व समाजविशिष्ट मानसिकतेतील वास्तव विलक्षण सामथ्र्यानं प्रकट व्हावं, मानवी जीवनातील व मानवी जीवन जगण्यातील भेदक सत्या समोर यावं. अत्यंत संवेदनशीलतेने व प्रामाणिकतेने या सत्याचा व वास्तवाचा वेध लेखक आपल्या कथांतून घेताना दिसतो या दृष्टीने रावीपार हीच कथा पाहावी.
हा प्रतिभावंत लेखक व्यक्तिवैशिष्ट्य टिपण्यात अत्यंत निष्णात आहे. व्यक्तींना व्यक्तिमत्व लाभते ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीमुळे, विचारशैलीमुळे, दृष्टिकोनामुळे किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावातील तीव्रतम गुण अथवा अवगुणामुळे! ‘रावीपार’मधील व्यक्ती अशा एखादं दुसऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांनी कथांमध्ये आपला ठसा उमटवितात. कथा आशय प्रभावी करतात.
शायरी लिहिणाऱ्या व गीतकार म्हणून नावाजलेल्या गुलजारांची काव्यात्म प्रतिभा कथेच्या माध्यमातूनही कधी कधी प्रकटते. कधी ती प्रतिमांच्या स्वरूपात येऊन आशयसमृद्ध करते तर कधी एखादी कथा गद्यकाव्याचे रूप धारण करते व लेखकाची कवित्वशक्ती व काव्यात्म मन ठायी ठायी प्रकट करत, जीवनातील भेदक सत्यालाही नितांत रमणीय अभिव्यक्ती प्रदान करते. ‘मी जागा होतो, रात्र झोपी जात होती. खोलीला असलेल्या खिडकीत बसून एक स्वप्न केव्हाचं पेंगत होतं. त्याच्या पापण्या ओलावल्या होत्या... ही रात्र केवळ चौरसाकार होती- भिंतीत बसवलेल्या खिडकीसारखी... डोळ्यांत जडवलेल्या स्वप्नांसारखी...!’ अशा छान भाषेत लिहून वाचकांना आकृष्ट करतात.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी व लेखक गुलजार यांचा हा पहिलाच लघुकथासंग्रह असला तरी विचार, संस्कार व जीवनानुभव या त्रयींच्या समन्वयातून लेखकाच्या मनाला लाभलेल्या प्रगल्भतेचा, अभिजाततेचा व समृद्ध आकलनशक्तीचा ‘रावीपार’ हा कथारूपातील मनोज्ञ आविष्कार आहे. सहानुभूतीपूर्ण, समतोल दृष्टिकोन प्रकट करणाऱ्या या कथा वाचकांच्या मनाला हलवून टाकणाऱ्या आहेत हे निश्चित!
मूळ उर्दूमध्ये असलेल्या गुलजारांच्या कथांचा मराठी अनुवाद केला आहे, मराठी साहित्याचे आस्वादक विजय पाडळकर व प्रकाशन संस्थेशी संबंध असलेले मोहन वेल्हाळ यांनी, या अनुवादकांच्या अनुवादकौशल्यामुळेच संग्रहातील कथा मराठी वाचकांपर्यंत पोहोचू शकल्या आहेत, हे विसरता येत नाही. अनुवादित साहित्यकृती जेव्हा स्वतंत्र साहित्यकृती वाटावी अशा पद्धतीने परभाषेतील आशयांनी संपन्न, प्रभावी व परिणामकारक अभिव्यक्ती करते, मूळ भाषेच्या लेखनातील कस यत्किंचितही कमी होऊ न देता सरस, सजीव, समूर्त होऊन आकारते, तेव्हाच मूळ लेखकाच्या साहित्यकृतीला अनुवादकाकडून पूर्ण न्याय मिळतो. मग तो अनुवाद हा अनुवाद न राहता ती कलाकृती स्वतंत्र निर्मिती वाटावी, अशा स्तरावर जाते. मूळ लेखकाच्या मनातील भावस्पंदने रसिक वाचकांच्या मनात निर्माण करण्याची कुशलता अनुवादकात असावी लागते. म्हणून मूळ साहित्यकृतीसाटी उपयोगात आणलेली भाषा या दोन्ही भाषांवर, शब्दशैलीवर अनुवादकाचे प्रभुत्व असणे अत्यावश्यक असते. ‘रावीपार’हा उर्दू लघुकथांचा मराठी अनुवाद या सर्व वैशिष्ट्यांची प्रचिती देणारा आहे. शब्दांचा नेमकेपणा व भाषेचा नेटकेपणा सरस, सुंदर आशयाला रोचक करणारा आहे.
कला साहित्य जेव्हा स्वाभाविक भावनोद्गारातून प्रकटते तेव्हा त्याचे स्वयंभू सौंदर्य रसिक वाचकांना दिपवून टाकते, अंतर्मुख करते व जीवनचिंतनास प्रवृत्त करते. ‘आवर स्वीटेस्ट साँग्स् आर दोज विच टेल अस सॅडेस्ट थॉटस्’ असा अंतरंगातून, आंतरमनातून प्रकटणारा भावनेचा उद्गार म्हणजे कला-साहित्य!
मानवी जीवनविषयीच्या गुलजार यांच्या भावनोद्गाराला मराठी पेहराव बहाल करणाऱ्या अनुवादकांना मूळ लेखकाचा सहकंप जाणवला व त्यातून ‘रावीपार’ कथासंग्रह आकाराला आला. अनुवादकांना याचे श्रेय देणे हा रसिकांच्या मनातील कृतज्ञतेचा भाग!