- Rasika Hinge
*पुस्तक परीक्षण*
मूळ भारतीय वंशाचा पण परदेशात शिकलेला कथानायक त्याच्या अमेरिकन प्रोफेसरच्या सांगण्यावरून भारतात आदिवासी बद्दल अंधश्रद्धा, धर्मांधता, याविषयी संशोधन करायला येतो.
अनिच्छेने इथे आलेल्या कथानायकास सौराष्ट्राच्या जंगलातील नर्मदेच्या खोऱ्यात आदिवासी प्रदेशात काम करतांना, त्यांच्या सोबत राहतांना आलेले अनुभव म्हणजे गुजराथी लेखक ध्रुव भट्ट यांची अंजनी नरवणे यांनी अनुवादित केलेली तत्वमसि कादंबरी.
वास्तविक कथानायकाला या आदिवासी बद्दल ना आकर्षण ना इथे काम करण्याची इच्छा. तरीही काही दिवस राहू, माहिती गोळा करू , आदिवासींना काही शिकवता आलं, त्यांच्या श्रद्धा किती चुकीच्या आहेत हे पटवून देण्यासाठी आणि जमलं तर एखादी शाळा वगैरे काढता आली तर पाहू असा विचार करून कथानायक भारत भूवर पाय ठेवतो.
इथे आल्यावर आदिवासी जीवन त्याला जवळून पहायला मिळतं. त्यांच्या श्रद्धा,परंपरा स्वतःवर असलेला विश्वास यामुळे तो नकळत त्यांच्याकडे खेचला जातो. भारतीय परंपरागत संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याची तुलना नकळत होऊ लागते.
आदिवासी प्रदेशातील काही ठिकाणं, काही घटना त्याला अचंबित करतात. तर काही प्रथा विचार करायला भाग पाडतात.
नर्मदेच्या खोऱ्यात परिक्रमेसाठी आलेल्या परिक्रमा वासींची जमेल तशी सेवा करायची हे आदिवासीचे तत्व. मुळात नदीची प्रदक्षिणा करणे म्हणजे अंधश्रद्धा आणि मागासलेपण आहे असे कथानायकाला वाटते.
आदिवासी भाषा शिकतांना, एखादा उपक्रम राबवितांना जसे मध गोळा करणे, शाळा सुरू करणे यासाठी त्याला आलेल्या विविध अडचणी, स्थानिक आदिवासींची परंपरेवर असलेली श्रध्दा या सगळ्या गोष्टी त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत असे त्याला वाटत राहतं.
भारतीय संस्कृतीत तीर्थाटन, आचार विचार, परंपरा यांची देवाण घेवाण यामुळे भारत एकत्रित बांधला गेला आहे असे कथानायकाला आदिवासींनी केलेली परिक्रमा वासींची सेवा पाहून पटायला लागतं,.
परिक्रमा करतांना प्रत्यक्ष नर्मदा दर्शन देते यावर त्याचा विश्वास नसतो. आलेल्या परिक्रमवासी शी बोलून माहिती घेण्याचा प्रयत्न कथानायक करतो. पण हे सांगून पटणारी गोष्ट नाही. यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून तो परिक्रमा अनुभवण्यास निघतो. अवघे विश्व एकाच मूलतत्वापासून निर्माण झाले आहे याचा अनुभव नर्मदेच्या तीरावर चालतांना येतो.
नर्मदा नदी ही जिवंत मानली जाते. तिच्या सहवासात ,तिच्या तीरावरील रम्य अनुभव वाचतांना नकळत आपणही मी कोण? विचार करू लागतो......
तत्वमसि आवडली कारण वाचतांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे... वाचा आणि अनुभवा एक उत्कट अनुभव.....
©️रसिका राजीव हिंगे
- Pratima Deshpande
मागच्या आठवड्यात गुजराथी लेखक ध्रुव भट्ट यांच्या तत्वमसि कादंबरीचा अंजली नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला. भारतातील लोकांच्या मनात असलेल्या अनेक समजुती, किंवा शास्त्राने दिलेली आज्ञा म्हणून पाळल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी, मग त्या भोळ्या समजुती असतील किंवा समजुती नसून खरेच ते सत्य असेल किंवा अमुक एक गोष्ट करण्यामागे किंवा न करण्यामागे अमुक अमुक शास्त्रीय कारण आहे, फक्त लोकांच्या समजुतीखातर त्याला पाप-पुण्याचे संकेत दिले असावेत इत्यादी गोष्टींवर अनेकदा चर्चा होताना आपण ऐकतो. तर अशा समजुती किंवा शास्त्राच्या आज्ञा असण्याने आपल्या देशात नेमकं काय झालंय याबद्दल खूप साधेपणाने बोलणारे हे पुस्तक आहे. फार अवजड काही न बोलता, सांस्कृतिक वारशाचे जतन कारण्याबद्दलचा खूप महत्वाचा आणि मोठा विचार या पुस्तकातून प्रभावीपणे मांडलेला आहे.
निसर्गाच्या समीप राहिल्यामुळे आदिवासी माणूस जास्त संवेदनशील असतो आणि सजीव-निर्जीव अशा सर्वच घटकांबद्दल त्याला निसर्गतःच खूप ममत्व असते असा अनुभव नायक घेतो. एक वेळ अशी येते की, त्याला प्रश्न पडतो, आदिवासींना सुधारण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे का? आदिवासींना पाहून आणि त्यांचे निरीक्षण करून करून सुरुवातीला त्यांना अडाणी, घाणेरडे समजणारा नायक कशा नकळत त्यांच्यावर प्रेम करू लागतो, त्यांना सुसंस्कृत समजू लागतो. नर्मदा परिक्रमा, आदिवासी लोकसंस्कृती, जंगलात राहताना त्यांच्यापुढे येणाऱ्या अडचणी यांच्याभोवती गुंफलेले कथानक आदिवासींच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकते.
बरेचदा कादंबरी एका विशिष्ट वळणावर येऊन थांबते, मग लेखक आपला विचार मांडून त्या गोष्टीचा समारोप करतो. इथे तसं न होता, कादंबरीच्या शेवटातून अनेक नवीन विचारांची मनात सुरुवात होते. कादंबरीचा नायक अगदी सुरुवातीपासून एका प्रश्नाचं उत्तर शोधताना सापडतो, तो प्रश्न म्हणजे भारतातील सर्व लोकांच्यात असं काय उपजतच आहे जे सर्वांना एका सामान धाग्यात बांधून ठेवते? या प्रश्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याला अनेक वेगवेगळ्या वाटांवरून घेऊन जातो. त्यावेळी अजूनही अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात. कादंबरीच्या नायकाची काही ठाम समजूत झालेली आहे असं ना दाखवता आजूबाजूच्या लोकांचे विचार, आणि त्यातून त्याचं झालेलं विचारमंथन हे आपल्यालादेखील काही विचार करण्यास भाग पडतं, ही यातील सर्वात आवडलेली गोष्ट.
- Ashiwini Gore
` तत्वमसि` ही रूढार्थाने कादंबरी असली तरी ते एक मुक्त चिंतन आहे. ते चिंतन रंजक वाटावे म्हणून त्याला कथेत परावर्तीत केले आहे असे फार तर आपण म्हणू शकतो. ध्रुव भट्ट ह्या प्रसिद्ध गुजराती लेखकाची ही कादंबरी अंजली नरवणे ह्यानी मराठीत अनुवादित केली आहे. गुजराती आणि भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार ह्या कादंबरीला मिळालेला आहे . लेखक म्हणतात ही कादंबरी म्हणजे नर्मदा नदी, तिच्या आजूबाजूचे आदिवासी , तिच्या काठच्या मंदिरांमधून किंवा आश्रमांमधून राहिलेले परिक्रमावासी ह्या सगळ्यांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि काही माझ्या स्वतःच्या कल्पना ह्याचे फळ आहे.
भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडण्याऱ्या नर्मदेच्या काठी ही कथा आकार घेते. कथेला नायक नाही, वाचकच त्याचा नायक होतो इतकी ही कथा आपली होऊन जाते. बालपणीचा काही काळ हा आपला नायक भारतात राहिलेला असतो नंतर मात्र तो परदेशात जातो आणि जवळजवळ १८ वर्षानंतर परत येतो, ह्या मधल्या काळात तो आपल्या ह्या मायभूमीपासून दुरावलेला असतो त्यामुळे त्याचे प्रोफेसर रुडॉल्फ जेव्हा त्याला आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासासाठी भारतात जायला सांगतात तेव्हा तो काहीसा नाखूष होतो, त्यांच्याकडे बरीच रदबदली करून बघतो, दुसऱ्या एका योग्य सहकाऱ्याचे नाव सुचवतो परंतु काहीही उपयोग होत नाही. `सुप्रिया भारतीय` ह्या तिथे आदिवासींमध्ये काम करणाऱ्या एका स्वयंसेविकेचे नाव प्रो. रुडॉल्फ त्याला सांगतात तेव्हा तर ही कोणीतरी ६०-६५ वर्षाची चष्मा घालणारी, खादी वापरणारी, भाषणं देणारी स्त्री असेल अशी त्याची खात्रीच होते. शेवटी ` तू आदिवासींमध्येच रहा, तिथे एक शाळा काढ, त्यांचं रोजचं आयुष्य बघ आणि त्याची टिपणं काढून मला पाठव` ह्या बोलीवर त्याची रवानगी भारतात होते. भारतातला त्याचा पहिलाच रेल्वेप्रवास म्हणजे बालपणीच्या आठवणींचं मोहोळ असतं. लहान वयातच आईला पारखा झालेल्या त्याने नंतरचं एक वर्ष गुजरातमधल्या एका छोट्या खेड्यात नानीजवळ काढलेलं असतं. सकाळी उठल्याबरोबर झालेलं नर्मदेचं पाहिलं दर्शन त्याला त्याच्या बालपणीच्या काळात घेऊन जातं. परदेशातल्या खाजगीपणाची सवय झालेल्या त्याला माणसं ओळख नसतांना इतकी एकमेकांशी कशी बोलतात,किंवा काय काय बोलू शकतात, ह्याचं भयंकर आश्चर्य वाटतं ` भारतीयत्व` म्हणून जे काही आहे ते म्हणजे काय ह्याची ओळख त्याला व्हायला लागते. भोपाळहून पुढे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जायला म्हणून आपला नायक रेल्वेत बसतो आणि आदिवासींशी त्याची पहिली तोंडओळख होते. आपल्यातच मग्न होऊन गाणाऱ्या एका आदिवासी युवतीला बघून नायकाला प्रश्न पडतो ` अनेक गोष्टींचा अभाव असतांना , अंगभर कपडे आणि पोटभर अन्न नसतांना सुद्धा ही मुलगी एवढी आनंदी कशी ?` सुखाची हिची व्याख्या नक्की आहेतरी काय ?. ही वनकन्या म्हणजे पुरिया पुढे नायकाला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जाते. कादंबरीत मध्ये मध्ये येणारी आदिवासींची भाषा खूप गोड वाटते , अर्थात लगेच त्याचा अनुवाद केलेला आहे त्यामुळे कथा सहज पुढे जाते. ह्या निर्मनुष्य स्थानकावर काही वेळ वाट बघून नायक एकटाच पुढे निघतो, इथला निसर्ग हळूहळू त्याच्या नजरेसमोर जणू उलगडत असतो. एका मोठ्या रायण वृक्षाच्या सावलीत बसल्यावर `मुनि का डेरा` आणि `बित्तुबंगा` असं लिहिलेले दोन दगड आणि त्यावरची व्याधाची आकृती त्याचं लक्ष वेधून घेते आणि लगेच तो आपली संशोधक मैत्रीण ल्युसी हिला त्याबद्दल कळवतो. थोड्यावेळाने त्याला घ्यायला येणारे गुप्ताजी आपल्याबरोबर सुप्रिया भारतीय ला घेऊन येतात आणि तिला बघून आपला नायक आश्चर्यचकित होतो, आनंदी, तरुण सुप्रिया बघून हिला काय दुःख असेल म्हणून ही इथे येऊन राहतेय ? असा अगदी सामान्य माणसाला पडेल असा प्रश्न त्यालाही पडतो. अतिशय हुशार, तंत्रकुशल अशी ही चुणचुणीत सुप्रिया आदिवासींची, गुप्तांजींच्या परिवाराची खूप जवळची असते, त्या साध्या लोकांनी तिचं नावही साधं सोपं करून टाकलेलं असतं, ते तिला `सुपरिया` म्हणत असतात. आपला नायक सुपारियाला बित्तुबंगा बद्दल विचारतो पण ती त्याला ताकास तूर लागू देत नाही, गुप्तजींबरोबर राहून तो इथली सगळी माहिती घेत असतो, इथल्या लोकांचे आचारविचार,त्यांची भाषा , संस्कृती ह्याबद्दलचं त्याचं गूढ मात्र वाढतच जात असतं. नकळत तो ह्या सगळ्यांमध्ये रमायला लागतो, कुठेतरी ह्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी समान धागा आहे हे त्याला जाणवायला लागतं. इतकी वर्ष विस्मरणात गेलेलं कच्छच्या छोट्याशा खेड्यातलं त्याचं एक वर्ष पुनः पुनः त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायला लागतं, त्याची नानी, मामा, मामी ,त्याच्या नानाजींचे एक चुलतभाऊ जे मंद बुद्धीचे होते ह्यांचं एकमेकांशी जोडलेलं असणं, एकमेकांना जपणं, सांभाळून घेणं, सहजपणे सामावून घेणं आज तो परत नव्याने अनुभवू लागतो. नायक म्हणतो तसं ऐशोआराम, भरपूर संपत्ती, पद, प्रतिष्ठा हे सगळं मिळवूनही सुखी, सुंदर नसलेले चेहरे आपल्या अवतीभवती सतत वावरत असतात किंवा बरेचदा तर आपणही त्यात असतो मग ह्या सगळ्याचाच अभाव असतांना इथे ह्या जंगलात सुपरियाच्या, पुरियाच्या, आदिवासींच्या किंवा लहानपणी पाहिलेल्या वरवर कठोर भासणाऱ्या नानीच्या रुपात एवढं नितळ निर्मळ सौन्दर्य कसं काय असू शकतं ?...ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल त्याला आदिवासींच्या सहवासात मिळत जाते. बित्तुबंगा ह्या नावाबद्दलचं गूढ उकलतं हे दोघे आदिवासी भाऊ असतात पुढे एका नरभक्षीण वाघिणीच्या हल्ल्यात त्यातला एक मरण पावतो , आपल्या भावाचा बळी घेणारी ही वाघीण नंतर बित्तुच्या मदतीने वनविभागाच्या जाळ्यात पकडल्या जाते, सुडाने बेभान झालेला बित्तु तिला खरंतर ठार मारणार असतो पण ही वाघीण जेव्हा थोड्याच काळात पिल्लाला जन्म देणार असते हे त्याला कळतं तेव्हा तो सहज तिला मुक्त करतो. इतक्या सहजपणे क्षमा करण्याची वृत्ती कुठलेही तथाकथित शिक्षण न घेतलेल्या बित्तुकडे कुठून येतात ह्याचं नायकाला महादाश्चर्य वाटतं. मध्ये एकदा नायकाला एक छोटासा अपघात होतो आणि बेशुद्ध अवस्थेत नर्मदा तीरावरच्या गणेश शास्त्रींच्या आश्रमात त्याच्यावर उपचार होतात गणेश शास्त्री , गुप्ताजी किंवा सुप्रिया हे सगळे आदिवासीसाठीच काम करणारे असतात. गणेश शास्त्रीशी इथला धर्म,संस्कृती ,परंपरा रीतिरिवाज ह्या विषयांवर भरपूर चर्चा होते. शास्त्रीजी त्याला समजावून सांगतात तुला इथे काम करायचे असेल , इथल्या लोकांच्या चुकीच्या समजुती बदलायच्या असतील, त्यांना काही नवं द्यायचं असेल तर आधी तुला त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांच्याशी मैत्री करावी लागेल, हळूहळू नायकाच्या विचारात परिवर्तन होऊ लागतं तो बदलू लागतो, त्याला ह्या लोकांबद्दल आत्मीयता वाटायला लागते, स्वयंसेवकांच्या मदतीनी तो इथे शाळा, मधुमक्षिका पालन असे छोटे उद्योग सुरु
करतो.
अतिशय साध्या वाटणाऱ्या ह्या आदिवासींची क्रूर बाजू सुद्धा पुरियाच्या निमित्ताने त्याच्या समोर येते तेव्हा तो हबकतो, अल्लड निरागस पुरीयाला काही कारणानी `डाकिण` ठरवलं जातं आणि मग अशी डाकीण नको म्हणून सगळे आदिवासी तिला ठार मारायला निघतात अशावेळी `साठसाली` ह्या आदिवासी जमातीची प्रमुख `कालेवाली माँ ` तिथे पोहचते आणि हकनाक बळी जाणारी पुरीया वाचते, तेव्हापासून हे `साठसाली` कोण आणि हि नखशिखांत बुरख्यात वावरणारी ` कालेवली माँ` काय प्रकरण आहे ह्याबद्दल नायकाला उत्सुकता वाटायला लागते . आदिवासींच्या सांगण्यानुसार साठसाली हि जंगलातल्या आतल्या भागात राहणारी अतिशय कट्टर अशी आदिवासी जमात आहे आणि त्यांच्या भागात कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही, `कालेवली माँ ` चा रहस्यभेद मात्र लगेच होत नाही.
नायकाला आता ह्या भागात येऊन 2,3 वर्ष झालेली असतात, उन्हाळ्याच्या दिवसांमधे रखरखीत निष्पर्ण झालेल्या ह्या जंगलात आग लागते आणि ही आग हा हा म्हणता पसरत जाते, हा वणवा विझवण्याच्या कामी सरकार, तिथे काम करणारे स्वयंसेवक, आदिवासी सगळे एकत्र येतात, त्यात येणारी छोटी खेडी, आदिवासी पाडे रिकामी करायला लागतात, नायकाला हे संकट नवं असतं पण आता तो इथे सरावलेला असतो, ह्या प्रसंगामुळेच इथल्या प्राथमिक शाळेच्या ध्येयवेड्या शिक्षकाची आणि त्याची मैत्री होते. दरम्यानच्या काळात ह्या सगळ्या घटनांची माहिती, त्याचं निरीक्षण, अनुमानं हे सगळं तो जमेल तसं प्रो. रुडॉल्फ आणि ल्युसी ह्यांना पाठवत असतो, आपल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून ल्युसी इथे येते, ह्या भागात फिरते तिला हवी ती माहिती गोळा करते, तिच्यासोबत फिरताना नायकाला कालेवाली माँ ला भेटण्याचा योग येतो ही कालेवाली माँ म्हणजे दुसरीतिसरी कोणी नसून सुपरियाची आई असते, ह्याच प्रवासात ` जिंदा सागबान ` चे सुद्धा नायकाला दर्शन होते. दैवी भासणारा हा सागचा सदाहरित वृक्ष म्हणजे जणू ह्या संपूर्ण जंगलाचा पुराणपुरुष असतो, अवघ्या चराचर प्राणिसृष्टीचा पोशिंदा असतो. तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं वाईट काम कधीही केलं नसेल तर तुम्हाला इथे कुठलाही धोका नाही उलट तुम्ही ह्या वृक्षाच्या छत्रछायेत अगदी सुरक्षित आहात अशी आदिवासींची समजूत असते. ल्युसी ह्या सगळ्याच प्रकरणाकडे खूप तार्किक,वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असते अर्थात नायकाचा सुरवातीचा दृष्टीकोन काही फारसा वेगळा नसतो पण आता इथे राहून तो ह्या सगळ्याबद्दल जास्त खोलात जाऊन विचार करू लागतो आणि त्यामुळेच ल्युसी जेव्हा त्याला इथून परतण्याबद्दल, स्वतःच्या नात्याबद्दल विचारते तेव्हा तो तिच्याकडे ह्या सगळ्यासाठी वेळ मागतो. नर्मदा ही निव्वळ नदी नाही तर ती एक जिवंत अनुभूती आहे हे इथल्या लोकांचा मानणं त्यानं सुरवातीला नाकारलेलं असतं पण त्याला आलेल्या काही अनुभवांवरून , अचानकपणे घडलेल्या परिक्रमेवरून तो गोंधळून जातो. शूलपाणीच्या जंगलात येणाऱ्या नायकाला तिथले आदिवासी लुटतात, त्याच्याजवळचं होतं नव्हतं ते सारं काढून घेतात आणि वरून हा नर्मदा मैय्याचा आदेश आहे असं सांगतात, नायक म्हणतो का असा आदेश देत असेल मैय्या ? आधीच निष्कांचंन, थकलेल्या जीवाकडून त्यांना काय मिळणार? पण जिवंत राहण्यासाठी तडफडणारा हा उपाशीतापाशी वस्त्रविहीन प्रवासी जेव्हा इथून बाहेर येईल तेव्हा `अहं ब्रह्मस्मि। ` हा त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होईल आणि `तत् त्वं असि।` अर्थात ` ते तू आहेस` ह्या सृष्टीत जे काही दैवी आहे ते अंशरूपाने तुझ्यात आहे आणि जे तुझं आहे, तू प्राप्त केलं आहेस तेच ह्या सृष्टीत परत जाणार आहेस हे ज्ञान त्याला प्राप्त होईल. आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात नायकाच्या मनातल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात, आपलं हरवलेलं मुल परत आल्यावर आई जसे त्याचे सगळे हट्ट पुरवेल तसंच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नर्मदा मैय्या सुद्धा त्याला स्वतःच नाव सांगून दर्शन देते आणि इथे कादंबरी संपते .
ही कादंबरी वाचतांना आपल्याला सुद्धा अनेक प्रश्न पडतात, इतके विविध धर्म, समाज ,पंथ, जाती ,उपजाती त्यांचे आचारविचार असणाऱ्या आपल्या देशात असं काय आहे की जे भारतीय म्हणून आपल्याला इतकी शतकं एकत्र ठेवतय, हो अगदी एक देश म्हणून अस्तित्वात येण्याच्या अधीही आपण कुठल्यातरी सुत्राने बांधलेलो होतोच ते सूत्र वरीलपैकी काहीच नव्हतं तर कादंबरीत म्हटल्याप्रमाणे ते सुत्र होतं निसर्गाचं, त्यानं सुरु केलेल्या परंपरांचं, त्यानं रुजवलेल्या संस्कृतीचं, त्यानं दिलेल्या क्षमा, दान , परतफेड ह्या संस्कारांचं, धर्म हा कधीच इथल्या लोकांसाठी महत्वाचा नव्हता धर्म म्हणजे जीवन चांगल्या तऱ्हेने जगण्यासाठी सांगितले गेलेले नियम. इतका सरळ अर्थ सांगून कादंबरीचा शेवट होतो अर्थात आपल्या मनात मात्र ती सुरुच राहते कारण चिंतन , विचार ही एक प्रक्रिया आहे आणि तेच आपल्या जीवंतपणाचं लक्षण आहे .
© अश्विनी गोरे
- विंग कमांडर प्रभाकर सहस्रबुद्धे
‘तत्वमसि’ ही कादंबरीचे अतिशय प्रभावी लेखन अन् तितकाच प्रभावी अनुवाद.
भारतीय संस्कृतीमागचे मूळ विचार, परंपरांमागचे तत्त्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात मनावर बिंबवणारं लिहिलेलं कुठंच नसेल.
- DAINIK TARUN BHARAT 05-10-2003
अठरा वर्षे परदेशात राहून ‘तो’ परत आलाय. भारतातल्या ग्रामीण भागात जाऊन ‘तो’ राहतो. तिथल्या आदिवासींच्या अडीअडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यांची मानसिकता, श्रद्धा यांचा प्रथम वैचारिक (व्यावहारिकपणे) विचार करतो. हळूहळू ‘तो’ या लोकांमध्ये गुंतत जातो. त्यांचे जीवन त्याचे कधी होते ते त्यालाही कळेनासे होते. नर्मदेकाठी राहून या आदिवासींच्या राहणीमानाचा शोध घेण्यासाठी ‘हा’ इकडे आलेला असतो. या लोकांची संस्कृती, परंपरा, नर्मदा तिची रूपे यातून त्यांच्या मनात प्रश्नांची द्वंद्वे निर्माण होतात. ‘मी कोण आहे?...’ ह युगानुयुगे मानवाला पडणारा सवाल त्यालाही पडतो.
‘तत्त्वमसि’ ही गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची कादंबरी आहे. तिचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ही कादंबरी आणि ‘समुद्रन्तिका’ या भट्ट यांच्या दोन कादंबऱ्यांना गुजरात साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. विषयाचं नाविन्य हे ध्रुव भट्ट यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. या कादंबरीत रूढार्थाने प्रेमकथा वगैरे नाही. एखाद्या कुटुंबाची कहाणीही नाही. अगदी ‘त्याचं नावही इथं लिहिलेलं नाही. समोर येतं ते साधं सुधं नर्मदेकाठचं आयुष्य. तिथल्या आदिवासींचं जिणं आणि त्याचं या साऱ्या पसाऱ्यात वावरणं.
नर्मदेची परिक्रमा याआधी मराठी वाचकांनी गोनिदांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ तून अनुभवली आहे. इथे समग्र परिक्रमा नसली तरी वळणावळणावर नर्मदा भेटत राहते. तिचे अस्तित्व सातत्याने जाणवणारे आहे. यातली पात्रे, त्यांचे सारे चित्रण हे नजरेसमोर उभे राहते. नर्मदेकाठची भाषा, तिथले रितीरिवाज सहजगत्या चित्रित होतात.
आदिवासींच्या गूढ चित्रांनी ‘त्याला’ काही प्रश्न पडतात. पुनर्जन्म, हा जन्म त्रिकालाचे ज्ञान असे नाना प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. हे सारे प्रश्न उरात घेऊन तो आदिवासींच्या पाठीशी उभा राहतो. शेवटपर्यंत ही कादंबरी मनावरची पकड कायम ठेवते. कथाओघात येणारे साधे आदिवासी, त्यांची संस्कृती दिसून येते. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणारी नर्मदा जिवंत मानली जाते. तिच्या परिसरात घडणाऱ्या अद्भूत रम्य घटना या विचारांबरोबरच मनोरंजनही करतात. मेहता पब्लिशिंग हाऊसने अन्य भाषांतले समृद्ध साहित्य मराठीत आणण्याचा वसा उचलला आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्यच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यावरची मानवाकृती, गूढ रेखाटने लक्ष्यवेधी आहेत. ‘मी कोण?’ या अदिम सत्याचा शोध कथानायकाबरोबर आपणही घ्यायला लागतो.
-राधिका कुंटे
- DAINIK TARUN BHARAT 20-02-2005
भारतीय संस्कृतीची वैभवगाथा...
गुजराती साहित्यांत ध्रुव भट्ट यांचे नाव आहे. त्यांच्या ‘समुद्रान्तिके’ या पहिल्या कादंबरीला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘तत्त्वमसि’ ही त्यांची दुसरी कादंबरी. यालाही गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
विषयाचे पूर्ण नावीन्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रेमकथा नाही. एका कुटुंबाची कथा नाही. खरंतर आपल्या कथानकाचे नावही आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही.
ही कादंबरी लेखकाने नर्मदेला अर्पण केली आहे. भारतवर्षाच्या उत्तर व दक्षिण भागांना जोडणाऱ्या, एकत्र बांधणाऱ्या त्या भवनमोहिनी नर्मदेस अशी ही अर्पण पत्रिका आहे.
लेखकाचे या देशावर, या देशाच्या सुंदर निसर्गावर आणि येथील अशिक्षित, अडाणी वाटणाऱ्या पण ज्यांच्या श्रद्धेने अन् प्रेमाने मन भारावून जाईल अशा भोळ्याभाबड्या जनतेवर त्यांचे प्रेम आहे. पराकोटीचे प्रेम आहे. वेगळ्या भाषा, वेगळे रीतीरिवाज, वेगळे धर्म अशा अनेक भिन्नता असताना या देशाच्या रहिवाशांकडे असे काय आहे की जे आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा लेखकाचा सतत प्रयत्न चालू असतो. या जिज्ञासेनेच लेखकाला ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा दिली आहे. पूर्ण कादंबरीचे ‘प्रथमपुरुषी’ लेखन आहे.
अठरा वर्षांनी कथानायक नर्मदेच्या खोऱ्यात, आदिवासी भागात चालू असलेल्या कामांत भाग घेण्यासाठी संशोधन करण्यासाठी येतो. इथे काम करताना त्याला अनेक प्रश्न पडतात. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना या विविध लोकांमधील श्रद्धा व प्रेम त्याला कायम बुचकळ्यात टाकते.
नर्मदा ही एक अशी जलवाहिनी आहे जिला या देशातले लाखो लोक ‘जिवंत’ समजतात. वर्षानुवर्षे अनेक हालअपेष्टा सोसून या देशांतले किती लोक नर्मदेची परिक्रमा करतात. १२०० मैल लोक नर्मदेची परिक्रमा करतात. १२०० मैल लांब पसरलेल्या या नदीची अशी परिक्रमा करताना ती सतत आपल्याबरोबर आहे. ती आपले रक्षण करील मार्ग दाखवील, आसरा देईल एवढेच काय, प्रत्यक्ष दर्शनसुद्धा देईल अशी या सर्वांची श्रद्धा असते. तीरावरची माणसे या परिक्रमावासींची सर्व सोय बघतात. सेवा करतात कारण ऋषीमुनींनी घालून दिलेली हजारो वर्षांची ही परंपरा खंडित होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. सारे रेवाखंड हे काम करीत असते. अर्धपोटी आदिवासीसुद्धा!
त्या भागात लहानाची मोठी झालेली, कॉलेज शिक्षण घेऊन पुन्हा आदिवासींसाठी काम करणारी सुप्रिया (त्यांच्या भाषेत सुपरिया) या अडाणी, घाणेरड्या, गावंढळ लोकांवर इतकं मनापासून प्रेम कसं करू शकते, याचे त्याला सुरुवातीला खूप आश्चर्य वाटते, पण नंतर त्याचे एकेक गुण जसे त्याच्या लक्षात येतात तसा तोही मनामध्ये त्यांना मानायला लागतो. सुप्रियाच्या कामाचे अनेक प्रसंग त्याला आश्चर्यचकित करतात. एका स्त्रीवर डाकीण झाल्याचा आरोप होतो. त्यातून तिचा मृत्यू टाळून त्यांना पटेल अशा मार्गाने दूर अंतरावर तिचे होणारे पुनर्वसन. हा प्रसंग कथानायकाच्या मनावर खूप परिणाम करतो.
दारावरून जाणाऱ्या सुपरियाला अडवून एक अस्थिपंजर असा म्हातारा आदिवासी, जेवण म्हणून तिला मिठाचे दोन खडे (जे त्याच्या जवळचे सर्वकाही असते.) देतो. ते मीठ खाल्ल्यावर आता माझे जेवण झाले. आता मी जेवणार नाही. असं म्हणणारी सुप्रिया आपल्याही मनात ठसते.
वृक्षांमध्ये असणारा वृक्षदेव आपले रक्षण करतो. ही आदिवासींची श्रद्धा सुरुवातीला कथानायकाला योग्य वाटत नाही, पण जेव्हा त्याला स्वत:लाच नदीच्या जवळून चालताना अभय मिळते, तेव्हा त्यांची श्रद्धा चूक कशी असा त्याला प्रश्न पडतो.
मृगनक्षत्रातला व्याधाचा तारा हा जोडतारा आहे. (एकाऐवजी दोन तारे) हे त्या आदिवासींना कसे कळले असेल? याचा त्याला थांग लागत नाही. कर्ज घेणारे आदिवासी ज्या प्रामाणिकपणे व्याज व मुद्दल फेडत असतात हे बघून कथानायकाला आश्चर्य वाटते. घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे परत करणे हाच त्याचा धर्म. हीच त्याची संस्कृती जी साधी, सरळ समज लोकांच्या मनात आहे ती प्रामाणिक वृत्ती त्याच्या मनाला भारावून टाकते. हीच प्रामाणिक वृत्ती बाबरियाची बायको दाखवते. कामाच्या ठिकाणी अपघात झाल्याने नवरा हॉस्पिटलमध्ये आहे, असे कळल्यावर ती कथानायकाला सांगते ‘तुमचे पैसे मी मजुरी करून फेडीन.’
नरभक्षक वाघाच्या हल्ल्याने मोठा भाऊ मरतो. तेव्हापासून लहान भाऊ वाघाच्या मागावर असतो. वाघ एकेठिकाणी डोके अडकून बंदी हातो. त्याच्याजवळ मारायला जाऊनही तो आदिवासी वाघाला सोडून देतो कारण ती वाघीण असते. ‘आई इथे, बच्चे जंगलात’ अशी ताटातूट नको असे त्याला वाटते. हा सर्वच प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी लिहिला गेला आहे.
अशा कितीतरी प्रसंगांतून जाताना शेवटी कथानायकाला वाटत राहते की ‘कोण शहाणे? कोण सुसंस्कृत?’ मी त्यांना शिकवतोय की त्यांच्याकडून शिकतोय.
मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करण्यासाठी अवघड नाही चढून मध काढणाऱ्या आदिवासींचे मतपरिवर्तन व्हावे म्हणून अतिशय धीराने काम करणारा लक्ष्मण शर्मा, बनात लागलेला वणवा, लोकांच्या पुनर्वसनासाठी झटणारे, विष्णू व विद्या, त्यांना फुलशेती शिकवण्यासाठी चर्चचे काम सोडून आलेले थॉमस, घनदाट अरण्यात वसलेली टोळी, त्यांचे नियम अशा अनेक घटनांचा पट या कादंबरीत विणला आहे.
आपल्या संस्कृतीवरील भाष्य गणेशशास्त्री या व्यक्तिरेखेने अतिशय सहृदयतेने केले आहे. सप्तचिरंजीवांपैकी (महर्षी व्यास) बियास मुनी कधीही आपल्या दारी येतील म्हणून त्यांच्या बसण्याची सोय, पायाला लावायला तेलाची सोय करणारी ही प्रजा आणि त्यांची बांधिलकी मनाला भावते.
कथानकाची परदेशी मैत्रीण हे सर्व अद्भुत बघायला इथे येते. ती एकदा म्हणते ‘एवढं मोठं हे विश्व एकाच मूलतत्त्वापासून निर्माण झालंय हा विचार किती रोमांचकारी आहे नाही?’ हाच अनुभव त्याला नर्मदातीराने चालताना येतो. त्याला वाटते, ‘या ठिकाणी जड व चेतन वेगळे नाहीत. हे खडक, हे वृक्ष मी आणि नर्मदा सर्वजण प्रत्येक क्षणी एकमेकांच्या रूपात बदलत आहोत.’
ही कादंबरी सुरुवातीपासूनच मनाची पकड घेते. नर्मदेच्या खोऱ्यातील अरण्यं, निसर्ग, तेथे वसणारे आदिवासी, त्यांची हिंदू धर्माची नव्हे, धर्मातीत असणारी आणि भारतीय संस्कृती या प्रदेशातील अद्भुत जीवनदायीनी नर्मदा आणि तिच्या कुशीत विसावलेली तिची लेकरं, यांची ही कहाणी वाचून झाल्यावरही मनात रेंगाळते.
या साऱ्याचे श्रेय कादंबरीला आहे. तसेच अनुवादालाही आहे. अतिशय सुंदर, तरल भावविश्व, निसर्गाची जादू अन् सामान्य माणसांचा विश्वास या साऱ्याचे अद्भुत दर्शन या अनुवादाने झाले आहे. संवादात वापरलेली छोटी गुजरातील वाक्येही कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोचवतात. सर्वांना मनापासून आवडेल अशीच ही कादंबरी आहे.
-रजनी मुकुंद वैद्य
- DAINIK LOKSATTA 30-11-2003
नर्मदापुत्राच्या संघर्षाची कथा…
गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळलेली, तत्त्वमसि’ ही ध्रुवभट्ट यांची कादंबरी परदेशी वास्तव्य करणारा, मूळ भारतीय वंशाचा एक आधुनिक तरुण आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतो. भारताच्या संस्कृतीविषयी, परंपरांविषयी त्याच्या मनात काही ठाम पूर्वग्रह आहेत. या अडाणी लोकांना जरा सुशिक्षित करायला पाहिजे. ही त्याची विचारपद्धती आहे. पण नर्मदेच्या काठावरची निसर्गाच्या हातात हात घालून जगणारी आदिवासींची जीवनपद्धती त्याला त्याचे पूर्वग्रह सोडायला भाग पाडते. भारताची परंपरासिद्ध संस्कृती आणि आधुनिक पाश्चात्य जीवनशैली यांची द्वंद्वे त्याच्या मनात उभी राहतात. स्वत:च्या बालपणाच्या हळव्या स्मृती, ठाम झालेले पूर्वग्रह आणि चित्ताला शांतता देणारी आदिवासी संस्कृती यांच्या घुसळणीतून तो स्वत:च्या आयुष्याबद्दलचे प्रश्न सोडवू पाहतो. अखेर नर्मदामैय्याच्या कुशीत एक परिक्रमावासी म्हणून स्वत:ला झोकून देतो.
त्याच्या मनातल्या संघर्षाची ही गोष्ट ती वाचताना ‘नर्मदा बचाव’ आंदोलनातल्या आदिवासींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काहीशा गूढ पद्धतीने उलगडत जाणारा हा अनुवाद मराठीतून वाचताना अजिबात उपरा वाटत नाही.
-मेघना