- BHAUSAHEB PAWAR
"काबुलीवाल्याची बंगाली बायको"
काल हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तकं वाचूनच पूर्ण झाले. एका भारतीय महिलेली कहाणी आणि ती ही अफगाणिस्तान सारखा देशामधील खेड्यातील.
बंगाल मधील हिंदू कुटुंबातील एक सुशिक्षित मुलींनी सर्वांचा विरोध झुगारून एका परदेशी अफगाणिस्तान मधील तरुणाशी लग्न केलं. सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानमधील एका छोट्याशा गावात मोठ्या विश्वासाने ती तिकडे गेली आणि साधारण आठ वर्ष बंदिवासात तिला अफगाणिस्तानमध्ये राहावे लागले. तिला आलेले अनेक बरे भुरे अनुभव या पुस्तकांमध्ये सांगितले आहेत. अफगाणिस्तानतील जीवन, शेती पद्धती, जीवनमान कसे आहे.तालिबान परिस्थितीत हे सर्व या पुस्तकात सांगितलेला आहे आणि आठ वर्षानंतर परत सुस्मिता बॅनर्जी ( भारतात आलेले आहे दोन-तीन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न भारतात येण्यासाठी केलेले प्रयत्न या पुस्तकात दिलेले आहेत.
- Samir Chavan
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
- संदीप रामचंद्र चव्हाण
घरातील सर्वाचा विरोध झुगारून २ जुलै १९८८ साली बंगाली कुटुंबातील एका सुशिक्षित हिंदू मुलीने एका अफगाणी मुसलमान तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती नवऱ्याबरोबर मोठ्या विश्वासानं गेली. त्यानंतर थोड्या अवधीतच तिला काहीही पूर्वकल्पना न देता तिचा नवरा तिला अफगाणिस्तानातच सोडून भारतात आला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की या देशात येण्यासाठीचा मार्ग आहे, पण बाहेर जाण्यासाठीचा नाही. सासरच्या लोकांना भेटायला म्हणून गेलेली ती तरुणी संपूर्ण देशच जणू तुरुंग असलेल्या अफगाणिस्तानात जवळपास आठ वर्षे अडकून पडते. या बंदिवासात तिला अनेक भलेबुरे अनुभव येतात. अफगाणिस्तानातील स्त्रियांचे यातनामय जीवन, अंधारात चाचपडणाऱ्या लहानग्यांचे बालपण, मोठ्या कुटुंबातील गुंतागुंतीचे नातेसंबंध इत्यादी गोष्टी तिला समजतात. तिथल्या आठ वर्षाच्या काळात तिने अनेक हालअपेष्टा, शारीरिक मानसिक छळ सोसला तरीही तिची भारतात परत जाण्याची तीव्र आकांक्षा मात्र कमी झाली नाही. भारतात पळून जाण्याचा फसलेला तिचा पहिला प्रयत्न आणि तरीही हार न मानता जीव धोक्यात घालून पुन्हा पळून जाण्याचा केलेला प्रयत्न यातून तिच्या धैर्याची कल्पना येते. भारतात पळून जाताना शत्रू समजलेल्या (पाकिस्तानी) लोकांनी तीला केलेली मदत आणि पाकिस्तानातील आपल्या (भारतीय) लोकांनी तिला दिलेली मानहानीकारक वागणूक तिच्यासह वाचकालाही अस्वस्थ करते.
तालिबानसारख्या धर्मांधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार अनुभवलेल्या सुश्मिता बॅनर्जी यांच्या जीवनचरित्रातील एक संघर्षपूर्ण भाग म्हणजे `काबुलीवाल्याची बंगाली बायको` हे पुस्तक होय. त्याकाळी अनेक बंगाली मुली लग्न करून अफगाणिस्तान गेल्याने तिथे अडकून पडल्या होत्या असे या आत्मचरित्रातून समजते. सध्या लव्ह जिहादबद्दल देशात खूप चर्चा आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तीस-पस्तीस वर्षांपूर्वीही हा प्रकार चालू होता याची खात्री पटते. शिवाय अफगाणिस्तानातील विदारक स्त्री-जीवनाच्या सत्याचे दर्शनही घडते!!
अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तालिबानने ५ सप्टेंबर २०१३ रोजी अफगाणिस्तानातील राहत्या घराबाहेर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या केली. या पुस्तकात फक्त अफगाणिस्तानातून भारतात पलायन करण्यापर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे. भारतात परत आल्यानंतर काय होते? त्या पुन्हा अफगाणिस्तान का जातात? परक्या देशात सोडून गेलेल्या नवऱ्याबरोबर पुन्हा त्या का जुळवून घेतात? इत्यादी माहिती या पुस्तकात नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.
~संदीप रामचंद्र चव्हाण
- DAINIK SAMANA 02-05-2004
सुस्मिता बॅनर्जी यांच्या ‘काबुलीवाला बंगाली बरू’ या बंगाली पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आपल्या आयुष्यातील काही घटना मांडल्या आहेत. एका अर्थाने हा तिच्या चारित्र्याचा काही अशं आहे. बंगालमधील या हिंदू ब्राह्मण कुटुंबातील तरुणीने अफगाणिस्तानातील मुसलमान तरुणाशी विवाह केला. पतीप्रेमापोटी लेखिका सासरच्यांना भेटायला अफगाणिस्तानात गेली. पण तिथे तिची अवस्था तुरुंगातील कैद्याप्रमाणे झाली. हिंदुस्थानातील सुशिक्षित तरुणीची मानसिकता आणि आधुनिक जगापासून खूप दूर असलेल्या असंस्कृत अशिक्षित माणसांमधील संघर्षाची ही कहाणी आहे. आठ वर्षे कैद्याप्रमाणे काढून शेवटी तालिबान्यांना शौर्याने तोंड देऊन ती हिंदुस्थानात परतली. धर्माला जीवनात आणि समाजात श्रेष्ठ स्थान आहे या विचारावर लेखिकेचा विश्वास आहे. पण धर्माच्या नावाखाली पराकोटीची बिर्भत्सता आणि दहशत निर्माण करणाऱ्या निर्विकारपणे माणसांची हत्या करणाऱ्याचे खरे रूप समाजासमोर यावे या हेतूने तिने हे अनुभव लिहिले आहेत. पुस्तक वाचताना तिच्या अपार मनोधैर्याने वाचक थक्क होतो. वागणूक तिथे मिळाली त्या परिस्थितीत सर्वसामान्य स्त्री जगूच शकली नसती. परत येण्याची गोष्टच सोडा. असामान्य धैर्याने मिळेल ते सहकार्य घेत खऱ्याखोट्याचा आधार घेत घेत ती अखेर हिंदुस्थानात येऊन पोहोचते. या कथानकाचा ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपट यापूर्वीच येऊन गेला आहे.
- DAINIK SAKAL 24-04-2005
थरारक, पण करुण...
भाषांतरित साहित्यकृतीसाठी या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या मृणालिनी गडकरी यांचे ‘काबुलीवाल्याची बंगाली बायको’ हे भाषांतरित पुस्तक म्हणजे अस्वस्थ करणारी थरारक, पण करुण कहाणी आहे.
सुस्मिता बॅनर्जी या मूळ बंगाली लेखिकेची ही कथा! रवींद्रनाथ टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या कथेतील रहिमत खान पठाणाची प्रतिमा मनात जपलेली सुशिक्षित बंगाली ब्राह्मण कुटुंबातील ही मुलगी! इंग्लिश घेऊन बी.ए. झालेली, जॉबाजखान, या अफगाण पठाणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून अफगाणिस्तानमधल्या त्याच्या गावी सासरच्या लोकांना भेटायला गेली; पण तिथे तिची अवस्था तुरुंगातल्या कैद्याप्रमाणे झाली. १९८९ ते १९९५ अशी सहा वर्षे काढून नंतर तिथून अक्षरश: पळुन ती भारतात कशी आली, त्याची ही सत्य कहाणी. स्त्री म्हणून तिथे तिला आलेले विलक्षण दारुण अनुभव आणि त्याच वेळी अफगाणिस्तानातील राजकीय अराजक, सामान्य माणसाच्या सामान्य जगण्याची विस्कटलेली चाकोरी, तिथल्या अशिक्षित, अडाणी, छळ सोसणाऱ्या स्त्रिया, मुलांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, गुंतागुंतीचे अनेक नातेसंबंध असणारी खूप मोठी कुटुंबे आणि आर्थिक हलाखी– या सर्वांविषयी लेखिकेच्या मनात येणारे विचार, तद् नुषंगिक भाष्ये– यांची एकत्रित वीा या पुस्तकात दिसते.
‘जंगली, असंस्कृत माणसांच्या हातात आपण सापडलो आहोत,’ याची भयावह जाणीव झाल्यावर परागंदा झालेल्या नवऱ्याच्या पश्चात तिथून पळून जातान तिने दाखवलेले धाडस आणि भारतात परत येण्याची तिची प्रबळ आकांक्षा या कहाणीतून सतत समोर येते.
तिथल्या मूलतत्त्ववादी प्रवृत्तीविषयी, स्त्रियांच्या परिस्थितीविषयी तिला जे आकलन झाले आहे; ते व्यक्त करण्यामागे तिची तळमळ आणि आधुनिक जाणिवा प्रत्ययाला येतात. मात्र ही लेखिका सराईत लिहिणारी नव्हे, हेही जाणवते. त्यामुळे हे जिवंत अनुभवकथन करताना त्यात सलगता राहिलेली नाही. मधूनमधून तिचे लहानपण, लग्नापूर्वीचे दिवस, मित्र-मैत्रिणी, छंद, आवडी यांविषयी जे तपशील वा निवेदन येते त्यामुळे या अनुभवांची तीव्रता उणावते. मात्र तरीही या कहाणीची वाचनीयता कमी होत नाही. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेकडे विचारपूर्वक पाहण्याचा, ती समजून घेण्याचा, परिस्थितीशी जुळवून घेण्याची धडपड करणारा तिच्या जिद्दी आणि चिवट स्वभाववैशिष्ट्यांचा दाट परिचय ही कहाणी करून देते. चुलत सासरे, सासू, गुलमुटी नावाची नणंद, द्रानाइचाचा, कालाखान ही व्यक्तिचित्रे उठावदार झाली आहेत. आसमंचासमोर ठामपणे उभे राहून जाब विचारणे, खुरियेच्या घरात तालिबानींवर बंदूक रोखणे किंवा इस्लामाबादमध्ये साओमदच्या घरातून अतिशय हिकमतीने तिचे निसटून जाणे, या प्रसंगातून लेखिकेचे जगावेगळे धाडस दिसते. पोटतिडकेने मांडलेले जिवंत अनुभव, समर्पक भाष्ये हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य!
-वंदना बोकील-कुलकर्णी
- DAINIK LOKSATTA 03-10-2004
एक अफगाणी कवडसा…
‘बंगाली कुटुंबातील एक सुशिक्षित मुलगी सर्वांचा विरोध झुगारून तिने परदेशी ‘अफगाणी’ मुसलमानाशी लग्न केलं. नंतर इतरांनी परोपरीने समजावूनही सासरच्यांना भेटायला अफगाणिस्तानातील एका छोट्या गावाला मोठ्या आत्मविश्वासाने गेली. या देशात यायला रस्ता आहे. परत जाण्यासाठी नाही हे तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं. काही स्वार्थी, लबाड माणसांपायी तिला बंदिवास घडला. या आठ वर्षांत आलेले अनुभव भेटलेली माणसे आणि तिथलं साकळलेलं जीवन, तसाच प्रचंड विरोध पत्करून भारतात परतणं. अशी ही काही ओळीत संपणारी कहाणी वास्तवात घडलेली आहे.
‘काबुलीवालार बंगाली बड’ ही सुस्मिता बॅनर्जी याची व्यथा आहे. ‘काबुलीवाल्याची बंगाली बायको’ असा तिचा अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी केला आहे. आतापर्यंत विविध प्रसारमाध्यमे, पुस्तकं यातून ‘अफगाणिस्ताना’चं दर्शन आपल्याला घडलं आहे. एका बंगाली मुलीच्या नजरेतून ते या कहाणीत दिसतं. रूढार्थाने सुरुवात -मध्ये- शेवट असा प्रकार इथे नाही. आठवणींच्या हिंदोळ्यांवर लेखिका झुलते आहे. आठ वर्षे तिथे राहूनही स्थिरावल्याची भावना तिच्या मनात नाही. साऱ्या लिखाणात ती व्यक्त होत राहते. कुटुंबात घडलेले प्रसंग तिला माहेरची, जावाजसोबतच्या सोनेरी दिवसांची आठवण करून देतात. मीला सासरी साहेब कामाल अशी हाक मारली जाई. या माणसांशी तिचे असलेले भावबंध, सूड-राग-लोभ सारे काही विविध प्रसंग आणि संवादांतून सामोरे येते. एका सुनेच्या, मुलीच्या आईच्या नजरेतून अफगाणिस्तानातले जीवन या कथेत येते.
कहाणी सापडणारे लेखिकेचे व्यक्तिमत्व करारी, रागीट, जिद्दीचे आहे. तसेच मातृहृदयी, प्रेमळही आहे. मात्र ज्या मुलीविषयी तिन्नी लेखिकेला माया वाटते. तिला न घेता अफगाणिस्तान कसे सोडले, हा प्रश्न उरतो. एकदाचे पलायन असफल होते. मग अखेरीस तालिवानी लेखिकेला दोनदा पळाल्याचे का विचारतात? असे काही प्रश्न पडतात. अफगाणी स्त्रीजीवन, त्यांचा होणारा छळ, वृद्धांची उपेक्षा याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर लेखिका सांगू पाहते. मुखपृष्ठवर हत्यारबंद काळ्या सावल्यांनी वेढलेली स्त्री लेखिकेचे गूज सचित्र करते.
पहिल्या पलायनाच्या वेळी सुटकेच्या आनंदात लेखिका ‘ओ आमार देशेरे माटि...’ (हे माझ्या जन्मभूमी) आणि ‘भारत आमार भारतवर्ष...’ अशी गाणी गाते. या आणि इतरही प्रसंगातून तिचे भारतीयत्व – बंगालीपण ठळकपणे समोर येते. ‘रवीद्रनाथंच्या ‘काबुलीवाला’तील ‘रहमत’मुळे अफगाणिस्तान आणि तिथली माणसं यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती. पण आज त्या रहमतखनाचा तो देश जणू राक्षसी झाला होता. मनात यायचं हाच का तो रहमतखानचा देश?’ तिची करुण कहाणी वाचून उत्तर सापडतं का हे बघायला हवं.
-राधिका कुंटे
- CHATURA MASIK 07-01-2005
तालिबान राजवटीमधील दुर्दैवी भारतीय स्त्री…
अफगाणिस्तान आणि तालिबान राजवट म्हणजे दहशत आणि दहशत! न्याय्य जगाच्या दृष्टिकोनातून अन्याय्य गोष्टी ज्या देशात सतत घडतात असा तालिबान! ‘अफगाणिस्तान’ हा विषय केंद्रवर्ती धरून काही उत्तम पुस्तके मराठीत लिहिली गेली. बुरख्याआडच्या स्त्रिया. अफगाण डायरी आणि ब्रेडविनर, ब्लास्फेमीसारखे अनुवादही साहित्यात आले. संवेदनशील, सहृदय वाचकांना अस्वस्थ अनुभूती देऊन गेले. वृत्तपत्रातून किंवा ‘वर्ल्ड न्यूज’ मधून दिसणाऱ्या अफगाणिस्तानाहूनही अधिक दुर्दैवी अफगाण या पुस्तकांतून चितारला गेला. परंतु या पुस्तकांपेक्षाही वेगळेपण असणारे म्हणून अधिकच अस्वस्थ करणारे आत्मकथन लिहिले आहे. सुस्मिता बॅनर्जी यांनी. अन्य पुस्तकांच्या लेखकांनी ‘तालिबान’ अफगाणिस्तान पाहिलेले आहेत. पण त्रयस्थांच्या दृष्टिकोनातून. त्यांनी स्वत: दुर्दैवीचे दशावतार भोगलेले नाहीत. निरीक्षणातून आणि दुसऱ्यांच्या अनुभवातून अफगाण चितारला आहे. (अर्थात म्हणून या पुस्तकाचे मोल किंचितही उणावलेले नाही) सुस्मिता बॅनर्जी या सुशिक्षित, पुरोगामी विचारांच्या परंतु परंपरा जपणाऱ्या घरातल्या हिंदू मुलीने, घरच्या सर्वांच्या विरोध धुडकावून लावून ‘जाँबाज’ या एका परदेशी अफगाणी - मुसलमान तरुणाशी लग्न केले आणि तिथूनच तिच्या दुर्दैवाची रेघ ओढली गेली. ही रेघ तिला अफगाणिस्तानतल्या पारंपरिक मुसलमान एकत्र कुटुंबात खेचत घेऊन गेली. जाँबाजच्या पाठोपाठ सुस्मिता काबूलजवळच्या अफागाणी घरात गेली. ज्या वेळी काबूलमध्ये जाण्यास लोक कचरत होते. त्याच वेळी नेमकी सुस्मिता काबूलजवळच्या (१८ तासांचा रस्ता) सासरी गेली. सासरच्या माणसांना भेटण्याच्या प्रबळ इच्छेपायीच मी पश्चिम आशियातील या देशात आले होते. या देशातील मध्ययुगीन काळाचा अंधार अजून फिटला नव्हता. या देशात येण्यासाठी रस्ता आहे, पण परत जाण्यासाठी नाही हे मला माहती नव्हते. याबद्दल व्यवहार्य विचार केला, तर असे दिसेल, लेखिका शिक्षित आहे. शिक्षित व्यक्तीला एका विवक्षित पातळीपुरते का होईना विश्वभान असते. त्यातून तिचे ‘जाँबाज’शी प्रेमलग्न झाले आहे. जाँबाजकडून त्याच्या देशातील भयंकर स्थितीची माहिती तिला झाली नाही का? तरुण वयातील प्रेमाचा कैफ! हे एकच उत्तर या प्रश्नाला आहे. कारण केलेल्या चुकांची जाणीव सुस्मिताला झाली आहे. तसे तिने अनेकवार प्रांजळपणे कबूल केले आहे. स्वत:च्या चुकांचे समर्थन तिने कुठेच केलेले नाही. म्हणून या आत्मपर लेखनातला प्रांजळपणा भावतो. तरुण ‘भावुकपणा’त काही प्रतिमा मनात असतात. सुस्मिताच्या बंगाली मनात रवींद्रनाथ टागोरांचा प्रेमळ, दिलेर काबुलीवाला, त्याची अफगाणात राहणारी गोड पोर आणि मिनीवर त्याने उधळलेले वात्सल्य (महाभारतातील काबूल कंदहाराची राजकन्या गांधारी) अशी उत्कट प्रतिमा अफगाणी माणसाची होती. पण प्रत्यक्षात सगळंच वेगळं होतं. जाँबाजपाठोपाठ गझनीला गेलेली सुस्मिता अफगाणीस्तानात गेल्यावर झाली ‘साहेब कामाल’ (तिथे तिचे हेच नाव रुढ झाले.) जाँबाजबरोबर तिथे गेल्यावर पहिला धक्का बसला तो त्याचे घर पाहून. या समाजात बहुपत्नित्वाचीच नाही तर बहुपतित्वाचीही चाल आहे. एकेक स्त्री दोन तीन विवाह करू शकते. शिवाय तिला भरपूर पैसाही नवरदेवाकडून मिळू शकतो. ‘निकाह’ हे निमित्त, परंतु बाकी सारा (रूढ अर्थाने) स्वैराचार. त्यातून होणारी संततीही बेसुमार. या सदैव युद्धाच्या आगीत करपणाऱ्या समाजाला सामाजिक शिस्त नाह. कायदेकानून नाहीत, न्याय नाही, सदैव शस्त्रांची आणि विनाशाची भाषा, मोठे (रशियन आणि अफगाणही) मासे सदैव छोट्या माशांची आणि बुरख्याआडच्या महिलांची शिकार करीतच होते. प्रगत संगणक युगात हा समाज ‘कळप’ म्हणून जगतो आहे. ही माणसं की पशू! तरीही ती जाँबाजवर प्रेम करीत होती. पण अकस्मात अचानक तिला पत्ताही न लागू देता, जाँबाज एकटाच हिंदुस्तानात गेला. तिला एकटी टाकून.
सुस्मिता जाँबाजशी झालेल्या लग्नाचे तपशील फार खोलात रंगवत नाही. किंवा जाँबाज तिला सोडून का निघून गेला? जाताना तिला तिच्यात देशात का परत नेले नाही? तिकडे गेल्यावर तिच्याशी कुठलाच संपकं का ठेवला नाही? याची शाहनिशा करीत नाही. कारण हे तपशील, ही वर्तुणकीची कारणमीमांसा तिलाही कळलेली नाही. शिवाय ते तपशील तिला नकोसे आहेत. त्रासदायकही आहेत. ‘जाँबाजला हिंदुस्तानात जाऊन आज तीन वर्षे झाली. इथं तो आणि मी दोन वर्षे सात महिने राहिलो, मला खूप सुख आणि अपार प्रेम देऊन गेला. उदंड, अप्राप्य अशा आठवणींच्या मागे धावून धावून मी थकून गेले आहे. ते काही घडलं ते अगदी अचानक घडलं. म्हणून मी वेडीबावरी झाले आहे. पार कोलमडून गेले आहे. या लोकाच्यात राहून न्याय अन्यायही विसरले आहे. इथल्या कोत्यामनाच्या माणसांचा एक टिंगलीचा विषय मी झाले आहे. जाँबाज इथून गेल्यापासून त्याच्या भावांनी माझा छळ मांडला होता. उपास घडत होते. झोपेने पाठ फिरवली होती आणि याबरोबर मारझोडही होत होती. बोलून काही उपयोग नव्हता. कारण हे लोक माणसात मोडणारे नव्हतेच. सध्या मी इथे कैदेतच आहे म्हणायला हरकत नाही. कारण हा सबंध देशच एक तुरुंग आहे. दुर्दैव आणि अव्हेररुपी, भेसूर, भयंकर अंधार हात धुवून माझ्या पाठीस लागले आणि माझं शांत जीवन उद्ध्वस्त करेल, असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. आता कदाचित नव्या जगाचा प्रकाश मला दिसणारच नाही.’
कोलकत्यात तर जाँबाजला सुस्मिता फारशी जवळून ओळखतही नव्हती. तरीही ती तारुण्य सुलभ आकर्षणातून त्याच्याशी विवाहबद्ध झाली आणि अगदी मोजक्या काळासाठी तिकडे जाऊन सासरच्या माणसांना भेटून परत यायचं असा तिचा बेत. अफगाणिस्तानतल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची तिला थेट कल्पना नव्हती. ती तिथे पोहोचली. अडाणी, डांबलेल्या, बाहेरच्या जगाशी ओळखही नसलेल्या बुरख्याआडच्या स्त्रियाबरोबर राहू लागली. ‘काकली’, ‘आराना’ आणि अनेक नातेवाईक स्त्रियांबरोबर वावरली. त्या स्त्रिया कसल्या? त्या होत्या फक्त माद्या! मुलांना जन्माला घालणाऱ्या! दर एक वर्षाला नवं मूल झालं नाही त हमखास सवत येणार, ही सतत धास्ती वागवणाऱ्या, अस्वच्छ माद्या. या माद्यांना आणि त्यांच्या मुलांना साधे औषधोपचारसुद्धा केले जात नसत.
सुस्मिता पदवीधर डॉक्टर नव्हती. परंतु तिला वैद्यकशास्त्राची बरीच माहिती होती. डॉ. पांडे यांचे ‘प्रॅक्टिस ऑफ मेडिसीन’ आणि सी. एस. दा यांचे टेक्स्ट बुक ऑफ गायनाकॉलॉजी’ ही दोन पुस्तके अभ्यासून ती डॉक्टरीची प्रॅक्टिस करू लागली. (भारतात ही गोष्ट अवैध आहे.) जिथे काहीच औषध स्त्रीला मिळू शकत नव्हते. तिथे निदान काहीतरी उपचार मिळू लागले आणि मुख्य म्हणजे सुस्मिताला जगायला एक आधार मिळाला. पैशांचा आणि मानाचा. आठ वर्ष सुस्मिताचे जीवन असे गोठलेले आणि साकळलेले होतं. जाँबाज येऊन तिला घेऊन जाईल किंवा सासरची लोकं तिला भारतात परत जाऊ देतील ही शक्यता संपली. आता हा बंदिवास संपवायचाच, इथून सुटका करून घ्यायचीच पण कशी? पुरा अफगाण रणगाड्यांच्या छायेत आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावात भिजला होता, पैसा, पासपोर्ट, व्हिसा, मदत यापैकी सुस्मिताकडे काहीच नव्हते.
लेखिका सुस्मिता रूढ अर्थानी लेखिका नाही त्यामुळे आत्मपर लिखाणाला आवश्यक भाषिक सफाई या लिखाणाला नाही. कित्येकदा तपशील विस्कळीत वाटतात. भाषाही पुराणी आहे. ‘अरे, मी तुम्हाला हचे काय सांगत बसले आहे, चला परत मूळ मुद्याकडे वळू’ अशा तऱ्हेने ती सुचतील. तसे तपशील मांडत जाते परंतु तिने जो संघर्ष केला तो इतका धाडसी, महत्त्वाचा आहे, मुख्य म्हणजे तिच्या सांगण्यात एक पोटतिडीक आहे त्यामुळे वाचक या कथानकांत गुंतत जातो. अफगाणी कुटुंब (अ) व्यवस्था पाहताना आपल्याला तमोयुगाची आठवण होते.अस्वच्छता, अंधारी घर, सकस खाण्याचा अभाव, सवती, संतती, अनारोग्य, कुराण-नमाज, आणि अल्लाची आणि पुरुषांची दहशत. ‘काफिर’ आसमचाचा सुस्मिताला म्हणत ‘तुम्ही हिंदू बंगाली म्हणजे काफिर. तुम्हा लोकांची सावली पाहिली तरी आम्हाला पाप लागेल. जाँबाज जनावर आहे. नाही तर त्याने काफिरांशी लग्न केलं नसतं. अफगाण घरातल्या काही प्रथाही लेखनातून समजतात म्हणजे सुना घालतात सैलसर सलवार कुर्ता आणि मुली घालतात घट्ट सलवार कमीज. मोठमोठ्या गोल रोट्या. अंड्याचा पोचा आणि दह्याखालचं पाणी असा आहार असलेल्या या घरातून भाज्यापाले कधीच शिजत नसतं. श्रीमंत घराच्या सजावटीत गालिचे आणि दारी द्राक्षांचे मळे असले तरी सामान्यांची घरे व्हेंटिलेशनची सोय नसणारे गोठे होते. मुलींना शाळा शिक्षण काहीच नाही. एकट्या स्त्रीने बाहेर जायचेच नाही. ‘अफगाणी’ हे चलनी नाणे प्रचारात आहे. बाहेरच्या जगाबद्दल अफगाणांना शून्य माहिती आहे. रशियाचे गुर्जार सैनिक बेगुमानपणे या देशात थैमान घालत होते. डॉ. नजिबुल्ला रशियाचे हस्तक होते. ‘मुजाहिदीन’ म्हणजे रशियन सैन्याला विरोध करणारे बंडखोर आणि नजीबच्या गटातले लोक ‘खालकी’, या साऱ्यांच्यात अखंड संघर्ष, गोळीबार आणि कत्तली. सुस्मिता म्हणते, ‘डोक्यावर सतत टांगती तलवार होती. या देशात अशी भयंकर स्थिती आहे, हे मला इथं आल्यावरच कळलं.
सुस्मिता निधर्मी आहे. तिच्या लेखी धर्म म्हणजे प्रेमाची ताकद. कुठल्याच धर्माची कहरता तिला मंजूर नाही. जाँबाजच्या काकांशी ती कट्टर धार्मिकतेवरून वाद घालते. सुस्मिताचे वैशिष्ट्य म्हणजे ती प्रत्येक घटनेच्या कार्यकारणभाव समर्पकपणे शोधते. या संदर्भातलं एक उदाहरण पुरेसं बोलकं आहे. ती लिहिते, ‘मयनाला दिवस गेले तेव्हा तिचा पती ‘सओबाई’ हिंदुस्थानात होता. तिला मारझोड होऊ लागली. शेवटी नाव उघडकीला आलं. इब्राहितकाका! तिच्या नवऱ्याचा बापच! सभ्य, सुसंस्कृत माणसाला ही गोष्ट पटणारच नाही. मात्र विचार केल्यावर असं वाटलं. इथल्या स्त्रियांना वैवाहिक जीवनाची, प्रीतीची ओळख होते तेव्हा पती त्यांना एकटं ठेवून परदेशात जातात. अनेकदा पाच पाच वर्षे जातात. तेव्हा मयना, जहॉआरासारख्या बायकांना नाही ताबा ठेवता येत भावनांवर.
या आत्मकथनातला थरारक भाग आहे. सुस्मिताच्या सुटकेचा. एकदा कशीबशी सुटका करून ती पाकिस्तानात पोहोचली. परंतु परत सासरी डांबली गेली. शेवटी तिने ज्या पद्धतीने सुटका करून घेतली ते पाहून एखाद्या धाडसी थरारपटाची आठवण होते. पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासातील माणसांनी तिला मदत तर केली नाहीच उलट विटंबनाच केली. याची खंतही ती नोंदवते. तिचे सर्वच लेखन ‘इम्पार्शल’ आहे म्हणून मोलाचे आहे. मी ज्या देशात काही वर्षे घालवली त्या देशाचा. पश्चिम आशियाई देशातील अत्यंत कडव्या, प्रतिगामी देशाचा निरोप घेत होते. काबूल अच्छा! सलाम! तुला सलाम् अखेर एका बंदिवासाची सुटका झाली. सुस्मिता लेखनाला का प्रवृत्त झाली आहे? धर्माच्या नावाखाली एखाद्या देशात जी पराकोटींची दहशत निर्माण करतात. धर्माचा जयजयकार करीत माणसा माणसांत भिंत उभी करतात. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घाला घालून त्यांची माजघरात रवानगी करतात. माणसांची हत्या करतात. देशाचा नाश करतात. त्यांच्या विरोधात हे लेखन आहे. हे लेखन जिहाद धर्माविषयी नसून धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्त्वाद यांच्याविरुद्ध आहे. माझ्याप्रमाणे भारतातून अफगाणिस्तानात जाऊन ज्या स्त्रिया असहायपणे जिणं जगताहेत त्यांच्याकडेही सर्वांचं लक्ष जायला पाहिजे. माझ्यापाशी अपार साहस नसतं तर मीही परत येऊ शकले नसते. माझी ही कहाणी वाचून एका जरी सहृदय माणसानं निषेधाचा आवाज उठवला. तरी श्रमाचं सार्थक झालं, असं मी समजेन.
सुस्मिता बॅनर्जीची अशी ही आत्मकथा, भोगकथा आणि साहसकथा मृणालिनी गडकरी यांनी अतिशय उत्तम अनुवाद रुपात मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. या दशकात अनुवाद रूपात देशी-विदेशी भाषांतल लेखन विपुल प्रमाणात मराठीत आले आहे. त्या वाचनाने वाचक ‘बहुश्रुत’ होत होत ज्ञानाच्या कथा विस्तारित होत आहेत. हे निश्चित.
-डॉ. सुवर्णा दिवेकर
- Sumit Patne
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलीनं, सर्वांचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानशा गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे. पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणसं वाईट नव्हती; पण काही लबाड,स्वार्थी माणसांमुळे तिला तिथं बंदी होऊन राहावं लागलं. आठ वर्षांच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव तिथलं साकळलेलं जीवन आणि तालिबानसारख्या धर्मांधांबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची ही कहाणी. तिच्या जीवनाची ही करुण कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.