- Prashant Laxman Shendge
अनुवाद पण भाषेच्या श्रीमंती अफाट
प्रेम हे एक रंगहीन मूलद्रव्य आहे.
पटकन पेट घेणारं... स्वतः जळता जळता इतरांनाही जाळून भस्मसात करणारं .. जाळ होतो, मागे पुरावा शून्य. ना धूर. ना राख. प्रेमाच्या धुंदीत मश्गूल असणाऱ्यांना कळता कळत नाही. पत्ता लागता लागतं नाही. त्यात दडलेल्या विषाच्या कुपीचा.
- DAINIK SAMANA 11-06-2006
महिलांच्या कथा अन् व्यथा...
मूळ इंग्रजी लेखिका अनिता नायर यांच्या ‘लेडीज कूपे’ या पुस्तकाचा स्वैर अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी मराठीत केला असून तो मेहता प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे.
अखिल नंदेश्वरी ऊर्फ अखिला दुर्दैवाने अविवाहित राहिलेल्या ‘स्त्री’ची ही कहाणी. कट्टर, सनातनी, कर्मठ, तामीळ ब्राह्मण अप्पा आणि अम्मा या दांपत्याच्या पोटी अखिलाचा जन्म झाला. नारायण, नरसिंह, आणि पद्मा ही तीन तिची धाकटी भावंड, स्त्रीनं स्त्रीसारखंच वागावं. पती हाच परमेश्वर अशा पुरातन विचारांच्या कुटुंबात ती वाढते. तिची आई पतिव्रताच. पतिसेवेपुढे मुलांकडे लक्ष देण्यास तिला वेळ नसायचा. वडील अप्पा आयकर खात्यात अधिकारी. ते एक नेक, स्वच्छ अधिकारी असल्यामुळे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये अप्रिय. त्यांच्या सचोटी, नेक स्वभावाच्या त्यांच्या गरजा जेमतेम असायच्या, पण छानशौक वगैरे नसायचे. अचानक एका अपघातात अखिलाच्या अप्पांचं निधन होतं. भावंडांत सर्वांत मोठी, सर्वांची अक्का, अखिलाच्या खांद्यावर साऱ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडते. वडिलांच्या निधनानंतर आयकर खात्यात तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळते. आई आणि आपली चार भावंडांची सारी जबाबदारी ती नेटाने पार पाडते. भावंडांचे शिक्षण, लग्न आणि विधवा वृद्ध आईची सेवा या सर्व धामधुमीत ती अविवाहित राहते. घरातील सारेचजण तिला गृहीत धरून चालतात. ज्या अक्कानं आपलं पालनपोषण नीट केलं, आपले संसार उभे करून दिले त्याची ‘नारायण’ वगळता कोणालाही जाणीव नसते. यात तिचं तारुण्य कोमेजून जातं. आपल्या अक्काला मत, मन, भावना, वासना आहे. तिला स्वातंत्र्य हवं आहे. हे कोणी ध्यानातच घेत नाही. या घुसमटीत या कोंडीतून बाहेर पडून आपण मोकळा श्वास घ्यावा. साऱ्या बंधनातून मुक्त व्हावं असं अखिला ठरवते. आणि साऱ्यांचा विरोध-रोष पत्करून ती मुक्त जीवन जगण्यासाठी एकटीच घरातून कन्याकुमारीला जाण्यासाठी निघते. कार्यालयीन मैत्रीण निलोफरच्या ओळखीने तिला लेडीज कूपेत आरक्षण मिळतं.
या लेडीज कूपेतील प्रत्येक स्त्री पात्र रेखाटताना त्या त्या स्त्री पात्राची कौटुंबिक, आर्थिकता, सामाजिक पार्श्वभूमी त्यांची जात-पात, धर्म, संस्कृती आणि संस्कार याचं वास्तववादी चित्रण लेखिकेने यात केलं आहे. ‘स्त्री’च्या विविध प्रकृती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचं मन, त्यांच्या वाट्याला आलेले जीवन भोग. त्यामुळे त्यांच्या मनाची होणारी घुसमट, कुचंबणा, मानसिक त्रास एकूणच त्यांची, विशेषत: अविवाहिता अखिलाची कथा आणि व्यथा अपर्णा वेलणकर यांनी सहज सुंदरतेने ‘लेडीज कूपे’त अनुवादित केली आहे.
- DAINIK SAKAL 18-02-2007
स्त्रीची स्वयंशोधाची धडपड...
वडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबादारी पेलताना स्वत:साठी तिचे जगणे राहूनच जाते. ती जबादारी पूर्ण झाल्यावही ती ‘स्वतंत्र’ होऊ शकत नाही... तरी स्वत:चा शोध घेण्याची तिची धडपड सुरूच असते. अशातच एक दिवस ती एकटीने प्रवासाला निघते. रेल्वेच्या डब्यात सोबत आणखी पाच जणी. स्वत:च्या आयुष्याचा विचार करत, त्या पाच जणींशी बोलत, त्या सुख-दु:खातून मार्ग काढत ती एका निष्कर्षावर येते... तिच्या पुरत्या अखिलनंदेश्वरी- अखिलाची ही कहाणी अशी उलगडत जाते. ‘लेडीज कूपे’ या कादंबरीत. स्वत:ची ओळख करून घ्यायला, अधोरेखित करायला जानकी, मार्गारेट शांती, प्रभादेवी, शीला, मारीकोलान्थू तिला मदत करतात. पण खरी मदत होते तिच्या मैत्रिणीची-कारपागमची!
अनिता नायर यांच्या या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. अपर्णा वेलणकर यांनी. कादंबरीचे निवेदन अगदी ओघवते आहे. पण या प्रत्येकीची कथा खूपच पसरट, वाटत जाते. त्यात तोचतोचपणा वाटू लागतो. वर्णनंही तीच वाटत राहतात. या पसाNयात या स्त्रियांच्या मनाचा वेध परिणामकारकपणे घेतलाच जात नाही. त्यामुळे ‘...प्रत्येकाची कहाणी ऐकताना सारखं वाटत होतं, मोठ्या सुखातलं छोटं दु:ख केवढं टोचतंय या बायकांना!...’ असे जे मारीकोलान्थूला त्यांच्याबद्दल वाटते, तसेच वाटू लागते. पण वास्तवास तसे नाहीय. प्रत्येकीची एका कहाणी आहे, एक वेदना आहे. तिच्यापुरती प्रामाणिक, सच्ची! मात्र कादंबरीत ती तितकी टोकदारपणे येत नाही. त्यामुळे भिडत नाही. शब्दबंबाळपणात हरवून जाते.
‘पुरुषाच्या आधाराशिवाय बाई एकटी आनंदाने जगू शकते? राहू शकते?’ या प्रश्नाचा वेध या निरनिराळ्या पात्रांच्या माध्यमातून लेखिकेने घेतला आहे. कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नाचे एकच एक किंवा नेमके उत्तर शोधण्याचा लेखिकेचा अट्टहास नाही. या प्रश्नाचे उत्तर तिने आपल्या पात्रांवर सोपवले आहे. परिस्थितीनुसार, कुवतीनुसार ती ती पात्रं आपल्यापुरते उत्तर शोधतात. या प्रश्नाचे सगळ्यांना लागू होईल, असे अंतिम एक उत्तर असूच शकत नाही. पण विचाराला नक्कीच हा प्रश्न चालना देतो. गुणदोषांसह कादंबरीचे हे यश नक्कीच म्हणावे लागेल.
-ऋता बावडेकर
- DAINIK LOKMAT 16-07-2006
सहा वेगळी दु:खे…
ही सहा सहप्रवासी स्त्रियांची जीवनगाथा आहे. लेडीज कूपेतून प्रवास करणाऱ्या या अनोळखी स्त्रिया काही तासांतच मैत्रिणींसारख्या एकमेकींची विचारपूस करून आपापसातील अपिचयाची अभ्रे बाजूला सारून भावनांना वाट करून देतात, त्यातून उमलत जातात. त्या त्यांच्या भावबंधातल्या ऋजू रेशमी पाकळ्या! आपल्या निसर्गदत्त स्वभाववैशिष्ट्यांमुळे स्त्रिया एकमेकींजवळ लवकर ‘मोकळ्या’ होऊ शकतात, एकमेकींना दिलासा देऊ शकतात.
या कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या लेडील कूपेत जानकी प्रभाकर, प्रभादेवी, मार्गारिया शांती पैलराज, अखिलनंदेश्वरी (अखिला) शीला वासुदेवेन व मारी कोलान्थू अशा सहा जणी आहेत. यात सर्वांत वयस्क म्हणजे जानकी व सर्वांत लहान म्हणजे १४ वर्षांची शीला. यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अखिलाची. तिचा प्रवास सर्वांत लांबचा तसा तिचा जीवनप्रवासही लांबचा. म्हणून या कादंबरीची ती नायिका आहे, असे म्हणायला हरकत नाही. कथेची सुरुवात व अंत तिच्यावरच आहे. या प्रवासातील थोड्याशा सहवासामुळे अखिलाच्या मनातील आंदोलने व त्यानंतर तिच्या जीवनाला मिळालेले वेगळे वळण हाच कथेचा विषय आहे.
अपघाती अकाली मृत्यू पावलेल्या वडिलांच्या जागी आयकर कार्यालयामध्ये लहान वयातच अखिला कामाला लागते. घरात मोठी असल्याने एका कुटुंबकर्त्याची सर्व कर्तव्ये पार पाडता पाडता कधी पंचेचाळीशीला येते ते कळत नाही. पाठची सर्व भावंडे मात्र मोठी होऊन लग्न करून मार्गी लागतात. अखिलाच्या लग्नाचा, तिच्या भविष्याचा विचार कोणाच्याही डोक्यात शिरत नाही. अगदी तिच्या आईच्यासुद्धा! ती जुन्या परंपरेतील जुन्या आचारविचारांची कर्मठ ब्राह्मण बाई असते. नवरा हेच तिचे जीवनसर्वस्व असते. तिच्या बाबतीतील अत्यंत विचित्र गोष्ट म्हणजे तिचे लग्न. तिच्या सख्ख्या काकांशीच वडिलांनी लावून दिलेले असते. अखिलाने एकदा याबद्दल विचारले असता तिला प्रचंड राग येतो. अखिलाला ती चांगलीच फ़ैलावर घेते; पण या घटनेने सर्वांनाच आश्चर्य वाटत असते. अशा कर्मठ वातावरणात वाढलेल्या अखिलाची आईच्या मृत्यूनंतर मात्र फारच घुसमट सुरू होते. आपल्या सख्ख्या भावंडांच्या मतलबीपणामुळे ती आतल्या आत कुढत राहते; पण निलोफर व कॅथरिन या मैत्रिणींमुळे तिच्यामध्ये मानसिक बदल सुरू होतात. निलोफर तर तिला जोरात बजावते, ‘तुझ्या त्या स्वार्थी बहिणीला पहिल्यांदा तू घरातून हाकलून दे. ती जळूप्रमाणे तुझे रक्तशोषण करते आहे.’’ अशा खंबीर व स्वतंत्र मैत्रिणींमुळे अखिलाही स्वत: खंबीर बनण्याचापक्का निश्चय करून आयुष्यात अगदी पहिल्यांदा एकटी कन्याकुमारीच्या प्रवासाला निघते. तिथे कूपेमध्ये ‘पुरुषाशिवाय स्त्री एकटी राहू शकते का?’’ या विषयावर बायकांची बरीच चर्चा होते. कन्याकुमारीला गेल्यावर या प्रश्नाचे अचूक उत्तर अखिलाला सापडते. तिच्या जीवाची तगमग थांबते, तिला तिच्या भावी जीवनाचा सुखाचा मार्ग सापडतो. इथेच कथा संपते; पण वाचकांपुढे प्रश्न उभा राहतो. ‘सुखासाठी या मार्गाचा अवलंब अखिला किती दिवस करू शकणार आहे?’
कूपेतील दुसरी सहप्रवासी म्हणजे जानकी प्रभाकर. कमी शिकलेल्या व स्वतंत्र विचाराची पात्रता नसलेल्या स्त्रियांची जी मनोवृत्ती असते तीच जानकीची असते. जुन्या विचारांचे जानकीचे उपदेश बाकीच्या जणी तिच्या वयाकडे पाहून ऐकून घेतात. कारण तिच्या बोलण्यात सरळपणा व कळकळ असते. तिच्यासमवेत ‘स्त्रियांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्त्व दाखवूच नये, तरच त्या समाधानी राहू शकतात.’ पती हाच परमेश्वर मानणारी स्त्री दुसरे काय सांगणार? हिच्या मनात एकच सल असते ती म्हणजे लग्नानंतर तिचा मुलगा सिद्धार्थ सतत आईची तुलना सासूशी करून तिला कमी लेखक असतो हेच. बाकी आपल्या संसारात ती समाधानी असते.
तिसरी प्रवासी म्हणजे प्रभादेवी. ही सुखवस्तू स्त्री नवऱ्याबरोबर सहज म्हणून अमेरिकेला जाते व तेथून मानसिकदृष्ट्या बदलून येते. तिथल्या स्त्रियांप्रमाणे ती स्वतंत्र आचार-विचारांची, अधिक धीट व अधिक फॅशनेबल बनते. मुळातच ती माहेरची श्रीमंत घरातली मुलगी. वडिलांच्या सौन्या-चांदीच्या चार पेढ्या. जावयासाठी त्यांनी हिऱ्याची पेढी सुरू केलेली. ‘फिजिकल फिटनेस’साठी पोहणे शिकायचे असा निश्चय करून ती स्वत:च्या बंगल्याच्या तलावात मोठा धोका पत्करून स्वत:च-कोणाच्या मदतीशिवाय पोहणे शिकते. ही रुबाबदार, सुंदर, धाडसी व आनंदी स्त्री नावाप्रमाणेच परमेश्वराने दान केलेल्या संपन्न जीवनाचा पुरेपूर उपभोग घेत असते. चौथी मार्गारिटा शांती. सतत मानसिक छळ करणाऱ्या नवऱ्याचा ती अत्यंत अजब पद्धतीने सूड घेते. वास्तविक ही एम. एस्सी. सुवर्णपदकविजेती बाई. प्राचार्य असलेल्या नवऱ्याच्या शाळेत शास्त्र शिक्षक म्हणून काम करीत असते. नवऱ्याला त्याच्या आवडीचे पदार्थ रोज इतके खायला करून देते, की शेवटी अतिवजन वाढल्याने त्याला चालणेही कठीण होऊन जाते. तो परावलंबी बनतो. नवऱ्याची विवशता जसजशी वाढत जाते, तसतशी मार्गारेट खट्टू होत जाते. नवऱ्याशी न भांडता, त्याच्याविरुद्ध एक शब्दही न बोलता सायन्स प्रयोगाच्या वेळी सुचलेल्या एका युक्तीने पार त्याचे अस्तित्वच ती मिटवून टाकते. त्याला पार अपंग बनवून टाकते. मार्गारेटाच्या अक्कल हुशारीने नवऱ्याचा काटा काढण्याचा मार्ग म्हणजे अंतर्यामी वेदनेने व्याकूळ झालेल्या एका शोषित स्त्रीचा अतर्क्य असा सूड आहे.
पाचवी मारी कोलान्थू ही पांढरपेशात न मोडणारी घरकामवाली स्त्री आहे, ती त्या कूपेत प्रवेश करताक्षणीच इतर स्त्रियांच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात, त्या फार बोलक्या आहेत. त्या तिच्याही लक्षात आल्याने कोणाशीही न बोलता ती मुकाट्याने वरच्या बर्थवर जाऊन पडते. या वेठबिगार गरीब बाईला अनौरस संततीला जन्म द्यावा लागतो. हिच्या नशिबी कायम दु:ख व कष्ट! ती म्हणजे मागास जमातीतील प्रातिनिधिक स्वरूपाची व्यक्तिरेखा वाटते. सहावी १४ वर्षांची शीला ही शाळकरी पोर असून, जीवनातील चढउतार तिने अनुभवलेले नसल्याने इतरांच्या चर्चेत भाग न घेता चुपचाप पुस्तक वाचत बसते. नुकतीच आजी गेल्याने तशी ती दु:खी असते. जीवनाचे विविध रंग दाखविणारा हा लेडीज कूपे. यातील साऱ्याच स्त्रिया दक्षिणेकडील. त्यामुळे संपूर्ण कादंबरीभर तेच वातावरण आहे. तिकडची सुंदर वर्णने यात आहेत. अपर्णा वेलणकर यांनी या कादंबरीचे केलेले मराठी भाषांतर अप्रतिम आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही वेधक झाले असते, तर ते अधिक आवडले असते.
- DAINIK AIKYA 29-01-2006
प्रौढ कुमारिकेच्या ‘प्रवासाची’ कथा…
१९९८ पर्यंत बंगलोर कॅन्टोमेंट रेल्वे स्टेशनवर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी स्वतंत्र तिकीट खिडक्यांची व्यवस्था होती. रात्रभर प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी रेल्वे गाड्यांमध्ये स्वतंत्र ‘लेडिज कूपे’ असत. नंतर रेल्वेने ही व्यवस्था रद्द केली. या काळात एका तमिळ ब्राह्मण कुटुंबातील अखिल नंदेश्वरी उर्फ अखिला या ४५ वर्षांच्या एका अविवाहित आणि सरकारी खात्यात कारकून असलेल्या एका स्त्रीची कथा ‘लेडिज कूपे’ या कादंबरीतून अनिता नायर यांनी रेखाटली आहे. या कादंबरीचा सरस अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केलेला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर स्वत:हून ओढून घेतलेली आईच्या संसाराची जबाबदारी अखिलाच्या खांद्यावरून कधी उतरतच नाही. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, नंतर आत्या आणि मावशी म्हणून ती या संसारात गाडलीच जाते. मात्र एके दिवशी तिला तिच्या स्वत:ची हाक ऐकू येते आणि ती हे सारे पाश तोडून प्रवासाला निघते. रेल्वेच्या ‘लेडिज कूपे’ मध्ये एकत्र आलेल्या आणखी पाचजणी तिला भेटतात आणि परकेपणा दूर होऊन या सहाजणी आपल्या आयुष्यातील गुपितं एकत्र वाटून घेतात. त्या अनुभवाच्या जोरावर अखिला स्वत:चं वेगळं आयुष्य जगण्याचा निर्णय घेते.
मळखाऊ रंगाची सुती पातळं नेसणाऱ्या अखिलाने एके दिवशी चक्क लाल-काळ्या रंगाची देखणी मदुराई साडी नेसायला काढली आणि नेहमीच लाकडाच्या ठोंब्याला फडकं गुंडाळल्यासारखी घरातून बाहेर पडणाऱ्या अखिलाकडे पाहून सर्वजण विस्फारलेल्या पण संशयी नजरेने पाहू लागतात. तेव्हा तिने आपण कन्याकुमारीला काही दिवस जात असल्याचे जाहीर केले. पण घरच्या लोकांच्या संशयाने लडबडलेल्या प्रश्नांचा तिला सामाना करावा लागला.
अखेर अखिला आपल्या एका मैत्रिणीला मदतीने कन्याकुमारीचे तिकीट काढतेच. तिला ‘लेडिज कूपे’ मधील सेकंड क्लासच्या डब्यातील सीट मिळते. तिथे तिची भेट पाच स्त्रियांशी होते. वेगवेगळ्या विचारांच्या आणि अनुभवांना सामोरे गेलेल्या या पाच स्त्रिया तिला तिचे नवे आयुष्य जगण्यासाठी बळ देतात. ४५ वर्षीय अखिलाचा अजून विवाह झालेला नाही, हे कळल्यावर ती आपली कथा त्यांच्यापुढे मांडते. स्त्रिया कशा जगतात, वागतात याचा शोध घेण्यासाठी ती हा प्रवास करते आहे, हे कळल्यावर त्या स्त्रियांमध्ये अचानक एका नव्या नात्याचा जन्म होतो. पुरुषाच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते का? हा प्रश्न ती त्यांना विचारते आणि त्या सर्वजणी तिला आपली कहाणी ऐकवतात.
या पाचजणींमध्ये जानकीदेवी या प्रौढ. पती आणि मुलगा यांच्या संसारात रमलेल्या जानकीदेवी, मुलगा जेव्हा सुनेच्या ओंजळीने पाणी पितो आहे, हे कळल्यानंतर निराश होते आणि अखेर पतीच्या प्रेमळ छत्राखालीच राहणे पसंद करते. दुसरी पंधरा वर्षांची शीला. आजीच्या गडगंज इस्टेटीमुळे तिचे वडील आणि आईही आजीसमोर कसे नमते घेतात, हे समजून चुकते. पोटातील कॅन्सरने आपल्याला गाठलेले आहे, हे माहीत असलेली आजी आपल्या या नातीवर जिवापाड प्रेम करते आणि आयुष्यात मन मानेल तसे जगावे, असा संदेश देत जीव सोडते. तिसरी मार्गारेट शांती. बाईला पुरुष हवाच असतो, पण तो ‘जगणं अर्थपूर्ण व्हावं, संपूर्ण व्हावं म्हणून नव्हे. बाईला खरोखरीच पुरुषाची गरज नसते. ‘पुरुषाशिवाय बाई अपुरी’ हे असत्य आहे, मिथ्या आहे. पुरुषच ते वापरतात आणि एकट्या बायकांना घाबरवतात असे मानणारी. तिचा नवरा इतरांना छळण्यातला विकृत आंन भोगणारा. त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा आत्मविश्वास ठेचला, त्याचं व्यक्तिमत्व मोडून काढलं तिनं. तो पूर्वी जसा होता, तसाच बारीक, तुडतुडीत, उद्धट आणि चपळ राहिला असता, तर त्याच्या छळातून सर्वांची मुक्तता करण्यासाठी तिने त्याला अवाढव्य, खाऊ-पिऊ घालून लठ्ठ केले अन् त्याला बंगलोरच्या एका सेंटरमधून ट्रिटमेंट घ्यावी लागते. प्रभादेवी चौथी स्त्री. वडिलांना मुलगा हवा असताना झालेली. त्यामुळे जन्मापासून उपेक्षा सहन करत मुलासारखे वाढवलेली. वडिलांच्या व्यवसाय वृद्धीसाठी लग्न करून नवऱ्याच्या घरी लाडाकोडात राहिली. पण तिचे स्वत्व विसरून ती तेथे राहू शकत नाही. स्वातंत्र्याची किंमत कळल्यानंतर ती नवऱ्यावर अधिकार गाजवू लागली आणि आपल्याला हवे तसे वागू लागली.
पाचवी मारिकोलान्थू. वडिलांच्या मृत्यूपश्चात आई जेथे स्वयंपाकपाणी करत राहिली, त्याच घरी तीही वाढली. त्या घरातल्या पुरुषांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी तिच्या मालकिणीने तिला शहरात दोन मिशनरं स्त्रियांकडे नर्सिंग शिकायला पाठवले. काही दिवस गावी आल्याची संधी साधून मालकिणीचा दीर तिच्यावर अत्याचार करतो. त्यातून जन्मलेल्या मुलाला ती आयुष्यभर जवळ करत नाही. मिशनरी स्त्रियांनी शहर सोडल्यानंतर ती पुन्हा मालकिणीकडे येते. तिची सावली म्हणून राहते, पण तेथूनही तिला बाहेर पडावे लागते आणि ती पुन्हा आपल्या मुलाच्या आश्रयाला जाते.
या पाच स्त्रियांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन अखिला कन्याकुमारीला पोहोचते आणि कधीकाळी तिच्या आयुष्यात आलेल्या तिच्या प्रियकराच्या आठवणी जाग्या होत्यात, आणि मग ती पुन्हा त्याच्याकडे जाते.
अपर्णा वेलणकर यांनी अनिता नायर यांच्या ‘द बेटर मॅन’ या पहिल्या पुस्तकामुळे प्रभावी होऊन या कादंबरीचा अनुवाद केला. प्रत्येक स्त्रियांची कथा मांडताना नायर यांनी त्या त्या स्त्रियांच्या व्यवसायाशी संबंधित भाषा सुरेखपणे पेरलेली आहे. स्त्रियांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाशी जोडणाऱ्या कथानकामुळे या कादंबरीला वेगळे परिमाण लाभलेले आहे.
-संदीप आडनाई