- Aniket Save
"डायरी ऑफ ॲन फ्रँक" ही साहित्य जगताला दिलेली अनमोल देणगी आहे.एक तेरा वर्षे वयाची मुलगी निरागसपणे तिच भावविश्व आपल्या समोर मांडते.
दुसऱ्या महायुद्धात नाझी भस्मासुराचा उदय होऊन त्याने `ज्यु` लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्या छळापासुन वाचण्यासाठी फ्रँक व व्हॅन डॅन कुटुंबिय तसेच डसेल् असे ८ जण एका गुप्तनिवासाचा आसरा घेतात.
अॅन लिहिते १२ जुन १९४२ ते ४ ऑगष्ट १९४४ पर्यंत घाबरून, रेडिओ हे एकमेव साधन बाहेरच्या गोष्टी समजण्याच, एकाच घरात कोंडुन, डोक्यावर सतत पकडले जाण्याची टांगती तलवार आणि प्रचंड ताण कसे जगले असतील ते ८-१० दिवस नव्हे तर तब्बल २६ महिने.
यात अॅन फ्रँक आपल्या आयुष्यातील प्रत्येक हळुवार घटना बिनदिक्कपणे मांडते. मग त्यात आईविषयी असलेला राग असो किंवा समंजस वडील आणि उमलत्या कोवळ्या वयात प्रेमाची आस, पीटरला घेतलेले पहिले चुंबन अन् त्याच्याशी एकत्र बसुन व्यतीत केलेले क्षण, भविष्याविषयी केलेला विचार. ह्यात अॅन ह्या काळात तिच्या जोडीच्या मुलींपेक्षा प्रगल्भ आणि प्रौढ होते. परिस्थिती माणसाला जबाबदार बनवते.
अखेर काय होते अॅन तिचे कुटुंबिय अन् सोबतच्या माणसांच यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.........
- Alka Ghadigaonkar
आज वाचून झाले. एवढ्या लहान वयात १३ व्या वर्षी ती लिहिती झाली ते १५ वर्षे होईपर्यंत तिने रोजनिशी लिहिली. १६ वयाची होण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. तिचे लेखन छान आहे. ती जर जास्त जगली असती तर तिचे अजुन छान छान पुस्तके तिने लिहिली असती नक्कीच ! मला हे पुस्तक आवडले.
- Trupti Kulkarni
अॅन फ्रँक लिखित, मंगला निगुडकर अनुवादित “डायरी ऑफ अॅन फ्रँक”, या मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातल्या ‘अॅन’ या मुख्य पात्राला ‘उमा जोशी’ यांनी लिहिलेलं पत्र.
|| श्री ||
प्रिय,
तारीख : कायमची
ॲन,
मी हे पुस्तक तू जेव्हा ही रोजनिशी लिहिलीस त्या वयाची असतानाच वाचले आणि अजूनही ते मला तितकीच मनापासून साथ देत आहे. किटी... ही जशी तुझी पत्रसखी तशीच तू माझी !
तुझी ही रोजनिशी म्हणजे हिटलरच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे किती लोकांना प्रचंड मानसिक स्थित्यंतरातून... जावे लागले त्याचे उत्तम उदाहरण. अतिशय अपमानास्पद जगणे ज्यू लोकांच्या वाट्याला आलेले असताना देखील तुम्ही इतके सकारात्मक आणि आशादायी पद्धतीने राहिलात त्याला तोड नाही. मृत्यूचे प्रचंड सावट असताना अज्ञातवासात २ वर्षे काढताना कमीतकमी निराशावादी रोजनिशी लिहणे सोपे नाही ग...!
प्रेमळ आईवडील, बहीण, मित्रमैत्रिणी, उबदार घर असुनसुद्धा तू रोजनिशी... किटी... या मैत्रिणीची निवड केलीस, यातुन तू... तुझ्याशीच सगळ्यात खरी आहेस ते कळते. तुझ्या रोजनिशीची वाटचाल आश्वस्त, बंधमुक्त घरातून... बंधनातील अज्ञातवासात असलेल्या घराकडे जाते, अन् हा प्रवास थक्क करणारा आहे.
तुमची अज्ञातवासात जायची तारीख होती १६ जुलै १९४२... पण जावे लागले ९ जुलैलाच!!! त्या वेळेला तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल ती कल्पनाही करवत नाही. अज्ञातवासात असलेले तेही घर तुम्ही सजवयाचा प्रयत्न केलात. तुझे आई वडील मार्गोट, ड्सेल, पीटर आणि त्याचे आई वडील यांचे इतके उत्तम वर्णन आहे की ते घर, जीना, वरची खिडकी सगळे डोळ्यासमोर येते... चित्रमय रोजनिशी.
कितीही भिती वाटली तरी तुझा निर्भिडपणा, उपजत विनोदबुद्धी व रसरसशीतपणा तू अजिबात सोडला नाहीस. पहिल्यांदा तुमच्याकडे खाण्याची चैन होती. पण नंतर ती चैन अजिबात राहिली नाही. अगदी आन्हिकं उरकतानासुध्दा तुम्हाला ज्या अनावस्थेतून जावे लागले, ते वाचताना अंगावर काटा येतो.
तुला कितीतरी विषयांत गती होती, आवड होती आणि एकाच वेळी तू ते हाताळू शकत होतीस. इतक्या विपरीत परिस्थितीत तुझा मेंदू इतका लिलया कसा काम करू शकतो? हा प्रश्न सुटतच नाही. पौगंडावस्थेतील त्या काळातल्या मुलीची मानसिक ससेहोलपट अगदी या काळातसुध्दा मनाला भावते, पटते.
शेवटचं तुझं पत्र "विसंगती चे बोचके" म्हणजे मानवी मनाचा कवडसा आहे. प्रत्येकजण स्वत:शी आणि इतरांशी वेगळा असतो, पण ते कबूल करण्याचे धारिष्ट्य तुझ्यात आहे.
खरंतर तु कोमल, हळवी, निसर्ग सौंदर्याची आवड असलेली मुलगी... पण लोकं आपल्याला हसतील म्हणून तू तुझ्यातल्या हट्टी, खोडकर, आनंदी मुलीला सतत बाहेर येऊ दिलेस; दोन्हीही रूपे लोभसवाणीच!
तुला एकच सांगते, तुझ्या लेखनाद्वारे तुला अमर व्हायचं होतं, ते तू झालीस, जगातील ३०/३५ भाषांमध्ये तुझ्या रोजनीशीचा अनुवाद झाला आहे. तुझी ही इच्छा पूर्ण झालीच आहे, पण ते तुझ्यापर्यंत पोहोचेल
का गं ?
तुझी,
पत्रसखी
- Sarita Chavan
माझ्या अत्यंत आवडत्या अशा या फेसबुक ग्रुप वरील माझी ही पहिली पोस्ट...
या ग्रुपमुळे अनेक अज्ञात तितक्याच विलक्षण पुस्तकांची ओळख झाली आणि घरातील बुकशेल्फ मध्ये त्यांची भर पडत गेली... मनस्वी आभार वाचन संस्कृती जपणाऱ्या ग्रुपवरील सर्व वाचन प्रेमींचे....
प्रियअँन फ्रॅंक... तसंतर काही वर्षांपूर्वीच ओळख झाली होती तुझी.. घट्ट रुतून बसली होतीस तू काळजाच्या कोपऱ्यात.. पण या कोरोनाग्रस्त दिवसांत तू अधिकच जवळची होऊन गेलीस.. आम्ही आमच्याच घरात काही जुजबी अडचणी वगळता सुखात लॉकडाऊन आहोत ते ही काहीच दिवसांकरिता.. पण तब्बल दोन वर्षे एका बंदिस्त तळघरात राहून क्षणोक्षणी मृत्यूचे सावट पुऱ्या जगण्यावर आच्छादुन राहिलेले असतानाही आयुष्याकडे पाहण्याचा तुझा रसरशीत आशावाद.. त्या बंदिवासातही जगण्याची तुझी अल्लड, निरागस लोकविलक्षण असोशी.. आणि तुझ्या किशोरवयाला न शोभणारं पण प्रौढानाही लाजवेल असं तुझं जगण्याचं ठाम तत्त्वज्ञान... इतक्या लहान वयात स्वतःला इतकं स्वच्छ ओळखणाऱ्या व्यक्ती विरळाच असतात... वाटत राहतं की तू इच्छिलेलं ते सुंदर, मोकळं, स्वतंत्र-स्वच्छंदी आयुष्य तुला लाभायला हवं होतं... अत्यंत हुशार, तरल, संवेदनशील असणारी तू त्याची हकदार होतीस... पण तुझ्या आयुष्याचा कोवळ्या वयातील शेवट मन विदीर्ण करून जातो...आपसूकच आसवांनी श्रद्धांजली वाहिली जाते तुझ्या प्रति...
आणि त्याचवेळी.. सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून त्यापायी निष्पाप जीवांची नृशंस हत्या करणाऱ्या जगातील तमाम हुकूमशहांविरुद्ध चीड धुमसत राहते मनात....
- Akshay Hande
मी या पुस्तकाचा आधीही वाचन झाल्यावर अभिप्राय दिला आहे पण आज पुन्हा एकदा देत आहे कारण वेळच तशी आहे.
तर हे पुस्तक म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका ज्यू मुलीची आत्मकथा आहे जी तिने एका डायरीत लिहिली होती. त्यावेळची तिची अवस्था आणि आजची आपली लॉकडाऊन मधील अवस्था जेमतेम सारखीच आहे उलट मी म्हणेल आपण खूप उजवे ठरू जर होणाऱ्या त्रासाची तुलना केली तर ! फरक इतकाच आहे की त्या वेळी आणीबाणी ही फक्त ज्यू लोकांसाठीच होती आणि शत्रू म्हणजे हिटलर चे नाझीवादी आणि आज आणीबाणी आपल्या सगळ्यांसाठी आहे , शत्रूही सगळ्यांचा एकच आहे .
तुम्हाला जर लॉकडाऊन म्हणजे काही अवघड तपश्चर्या वगैरे टाईप वाटत असेल तर Anne Frank ची ही डायरी नक्की वाचा.
बंद खोलीत तिने कुटुंबाबरोबर कसे दिवस काढले , काय खायची-प्यायची , आपले छंद कसे जोपासले , वेळेचा उपयोग कसा केला हे सगळं लिहिलंय.
आपल्यालाही तेच करायचं आहे उलट तो काळ खूप जुना होता आज तर आपल्याकडे किती काय काय आहे घरात बसून करण्यासारखं मग का लोकांकडून अशा अक्षम्य चुका होतात !
मी तर म्हणेल या कठीण काळात आपल्याला Anne Frank सारख जगावं लागेल आणि तितकंच धीट व जबाबदारही बनायलाच लागेल 🙏
वाचा आणि इतरांनाही वाचायला लावा 🙏
- Santosh Rangapure
अॅन फ्रॅन्क ची डायरी हे पुस्तक खूप दिवसांपासून वाचायचे डोक्यात होते आणि सध्या चालू असलेल्या lockdown मुळे हा योग जुळून आला. याला पुस्तक म्हणण्यापेक्षा एका कोवळ्या 13 वर्षाच्या जीवाने लिहिलेले अत्यंत भावनिक आणि संवेदनशील आत्मकथन च म्हणता येईल.
दुसर्या महायुद्धाच्या काळात हॉलंड मधील अॅमसटरडॅम येथे जन्म घेतलेली फक्त 13 वर्षाची अॅन जन्माने ज्यु असल्याने सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही. हॉलंड वर नाझी सैन्याचा कब्जा असल्याने अनेक ज्यु कुटुंब भूमीगत होतात किंवा अज्ञातवासात तरी जातात. अॅन चे कुटुंबीय देखील अशाच एका आडजागेत सहारा घेतात आणि एकाच घरात तब्बल दोन वर्षे बाहेरच्या जगाचा कुठलाही संपर्क नसताना कुढत काढतात.
असामान्य बुद्धीमत्ता आणि वाचन लेखनाची प्रचंड आवड असलेल्या अॅन ला रोजनिशी लिहायची सवय असते आणि याच रोजनिशी द्वारे ती व्यक्त व्हायचा प्रयत्न करते. स्वतः ची होणारी घुसमट, प्रचंड कोंडमारा, जगण्याची नसलेली खात्री त्यामुळे होणारी तगमग, नातेसंबंधातील ताणतणाव, तारूणय सुलभ भावना हे सर्व तिने इतक्या सुंदर पद्धतीने मांडले आहे कि वाचताना आपण हरवून जातो आणि भान हरपून जाते. तिचे नाजूक वय पाहता तिने लिहिलेल्या गोष्टींमधे निरागसता आणि सच्चाई जाणवते त्यात राजकारण नसून केवळ साधे जीवन जगण्याची धडपड दिसते.
महायुद्ध संपल्यानंतर हि रोजनिशी प्रसिद्ध होऊन पुस्तक रूपात लोकांच्या समोर आले आणि त्या काळात ज्यु धर्मीयांनी सोसलेल्या हालअपेष्टांची सर्व जगाला जाणीव झाली,अॅन च्या भावनिक लिखाणाने लोक अक्षरशः हादरून गेले. सदर पुस्तक 60 पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून नाझी काळातील सर्वोत्तम लिखाण म्हणून याची गणना होते.
मित्रांनो आज आपण सर्व सुखसोयी असताना आपल्या स्वतःच्या घरात फक्त काही काळ काढायचा असताना कुरकुर करतो मग अॅन सारख्या 13 वर्षाच्या कोवळ्या मनाला सतत हॉलोकासट च्या दडपणाखाली मृत्यूच्या छायेत राहून काय वाटले असेल? तिची पण सामान्य मुलींसारखी स्वतंत्र जीवनाची लहान लहान स्वप्नं असतात पण त्याला ती मुकते पण अशाही धीरगंभीर परिस्थितीत मनाचा तोल न ढळू देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ती आयुष्य जगते. स्वतःच्या अल्प कारकीर्दीत अॅन ने केवळ रोजनिशी द्वारे सकारात्मक जगण्याचा फार मोठा संदेश जगासमोर ठेवला आहे असे मला वाटते. आवर्जून वाचावे, नक्की वाचावे, पुन्हा पुन्हा वाचावे असे हे अनमोल पुस्तक हा अनमोल ठेवा मी वाचू शकलो, अनुभवू शकलो म्हणुन स्वतः ला खूप भाग्यवान समजतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼
- ZEE MARATHI DISHA 13 JULY - 19 JULY, 2019
जगात गाजलेली अनमोल डायरी...
महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल होतं, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा छळ करण्यास माणूस कसा प्रवृत्त होतो, याचं प्रत्ययकारी चित्रण ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’मध्ये वाचून मन सुन्न होतं. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षं अॅन फ्रॅंक या १३ वर्षीय बालिकेला ना शाळा, ना मैत्रिणी अशा परिस्थितीत एका गुप्त ठिकाणी अज्ञातवासात राहावं लागलं. तेव्हा मनातील कोंडलेल्या भावभावनांना कोणताही आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून देण्यासाठी, तिनं डायरी लिहायला सुरुवात केली. १२ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ पर्यंत तिनं रोजनिशी लिहिली.
सुरुवातीला तिनं शाळेतल्या मित्रमैत्रीणींविषयी आठवून आठवून लिहिलं. नंतर ओघातच गुप्तनिवासात राहणाऱ्यांच्या स्वभाविषयी, त्यांना मदत करणाऱ्यांविषयी, तिचे आई-वडील, बहीण मारगॉट या कुटुंबीयांविषयी, त्यांचे स्वभावविशेष, सवयी तसंच बाहेरच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी ती लिहीत होती. गुप्तनिवासात आल्यापासून हितगुज सांगावं, अशी कोणी मैत्रीण नाही म्हणून या रोजनिशीलाच मैत्रीण समजून तिचं नाव तिनं ‘किटी’ ठेवलं. दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘प्रियतम किटी’ संबोधून ती लिहू लागली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा छळ झाला. त्यामुळे बालपणी फुलपाखरू आयुष्य जगणाऱ्या अॅन फ्रॅंकला अचानक नाझींच्या छळकथांना सामोरं जावं लागतं. अॅन फ्रॅंकचे कुटुंबीय, व्हॅनडॅन कुटुंबीय नाझी भस्मासुरापासून दूर पळत एका इमारतीत लपून छपून राहू लागतात. सर्व बाजूंनी बंदिस्त, पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या, दबकून बोलणं, शाळा सवंगडी दुरावलेले... बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क, बरोबर आणलेल्या पुस्तकांच्या वाचनाविषयी दुसरा काहीही विरंगुळा नाही... साधी बेल वाजली तरी आपल्याला पकडायलाच आले आहेत ही धास्ती. अशा प्रकारचं जगणं वाट्याला आलं. काहींना सहानुभूती वाटली, मदत करावीशी वाटली तरी ते करू शकत नाहीत, कारण ही बातमी कळली तर जर्मन लोक मदतकर्त्यांना जबर शिक्षा करत.
अशा धास्तावलेल्या परिस्थितीत या मंडळींनी दोन वर्षं काढली. ४ ऑगस्ट १९४४ रोजी ही मंडळी पकडली गेली आणि जर्मन छळछावणीत त्यांची रवानगी झाली. त्यातून काही दिवसांतच अॅनचे वडील आटो फ्रॅंक कसेबसे वाचले. १९५३ पर्यंत ते अॅमस्टरडॅममध्ये राहिले. १९५३ नंतर ते त्यांच्या बहिणीकडे स्वित्स्झर्लंडमधील बॅसेल या गावी राहिले. १९ ऑगस्ट १९८० रोजी ते वारले. त्या अगोदरच त्यांनी अॅनची डायरी प्रकाशित केली होती. ४ ऑगस्ट १९४४ रोजी गुप्तनिवासात लपून राहिलेल्या लोकांना पकडण्यात आलं. मिएप गाइस व बेप व्हायस्कुइज्ल या दोन सेक्रेटरींना अॅनच्या रोजनिशीचे कागद जमिनीवर विखुरलेले सापडले. मिएपनं ते सर्व गोळा करून सुरक्षित ठेवले. युद्धसमाप्तीनंतर अॅन वारल्याचं तिला कळलं, तेव्हा तिनं ते कागद अॅनचे वडील आटो फ्रॅंक यांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी ही रोजनिशी १९४७मध्ये प्रकाशित केली. जागतिक साहित्यविश्वात एक अनमोल लेणं असलेल्या या डायरीच्या आतापर्यंत लाखो प्रती खपल्या आहेत.
-मंगला गोखले
- NEWSPAPER REVIEW
वादळ आणि दिवली यांच्या संघर्षाची ही आहे कहाणी...
अॅन फ्रॅंकच्या आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रोजनिशीच्या रूपाने तिने मिळवलेले अमरपण.
या रोजनिशीत एका तरुण, भावनाप्रधान मुलीचे हृद्गत आहे. एवढ्या लहान वयात तिला असलेले जगाचे आणि जीवनाचे ज्ञान मनाला थक्क करते.
‘‘जग चांगलं आहे. त्यातली माणसे प्रेमळ आहेत. त्यांच्या भलेपणावर माझा पुरा विश्वास आहे.’’ अॅन म्हणायची.
‘‘माझे आयुष्यातले मुख्य ध्येय म्हणजे विध्वंस, नाश करणे हे होय.’’ हिटलर नाझी जर्मनीचा पुढारी ओरडून सांगत होता. त्याची मते साऱ्या जगाला ओरडून सांगण्यासाठी, एका बलवान राष्ट्राची सारी यंत्रणा आणि शक्ती खपत होती तर त्याच्या राक्षसी जुलमाला बळी पडलेल्या अॅनची मते, फक्त तीच वाचू शकत असलेल्या या रोजनिशीखेरीज कुणालाही माहित नव्हती.
आज हिटलटरच गगनभेदी आवाज लुप्त झाला आहे. त्याची मते विसरली गेली आहेत. पण साऱ्या जगाला सांगण्यासाठी एक कैफियत स्वत:च्या हृदयाशी बाळगून बसलेली ही रोजनिशी मात्रआज अमर झाली आहे. जगातील जवळजवळ ७० (सत्तर) भाषांतून या रोजनिशीचे अनुवाद छापले गेले आहेत. तिच्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.
-जॉर्ज स्टीव्हन्स
- SAHITYA-KALA 25-11-1988
मरणानंतरही ‘जगणारी’ – अॅन फ्रॅंक…
दुसरे महायुद्ध ही ह्या शतकातील अनेक दृष्टीने सर्वांत महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. दुसऱ्या महायुद्धापासून जगाच्या नकाशात आमुलाग्र बदल झाले, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य शक्ती रसातळाला गेल्या आणि अमेरिका व रशियासारख्या नव्या शक्तींचा उदय झाला; पण या सर्वांपेक्षा दुसरे महायुद्ध लक्षात राहते ते भीषण अशा संहारामुळे. हिटलरच्या अट्टाहासापायी ६० लाख ज्यूंना आपले प्राण गमवावे लागले, शिवाय सैनिकांच्या मृत्यूची गणतीच नाही. सुमारे ८० मिलीयन लोक दुसऱ्या महायुद्धात मारले गेले. इतका भीषण संहार घडवून आणणारी ही घटना जगाच्या इतिहासात एकमेव असावी. या घटनेवर संशोधन होऊन जितके प्रचंड लिखाण झाले आहे तेवढे जगाच्या इतिहासातील अन्य कोणत्याही घटनेवर झाले नसावे. आज या घटनेवर आधारलेली अक्षरश: हजारो पुस्तके अस्तित्वात आहेत. विविध कोनांनी ही घटना पाहण्याचा अनेक अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, कलावंतांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे विविध छटांनी हा काळ वाचकांच्या डोळ्यांसमोर गोचर होतो.
ओल्गा लेंग्वेल या सामान्य स्त्रीचे आत्मकथन हिटलरच्या यातनातळाचे ज्वलंत दर्शन घडविते. वाचताना देखील त्या वर्णनातला भयानकपणा थरारून सोडणारा आहे. नाझी सैनिकांनी ज्यू स्त्रियांवर केलेल्या अत्याचारातून जी मुलं झाली, अशांना काही प्रश्न विचारून त्याचे संकलीत पुस्तकही हा एक अभिनव उपक्रम म्हणता येईल. हा सारा खटाटोप ऑस्ट्रेलियातील एका ज्यू पत्रकाराने-पीटर सीक्रीव्हस्की याने Born Guilty : Children of Nazi Families. ‘‘या पुस्तकात केला. या विविध लेखनातून दुसऱ्या महायुद्धातील अनेक गोष्टी स्पष्ट होतात. तरीसुद्धा, हिटलरचा मृत्यू, बंकर नं ७, ईव्हा ब्राऊनचा मृत्यू, अश अनेक गूढ गोष्टींची ऊकल मात्र होऊ शकली नाही. आजपर्यंत तरी या गोष्टी वादग्रस्तच आहेत.
दुसऱ्या महायुद्धावर जगातील अनेक प्रमुख भाषांत विपुल साहित्य निर्माण झाले. वि. ग. कानिटकारांनी लिहिलेला ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ हा ग्रंथ मराठी वाचकाला दुसऱ्या महायुद्धांचा काळ डोळ्यासमोर उभा करतो. ‘नाझी भस्मासुरांचा उदयास्त’ हा वस्तुनिष्ठ इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. या घटनेला कादंबरीची कलात्मकता वि. स. वाळींबे यांनी ‘दुसरे महायुद्ध’ या ग्रंथात प्राप्त करून दिली आहे. जी. ए. कुलकर्णी या सिद्धहस्त प्रतिभावंताने ‘ओल्गा लेंग्वेल’चे आत्मकथेने (वैऱ्याची एक रात्र) मराठीत आणून आणखी एक काळ्याकुट्ट कृत्याचे दर्शन घडविले. यातील भयानकता, मृत्यूचे थैमान, (प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही – मृत्यूचे निकट सानिध्य) यानी वाचक अस्वस्थ होतो. ‘मानवता’ या मूल्यावरची श्रद्धा हळमळू लागते. ‘हायरी ऑफ फ्रॅंक’ हा एक वेगळाच अनुभव मंगला निगुडकर यांनी मराठीत आणला.
‘अॅन’ ही बारा-तेरा वर्षांची ज्यू मुलगी. हिटलरशाहीचा पाश जर्मनीच्या सभोवतालच्या छोट्याछोट्या राष्ट्रांभोवती आवळत गेला आणि त्यात ‘हॉलंड’ ही होते. हळूहळू तर, ‘ज्यू’ वरील बंधने वाढत गेली आणि शेवटी तर, ठराविक तारखेच्या आंत ज्यूंना देशत्याग करण्याचा आदेश देण्यात आला आणि जे ज्यू देशाबाहेर जाणार नाहीत त्यांची रवानगी निर्दयपणे यातना तळावर करण्यात येई. हिटलरच्या या ज्यू द्वेशाच्या वणव्यात अनेक ज्यू कुटुंबियांनी देशत्याग केला आणि बहुदा तटस्थ राष्ट्रांचा आश्रय घेतला. पण कुटुंबांनी देशत्याग केला आणि बहुदा तटस्थ राष्ट्रांचा आश्रय घेतला. पण ज्यांना देशत्याग शक्य झाला नाही त्रूाचे मात्र खूपच हाल झाले. अनेकांना ‘कॉन्सट्रेशन कॅप’ची न परतीची वाट चालावी लागली. कित्येक ज्यू कुटुंबियांनी हॉलंडमध्येच लपून छपून रहाण्याचा मार्ग स्वीकारला. (त्यातूनही ज्यांच्या गुप्तनिवासाची बातमी ‘गेस्टापो’ ज्यू ना लागली त्यांची रवानगीही यातनातळावर केली गेली.)
१२-१३ वर्षांच्या अॅनच्या कुटुंबावरही असाच अज्ञातवास कंठण्याची वेळ आली. नुकतीच उमलू लागलेली अॅन् आपल्या आई वडिलांबरोबर अज्ञात निवासात राहायला गेली. त्यांच्याबरोबर व्हॅनडॅन कुटुंबही अज्ञातवासात आश्रयाला आले आहे. श्री. व सौ. व्हॅनडॅन आणि त्यांचा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा पीटर. अज्ञात निवासातील जागा दोन कुटुंबाना अपुरी आहे. माणसे आणि सामान यांची गर्दी झाली आहे. ‘इथे कुणी राहते.’ हे बाहेरच्या लोकांना (विशेषत: गेस्टापोजना) कळू नये म्हणून वावरतांना अनेक बंधने स्वत:भोवती घालून घ्यावी लागतात. निवासाच्या खालच्या मजल्यावरचं ऑफिस दिवसा सुरू असते म्हणून वरच्या मजल्यावर चालतांना पायाचे आवाज होऊ न देणे, हळू बोलणे, मोठ्याने हसणे नाही, बाथरूममधला नळ वापरायचा नाही, शेगडी पेटवायची नाही, खिडकीतून बाहेर डोकवायचे नाही, खिडकी खरे तर उघडायची सुद्धा नाही, एक-ना दोन अशा अनेक बंधनांमुळे या गुप्त निवासातले जीवन म्हणजे स्वत:च स्वीकारलेली एक कैद असे उमलू पाहणाऱ्या अॅनूला वाटू लागले. या पूर्वीच्या मुक्त आणि स्वच्छंदी जीवनाकडे ओढ घेत असते. या गुप्त निवासातले बंधनात जखडलेले जीवन तिला खूपच असह्य होते. हे सगळे अॅनूला कुणाजवळ तरी बोलायचे आहे, मन मोकळे करायचे आहे, पण ऐकायला वेळच कुणाला नाही. तेव्हा अॅन् रोजनिशी लिहिण्याचे ठरविते. कारण ‘‘माणसापेक्षा कागद जास्त सहनशील, सोशीक असतो.’’ आपले शब्द तो मुकाट्याने ऐकतो, असे अॅनला वाटते. या अज्ञात वासात अॅनची डायरी हीच तिची जिवलग मैत्रिण बनते डायरीचे नाव अॅनूने गंमतीने ‘किटी’ ठेवले आहे. प्रत्येक दिवसांच्या डायरीलेखनाची सुरुवात ‘प्रिय किटी’ने होते आणि शेवट– तुझी अॅन्!
रोजनिशी, लिहितांना कसल्याही उपचारांचे बंधन नसल्यामुळे अॅन खूपच मोकळेपणाने लिहिते. आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रिय किटी’ला सांगण्याचा तिचा प्रयत्न आहे. १२-१३ वर्षांच्या मुलीने लिहिलेले मनोगत खरोखरच जिवंतपणाने वाचकांपुढे साकार हाते, अॅन काही सिद्धहस्त लेखिका नव्हती, तरीही तिचे अनुभवाशी पावलेले तादात्म्य तिच्या शब्दांतून चैतन्याची फुंकर मारून जाते आणि शब्दच जिवंत होतात. मुलीच्या जीवनातील वय वर्षे १२ ते १५ ही अत्यंत विचित्र असतात. या काळात बालपणातील गोंडस निष्पापपण हरवलेले असते आणि तारुण्याचे सळसळते चैतन्य अद्याप लाभलेले नसते! त्यामुळे एका विचित्र मन:स्थितीतून हा खडतर प्रवास हात असतो. अॅन्च्या दुर्दैवाने तिचा हा काळ गुप्त निवासातल्या कैदेत गेला. तिच्या लेखनातून मानसिक कोंडमारा स्पष्ट जाणवतो. आपण कोणत्या परिस्थितीत सापडलो आहोत याची तिला जाणीव आहे. गांभीर्य आहे तरीही तिचा सहज स्वभाव अनेकदा उसळून येतो आणि तिची लेखणी एखादा मजेशीर प्रसंग रंगवून जाते. गुप्तनिवासाचे वर्णनही अत्यंत रेखीवपणे प्रकट होते. तेथील अडचण, माणसांची आणि सामानाची गर्दी, यामुळे उद्भवणारे फजितीचे प्रसंग अतिशय मार्मिकपणे प्रकट होतात. तसेच बाहेरून येणाऱ्या ज्यू छळाच्या बातम्या, युद्धाच्या बातम्या, रात्रीबेरात्री आकाशात घरघरणारी ब्रिटिश बॉम्बर्स, जमिनीवरून घडाडणाऱ्या जर्मन तोफा आणि या सर्वांमुळे गुप्तनिवापसात उठणारे विविध तरंग! यांचे अतिशय परिणामकारक चित्रण ‘किटी’च्या अनेक पानांतून प्रत्ययाला येत. या सर्वांत अॅनच्या शरीरात बदलांबरोबरच होणारे मानसिक बदलही सुस्पष्टाणे दिसून येतात. अॅन हळुहळू तारुण्याकडे जाऊ लागते. तरुण मनांची प्रेमाची भूकही तिने कोणताही आडपडदा न ठवेता प्रकट केली आहे. सुरुवातीला तिला न आवडणारा, कंटाळवाणा, आळशी, येडपट पीटरही तिला आता आवडू लागतो. (गुप्तनिवासात मैत्री करण्यासाठी ती एकमेव -------- उपलब्ध असतो.) कदाचित परिस्थितीतून तडजोड म्हणून तिने तो स्वीकारलाही असेल, पण अॅन् पीटरवर प्रेम करू लागते आणि तारुण्याबरोबरच स्पर्श, डोळ्यांची भाषा या अत्यंत तरल भावनाही जागृत होतात. जीवनात खूपच सुख व आनंद असल्याचा नवाच प्रत्यय तिला येतो, इथून पुढची अॅन थोडी वेगळी वाटते. स्वत:त रमणारी, स्वत:शीच बोलणारी आणि विचार करणारी...
युद्ध संपल्यानंतर... च्या मुक्त जीवनाची चित्रे अॅन डोळ्यासमोर उभी करते. पण दुर्दैवाने युद्ध संपण्याआधी अॅनचे आयुष्य संपते...
लपूनछपून राहणाऱ्या ज्यू कुटुंबांची खूपच कुचंबणा होऊ लागते. अन्नही कमी मिळू लागते. आसपासच्या, शेजारीपाजाऱ्यांच्या पकडल्या गेल्याच्या बातम्याही अस्वस्थ करू लागतात आणि या वणव्यात अॅनचे कुटुंबही सापडते. यातना तळाची वाट सर्वांनाच चालावी लागते. १४ जून १९४२ रोजी सुरू झालेला अॅन् किटी संवाद १ ऑगस्ट १९४४ रोजी अचानक थांबतो.’ कारण ४ ऑगस्ट रोजी या गुप्तनिवासावर ‘द ग्राईन पॉलिशे’ नी धाड घातली आणि सर्वांना पकडून नेले. गेस्टापोच्या लोकांनी गुप्तनिवास संपूर्ण धुंडाळला. जुनी मासिके, पुस्तके, वर्तमानपत्रे जमिनीवर इत:स्तता फेकून दिली. त्यातच एली व मिएप यांनपा अॅनची डायरी सापडली आणि आज ती डायरी वाचकासमोर एक कोवळे मन उलगडते आहे. खरे तर सर्वांना पकडले गेल्यानंतर यातना तळावरच खऱ्या ‘यातनेला’ सुरुवात होते. पण त्या आधची अॅनचे डायरी लेखन थांबते. तरीसुद्धा बंदिस्त आणि घुसमटलेल्या जीवनाचे हुंकार आयुष्याच्या क्षणभुंगुरतेची जाणीव करून देतात.
प्रत्यक्ष भेटणाऱ्या मृत्यूपेक्षा मृत्यूचे निकटचे सानिध्य हे अतिशय भयकारी असते! क्षणोक्षणी दचकत पोलिसांच्या आणि गेस्टापोजच्या बुटांच्या खडखडाटावर आपले आयुष्य ओलीस ठेवून जाणणारे ते आठ माणसांचे कुटुंब! अॅनच्या डायरीतून या सत्याचा प्रत्यय येतो.
मानवी मनोव्यापार अतिशय गुंतागुंतीचे असतात. पण अॅनने स्वत:च्या सहजसुंदर शैलीतून त्या बंदिस्त जीवनातल्या क्रियाप्रतिक्रियांचा नेमका वेध घेतला आहे. लहान सहान गोष्टीवरून धुसपुसणारी लहान-मोठी माणसे आणि त्यांच्या मनाचे विविध पदर हळुवारपणे उलगडले जातात. काहीतरी ‘आदम्य’ ‘उज्वल’ निर्माण करण्याच्या कृत्रीम खटपटीने अॅन डायरी लिहित नाही– तर लिहिण्यात एक प्रांजळ प्रवाहीपणा दिसतो. अॅनला स्वत:जवळ असणाऱ्या भुंगांची जाणीव आहे. गुप्तनिवासात ती कथा, निबंध, लेख लिहित असते. तरीही तिचे आपल्या ‘किटी’वर खूपच प्रेम आहे. ‘किटी’ पासून ती काही लपवून ठेवीत नाही. अगदी निकटच्या माणसांचे गुणदोष किटीला सांगून टाकते. लिहिण्याच्या ओघात, ‘‘माणसाचे खरे स्वरुप, त्याच्याशी भांडण होते तेव्हाच प्रकट होते, तोवर नाही!
हे शाश्वत सत्यही ती प्रकट करते. १४ वर्षांच्या अॅनचे हे विचार मोठ्या माणसानाही थक्क करणारेच आहेत. अॅनचे एक आवडते पेन, चुकून कचऱ्याबरोबर शेगडीत टाकले जाते, अॅन खूप शोधते. पण दुसऱ्या दिवशी शेगडीतल्या राखेत पेनची क्लिप सापडते. हा प्रसंग तसा साधाच, पण अॅन म्हणते, ‘दु:खात सुख एवढेच की, माझ्या पेनचे दहन झाले. पुढे माझेही तेच व्हावे अशी तीव्र इच्छा आहे!’’ एका बाजूला ‘युद्धानंतर’ या विषयावर उत्साहाने बोलणारी अॅन स्वत:च्या मृत्यू कल्पनेलाही निरामय मनाने सामोरी जाते. युद्धानंतर आपल्या रोजनिशीला खूप महत्त्व येईल असे तिला मनातून कुठेतरी वाटते. आपल्या डायरीत, ‘एका कुरूप वेड्या बदकाचे मनोगत’ असे नावही ती देते.
...मार्च १९४५ मध्ये हॉलंड मुक्त झाले, पण त्यापूर्वी दोनच महिने बर्जेस बेल्सनच्या कैदेत अॅन मरण पावली...
‘युद्धानंतर’चा दिवस तिच्या आयुष्यात उगवलाच नाही! ‘मला मृत्यूनंतरही जगायचे आहे.’’ आणि म्हणून देवाले दिलेल्या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे!’ असे अॅन म्हणायची... तिने लिहिलेल्या डायरीच्या रूपाने ती आजही जिवंत आहे. अनेकांना भेटते आहे.
सौ. मंगला निगुडकरांनी अॅनच्या डायरीचा मराठी अनुवाद साधून अॅनची मराठी वाचकांशी भेट घडवून आणली आहे. अॅनच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी अगदी, अॅन भेटल्याचे समाधान मिळते.
-प्रा. कृष्णाजी कुलकर्णी