- Vijay Patil
`माझा गाव`
लेखक- मा.रणजित देसाई
मेहता पब्लिशिंग हाऊस
` स्वातंत्र्यपूर्व काळातील तांबड्या मातीचा सुगंध देणारी, एखादा कृष्ण-धवल मराठी चित्रपट पाहतो आहोत याची अनुभूती देणारी, आपण त्या गावाचा एक भाग आहोत असं वाटणारी एक संवेदनशील कलाकृती`.
आप्पासाहेब इनामदार म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातील त्या गावचे प्रमुख. आपल्या गावातील मंडळींना प्रसंग पडला तर आपल्या छातीचा कोट आणि गरज पडल्यास नरडीचा घोट घ्यायला कमी पडणार नाही असं एक दमदार व्यक्तिमत्व.
त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे वरून जरी नारळासारखे कठीण वाटत असेल तरी त्यांचा स्वभाव अतिशय मृदू गोड पाण्यासारखा आहे हे त्यांच्या आपल्या सुनेवर लेकीची माया पांघरणारा व आपल्या सुनेच्या गरोदर आणि बाळंतपणाच्या प्रसंगी सासू-सासरे अशी दुहेरी भूमिका निभावन्यातून दिसून येते.गावात पडलेल्या ओला दुष्काळ वेळी गावातील लोक गाव सोडून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना आपल्या धान्याची कोठारे मोकळी करून देणार, आणि तेही संपल्यावर स्वतःचे घरातील दागिने मोडून त्याचा पैसा उभा करून गावकऱ्यांसाठी धान्य विकत घेणारा आणि गरज पडल्यास आपली जमीन विकायला मागेपुढे न पाहणारा गाव प्रमुख आपल्याला येथेच भेटतो.
तात्या म्हणजे गावातील पुजारी आणि वैद्यकशास्त्राला धंदा न मानता, सेवा मानणारे उत्तम वैद्य . रामशास्त्री प्रभुणे यांचं दुसरं रूप म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आप्पा साहेबांचा मोठा आधार आणि प्रत्येक अप्पासाहेबांच्या संकटात बरोबरीने तोंड देणारी व त्यातून मार्ग काढणारी व्यक्ती म्हणजे तात्या. आप्पा साहेबांना योग्य सल्ला व वेळप्रसंगी आप्पासाहेबांना सुनवायला सुद्धा मागेपुढे न बघणारा गावातील एकमेव माणूस म्हणजे तात्या.गावात पटकीच्या साथी वेळी तात्यांनी अहोरात्र केलेले प्रयत्न व आप्पासाहेब यांनी गावाच्या प्रमुख या नात्याने त्यांना दिलेलं बळ.रावबाच्या हौशाच्या वेडापायी आणि नंतर तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावात झालेली दुफळी व बिघडलेल्या वातावरण आणि या बाक्या प्रसंगावर त्यांनी केलेली मात.मनात आदर्श सल्लागार व आदर्श गावप्रमुख कसा असावा याच उदाहरण घालून देतात
उमा म्हणजे आप्पासाहेब यांची थोरली सून, वाड्यातील जबाबदार स्त्री, आपल्या सासूच्या निधनानंतर आपल्या दिरावर आईची माया लावणारी आदर्श सून.आपल्या नवऱ्याचा चुकत आहे हे माहीत असूनही तोंड न उघडणारी, आपले वडील आणि सासरे यांच्यात वाद झाल्यानंतर तब्बल 11 वर्षे आपल्या माहेरचं नाव न काढणारी व माहेरचे तोंड न बघणारी, दरोड्याच्या वेळी आपल्या कुटुंबांना सोडून न जाण्याची हिंमत दाखवणारी, आदर्श कारभारी आणि सून उमा वहिनी.
रावबा म्हणजे आप्पा साहेबांच्या शेती आणि शिकारीची आवड असलेले पण आप्पांच्या धाकात
असलेले तरुण रक्ताची रग असणारे, थोरले वारसदार.
जयवंत म्हणजे आपल्या आईच्या निधनानंतर, उमा वहिनी च्या सावलीत वाढणारा आणि वहिनीलाच आई मानणारे संवेदनशील असे अप्पासाहेबांच्या धाकले वारसदार.
कथानकाच्या शेवटी आप्पासाहेब दरोडेखोरांच्या गोळीबाराला बळी पडतात आणि काकी पण तापाने मरण पावतात व त्या धक्क्याने तात्या ही हे जग सोडून जगतात आणि जयवंत पुढच्या शिक्षणासाठी बेळगावला निघून जाण्यास तयार होतो. त्यावेळेस आपल्याला स्वतःला ही जयवंत सारखी वाटते की, खरोखरच आता या गावात आपलं काही राहिले नाही. पण उमा वहिनी साठी व छोटया यशवंत साठी हा गाव सोडून आपण जाऊ नये असं एक मन सांगत असते.
शेवटची 2-3 पाने वाचताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबायचं नाव घेत नाहीत आणि गावच्या तांबड्या वाटेवरून मागे बघवत ही नाही,माझ्या गावातून पाय ही निघत नाही.
✅️विजय पाटील ✅️
- Priya Deshmukh
#माझागावं
◆◆◆◆◆◆◆
कल्पनाशक्ती ही अनेक गोष्टीची जननी आहे. कोणतीही गोष्ट मूर्तस्वरूप येण्यापूर्वी कल्पनाच तर असते. कितीही अकल्पित वाटो. कल्पना मानवासाठी महाशक्तीचं. कुणी विमानाची. कुणी जहाजाची कल्पना केली. मीही कल्पना केली माझ्या गावाची.. !!! होय माझा गावं. बेळगावातील डोंगराच्या कुशीत वसलेलं. माणुसकीच्या झऱ्याचा किनारा लाभलेलं माझं गावं. रणजीत देसाईंचं `माझा गावं`. कल्पना केली अन् थेट गावात उडी मारली. गावगाडा, गणगोत, नदी, डोंगर, मंदिर, यात्रा, मेळे ह्या सगळ्या मनातल्या आठवणी एका क्षणात नजरेसमोरुन गेल्या....
जयवंत हा या कादंबरीचा सूत्रधार असून त्याचे वडील आप्पासाहेब इनामदार हे मुख्य पात्र आहे. गावची आठवण यावी आणि माझा गावं न वाचाव असं होऊच शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं हा हेतू कादंबरी लिहीण्यामागे होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसं जुळवून घेत होता, कसं वाहून घेत होता, कसा जगत होता याचं वर्णन माझा गावमध्ये देसाईंनी उत्तम पद्धतीने रेखाटलं आहे. अठरापगड जाती, त्यांचे उद्योग, गावच्या वेशीवर होणाऱ्या बैठका, शिकारीवर जाण्याचे प्रसंग अत्यंत रंजक स्वरूपात मांडले आहे.
गावचा कारभारी म्हणून आप्पासाहेबांकडे बघितले जाते. आपल्या पंखाखाली असलेल्या या गावचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची सतत जाणिव असणारे आप्पासाहेब. प्रशस्त वाडा, त्याची रचना, वाड्यातील नोकर-चाकर यावरून त्या काळातील त्यांचा रुबाब आणि तो वाडा डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहतो. सत्तालोलूप नसलेले आप्पासाहेब गावचे प्रमुख असून गावाबद्दल त्यांनी नेहमीच योग्य ते कर्तव्य पार पडले आहे.
गावातील बोलीचे एकूण एक प्रकार लिहीताना लेखकांनी त्यातील बाज अत्यंत जाणिवपुर्वक जपण्याचा प्रयत्न केला आहे. गावकऱ्यांची आप्पासाहेबांप्रती नम्रतेची आणि आदराची बोली, आप्पासाहेबांची गर्वविरहीत पण रुबाबदार बोली, तर घरंदाज सुनेची डोक्यावर पदर घेऊन आदराने केलेली सुसंस्कारी बोली, रायबाची अहंकारी आणि स्वार्थी बोली, जयवंताची खट्याळ बोली तर तात्यांची गावकऱ्यांच्याप्रती सेवाभावी आणि मित्राला सल्ला देतानाची सल्लागार म्हणून केलेली बोली जशीच्या तशी वर्णन केली आहे.
गावात महामारी दुष्काळ पडला असताना गावकऱ्यांना धान्याचे कोठार रिकामे करणारे दानी आप्पासाहेब दिसून येतात तर वेळप्रसंगी कर्ज काढून गावकऱ्यांना जगवितांना एक गावाचा पालक म्हणून खंबीरपणे उभे राहतात. त्यांचा मुलगा रायबा मात्र त्याच्या अगदीच विरुद्ध वृत्तीचा. कर्तव्य, परंपरा या सगळ्या गोष्टीपासून दूर असलेला, बाहेरख्याली होता. घरात सोन्यासारखी बायको म्हणजेच उमा असताना रायबाचे घरात कमी आणि बाहेरच लक्ष जास्त असायचे. याचा विचार सतत आप्पा साहेबांना खात असायचा. पण तिच्यावर पोरीसारखी माया, प्रेम आणि जीव लावताना सुनेपेक्षा बाप-लेकीचं नातं डोळ्यासमोर उभं राहतं.
गावचे ब्राम्हण म्हणजे तात्या कुलकर्णी. आप्पासाहेबांचे खास मित्र आणि एक उत्तम वैद्य देखील. ते ब्राम्हण असून देखील त्यांनी वैद्यकीय सेवा कधीच कमी पडू दिली नाही किंवा त्याच्यामध्ये जात-पात, उच्चनीचता आडवी आणली नाही. प्रत्येक रोगावर त्यांच्याकडे उपचार असतात आणि त्यांची जडीबुटी लवकर रोगावर परिणाम देखील करायची. प्रसंगी तात्या भरल्या ताटावरून उठून देखील गावातील गरिबांच्या उपचारासाठी जायचे. त्यावेळी त्यांच्या पत्नी मधील अस्सल ब्राम्हणी पण प्रेमळ, मायाळू आणि काळजीवाहू स्वभाव दिसून यायचा.
व्यभिचारी रायबाच्या वागणुकीचा फटका, त्यांच्या व्यभिचारी कर्माची फळ आप्पासाहेबांना भोगावी लागलेली दिसून येतात. केवळ मुलाच्या चुकीमुळे आप्पासाहेबांवर चवताळून आलेले गावकरी दिसतात आणि गावावर आलेल्या संकटाच्या वेळी आप्पासाहेबांनाच हात जोडून मदत मागणारे गावकरी देखील दिसतात. वाड्यावर आलेल्या या प्रसंगांमध्ये तात्या कुलकर्णींची नेहमीच एक वेगळी भूमिका मनात प्रश्न निर्माण करून जाते. नेहमी सत्य बोलणारे तात्या वाड्याच्या कुलदीपकाची आपल्या हुशारीने सुटका करुन वडिलांची आणि आपल्या मित्राची अब्रू वाचवतात आणि पुन्हा आप्पासाहेबांचे गावातील स्थान आदरसहीत निर्माण होते.
जुन्या परंपरांचे उदात्तीकरण न करता त्यांच्या चांगुलपणाचे गुणगान करण्याची मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. त्यातूनच माझा गावाची निर्मिती झाली. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पहिला. तेथेच देसाईंच्या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज बघायला मिळतो. गावात यात्रा मेळे भरतात तेव्हा सहकुटुंब यात्रेत जाताना आणि त्या यात्रेतील देवाच्या समोर मुख्य बकऱ्याची बळी देतानाचा प्रसंग जिवंत उभा केला आहे.
उमाला मुलं नसल्यामुळे आप्पासाहेब बकऱ्याची बळी देऊन नवस देखील बोलले होते. त्यातून त्या काळातील दैवी शक्तीचे वर्णन केले आहे. दोन वर्षांचा जयवंत उमाला आपल्या दिरापेक्षा मुलगा जास्त वाटत होता. दीर-भावजयीच्या संवादाला मर्यादा असून मायलेकाचा नातं मात्र खूप मार्मिक रित्या रेखाटलं आहे. प्रत्येक वेळी उमा जयवंताची आई होताना दिसून येते. जयवंताचे देखील तिच्याशिवाय पान हालत नाही. फरक फक्त एवढाच की तो उमाला आई ऐवजी वहिनी म्हणायचा. पण दोघांचाही एकमेकांत फार जीव गुंतला आहे असे लक्षात येते. आप्पासाहेब- उमा, जयवंत-उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातील हळवी तार छेडून जातो.
गावचा प्रमुख गावासाठी आनंदातच नाही तर संकट काळात देखील ढाल म्हणून उभा राहतो. गावच्या वेशीवर असलेल्या लक्ष्मी मंदिराची हुबेहूब रचना डोळ्यासमोर क्षणात उभी राहते. रायबा कडून घडलेला प्रसंग मनात भीती निर्माण करून जातो. गावात महामारी आली असताना गावचा कुठलाही नागरिक मृतदेह नेऊन टाकण्यासाठी पुढे सरसावत नव्हता, तेव्हा तरुणांना प्रोत्साहन देऊन आप्पासाहेबांनी स्वतः गावातील मृत पडलेल्या लोकांचे देह उचलले होते. इथे आप्पासाहेबांची माणुसकी दिसून येते.
एकदा गावात दरोडा पडला असताना त्यातच आप्पासाहेबांचा मृत्यू होतो. त्यावेळी संपूर्ण गाव धाय मोकलून रडत असतो. उमाचा आधार खचलेला असतो, तात्यांचा मित्र न सांगता, न भेटताच निघून गेला असतो, जयवंत आणि रायबाचा बाप कायमचा निजलेला असतो. गावकऱ्यांचा पालक काळाच्या पडद्याआड गेला असतो. वाड्याची आणि गावची शान निस्तेज झाली असते. इकडे तात्यांची पत्नीदेखील आजाराने ग्रासली असताना त्यांची दोन्हीकडील होत असलेली ओढाताण आणि आलेला ताण त्यांचं दुःख खोलवर रुजत जातो.
आप्पासाहेब गेल्यानंतर लगेचच दहाच दिवसात तात्यांची पत्नी देखील स्वर्गवासी होते. तात्यांची आणि त्यांच्या पत्नीची एक वेगळीच प्रेमळ नाळ आणि आत्मिक बांधिलकी या कथेत दिसून येते. तात्यांच्या पत्नी सोबतच तात्यांचा देखील मृत्यू होतो. एकाच दिवशी गावच्या ब्राम्हण दांपत्याचे एकाच घरातून दोन मृतदेह वाजत-गाजत, भगवंताच्या जयजयकाराने, साधुसंतांची पालखी निघावी त्याप्रमाणे अंतिम प्रवासासाठी निघतात. टाळ्याच्या गजरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जातो तेव्हा देखील संपूर्ण गाव दुःखात न्हाऊन निघतं. जयवंतला तात्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचा खूप लळा होता. उठसूट वहिनीच्या तक्रारी तर आई म्हणून वाहिनीने केलेल्या कामाचे कौतुक आणि गुणगान करण्यासाठी जयवंत तात्याचे घर गाठायचा. तो प्राथमिक शिक्षण देखील याच ठिकाणी घ्यायचाह यातून आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पाहत असतं.
कथेचा सूत्रधार जयवंत आता गाव सोडून निघालेला आहे नदीच्या काठाला वळसा घालून तो पुढे निघालेला आहे. गावात स्मशान शांतता पसरली आहे. गावचा प्रमुख गेला आणि गाव ओसाडं पडल्यासारखं वाटू लागलं. रायबा आता गावच्या प्रमुखपदी आला होता. जयवंताचं पुढील शिक्षण आता उमाच्या माहेरी म्हणजे कोल्हापूरला होणार होतं. जयवंताला खूप शिकायचं होतं पण इथे कथेचा सूत्रधार निराश आणि हताश दिसून येतो. या गावातील त्याची प्रेमाची माणसं एक-एक करून गळून गेली. आज तो उच्चशिक्षणासाठी हे गाव सोडून जातं आहे. पांधीच्या तोंडाशी उभे राहून त्याला या गावचा जीवनपट आठवतो. चांगले-वाईट प्रसंग आठवतात.
माझा गाव म्हणून आप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगत आहे. हे गाव सोडून जाताना प्रशस्त वाडा आणि उमाचा नवरा जरी तिच्यासोबत असला तरी ती वाड्यात किती एकटी पडणार याची जाणीव जयवंतला असते. मायलेकाच्या निरोपाचा हा प्रसंग खूप हळवा आहे; इतका की वाचताना आपल्या डोळ्यातून कधी अश्रू पुस्तकावर गळून पडतात कळत देखील नाही. आप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे वहिनी किती एकटी पडणार याची जाणीव जयवंतला आहे. याच कारणाने त्याचे पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत आहे आणि वाडयाकडे बघून त्याचे हात आपसूकच जोडले गेले आहे. "तुला माहित आहे तु हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा होतो...
- Amod Mehta
रणजीत देसाई यांचे माझा गाव ही कादंबरी तशी वाचकांना अपरिचित आहे. या कादंबरीत काय आहे ते पुस्तकाच्या मलपृष्ठावर सांगितलेच आहे. नेहमीप्रमाणे या या पुस्तकाची भाषा शैली अत्यंत ओघवती आणि हृदयंगम आहे. पुस्तक अतिशय वाचनीय व खिळवून ठेवणारे आहे.
- Bageshree Deshmukh
#रणजितदेसाई #माझागाव
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पुस्तकांच्या राशीत लोळायचं, उठायचं बसायचं, अखंड वाचायचं. पुस्तकं म्हटले की रणजित देसाई हे नाव मला वगळता येत नाही. या वेळी "माझा गाव" नावाचं पुस्तक हातात घेतलं. सध्याच्या वातावरणात जिथे कोरोनाने धुमाकूळ घातलाय त्यापासून तुटून एका वेगळ्याच गावी जाऊन बसले. बेळगावच्या परिसरातले डोंगर- टेकाडातले गाव. गावात नदी आहे, देऊळ आहे, विविध जातीचे थर आहेत कुलकर्णी- पाटलांची सत्ता आहे. पण त्या सत्तेत स्वार्थापेक्षा एकमेकांना जगवण्यासाठी लागणारा माणुसकीचा खळाळता झरा आहे. म्हणूनच गावावर अनेक संकटं येऊन गेली तरी माणसा- माणसांतला ओलावा आटलेला नाहीय...
कथेचा सुत्रधार त्याचं हे गाव सोडून निघाला आहे, त्याच्या मनात आठवणींनी गर्दी केलीय. नदीकाठाला वळसा देऊन तो पुढे जाताना, टेकडीवरचं लक्ष्मीचं देऊळ त्याच्या नजरेत भरतंय. समोरच्या पांधीतून पुढे जाऊन पुर्वेची टेकडी ओलांडली की तालुक्याला जाणा-या बसने तो बेळगावी जाणार आहे... त्याचं मन भरून आलं आहे. या उंचावरच्या पांधीतून पलीकडे गेला की गाव दृष्टीआड होईल याची त्याला जाणीव आहे. न राहवून मागे वळून पाहताना एकाच ठिकाणी खिळल्यागत तो उभा राहिला आहे. दूर माडांच्या चौकोनाकडे त्याची नजर लागलीय. त्या चौकोनी जागेतच त्याचा दिमाखदार वाडा उभा आहे. इनामदारांचा वाडा. आणि हे स्वतःचं गाव सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना त्याचं मन त्या वाड्यात, नव्हे. वाड्यातल्या एका व्यक्तीत अडकले आहे.... ती व्यक्ती त्याच्याशिवाय किती एकटीये, याची जाणीव त्याच्या भारलेल्या मनाला अधिकच अस्वस्थ करते आहे.....
या पार्श्वभुमीवर सुरू झालेली गोष्ट आपल्याला त्या काळातल्या इनामदारकी. सत्तालोलूप नसलेली पण आपल्या पाखराखाली असलेल्या गावाचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची जाणीव मनात सतत जागृत असलेले अप्पासाहेब या कथेचे नायक असल्यासारखे शोभतात. अप्पासाहेबांचा मुलगा त्यांच्या अगदीच विरोधी वृत्तीचा. बाहेरख्याली सुद्धा. तोच आपला अधिकृत वारस असल्याने अप्पासाहेबांची पदोपदी होणारी कोंडी. सोन्यासारखी सून, उमा. तिचे तुटलेले माहेर. लग्न होऊन दहा वर्षे उलटून गेली तिला मूल नसल्याने तिची होणारी तगमग आणि अप्पासाहेबांचा दुसरा मुलगा म्हणजेच कथेचा सुत्रधार, जयवंत तो अवघा आठ वर्षांचा. म्हणजे उमा घरात आली तेव्हा दोन वर्षांचा जयवंतच जणू तिचे मूल. त्याने फक्त उमेच्या पोटी जन्म घेतलेला नाही. पण उमेने आईची जागा भरून वर काकणभर जास्तच त्याच्यावर माया केलेली आहे. शेजारी राहणारे तात्यासाहेब गावातले मानलेले ब्राह्मणाचे घर आहे. तात्या- अप्पा बालपणीचे मित्र आहेत. तात्या आणि काकूने गावाला आपलंस केलंय ते फक्त त्यांच्या प्रेमाने नव्हे तर ते गावचे अनाधिकृत वैद्य आहेत. कुठल्याही व्याधीवर तात्या उपचार करू शकतात. ते वैद्य म्हणून धावत जातात तेव्हा त्यांना कुठलाही धर्म, जात त्याज्य नाही.
एक आदर्श गाव कदाचित रणजित देसाईंच्या मनात रेंगाळत असावा. त्यातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असावं. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारकीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पाहिला आहे, तिथे देसाईंच्या या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज पाहिला की जाणवतं असं काही खरोखरच असलं असतं तर आपला समाज फार पूर्वीच माणुसकीने ओतप्रोत, समृद्ध असा झाला असता. जगावर, भारतावर कुठलीही आपदा कोसळल्यावर लोकांनी सर्व थरांतून मदत करावी. एकमेकांना जगवावे हे आवाहन करण्याची वेळ आली नसती. कृती आपोआप घडत गेली असती. तो समाज- स्वभाव ठरला असता. अतिसुखाने नांदणा-या गावात जत्रा भरतात, सोहळे होतात. अप्पासाहेब सूनेवर प्रेम-माया- विश्वास आपल्या पोटच्या पोरापेक्षा अधिक करतात. आपल्या पोरांत असलेल्या दुर्गुणांमूळे या घरात आणलेल्या या मुलीला "पुरेसे" सुख मिळालेले नाहीये, याची जाणीव अप्पासाहेब ठेवून आहेत. आपल्या अवती- भोवती कुठे अशी व्यक्ती सापडते का, आपण शोधत राहतो.
गावावर अनेकवेळा अनेक संकटे येतात. अप्पासाहेब धिरोदात्त. परोपकारी. एकदा गावावर महामारी ओढवते. माणसे पटापटा गळून जातात. प्रेतांची विल्हेवाट लावायला तरूण धजावत नाहीत. अप्पसाहेब स्वतः तिरडी धरायला पुढे होतात तसा गाव जागा होतो. पुढे दुष्काळ येतो. अप्पासाहेब धनधान्याचे कोठार खुले करून देतात. गाव इनामदारांचे कोठार बघता बघता रिकामे करतात.
अप्पासाहेबांच्या मुलावरच त्याच्या आततायी स्वभावामुळे बाहेरख्यालीपणामुळे नको ते बालंट येतं. तेव्हा मात्र हवालदिल अप्पासाहेब, ज्याला मायेने गोंजारलं तेच गाव यावेळी अप्पासाहेबांच्या विरोधात उभं ठाकल्यावर हललेले अप्पासाहेब देसाई लेखणीतून उभे करतात. गावात पडलेली
दुफळी पुन्हा कसबाने जोडून घेतात. गाव पुन्हा अप्पासाहेबांना मानू लागतं. आपल्याला अप्पासाहेबांची काहीही घडलं तरी माझ्यावर कलंक नको ची भुमिका क्षणभर व्यथित करते. त्या पेक्षा जास्त तात्यासाहेबांतले राजकारण पाहून आपण दिग्मुढ होतो. या ठिकाणी देसाईंनी हे राजकारण ब्राह्मण तात्यांनाच का खेळायला लावले, आपण विचारात पडतो. तात्यांची झाकली मुठ, उघडी झाल्यावर, एकाएकी व्यक्तीरेखातला हा बदल पचायला जड जातो.
गावावरच्या एका दरोड्यात अप्पासाहेब स्वतः लढून मृत्यूमुखी पडतात तेव्हा मात्र आपण लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर वाचतो आहोत असा भास होतो. आपल्याला उमा मात्र कथेत धरून ठेवते. एका पातळीवर या अनेक गोष्टी घडत असताना, अप्पासाहेब -उमा, जयवंत- उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातली हळवी तार छेडून जातातच. वहिनी दीरातले हे संवाद. मर्यादाशील असले तरी, त्यांच्यातलं आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पहात असतं. देसाईंचे हेच कसब हाती घेतेलेले पुस्तक सोडू देत नाही.
जयवंताची एक- एक करून प्रेमाची माणसं गळून गेली आहेत आणि तो वरच्या शिक्षणाकरता हे गाव सोडून जातो आहे. पांधीच्या तोंडाशी त्याला त्याचा जीवनपट उलगडत जातोय. "माझा गाव" म्हणून अप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगतो आहे. हे गाव सोडून जाताना, वाड्यात नवरा असला, तिचा तो सहचर असला तरीही, अप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे त्याची उमावहिनी किती एकटी आहे, याची जाणीव होऊन पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यांतून पाणी अखंड खळतंय.... वाड्याकडे पाहून त्याचे हात जोडले गेले आहेत. "तुला माहिती आहे, तू हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा झाला आहे....
- Narendra Gaikwad
माझे सुहृद श्री. वडगावकर सर यांच्या मुळे मी रणजित देसाई यांचे माझा गाव वाचले...निगुतिंन वाचू, सवडीनुसार वाचू म्हणून बाजूला ठेवलं...पण झपाटल्या सारखे एकाच बैठकीत वाचुन काढले.....
- Pratik Yetavadekar
एक छान अशी कादंबरी
यात वर्णन केलेले गाव म्हणजेच रणजित देसाई उर्फ दादांचे कोवाड यातला वाडा यातील जयवंताच पात्र म्हणजेच दादांचं लहानपणीचे प्रतिबिंब
- Vivek Patil
त्याकाळातील ग्रामीण भागात राहणारा माणूस कसा होता, कसा जगत होता, त्याचे परस्पर संबंध गाबाबद्दलची आत्मीयता कशी होती, संकटकाळी तो कसा वागत होता याचं प्रत्ययकारी दर्शन `माझा गाव` मधून घडत.
हळूहळू जुन्या चांगल्या परंपरांचे समाजातून उच्चाटन होवू लागले आणि त्याजागी कोणत्याच उच्च मुल्यांची स्थापना न झाल्यामुळे समाजाच्या विविध घटकात बेबनाव वाढत गेला. स्वार्थीपणा आणि भाऊबंदकी यामुळे माणसातील माणुसकीचा लोप होवू लागला. म्हणूनच जुन्या परंपरांमधील चांगुलपणाचे, गुणगान करण्याची एक मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. यातूनच `माझा गाव` ची निर्मिती झाली आहे.
या कादंबरीतले प्रत्येक पात्र जिवंत आहे, स्वाभाविक वाटणारे आहे. खेड्यातील पाटील-कुलकर्णी एकत्र आल्यावर गावाच्या उद्धारासाठी, गोर-गरीबांसाठी बरेच काही घडू शकते आणि पूर्वीच्या काळी ते घडतही होते याचा परिचय करून देणारी एक हृद्य कादंबरी. जुन्या पिढीतील परोपकारी व बुद्धीमान असे तात्या कुलकर्णी आणि गावावर जीवापाड प्रेम करणारे आप्पासाहेब इनामदार यांच्या परस्पर संबंधातून कादंबरीचे कथानक फुलत जाते. आजच्या संकुचित, स्वत:पुरते पाहणार्या मानसिकतेमुळे होणार्या सामाजिक र्हासाच्या पार्श्वभूमीवर आजही ह्या कादंबरीचे महत्त्व अधिक आहे.