- Shweta Tadphale
रुचिरा हे पाककला शास्त्राचे पुस्तक माहीत नाही असा कोणी महाराष्ट्रात तरी नसेल. स्वयंपाकाचे अगदी प्राथमिक धडे इथूनच सुरू करायचे.पहिला गुरु आई ,जिच्या हाताखाली वरकामे करून बघून आपण शिकतो.आणि नंतर साक्षात अन्नपूर्णा,कमलाबाई ओगले.
प्रत्येक मराठी घरात रुचिरा हे पुस्तक असते. मला आठवतंय मी वाचायला काहीच नाही म्हणून आईनी नवीनच आणलेलं हे पुस्तक टाईमपास जाणून वाचायला घेतले होते.सहज आणि सोपे पदार्थ, पारंपरिक पदार्थ अगदीच सध्या भाषेतही वरण भात ते केक पर्यंत,मस्त गाईड .सध्या घरातील वाटीचे आणि चमचा हे प्रमाण. ह्या पद्धतीने पदार्थ खूप परफेक्ट व्हायचा. मी तर लग्नात मुलींना हेच भेट द्यायचे .
आज त्यांची आठवण येतेय कारण त्यांचे पुण्यस्मरण दिवस आज आहे.त्यावेळी असे धाडसी पुस्तक आणि त्याच्या अनेक वेळा झालेल्या आवृत्त्या हेच त्यांचे यश सांगतात. मी व माझ्यासारख्या अनेक जणींना सुगरण बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
- Rama Khatavkar
या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये.
छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की.
२८ च्या वर आवृत्या निघाल्यात.
कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे.
त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे.
विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच.
स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच.
अगदी स्वयंपाकघराची नव्याने ओळख झालेल्या पुरुषांनाही यांचा आधार वाटेल.
साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत.
भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी.
मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा नाही.
हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे.
बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच.
- Zee Marathi
आणि काय हवं ...
प्रिया बापट `रूचिरा` बघून पुरणपोळ्या करते ... २९/०४/२०२० 👇
- EKATA - APRIL 2019
स्वयंपाक घरातील नंदादीप : रुचिरा...
जातीच्या सुंदरींना काहीही शोभते. पण मूळच्या सौंदर्याबरोबरच चांगल्या वस्त्रप्रावरणांची आणि अलंकाराची जोड मिळाली तर सौंदर्यात अधिक भर पडते. हे जसं खरं आहे. त्याचप्रमाणे ‘स्वयंपाकघर’ महिलेचं हक्काचं स्थान तेही शास्त्रशुद्ध असलं पाहिजे. ‘सगळ्या पदार्थांनी, सोयींनी युक्त असावं.’ ही वाक्य वाचताना मनाशी म्हटलं की देवघराप्रमाणेच स्वयंपाकघराचं स्थान आहे. ही वरील वाक्य ‘रुचिरा’च्या लेखिका कमलाताई ओगले यांच्या प्रस्तावनेतील आहेत.
जीवनातील आवश्यक अशा घटकातील महत्त्व जाणून ‘रुचिरा’ हे पुस्तक कमलाताईंनी लिहिलं १९७० पासून २०१४ पर्यंत त्याच्या ४२ आवृत्त्या निघाल्या. लाखो प्रतींच्या खपानंतर आजही त्याला तेवढीच मागणी आहे. सतत प्रती संपतात आणि प्रकाशकांना फोन येतात.
पाककला ही नवीन नाही पण वाचनाची आवड असणाऱ्यांना कोरंकरकरीत रुचिरा दिसल्यास पूर्ण वाचून बाजूला ठेवण्याव्यतिरिक्त गत्यंतर नाही. असे वाटते. नुकतेच खूप वर्षांनी हे पुस्तक ग्रंथच म्हणा हवंतर. माझ्या नजरेसमोर आला आणि पूर्ण फडशा पाडून बाजूला ठेवला. चिंतन करावे असाच विषय वाटला. तसं हे पुस्तक आणि कमलाताई ओगले कोणालाच नवीन नाहीत, पण ट्रंकेतील पैठणी किंवा लग्नातील शालू दिसला तर पटकन बाजूला ठेवला जात नाही.
४०-५० वर्षांपूर्वी नव्या सुनांना परदेशी जाणाऱ्या मुला-मुलींना हे पुस्तक म्हणजे वरदान होते. फोडणी कशी करावी? इथपासून मसाल्याची ओळख, भाज्या, कोशिंबिरी-चटण्या, वडे, फराळाचे पदार्थ वाटी चमच्याच्या अंदाजाने तसेच विविध मापाने कसे घ्यायचे हे विस्तारितपणे त्यात लिहिले आहे.
सासूबाईंच्या शिकवणीमुळे मार्गदशनामुळे बाराव्या वर्षी लग्न करून आलेल्या कमलाताईंनी स्वयंपाकाच्या विषयात खूप प्रगती केली. हाताला चव असल्याने प्रत्येक पदार्थाची गोडी रुचकर असे. लाखो सुनांनी सासू म्हणून त्यांना गौरविले आहे. चौथी शिकलेल्या कुंडल (किर्लोस्करवाडी) येथून आलेल्या या महिलेने अतोनात प्रगती केली. नवीन सुनांना सुखी स्वयंपाकाचा कानमंत्र दिला आणि कुटुंब सुखी समाधानी झाले. आपले पाककलेतील ज्ञान पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्यास आपल्या अनुभवाची शिदोरी सर्वांनाच देता येईल हा विचार करून पुस्तकप्रपंच केला, असं त्यांनी लिहिलंय आणि त्यांच्या एवढ्या आवृत्त्या, लाखोंवर गेलेला खप हे काही त्यावेळी ध्यानी नव्हते. सांगली, बेळगांव, जळगांव, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी पतीच्या बदलीमुळे राहावे लागले. त्यामुळे विविध ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळत होते. मुंबईच्या वनिता समाजमध्ये दरवर्षी बक्षिसे मिळवत त्याच ठिकाणी कार्यकारिणीवर सुद्धा त्यांनी पद गाजविले. सासऱ्यांच्या आग्रहामुळं सांगलीच्या राणीबरोबर बॅडमिंटन ब्रिज खेळण्याची संधी मिळाली.
धडाडीचा स्वभाव असल्यामुळे सतत काहीतरी नवीन करावे असा ध्यास होता. महिलांना स्वयंपाकाचे धडे देत क्लासेस घेणे, परदेशात क्लासेस घेणे, व्याख्याने देणे, असे करीत त्यातून मिळालेला पैसा स्वा. सावरकरांच्या निधीला त्या देत असत. टीव्हीवर पहिली मुलाखत देताना कुटुंबात सगळ्यांना वाटत होते त्या काय बोलतील? पहिलीच मुलाखत यशस्वी झाली. ऑस्ट्रेलियातील त्यांचे चिरंजीव श्री. अरुण ओगले व सून रोहिणी ओगले यांच्याकडून त्यांची बरीच माहिती मिळाली. सिडनी येथे त्यांनी महिलांना पाककलेबाबत खूप छान व्याख्यान दिले, की महिला आजही त्यांनी सांगितल्याप्रमाणे पदार्थ तयार करतात. आईच्या हाताला प्रचंड चव होती. त्यामुळे काही केले तरी आम्हा सगळ्यांना ते खूप आवडायचे असे श्री. ओगले सांगतात. पुस्तक प्रपंच करताना सामाजिक भानही त्यांना होते. विविध संस्थांना त्या मदत करीत होत्या. घरातून पती, थोरले चिरंजीव विश्वनाथ आणि दोन्ही सुना त्यांच्या सासूबाई या सगळ्यांचे माझ्या यशात खूप मोठे स्थान आहे. असंही कमलाताईंनी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. भाषेचं शुद्धीकरण त्याची व्यवस्था कुटुंबातील प्रत्येकाने केली आहे. हे त्या आग्रहपूर्वक सांगतात.
किर्लोस्कर प्रकाशनातर्फे प्रथम बऱ्याच आवृत्त्या प्रकाशित झाल्यानंतर आता बरीच वर्षे पुण्यातील नामवंत अशा ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडे ही प्रकाशनाची धुरा आहे आणि आजही यशस्वीरीत्या त्याचे काम आनंदपूर्वक होत आहे.
मसाले - फोडणीपासून विविध प्रकारच्या विविध पद्धतीने भाज्या, उसळी, कोशिंबिरी, पोळ्या, वड्या, लाडू यांची प्राथमिक तयारीपासून यात माहिती दिली आहे. महाराष्ट्रीय बंगाली, पंजाबी, कर्नाटकी, कोकणी या सर्व प्रांतांच्या पदार्थांची माहिती दिली आहे. पान वाढताना कसे वाढावे? पदार्थांचे सुशोभिकरण कसे करावे? विडा कसा बांधवा? किती प्रकारची पाने करता येतात. खमंग सुपारी-मसाला सुपारी-मुखशुद्धी ही साधी दिसणारी पण महत्त्वाची गोष्ट याबाबत खुलासेवार माहिती आहे. कृतीची माहिती खुलासेवर दिली आहे.
संसार सुखी व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. खवय्या असलेल्या नवऱ्याला, मुलांना चांगला स्वयंपाक करून सुखी करण्यासाठी ‘रुचिरा’ हे मार्गदर्शक आहे. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांना माहिती मिळते पण ज्ञानेश्वरी, श्यामची आई, गड आला पण सिंह गेला, या ग्रंथाच्या लाखो प्रतींच्या खपांप्रमाणेच हे ‘रुचिरा’ त्याच रांगेत असावे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
– मनिषा लोणकर
- Mrs.Meghana shet
Big guidance to us. With accurate measurements of all ingredients.
- Rama Khatavkar
या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये.
छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की.
२८ च्या वर आवृत्या निघाल्यात.
कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे.
त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे.
विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच.
स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच.
साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत.
भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी.
मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा नाही.
हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे.
बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच.
- आमदार नीलमताई गो-हे
आमच्या काळी प्रत्येक मुलीला लग्नाचा आहेर म्हणून रुचिरा मिळायचं . अजूनही ते तेवढच लोकप्रिय आहे .
- महापौर मुक्ता टिळक
पुस्तकाची पानं खिळखिळी झाली तरी आजही मी रुचिरा वापरते .
- अभिनेत्री सुहास जोशी
रुचिरा हे पुस्तक माझ्यासाठी मोठा आधार आहे .
- DR SUSHAMA POUDWAL, LOKSATTA CHATURANG 14-1-2017
‘रुचिरा’सारख्या पुस्तकांनी विक्रीचे उच्चांक गाठत सर्वाधिक खपाचे विक्रम मोडले आहेत. या पुस्तकांच्या प्रस्तावनांपासून पदार्थांचे नाव, जिनसांची यादी, वजनं-मापं, कृतींच्या पद्धती, भांड्यांचे उल्लेख, वापरलेली भाषा यांमधून आहाराविषयाचे आचार-विचार समजतात. देशाचा, प्रांताचा सांस्कृतिक इतिहास उलगडत जातो. तत्कालीन समजाचे खानपान, राहणीमान यावरून देशकालपरिस्थितीवर प्रकाशझोत टाकला जातो. पाककृती देताना लेखक कळत-नकळत स्वत:ला व्यक्त करतात. ते ज्या काळात आणि वातावरणात राहतात, त्या काळाचे आणि समाजाचे प्रतिबिंब या लिखाणात वेगवेगळ्या तऱ्हांनी डोकावते. या साहित्याचा स्वत:चा असा वेगळा आकृतिबंध आहे. हा आकृतिबंध वेगवेगळ्या कोनांमधून समजून घेणं खूप गमतीचं आहे.
- MAHARASHTRA TIMES 30-09-2016
मीठ आणि लिंबाची साल या दोन पदार्थांशिवाय पानात काहीच उरता कामा नये. पूर्णब्रह्म असलेल्या अन्नाचं महत्त्व अगदी नकळत्या वयात आम्हा भावडांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. घरात आई, काकू, आजी मोठ्या बहिणी असल्यानं स्वयंपाकघरात जाऊन रांधणे वगैरेचा योग कधीच आला नाही. अगदी कॉलेजला जाईपर्यंत आईनं मग धोशा लावून लावून कुकर लावणं, पोळ्या, एखादं दोन भाज्या शिकवून मला पारंगत केलं. लग्नानंतर किचनमध्ये माझ्या हातून घडलेल्या गमतीजमती किंबहुना फजित्या आठवून आज हसायला येतं.
दोन नारळांच्या दूधात मी चार-सहा नव्हे, तर चक्क किलोभर कोकम टाकून सोलकढी बनवण्याचा प्रयत्न केला होता. आंबटढोण या शब्दाला समानार्थी असलेली सोलकढी आता उचल आणि फेकून दे असा आज्ञावजा सल्ला यजमानांनी दिला. कमलाबाई ओंगलेंचं ‘रुचिरा’ नावाचं पुस्तक माझा मोठा आधार बनलं. लोणकढं तूप बनवण्याच्या अट्टाहासाच्या वेळी पाणी राहिल्यामुळे दर मिनिटामिनिटाला लोण्याला येणारे फेसाचे उमाळे मी आजही विसरू शकत नाही. चुकत-चुकत मी घडत गेले पाकशास्त्र. आज काही उरलं, तर त्यातच एखाददुसरा जिन्नस बेमालूमपणे मिसळून नवा पदार्थ करण्याकडे माझा कल असतो. परदेशातून माझी मुलं आली की, अशा नव्या पदार्थांची ओळख परेडच सुरू असते. उमा आणि रोहन या माझ्या नातवंडांना मी कालवलेला गोड वरणभात तूप भरवताना मला अतीव समाधान मिळतं. आईच्या हातचे घावन मला नॉस्टेल्जिक करतात.
कोल्हपूरला आले की खासगावची मिसळ आणि सोळंकी आईस्क्रीम हा बेत न ठरवताही ठरतो. पुण्यातल्या संभाजी पार्कमधली भेळ माझी विशेष लाडकी आहे. सेवासदनचं वेलची केशरवालं पन्हं निव्वळ आठवणीनंही तजेला देतं. जगभर फिरले. सारे पदार्थ चाकले. त्यात थाई आणि मेक्सिकन पदार्थ मला विशेष भावले.