- Ujjwala Dharma
आताच संत चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी "जोहार मायबाप जोहार"ही वाचून संपवली। मंजुश्री गोखले यांनी ही सुंदर,मनोवेधक कादंबरी लिहिली आहे।मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती। अगदी मोजके अभंग माहिती होते।पण या कादंबरीने त्यांचा मनाला पीळ पाडणारा,डोळ्यात वेळोवेळी पाणी उभे करणारा जीवनपट उभा केला।लहानपणची अंधुक आठवण आहे-गावातील संडास स्वच्छ करायला माणसे यायची त्याची।आता आठवले तरी काटा येतो अंगावर आणिएक माणूस दुसरया माणसाला इतका हीन कसा लेखू शकतो याची शरम वाटते।लेखिकेने तो सगळा काळ इतका सुंदर चितारले आहे।चोखोबांचं रोजचं जीवन,पदोपदी आलेल्या अडचणी, समाजाकडून झालेले भयंकर हाल आणि या सगळ्यातून त्यांचा विठ्ठलावरचा अढळ विश्वास आणि ती निस्वार्थ ,निष्पाप,निर्मळ भक्ती। नमन,शतशहा नमन चोखोबा तुम्हाला।
- शुचिता फडके
हे पुस्तक विक्रीकरता उपलब्ध झाल्यावर केवळ आठ दिवसातच वाचायला मिळालं. लोकसखा ज्ञानेश्वर वाचलं असल्यामुळे संतांबद्दल पुस्तकं वाचावीशी वाटत होतीच. त्या उत्सुकतेपोटी जोहार मायबाप जोहारदेखील हाताळायला घेतलं आणि पहिल्या पानापासून जाणवली ती लेखिकेची आत्मियता, तळमळ. एकदा हातात घेतलेलं पुस्तक खाली ठेवलं, तेच मुळी अर्धा प्रहर रात्र उलटून गेल्यावर. सरळसोप्या भाषेत लिहिलेली चोखामेळ्याची ही गोष्ट काळजाला स्पर्शून गेली. सारखं वाटत राहिलं, की का अशी जीवघेणी उपेक्षा त्यांच्या वाट्याला यावी? का अशी जन्माने जात ठरावी? अनंत प्रश्न, रडून थकलेले डोळे आणि चोखामेळोबद्दलच्या तीव्र सहानुभूतीने गच्च भरलेले मन यापैकी कुणाचं पारडं जड होतं ते जाणण्यात उरली रात्र सरली. पहाटे मात्र जाणवलं एक समाधान. एक सुंदर कलाकृती वाचायला मिळाल्याचा आनंद. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या या भक्तश्रेष्ठाच्या जीवनाबद्दल अतिशय सुरेख माहिती मिळाली आणि प्रकर्षाने जाणवलं की समाजव्यवस्थेमुळे काही विशिष्ट जातीच्या लोकांना काय काय सोसावं लागलं. पुस्तकातील वेदनेचा भाग जितका भिडतो तितकाच विठोबा-रुक्मिणीमधील बंध भावतो.
मंजुश्रीतार्इंनी इतकी सुंदर कलाकृती निर्माण केली आहे. भक्तीचा इतका अप्रतिम अविष्कार प्रसवला आहे, की वाटतं, त्यांनी संत चरित्र हा एकमेव उद्देश समोर ठेवावा आणि बहुप्रसवा व्हावे.
- सौ. कांचन साठ्ये, पुणे
नुकतेच एक चांगले पुस्तक वाचनात आले, `जोहार माय बाप जोहार`. या कादंबरीत चोखामेळा यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला आहे. भारताच्या संतपरंपरेतील एक रत्न म्हणजे संत चोखामेळा. अस्पृश्य समाजात जन्म घेऊन विठ्ठल या देवतेची निस्सीम भक्ती करणारा हा संत. त्याकाळात पुरोहित वर्गाचे विशेषत: बडव्यांचे प्राबल्य असताना कुठलीही कटुता न येऊ देता मरेपर्यंत आपली विठ्ठलाशी असलेली तन्मयता त्याच्या जीवनपटात दिसते. विठ्ठलाचा हार चोरल्याचा आरोप हा चोख्याच्या आयुष्यातला सर्वात दु:खद प्रसंग. दलित असूनही त्याच्या अभंगातून डोकावणारा अभ्यास थक्क करून जातो. अविनाशी आत्मा हा विषय त्याच्या अभंगातून अतिशय सहजपणे हाताळलेला दिसतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत वर्णन केला आहे. त्याचे अभंग, सेवा, संत सहवास, संतांनी केलेली पाठराखण या सर्वच गोष्टींचा उल्लेख यात आला आहे. कादंबरीचा हृद्य शेवट वाचताना मन भरून आले. प्रकाशकांनी चांगले साहित्य मूल्य असलेली अशी पुस्तके वाचकांना द्यावीत ही अपेक्षा.
- PROF B. V. CHOUKHANDE
आपण लिहिलेलं ‘जोहार मायबाप जोहार’ पुस्तक वाचलं. वाचता वाचता वेचता येणारं लिखाण भासलं. वाचकाला पुढे खेचत नेणारी लेखणी आपली शैली सुखावणारी. त्याच वेळी डोळ्याला धारा लावणारी. चोखोबा मुळात एक उपेक्षित वर्णातील त्यामुळे त्यांचेवर लिहिणारे आजच्या परिस्थितीत कमी. बरं आपण हातात घेतलेला हा विषय आपला परिचय करून देणारा भावतो. आपली मांडणी, प्रत्येक प्रसंग शिवाय कोल्हापूरचे असून त्यांचे मूळगाव (मेहुणा) बुलढाणा जिल्ह्यातील शब्दाची मांडणी लिहिताना ‘डफ’ झाली त्यामुळेच भक्तीचा रंग चढला. कालातीत ग्रंथावर भाष्य करणारे लेखक पुढे येतात अन् अप्रतिम दस्तऐवज वाचकासमोर मांडतात यात त्यांचं अभिनंदनीय कर्म श्रेष्ठ ठरतं.
- GAJANAN DEO 10-4-2011
संतश्रेष्ठ चोखामेळ्याच्या सोबतीने इतरही संतांची तुम्ही भेट घडवून आणली. पंढरीतच मी वाववतोय. विठ्ठलाचं दर्शन सतत होतंय. वारकऱ्यांच्या दिंडीत मी नातचोय, सहभागी होतोय, असे जिवंत क्षण चित्रण या पुस्तकरूपाने मला अनुभवाला मिळाले. अध्यात्माची गोडी आणखीण वाढली. मी तुमच्या माधुर्यमय शब्दाने व अमृततुल्य वाक्याने मोहून गेलो, न्हाऊन गेलो. कादंबरीतील प्रसंग हृदयाला खोलवर भिडतात. मोरपंखासारखे अलगद स्पर्श करून जातात. शिस्तबद्ध शब्दरचना, उत्कृष्ट वाक्ये, अभंगाची ओळख मनाला खरंच मोहून टाकतात. संसारात मोहमायेत भटकणाऱ्या जीवाला अप्रतिम आनंद मिळवून देतात. हरणाच्या पाडसागत उड्या मारायची इच्छा होते. फुलपाखराप्रमाणे अलगद मधु घट प्यावासा वाटला. काही प्रसंग वाचून मन माझं द्रवतं तर काही प्रसंग मनावर अमृताचा वर्षाव करतात. लाडू, पेढा, बासुंदी नाही गं ताई! दर्जेदार काजूकतली खाल्ल्यागत वाटलं. रसमलई मिळाल्यागत झालं.
संतश्रेष्ठ नामदेव, ज्ञानेश्वरांची भावंडं, गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, जनाबाई, नरहरी सोनार या सर्वांचं चोखाच्या घरी बारसं जेवणं म्हणजे धर्ममार्तंडाच्या तोंडात सणसणीत चपराक आहे. धन्य तो चोखामेळा.
या सर्व संतांच्या उपस्थित साक्षात स्वर्गमय वातावरण, चोखा महाराच्या घरी, क्या बात है! माशाल्ला ऽ ऽ ऽ सुभान अल्ला!! त्या घटनेला मी साक्षीदार नव्हतो याची खंत वाटते मला. माणिक मोत्यासारख्या शब्दांनी तुम्ही या पुस्तकात अमृताची गोडी आणली आहे. हे पुस्तक हिमालयासारखे उंच व महान आहे.
- PROF. MADHUKAR KASTURE 15-2-2011
जेवढ्या हळुवारपणे ‘चोखोबा’ या नामवाचक शब्दाची उकल केली तेवढ्याच हळुवारपणे श्रीसंत चोखोबा यांची जीवनचरित्र विशद केलेल्या ‘जोहार मायबाप जोहार’ या साहित्यकृतीबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवत असताना, चोखोबांनी दिलेल्या परीक्षांचे वाचन करताना डोळ्यांतून नकळत अश्रू येतात, हे या कादंबरीचे यश आहे असे मला वाटते.
बहुतेक प्रकरणांच्या शेवटच्या परिच्छेदात श्री विठ्ठल व रुक्मिणी यांच्यातील भक्ताविषयीचा संवाद व भावी काळातील घटनांचा अंदाज हे या कादंबरीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. श्री संत चोखोबा यांच्यावरील ही कादंबरी निश्चितच वाचक, संशोधक व अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.
अजूनही समाजात असलेली जातीविषमता व जातीभेद दूर करण्यासाठी या कादंबरीचा निश्चितच उपयोग होईल, असे माझे मत आहे. शेवटी आपल्या या साहित्यकृतीस उदंड यश लाभो असे श्री संत चोखोबा यांचे गुरू संत श्रेष्ठ नामदेव महाराज व चोखोबा सारख्याच अनेक भक्ताविषयी वात्सल्याची भावना असणारे श्रीविठुराया यांच्या चरणी विनंती करतो.
- KISHOR PARIHAR
माझ्यासारख्या अरसिक वाचकांस आपण लिहिलेली ‘जोहार माय बाप जोहार’ ही कादंबरी वाचावयास मिळाली हे माझे भाग्यच. मी मूळचा वाचक नाही. फक्त रोज वर्तमानपत्र, लहान लहान गोष्टींचे पुस्तके वाचतो. पण यावेळेस माझ्या पत्नीने मला ‘जोहार माय बाप जोहार’ ही कादंबरी वाचावयास सांगितली. ती आणि माझी लहान मुलगी गाढे वाचक आहेत. मोठमोठे ग्रंथ, कादंबऱ्या, कथा हे त्यांचे खाद्य. माझे नाही. झाले असे माझ्या मोठ्या मुलीचा अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. मी तिच्याजवळ दवाखान्यात सकाळी ६ पासून रात्री १० पर्यंत बसून राहत होतो. त्याच वेळेस मला पत्नीने कादंबरी वाचावयास आणून दिली. झाले काय. कादंबरी कधी न वाचणारा त्यात इतका रमून गेलो की, मला माझेच भान राहिले नाही. तीन दिवसांत कादंबरी वाचून पूर्ण केली. वाचताना कितीदा तरी डोळे पाणावले. मीच त्या युगात गेल्यासारखे वाटले. मलाच चोखोबा, नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल, सोयरा, सावित्री या सर्वांचा भास व्हावयास लागला. माझ्याच मुखातून विठ्ठल विठ्ठल बाहेर पडावयास लागले. एक क्षण सुद्धा कादंबरी दूर सारावी असे वाटत नव्हते. सारखी उत्सुकता, उत्कंठता वाढत होती. आपल्यासमोर वरील सर्व व्यक्ती साक्षात आहे असे वाटत होते. मला आपल्यामुळे वरील सर्व व्यक्ती साक्षात आहे, असे वाटत होते. मला आपल्यामुळे त्याचा सर्वांचा साक्षात्कार झाला. मलाही कादंबरी वाचून पुण्या लाभल्याचा आनंद झाला. आपण कादंबरी लिहिताना शब्दाची, परिस्थितीची, क्षणांची, व्यक्तींची, स्थळांची जी सांगड घातली ती त्या युगात माझ्यासारख्या अरसिक वाचकास पोहोचवते. कादंबरीचे लिखाण आपल्या हातून घडले त्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद! देव तुमच्या हातून असेच लिखाण घडवत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!
आता मी ‘तुकयाची आवली’ ही कादंबरी नक्की वाचणार आहे.
- DAINIK TARUN BHARAT 17-4-2011
उदात्त व्यापक, समर्थ जीवननिष्ठा हीच वारकरी संप्रदायाची शक्ती होती व हीच संतसाहित्याची आदिप्रेरणा होती.
‘न लगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण ।।’ संसारात राहून ईश्वरभक्ती करता येते. स्वत:चे नियतकर्म करीत, भक्तिमार्ग स्वीकारून कोणत्याही कुल - जाती - वर्णाच्या व्यक्तींना आध्यात्मिक उनती साधता येते. वारकरी संप्रदायाची शिकवण मनी-मानसी साठवत, संत परंपरेत आपली नाममुद्रा अढळ करणारे महान विठ्ठलभक्त, संत चोखामेळा यांच्या आयुष्यावरील ‘जोहार मायबाप जोहार’ ही कादंबरी मंजुश्री गोखले यांनी परिश्रमपूर्वक लिहिली आहे. मुखपृष्ठावरील अत्यंत समर्पक चित्र व उत्तम छपाई यासह मेहता पब्लिशिंग हाऊसने ती देखण्या स्वरुपात प्रकाशित केली आहे.
कादंबरी, कथा, कविता अशा आकृतिबंधांना सहजतेनं हाताळणाऱ्या मंजुश्री गोखले यांनी ‘तुकयाची आवली’ ही कादंबरी लिहून, तुकारामांच्या दुसऱ्या पत्नीची कजाग, भांडखोर, ही जनमानसातील प्रतिमा बाजूला करुन एक पत्नी, गृहिणी, व्याकुळ माता या स्वरुपात तिला वाचकांसमोर आणली. संत चोखामेळा यांच्या जीवनातील अनेक नाट्यमय प्रसंगांमुळे व विलक्षण घटनांमुळे तसेच अस्पृश्य असूनही श्रेष्ठ संतपदापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रतिभासामर्थ्यामुळे संत चोखामेळा यावर कादंबरी लिहिण्याची इच्छा लेखिकेला झाली. चोखामेळा हे नामदेवांचे समकालीन. संतमंडळातील थोर संत नामदेव हे त्यांचे गुरू.
‘नाही देह शुद्ध याति अमंगळ। अवघे वोंगळ गुणदोष।
वाणी नाही शुद्ध धड न ये वचन। धि:कारिती जन सर्व मजा।।’ अशी जातिहीनतेची बोच काळजात सांभाळीत आणि सामाजिक उपेक्षेचे दु:ख सहन करीत आपल्या अभंगवाणीतून आध्यात्मिकता व दलितांवरील सामाजिक अन्यायाची वेदना व्यक्त करणारे मराठी साहित्यातील पहिले संतकवी चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी ‘जोहार मायबाप जोहार’! संत चोखामेळा यांची समाजाने केलेली उपेक्षा व त्यांचे विलक्षण जीवनध्येय यांना अधोरेखित करत ही कादंबरी आकारते.
संत चोखामेळा यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचे चित्रण लेखिकेने, चोखामेळा, सोयरा, संत नामदेव, संत जनाबाई इ. च्या अभंगातून येणाऱ्या संदर्भाच्या साहाय्याने केले आहे. प्रेम, विठठलभक्ती व समाजाकडून प्राप्त झालेली अवहेलना यांच्या ताणाबाणातून चोखामेळांचा जीवनपट लेखिका उलगडून दाखविते. वेळोवेळी मनाला दुबळी करणारी जातिहीनतेची जाणीव व विठठलभक्तीची तीव्र आसक्ती यांच्यामुळे निर्माण होणारे वास्तवातील ताण-तणाव चोखामेळा यांचे जीवनयापन कसे छिन्नभिन्न करून टाकतात याचा आलेख लेखिका या कादंबरीत चितारते. प्रेम, संस्कार, जीवनमूल्ये जपणारी विचारशैली असल्यामुळे कौटुंबिक जीवनात चोखामेळा जरी समाधानी असले तरी विठठलभक्तीची आस पुरी करताना निर्माण होणारे अडथळे व त्या अडथळ्यांना पार करताना करावे लागणारे दिव्य यात चोखोबांच्या आयुष्याची कशी होरपळ झाली हे लेखिकेने या कादंबरीत अधोरेखित केले आहे. चोखामेळा यांच्या संतपदाला भक्ती प्रामाण्यतेला, निखालस प्रांजळपणाला कुठेही धक्का न लावता संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवारातील व्यक्तींची व समकालीन संतांची व्यक्तिचित्रे कादबंरीत साकारली आहेत. साधा, सरळ, पापभीरु मनुष्य आणि आत्मभान असलेला एक देवभोळा समर्पित संत म्हणून कादंबरीत आकारलेले चोखामेळा यांचे व्यक्तिमत्त्व तसेच निर्व्यसनी, सत्शील, विठठलभक्त सुदामा व बोलक्या स्वभावाची सावित्री या चोखोबांच्या आईवडिलांची व्यक्तिमत्त्वे, नाकीडोळी निटस, शांत व बुद्धीमान असणाऱ्या त्यांच्या पत्नीचे सोयराचे व्यक्तिमत्त्व आणि गोरोबाकाका, संत नामदेव, जनाबाई इ. समकालिन संतांची व्यक्तिमत्त्वे या कादंबरीत सजीव होऊन वावरतात.
जीवनात येणाऱ्या-भेटणाऱ्या व्यक्ती, निर्माण होणारे प्रसंग व विचारशैलीतील विरोध यामुळे निर्माण होणारे संघर्ष हा तर नाट्याचा आत्मा! संत चोखामेळा यांचे अवघे जीवन संघर्षाच्या अग्निकणांनी भरलेले आणि दाहकतेने त्यांना होरपळून टाकणारे! स्थूल-सूक्ष्म संघर्षाचा अविष्कार या कादंबरीत असला तरी यातील संघर्षाचा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे झालेला दिसतो.
चोखामेळा यांच्या जीवनातील विलक्षण प्रसंग जितके रोचक तितकेच रसवत्ता निर्माण करणारे आहेत. क्रौर्य-क्रोध व कारुण्याचे भावरंग जसे परिणामकारक तसेच चमत्कारांचे अस्तर असणाऱ्या घटना मनाला भयचकित करत अद्भूत, करुण रसांची निर्मिती करतात.
एक स्त्री लेखिका या दृष्टिकोनातून टिपले जाणारे बारकावे कथाशयाला स्वाभाविक सौंदर्य बहाल करतात. ‘एक दिवस ढोराच्या चामड्याच्या वासानं तिला मळमळून आलं... ढवळून आलं... पोटात काही ठरेना..’ अशी संततीच्या आगमनाची लागलेली चाहूल लेखिका सहजतेनं दर्शविते. कथानकाच्या प्रवाहित्वात बाधा न आणता लेखिकेने केलेले शब्दांचे स्पष्टीकरण कथानकाला-व्यक्तिमत्त्वाला सखोलता प्रदान करते. उदा. चोखामेळा मलिन असूनही जो चोख आहे, तसेच चोखोबा महार असला तरी तो येसकर जमातीचा होता. येसकर म्हणजे वेसकर. गावकुसाबाहेर वेस बांधण्याचे, वेशीवरचे बुरुज बांधण्यात ही जमात कुशल होती. चोखोबांना देण्यात आलेले भुयाराचे बांधकाम तसेच चोखोबांनी स्वत: दीपमाळ बांधण्याचे हाती घेतलेले काम या प्रसंगाना त्यामुळे सुसंगतता व सहजस्वाभाविकता लाभते. संत चोखामेळा यांचे सुमारे पंचावन्न ते साठ अभंग व अन्य संतसज्जनांचे काही अभंग कथानकात गुंफल्यामुळे चोखामेळा व अन्य संतांच्या व्यक्तिमत्वातील भाव कंगोरे कादंबरीत ठळकपणे जाणवतात. तसेच त्यांच्या मनातील भावांदोलने, त्यातील तीव्रता, चढ-उतार प्रभावीपणे प्रत्ययाला येतात.
क्वचित कधी संवादातून भाषाशैलीतील एकसंधता, सुसंगता ढळलेली आढळते. तसेच चोखा व नामदेव यांच्यात केलेली तुलना विठ्ठलमुखातून होताना दर्शविली तरी दोघांची पृथगात्मता स्पष्ट करताना प्रगटणाऱ्या विचारांवर लेखिकेच्या विचारांचे तसेच विचारवंतांच्या विचारांचे प्रतिबिंब पडलेले जाणवते. तरीही संघर्षमय जीवनाने भरलेली व विठ्ठलभक्तीने भारलेली संत चोखामेळा यांच्या जीवनावरील ‘जोहार मायबाप जोहार’ ही कादंबरी रोचक व वाचनीय आहे.