Madhuri Kajave वारकरी संप्रदायाचा `कळस` म्हणजे तुकाराम महाराज तर सर्व परिचित आहेतच. पण त्यांची पत्नी `आवली` हिचा परिचय आपल्यासमोर येतो तो काहीशा नकारात्मक स्वरूपातच! साक्रेटीसची बायको झांटिपी आणि तुकारामाची बायको आवली यांची तुलना करण्याचा मोहही बऱ्याच लोकांना झाल्याचं आठवतंय. कजाग, तोंडाळ ,भांडखोर अशी काहीशी आक्रमक प्रतिमा अवलीच्या वाट्याला आलीय.
मंजूताईनी तिची ही उपेक्षा जाणून घेतली आणि तिला त्यात न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या ` आवली` या चरित्रात्मक कादंबरीतून केला आहे.
कर्तबगार पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री उभी असते, असं कौतुकानं म्हटलं जातं. संतपदाला जाण्याचं जे अफाट कर्तुत्व तुकाराम महाराजांनी केलं, त्या पाठीमागे आवलीचे संसार सावरणारे हात होते. तिची उपासमार होती. तिचे कष्ट होते. तुकाराम महाराजांच्या मऊ मेणाहुनी स्वभावा विरोधात ती कर्तव्यकठोर होती पण ही कठोरता निश्चीतच समर्थनीय आहे हे मंजूताईनी दाखवून दिलंय. मंजुताई, तुम्हाला पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा!
अतिशय वाचनीय आणि बांधून ठेवणारं पुस्तक आहे. ही कादंबरी एका कवियत्रीनं लिहिलींय हे मात्र क्षणोक्षणी जाणवतं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य! आपला ग्रूप हा पुस्तकप्रेमींचा आहे. लेखकाशिवाय आणि कवींशिवाय नवीन पुस्तके लिहिली जाणार नाहीत. जुन्या आणि प्रस्थापित लेखक,कवींचं आपल्याला कौतुक आहेच पण त्याचबरोबर आपण नव्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं. जशी वाचक चळवळ आहे, वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आपण प्रयत्न करतो तशीच लेखनसंस्कृती जोपासण्याचे प्रयत्नही व्हायलाच हवेत. आपल्यातल्या नवनिर्माणाचा अंकुर आपणच सांभाळला, मोठा केला पाहिजे. मंजुताईंचं हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवं, असा माझा आग्रह आहे.
SAPTAHIK SAKAL 25-10-2008संसारी, कर्तव्यदक्ष आवली...
संत तुकारामांच्या अध्यात्मिक निष्ठा आणि त्यांचे लौकिक पातळीवरचे जगणे यांचा आधुनिक दृष्टीकोनातून वेध घेण्याचा प्रयत्न दि.बा. मोकाशी यांच्या `आनंदओवरी`, तसेच रंगनाथ पठारे यांच्या `वैकुंठीची माती` या कथेमध्ये घेतलेला आहे. मोकाशींनी तुकोबाचा धाकटा भाऊ कान्होबा याला केंद्रस्थानी ठेऊन असामान्य तुकोबा आणि सर्वसामान्य तुकोबा या दोन पैलूंचा शोध घेतलेला आहे. पठारेंनी तुकोबाची पत्नी जिजाबाई उर्फ आवली आणि तुकोबा यांच्या सहजीवनावर प्रकाश टाकीत शारीरिक वासनांच्या संदर्भात या दोघांच्यातील माणूसपणाचा शोध घेतला आहे. मृणालिनी जोशींनी `आनंदाचे डोही आनंद तरंग` या चरित्रपर कादंबरीत जिजाबार्इंकडे नायकपद दिलेले आहे. जिजाबाईचे मोठेपण, तीचे स्वाभाविक माणूसपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. तुकोबांशी कडकडून भांडणारी, फटकळ, कजाग आवली अशी तिची ओळख तुकोबांच्या चरित्रपर कादंबऱ्यांमधून पुढे आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर मंजुश्री गोखले यांनी लिहिलेली `तुकयाची आवली` ही कादंबरी वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहे का, हे पहावे लागेल. या कादंबरीत लेखिकेने आवलीचे बालपण, गुळवे सावकाराच्या घरातील समृध्दी, तिचा सधन तुकोबांशी विवाह होणे, पुढे काही काळ व्यावहारिक सुखाचा गेल्यानंतर तुकोबांवर कोसळलेल्या अनेक आपत्तींची आवली साक्षी-सोबती होती. तिने साधक तुकोबांचे सिध्दावस्थेपर्यंत विकसित होणे अनुभवले, साहिले होते. विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेल्या तुकोबांना संसाराची, मुला-बाळांची आठवण करून देण्याचे काम जिजाबार्इंची तिखट वाणी करीत असे. तुकोबांचे निर्वाण, त्यापूर्वी तेरा दिवसांचा उपवास, यासाऱ्या प्रवासात आवली त्यांची `सहचरी` होती. याची सार्थ जाणीव मंजुश्री गोखले यांनी ठेवली आहे. त्यांनी एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून, एक गृहिणी म्हणून, एक आई म्हणून आवलीचे चित्रण केले आहे. परिस्थितीशी झुंज घेत, संसारासाठी खस्या काढत, आवलीची एक हाती लढाई चालूच होती. तुकारामाच्या थंडपणाचा, संसारविषयीच्या उदासीनतेचा तिला राग येत होता. त्या रागाचं रुपांतर संतापात होत होते. आणि त्या संतापाचा विस्फोट तिच्या तोंडावाटे होत होता. तिच्या जहाल शब्दांनी ती तुकारामांना डिवचत होती, विठ्ठलाला चिडवत होती. पण यादोघांपैकी कुणीच तिला दाद देत नव्हते. म्हणून आवली आणखीनचं संतापत होती. पण भौतिक संसाराची कास सोडलेले तुकाराम मात्र शांतपणे विठ्ठलाशी संवाद साधत होते.(पृ.८७) असे आवलीचे चित्रण लेखिकेने केलेले आहे; तर तुकोबांची व्यक्तिरेखा चितारताना, `तुकोबा प्रयत्नवादाची कास सोडून हतबल होऊन बसले होते. समस्यांना सामोरे जाऊन त्या सोडवण्यातला पुरुषार्थ विसरुन ईश्वराला शरण जाऊन असहाय्य झाले होते,` असे लेखिकेला वाटते. त्याला आपण बदलू शकत नाही, हे अपयश तिला बोचत होते. तिच्या अश्रूंवाटे हे अपयश व्यक्त होत असे. आपल्या झुंजार मनाला सहन होत नव्हते. आणि त्यावर इलाज सापडत नव्हता.
आवलीला कजाग म्हणण्यापेक्षा `आज` तीचा राग, मनातले विचार, संसाराचा गाडा चालवताना होणारा त्रास ती मोकळेपणाने, निर्भयपणे बोलून दाखवते. घरातले दारिद्र, उपेक्षा, नवरा असूनही एकटेपणाने दबून न जाता ती चारी बाजूंच्या हल्ल्यांना तोंड देत खांद्यावर, उरीपोटी घेऊन चालत राहते. आपल्याला हवे ते मिळवायचे, नको ते नाकारायचे किंवा नाकारता न आल्यास सोसायचे, आणि हे सारे संसारात राहून करायचे, ही जीवघेणी गोष्ट आवलीने मोठ्या ताकदीने निभावली. दैहिकतेकडे आवली स्वीकारशील दृष्टीने, स्वाभाविकतेसह पाहते. संसारातील निराशा, दु:खे मूकपणे सोसायची; सर्वसामान्य बाईने प्रतिकार करु नये, अशीच पारंपारिक शिकवण आवलीने नीडर होऊन नाकारली. कौटुबिक नाती, व्यक्तीचे शरीर-मन, संसारातील कर्तव्यबुध्दीने बांधण्यातून येणारे एकटेपण आवलीने पचविले; कसलीही भिडभाड न ठेवता शब्दांतून व्यक्त केले. आवलीच्या व्यक्तिमत्वातील पार्थिवता, साधेपणा, निकोपमनाने जगण्याला सामोरे जाणे, तिची भाषा स्त्रीमनाची स्वाभाविक भाषा... स्त्रीत्वाबद्दल तीला कमीपणा वाटत नाही. ती तुकोबांच्या परमार्थ साधण्याच्या आड येत नाही. संसार आणि तुकोबा हे तिचे अनुभवकेंद्र आहे. तिच्या प्रत्येक अनुभवावर तिची खास मुद्रा आहे. संसारात राहून स्वत:चे असणे आपण तोलायचे, ही अवघड कसरत आवलीने केली. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास ती आऊटस्पोकन आहे, असे म्हणावे लागेल. संसाराच्या साऱ्या जबाबदाऱ्या एकहाती पार पाडताना आवलीने स्वत:चे स्वतंत्र `अवकाश` शोधला. तुकोबांच्या विकास पावणाऱ्या जाणिवेच्या प्रवासात आवली हरवून गेली नाही किंवा तिला टोचणारे सल ती बोलत राहिली. तीचे हे धाडस भोवताली तुकाराममय अध्यात्मिक वातावरणात निश्चितच महत्त्वा आहे. तिच्या मनोगतामध्ये उत्कटता, भाषेतला आणि जगण्यातला रांगडेपणा आहे. यातून तिच्यातली आंतरिक शक्ती, निर्भयता व्यक्त होते. आवलीने कुटुंबात मिळवलेले स्थान तिच्या कर्तुत्ताने मिळवलेले आहे. तिने स्वतंत्रपणे केलेल्या जीवनसंघर्षातून स्वप्रतिमा घडविली. स्त्री नावाच्या माणसाची उंची वाढवली. तुकोबांनी आवलीचे शब्दांनी ओढलेले कोरडे लिहून ठेवलेत. तिला उपदेशही केला आहे. `स्वामींचे स्त्रीने स्वामींस कठीण उपदेश केला,` हे तुकोबांनी म्हटले आहे. तुकोबा-आवली यांच्या सहजीवनाकडे चूक-बरोबर या दृष्टीने पाहू नये, असे वाटते.
- रुपाली शिंदे