- DAINIK TARUN BHARAT 07-04-2002
स्त्री प्रबोधाची गीता...
वि. स. खांडेकरांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिलेली ‘नवी स्त्री’ ही कादंबरी सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहे. १९५० साली वसंत मासिकातून प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही जुनी न वाटता आजच्या नव्या स्त्रीच्या समस्यांचे भावविश्वाचे चित्रण उभे करते. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा, शिकून तिचा विवाह होणारच पण तिने सामाजिक मन घडवायला हवे, तिचं मन मुला-पुरुषांप्रमाणे स्वतंत्र हवे, पुरुषाने तिला मैत्रीण मानायला हवे असे विषय या कादंबरीतून पुढे आले आहेत. खांडेकर हे दुबळे ललित लेखक नव्हते तर क्रांतीदर्शी विचारांचे लेखक होते हे उमजून देणारी ही कादंबरी आहे.
- DAINIK SAKAL 06-09-2001
ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना जाऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली. खांडेकरांची असंकलित स्वरूपातील ‘नवी स्त्री’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे कोल्हापुरात नुकतीच प्रकाशित झाली. सुमारे तीन हजार छापील पृष्ठे होतील एवढे खांडेकरांचे साहित्य अद्याप असंकलित होते. ते सारे यंदाच्या त्यांच्या रजत स्मृती वर्षात प्रसिद्ध करण्याचा संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा, तसेच खांडेकर कुटुंबीयांचा आणि प्रकाशकांचा संकल्प आहे. खांडेकरांसारख्या द्रष्ट्या, प्रज्ञावंत साहित्यिकाने पन्नास वर्षांपूर्वी ‘नव्या स्त्री’ संबंधी काय म्हटले होते, ही आधुनिक शिक्षित स्त्री खऱ्या अर्थाने सबला व्हावी यासाठी त्यांनी कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांचे दर्शन या कादंबरीत घडते; आणि आजची स्थिती पाहता, त्याच अपेक्षा आजही कायम असल्याचेच चित्र दिसते. अर्धशतकाचा मोठा टप्पा ओलांडून पुढे आल्यावरही स्त्रियांच्या सामाजिक व्यावहारिक जडणघडणीत स्थूलमानाने फारसा फरक पडलेला नाही, हे म्हणूनच खूप चिंताजनक वाटते. खांडेकरांना केवळ आधुनिक व सुशिक्षित नवी स्त्री अभिप्रेत नव्हती, तर आधुनिकतेच्या जडणघडणीत तिचे माणूस म्हणून संस्कारीकरण कसे होईल. याचा त्यांना ध्यास होता. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी वळून किंवा हात उगारून स्त्रीला पेलता येणार नाही; तर सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची आणि अंगाखांद्यावर नवीन जबाबदाऱ्या पेलणारी असावी, असे खांडेकरांना वाटत होते. नव्या स्त्रीला कायद्यापासून इतर अनेक गोष्टींची चांगली जाण आणि माहिती असली पाहिजे, असा खांडेकरांचा आग्रह होता. तत्कालीन परिस्थितीत मांडलेले हे विचार लक्षात घेतले, तर खांडेकरांची ही कादंबरी म्हणजे स्त्री प्रबोध गीता ठरते.
कालचक्र वेगाने फिरते आहे. विविध क्षेत्रात स्त्रिया नवनवी क्षितिजे जिंकत आहेत. स्पर्धापरीक्षांपासून उद्योग-व्यवसाय, संशोधन अशा अनेकविध ठिकाणी त्यांचे उच्चस्थान दिसतेही आहे; परंतु तेवढ्यावरूनही खांडेकरांच्या मनातील ‘नव्या स्त्री’ची कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे. असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होतो; पण सबळ, ज्ञानी, व्यवहारी होतोच असे सांगता येत नाही. महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे असे आकडेवारीने सिद्ध करता आले तरी त्या व्यवहारी झाल्या, असे मानता येणार नाही. आपली एकूण सामाजिक रचना पाहता, स्त्रीला आपण पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे दिसत नाही. स्त्रीला कायदा ठाऊक झाला, त्यातून तिच्या हक्कांच्या कर्तव्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, तर ती श्रेष्ठ ठरेल, या भीतीपोटी तसे प्रयत्नही फार कोणी करीत नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली असली, तरी आजही किती तरी स्त्रिया निरक्षरतेच्या अंधकारात चाचपडत आहेत. स्त्रियांच्या विकासाचे हे प्रयत्न पाहिले, तर आजचे चित्र खूप उज्ज्वल व्हावयास हवे होते असे वाटते; पण तसे घडले नाही. स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य आजही काही शृंखलांनी जखडलेलेच आहे. माणूस म्हणून स्त्रीचा जगण्याचा अधिकार तिला पूर्णपणे लाभला आहे, असे म्हणता येणार नाही, अशी स्थिती आहे.
जळगाव-साताऱ्यातील घटना, कोठेवाडीसारखी प्रकरणे, कौटुंबिक छळातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या, अनेक ठिकाणी त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही उदाहरणेच स्त्रीचे समाजातल चित्र स्पष्ट करणारी आहेत. स्त्रीला सबल बनविणारे, तिला पायावर उभे करणारे, तिला हक्कांची जाणीव देणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा परिणामही कोठे कोठे जाणवतो आहे; परंतु तेवढ्यावर समाधान मानावे आणि आपण प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे समाधान करून घ्यावे, अशी स्थिती नाही. खांडेकरांना अभिप्रेत असलेली ‘नवी स्त्री’ अर्धशतकानंतरही आज दिसत नाही. हे चित्र झपाट्याने बदलण्यासाठी, स्त्री-पुरुष या उभयतांच्या मानसिकतेतही बदलाची गरज आहे. हा बदलही अत्यंत प्रामाणिक हवा. दिखाऊपणा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी. खांडेकरांची आजवर दडून राहिलेली ‘नवी स्त्री’ यंदाच्या ‘महिला सबलीकरण वर्षा’त अवतरणे, हा खरोखरच योगायोग आहे. आपण तो जाणून घेण्याची गरज आहे.
-मल्हार अरणकल्ले
- DAINIK SAKAL 16-09-2001
‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा. १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां-पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते.
- SAKAL 10-02-2002
खांडेकराची ‘नवी स्त्री’…
वि. स. खांडेकर यांच्या ‘नवी स्त्री’ या कादंबरीचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे. ही कादंबरी १९५० च्या दरम्यान ‘वसंत’ मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती. २००१ हे ‘महिला सबलीकरण’ वर्षाचे निमित्त साधून मेहता प्रकाशनाने ही कादंबरी नव्याने प्रकाशित केली आहे.
वि. स. खांडेकर हे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचे खूप लेखन असंकलित आहे. हे ध्यानात आल्यानंतर सुनीलकुमार लवटे यांनी हे ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे निश्चित केले. प्रस्तुत ‘नवी स्त्री’ ही कादंबरी या योजनेचा एक भाग आहे. खांडेकरांना अभिप्रेत असलेली नवी स्त्री केवळ आधुनिक व सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीचे संस्कारीकरण, आधुनिकतेच्या जडणघडणीत माणूस म्हणून कसे होईल, याचा त्यांना ध्ययास लागलो असायचा. ‘नवी स्त्री’ कादंबरी-लेखनात ही तळमळ पानोपानी स्पष्ट होते. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी आवळून नि हात उगारून स्त्रीस पेलता येणार नाही. सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची, अंगाखांद्यावर नवनवीन दायित्व पेलणारी, जबाबदार समाजधुरीण म्हणून खांडेकरांना अभिप्रेत होती.’ ही लवटे यांनी प्रकट केलेली भूमिका प्रस्तुत कादंबरीतून कितपत दिसते ते पाहू.
या कादंबरीची नायिका ललिता खेड्यातून पुण्यात जाऊन वसतिगृहात राहून बी. ए. होते. तेथे सुवर्णपदक मिळवते. समाजवादी विचाराचा मित्र दिवाकराशी मैत्री करते, त्याचयाविषयी जवळीक वाटत असूनही केवळ मैत्री करते. काकासाहेब या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाशी कमलाकरबरोबर पंधरा दिवस गाडीतून फिरते, त्याच्याशी लग्न करावे असा विचारही तिच्या मनात येतो. त्याच वेळी तिचा मित्र दिवाकर तिला भेटतो आणि कमलाकरशी लग्न झाल्यावर ‘कारखाना कामगारांच्या स्वाधीन करण्याची अट तू काकासाहेबांना घाल’ असे सांगतो आणि तसेच वचन ती दिवाकरला देते. येथे कादंबरी संपते.
खांडेकरांच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये जसे ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ पात्रे असतात, त्याचप्रमाणे याही कादंबरीत ललिता, ललिताचे वडील तात्या, दिवाकर आदी पात्रे आहेत. ललिता ध्येयवादी आहे. हे ललिताचे चित्रण नव्या आधुनिक विचाराच्या स्त्रीचे नाही असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण १९५० चा काळ ध्यानात घेतला तर तसे वाटणार नाही. यासंदर्भात डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत लिहितात ‘नवी स्त्री’ची नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर, समाजवादी समाजरचना यावी म्हणून काया, वाचा, मने धडपडतात. दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब नि कमलाकर भांडवलशाही रचनेची मुळं आणखी खोल रुतवू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ललिता नव्या स्त्रीचा प्रतिनिधी बनून व्यक्तिगत स्वार्थीपेक्षा समाजहित श्रेष्ठ मानून सर्वस्व त्यागास तयार होते.
प्रा. लवटे यांना भाऊसाहेब खांडेकरांविषयी नितांत आदर असल्याने ललिता ही आधुनिक नव्या स्त्रीची प्रतिनिधी वाटते. आज स्त्री अनेक क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ पाहत आहे. तिला ‘स्व’ची जाणीव झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत कादंबरीतील नायिका ललिता निश्चितच नवी वाटत नाही.
खांडेकरांच्या अन्य कादंबरीत जशी ‘टिपिकल’ पात्रे आढळतात, तशी पात्रे या कादंबरीतही आहेत. ललिताचे वडील तात्या, दिवाकर, स्वत: ललिता ही पात्रे ध्येयवादी आहेत, निष्ठावान आहेत. मगनभाई, काकासाहेब, कमलाकर ही पात्रे भांडवलदारी वृत्तीची आहेत. अन्य कादंबरीतील पात्रांप्रमाणे याही कादंबरीत रोमँटिक वृत्तीची पात्रे आहेत; पण असे असूनही ही कादंबरी वाचायला हवी. कारण ही कादंबरी वि. स. खांडेकरांची आहे. भाऊसाहेब खांडेकर जसे कादंबरीकार होते, तसे ते कथाकार, लघुनिबंधकार, रूपककथाकर आणि उत्तम समीक्षक होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना खूप लेखन असंकलित असूनही खांडेकरांनी ते प्रकाशित का होऊ दिले नसावे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणतेही असले तरी भाऊसाहेब खांडेकर मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. त्यांचे सर्व लेखन जपून ठेवायला हवे. आणि ते काम प्रा. लवटे करीत आहे. त्या कामाचा प्रारंभ त्यांनी ‘नवी स्त्री’ या कादंबरीच्या संपादनापासून केला आहे. पुढील कामाची मोठी तयारीही त्यांनी केली आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा.
उल्का, सुलभा, देवयांनी, र्शिमष्ठा, नंदा, वसू या नायिका ज्यांनी वाचल्या असतील, त्यांनी ललिता समजून घेण्यासाठी ‘नवी स्त्री’ ही कादंबरी वाचायला हवी.
- SAKAL 06-09-2001
‘नव्या स्त्री’ची नवी कल्पना…
ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना जाऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली. खांडेकरांची असंकलित स्वरूपातील ‘नवी स्त्री’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे कोल्हापुरमध्ये नुकतीच प्रकाशित झाली. सुमारे तीन हजार छापील पृष्ठे होतील एवढे खांडेकरांचे साहित्य अद्याप असंकलित होते. ते सारे यंदाच्या त्यांच्या रजत स्मृती वर्षात प्रसिद्ध करण्याचा संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा, तसेच खांडेकर कुटुंबीयांचा आणि प्रकाशकांचा संकल्प आहे. खांडेकरांसारख्या द्रष्ट्या, प्रज्ञावंत साहित्यिकाने पन्नास वर्षांपूर्वी ‘नव्या स्त्री’ संबंधी काय म्हटले होते, ही आधुनिक शिक्षित स्त्री खऱ्या अर्थाने सबला व्हावी यासाठी त्यांनी कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांचे दर्शन या कादंबरीत घडते आणि आजची स्थिती पाहता, त्याच अपेक्षा आजही कायम असल्याचेच चित्र दिसते. अर्धशतकाचा मोठा टप्पा ओलांडून पुढे आल्यावरही स्त्रियांच्या सामाजिक व्यावहारिक जडणघडणीत स्थूलमानाने फारसा फरक पडलेला नाही. हे म्हणूनच खूप चिंताजनक वाटते. खांडेकरांना केवळ आधुनिक व सुशिक्षित नवी स्त्री अभिप्रेत नव्हती, तर आधुनिकतेच्या जडणघडणीत तिचे माणूस म्हणून संस्कारीकरण कसे होईल, याचा त्यांना ध्यास होता. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी वळून किंवा हात उगारून स्त्रीला पेलता येणार नाही; तर सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची आणि अंगाखांद्यावर नवीन जबाबदाऱ्या पेलणारी असावी, असे खांडेकरांचा आग्रह होता. तत्कालीन परिस्थितीत मांडलेले हे विचार लक्षात घेतले, तर खांडेकरांची ही कादंबरी म्हणजे ‘स्त्री प्रबोध गीता’ ठरते.
कालचक्र वेगाने फिरते आहे. विविध क्षेत्रांत स्त्रिया नव-नवी क्षितिजे जिंकत आहेत. स्पर्धा परीक्षांपासून उद्यागे-व्यवसाय, संशोधन अशा अनेकविध ठिकाणी त्यांचे उच्चस्थान दिसतेही आहे; परंतु तेवढ्यावरूनही खांडेकरांच्या मनातील ‘नव्या स्त्री’ची कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे, असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होतो; पण सबळ, ज्ञानी, व्यवहारी होतोच असे सांगता येत नाही. महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे असे आकडेवारीने सिद्ध करता आले, तरी त्या व्यवहारी झाल्या, असे मानता येणार नाही. आपली एकूण सामाजिक रचना पाहता, स्त्रीला आपण पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे दिसत नाही. स्त्रीला कायदा ठाऊक झाला, त्यातून तिच्या हक्कांच्या-कर्तव्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, तर ती श्रेष्ठ ठरेल, या भीतीपोटी तसे प्रयत्नही फार कोणी करीत नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली असली, तरी आजही किती तरी स्त्रिया निरक्षरतेच्या अंधकारात चाचपडत आहेत. स्त्रियांच्या विकासाचे हे प्रयत्न पाहिले, तर आजचे चित्र खूप उज्ज्वल व्हावयास हवे होते असे वाटते; पण तसे घडले नाही. स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य आजही काही शृंखलांनी जखडलेलेच आहे. माणूस म्हणून स्त्रीचा जगण्याचा अधिकार तिला पूर्णपणे लाभला आहे, असे म्हणता येणार नाही, अशी स्थिती आहे.
जळगाव-साताऱ्यातील घटना, कोठेवाडीसारखी प्रकरणे, कौटुंबिक छळातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या, अनेक ठिकाणी त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही उदाहरणेच स्त्रीचे समाजातील चित्र स्पष्ट करणारी आहेत. स्त्रीला सबला बनविणारे, तिला पायावर उभे करणारे, तिला हक्काची जाणीव देणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा परिणामही कोठे कोठे जाणवतो आहे; परंतु तेवढ्यावर समाधान मानावे आणि आपण प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे समाधान करून घ्यावे, अशी स्थिती नाही. खांडेकरांना अभिप्रेत असलेली ‘नवी स्त्री’ अर्धशतकानंतरही आज दिसत नाही. हे चित्र झपाट्याने बदलण्यासाठी स्त्री-पुरुष या उभयतांच्या मानसिकतेतही बदलाची गरज आहे. हा बदलही अत्यंत प्रामाणिक हवा. दिखाऊपणा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी. खांडेकरांची आजवर दडून राहिलेली ‘नवी स्त्री’ यंदाच्या ‘महिला सबलीकरण वर्षा’त अवतरणे, हा खरोखरचे योगायोग आहे. आपण तो जाणून घेण्याची गरज आहे.