- विजय तानाजी पाटील (तासगाव )
"ग्रामीण भागातून पोटासाठी शहराकडे वळणाऱ्या लोकांच्या वर्तनात होणारा स्वार्थी बदल आणि गावकुसातील विविध जातीधर्मातील लोकांनी एकमेकांबद्दल जपलेली आत्मीयता, बेरकी राजकारण,कुरघोडी व्यक्त करणारा कथासंग्रह "
`पाझर`या कथेत टीव्ही बघून काही तरुणांमध्ये जैतूनबी, बाबुलबद्दल निर्माण झालेला द्वेष,परंतु त्याला जुन्या पिढीच्या पाटील व जाणत्या मंडळींनी अजिबात थारा न दिल्याने गावात एकी राहिल्याचे दिसून आलं आहे.
`तुटल्या प्रदेशाचा प्रवास`
या कथेत मुलांना पोटाला चिमटा देऊन शिकवल्यानंतर, अप्पलपोटा विचार करून रक्ताच्या नात्यांना ती कसे विसरून जातात हे लेखकाने मार्मिकपणे दर्शवले आहे. पण यात त्या घरच्या म्हातारीची कुटुंब एकत्र राहावं ही तळमळ मात्र मनाला चटका लावून जाते.
`बहुलकरांच्या मुलाची गोष्ट` या कथेत मास्तर आपल्या दिपूला, त्यांना परिस्थितीमुळे जे शिकता आले नाही ते दिपूने शिकावं यासाठी केलेली जोर-जबरदस्ती त्यांच्याच अंगलट येते अन दिपू घर सोडून निघून जातो. गुरुजींनी आपल्या गरीब भावंडांना अंतर दिलेलं असूनही अशा कठीण प्रसंगी भावाच्या मदतीला ती धावून येतात.शिकल्याने माणूस स्वार्थीच विचार करू लागतो त्यापेक्षा मायेचा पाझर असलेली अडाणी लोक बरी .कथेने आपल्या मुलावर अपेक्षांचे ओझं लादणाऱ्या पालकांच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे.
` ठराव ` या ग्रामीण कथेत दूधसंघाच्या निवडणुकीतील गाव पातळीवरचे बेरकी आबा, तात्यांचे राजकारण, एकमेकांची जिरवाजिरवी समोर आणली आहे.गरज पडल्यावर एकमेकांच्या जीवावर उठणारं राजकारण मनात घृणा निर्माण करते.
` वळसंगे काका`या कथेत नायकाने आपल्या घराची परिस्थिती सुधारण्यासाठी, आपल्या स्वतःचा बळी देऊन घरच्यासाठी केलेली धडपड दर्शवली आहे. या त्यागाची भावंडांना जाण नसल्याने शेवटी काकालाही स्वतःचा विचार करण्यास परिस्थिती भाग पाडते.
`लेखकराव` या कथेत लेखनकलेस धनिकांच्या दावणीस बांधण्याचा प्रकार नायकाने समोर आणला आहे. पिढी जात गर्भ श्रीमंत दादासाहेब आपल्या खानदानाचे अपेक्षित चरित्र लेखकास हवा तो मोबदला देऊन, लिहिण्यास सांगत आहेत.
` छळणारी गोष्ट ` ही एक गुढकथा तात्या ह्या गावकुसातील पुढाऱ्याची. पण कथेने एवढी वळणे घेतली आहेत की, शेवटपर्यंत तात्या नावाचं गुढ वाचकाला उकलतच नाही.
`आपण माणसात जमा नाही` या कथेत नायक व त्याच्या आई-वडिलांस, त्यांचे आजोबा नेसत्या कपड्यांनीशी घरातून बाहेर काढतात. त्यानंतर त्यांचा सुरू होतो जगण्याचा संघर्ष.या काळात त्याच्या आईचे वडीलांकडे नायकास शिकवायला ठेवून घेतात.पण मामी व इतर नातलगांचा त्याला विरोध. आजोबांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होतं. तो सरकारी नोकरी पदरात पाडून घेतो.उपकाराची परतफेड म्हणून आपल्या भाच्यास पुढे शिकवायचे असते.पण त्यावेळेस पत्नीने केलेला आकांडतांडव बघून नायकाला स्वतःचीच लाज वाटते अन तो ठरवतो `आता गावाची शीव नाही बघायची, कारण आपण माणसात जमा नाही` हा प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्यालाही नायक आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहे असं नक्कीच वाटतं.
`तळ` या कथेत कल्लवा ही कथेची नायिका असून, ती एकहाती हातभट्टीचा व्यवसाय कुठल्याच पुरुषाला दाद न देता सांभाळते. तिला बाहेरख्यालीपणा खपत नसल्याने, आपल्या नवऱ्याशी फारकत घेऊनही त्याच्याशी प्रामाणिक राहणारी स्त्री कल्लवा. तिच्यावर हात टाकल्याचे कळल्यावर सत्यवाचे तिच्या पाठीशी उभ रहाणं मनात घर करून जाते.
एकंदरीत या कथा मानवी स्वभावाचे विविध पैलू, अन त्याचे परिस्थिती अनुरूप बदलणारे वर्तन आपल्यासमोर उघडून दाखवतात.कोल्हापूर परिसरातील वर्णन वाचून आपल्या आसपास कथा घडत असल्याचा भास होतो.
- B Poorva
#पुस्तक_ओळख
#आपण_माणसात_जमा_नाही
#रिवणावायली_मुंगी
#राजन_गवस
कधी कधी काही काही पुस्तकं फार उशिराच हातात पडली असं वाटतं, त्यातलीच ही दोन.
आजवर जरी पुस्तकं वाचली तरी पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आहोत ही जाणीव मनाच्या तळाशी जिवंत असायची पण राजन गवस यांचे कथासंग्रह त्या अर्थाने मला वेगळेच भासले. त्याच्या कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनःपटलावर जिवंत होतात,स्मृतीत रेंगाळत राहतात.
हे कथासंग्रह प्रत्येक मनाचे आहेत.स्त्री आत्ताची असो वा ऐंशी नव्वदीच्या काळातली असो ,तिची जीवनमूल्ये,तिची घुसमट ,तिची बदलत जाणारी दृष्टी हे जितकं राजन गवस यांनी अस्सल पणे मांडलं आहे तितकंच प्रभावीपणे बदलत्या गावगाड्यातल्या माणसाचे औद्योगिकरण बदलत जाणारे राहणीमान,पालटत जाणारे दोन पिढ्यातील अंतर त्यातून होणारी मानवी मनाची उलाघाल याचे अतिशय प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून केले आहे.एकसंघतेतून विस्कळीत होत व्यवहारी आणि भोगवादी बनत गेलेली पिढी आणि त्यातून जुन्या संस्कारातील मानवी मनावर येणारा ताण अशा मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर या कथा प्रकाश टाकतात.
राजन गवस यांच्या कथा जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्याच विविधांगी आहेत.वाचकाला चौकटीबाहेर विचार करायला लावून जीवनार्थाने समृद्ध करतात.
-©पूर्वा बडवे
- गोविंद पाटील
साहित्य अकादमी विजेते मराठीतील आघाडीचे लेखक राजन गवस यांनी लिहलेल्या आणि प्रतिष्ठित दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ग्रामीण कथांचा " आपण माणसात जमा नाही..."हा संग्रह नुकताच वाचून काढला..संग्रहात एकूण तेरा कथा आहेत.
खेड्यापाड्यात शिक्षण आलं...कमालीच्या गरीबीवर मात करून मुलं शिकायला लागली.त्यांच्या शिक्षणासाठी नात्यागोत्यातल्या माणसानी खूप हाल सोसले.प्रसंगी पडेल तो त्याग केला.हा त्याग करणार्यांमध्ये आई बाबा बहिण भाऊ आजी आजोबा चुलता काकू मावशी काका मामा मामी आत्या अशा गावगाडा संस्कृतीच्या आपल्या लोकांनी शिकवण्यासाठी आपलं योददान दिलं.. नव्याने शिक्षित झालेल्या या पिढिकडून मागच्यांच्या काही अपेक्षा होत्या पण नोकरीमुळे शहराचं वारं लागलेल्या या पांढरपेशानी त्यांच्या अपेक्षांना छेद दिला या मध्यवर्ती सुत्राला धरून या कथा लिहिल्या गेल्या आहेत..राजन गवस यांच्या कथांमधून बदलत निघालेला नवा गाव..गावातलं सडकं राजकारण..जातकारण...नातेसंबंधातले ताणतनाव..बदलणारे समूहमानस यांचे मर्मग्राही चित्रण आले आहे..मराठी कथा साहित्यात स्वताचे वेगळेपण सिद्ध करणारा हा संग्रह आपण नक्की वाचायला हवा...
- JYOTI GRANTHVARTA MAGAZINE 15-8-2009
राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा. त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते.
- DAINIK DESHDOOT 1-8-2009
मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित सुप्रसिद्ध लेखक राजन गवस लिखित ‘आपण माणसात जमा नाही’ हा निवडक कथांचा संग्रह निखळ, समृद्ध जीवनाभूतीचा वाचकांना प्रत्यय देणारा ठरला नसून लेखकाची जीवनाकडे पाहण्याची सकस अन् समृद्ध दृष्टीची अनुभूती देणारा ठरला आहे.
संस्कृती प्रतिष्ठान, वि. स. खांडेकर, ग. ल. ठोकळ आणि ह. ना. आपटे अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित लेखक राजन गवस यांचा हा कथासंग्रह विविध वैशिष्ट्यांनी नटलेला असून कथात्मक वाङ्मयाच्या प्रदीर्घ परंपरेची अनुभूती देणाराही ठरला आहे.
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या एकूण १३ कथांचा हा संग्रह ग्रामीण जीवनाची अनुभतूी तर देतोच याशिवाय कथांमधील पात्रांच्या स्वभावाच्या बारकाव्यासह प्रचिती देण्यातही यशस्वी ठरला आहे. ‘बहुलकरांच्या मुलाची गोष्ट’ या कथेत बहुलकरांचे कडक, करारी, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व असूनही हृदयाच्या कोपऱ्यात मुलाविषयी ममता दडलेली तसेच ठराव, वळसंग्या काका, तुटल्या प्रदेशाचा प्रवास सारख्या या कथा संग्रहातल्या सर्वच कथा अस्सल ग्रामीण भाषेचा साज घेऊन प्रस्तुत झाल्या आहेत. प्रत्येक कथेचा गाभा वेगवेगळ्या सूत्राने गुंफलेला असला तरी प्रत्येक कथा आगळावेगळा आशय घेऊन या कथासंग्रहात पेश झालेल्या आहेत. सन्नाटा आणि लेखकराव या कथा आणि तिप्या, मी आणि सैराय श्वापद ही कथा शीर्षकाच्या वेगळ्याच वलयाने लेखकाने सादर केल्या आहेत. प्रत्येक कथेत प्रत्येक गावांचे संवेदनशीलतेसह वर्णन झाले आहे. तसेच तीन दशकातील महाराष्ट्रातल्या गावगाड्याचे बदलते रूप प्रस्तुत झालेले आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक काळातल्या शहरी जीवनाचे संक्रमण ग्रामीण लोकमानसावर हळूहळू कसे आक्रमण करीत आहे. यामुळे ग्रामीण जीवनातले साधेसुधे रूप कसे बदलत चालले आहे. म्हणूनच या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आगळावेगळा जीवनार्थ सांगणारी ठरली आहे.
- DAINIK AIKYA 3-5-2009
राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेथील एक महत्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनसृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता आवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती राहिलेला आहे. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.
- DAINIK TARUN BHARAT 6-9-2009
माणुसकीचे पाझर दर्शविणाऱ्या कथा
रिवणावयली मुंगी, चौंडक, भंडारभोग इ. लोकप्रिय साहित्यकृती निर्माण करणाऱ्या राजन गवस यांचा ‘आपण माणसात जमा नाही’ हा कथासंग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. पूर्वप्रसिद्ध तेरा कथांचा हा संग्रह इ. स. १९९१ ते २००५ या कालखंडातील परिस्थितीचा वेध घेत कौटुंबिक, सामाजिक समस्यांकन करतो. भोवतालच्या परिस्थीतीचे निरीक्षण करून मानवी स्वभावातील कंगोरे तसेच जीवन सत्ये प्रभावीपणे कथाशयातून साकारणे ही राजन गवस यांच्या प्रतिभेची खासियत आहे. त्यामुळेच कथापरंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण कथा म्हणून त्यांची कथा महत्त्वाचे स्थान प्राप्त करते.
‘आपण माणसात जमा नाही’ कथासंग्रहातील माणसे ग्रामीण जीवनात घडली आहेत. त्यांच्या वृत्ती, संस्कार, जाणिवा गावाच्या मातीतून अंकुरल्या आहेत. शहरी विचारशैलीचे प्रभाव गावावर, गावातील माणसांवर अंमल गाजवू लागतात तेव्हा व्यक्तिजीवन, सामाजिक चौकट, संस्कृती यांना तडे देत शांत समंजस जीवनात अशी काही समस्यांची निर्मिती करतात की ज्यामुळे मानवी जीवनमूल्ये, मनाच्या श्रद्धा, विश्वास दुभंगून जावेत. परिवर्तन अटळ असले तरी ते जर संकुचित स्वार्थी वृत्तींना पोसणारे असेल तर मनाला, जीवनाला अस्थिर, अस्वस्थ करून टाकणारे ठरते. राजन गवस यांच्या कथातून ग्रामीण जीवनात, संस्कृतीत होणारे परिवर्तन व त्यामुळे मानवी जीवनात निर्माण होणारे ताण-तणाव यांचा ताणाबाणा दृगोचर होतो. पाझर, तुटल्या प्रदेशाचा प्रवास, वळसंग्या काका इ. कथा या दृष्टीने लक्षणीय ठरतात. समस्यांचे स्वरूप कौटुंबिक असो, सामाजिक असो अथवा राजकारणाच्या अंगाने जाणारे असो, या समस्यात भरडून निघणाऱ्या व्यक्तींच्या मनाची आंदोलने अत्यंत बारकाव्याने लेखकाने दृष्य व प्रत्ययकारी केली आहेत. भिन्न भिन्न व्यक्तिमत्त्वांतील परस्परांना छेदणारे विरोधी भावदर्शन आणि प्रसंगदर्शन यामुळे समस्यांची तीव्रता सखोल होते. बेरडांच्या जीवनशैलीचे, त्यांच्या निष्ठांचे रेखाटन करणारी ‘तळ’ कथा असो, शिक्षणाने जाणिवा प्रगल्भ होण्याऐवजी अहंकार व आत्मकेंद्रिततेमुळे घडलेली बहुलकरांच्या मुलांची गोष्ट असो किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाराच कसा बाहेर फेकला जातो हे दर्शविणारी ठराव सारखी कथा असो या कथा व्यक्तिव्यक्तींच्या स्वभावाचे, त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचे तसेच गावाच्या लोकमानसाचे व संस्कृतीचे भान देणाऱ्या आहेत. ‘आपण माणसात जमा नाही’ मधील कथातून व्यक्त होणारी स्त्रियांची व्यक्तिमत्त्वे अत्यंत लक्षणीय असून कथाशयाचे बलस्थान ठरावीत अशी आहेत. स्त्री व्यक्तिमत्त्वाचे नानाविध पैलू कथातून प्रकट होत असले तरी त्यांना बळकट करणारा पैलू म्हणजे निष्ठा! पत्नीचे प्रेम, तिची निष्ठा, तिचा समजूतदारपणा गृहित धरून पतीकडून जेव्हा बेबंद वर्तन घडते तेव्हा या स्त्रिया गरीब असोत, अशिक्षित असोत आपले क्रांतिकारी रूप प्रकट करतात. कधी सौम्य, कधी गहिऱ्या तर कधी प्रखरतेनं त्या आपल्या निष्ठा, श्रद्धा, मूल्ये प्रकट करतात. तळ, सन्नाटामधील कल्लवा, भटीण असो जैतुनबी असो किंवा जडीबुटीवाली कमळा सुतारीण असो.
ग्रामपंचायचत निवडणुका, गावाचे होत असलेले शहरीकरण यांचे रेखांकन जसे या कथातून होते तसेच वयस्क व्यक्तींच्या गावाशी जोडलेल्या निष्ठा व शिकलेल्या नवतरुणांच्या मनावरील शहरांचा व तेथील चैनीच्या जीवनाचा प्रभाव यांचेही चित्र रेखाटले जाते. कौटुंबिक वातावरणात नव्या-जुन्याचा मेळ घालण्याची धडपड करीत शिक्षण, नोकरी, पैसा अडका प्राप्त करण्याची प्रवृत्ती जशी प्रकटते तशीच मुला-सुनांना आपली अडचण होत असावी या जाणिवेची धगही ज्वलंत असलेली दिसते. व्यवहारी, आत्मकेंद्री, उपयोगितावादी शहर प्रभाव झेलत ग्रामीण मानसिकतेत होत जाणारे परिवर्तन, संक्रमण या कथात अधोरेखित होते.
जिवंत व्यक्तिरेखाटन, ताण-तणावासह होणारे समस्यांकन, सखोल जीवनाशयाचे प्रकटन, प्रत्ययकारी भावनिक आंदोलने व भावावर्त, प्रसंग साक्षात करणारी शब्दशैली व कृषी संस्कृतीचे अस्सल स्वरूप प्रत्ययाला आणून देणारी भाषाशैली या वैशिष्ट्यांमुळे हा कथासंग्रह वाचकमनाला भिडतो, अंतर्मुख करतो.
- DAINIK LOKSATTA 5-7-2009
राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथा परंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे.त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टीयुक्त जाणिवा, बदलता गावागाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरीत्या आविष्कृत झाली आहेत.समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते.गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो,तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे.बदलत्या गावागाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते.कृषी संस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध,जातीयतेची उतरंड याबद्दला जीवनार्थ ही कथा व्यक्त करते.गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावागाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते.आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते.या गोष्टींमुळे कृषी संस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची
रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती राहिलेला आहे.
नव्या कृषी संस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.